गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

पॉवर कंट्रोलर पवार ........!

 





पॉवर कंट्रोलर पवार .........!

बायको सरपंच किंवा नगरसेवक अथवा जिल्हा परिषद सभापती,एवढंच काय अध्यक्ष असेल तरी सगळा कारभार तिचा नवराच पाहत असल्याची हजारो उदाहरणे आपण रोज उघड्या डोळ्यांनी पाहतो मात्र मुख्यमंत्री म्हणून एक व्यक्ती अन फायनल डिसीजन मेकर म्हणून दुसरीच व्यक्ती असं पाहिलं नसेल कधी,मात्र हे पहायचं असेल तर महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर लक्ष दिल्यास हे स्पष्टपणे दिसून येईल .मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे बसले असले तरी निर्णय घेण्याचे अधिकार मात्र शरद पवार यांनाच असल्याचं चित्र सध्या दिसत आहे .राजकारणातील पतीराजांचा हस्तक्षेप थांबावा यासाठी महिला धोरणाचा पुरस्कार करणारे पवार मात्र आज पॉवर कंट्रोलर आहेत अस म्हटल्यास वावग ठरणार नाही .

महाविकास आघाडीच सरकार राज्यात येऊन आता आठ महिने होत आले आहेत,या काळात सरकार म्हणून काय चमकदार कामगिरी केली यापेक्षा एक गोष्ट अधिक तीव्रतेने जाणवली ती म्हणजे शरद पवार यांचा राज्य सरकारच्या निर्णयामधील हस्तक्षेप .विषय कोणताही असो पवार हेच रिमोट कंट्रोल असल्याचे वारंवार समोर आले आहे .कदाचित महाविकास आघाडी सरकारमधील पवार हे समन्वयक किंवा महाविकास आघाडीचे अध्यक्ष असावेत,त्यामुळे मंत्रालयातील प्रिन्सिपल सेक्रेटरी पासून ते थेट एखाद्या जिल्हाधिकारी पर्यंत सगळ्यांकडून पवार हे ब्रिफिंग घेत असल्याचे सध्या दिसून येत आहे .राज्यसभा खासदार असल्याने कदाचित त्यांना हे अधिकार असावेत .पण या सरकारचे कंट्रोलर शरद पवार आहेत हे मात्र नक्की .आता त्यांनी भविष्यात मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली नाही म्हणजे मिळवले .

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली अन सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप हा सत्तेपासून दूर राहिला .कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी काही सूत्र फिरवली की संजय राऊत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी भाजपची शिकार केली. हे करताना पवार यांनी काँग्रेस ला देखील आपल्या दावणीला बांधण्यात यश मिळवले .या त्यांच्या प्रयोगातून राज्यातील भाजप नेते आणखीनही सावरलेले नाहीत .

राज्यातील सरकार मध्ये कोणाला मंत्रिपद द्यायचे इथपासून ते अजित पवार यांचे बंड कसे मोडून काढायचे इथपर्यंत शरद पवार हेच लीड रोल मध्ये होते .पवारांनी या काळात आपली पन्नास वर्षांची राजकीय कारकीर्द अन डावपेच पणाला लावत भाजपला धक्का दिला .शिवसेनेत दुसऱ्याला मुख्यमंत्री पद दिल्यास बंडाळी होऊ शकते हे ओळखून पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पद घालण्यात यश मिळवले .अत्यंत शांत,सुस्वभावी हळू बोलणारे,विचारपूर्वक निर्णय घेणारे पण त्याच सोबत संघटन शक्ती मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे उद्धव ठाकरे हे देखील पवारांच्या गुगली ला समजू शकले नाहीत .ठाकरे सरकारचा राज्याभिषेक पार पडला अन शरद पवार यांनी सगळी महत्वाची खाती आपल्या पक्षाकडे घेत पहिला डाव टाकला .

त्यानंतर पहिल्या दिवसापासून शरद पवार यांचा राज्य सरकार मधील हस्तक्षेप सामान्य माणसाला देखील जाणवू लागला .एक दोन महिने होत नाहीत तोच कोरोनाच संकट देशासमोर उभं राहिलं आणि राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभे राहिले .या संकटातून बाहेर काढण्यासाठी पवार यांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली .सह्याद्री अतिथीगृह असो की सिल्व्हर ओक इथं पॅरालल बैठका घेण्याचा धडाका पवारांनी सुरू केला .

राज्याच्या बहुतांश सर्व खात्याचा आढावा पवार हे कोणत्या अधिकारात घेत होते हा प्रश्न विचारण्याची हिम्मत कोणातच नव्हती .कारण ज्या माणसांमुळे आपल्याला सत्तेची अन खुर्चीची ऊब मिळाली आहे त्याला जाब कसा विचारणार .पवार यांची खेळी यशस्वी झाली होती .सत्तेत प्रत्यक्ष कोणतंही पद नसताना ज्या पद्धतीने सोनिया गांधी यांनी दहा वर्षे केंद्र सरकारमध्ये युपीए सरकारवर नियंत्रण ठेवलं अगदी त्याच पद्धतीने पवार यांनी राज्य सरकारमध्ये सध्या लक्ष घातले आहे .

राज्यातील कोणताही निर्णय ,कोणत्याही खात्याचा विषय असो त्यावर पवार यांनी शेवटची मोहर उठवल्याशिवाय काहीच होत नाही हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे .कोरोनाच्या काळात आरोग्यमंत्री असणारे राजेश टोपे हे सुरवातीच्या काळात मीडियावर चांगलेच लोकप्रिय झाले मात्र अचानकच ते मीडियातून गायब झाले .याचे कारण ते स्वतः किंवा पक्षप्रमुख पवारच देऊ शकतील .पवार यांनी राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये पुढाकार घेतला असला तरी कोणत्या अधिकारात ते या बैठका अन निर्णय घेतात हे मात्र न उलगडणारे कोडे आहे .विशेष म्हणजे याबाबत ते एक काळजी नक्की घेतात की त्यांच्या बहुतांश बैठकांना कोणत्या ना कोणत्या खात्याचा मंत्री हजर असतो,म्हणजे उद्या कोणी आक्षेप घेतला तर राज्यसभा सदस्य म्हणून आपण हजर होतो अस म्हणायला पवार मोकळे .मात्र पवारांच्या या खेळी लहान लेकराला सुद्धा कळण्यासारख्या आहेत .

शरद पवार यांनी कोल्हापूर,पुणे,नाशिक,औरंगाबाद या ठिकाणी जाऊन गेल्या चार महिन्यात अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना देत सगळ्यांना कामाला लावले .काही दिवसांपूर्वी पुण्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत आढावा घेतला .कोरोना असो की अवकाळी झालेला पाऊस,एवढंच काय पण मध्यंतरी अजोय मेहता यांची पुन्हा नियुक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर बरेचशे सेक्रेटरी पवार यांना जावून भेटले अन मेहता यांच्याबाबत तोडगा काढण्याची आग्रही मागणी केली .प्रशासनातील मोठं मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यात देखील त्यांचा शब्द अंतिम असतो हे पोलीस दलातील बदल्यावरून जेव्हा तणाव निर्माण झाला तेव्हा समोर आले .

विधानपरिषद निवडणूक लागल्यानंतर देखील पवार यांचाच शब्द अंतिम असल्याचे स्पष्ट झाले .काँग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री आमची कामे करत नाहीत अशी नाराजी व्यक्त केल्यानंतर पवार यांनीच समज काढली होती .राज्याचे मुख्यमंत्री हे घराबाहेर पडत नाहीत मात्र मी स्वतः आढावा घेतो आहे हे चांगले नाही का असा सवाल त्यांनी स्वतः मध्यंतरी केला होता .

कोरोनाचा विषय असो की सुशांतसिंग राजपूत प्रकरण अथवा अगदी काल परवा पुढे आलेले कंगना राणावत प्रकरण,प्रत्येक ठिकाणी शरद पवार हेच पुढाकार घेऊन दिशा निर्देश देत असल्याचे दिसून आले आहे .पवार यांना प्रशासन आणि सत्तेचा मोठा अनुभव आहे हे मान्य आहेच पण त्यांच्या या सत्तेतील हस्तक्षेपामुळे राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .ठाकरे हे निर्णय घेण्यास सक्षम नाहीत की त्यांनी दिलेल्या आदेशानंतरही पवार यांची फायनल डिसीजन आवश्यक असते असे गेल्या सहा आठ महिन्यात वाटू लागले आहे .

राज्यसभा सदस्य म्हणून बैठकांना हजर राहण्याचा नक्कीच अधिकार पवार यांना असेल परंतु सगळी बैठक स्वतःच्या निर्देशानुसार घ्यायची,अधिकाऱ्यांना कामाला लावायचे हे कसे चालेल .उद्या आणखी एखाद्या राज्यसभा सदस्याने अशा पद्धतींने कारभार केला तर तो मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना चालेल का .राज्याचे पोलिस प्रमुख हे पवार यांना सकाळीच जाऊन ब्रिफ करतात,सगळ्या खात्यात काय काय सुरू आहे याची माहिती मंत्री तर देतातच परंतु अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून पवार हे देखील माहिती घेतात,याला कंट्रोलर नाही म्हणायचे तर काय म्हणायचे .

राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे प्रमुख म्हणून ते जर अशा पध्दतीने कारभार करणार असतील तर उद्या काँग्रेस किंवा शिवसेनेचे राज्यसभा सदस्य देखील बैठका घेतील मग हे पवार यांना चालेल का हे आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत .पवार यांनी सरकारच्या कामात किती हस्तक्षेप करावा आणि सरकारमध्ये बसलेल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांनी त्यांचे किती ऐकावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी पवार हे राज्यात एक नवे सत्ताकेंद्र निर्माण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सक्षम नाहीत यावर शिक्कामोर्तब करत आहेत हे सुद्धा ठाकरे यांना कळू नये का ?आणि कळत असूनही जर असेच चालू राहणार असेल तर बाहेर बसून सरकार चालवण्यापेक्षा पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी अन मग सगळा कारभार बिनबोभाट पणे हकावा, पण या पद्धतीने बाहेरून नियंत्रण ठेवून ते नेमकं काय साध्य करीत आहेत हे न उलगडणारे कोडे आहे .

महिलांना समान आरक्षण देण्याचं श्रेय शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतो कारण ग्रामपंचायत पासून ते महापालिका अगदी आमदारकी पर्यंत अनेक महिला निवडून आल्या तरी त्यांचा कारभार मात्र त्यांचे पतीराज च चालवत असत हे नेहमी समोर आले आहे .त्यामुळे पवार यांनी महिलांना सत्तेत समान वाटा देण्याचा निर्णय घेत पाळण्याची दोरी ते झेंड्याची दोरी असा सन्मान त्यांना मिळवून दिला कारण नवरोबा चा होणारा हस्तक्षेप त्यांना मान्य नव्हता .मात्र आज ते याच पद्धतीने कारभार करत आहेत याला काय म्हणायचे .म्हणजे आपण दुसऱ्याला शहाणपण शिकवायचे अन स्वतः मात्र मन मानेल त्या पद्धतीने वागायचे हे योग्य वाटत नाही .असो शेवटी पवार हे पॉवर मध्ये आहेत त्यामुळे सध्या ते जे करतील अन म्हणतील तीच पूर्वदिशा म्हणावी लागेल मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड

9422744404

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

मित्र माने इत्र ............!



मित्र म्हणजे इत्र ..........!

अस म्हणतात की जी गोष्ट आपण आई वडील,भाऊ बहीण,गुरुजन यांना मनमोकळ्या पध्दतीने सांगू शकत नाहीत ती गोष्ट आपण सहजपणे ज्याच्याजवळ बोलून मोकळं होतो ती व्यक्ती म्हणजे मित्र .मी आणि इतर किंवा त्रयस्थ यांना जोडणारा म्हणजे मित्र .मित्र हा आरशासारखा असतो तुम्ही जे आहात,तुमच्यातले गुण दोष सगळं सगळं जसच्या तस दाखवतो,अन तो सावलीसारखा देखील असतो,जो कितीही कठीण प्रसंग येवो तुमची साथ सोडत नाही .
हा मित्र कोणत्याही वयाचा,कोणत्याही जाती धर्माचा,कोणत्याही वर्गाचा असू शकतो .मैत्रीला वयाच किंवा जाती धर्माच,गरीब श्रीमंती च बंधन नसतं. वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात शेजारी शेजारी काम करणारे दोघे चांगले मित्र असतीलच असे नाही .कारण एका क्षणात मैत्रीचे सूर जुळतात अन आयुष्याचे जीवणगाने गुणगुणायला सुरवात होते . मैत्रीला जस जात,धर्म,पैसा, संपत्ती याच बंधन नसतं तसच मैत्रीत लिंगभेदाला सुद्धा फार किंमत नसते .दोन पुरुष हे चांगले मित्र असतात तसेच स्त्री आणि पुरुष सुद्धा चांगले मित्र असू शकतात .
मैत्रीमध्ये नेहमी कृष्ण सुदम्याच उदाहरण दिलं जातं कारण या दोघांमधील सामाजिक अन आर्थिक अंतर हे पृथ्वी अन आकाश एवढं मोठं होतं पण म्हणून त्या दोघांच्या मैत्रीत कधी अंतर निर्माण झाले नाही .मैत्री ही कर्ण अन दुर्योधनाची देखील होती .जिथं स्वार्थ किंवा मतलब नसतो तिथंच मैत्रीची बीज अंकुरतात अन त्याला समाधानाची फुले अन फळे लगडतात .मैत्री हे अस झाडं आहे ज्याला केवळ दुसऱ्याच दुःख वाटून घेत आनंद पसरवणे माहीत असतं .
शक्यतो माणसाच्या आयुष्यात शालेय जीवनातील मित्र कायम स्मरणात राहतात किंवा त्या वयात जी मैत्री होते ती चिरकाल टिकते कारण त्या वयात माणसाला गरीब श्रीमंत, जात पात हे भेद माहीत नसतात .व्यवसाय किंवा नोकरीमुळे देखील अनेक मित्र जोडले जातात,मैत्रिणी जोडल्या जातात मात्र ते रिलेशन लिमिटेड असते,लहणपनी झालेली मैत्री अनलिमिटेड असते .या मैत्रीला कोणत्याही प्रकारे एक्सपायरी नसते .मनातला कोलाहल न सांगता सुद्धा ज्याला केवळ आपल्या डोळ्यातून किंवा हलचालीतून कळतो तो खरा मित्र असतो .या मैत्रीची अनेक रूपे आहेत .पृथ्वीवर असा एकही व्यक्ती नसेल ज्याला मित्र नाही .स्वार्थ अन परमार्थ यातील अंतर सहजपणे पार करून एका वेगळ्या भावविश्वात सुखद अनुभूती देणारा म्हणजे खरा मित्र .बर हा मित्र पैशाने विकत घेता येत नाही अन देता सुद्धा येत नाही .
मैत्री ही खळाळत्या झऱ्या प्रमाणे असते, त्याचा तळ स्पष्टपणे दिसतो अन चव देखील गोडच लागते .अडचणीत मदतीला येतो तोच खरा मित्र अस म्हणतात मात्र अडचणी येणारच नाहीत यासाठी छातीचा कोट करून उभा राहतो तो खरा मित्र अस मी मानतो .कारण अडचणी प्रत्येकाला असतातच त्यावर जो तो आपापल्या परीने मार्ग शोधून मात करतो पण यात मार्ग दाखवण्याच काम देखील एक सच्चा मित्रच करतो .
रक्ताची नाती ही जन्माने मिळतात तर मानलेली नाती मनाने जुळतात मात्र जिथं रक्त अन मान दोन्ही वेगळं असूनही सूर जुळतात, मन जुळतात ती नाती म्हणजे मैत्री होय .कोणी कितीही मोठ्या पदावर,हुद्यावर गेला तरी त्याला भेटल्यानंतर एक सणसणीत शिवी तोंडातून बाहेर पडते अन गच्च मिठीत घेतल्यावर सगळ्या तक्रारी दूर होतात तो असतो मित्र .मैत्रीत अहो जाओ, आपपर भाव नसतो,थेट काळजाला हात घालणारी अरे तुरे ची साद असते .हजार शत्रूशी सामना करण्यासाठी एक सच्चा मित्र खूप झाला .बुडत्याला काडीचा आधार अस जे म्हणतात त्याच पद्धतीने रोजच्या जगण्या मरण्यांच्या रेसमध्ये जो खंबीरपणे सोबत उभा असतो,ऊन वारा वादळ भूकंप काहीही होवो जो आपला हात सोडत नाही तो खरा मित्र .
आयुष्यात जेव्हा केव्हा अडचणी येतात ,आयुष्याची चार्जिंग संपत जाते ,नात्याचे चार्जर जेव्हा काम करत नाही तेव्हा पॉवर बँक बनून जो मदतीला धावून येतो तो म्हणजे मित्र .या मैत्रीच्या अनेक कथा कहाण्या आहेत पण आयुष्याच्या स्क्रिप्ट मध्ये अथ पासून इति पर्यंत जो सोबत असतो ना तो म्हणजे मित्र होय .
मित्र माने इत्र असंही काहीजण म्हणतात,कारण ज्याच्या सहवासाने आपलं आयुष्य दरवळून  जात तो म्हणजे मित्र .या मित्रामुळे आपल्या बेचव आयुष्याला एक खमंगपणा येतो,ज्याप्रमाणे कितीही सुगरण स्त्रीने अतिशय सुंदर स्वयंपाक केला पण त्यात मिठच नसेल तर तो स्वयंपाक बेचव लागतो तसच आयुष्यात मित्र नसेल तर आयुष्य निरस, बेचव होतं .मित्र म्हणजे ऑक्सिजन आहे,माणसाचा श्वास थांबू न देण्याच काम ऑक्सिजन करतो तसच आपल्या आयुष्यात कधीच कोणतीच बाधा येऊ नये यासाठी मित्र धडपडत असतो . मोबाईल अन इंटरनेट च्या जमान्यात आज जो तो धावपळीत अन घाईगडबडीत आहे मात्र अशाही वेळी एक निवांत क्षण,किंवा एक विसाव्याच ठिकाण म्हणजे मित्र होय .या मित्रांसाठी एक दिवस निश्चितच पुरेसा ठरणार नाही,ज्याने आपल्या आयुष्यात अविभाज्य अशी जागा मिळवली आहे त्याला एक दिवस शुभेच्छा देऊन कसे भागेल .तरीही आजच्या मैत्री दिनानिमित्त माझ्या सर्व मित्रांना सस्नेह शुभेच्छा !

