काळ सोकावतो आहे .............!
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो मात्र या चौथ्या स्थम्भाला कायम अडचणीत आणण्याचे उद्योग अलीकडच्या काळात होत असल्याचे दिसून येत आहे,बातमीमुळे अफवा पसरली गेली किंवा एखाद्या पोस्टवरून समाजात दुही निर्माण झाली अशी कारणे देऊन पुन्हा एकदा एका पत्रकाराला राज्यात पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागले,झालेली कारवाई चूक की बरोबर यावर वाद विवाद होऊ शकतात मात्र ज्या पद्धतीने सूडबुद्धीने प्रशासन वागत आहे ते पाहता म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आहे हे वाईट आहे असेच म्हणावे लागेल .
एबीपी माझा चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या एका तथाकथित बातमीमुळे गर्दी जमली अन गोंधळ निर्माण झाला असे तारे सरकार अन प्रशासनाने तोडले आणि राहुलला अटक केली,त्यानंतर बुधवारी दुसरे प्रकरण समोर आले ते बीडला .
गेल्या तीस वर्षांपासून पार्श्वभूमी नावाचे दैनिक चालवणारे संपादक गंमत भंडारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करीत रात्रभर कोठडीत डांबून ठेवले .काय गुन्हा केला त्यांनी तर एक पोलीस कर्मचारी हा मुंबई भागातून बीड जिल्ह्यात आल्याची आणि त्यांच्यामुळे कोरोना फैलावू शकतो का अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्याची चार ओळीची बातमी व्हायरल केली .
हा सगळा प्रकार भंडारी यांनी जाणीवपूर्वक केला होता का तर निश्चितच नाही,त्यामागे दोन समाजात किंवा जनतेत गोंधळ निर्माण व्हावा असा हेतू होता का तर नाही,किंवा आपल्या बातमीमुळे दैनिकाचा खप वाढावा असंही त्यांचं मत नसावं पण तरीदेखील पोलीस प्रशासनाने अशा पध्दतीने कारवाई केली की जणूकाही भंडारी हे अट्टल दरोडेखोर किंवा चोर आहेत .गंमत भंडारी यांना जे लोक ओळखतात त्यांना माहीत आहे की कडक बोलणारा,कडक शब्दात लिहिणारा,जे लोकांना वाटते ते त्यांच्याच शब्दात मांडणारा हा संपादक आहे .
काहीवेळा ते एकांगी लिहितात,स्वतःला न्यायाधीश असल्यासारख्या ऑर्डर सोडतात,नको ते सल्ले देतात हे देखील।सत्य आहे मात्र त्यामागे त्यांचा स्वतःचा काही स्वार्थ नेहमीच असतो असे नाही .
पार्श्वभूमी मध्ये मुख्य बातमी हीच मुख्य आकर्षण असते ,या बातमीत संपादक हे स्वतःच मत व्यक्त करतात त्यामुळे अनेकवेळा ती अतिरंजित वाटते .घटना जशी घडली त्यापेक्षा ती का घडली,रोखण्यासाठी काय करता आले असते,कोणती खबरदारी घेतली गेली किंवा नाही गेली यावर बातमीत जास्त भर दिलेला असतो ,जो अनेकांना खटकतो .बातमी किंवा पत्रकारितेच्या इथिक्स मध्ये हि गोष्ट बसत नाही .मात्र तरीही ती भंडारी यांची स्टाईल झाली आहे त्यामुळे आता त्यांची ओळख निर्माण झाली आहे .पुढारी असो की प्रशासन अथवा सामान्य माणूस अनेकांना पार्श्वभूमी ची ही स्टाईल पचनी पडत नाही .त्यामुळे अनेकदा संपादक हे मोहम्मद तुघलक वाटतात,अतिशहाणे वाटतात,ते संपादक कमी आणि सल्लागार जास्त वाटतात ."अगर मेरी सरकार आयेगी तब भी मै विपक्ष मे बैठुंगा"हे राम मनोहर लोहिया यांच ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या भंडारी यांनी आपल्या स्वभावामुळे अनेकांचा इसार घेऊन ठेवलेला आहे .
त्यांनी जी बातमी व्हायरल केली त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी मुंबई परिसरातून बीड जिल्ह्यात आल्याचा उल्लेख होता,या बातमीमुळे अफवा पसरली आणि लोक भयभीत झाले असा दावा करून पोलिसांनी भंडारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला,तातडीने त्यांना अटक करण्यात आली .आता हे एवढं आवश्यक होतं का,की समज देऊन अथवा प्रतिबंधात्मक कारवाई करून प्रकरण मिटवता आलं असतं .पण पोलीस कारवाई बाबत आपण काय बोलणार त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं,कायद्यापुढे कोणी लहान मोठं नाही सगळे समान आहेत हे यावरून दाखवून द्यायचं असेल म्हणून सुद्धा ही कारवाई झाली असेल .
