सरणावर जायची एवढी घाई कशासाठी .............!
माझ्या लाडक्या बीड वासीयांनो,लाडक्या एवढ्यासाठी म्हणलं की माझा जीव आहे बीडवर अन इथल्या माणसांवर,मात्र आज मला मी बीडकर असल्याची लाज वाटली,खरंच लाज वाटली,अरे ज्या महा भयंकर रोगापासून सुटका मिळावी म्हणून सगळं जग लढत आहे,लहानापासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सगळे घरात रहा,सुरक्षित रहा हे सांगत आहेत,तिथं आम्ही मात्र सगळी लाज नाकाला गुंडाळून मोक्कार वळू सारखे रस्त्यावर फिरत आहोत,त्यामुळे आज मला मी बीडकर असल्याचीच लाज वाटू लागली आहे .
तुम्ही म्हणाल तू आम्हाला शिकवणारा कोण शहाणा लागून गेलास,तू किती पथ्य पाळतोस,तर एक स्पष्ट सांगतो की या संकटाचा सामना करण्यासाठी मी माझ्या परीने जे शक्य आहे ते करतो आहे .मी पत्रकार असल्याने माझं कर्तव्य करतो आहे .मात्र बीडकर म्हणून तुम्ही जे वागताय ना ते योग्य नाही हे मात्र तितकंच खरं आहे .
कोरोना कोण आहे,तो कोणाचा भाऊबंद आहे का,की तो अमुक एका धर्माचा जातीचा आहे का,तर निश्चितच नाही,तो एक विषाणू आहे जो जग गिळंकृत करायला निघाला आहे .जगावर अधिराज्य गाजवण्याचं स्वप्न पाहणारी अमेरिका असो की चीन हे मोठं मोठे बलाढ्य देश या संकटासमोर गुडघे टेकवत आहेत,तिथं तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती. या आजारावर अजूनपर्यंत कोणताही ठोस असा इलाज सापडलेला नाही मात्र घरात राहून,ठराविक अंतर ठेवून,हात पाय धुवून,स्वतःच्या शरीराची स्वछता ठेवून आपण त्यापासून स्वतःचा बचाव करु शकतो .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वीस दिवसात अनेकवेळा मीडियाच्या माध्यमातून जनतेला घरात राहण्याच आवाहन करत आहेत,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत की आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सगळे तुम्हाला आम्हाला रिकामचोट वाटले का .देशासमोर आज अनेक प्रश्न आ वासून उभे असताना अचानक आलेल्या या मोठ्या संकटाच्या विरोधात सरकार असो की विरोधक सगळेच हातात हात घालून लढत आहेत,कोणत्याही देशावर जेव्हा संकट येत तेव्हा एक देशवासीय म्हणून आपलं कर्तव्य असतं की आपण सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे .
आज देशात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे,मृत्य होणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे,या आजारावर मात करण्यासाठी अमेरिका सारखा देश इतर देशाकडे मदत मागत आहे,सुदैवाने अजून भारतात याचे प्रमाण आटोक्यात आहे मात्र ते वाढणार नाही याची कोणीच खात्री देऊ शकत नाही .
बीड जिल्ह्यात देखील प्रशासनाच्या सजगतेमुळे कोरोना अजून आत शिरकाव करू शकलेला नाही मात्र उस्मानाबाद असो की नगर अथवा हिंगोली ,औरंगाबाद अशा सगळ्याच जिल्ह्यात म्हणजे बीडच्या वेशीवर कोरोना येऊन ठेपला आहे .
आपण मात्र गाव जलो हनुमान बाहेर या मानसिकतेतून बाहेर पडायला अजून तरी तयार नाहीत .बीड जिल्ह्यात नाकाबंदी मोडून दाखल झालेल्या काही लोकांच्या संपर्कात आलेल्या पोलीस बांधवांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सगळ्या बिडवासीयांनी आनंद व्यक्त केला .कारण हा आजार संपर्कातून जास्त वाढतो ,हे तुम्ही आमही सगळेच जाणतो .
मात्र जे कळतं ते वळत नाही अशी आपली अवस्था सध्या झाली आहे .निव्वळ कमरेच सोडून डोक्याला गुंडाळल्यानंतर कोण काय बोलणार .
लॉक डाऊन नंतर आज चौदा दिवस झाले आपण घरात आहोत,मात्र जणूकाही चौदा वर्षापासून आपण वनवासात आहोत अस वागू लागलो आहोंत,विचार करा प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवासात कसे राहिले असतील,घरदार ,आई वडील आणि प्रजेला सोडून .राम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा ते राजपुत्र होते मात्र चौदा वर्षाच्या वनवासानंतर ते प्रभू श्रीराम झाले .आपण मात्र त्यांना देव मानत असताना चौदा दिवस घरात राहू शकत नाहीत का,बर काय नाही आपल्याजवळ ,सगळं जग तुमच्या हातात आहे,मोबाईल मुळे आणि टिव्हीमुळे जगात काय सुरु आहे हे तुम्हाला एक सेकंदात कळतंय,बायका पोरं, आई वडील,सगळे तर जवळच आहेत,मग बाहेर झकमारी करण्याची एवढी गरज आहे का ?