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404




शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

आठवणीतला पाऊस .........!

आठवणीतला पाऊस ..........!

लक्ष्मीकांत रुईकर ,बीड

9422744404

मित्रा वर्षातले आठ महिने मी तुझी वाट पाहत असतो,का म्हणून काय विचारतोस वेड्या,तू आलास की ती माझ्याजवळ येऊन घट्ट मिठीत विसावते,अरे हो खरच सांगतोय,हसू नकोस लबाड,तुझी शपथ,तू आलास ना की तुझ्या प्रत्येक थेंबात मला तिची आठवण ओलं चिम्ब करते,आमच्या प्रेमाचा पहिला वहिला साक्षीदार आहेस तू,मी असाच एकट्याने रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक तू आलास अन ओला चिम्ब होत मी तुझ्याशी गप्पा मारत मारत मनमुराद भिजलो,अस म्हणतात की पावसात भरपूर रडून घेतलं तरी चालत कारण आपले अश्रू दुःख कोणाला दिसत नाही,पण हे त्या दिवशी साफ खोटं ठरलं,जेव्हा तू धो धो कोसळत होतास,मी मनमुराद भिजत होतो अन मनातलं दुःख लपवत होतो,तेव्हा एक गोड आवाज कानावर आला अन अचानक भानावर आलो तेव्हा लक्षात आलं की कोणीतरी पाठीमागून मोठ्याने आवाज देत आहे,अरे वेड्या तो आवाज अनोळखी होता,मात्र त्यात आपलेपणा होता,अन मी वळून पाहिल्यानंतर पडत्या पावसात सुद्धा कोरडाठाक झालो,कारण जिला रोज स्वप्नात पहात होतो,ती माझी सखी माझ्यासमोर उभी होती,अन माझ्या हाताला धरून मला तुझ्यापासून दूर नेत होती
तुही किती खट्याळ मित्रा,काहीवेळ विश्रांती घेतलीस अन जणू काही मला इशारा केलास की जा आता उद्या भेटू
आजही आभाळकडं नजर गेली की तू आठवतोस कारण आमच्या पहिल्या भेटीचा साक्षीदार होतास तू,मित्रा आयुष्यात तो दिवस अन त्या दिवशीचा तू कधीच नाही विसरू शकत मी,त्यामुळंच म्हणतो जेव्हा जेव्हा तू येतोस तेव्हा तेव्हा ती मला बिलगून असते अन आम्ही दोघंही पुन्हा तुला अन त्या दिवशीच्या भेटीला आठवत रमून जातो

मंगळवार, २८ जुलै, २०२०

संतोष हे पटलं नाही ...............!


संतोष ,हे पटलं नाही ..........!!

पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोबाईल हातात घेतला अन धक्काच बसला,गेवराईचा पत्रकार ,जिवलग मित्र संतोष भोसले याच्या अकाली निधनाची बातमी वाचली अन दोन मिनिटं पायाखालची जमीन सरकली .खर्जातला जाडा भरडा भारदस्त आवाज,आपल्याच ठेक्यात जय महाराष्ट्र म्हणण्याची पद्धत,बातमी मागची बातमी शोधून त्यावर वैचारिक चर्चा,राजकारण ,समाजकारण,साहित्य याबाबतीत असलेला अभ्यास या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर तरळून गेल्या.
संतोष म्हणजे समाधान ,सुख,शांती या सगळ्या गोष्टीसोबत जिज्ञासा असणारा व्यक्ती म्हणजे गेवराईच्या पत्रकारितेतील एक आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व संतोष भोसले .
संतोष पत्रकार असला तरी तो बाळासाहेब ठाकरे यांचा एक सैनिक म्हणूनच जगला,ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारा हा सैनिक आयुष्याचा सामना मात्र अर्ध्यातच सोडून मृत्यूसमोर शस्त्र खाली ठेवत निघून गेला हे खूप क्लेशदायक आहे .संतोष अन माझा स्नेह तसा वीस वर्षापासूनचा .गेवराईच्या पत्रकारिता क्षेत्रातील मित्र अय्युब बागवान,सुभाष सुतार,मधुकर तौर,सुभाष मुळे, गणेश क्षीरसागर, काझी अमान् या सगळ्यांमध्ये वेगळा असलेला संतोष लगेच लक्षात यायचा .
आपलं मत अत्यंत स्पष्टपणे मांडून प्रसंगी समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करून संतोष आपला मुद्दा त्या व्यक्तीच्या गळी उतरवायचा ही त्याची खासियत होती .बातमी मग ती गेवराईची असो की राज्य अथवा राष्ट्रीय पातळीवरील ,त्याच्यासोबत चर्चा करायला एक वेगळी मजा यायची,प्रत्येक बाबतीत चांगला,वाईट,बाजूने विरोधात विचार करून तो आपलं मत मांडायचा .
कधीही भेट झाली की भारदस्त आवाजात जय महाराष्ट्र घालून काय सर सेवेची संधी द्या,गरीबासोबत चार घास खा असं हक्कानं म्हणून खळखळून हसत आयुष्याची मजा घेणारा संतोष असा अचानक निघून गेला हे बुद्धीला अजूनही पटत नाही .गेवराईत एखादी घटना घडली की बातमी मागची बातमी काय असेल याची खबरबात जाणून घ्यायची असेल तर संतोष ला फोन केला की आपल्या खास शैलीत तो नेमकं का,कसं, कुठं,कधी घडलं हे सांगायचा .
गेवराई तालुक्यातील दोन्ही पंडित अन पवार यांच्यातील राजकीय वैरभाव असो की इतर कोणताही विषय हा माणूस अथ पासून इति पर्यंत खडा न खडा माहिती ठेवून असायचा .त्याची अन माझी भेट सुभाष सुतार सोबत बीडमध्ये व्हायची .ते दोघे आजही अगदी अलीकडच्या काळापर्यंत बीडमध्ये आले की माजीमंत्री  सुरेश नवले यांची भेट घेतल्याशिवाय जात नसतं .
एक वेगळं रसायन होता संतोष,अत्यंत लाघवी स्वभाव,आपलंसं करण्याची कला अवगत असलेला हा पत्रकार त्याच्या अनेक शोध बातम्यांमुळे प्रकाश झोतात आला मात्र त्याचा माज कधी त्याच्या वागण्या बोलण्यातून जाणवला नाही .राजकारणी असो की समाजकारणी प्रत्येक व्यक्तीसोबत त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते .पत्रकारितेत नव्याने आलेल्या तालुक्यातील अनेक पत्रमित्रांचा तो हक्काचा मामा होता .

सामना सारख्या हिंदुत्ववादी दैनिकात वार्ताहर म्हणून काम करीत असताना सुद्धा सर्वपक्षीय नेते अन कार्यकर्ते यांचा तो जवळचा अन लाडका होता .कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर त्याने यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत लेख देखील लिहिला होता अन आज तोच मित्र कोरोनाच्या धास्तीने अचानक सोडून गेला .आयुष्याचा सामना धीरोदात्तपणे अन छातीठोकपणे उभं राहून लढायचा असतो अन जिंकायचा असतो हे इतरांना सांगणारा हा अवलिया मित्र आज मात्र स्वतःच अचानक निघून गेला अन आम्हा पत्रकारांनाच नव्हे तर गेवराईतील अनेकांना पोरकं करून गेला .मित्रा तुझं हे असं अचानक जाणं मनाला काही पटलं नाही बघ .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड.
9422744404


सोमवार, १५ जून, २०२०

लोड लेनेका नही देनेका ..........!



लोड लेनेका नही देने का ..........!

अस म्हणतात की जन्म आणि मृत्यू या दोनच गोष्टी माणसाच्या हातात नाहीत बाकी सगळं त्याच्या आवाक्यात आलं आहे,मात्र 21 व्या शतकात माणूस टेस्टट्युब बेबी च्या माध्यमातून जन्म अन आत्महत्येच्या माध्यमातून मृत्यू देखील आपल्या हातात ठेवण्यात यशस्वी झाला आहे,सुशांत ने केलेल्या आत्महत्येच्या प्रकारानंतर हे प्रकर्षाने जाणवू लागल आहे .मृत्यू मग तो नैसर्गिक असो की अनैसर्गिक तो चटका लावूनच जातो मात्र सुशांत सारख्या सेलिब्रिटी ने मरणाला कवटाळण जास्त वेदना देऊन  जातं. माणसानं दगडाशी का होईना पण बोललं पाहिजे अन आपलं मन मोकळं केलं पाहिजे हे तितकंच खरं आहे .

अवघ्या 30 -35 वर्षाच्या आयुष्यात सुशांत सिंग राजपूत इतका कंटाळला की त्याने अचानक एक्झिट घेतली .मोठे तितके खोटे अन जया अंगी मोठेपण तया यातना कठीण अस जे म्हणतात ते या घटनेने पुन्हा एकदा तंतोतंत खर ठरलं .लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा अस आपले आई बाप सांगतात ते काही खोटं नाही .चंदेरी दुनियेतील झगमगाट हा डोळ्यांना दिपवून टाकतो मात्र या झगमागटामागे किती काळ सत्य दडलेलं असत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं .
सुशांत सिंग राजपूत असो की भैयु महाराज अथवा मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी हिमांशू रॉय ,काय नव्हतं या लोकांजवळ, ऐश्वर्य म्हणजे काय असतं हे या लोकांकडे पाहिल्यावर कळतं, मात्र तरीही हे लोक आयुष्याला कंटाळले,प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतील ,मात्र आयुष्यात कोणत्याही अडचणींवर मात करता येत नाही अस नाही,पण तरीदेखील या लोकांनी आत्महत्या सारखा निर्णय घ्यावा म्हणजे खूप वाईट आहे .
माणूस जन्मल्यापासून तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेला असला किंवा आठरविश्व दारिद्र्य घेऊन जन्मलेला असो .अडचणी प्रत्येकाच्या नशिबात येतातच,अडचणी संकट नसली तर आयुष्य बेचव होईल .
सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच आयुष्याचा प्रवास करावा लागतो .ज्या अभिनेत्याने रील लाईफ मध्ये आत्महत्यापासून कस दूर राहायचं हे शिकवलं अन दाखवलं त्यानेच मृत्यूला कवटाळण योग्य नाही वाटत .एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी ला जवळच अस कोणीच नसावं हे केवढ दुर्दैव आहे .सुशांत असो की भैयु महाराज यांनी आपल्या क्षेत्रात लोकांना जगण्याची नवी उमेद शिकवली,त्यांच्या आदर्शावर अनेकजण आयुष्यात स्थिर झाले असतील मात्र याच लोकांनी असा निर्णय घेणे हे बुद्धीला पटत नाही .

आयुष्याच्या पटावर आपण प्यादेच असतो मात्र आपण वजीर म्हणून खंबीरपणे पाय रोवून उभं राहिल्यास येणारी संकट दूर करून संकटावर मात करता येते .हे साध गणित या सेलिब्रिटी लोकांना माहीत नसावं हे किती अवघड आहे .कितीही संकट आली तरी मनाने खंबीर असलेला माणूस शेवटपर्यंत संघर्ष करतो अन सुखाच्या शोधात शेवटपर्यंत राहतो अन जगतो .मात्र सुशांत सारखे लोक जर इतक्या लवकर हार मानणार असतील तर त्यांना फॉलो करणाऱ्या लोकांनी काय करायचं हा प्रश्नच आहे .
आत्महत्या हा उपाय असू शकत नाही,कारण माणसाला नेहमी अडचणी येतातच,नव्हे अडचणी आल्याशिवाय जगण्यात मजाच नाही मग या अडचणी आल्यावर त्यांना तोंड देण्यापेक्षा तो पळवाट का शोधतो हा संशोधनाचा विषय आहे .सुशांत हा सेलिब्रिटी आहे म्हणून त्याच्या मृत्यूवर अनेकांनी हळहळ व्यक्त केली मात्र देशात रोज शेकडो शेतकरी मरणाला कवटाळतात त्याबाबत कोणाला काही वाटत नाही अशा पोस्ट वाचण्यात आल्या,ते बरोबर आहे .मात्र सुशांत सारखे लोक चंदेरी दुनियेत असल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे म्हणून सोशल मीडियावर जास्त हळहळ व्यक्त झाली .याचा अर्थ शेतकऱ्यांची आत्महत्या कमी अन सुशांत सारख्या सेलिब्रिटी ची मोठी असा होत नाही .पण सोशल मीडियावर कोणी काय अन कस व्यक्त व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .
माणसाच्या आयुष्यात एक तरी जागा किंवा मित्र मैत्रिण अशी असावी की जिथं आपल्याला आपलं मन मोकळं करता येईल,एक तरी खांदा असा हवा की त्यावर आपलं डोकं ठेवून धायमोकलून रडता येईल .पण सिमेंट काँक्रीट च्या या जंगलात शहरं वाढली अन माणुसकी,आपुलकी,जवळीकता ,संवेदनशीलता कमी झाली .फ्लॅट संस्कृती मुळे माणसाची वृत्तीदेखील संकुचित झाली अन त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले .रोज कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणावरून आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात .अगदी टीव्हीवर कार्टून पाहू दिलं नाही म्हणून एका लहानग्यांन दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली,परीक्षेत अपयश आल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या असोत की प्रेम भंगातून होणारे मृत्यू,अथवा कर्जबाजरी पणाला कंटाळून होणाऱ्या आत्महत्या असोत,जीवन खूप सुंदर आहे,मात्र त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे याचा विसर या लोकांना पडतो अन मग हे अस पाऊल ते उचलतात .

माणसाकड दोन वेळच भागेल एवढाच पैसा असावा अस नेहमी म्हंटल जात मात्र मनुष्य स्वभावानुसार तो गाडी,घोडी,घरदार,जमीन जुमला यासाठी मरमर करतो अन जाताना मात्र फुटका मनी तोंडात घेऊन जातो,हे सगळं माहीत असून सुद्धा माणूस पैशाच्या मागे धावतो हे किती मोठा दुर्दैव आहे .माणूस आपल्या स्वतःकड बघून  जगण्यापेक्षा दुसऱ्यासोबत स्पर्धा करण्यात धन्यता मानतो अन मग त्याचा शेवट दुर्दैवी होतो .

येताना नागवा अन जातानाही नागवच जाव लागतं मात्र तरीही आपण नेहमी दुसऱ्याच्या संपत्तीकडे पाहतो,अगदी भाऊ भाऊ असो,बहीण भाऊ असो की बाप लेक, जावा जावा ,प्रत्येकजण दुसऱ्याच्या ताटात काय अन किती आहे हे पाहण्यात तो आपल्या ताटाकड अन पोटाकड दुर्लक्ष करतो .किती लागत हो जगायला,दिवसभरात चार पोळ्या,भाजी किंवा चटणी,पण माणूस दुसऱ्याच्या नादात स्पर्धा करण्यासाठी म्हणून नको तेवढं कमवायच्या मागे लागतो अन मग नाही भेटलं की मरणाला कवटाळतो .
त्यामुळं एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे की मनुष्य जन्म एकदाच मिळतो त्यामुळे भेटलेल आयुष्य सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झोका घेत घेत जगायचं,कितिही मोठं संकट आलं, दुःख वाट्याला आलं,तरी हे आपल्या नशिबाचे भोग आहेत अस म्हणून सगळं काही नशिबाच्या माथी मारून मोकळं व्हायचं .लोड लेनेका नही देने का हे कायम लक्षात ठेवल्यास अशक्य अस काहीच नाही.तेव्हा खचून न जाता धैर्याने जगा अन आलेल्या परिस्थितीला तोंड देत आयुष्याचा प्रवास सुखाचा करा .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

शुक्रवार, १२ जून, २०२०

डी एम गेट वेल सून ...........!


डी एम गेट वेल सून ..........!
धनंजय मुंडे हे नाव आज राज्यातील कानाकोपऱ्यात परिचित झालं आहे ते त्यांच्या भाषणामुळे अन दांडग्या जनसंपर्कामुळे .तब्बल सहा सात वर्षांपूर्वी स्व गोपीनाथ मुंडे यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर ते टीकेचे धनी झाले,अगदी त्यांना खलनायक म्हणून काही वर्षे टिका सहन करावी लागली,मात्र कोशीष करनेवाले की हार नही होती हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ते लढत राहिले अन आज राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे .आयुष्यात कायम संघर्ष वाट्याला आलेल्या धनंजय यांना आता कोरोनाशी दोन हात करावे लागणार आहेत, मात्र नेहमीप्रमाणे ते कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा जनसेवेत रुजू होतील हे नक्की .
धनंजय मुंडे म्हणजे ग्राऊंडवरचा गडी, कायम लोकांत राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेला नेता म्हणून आज त्यांची राज्यभर ओळख आहे .रात्री अपरात्री कधीही ,कोणीही फोन केला तरी ते हजर असतात .आपले काका गोपीनाथ मुंडे आणि भाजपनेते प्रमोद महाजन यांच्याकडे बघून मोठे झालेले धनंजय यांच्या बोलण्यात मुंडे महाजन यांची छाप कायम जाणवते .
गोपीनाथ मुंडे म्हणजे आपले राजकीय गुरू अस मानून या एकलव्याने त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात जिल्हा परिषद पासून सुरवात केली .आज ते राज्याच्या मंत्रिमंडळात मानाच्या स्थानावर आहेत .
बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांना सोडल्या नंतर धनंजय हे टीकेचे धनी झाले,त्यांच्या समाजातच नव्हे तर राज्यात ते खलनायक ठरले .राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी टाकत गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर उभं केलं .धनंजय यांनीदेखील आपल्या पदाची प्रतिष्ठा राखत पदाला न्याय दिला,मात्र यावेळी त्यांच्यासमोर होत्या बहीण पंकजा मुंडे .ग्रामपंचायत असो की विधानसभा, लोकसभा प्रत्येक निवडणुकीत या बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली राज्याने याची देही याची डोळा पाहिलं आहे .गेल्या पाच वर्षात पंकजा आणि धनंजय यांच्यातील राजकीय वैरभाव अधिक गडद झाला,बहिणीच्या खात्यातील भ्रष्टाचार बाहेर काढताना धनंजय यांनी आरोपांच्या ज्या फैरी झाडल्या त्यामुळे नात्यातील कटुता अधिकच वाढली .मात्र तरीही ते मागे हटले नाहीत .प्रत्येकवेळी दोघेही एकमेकांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नव्हते .
धनंजय म्हणजे एक शापित राजकुमार अस बोललं जायचं,कायम संघर्ष आणि तोही रक्ताच्या नात्याशी,त्यामुळे वेळप्रसंगी ते अनेकदा भावुक अन व्यथित होत असलेल अनेकांनी पाहिलं आहे,तसच बहीण पंकजा यांच्याबाबतीत सुद्धा घडत होतं,मात्र दोघांचे पक्ष अन विचार वेगळे असल्याने संघर्ष योगायोगाने व्हायचाच, पण त्यामुळे राजकीय गणित मात्र अनेकदा बदलेली पाहिली गेली .
बहीण भावाच्या या संघर्षात कार्यकर्ते देखील भरडून निघाले,धनंजय यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले मात्र आगीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय जस सोन्याच मोल कळत नाही तसेच त्यांच्याबाबतीत सुद्धा झालं .लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था असो की बीड लोकसभा निवडणूक प्रत्येकवेळी धनंजय याना राजकीय मात देण्यात पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या, मात्र या पराभवामुळे खचून न जाता धनंजय मुंडे यांनी त्यातून प्रत्येकवेळी एक नवा धडा घेत आपली लढाई सुरू ठेवली .
परळी विधानसभा निवडणुकीच्या काळात पंकजा मुंडे यांचा पराभव होईल हे कोणालाच अपेक्षित नव्हते .कारण लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना दीड लाखापेक्षा अधिकचे मिळालेले मताधिक्य .मात्र प्रत्येक निवडणुकीची गणित ही वेगळी असतात,त्यामुळे मागच्या अनुभवातून शिकून पुढे जायचे असते,पराभवाने खचून अन विजयाने उन्मादुन न जाता संयमाने वाटचाल करायची असते हा धडा त्यांनी गिरवला होता,त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झाला .धनंजय मुंडे यांचा थेट असलेला जनसंपर्क त्यांना या निवडणुकीत कामाला आला अन त्यांनी विजयाची पताका फडकावली .
महाविकास आघाडीच्या सरकार पूर्वी मुंबईत ज्या घडामोडी घडल्या त्यातही धनंजय मुंडे हे टीकेचे धनी झाले .अजित पवार यांच्याशी असलेलं सख्य त्यांच्या टिकेसाठी कारणीभूत ठरले .मात्र त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली .सामाजिक न्यायमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी गरीब कल्याणासाठी काम सुरू केलं .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तळ ठोकून बसलेल्या धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले,यासह जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांनी प्रशासनाला कामाला लावले .कोरोना असताना देखील लोकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते कायम कार्यरत होते .मात्र मुंबईत गेल्यानंतर ते स्वतःच कोरोना बाधित झाले अन पुन्हा त्यांच्या संघर्षाची आठवण लोकांना झाली .
कोरोना हा आजार झालेले मुंडे हे महाविकास आघाडी सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत .त्यांना फार लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्या स्वास्थ्यासाठी समर्थकांनी पूजा,प्रार्थना सुरू केली आहे,कायम लोकांत रमणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्यांसाठी कार्यकर्ते चिंतेत पडले आहेत .या अशा काळात कोण आपला अन कोण परका  हे कळतं .धनंजय यांचा दांडगा जनसंपर्क पाहता आणि लढण्याची इच्छाशक्ती पाहता ते या संकटावर सुद्धा लीलया मात करतील यात शंका नाही .ते लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू होतील ही अपेक्षा आहे .जनसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या संघर्ष योध्याला प्रकृती स्वास्थ्यासाठी अन जनसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा !
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

सोमवार, ११ मे, २०२०

गायछापच्या खारवड्या ...........!



गायछापच्या खारवड्या .................!

तुम्ही सगळ्यांनी म्हणजे बहुतांश जणांनी पापड्या ,कुरडया,खारवड्या खाल्याचं असतील ना,उपवासाच्या पापड्या,ज्वारी,बाजरी,बटाटे अशा वेगवेगळ्या पापड्या खाल्या असतील अन खारवड्या सुद्धा नाही का,या खारवड्या बाजरीपासून बनतात हे सगळ्यांना माहीत आहे मात्र तुम्ही गायछापच्या खारवड्या खाल्या आहेत का कधी, नाही ना,मी पण नाही खाल्या मात्र आमच्या एका मित्राने लॉक डाऊन च्या काळात त्या केल्या असाव्यात अशी आम्हाला शंका आहे .
आम्ही दोन चार मित्र सकाळी सहज गप्पा मारत बसलो असताना अचानक गाय छापचा विषय निघाला अन लगेच उदय जोशीने सिक्सर मारला,तो म्हणला त्यांनी गायछापच्या खारवड्या घातल्या असतील अन आम्ही सगळे पोट धरून हसू लागलो,हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे या कोरोनाच्या महामारीने अनेकांना अनेक अनुभव दिले आहेत,म्हणलं आज यातील काही अनुभव लिहून काढावेत .
साधारणपणे मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून देशावर कोरोनाचे काळे ढग जमू लागले होते  .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यु जाहीर करून भारतवासियानो आता महिना दीड महिना घरातच रहा असा संदेश दिला .कधीही  आठ दहा तासापेक्षा जास्त काळ घरात बसू न शकणाऱ्या,त्यातही अर्धवेळ झोपेतच घालवणाऱ्या बहुतांश भारतीयांना हे पचनी पडणार नव्हतं मात्र तरीही गेल्या पन्नास दिवसापासून तमाम लोक हे सरकारी आदेशाचे शक्य तेवढे पालन करीत आहेत .
मात्र शेवटी आपण  सगळे भारतीयच आहोत ,सरकारने कितीही बंधन घातली,आर्जव केली,कायदे केले,एवढंच काय पण गुन्हे दाखल केले तरी आपण या घरबंदी मधून बाहेर पडण्याचा येनकेन प्रकारे प्रयत्न करीतच असतो अन त्यातून मग घडतात वेगवेगळे किस्से .

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा थुंकल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून सरकारने तंबाखू,गुटखा,सिगारेट च्या विक्रीवर बंदी घातली,सर्व दुकाने टपऱ्या बंद केल्या नव्हे सील केल्या मात्र कोणत्याही बंदी घातलेल्या गोष्टी सहज उपलब्ध करून घेण्यात आम्हा भारतीयांना एक वेगळाच आनंद मिळतो तसा या गोष्टीतही का नाही मिळणार,म्हणून मग मागच्या दाराने, चोरी छुपे या वस्तूंची खरेदी विक्री सुरू झाली,त्यातल्या त्यात भाव दुप्पट होऊन देखील आजही या वस्तू सहजपणे मिळू लागल्या आहेत हे विशेष .मध्यंतरी बीडच्या पोलीस खात्याने तब्बल चाळीस कोटी रुपयांचे गुटख्याचे कुपन पकडले होते,त्यात वरकरणी आरोपी वेगळे असले तरी यात एका जिल्हाप्रमुखाचा हात होता अन तो हा धंदा पार्टनर शिप मध्ये करत होता असे नंतर कळले मात्र या कारवाईचे पुढे काय झाले ते काही समोर आले नाही ,असो .तर विषय हा आहे की गुटखा,सिगारेट,पान, तंबाखू,दारू विक्रीवर बंदी घातलेली असली तरी या सगळ्या गोष्टी सर्रास उपलब्ध होत आहेत,भाव फक्त जास्त आहेत एवढंच .
काही ठिकाणी अन्नधान्याच्या नावाखाली सर्रास तंबाखू अन गुटख्याची तस्करी केली गेली तर अनेक लोक हे दुधाचे टँकर,टेम्पो,जनावरांची वाहतूक करणारी वाहने यातून गावाकडे जाताना पकडले गेले .अनेक बियरबार, वाईन शॉप मालकांनी स्टोक घरी घेऊन जात होम डिलिव्हरी करून यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक केली .

एका राजकीय नेत्याला मालिश करण्याची हुक्की आली,मग काय शेठने मालिश करणाऱ्याला चारचाकी गाडी पाठवली अन घरी बोलावून घेतलं,सगळ्या अंगाची मालिश झाली अन नेत्याला झोप लागली,मालिश करणारा पायी पायी निघाला घराकडे अन त्याला गाठलं पोलिसांनी आणि त्याची एवढी धुलाई केली की त्याला स्वतःचीच मालिश करण्याची वेळ आली .

अशाच आमच्या एका मित्राने गेल्या महिनाभरात तब्बल ऐंशी च्या आसपास गायछाप तंबाखूच्या पुड्या फस्त केल्याचा विषय निघाला,आता एवढ्या पुड्या त्याने एकट्याने खाल्या की गावजेवन दिल्याप्रमाणे वाटल्या .हे त्यालाच माहीत,मात्र हा विषय निघाला अन आम्हालाही आश्चर्य वाटलं,तेवढ्यात उदय जोशी ने आपल्या खास शैलीत सांगितले की कदाचित त्यांनी गायछापच्या खारवड्या घातल्या असतील,ही कल्पनाच भारी आहे,गायछाप तंबाखुला चुना लावायचा,त्या मिश्रणाला खारवड्या प्रमाणे वाळत घालायचं अन झाल्या गायछापच्या खारवड्या तयार,तर आजकाल या गायछाप ला सोन्याचा भाव आला आहे,दहा रुपये किरकोळ किंमत असलेली ही पुडी आज शौकीन अन व्यसनी लोक तीस चाळीस रुपयांना खरेदी करत आहेत .
हे झालं गायछापच,इतरही सगळ्याच न मिळणाऱ्या किंवा समोरून शटर बंद असलेल्या गोष्टीसुद्धा या कोरोनाच्या संकटात बेभाव मिळू लागल्या आहेत .आता दारुचच घ्या ना,राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व बियर बार अन वाईन शॉप ला।सील केलं असल तरी देखील तळीरामांना सहजपणे मदिरा उपलब्ध होत आहे,दीडशे रुपयांची बाटली पाचशे रुपयांना मिळत असली तरी देणारा उपकार केल्याप्रमाणे अन घेणारा कृतकृत्य झाल्याप्रमाणे भाव चेहऱ्यावर आणून याचा आनंद घेतात हे नक्की .
देशात लॉक डाऊन असताना बीडच काय पण जिल्ह्यात अन राज्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे दारू मिळत आहे,अट फक्त एकच आहे जी स्टोक मध्ये असेल तिच्यावर भागवावे लागत आहे,नही मामु से नकटे मामु सही याप्रमाणे जी मिळेल ती गोड मानून तळीराम आपला घसा ओला करत आहेत हे नक्की .ही दारू उपलब्ध व्हावी म्हणून जुने जाणते मित्र,नातेवाईक,जुने कस्टमर अशांच्या ओळखी काढून हौस भागवली जात आहे .एकंदर काय तर रोज नाइंटि का होईना मिळाली पाहिजे हे खरं,बाकी ती ओरिजिनल आहे की डुप्लिकेट याला सध्या कोणी महत्व देत नाही .
संचारबंदी शिथिल असल्याच्या काळात अनेकजण सहलीला निघाल्याप्रमाणे बाहेर पडत असून काहीजण बँकेत गार्डन मध्ये फिरायला आल्यासारखे येतात,शंभर दोनशे रुपये भरतात किंवा काढतात नाहीतर एक तासभर लाईनमध्ये उभं राहून  बॅलन्स किती आहे चेक करा अन पासबुक भरून द्या अस सांगत आपली बाहेर फिरण्याची हौस भागवून घेत आहेत .काही महाभाग तर एक बिस्किटंचा पुडा किंवा एक कोथिंबीर ची जुडी घेण्यासाठी बाहेर पडतात.
एका मित्राने तर भन्नाट किस्सा सांगितला, लॉक डाऊन च्या काळात बायकोने गाऊन घेण्याची फर्माईश केली मग काय दुकानात घेऊन जावं लागलं,दुकानात सोडून साहेब पत्नीला आणायला गेले तर दुकानात पाच पंचवीस बायका तोंडाला बांधून खरेदी करत होत्या,याची अडचण झाली कोण आपली बायको अन कोण दुसऱ्याची,शेवटी याने आवाज दिला अन बायकोला घेऊन घर जवळ केलं.आता मला सांगा गाऊन नसला तर एवढं काही बिघडत का पण नाही लॉक डाऊन च्या काळात खरेदी केली हे मैत्रिणींना सांगायला पाहिजे ना म्हणून कदाचित वहिणीसाहेबांनी गाऊन खरेदीची फर्माईश केली असावी,बर आणल्यावर मैत्रिणी म्हणल्या अग हा चांगला नाही,कलर धुरकट आहे बदलून आण, मग पुन्हा साहेब दुकानात .
काही महाभाग हे घरच खाऊन खाऊन बोर झाले म्हणून त्यांनी सरळ खानावळ किंवा हॉटेल ला फोन केला ,मग तिथं वेगवेगळ्या पदार्थासोबत घसा ओला करण्याची सोय असणाऱ्या हॉटेल किंवा खानावळीला प्राधान्य दिलं गेलं .कुलर असो की एसी अथवा कॉम्प्युटर खरेदी सगळं काही आतल्या दारान किंवा मागच्या दारान सुरूच आहे .
या महिन्यात अनेकांचे वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस देखील आहेत त्यामुळे त्यातील काही जणांनी टरबूज कापून केक कापल्याचा आनंद मिळवला तर काहींनी स्वीट होम मधून केक आणून सेलिब्रेशन केलं .अनेकांनी आपल्या नातेवाईकांना ,कुटुंबियांना आजारी पाडल अन त्यांच्या जुन्या फाईल सोबत घेऊन गावातून एक फेरफटका मारण्यात धन्यता मानली .
सरकारी कर्मचारी देखील यामध्ये मागें नाहीत,सरकारी कार्यालयात केवळ दहा किंवा 33 टक्के कर्मचारी हजर असावेत असा आदेश असताना काही महाभाग गळ्यात कार्यालयाचे ओळखपत्र घालून फिरताना दिसून आले .अगदी या काळात पत्रकार देखील मोठ्या संख्येने झाले,कोणीही सोम्या गोम्या गळ्यात प्रेस च कार्ड घालून पोलिसांसमोर बिनधास्त फिरताना दिसून आले .
अनेकांनी पोलीस आणि इतर गोरगरिबांना अन्नदान करण्याच्या नावाखाली पास मिळवले अन ते रस्त्यावर बिनधास्त उंडारू लागल्याचं चित्र पहावयास मिळालं .काही पोलीस बांधवांनी देखील मग अंतर्वस्त्रे खरेदी करण्याची हौस भागवून घेतली .हे सगळं पाहिल्यानंतर एक प्रश्न पडला की खरच आपण कोरोना बाबत किती जागरूक आहोत,देशावर मोठं संकट आलेलं असताना आपण मात्र या संकटात घरात बसून सरकारला सहकार्य करण्याऐवजी बाहेर उंडारत फिरण्यात धन्यता मानली आहे .दोन महिने नाही पिली दारू,नाही कपडे खरेदी केले,नाही व्यसन केले तर आपण मरणार आहोत का ,नक्कीच नाही पण कायदा मोडण्यात आपल्याला मोठा चेव येतो ना त्यामुळे आपण गायछापच्या खारवड्या सुद्धा करून टाकुत हे या संकटकाळात प्रकर्षाने दिसून आलं .कधी सुधारणार आहोत आपण हे देवालाच माहीत अस यानंतर म्हणावं वाटतं .या सगळ्या संकट काळात आपण घरात राहावं,बाहेर पडू नये,गर्दी करू नये यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र झटत आहे आपण मात्र हे सगळे नियम,कायदे धाब्यावर बसवून कसे नियम मोडले याचे किस्से रंगवण्यात आघाडीवर आहोत,काय मिळवणार आहोत यातून आपण,कोणतं मेडल मिळणार आहे,हे सगळं करून आपण आपलंच नाही तर आपल्या कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं आरोग्य बिघडवत आहोत हे आपल्याला कधी कळणार आहे .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