पन्नास तासांच्या संचारबंदी नंतर मंगळवारी बीड,परळी,माजलगाव,अंबाजोगाई या भागात रस्त्यावर जे चित्र दिसले ना ते आपल्या अकलेची दिवाळखोरी दाखवणारे होते .मी म्हणतो तुम्ही आम्ही रोजच भाजी खातो का हो,एरवी आपण रोज दोन भाज्या,भात, वरण, पोळी ,चटणी,लोणचं अस जेवण जेवतो का, नाही ना,मग या लॉक डावूनच्या काळातच एवढी काय खाय खाय सुटली आहे .दुष्काळातून आल्यासारखे आपण वागतो आहोत .आठवड्यात एक दिवस भाजी खरेदी केली तरी चालू शकते,किराणा सामान तर आपण सहसा महिन्यातून एकदाच भरतो ना,मग बाहेर जाऊन एवढं काय करतो आहोत आपण .
रिकामं फिरण्यामध्ये कसली आली आहे मर्दुमकी कळत नाही मला,साला जान है तो जहाँ है हे माहीत असूनसुद्धा आपण का मरणाला आमंत्रण देत आहोत हे न उलगडणारे कोडे आहे .
बीड जिल्ह्यात गेल्या चौदा पंधरा दिवसात रस्त्यावर जी परिस्थिती दिसली ती बीडकर किती मूर्खपणा करू शकतात हे दाखवणारी आहे .
बीडच नव्हे तर जवळपास सगळ्याच शहरात लोक संचारबंदी मोडणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य असल्यासारखे वागू लागले आहेत .
शहरातील,चौका चौकात खाकी कपडे घालून जे लोक बसले आहेत ना त्यांनाही घरदार,लेकरबाळ आहेत,मात्र ते तुमच्या आमच्यासाठी उन्हातान्हात थांबून आपलं काम करत आहेत,आम्ही काय करतोय तर त्यांच्याशी दांडेलशाही करतोय,त्यांनाच भांडतोय .
अरे शहाण्यांनो तुम्ही ज्यांच्या नावाने आज खडे फोडत आहात ना ते जर रस्त्यावर थांबले नाहीत तर तुमच्या वेशीवर आलेला तो कोरोना नावाचा यम केव्हाच तुमच्या दारात येईल हे कळणार सुद्धा नाही . डॉक्टर, आरोग्य सेवेतील सगळा स्टाफ आणि महसूल,पोलीस प्रशासन हे डोळ्यात तेल घालून तुमच्या आमच्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत .आम्ही मात्र त्यांच्या मेहनतीवर भडाभडा पाणी ओतत आहोत,मी तर म्हणेल की बिडकरांचा हा प्रकार म्हणजे खंडीभर वरणात फळाफळा मूतन्या सारखाच आहे .
माफ करा पण आजच बीडच्या लोकांचं वागणं नाही पटलं मला,शहरातील रस्त्यावर किमान एक हजार ते दीड हजार मोटारसायकल,चारचाकी वाहन,टेम्पो,टमटम दिसून आल्या .
एकीकडे जिल्ह्यातील सगळे पेट्रोल पंप सामान्य नागरिकांना बंद केले असताना एवढ्या गाड्या आल्या कोठून,त्यांना पेट्रोल मिळाले कसे हा प्रश्न अनुत्तरित आहे .नियम तोडण्यात आम्हाला खूप फुशारकी वाटते .एवढ्या संचारबंदी च्या काळात सुद्धा आम्ही कसे बाहेर राउंड मारून आलो,पोलिसांच्या डोळ्यात कशी धूळफेक केली याच आम्हाला कोण कौतुक वाटतं, मात्र आपण घराबाहेर पडून,गर्दी करून,रस्त्यावर मोक्कार फिरून पोलीस आणि प्रशासन यांच्या डोळ्यात नाही तर आपल्या स्वतःच्या आयुष्यात माती फेकत आहोत हे आपल्याला का कळत नाही .
आपला मृत्यू दारावर,वेशीवर आ वासून उभा आहे,त्यांच्या अन आपल्या मध्ये जर कोणी उभं असेल ना तर ते आहेत पोलीस,डॉक्टर आणि प्रशासन .
आपण जर चार दोन दिवस भाज्या नाही खाल्या,बाहेर नाही पडलो,तर मरणार आहोत का,नाही आपल्याला बाहेर जाता आले तर जगबुडी होणार आहे का .इथं सगळं जग लॉक डाऊन आहे,एक एक जीव वाचवण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे आणि आपण मात्र अक्कल गहाण टाकल्यासारखं वागत आहोत .हा आजार आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना होऊ नये,यापासून सगळे सुरक्षित राहावेत म्हणून आरोग्य यंत्रणा जीवतोड मेहनत घेत आहे .अख्ख जिल्हा रुग्णालय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिकामं करण्यात आलंय, सगळीकडे भयाण शांतता अन भीतीचं वातावरण आहे,बाहेर गावाहून आलेले लोक म्हणजे दुसरे यम आल्यासारखं त्यांना आपण वागवतोय ,हे का होतय कारण कोरोना होण्याची भीती प्रत्येकालाच आहे,मग तरीही आपण न काळल्यासारखं का करतोय हा खरा मुद्दा आहे .
बीड सारख्या शहरात जर या आजाराची लागण झाली तर सरकारी सोडा खाजगी रुग्णालयात सुद्धा जागा पुरणार नाही,रुग्ण आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात मारामाऱ्या होतील ,मग हे जर ओढवून घ्यायचं नसेल तर आपण घरात राहील तर बरं होईल ना,मात्र बीडच्या रस्त्यावर रोज जे चित्र दिसत ना ते मन विषण्ण करणार आहे .पोलीस दलाचे कर्मचारी असोत की आरोग्य विभागाचे लोक कोणत्याही संरक्षक साहित्याशिवाय आपलं काम करीत आहेत,आपण मात्र घराबाहेर पडून चौकाचौकात गप्पांचे फड रंगवत आहोत अन त्यात धन्यता मानत आहोत .
जिथं मंदिरातल्या देवांनी स्वतःला क्वारान्टीन करून घेतलंय तिथं तुमची आमची काय कथा,परंतु हे सगळं समजून देखील बीड सेफ आहे,आपल्याकडे पॉझिटिव्ह लोक नाहीत,प्रशासन विनाकारण बाऊ करतंय, असले फालतू विषय चघळत बसण्यात आपण धन्यता माणतोय .
आपण चौकात बसून किंवा शहरभर उंडारत फिरून असा काय देशाचा विकास करणार आहोत का,नक्कीच नाही, उलट घरात बसल्यामुळे लेकरं खुश आहेत,बायको,आईवडील सगळे कितीतरी वर्षांनी एकमेकांच्या आवडीनिवडी जपत आहेत, जुने खेळ,जुने मित्र,मैत्रिणी यांच्या आठवणीत दिवस जात आहेत पण आम्हाला हें नकोय .आम्ही मोदी अन ठाकरे पेक्षा हुशार आहोत त्यामुळे आम्ही त्यांची अक्कल काढण्यात स्वतःला हुशार मानत आहोत .
गेल्या पंधरा दिवसात प्रत्येकाने ठरवलं असत तर निश्चितपणे या दिवसात काय काय अनुभवलं,कोणाचे स्वभाव आवडले,कोणाचं वागणं खटकलं या बाबत छान छान लिखाण करता आलं असत,ज्या आईबापाच तोंड पाहण्यासाठी मुलांना आठवडा लागायचा त्यामुलांच्या सोबत वेळ घालवण्याची संधी जर मिळाली आहे तर तीच सोनं करा ना, पण नाही,सहजासहजी एखादी गोष्ट मान्य करतील ते बीडकर कसले .
समजा तुम्ही बाहेर गेलात अन दुर्दैवाने तुम्हाला हा आजार झाला तर 14 दिवस ते 28 दिवस एकट्याने रुग्णालयात राहावे लागेल ते सोपे नाही मग कशाला विषाची परीक्षा घ्यायची .या जगात जो जन्माला आला तो प्रत्येक जण एक ना एक दिवस मरणारच आहे पण त्या मरणाची तयारी आपण स्वतःच का करा,सरणावर जायची एवढी घाई अन पुंगी वाजवून तो कोरोना नावाचा साप का घरात घुसवून घ्या.
त्यामुळे अतिशहानपणा न करता आयुष्यात कधी तुम्हाला बाहेर पडायला अन खरेदीला जाण्याची संधी मिळालीच नाही असं वागता गपगुमान घरात रहा,आज काही दिवस घरात राहिलात तर या जगात रहाल नाहीतर चांगला होता म्हणायला सुद्धा लोक धजवणार नाहीत,कारण या अशा काळात जर तुम्ही मेलात तर हाताने मस्ती केली ,जाऊ नको,फिरू नको म्हणत होते तरी गेला अन जीवाला मुकला असच लोक बोलतील अन ती वस्तुस्थिती असेल,म्हणून च नम्र विनंती आहे की या संकटकाळात बाहेर पडून आपल्यासोबतच कुटुंब आणो देशवासीय यांचे प्राण धोक्यात घालण्यापेक्षा घरी रहाणं प्रशासन आणि शासनाला सहकार्य करा .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

1 टिप्पणी:
मार्मिक लिखाण......पण बीडकर ऐकतील या बद्दल शंकाच आहे.... .ते काही मोजके दीड शहाणे......असो परमेश्वरासमोर प्रार्थना..... सर्वांना सदबुद्धी दे.. .गपगुमानघरीच थांबण्याची
टिप्पणी पोस्ट करा