काळ सोकावतो आहे ...........!




काळ सोकावतो आहे .............!

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो मात्र या चौथ्या स्थम्भाला कायम अडचणीत आणण्याचे उद्योग अलीकडच्या काळात होत असल्याचे दिसून येत आहे,बातमीमुळे अफवा पसरली गेली किंवा एखाद्या पोस्टवरून समाजात दुही निर्माण झाली अशी कारणे देऊन पुन्हा एकदा एका पत्रकाराला राज्यात पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागले,झालेली कारवाई चूक की बरोबर यावर वाद विवाद होऊ शकतात मात्र ज्या पद्धतीने सूडबुद्धीने प्रशासन वागत आहे ते पाहता म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आहे हे वाईट आहे असेच म्हणावे लागेल .

एबीपी माझा चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या एका तथाकथित बातमीमुळे गर्दी जमली अन गोंधळ निर्माण झाला असे तारे सरकार अन प्रशासनाने तोडले आणि राहुलला अटक केली,त्यानंतर बुधवारी दुसरे प्रकरण समोर आले ते बीडला .
गेल्या तीस वर्षांपासून पार्श्वभूमी नावाचे दैनिक चालवणारे संपादक गंमत भंडारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करीत रात्रभर कोठडीत डांबून ठेवले .काय गुन्हा केला त्यांनी तर एक पोलीस कर्मचारी हा मुंबई भागातून बीड जिल्ह्यात आल्याची आणि त्यांच्यामुळे कोरोना फैलावू शकतो का अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्याची चार ओळीची बातमी व्हायरल केली .

हा सगळा प्रकार भंडारी यांनी जाणीवपूर्वक केला होता का तर निश्चितच नाही,त्यामागे दोन समाजात किंवा जनतेत गोंधळ निर्माण व्हावा असा हेतू होता का तर नाही,किंवा आपल्या बातमीमुळे दैनिकाचा खप वाढावा असंही त्यांचं मत नसावं पण तरीदेखील पोलीस प्रशासनाने अशा पध्दतीने कारवाई केली की जणूकाही भंडारी हे अट्टल दरोडेखोर किंवा चोर आहेत .गंमत भंडारी यांना जे लोक ओळखतात त्यांना माहीत आहे की कडक बोलणारा,कडक शब्दात लिहिणारा,जे लोकांना वाटते ते त्यांच्याच शब्दात मांडणारा हा संपादक आहे .
काहीवेळा ते एकांगी लिहितात,स्वतःला न्यायाधीश असल्यासारख्या ऑर्डर सोडतात,नको ते सल्ले देतात हे देखील।सत्य आहे मात्र त्यामागे त्यांचा स्वतःचा काही स्वार्थ नेहमीच असतो असे नाही .
पार्श्वभूमी मध्ये मुख्य बातमी हीच मुख्य आकर्षण असते ,या बातमीत संपादक हे स्वतःच मत व्यक्त करतात त्यामुळे अनेकवेळा ती अतिरंजित वाटते .घटना जशी घडली त्यापेक्षा ती का घडली,रोखण्यासाठी काय करता आले असते,कोणती खबरदारी घेतली गेली किंवा नाही गेली यावर बातमीत जास्त भर दिलेला असतो ,जो अनेकांना खटकतो .बातमी किंवा पत्रकारितेच्या इथिक्स मध्ये हि गोष्ट बसत नाही .मात्र तरीही ती भंडारी यांची स्टाईल झाली आहे त्यामुळे आता त्यांची ओळख निर्माण झाली आहे .पुढारी असो की प्रशासन अथवा सामान्य माणूस अनेकांना पार्श्वभूमी ची ही स्टाईल पचनी पडत नाही .त्यामुळे अनेकदा संपादक हे मोहम्मद तुघलक वाटतात,अतिशहाणे वाटतात,ते संपादक कमी आणि सल्लागार जास्त वाटतात ."अगर मेरी सरकार आयेगी तब भी मै विपक्ष मे  बैठुंगा"हे राम मनोहर लोहिया यांच ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या भंडारी यांनी आपल्या स्वभावामुळे अनेकांचा इसार घेऊन ठेवलेला आहे .
त्यांनी जी बातमी व्हायरल केली त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी मुंबई परिसरातून बीड जिल्ह्यात आल्याचा उल्लेख होता,या बातमीमुळे अफवा पसरली आणि लोक भयभीत झाले असा दावा करून पोलिसांनी भंडारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला,तातडीने त्यांना अटक करण्यात आली .आता हे एवढं आवश्यक होतं का,की समज देऊन अथवा प्रतिबंधात्मक कारवाई करून प्रकरण मिटवता आलं असतं .पण पोलीस कारवाई बाबत आपण काय बोलणार त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं,कायद्यापुढे कोणी लहान मोठं नाही सगळे समान आहेत हे यावरून दाखवून द्यायचं असेल म्हणून सुद्धा ही कारवाई झाली असेल .
पण अलीकडच्या काळात पत्रकार हे सगळ्यांसाठी सॉफ्ट टार्गेट झाले आहेत,सगळेच पत्रकार लाचखोर,पीत पत्रकारिता करणारे,पुढपुढं करणारे ,पाकीट घेऊन पत्रकारिता करणारे नसतात मात्र सब घोडे बारा टक्के अशा पद्धतीने मानसिकता करून पुढारी,अधिकारी आणि सामान्य माणूस या वर्गाकडे पाहतो .पत्रकारिता पहिल्यासारखी राहिली नाही अस नेहमी म्हणलं जात मात्र अशावेळी पत्रकारांना येणाऱ्या अडचणी कोण समजून घेत का .एखाद्या पुढाऱ्यांविरोधात बातमी दिली की तो पत्रकार जातीयवादी, धर्मवेडा, सरकारच्या किंवा विरोधकांच्या हातचं बाहुल म्हणून बदनाम केला जातो .ज्या पत्रकाराने शरद पवार यांना पदमसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला अन पवार चिडले त्या पत्रकाराची कुंडली सोशल मीडियावर टाकून त्याला बदनाम केलं गेलं,मात्र हे करताना त्याने यापूर्वी अनेक चांगले प्रश्न धसास लावले असतील याकडे दुर्लक्ष केलं गेलं .असच काहीस अनेकवेळा होतं मात्र सगळे पत्रकार हे पैशापुढं आपलं इमान विकणारे आहेत असा समज करून घेतला जातो अन त्यांना त्रास देण्यासाठी संधी शोधली जाते .
राहुल कुलकर्णी असो की गंमत भंडारी या लोकांनी आणि इतरही पत्रकारांनी चांगली काम केलेली आहेत,पण त्यांच्याकडून एक चूक झाली की लगेच प्रशासन त्यांना धडा शिकवण्याची संधी मिळल्यागत काम करतं .मात्र अस जर प्रशासनाकडून झालं तर दिलगिरी व्यक्त करून किंवा चुकून झालं अस म्हणून मुद्दा पुढे ढकलला जातो .कोरोना झालेल्या किंवा निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीच नाव जाहीर करू नये असा आदेश असताना जिल्हाधिकारी बीड यांनी मात्र गुरुवारी नगरमध्ये उपचार घेणाऱ्या पिंपळा येथील रुग्णाचे नाव जाहीर केले,मग पुन्हा सुधारणा केली,अशावेळी ते स्वतःवर कायद्याचा बडगा उगरणार का?हा सवाल कोणी उपस्थित केला तर तो लगेच कायद्याच्या दृष्टीने कायदा मोडणारा म्हणून संबोधित केलं जातं .याचाच अर्थ प्रशासनाने किंवा सरकारने केलेली चूक ही मागे घेता येऊ शकते,माफी मागून प्रकरण सोडून देता येते पण इतरांनी चूक केली तर थेट गुन्हा दाखल केला जातो .एखाद्या मंत्र्याने प्रक्षोभक विधान केले तर किंवा पुढाऱ्यांची जीभ घसरली तर आमचं विधान तोडून मोडून दाखवलं,आम्हाला तस म्हणायचं नव्हतं,आमच्या विधानाचा गैरअर्थ लावला गेला अस म्हणून पांघरून घातलं जात,मात्र पत्रकारांनी काही केलं की लगेच त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं हे कितपत योग्य आहे .
आज जिथं सगळ्या बाजूने सामान्य माणुस हताश झालेला असतो त्यावेळी केवळ पत्रकारिता या क्षेत्राकडून च लोकांना न्यायाची अपेक्षा आहे .पण त्याच वर्गाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय हे देखील दुर्दैवी आहे .राहुल कुलकर्णी आणि गंमत भंडारी यांच्या अगोदर सुद्धा बीडमध्ये महेंद्र मुधोळकर या पत्रकारावर देखील एक पोस्ट केली म्हणून कारवाई केली गेली .मग जर पत्रकारकडून चूक झाली तर कारवाई करणारे प्रशासन त्यांच्या एखाद्या अधिकाऱ्याकडून चूक झाली तर का कारवाई करत नाही हा प्रश्न निर्माण होतो .
मास्क वापरला नाही म्हणून सामान्य माणसाला दंड करणारे अधिकारीच जर स्वतः मास्क लावणार नसतील तर मग त्यांच्यावर कारवाई कोण करणार,जिथं देशात लॉक डाऊन आहे तिथं कोणी अधिकारी जर बांधकाम करत असेल अन त्याला परवानगी आहे अशी सबब दिली जात असेल तर मग या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार .
हे म्हणजे हम करे सो कायदा अस झालं .गंमत भंडारी यांनी जे केलं त्याच समर्थन होऊच शकत नाही पण म्हणून त्यांच्यावर आकसबुद्धीने कारवाई अपेक्षित नाही,ती तशी केली गेली अशी चर्चा होते आहे . वृत्तपत्र असो की इ मीडिया या लोकांमुळे हजारो लोकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत,अनेकांचे संसार उभे राहिले आहेत,सत्ताधारी,विरोधक,प्रशासन यांच्यातील लूप होल्स बाहेर आले आहेत .मीडिया अनेकवेळा अतिरंजित पणा करतो हे मान्य केलं तरी याच मीडियाच्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत हे विसरून चालणार नाही .
मग तरीसुद्धा मीडियाला टार्गेट करून नेमकं काय साध्य करायचे आहे हे न उलगडणारे कोडे आहे .
अनेकदा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ,कर्मचारी हे आपल्या बदल्या,बढती यासाठी तसेच एखाद्या कारवाईत सुटका मिळावी म्हणून पुढाऱ्यांचे उंबरे झिजवताना आपण पाहतो .पुढाऱ्यांच्या हातचे खेळणे असल्यासारखे अधिकारी वागतात पण नियम फक्त सामान्य माणसाला लागू असतात प्रशासनाला नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे .गंमत भंडारी असोत की इतर पत्रकार प्रत्येक बाबतीत कायद्याचा धाक दाखवून उपयोग नसतो,मात्र हे कोण सांगणार . कारण सध्या पत्रकार असो की सामान्य माणूस प्रत्येकाचाच हात प्रशासन आणि सरकार या दोन यंत्रणेखाली अडकलेला आहे,तरीदेखील अशा पद्धतीने होणाऱ्या कारवायांमुळे मनोबल ढासळू शकते हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

राहुल,तुझं चुकलंच .............!


राहुल तुझं चुकलंच ...........!

पत्रकारिता हे सतीचं वाण आहे अस म्हणतात त्याचप्रमाणे पत्रकार सोडून इतर सगळ्यांनी कमरेच सोडून डोक्याला गुंडाळल तरी त्यांना तो अधिकार असतो मात्र पत्रकारांना नसतो असा एक अलिखित नियम आहे,राहुल ,मित्रा गेल्या वीस वर्षाच्या काळात तू संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देश पालथा घातलास, रावापासून रंकापर्यंत अनेकांच्या कहाण्या जगासमोर मांडल्यास मात्र हे करताना तू सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याच्या व्रतामध्ये अनेकांना अंगावर घेतलेस अन त्यातूनच तुझ्यावर कारवाईसाठी टपून बसलेल्या गिधाडांच्या हाती तू सापडलास, त्यामुळेच म्हणतो राहुल तू चुकलास .
पत्रकार हा समाजमनाचा आरसा असतो अस म्हणलं जात,समाजात कुठं काही चांगल ,वाईट घडत असेल तर ते दाखवणं हे आपलं काम आहे,अगदी त्यासाठी आपण आपला जीव देखील धोक्यात घालतो .पत्रकार म्हणलं की दिसतो तो त्याला मिळणारा मान, अधिकारी असोत की पुढारी सगळेच त्याला झुकून सलाम करतात एवढंच सगळ्यांना दिसत. मात्र एक पत्रकार बातमी देण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी किती धडपड करतो हे कोणालाच दिसत नाही .म्हणतात ना माशाचे अश्रू कधीच दिसत नाहीत म्हणून त्याला दुःखच माहीत नाही अस नसतं तसच काहीस आपल्या पत्रकारिता जमातीचं आहे .आजही शहरी,निमशहरी,ग्रामीण भागातील पत्रकार हे कसाबसा चरितार्थ चालवतात,नुसत्या सन्मानाने त्यांचंच काय कोणाचच पोट भरत नाही हो . पत्रकारितेच्या क्षेत्रात चमक धमक खूप आहे पण त्यामागे त्रास किती आहे हे कोणालाच माहीत नाही,अनेकवेळा दिवसेदिवस उन्हा तान्हात, न खतापिता शेकडो मैल एका बतमीसाठी पत्रकारांना हिंडावे लागते,एखादा शब्द चुकला तर पत्रकाराला बोल लावणारे लोक त्या बतमीसाठी त्याने किती मेहनत घेतली आहे याचा कधीच विचार करीत नाहीत .
आज इलेक्ट्रॉनिक मीडिया मुळे अन सोशल मीडियामुळे प्रत्येक जण पत्रकार झाले आहेत,पत्रकारितेला एक सवंगपणा आला आहे.मात्र राहुल तुझी पत्रकारिता ही वेगळी आहे,पानिपत ची लढाई कशी अन कुठून सुरू झाली इथपासून ते अंदमान निकोबार मध्ये सावरकर यांना किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या .इथपर्यंत अनेक चांगल्या वाईट गोष्टी तू समाजासमोर मांडल्यास .एवढंच काय पण शरद पवार असोत की इतर राजकारणी यांना आपल्या वेगळ्या आणि अनोख्या शैलीने तू बोलत केलं आहेस .त्यावेळी अनेकांनी तुझं तोंडभरून कौतुक केलं आहे .जिल्ह्याच्या बातमीला राज्य पातळीवरील संदर्भ कसे द्यायचे अन जिल्ह्या जिल्ह्यातून इनपुट घेऊन बातमीच सोनं कस करायचं हे तुझं कसब वादातीत आहे . पांढऱ्या शुभ्र कापड्यावरील एक काळा डाग शोधण्यासाठी तुझी नेहमी धडपड सुरू असते,काही जणांना तो तुझा आगाऊपणा वाटतो, काही जण तुला अतिशहाणा म्हणतात, काही जणांना तू तिरसट वाटतोस पण पत्रकारितेच्या बाबतीत तू वेगळा आहेस हे मात्र खरं आहे .
मात्र दोन दिवसांपूर्वी जे घडलं त्यात तुला दोषी धरून अटकेची कारवाई करून सरकारने आपली मर्दुमकी दाखवून दिली आहे .सरकार किंवा अधिकारी कोणाचंही असो आपल्या अंगाशी आलं की ते त्या माकडीनिप्रमाणे वागतात .आपला जीव वाचवण्यासाठी या लोकांनी तुला बळीचा बकरा बनवलं .एबीपी माझा ने वाधवान प्रकरणात सरकारला जे प्रश्न विचारले ते सरकार आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना चांगलेच झोम्बले .त्या दिवसाचा वचपा काढण्यासाठी संधी शोधणाऱ्यांच्या हातात आयत कोलीत मिळाल .
राहुल कुलकर्णी यांनी बातमी दिली सकाळी नऊ वाजता,अकरा वाजता रेल्वे विभागाने ट्रेन सुरू होणार नाहीत हे स्पष्ट केलं त्यानंतर चार वाजता हा जमाव जमला .मग यात राहुल किंवा एबीपी च्या बातमीचा संबंध येतो कुठे.पण म्हणतात ना सरकार आपलं असल्यावर ओलं आणि वाळल कसंही जळतं. तस काहीस तुझ्या प्रकरणात झालं.
ज्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तुला अटक झाल्याची माहिती तातडीने ट्विट केली त्याच देशमुख यांनी वाधवान प्रकरणात अमिताभ गुप्ता यांचा बोलविता धनी कोण याचा शोध घेण्यासाठी ही तत्परता दाखवली नाही .अधिकारी कितीही मोठ्या पदावर असला तरी तो मनाने शहाणपणा करीत नाही,त्याला या प्रकरणात कोणी ऑफ द रेकॉर्ड आदेश दिले याचा खुलासा देशमुख करणार आहेत का,त्यांनी जर वाढवान आणि गुप्ता यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर कळून जाईल की गुप्ता कोणाच्या इशाऱ्यावर या प्रकरणात नागवं नाचले ते,मात्र ते करण्यापेक्षा देशमुख यांनी तुला 24 तासात अटक करून जग जिंकल्याचा आव आणला .

आता सरकारवर टीका केल्यावर त्याची किंमत तर मोजवीच लागेल ना .अरे आजही मुंबई असो की दिल्ली शेकडो पत्रकार हे सरकारच्या तुकड्यावर आपला चरितार्थ चालवतात अस हे राजकारणी सर्रास सांगतात,कारण आपलेच अनेक संपादक,ज्येष्ठ पत्रकार यांनी मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट असतील किंवा इतर लाभ मिळवले आहेत,तू मात्र सातत्यानं सरकारच्या विरोधात ,जे चूक आहे ते समोर आणण्यात आपली पत्रकारिता केलीस अन आज त्याचाच फटका तुला बसतो आहे .
राहुल कुलकर्णी यांच्याबाबत जे घडले तेच किंवा कमी अधिक प्रमाणात हे अनेकांच्या बाबतीत नेहमी घडते मात्र इतरवेळी पत्रकारांना सन्मान,खुर्ची देणारे अधिकारी ,राजकारणी आपली 'जात'हा पत्रकार अडचणीत आल्यावर बरोबर दाखवतात .कारण त्यांचा इगो कधी ना कधी त्या पत्रकारकडून दुखावलं गेलेला असतो .आज दिल्ली असो की उत्तर प्रदेश अथवा मध्यप्रदेश किंवा तेलंगणा अनेक राज्यांनी त्या त्या भागातील मजूर,शेतकरी,कष्टकरी अशा श्रमजीवी लोकांना पाचदहा हजार रुपये थेट मदत केली आहे,महाराष्ट्रात मात्र अद्याप तरी केवळ गहू तांदूळ वाटण्यापालिकडे काहीही झालेले नाही,मग अशा बातम्या आपण केल्या की आपण विरोधकांच्या ओंजळीने पाणी पिणारे म्हणून हिनवले जाते .शिवभोजन असो की इतर योजना याबाबत आपण छान छान ,गोडगोड बातम्या केल्या तर आपण ग्रेट पत्रकार अन थोडं विरोधात लिहिलं की लगेच सरकार विरोधी हे अस गणित होवुन बसला आहे .
"चूप बैठ नही तो कान काट दुंगा"अशी भूमिका कोणत्याही सत्ताधाऱ्यांची असते .मात्र निरंकुश आणि मदांध झालेल्या सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकारांच असत .आणि त्यांनी त्यांचं काम केलं की त्यांना बदनाम करण्याचा,त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान करण्याचा ,त्यांच्यावर हल्ले करण्याचा उद्योग सत्ताधारी करतात .राहुल तुझ्या बाबत सुद्धा हेच झाले आहे .देशात लॉक डाऊन असताना केवळ पैसा आहे ,राजकारणी लोकांच्या ओळखी आहेत म्हणून वाढवान कुटुंबाला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली,सामान्य माणूस घराबाहेर भाजीपाला घ्यायला पडला तर त्याच्या पार्श्वभागावर सटके देणारे पोलीस वाढवान सारख्या धनाढ्य लोकांना मात्र कमरेत वाकून मुजरा करतात .जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राबविण्याची जबाबदारी असणाऱ्या एस पी सारख्या अधिकाऱ्याने लॉक डाऊन च्या काळात घराचे बांधकाम काढले तर कलेक्टर सारखे अधिकारी सुद्धा काहीवेळा पाठराखण करतात अन याचा जाब विचारायला गेलं तर पत्रकार कुठं अडचणीत आणता येतो का याची संधी शोधली जाते .हा सगळा प्रकारचं किळसवाणा आहे .
लोकांनी मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये अन्यथा एक हजार रुपये दंड केला जाईल अस सांगणारे जिल्हाधिकारी जर मास्क न घालता रस्त्यावर येत असतील तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार अन हे विचारणाऱ्या पत्रकाराला मात्र दमदाटी होत असेल तर दाद मागायची कोणाकडे हे देखील अनुत्तरीत असे प्रश्न आहेत .

राहुल कुलकर्णी यांनी जर चूक केली असेल तर त्यांना शिक्षा व्हायला हरकत नाही मात्र सरकार आणि  गृह विभाग आपल्या निष्क्रियतेवर पांघरुन घालण्यासाठी हे असले उद्योग करत आहे .रेल्वेचा अपघात झाला म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या मंत्रिपदाचा तेव्हा राजीनामा दिला होता .आज ही नैतिकता दाखवून अनिल देशमुख हे वाढवान प्रकरणात गृह विभागाचा गलथानपणा मान्य करून राजीनामा देण्याची हिंमत दाखवतील का,तर उत्तर आहे नाही .कारण अलीकडच्या काळात नैतिकता हा शद्बच राजकारणातून हद्दपार झाला आहे,मग अशा लोकांकडून सूडबुद्धीने कारवाई होण्याशिवाय दुसरी काय अपेक्षा करणार .
राहुल कुलकर्णी यांनी जी बातमी दिली त्यामागे त्यांचा हेतू राज्यात हजारो लोक एकत्र यावेत ,पॅनिक निर्माण व्हावे,गोंधळ उडावा असा नक्कीच नव्हता याची जाणीव सगळ्यांनाच आहे पण तरीही तातडीने मुंबईवरून पोलीस येऊन अटकेची कारवाई करतात म्हणजे यामागे राजकीय सूड आहे हे दूध पित्या लेकराला सुद्धा कळेल .जर राहुल यांच्या बातमीमुळे एवढं सगळं घडल अस सरकार म्हणत असेल तर मग सरकारच्या बुद्धीची करावी तेवढी कीव थोडीच आहे .
या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने दिसून आली ती म्हणजे एबीपी माझाची संपूर्ण टीम राहुलच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली,इतर चॅनेलच्या प्रतिनिधींबाबत अस घडलं असत तर मॅनेजमेंट ने हात झटकले असते कदाचित,पण राजीव खांडेकर यांनी सुद्धा या आपल्या सहकाऱ्यांची जी सत्य बाजू मांडली ती कौतुकास्पद आहे .
हे सगळं असलं तरी राहुल तू चुकलासच अस मी अजूनही म्हणेल कारण टिळक,आगरकर,अत्रे,भालेराव यांची पत्रकारिता आता राहिलेली नाही रे,जे दिसतंय ते दाखवायचं नाही तर जे विकतंय ते दाखवायचं,राजकारणी,पुढारी,अधिकारी यांच्या पूढेपुढे करायचे,टीका टिप्पणी,शिवराळ भाषा वापरायची नाही,सरकारला जाब विचारायचा नाही,म्हणजे मग तुम्ही आम्ही ग्रेट नाहीतर तुरुंग थेट .असो पण सरकारच्या या तुघलकी कारभाराचा एक पत्रकार म्हणून मी निषेध करतो .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404 .

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

सरणावर जायची एवढी घाई कशाला ..........!


सरणावर जायची एवढी घाई कशासाठी .............!

माझ्या लाडक्या बीड वासीयांनो,लाडक्या एवढ्यासाठी म्हणलं की माझा जीव आहे बीडवर अन इथल्या माणसांवर,मात्र आज मला मी बीडकर असल्याची लाज वाटली,खरंच लाज वाटली,अरे ज्या महा भयंकर रोगापासून सुटका मिळावी म्हणून सगळं जग लढत आहे,लहानापासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सगळे घरात रहा,सुरक्षित रहा हे सांगत आहेत,तिथं आम्ही मात्र सगळी लाज नाकाला गुंडाळून मोक्कार वळू सारखे रस्त्यावर फिरत आहोत,त्यामुळे आज मला मी बीडकर असल्याचीच लाज वाटू लागली आहे .
तुम्ही म्हणाल तू आम्हाला शिकवणारा कोण शहाणा लागून गेलास,तू किती पथ्य पाळतोस,तर एक स्पष्ट सांगतो की या संकटाचा सामना करण्यासाठी मी माझ्या परीने जे शक्य आहे ते करतो आहे .मी पत्रकार असल्याने माझं कर्तव्य करतो आहे .मात्र बीडकर म्हणून तुम्ही जे वागताय ना ते योग्य नाही हे मात्र तितकंच खरं आहे .
कोरोना कोण आहे,तो कोणाचा भाऊबंद आहे का,की तो अमुक एका धर्माचा जातीचा आहे का,तर निश्चितच नाही,तो एक विषाणू आहे जो जग गिळंकृत करायला निघाला आहे .जगावर अधिराज्य गाजवण्याचं स्वप्न पाहणारी अमेरिका असो की चीन हे मोठं मोठे बलाढ्य देश या संकटासमोर गुडघे टेकवत आहेत,तिथं तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती. या आजारावर अजूनपर्यंत कोणताही ठोस असा इलाज सापडलेला नाही मात्र घरात राहून,ठराविक अंतर ठेवून,हात पाय धुवून,स्वतःच्या शरीराची स्वछता ठेवून आपण त्यापासून स्वतःचा बचाव करु शकतो .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वीस दिवसात अनेकवेळा मीडियाच्या माध्यमातून जनतेला घरात राहण्याच आवाहन करत आहेत,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत की आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सगळे तुम्हाला आम्हाला रिकामचोट वाटले का .देशासमोर आज अनेक प्रश्न आ वासून उभे असताना अचानक आलेल्या या मोठ्या संकटाच्या विरोधात सरकार असो की विरोधक सगळेच हातात हात घालून लढत आहेत,कोणत्याही देशावर जेव्हा संकट येत तेव्हा एक देशवासीय म्हणून आपलं कर्तव्य असतं की आपण सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे .
आज देशात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे,मृत्य होणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे,या आजारावर मात करण्यासाठी अमेरिका सारखा देश इतर देशाकडे मदत मागत आहे,सुदैवाने अजून भारतात याचे प्रमाण आटोक्यात आहे मात्र ते वाढणार नाही याची कोणीच खात्री देऊ शकत नाही .
बीड जिल्ह्यात देखील प्रशासनाच्या सजगतेमुळे कोरोना अजून आत शिरकाव करू शकलेला नाही मात्र उस्मानाबाद असो की नगर अथवा हिंगोली ,औरंगाबाद अशा सगळ्याच जिल्ह्यात म्हणजे बीडच्या वेशीवर कोरोना येऊन ठेपला आहे .
आपण मात्र गाव जलो हनुमान बाहेर या मानसिकतेतून बाहेर पडायला अजून तरी तयार नाहीत .बीड जिल्ह्यात नाकाबंदी मोडून दाखल झालेल्या काही लोकांच्या संपर्कात आलेल्या पोलीस बांधवांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सगळ्या बिडवासीयांनी आनंद व्यक्त केला .कारण हा आजार संपर्कातून जास्त वाढतो ,हे तुम्ही आमही सगळेच जाणतो .
मात्र जे कळतं ते वळत नाही अशी आपली अवस्था सध्या झाली आहे .निव्वळ कमरेच सोडून डोक्याला गुंडाळल्यानंतर कोण काय बोलणार .
लॉक डाऊन नंतर आज चौदा दिवस झाले आपण घरात आहोत,मात्र जणूकाही चौदा वर्षापासून आपण वनवासात आहोत अस वागू लागलो आहोंत,विचार करा प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवासात कसे राहिले असतील,घरदार ,आई वडील आणि प्रजेला सोडून .राम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा ते राजपुत्र होते मात्र चौदा वर्षाच्या वनवासानंतर ते प्रभू श्रीराम झाले .आपण मात्र त्यांना देव मानत असताना चौदा दिवस घरात राहू शकत नाहीत का,बर काय नाही आपल्याजवळ ,सगळं जग तुमच्या हातात आहे,मोबाईल मुळे आणि टिव्हीमुळे जगात काय सुरु आहे हे तुम्हाला एक सेकंदात कळतंय,बायका पोरं, आई वडील,सगळे तर जवळच आहेत,मग बाहेर झकमारी करण्याची एवढी गरज आहे का ?
पन्नास तासांच्या संचारबंदी नंतर मंगळवारी बीड,परळी,माजलगाव,अंबाजोगाई या भागात रस्त्यावर जे चित्र दिसले ना ते आपल्या अकलेची दिवाळखोरी दाखवणारे होते .मी म्हणतो तुम्ही आम्ही रोजच भाजी खातो का हो,एरवी आपण रोज दोन भाज्या,भात, वरण, पोळी ,चटणी,लोणचं अस जेवण जेवतो का, नाही ना,मग या लॉक डावूनच्या काळातच एवढी काय खाय खाय सुटली आहे .दुष्काळातून आल्यासारखे आपण वागतो आहोत .आठवड्यात एक दिवस भाजी खरेदी केली तरी चालू शकते,किराणा सामान तर आपण सहसा महिन्यातून एकदाच भरतो ना,मग बाहेर जाऊन एवढं काय करतो आहोत आपण .
रिकामं फिरण्यामध्ये कसली आली आहे मर्दुमकी कळत नाही मला,साला जान है तो जहाँ है हे माहीत असूनसुद्धा आपण का मरणाला आमंत्रण देत आहोत हे न उलगडणारे कोडे आहे .
बीड जिल्ह्यात गेल्या चौदा पंधरा दिवसात रस्त्यावर जी परिस्थिती दिसली ती बीडकर किती मूर्खपणा करू शकतात हे दाखवणारी आहे .
बीडच नव्हे तर जवळपास सगळ्याच शहरात लोक संचारबंदी मोडणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य असल्यासारखे वागू लागले आहेत .
शहरातील,चौका चौकात खाकी कपडे घालून जे लोक बसले आहेत ना त्यांनाही घरदार,लेकरबाळ आहेत,मात्र ते तुमच्या आमच्यासाठी उन्हातान्हात थांबून आपलं काम करत आहेत,आम्ही काय करतोय तर त्यांच्याशी दांडेलशाही करतोय,त्यांनाच भांडतोय .
अरे शहाण्यांनो तुम्ही ज्यांच्या नावाने आज खडे फोडत आहात ना ते जर रस्त्यावर थांबले नाहीत तर तुमच्या वेशीवर आलेला तो कोरोना नावाचा यम केव्हाच तुमच्या दारात येईल हे कळणार सुद्धा नाही . डॉक्टर, आरोग्य सेवेतील सगळा स्टाफ आणि महसूल,पोलीस प्रशासन हे डोळ्यात तेल घालून तुमच्या आमच्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत .आम्ही मात्र त्यांच्या मेहनतीवर भडाभडा पाणी ओतत आहोत,मी तर म्हणेल की बिडकरांचा हा प्रकार म्हणजे खंडीभर वरणात फळाफळा मूतन्या सारखाच आहे .
माफ करा पण आजच बीडच्या लोकांचं वागणं नाही पटलं मला,शहरातील रस्त्यावर किमान एक हजार ते दीड हजार मोटारसायकल,चारचाकी वाहन,टेम्पो,टमटम दिसून आल्या .
एकीकडे जिल्ह्यातील सगळे पेट्रोल पंप सामान्य नागरिकांना बंद केले असताना एवढ्या गाड्या आल्या कोठून,त्यांना पेट्रोल मिळाले कसे हा प्रश्न अनुत्तरित आहे .नियम तोडण्यात आम्हाला खूप फुशारकी वाटते .एवढ्या संचारबंदी च्या काळात सुद्धा आम्ही कसे बाहेर राउंड मारून आलो,पोलिसांच्या डोळ्यात कशी धूळफेक केली याच आम्हाला कोण कौतुक वाटतं, मात्र आपण घराबाहेर पडून,गर्दी करून,रस्त्यावर मोक्कार फिरून पोलीस आणि प्रशासन यांच्या डोळ्यात नाही तर आपल्या स्वतःच्या आयुष्यात माती फेकत आहोत हे आपल्याला का कळत नाही .
आपला मृत्यू दारावर,वेशीवर आ वासून उभा आहे,त्यांच्या अन आपल्या मध्ये जर कोणी उभं असेल ना तर ते आहेत पोलीस,डॉक्टर आणि प्रशासन .
आपण जर चार दोन दिवस भाज्या नाही खाल्या,बाहेर नाही पडलो,तर मरणार आहोत का,नाही आपल्याला बाहेर जाता आले तर जगबुडी होणार आहे का .इथं सगळं जग लॉक डाऊन आहे,एक एक जीव वाचवण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे आणि आपण मात्र अक्कल गहाण टाकल्यासारखं वागत आहोत .हा आजार आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना होऊ नये,यापासून सगळे सुरक्षित राहावेत म्हणून आरोग्य यंत्रणा जीवतोड मेहनत घेत आहे .अख्ख जिल्हा रुग्णालय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिकामं करण्यात आलंय, सगळीकडे भयाण शांतता अन भीतीचं वातावरण आहे,बाहेर गावाहून आलेले लोक म्हणजे दुसरे यम आल्यासारखं त्यांना आपण वागवतोय ,हे का होतय कारण कोरोना होण्याची भीती प्रत्येकालाच आहे,मग तरीही आपण न काळल्यासारखं का करतोय हा खरा मुद्दा आहे .
बीड सारख्या शहरात जर या आजाराची लागण झाली तर सरकारी सोडा खाजगी रुग्णालयात सुद्धा जागा पुरणार नाही,रुग्ण आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात मारामाऱ्या होतील ,मग हे जर ओढवून घ्यायचं नसेल तर आपण घरात राहील तर बरं होईल ना,मात्र बीडच्या रस्त्यावर रोज जे चित्र दिसत ना ते मन विषण्ण करणार आहे .पोलीस दलाचे कर्मचारी असोत की आरोग्य विभागाचे लोक कोणत्याही संरक्षक साहित्याशिवाय आपलं काम करीत आहेत,आपण मात्र घराबाहेर पडून चौकाचौकात गप्पांचे फड रंगवत आहोत अन त्यात धन्यता मानत आहोत .
जिथं मंदिरातल्या देवांनी स्वतःला क्वारान्टीन करून घेतलंय तिथं तुमची आमची काय कथा,परंतु हे सगळं समजून देखील बीड सेफ आहे,आपल्याकडे पॉझिटिव्ह लोक नाहीत,प्रशासन विनाकारण बाऊ करतंय, असले फालतू विषय चघळत बसण्यात आपण धन्यता माणतोय .
आपण चौकात बसून किंवा शहरभर उंडारत फिरून असा काय देशाचा विकास करणार आहोत का,नक्कीच नाही, उलट घरात बसल्यामुळे लेकरं खुश आहेत,बायको,आईवडील सगळे कितीतरी वर्षांनी एकमेकांच्या आवडीनिवडी जपत आहेत, जुने खेळ,जुने मित्र,मैत्रिणी यांच्या आठवणीत दिवस जात आहेत पण आम्हाला हें नकोय .आम्ही मोदी अन ठाकरे पेक्षा हुशार आहोत त्यामुळे आम्ही त्यांची अक्कल काढण्यात स्वतःला हुशार मानत आहोत .
गेल्या पंधरा दिवसात प्रत्येकाने ठरवलं असत तर निश्चितपणे या दिवसात काय काय अनुभवलं,कोणाचे स्वभाव आवडले,कोणाचं वागणं खटकलं या बाबत छान छान लिखाण करता आलं असत,ज्या आईबापाच तोंड पाहण्यासाठी मुलांना आठवडा लागायचा त्यामुलांच्या सोबत वेळ घालवण्याची संधी जर मिळाली आहे तर तीच सोनं करा ना, पण नाही,सहजासहजी एखादी गोष्ट मान्य करतील ते बीडकर कसले .
समजा तुम्ही बाहेर गेलात अन दुर्दैवाने तुम्हाला हा आजार झाला तर 14 दिवस ते 28 दिवस एकट्याने रुग्णालयात राहावे लागेल ते सोपे नाही मग कशाला विषाची परीक्षा घ्यायची .या जगात जो जन्माला आला तो प्रत्येक जण एक ना एक दिवस मरणारच आहे पण त्या मरणाची तयारी आपण स्वतःच का करा,सरणावर जायची एवढी घाई अन पुंगी वाजवून तो कोरोना नावाचा साप का घरात घुसवून घ्या.
त्यामुळे अतिशहानपणा न करता आयुष्यात कधी तुम्हाला बाहेर पडायला अन खरेदीला जाण्याची संधी मिळालीच नाही असं वागता गपगुमान घरात रहा,आज काही दिवस घरात राहिलात तर या जगात रहाल नाहीतर चांगला होता म्हणायला सुद्धा लोक धजवणार नाहीत,कारण या अशा काळात जर तुम्ही मेलात तर हाताने मस्ती केली ,जाऊ नको,फिरू नको म्हणत होते तरी गेला अन जीवाला मुकला असच लोक बोलतील अन ती वस्तुस्थिती असेल,म्हणून च नम्र विनंती आहे की या संकटकाळात बाहेर पडून आपल्यासोबतच कुटुंब आणो देशवासीय यांचे प्राण धोक्यात घालण्यापेक्षा घरी रहाणं प्रशासन आणि शासनाला सहकार्य करा .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

शनिवार, २१ मार्च, २०२०

माज कराल तर जीवानिशी जाल ...........!


माज चांगला नाही ............!
संपूर्ण जग ज्या भीतीच्या सावटाखाली सध्या जगतंय ते पाहिल्यानंतर प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे मात्र काही लोक अजूनही याबाबत जागृत नसल्याचे दिसत आहे,सरकार,प्रशासन सामाजिक संस्था सगळेच दक्ष राहण्याची हात जोडून विनंती करत असताना दीड शहाणे लोक मात्र अजूनही रस्त्यावर फिरताना,प्रतिबंधक उपाययोजना पायदळी तुडवताना दिसत आहेत,हा माज चांगला नाही ,नाहीतर एकाच्या मुर्खपणामुळे हजारो,लाखोंना आपला जीव गमवावा लागेल .
कोणत्याही आपत्ती ला इष्टापत्ती मध्ये रूपांतर करण्याची मानवी मानसिकता आहे,कोरोना बाबतही अस करता येऊ शकतं पण त्यासाठी हवी आहे सामूहिक संघटनशक्ती आणि इच्छाशक्ती .कारण या आजारापासून दूर राहायचं असेल तर प्रत्येकाने आपल्याला गर्दीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे .
मानवी जन्म हा चौऱ्या ऐंशी योनी मधून गेल्यानंतर मिळतो अस म्हणतात मग हे माहीत असूनसुद्धा आपण एवढं अमूल्य अस जीवन हसतखेळत जगण्यापेक्षा ,चार आठ दिवस घरात बसण्यापेक्षा बाहेर फिरून का धोक्यात घालतोय हा न उलगडणारा प्रश्न आहे .
चीनमध्ये साधारणपणे डिसेंम्बर च्या सुमारास कोरोना व्हायरस ची लक्षणे दिसून आली,त्या देशाने या व्हायरस शी दोन हात करण्यासाठी उपाययोजना देखील सुरू केल्या,अगदी दहा हजार खाटांचे रुग्णालय अवघ्या एक महिन्यात उभारले,हे सगळं करण्यामागे अखंड मानवजातीचे रक्षण हाच हेतू त्यांचा होता .हा विषाणू भारतापर्यंत किंवा इतर देशापर्यंत येता येता फेब्रुवारी मार्च उजाडला .
मार्चच्या पहिल्या आठवड्यात ज्या इटलीमध्ये कोरोनाची नुकतीच लागण झाली .त्याच देशात 20 मार्चपर्यंत पन्नास हजारच्या घरात लोकांना लागण झाल्याचे समोर आले आहे .तर चीन सारख्या देशात देखील या विषाणू ने लाखो लोकांना आपल्या कवेत घेतले आहे .
भारतात देखील या विषाणूमुळे तिनशेच्या आसपास लोकांना लागण झाली आहे . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री हे जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहेत .
हा आजार संसर्गजन्य आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे,मात्र भारतासारख्या देशात अजूनतरी एखाद्या मोठ्या समूहाला हा आजार झाल्याचे समोर आलेले नाही हे सुदैव आहे .मात्र त्यामुळे धोका टळलेला नाही .धोका कायमच आहे,त्यासाठी गोळ्या औषधे तर आहेतच पण काळजी घेण जास्त महत्वाचं आहे .
जगाच्या पाठीवर हा एकमेव प्रसंग असा आहे की याचा कुठेही निषेध केला गेला नाही,किंवा याच्या विरोधात कुठेही आंदोलन,मोर्चे,उपोषण केले गेलेले नाही .सगळेजण हातात हात घालून याच्याशी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत .सरकार कोणाचे आहे अन विरोधात कोण आहे याचा विचार न करता,कोण कुठल्या धर्माचा,जातीचा,पंथाचा आहे याचाही विचार न करता लोक एकत्र येऊन या संकटाचा सामना करत आहेत हे विशेष आहे .
मराठवाड्यात 21 आणि 22 मार्च रोजी बंदचे आवाहन केले आहे .तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यु चे आवाहन केले आहे .याचे पालन करणे हे सजग नागरिक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे .परंतु लोक मात्र त्याकडे जास्त लक्ष देत नसल्याचे चित्र आहे .
या जगाच्या पाठीवर असा कोणताही मनुष्य प्राणी नाही की जो काही दिवस,महिने घराबाहेर पडला नाही तर जगबुडी होईल .जगाची आर्थिक वाढ खुंटल ,काही दिवस आपण जर घरात बसून राहिलो तर कोणाचं काहीच नुकसान होणार नाही मग आपण का आटापिटा करतोय ही न कळणारी बाब आहे .
या आजारापासून बचाव करायचा असेल तर समूहाने एकत्र येणे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक आहे, अशावेळी काही हौशी लोक मात्र सर्रास बाहेर बोंबलत फिरतानाचे चित्र आहे .बंद म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच असल्याचे ते समजत आहेत .लोकांना कळकळीने सांगितले तरी ते घराबाहेर पडत आहेत .स्वतः पंतप्रधान, मुख्यमंत्री सांगत आहेत की अन्न धान्याचा साठा करू नका,घरातच बसून रहा, लोकसंपर्क टाळा मात्र तरीही लोक शहाणपणा करून आपल्या सोबत इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत .जिथं मंदिर मस्जिद,चर्च,गुरुद्वारा बंद आहेत,देवदर्शन,सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे तिथं घराबाहेर पडून आपण अस काय साध्य करणार आहोत .विनाकारण बाहेर पडल्याने फार काही देशहिताचे काम आपण करणार नाहीत मात्र तरीही लोक मजाक म्हणून बाहेर निघत आहेत .
सध्याच्या इंटरनेट आणि सोशल मीडिया च्या जमान्यात घरबसल्या सगळं उपलब्ध असताना आपण बाहेर जाण्याचा अट्टहास का करतो आहोत हेच कळत नाही .एखाद्या आजारामुळे का होईना आपण घरात बसून आहोत याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपण घराबाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहोत हे लाजिरवाणे आहे .
लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करणे हे आपले परम कर्तव्य असताना त्यावेळी मात्र आपण घरात बसणे, पिकनिक ला जाणे पसंत करतो,मात्र आज घरी बसण्याची अत्यंत गरज असताना आपण घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत .घरात लेकरं बाळ आहेत,आईवडील,भाऊ बहीण आहेत,गावाकडे अनेक महिन्यांनी,वर्षांनी आलेले पै पाहुणे आहेत,त्यांच्याशी बोला, गप्पा मारा,खेळ खेळा, मनपसंत टीव्ही सिरीयल पहा,वाचन करा,जीवनाचा आनंद घ्या ना,कशाला पाहिजे बाहेर हिंडण, फिरणं.
एकीकडे आपण इंटरनेट आणि मोबाईलमुळे माणूस माणसापासून दूर चालल्याची रोजच चर्चा करतो अशावेळी निसर्गानेच आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिली आहे अस समजून जर घराबाहेर न पडता प्रशासन आणि सरकारला सहकार्य केले तर निश्चितपणे या संकटाला आपण सहजपणे दूर करू शकतो ,हे माहीत असूनसुद्धा आपण रस्त्याने अत्यन्त निष्काळजीपणे फिरत आहोत .हर कुठंतरी थांबल पाहिजे .
हा आजार वैयक्तिक काळजी घेतल्यास आटोक्यात येऊ शकतो हे सत्य आहे त्यामुळे माज न करता घरातच बसून रहा ,तुम्ही जर स्वतःची काळजी घेतली तर तुमच्यासोबतच समाज देखील सुदृढ आणि सक्षम राहील हे निश्चित .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

शनिवार, ७ मार्च, २०२०

प्रोडक्ट नव्हे प्रोडक्टिव्ह ...............!


प्रोडक्ट नव्हे प्रोडक्टिव्ह .............!

दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर जॉनी लिव्हर यांचा एक व्हिडिओ पाहिला, म्हाताऱ्या झालेल्या आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती काय म्हणते आहे हे मुलांना कळत नाही अन ते चिडचिड करतात,शेजारी असलेले डॉक्टर सांगतात की तुम्ही आम्ही लहान असताना आपलं बोबड बोलणं ज्या आईला न सांगता कळतं तिचं म्हातारपणी च बोलणं आपल्याला कळू नये हे दुर्दैव आहे,तिच्या जवळ बसा, प्रेमाने हात हातात घ्या अन तिच्याशी बोला बास तिला काही नको .हा व्हिडीओ पाहिला अन मनात कालवाकालव झाली .स्त्री मग ती आई असो,बहीण असो नाहीतर पत्नी असो किंवा मैत्रीण ,किती सोसते पण तिच्या नशिबी मात्र कायम अवहेलना अन उपेक्षाच येते,तिला एक दिवस शुभेच्छा द्यायच्या अन वर्षभर अन आयुष्यभर मात्र मनःस्ताप द्यायचा किंवा तिने तो सोसायचा हे कुठवर चालणार .
अनादी काळापासून स्त्री ही शोषित आहे .मग ती रामायण महाभारतातील राजकन्या असो किंवा पट्टराणी ,तिच्या नशिबी कायम हाल अपेष्टा अन अवहेलना च आलेली आहे .स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून आजही तिच्याकडे पाहिले जाते .तिला काय कळतं अस म्हणून कायम तिला डावलल जातं. तिचा पदोपदी अपमान केला जातो .प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते अस म्हणलं जात मात्र हाच पुरुष एखाद्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभा असलेला अभावानेच जाणवतो किंवा दिसतो .हे अस का होतं याच उत्तर माहीत असूनही कोणीच पुढे येऊन देत नाही .
एखादी स्त्री सुंदर असेल,चांगलं रहात असेल ,व्यवस्थित बोलत असेल,तिच्या कामातून वेळ काढून जर सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असेल तर लगेच तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात .विशेष म्हणजे यात महिलांचाच मोठा सहभाग असतो .स्त्रियांना ईश्वरानेच सुंदर रूप दिलं आहे,ते सांभाळण्यासाठी ती जर प्रयत्न करत असेल,जगाच्या राहटगाडग्यात ती जर खंबीरपणे उभे राहून आपलं अस्तित्व सिद्ध करत असेल तर इतरांना अडचण असण्याच काहीच कारण नाही .पण समाजाला ते मान्य नसतं .अशी स्त्री लगेच बाहेरख्याली आहे,तीच कुणासोबत तरी लफडं आहे अस म्हणून तिला बदनाम केलं जातं .खरंतर स्त्री च रूप हे तिच्यासाठी एक वरदान आहे मात्र सुंदर स्त्रीबद्दल जेव्हा तिच्याच सारख्या स्त्रिया नको ती चर्चा करतात तेव्हा हेच सौंदर्य अभिशाप ठरतं .
आज भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात एकीकडे प्रतिभा पाटील,सोनिया गांधी,सुमित्रा महाजन अशा एक ना अनेक स्त्रिया आपलं अस्तित्व सिद्ध करत असताना दुसरीकडे स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जाण्याची अनेक उदाहरणे आपल्या आसपास दिसतात .महिलांच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या वाट्याला देखील समाजाकडून उपेक्षाच आली मात्र त्यांनी त्याला न जुमानता आपलं कार्य सुरू ठेवलं, ज्यामुळे आज महिला,मुली ताठ मानेने शिकत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत .
स्त्री भ्रूण हत्येचा विषय असो की हुंडाबळी अथवा मानसिक,शारीरिक छळाचा विषय असो,नीट अभ्यास केल्यास लक्षात येतं की या सगळ्या ठिकाणी एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीवर अन्याय करण्यासाठी पुढे असते .सासू सुनेचा छळ करते,मुलगी नको म्हणून तिच्यावर अन्याय अत्याचार केले जातात .हुंड्यासाठी सुनेचा छळ करणारी देखील एक स्त्रीच असते ,अठरा वीस वर्षे आपल्या घरात,आपल्या नजरेखाली वाढवलेल्या मुलीला सासरी पाठवल्यावर तिच्या संसारात लुडबुड करणारी आई देखील एक स्त्रीच असते,एवढच नव्हे तर बहुतांश वेश्या वस्त्या असोत की कुंटणखाने या ठिकाणी एक स्त्रीच पुढाकार घेताना दिसते .हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर मन विषण्ण होतं .
एक स्त्रीच दुसरीचा दुस्वास कसा करू शकते हा न सुटणारा प्रश्न आहे .तस पाहायला गेलं तर स्त्रीने ठरवलं तर ती होत्याच नव्हतं अन नव्हत्याच होतं करू शकते .ती सरस्वती आहे,अंबा आहे,तशीच ती दुर्गा देखील आहे .ती देघरातला नंदादीप आहे,मात्र तिच्यातील शक्ती ला व्यासपीठ मिळत नाही अन मिळालं तर तिथंही दुसरी कोणीतरी स्त्रीच तिला आडवी येते .हा सगळा प्रकार थांबला तर स्त्री ही नवदुर्गा होऊ शकते .याचा अर्थ स्त्रियांच्या या अवस्थेला पुरुष जबाबदार नाहीत असा होत नाही .स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे हा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे .प्रत्येक स्त्री ही स्वतंत्र आहे, तिला तीच अस्तित्व आहे हे पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे .रस्त्याने चालताना असो की एखाद्या सभा समारंभात असो,स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजेच .स्त्रीच शरीर म्हणजे पुरुषांचा हक्क आणि त्यांची वासना शमविण्यासाठी च स्त्रीचा जन्म आहे ही मानसिकता बदलली पाहिजे .
आपली आई,बहीण,बायको यांच्यानंतर प्रत्येक स्त्री ही आपल्या वासना शमविण्यासाठी आहे अस पुरुष जोपर्यंत मानतात तोपर्यंत स्त्री ही सबला होऊच शकत नाही .
आजही एकीकडे मोठं मोठ्या पदावर स्त्रिया यशोशिखर पादाक्रांत करीत असताना शेतात राबणारी,कचरा वेचणारी, भांडे धुणे करणारी स्त्री कायम उपेक्षित च राहिलेली दिसते .हे कुठंतरी थांबल पाहिजे .जी स्त्री नऊ महिने आपल्या पोटात गर्भाला वाढवते,वर्ष दोन वर्षे आपल्या छातीशी कवटाळून स्तनपान करून मुलाला ,मुलीला वाढवते,पोसते त्याच स्त्रीच्या बाबत आपण इतका राक्षसी विचार कसा करू शकतो याच आत्मपरीक्षण प्रत्येक पुरुषाने करण्याची गरज आहे .
पुरुषाने नोकरी करायची,चार पैसे कमवायचे अन स्त्रीने चूल अन मूल सांभाळायचं ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे .स्त्री ही उपभोगाची नव्हे तर उपयोगाची वस्तू आहे,तिला सोबत घेतल्यास जग जिंकता येतं हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं .देशात आज वाढते बलात्कार, अत्याचार अन्याय पाहिल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो की खरच आपण स्त्री ला माता मानतो का .कथा असो की कादंबरी किंवा सिनेमा, नाटक या ठिकाणी स्त्री ही शोषित ,पीडित दाखवली जाते .हे कुठंतरी थांबल पाहिजे .महिला दिन आहे म्हणून एक दिवस स्त्रीचा सन्मान करायचा,तिच्याबद्दल चांगलं चांगलं बोलायचं,लिहायचं,तिचा गौरव करायचा अन नंतर मात्र तिच्यावर सातत्याने अन्याय अत्याचार करायचे हे योग्य नाही .
कोणतीही स्त्री ही स्वखुशीने वेश्या व्यवसाय किंवा व्यभिचार करत नाही किंबहुना तिला या दलदलीतून बाहेरच पडायचं असतं, मात्र समाजाचे ठेकेदार,पुरुष मंडळी तिला या दलदलीत घट्ट रोवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत .झोपडीत राहणारी असो की राजमहालात राहणारी असो कोणत्याही स्त्री चा सगळ्यात मोठा दागिना तिची इभ्रत असते ,त्यासाठी ती प्रसंगी आपला जीव देखील द्यायला तयार असते मग तीच स्त्री या अशा कामात कशी खुश असू शकेल .याचा विचार झालाच पाहिजे .
अलीकडच्या काळात वाढते अत्याचार,अन्याय यावर बोलताना बहुतांश वेळा महिला,मुलींच्या पेहरावाबद्दल आक्षेप घेतला जातो .कदाचित तो योग्यही असेल पण उघड नागड फिरायचा ठेका काय फक्त पुरुषांनाच आहे का याचा विचार का केला जात नाही .स्त्री ने आपला पदर सांभाळावा अस म्हटलं जातं .मुली जीन्स,टॉप,वनपीस,टू पीस घालतात त्यामुळे पुरुषांची मानसिकता बिघडते अस सांगून सर्रास या अशा नराधम लोकांच्या समर्थनार्थ बोललं जातं.मग हेच जर आपल्या आई,बहिणीबद्दल किंवा बायको बद्दल कोणी बोललं तर मात्र आमचा इगो जागा होतो ,हे अस का होत याचाही विचार व्हायला हवा .स्त्रियांनी राहणीमान बदलले आहे कारण ती आजची गरज आहे,त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे,पण तस न करता कोणीही उठतो अन स्त्रीच्या राहणीमानाबद्दल टिकटिपनी सुरू करतो .हे करताना आपण विसरतो की आपण काय पेहराव करतो,आपली मानसिकता काय आहे याचा आपल्याला का विसर पडतो .
एक मुलगा शिकला तर एक कुटुंब सुधारू शकतं पण एक स्त्री शिकली तर एक पिढि सुधारते हे आपण केवळ भाषणापूरत का लिमिटेड करून ठेवतो .
आज अस कोणतं क्षेत्र आहे ज्यात महिला,मुली या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत नाहीत .राजकारण असो की समाजकारण ,विज्ञान असो की तंत्रज्ञान, व्यवसाय असो की उद्योग या प्रत्येक क्षेत्रात मुली,महिला बरोबरीने नव्हे काकणभर पुढेच आहेत .तरीदेखील स्त्री ही अबला आहे,तिला काही कळत नाही,ती भित्री भागूबाई आहे अस म्हणून तिला हिनवल जातं, हे चूक आहे .स्त्री ही घराचा आधार असते,स्त्री ही समाजाला शिस्त लावणारी हेडमास्तर असते,स्त्री ही समाजाचा आरसा असते त्यामुळं ती स्त्री जर अबला असेल तर समाज सुदृढ आणि सक्षम कसा होऊ शकेल .या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास निश्चितपणे स्त्री ही दीन न राहता सक्षम,खम्बीर ,धाडसी होऊ शकेल यात शंका नाही .
स्त्री ही एक प्रॉडक्ट् नसून ती प्रोडक्टिव्ह आहे,ती नवनिर्मितीचा स्रोत आहे, तिच्या पोटातून मनुष्याची निर्मिती होते याचा विसर अलीकडच्या काळात पडल्याने स्त्री चा जागोजागी अवमान होत असल्याचं चित्र आहे .स्त्री फक्त शोषणासाठीच असते ही भावना वाढीस लागल्याने ती पोषण देखील करू शकते हे समाज विसरत चालला आहे .स्त्रीच शरीर हे कमनीय बांधा नसून सहनशक्तीच आगार आहे हे कायम लक्षात ठेवायला हवे .तरच खऱ्या अर्थाने स्त्रीचा मान,सन्मान राखला जाईल अन ती समाजाला पुढे घेऊन जाईल .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड .
9422744404 .

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

देवदरबारी सेवेस निघाला कीर्तनकार ..............!


किर्तनसूर्य निघाला देवदरबारी 
सेवा रुजू करण्यासी ........!!

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या गाथेत मृत्यूचे वर्णन करताना सांगतात की,
"झाला प्रतिरूप शरीराचा भाव |लक्षीयेला ठाव स्मशाणीचा ||रडती रात्रंदिवस कामक्रोध माय|
म्हणती हाय हाय यमधर्म ||वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा| ज्ञानाग्नि लागला ब्रम्हत्वेसी ||
फिरविला घाट फोडीला चरणी |महावाक्य ध्वनी बोंब झाली || दिली तिलांजली कुलनामरूपासी | शरीर ज्याचे त्यासी समर्पिले || तुका म्हणे रक्षा झाली आपोआप | उजळीला दिप गुरुकृपा ||

याप्रमाणे राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी हे वैकुंठाच्या प्रवासाला निघून गेले असले तरी त्यांची कीर्ती अन त्यांचं देव,देश अन धर्माप्रतीच कार्य अनादी काळापर्यंत स्मरणात राहील हे निश्चित .
जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणारच आहे,शरीर हे नश्वर आहे आत्मा अमर आहे हे कटुसत्य आहे पण काही लोकांचं जाणं मनाला चटका लावून जातं, राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्या निधनाची बातमी काळजाचा ठोका चुकवणारी होती,प्रकांड पंडित असणारा,कोणताही विषय लीलया पेलणारा ,कोणत्याही दुःखावर सहज मात करून सुखाशी हातमिळवणी करणाऱ्या या माणसाला मृत्यूवर मात्र विजय मिळवता आला नाही,बुवा अस अर्ध्यावर सोडून जाणं काही पटलं नाही हे मात्र खरं .
गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या छोट्याशा गावातून कीर्तनाच्या माध्यमातून आपलं नाव सातासमुद्रापार नेण्याचा भीमपराक्रम भरतबुवा रामदासी यांनी केला होता .त्यांच्याबद्दल काही लिहीन म्हणजे सूर्याला त्याच्या तेजस्वी पणाबद्दल आरसा दाखवण्या सारख आहे .साधारणपणे पाच फूट उंची,अंगावर नेहरू,शुभ्र धोतर आणि गळ्यात पांढरा गमजा, कपाळावर चंदनाचा टिळा अन बुक्का अस त्यांचं रूप पाहिल्या नंतर कोणालाही ते तेजस्वी पुरुष आहेत हे लक्षात यायचं .
भरतबुवा म्हणजे एक चालत बोलत विद्यापीठ होते,अध्यात्मिक,ऐतिहासिक, साहित्यिक,सांस्कृतिक,पौराणिक असा कोणताही विषय असला तरी ते हजारो,लाखो लोकांच्या काळजाला भिडेल अन मनाला पटेल असं कीर्तन करायचे .माणूस येताना रिकाम्या हाताने येतो अन जातानाही रिकाम्या हातानेच जातो हे खरं असलं तरी गेल्यानंतरही तुम्ही तुमच्या कीर्ती,कार्यामुळे कायम स्मरणात राहू शकतात .मरावे परी कीर्ती रुपी उरावे अस काहीस बुवांच्या बाबतीत म्हणावं लागेल .एक आदर्श ते समाजासमोर ठेवून गेले आहेत .बुवा कीर्तनकार होते,बुवा हभप होते,बुवा माणुसकीचा झरा होते,बुवा पितृतुल्य होते,बुवा समाजाचा आधार होते,बुवा संतसाहित्याचे गाढे अभ्यासक होते .
रामकृष्ण ही आले गेले त्याविन का जग हे बुडाले अस म्हणतात हे सत्य असले तरी भरतबुवा यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबासोबतच समाजाचे अपरिमीत नुकसान झाले आहे ते कधीही भरून निघणार  नाही  हे नक्की .भरतबुवा रामदासी हे रामदासी पंथातील होते,सहसा कीर्तनकार हे  सहजपणे लोकांत मिसळून त्यांना देवाधर्माच्या कार्यात सहभागी करून घेणारे असतात .मात्र भरतबुवा हे देव आणि मनुष्य यांच्या मधील महामार्गावरील मैलाचा दगड होते .नारदीय असो की वारकरी अथवा सांप्रदायिक कीर्तन,ते चौकोनी चिरा होते .सर्वच कीर्तनातून ते समाजप्रबोधन करण्यासोबतच भगवंत भक्तीचे धडे देत असत .
भरतबुवा अन माझं एक वेगळं नातं होत कारण ते माझ्या गावचे म्हणजे रुईचे होते,कधीही कुठेही भेटले की सुहास्य मुद्रेने स्वागत करून मला तुमचा अभिमान वाटतो अस म्हणत पाठीवर थाप देणार .मात्र आता पाठीवर थाप देणारा तो हात अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे .
पृथ्वीवर हजारो लाखो मंदिर आहेत की ज्यांच्या कळसाचे दर्शन झालं तरी आपण हात जोडतो मात्र असे पाय खूप कमी आहेत की जिथं आपण नतमस्तक होतो,ते पाय होते भरतबुवा,जे भेटले की आपसूक हात जोडले जायचे .
माणूस कितीही मोठा झाला,पैसा ,संपत्ती कमावली तरी त्याला भेटल्यावर जर आपलेपण वाटत नसेल तर त्याच्या जगण्याला काही अर्थ नसतो मात्र भरतबुवा याला अपवाद होते .त्यांना भेटल्यावर नेहमी आपण देवदूताला भेटत आहोत असा भास व्हायचा .लहान मूल असो की तरुण अथवा वृद्ध ते सगळ्यांसोबत एडजेस्ट व्हायचे,आपल्या ज्ञानाचा त्यांना कधीही दुराभिमान नव्हता,गर्व नव्हता .माणूस म्हणून एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते बुवा . बुवा केवळ किर्तनच करायचे अस नाही तर ते छान लिहायचे सुद्धा,लोकमत असो की लोकसत्ता अथवा महाराष्ट्र टाईम्स अशा अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी सातत्याने संत साहित्यावर लिखाण केले आहे .
काही दिवसांपूर्वी त्यांची भेट एका बैठकीनिमित्त झाली होती तेव्हा त्यांनी स्वतःबद्दल बोलताना सांगितले होते की मी कोण आहे,किती मोठा आहे यापेक्षा मी माणूस आहे अन ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती माझं काही देणं लागत अस मानतो म्हणून मी समाजकार्यात सहभागी होतो .बुवा शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक कार्यात सहभागी होते हे मात्र खरं आहे .अगदी दोन दिवस अगोदर त्यांनी महेश कुलकर्णी यांच्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले होते .
ठेविले अनंते तैसेचि रहावे ,चित्ती असू द्यावे समाधान या प्रमाणे भरतबुवा आयुष्य जगले . त्यामुळे ईश्वराने देखील त्यांना काहीच कमी पडू दिले नाही . ऋतुपर्ण सारखा पुत्र दिला ज्याने आईबापांच्या नावाचा झेंडा अटकेपार नेला .मुलाच्या कीर्तनाचे गुणगान करीत सूत्र संचलन करण्याचा योग बिडकरांनी कीर्तन महोस्तवात याची देही याची डोळा अनुभवला आहे .त्यांच्या पत्नी देखील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत .
"जिंदगी जिंदादिली का नाम है,मुर्दादिल क्या खाक जिया करते है " हे ब्रह्मवाक्य त्यांनी आपल्या काळजात कोरून ठेवलं होतं,त्यामुळे ते नेहमी समाधानी होते .ईश्वरी साक्षात्कार ते जेव्हा कीर्तनातून  लोकांपुढे मांडायचे तेव्हा आपण जणूकाही देवाच्या दरबारात उभे आहोत असा भास व्हायचा .तुकाराम गाथा असो की ज्ञानेश्वरी अथवा भगवतगीता त्यांना मुखोदगत होती .शरीराची उंची कमी असली तरी समाजातील उंची मात्र त्यांनी हिमालयएव्हढी गाठली होती .देव आणि मनुष्य यांच्या मार्गातील या मैलाच्या दगडाने परिस्थितीचे अनेक घाव सोसले आहेत मात्र त्याबद्दल कधीही तक्रार न करता त्यांनी संघर्ष करीत सुखाचे दिवस निर्माण केले .
बुवा इतक्या अकाली जातील हे कोणालाही स्वप्नात सुद्धा वाटले नसेल .शरीर हे नश्वर आहे हे सगळ्यांना सांगणारे बुवा इतक्या सहजपणे संसाराचा त्याग करून निघून जातील यावर अजूनही विश्वास बसत नाही .जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला हे जरी सत्य असले तरी बुवा तुम्ही इतक्या अकाली जाण्याने आम्ही पोरके झालो हो .देवाकडे घेऊन जाणारा देवदूतच देवाने आमच्यातून खेचून नेला आता आम्ही कोणामार्फत आमचं गाऱ्हाणं देवाकडे मांडायचे .
भरतबुवा यांनी सांगली,सातारा,पंढरपूर या भागात हजारो विद्यार्थ्यांना कीर्तनाचे मोफत शिक्षण दिले आहे,जिथे जिथे जातील तिथे तिथे कीर्तनाच्या माध्यमातून देव,देश अन धर्मसेवा करण्याचं अखंड व्रत त्यांनी घेतलं होतं . ते कीर्तन करताना असा अनुभव यायचा की जणूकाही आपण देवाच्या दरबारात उभे आहोत .भाषाप्रभु,वाणीवर सरस्वतीचा वास असलेला हा विठ्ठलाचा भक्त आपल्या सावळ्याच्या सेवेसाठी एवढ्या लवकर अनंताच्या प्रवासाला निघून जाईल यावर अजूनही विश्वास बसत नाही .बुवा एकच शब्द देतोत की तुम्ही चेतवलेली भगवतभक्तीची ही मशाल कायम तेवत राहील अन तुम्ही आमच्या मनात कायम रहाल .तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली !

लक्ष्मीकांत रुईकर, बीड

9422744404 .

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

बांगडीच दुःख .................!


बांगडीचं दुःख.....................!

रस्त्याने चालताना टचकन आवाज झाला अन माझी विचारांची तंद्री अचानक विस्कळीत झाली,पायाखाली काय आलं म्हणून पाहावं म्हटलं तर एक फुटकी बांगडी दिसली,चार पाच ठिकाणी तूटली होती बिचारी,का कोण जाणे पण आतून एक आवाज आल्यासारखा झाला अन तुटलेली,पिचलेली ती बांगडी मी सहज उचलून हातात घेतली,तिला मी स्पर्श करताना माझं मलाच काहीतरी विचित्र होत असल्याची जाणीव झाली ,कदाचित ती अंग चोरते आहे की काय अस मला वाटलं,तरी देखील मी तिला अलगद उचलून माझ्या जवळच्या एका स्वच्छ पांढऱ्या रुमालात व्यवस्थित ठेवलं अन मला लक्षात आलं की ती खरोखरच खूप घाबरलेली,सैरभैर झालेली आहे.तिची नजर ,तिचे विस्फारलेले डोळे माझ्याकडं ,माझ्या प्रत्येक हालचालीकड एकटक बघत होते,जणू काही मी आता नेमकं काय करणार आहे याचा ती हळुवारपणे अंदाज घेत होती.

तिच्या नजरेतील असह्यपणा मी देखील जाणू शकलो नाही असं काही नव्हतं,यापूर्वी मी अनेकदा रस्त्यावरून जाताना कित्येकदा रस्त्यात ,कडेला,दुकानाच्या बाहेर अनेक तुटलेल्या बांगड्या पाहिल्या होत्या,मात्र आजचा तिच्याबद्दलचा अनुभव काही निराळाच होता,मी रुमालात हळुवारपणे ठेवलेल्या तिच्याकडं बघितलं तर ती अद्यापही भेदरलेलीच दिसत होती,काही तरी अघटित झालं आहे याची कल्पना एव्हाना मला आली होती .

नेमकं काय झालं असेल याचा अंदाज बांधण्याचा मी प्रयत्न करीत होतो मात्र काहीच सुचत नव्हतं,मनात अनेक शंका कुशंका नि थैमान घातलं होत,यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं परंतु आज मात्र एक वेगळीच भीती तिच्या स्पर्शामुळं मनात तयार झाली होती.का कोण जाणे पण खूप काहीतरी भयानक घडलं आहे याचा अंदाज आला होता .डोक्यात सुरू असलेलं वादळ बाजूला ठेवून मी तिच्याकडं निरखून पाहू लागलो,बराच काळ गेल्यानंतर तिच्याही लक्षात आलं असावं की ज्या माणसानं आपल्याला आधार देऊन जवळ घेतलं आहे ते हात,तो माणूस भला असावा म्हणून ती देखील थोडी सावरली होती .

बराच काळ आमच्या दोघांमध्ये एक भयान शांतता होती,अगदी हळुवारपणे आपल्या पिलासाठी साखरेचा दाना घेऊन जाणाऱ्या मुंगीच्या पावलांचा देखील आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू यावा एवढी भयाणक शांतता होती.शेवटी मीच या शांततेला तोंड फोडलं अन नेमकं काय झालं हा प्रश्न केला,माझा प्रश्न एकूण इतका वेळ शांत असलेल्या तिने पुन्हा एकदा जोरात हंबरडा फोडला .

तिचा तो आवाज काळीज पिळवटून टाकणारा होता,इतक्या वेळ असलेल्या शांततेला भेदून या आवाजाने नभांगणातील ताऱ्यांना देखील घाम फुटला असावा .तिच्या त्या आवाजाने मला नेमकं काय झालं असेल याचा पूर्णपणे अंदाज आला,मी काहीही न बोलता फक्त तिच्याकडं बघत होतो,तिची प्रत्येक हालचाल टिपण्याचा प्रयत्न करीत होतो,न बोलताही तिनं त्या किंकाळीतून सगळं काही सांगितलं होतं .बराच काळ मी न बोलता थिजल्यासारखा जागच्या जागी बसून होतो,अखेर मी तिला प्रेमानं जवळ घेत नेमकं काय,कसं, कुठं,कधी घडलं,कोणी केलं,का केलं,असे एक ना अनेक प्रश्न एका दमात विचारले अन पुन्हा तिच्या उत्तराची वाट पाहत बसलो .

बराच काळ लोटल्यानंतर आणि मी कोणी तरी विश्वास ठेवण्यासारखा माणूस आहे याची खात्री पटल्यानंतर तिने मला आपली कर्मकहानी सांगायला सुरुवात केली,मी तुम्हाला दादा म्हणू शकते का ? या तिच्या प्रश्नाने मी देखील जरा स्थिरावलो .पण तिच्या त्या प्रश्नाने माझ्या मनाची मात्र चलबिचल झाली,कारण त्या प्रश्नांन माझं एक नातं निर्माण केलं होतं,तसा मी खूप नात्यात अडकून राहणारा नाही पण हे अनामिक नातं मात्र काळजात घर करणार होतं, तिच्या दादा या शब्दात जो विश्वास होता तो जाणवला मला.म्हणलं बोल बिनधास्त बोल,काय झालं तुला ,का अशी अवस्था झाली तुझी,रस्त्यात अशी का पडली होतीस विव्हळत .तशी ती म्हणाली दादा सांगते सगळं सांगते जरा श्वास तर घेऊ दे .

इतका वेळ शांत असलेला मी जरा स्थिरावलो आणि प्राण कानाशी आणून ऐकू लागलो,तिनं सांगायला सुरुवात केली,का रे दादा जेव्हा माणसाचा जन्म होतो तेव्हा पाचव्या दिवशीच मला हातात प्रेमानं घातलं जात,मुलगा असो की मुलगी माझ्या असण्यानं त्यांच्या सौंदर्यात भरच पडते,माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत सोबत असणारी मी आज मात्र पूर्णपणे खचून गेले आहे, सुवासिनींचा दागिना म्हणून मिरवताना मला कोण आनंद होतो ते शब्दात नाही सांगता येणार,एवढंच काय पण एखादी सुवासीन जेव्हा तीच कुंकू पुसलं जात तेव्हा देखील मला तिचा हात सोडून जाताना प्रचंड वेदना होतात .मात्र आज माझीच मला लाज वाटू लागली आहे,मी किती असाह्य आहे हे या समाजाने मला आज दाखवुन दिलं आहे .
मी तुझ्या लेकीची लाडकी असते,बायको मला हळुवारपणे सांभाळते तर आई अन बहीण या मला जीवापाड प्रेम देऊन जपतात,मैत्रीण देखील मला घरची वागणूक देतात हा सगळा आनंद असताना एक वेदना मात्र कायम मनात घर करून राहते आहे की ज्यांच्या हातात मी थाटात मिरवते तीच आयुष्य जेव्हा कोणी नराधम विस्कटून टाकतो ना तेव्हा माझीच मला लाज वाटते .
आजकाल माणूस ज्या पशूंच्या वृत्तीने वागतो आहे ना ते पाहिल्यावर आया बायांनो यापुढे तुम्ही हातात हात घालून मला मिरवण्यापेक्षा हाती शस्त्र घ्या अन तुमच्या इभ्रतीवर दरोडा घालणाऱ्या नरपशूंच्या नरडीचा घोट घ्या अस म्हणावं वाटत आहे .अरे आज मी जीच्यासोबत होते ना काय दोष होता तिचा,ती सुंदर होती दिसायला,लडिवाळ होती बोलायला,डोळे तिचे जुल्मीगडे असे होते,केशसंभार करून ती निघाली होती उच्च शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला .तिच्या जन्मापासून मी सोबत असल्याने कित्येकदा एकांतात तिने मला मनातल्या गोष्टी सांगितल्या आहेत,मात्र काही वासनांध लोकांची नजर तिच्या देहावर पडली अन त्यांनी ती कळी उमलण्याआधीच कुस्करून टाकली रे,तीच हे वाक्य ऐकलं अन माझं काळीज पिळवटून निघालं .
तस पाहिलं तर ती होती एक बांगडी,निर्जीव वस्तू पण लेकीबळींच्या स्पर्शाने ,कुरवळण्याने तिच्यात सुद्धा प्राण आले होते, म्हणूनच तिची वेदना आज माझ्या कानी पडली .अरे दादा,या तिच्या आवाजाने मी पुन्हा भानावर आलो,म्हणलं काही नाही ग,पण कोणी केलं हे सगळं,कोण होते ते,त्यांना आया बहिणी नव्हत्या का?या माझ्या प्रश्नावर ती कुस्तीक पणे हसली अन म्हणाली अरे आपलं ते लेकरू अन दुसऱ्याचं ते कार्ट ही जगाची रितच आहे वेड्या हे अजूनही तुला कसं नाही कळलं .
आपल्या आई,बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर तळपायाची आग मस्तकाला जाणारा पुरुष जेव्हा रस्त्याने जाताना ,येताना,कार्यालयात बसल्यावर,कामाच्या ठिकाणी,बाजारात,सार्वजनिक सभा ,समारंभात दुसऱ्या स्त्री ला पाहतो ना तेव्हा त्याच्या डोक्यात तो एक नर आणि समोरची स्त्री म्हणजे असते फक्त मादी .ती आपल्या वापरासाठी च आहे हा पक्का समज करून घेत तो लाळ घोटेपणा करत राहतो .हे करताना त्याला स्थळकाळ, वय,जातपात,धर्म याच कुठलच भान राहत नाही अन त्याच्या नजरेतून फक्त वासना टपकत राहते .जी दिसेल,जिथे दिसेल तिथे या पुरुष नावाच्या नरपशूंच्या डोक्यात वासना निर्माण होते अन मग माझ्यासारख्या लाखो बांगड्यांच्या नशिबी हे असं रस्त्यात विव्हळण येतं .
तिच्या बोलण्यातून तिच्या मनातील वेदना, अंगार लक्षात येत होता.कोणत्या समाजात आपण राहत आहोत याची चीड येत होती .ज्या समाजात स्त्री म्हणजे लक्ष्मी,सरस्वती,दुर्गा,अंबा, चण्डिका म्हणून स्त्री ची पूजा केली जाते,ज्या स्त्रीच्या उदरात नऊ महिने मनुष्य वाढतो त्याच स्त्री ला उपभोगाची वस्तू म्हणून पाहताना त्याला लाज कशी वाटत नाही हा तिचा सवाल माझ्यासमोर हजारो प्रश्न निर्माण करून गेला,तिच्या प्रत्येक शब्दात अंगार होता,तर शब्द शस्त्रप्रमाणे माझ्यावर वार करीत होते अन मी हतबल होतो .
कुठे प्रेमाला नकार दिला म्हणून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार सुरू आहे तर कुठे एकतर्फी प्रेमातून रिंकू पाटील सारखे अनेक जीव जाळून टाकले जात आहेत,काही मुलींना प्रेम का करत नाही म्हणून तेजाब टाकून विद्रुप केलं जातंय तर काही सावित्रीच्या लेकींची इभ्रत भर रस्त्यात लुटली जात आहे .स्त्री ही पुरुषाच्या वापराची,उपभोगाची,ऐशा आरामाची वस्तू असल्याप्रमाणे जिकडे तिकडे सध्या स्त्री ला लुटलं जात आहे,छळल जात आहे .
अरे दादा वासनेने ग्रासलेल्या या समाजातील काही नराधमांना तीन दिवसांपूर्वी जन्मलेलं लेकरू असो की नव्वद वर्षांची माझी आजी असो काहीच दिसत नाही त्यांना फक्त त्यांचा कंड जिरवायचा असतो.अशा घटना घडल्यानंतर निषेध, मोर्चे आंदोलने होतात आणि पुन्हा जणूकाही घडलेच नाही अस तुम्ही आम्ही सगळे वागू लागतो .
हा सगळा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे,काय दोष होता त्या कोवळ्या जीवाचा जिच्या हातात मी होते,ती देशाच्या,कुटुंबाच्या समाजाच्या प्रगतीची स्वप्न रंगवत आपल्या मार्गावर जात होती मात्र काही हरामखोर नराधमांना तीच सुख पाहवल नाही अन तिला कुस्करून टाकलं रे.कोणी अधिकार दिला या नालायक लोकांना अस तीच आयुष्य उध्वस्त करण्याचा.कायदा किती तकलादू आहे हे सुद्धा अशा घटनांमध्ये होणारी वाढ अधोरेखित करते .या देशात जिच्यावर अत्याचार,बलात्कार,अन्याय झाला आहे तिलाच प्रश्न विचारून,तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून पुन्हा एकदा कायद्याच्या मंदिरात निर्वस्त्र केलं जातं तेव्हा मी निर्जीव असून सुद्धा माझं मनही हेलावून जातं रे .कुठंतरी हे थांबल पाहिजे,कोणीतरी या अशा नराधमांना,लेकी बाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्या नरपशुना जिथल्या तिथे फासावर लटकवणारा माईचा लाल पैदा होणार आहे की नाही .आज देशात दररोज हजारो आया बहिणींच्या इभ्रतीवर दरोडे घातले जात आहेत मात्र समाज आणि कायदा डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे .लाज वाटते या अशा माणसांच्या जगात राहण्याची .
कानात शिस ओतल्याप्रमाणे तिचे शब्द माझ्या मनावर घणाचे घाव घालीत होते अन मी मात्र निशब्द झालो होतो .
सध्या जे चालू आहे ते खरच खूप चीड आणणार आहे,दिल्लीतील निर्भया असो की गल्लीतील निर्जला,कोणीच आज सुरक्षित राहिलेली नाही,ज्या स्त्रीच्या छातीला कवटाळून आपण लहानाचे मोठे झालो आहोत तिच्याच छातीवर घाव घालताना समाजातील या अशा लोकांना लाज कशी वाटत नाही हा खरा प्रश्न आहे .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404
                               

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...