पण अलीकडच्या काळात पत्रकार हे सगळ्यांसाठी सॉफ्ट टार्गेट झाले आहेत,सगळेच पत्रकार लाचखोर,पीत पत्रकारिता करणारे,पुढपुढं करणारे ,पाकीट घेऊन पत्रकारिता करणारे नसतात मात्र सब घोडे बारा टक्के अशा पद्धतीने मानसिकता करून पुढारी,अधिकारी आणि सामान्य माणूस या वर्गाकडे पाहतो .पत्रकारिता पहिल्यासारखी राहिली नाही अस नेहमी म्हणलं जात मात्र अशावेळी पत्रकारांना येणाऱ्या अडचणी कोण समजून घेत का .एखाद्या पुढाऱ्यांविरोधात बातमी दिली की तो पत्रकार जातीयवादी, धर्मवेडा, सरकारच्या किंवा विरोधकांच्या हातचं बाहुल म्हणून बदनाम केला जातो .ज्या पत्रकाराने शरद पवार यांना पदमसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला अन पवार चिडले त्या पत्रकाराची कुंडली सोशल मीडियावर टाकून त्याला बदनाम केलं गेलं,मात्र हे करताना त्याने यापूर्वी अनेक चांगले प्रश्न धसास लावले असतील याकडे दुर्लक्ष केलं गेलं .असच काहीस अनेकवेळा होतं मात्र सगळे पत्रकार हे पैशापुढं आपलं इमान विकणारे आहेत असा समज करून घेतला जातो अन त्यांना त्रास देण्यासाठी संधी शोधली जाते .
राहुल कुलकर्णी असो की गंमत भंडारी या लोकांनी आणि इतरही पत्रकारांनी चांगली काम केलेली आहेत,पण त्यांच्याकडून एक चूक झाली की लगेच प्रशासन त्यांना धडा शिकवण्याची संधी मिळल्यागत काम करतं .मात्र अस जर प्रशासनाकडून झालं तर दिलगिरी व्यक्त करून किंवा चुकून झालं अस म्हणून मुद्दा पुढे ढकलला जातो .कोरोना झालेल्या किंवा निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीच नाव जाहीर करू नये असा आदेश असताना जिल्हाधिकारी बीड यांनी मात्र गुरुवारी नगरमध्ये उपचार घेणाऱ्या पिंपळा येथील रुग्णाचे नाव जाहीर केले,मग पुन्हा सुधारणा केली,अशावेळी ते स्वतःवर कायद्याचा बडगा उगरणार का?हा सवाल कोणी उपस्थित केला तर तो लगेच कायद्याच्या दृष्टीने कायदा मोडणारा म्हणून संबोधित केलं जातं .याचाच अर्थ प्रशासनाने किंवा सरकारने केलेली चूक ही मागे घेता येऊ शकते,माफी मागून प्रकरण सोडून देता येते पण इतरांनी चूक केली तर थेट गुन्हा दाखल केला जातो .एखाद्या मंत्र्याने प्रक्षोभक विधान केले तर किंवा पुढाऱ्यांची जीभ घसरली तर आमचं विधान तोडून मोडून दाखवलं,आम्हाला तस म्हणायचं नव्हतं,आमच्या विधानाचा गैरअर्थ लावला गेला अस म्हणून पांघरून घातलं जात,मात्र पत्रकारांनी काही केलं की लगेच त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं हे कितपत योग्य आहे .
आज जिथं सगळ्या बाजूने सामान्य माणुस हताश झालेला असतो त्यावेळी केवळ पत्रकारिता या क्षेत्राकडून च लोकांना न्यायाची अपेक्षा आहे .पण त्याच वर्गाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय हे देखील दुर्दैवी आहे .राहुल कुलकर्णी आणि गंमत भंडारी यांच्या अगोदर सुद्धा बीडमध्ये महेंद्र मुधोळकर या पत्रकारावर देखील एक पोस्ट केली म्हणून कारवाई केली गेली .मग जर पत्रकारकडून चूक झाली तर कारवाई करणारे प्रशासन त्यांच्या एखाद्या अधिकाऱ्याकडून चूक झाली तर का कारवाई करत नाही हा प्रश्न निर्माण होतो .
मास्क वापरला नाही म्हणून सामान्य माणसाला दंड करणारे अधिकारीच जर स्वतः मास्क लावणार नसतील तर मग त्यांच्यावर कारवाई कोण करणार,जिथं देशात लॉक डाऊन आहे तिथं कोणी अधिकारी जर बांधकाम करत असेल अन त्याला परवानगी आहे अशी सबब दिली जात असेल तर मग या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार .
हे म्हणजे हम करे सो कायदा अस झालं .गंमत भंडारी यांनी जे केलं त्याच समर्थन होऊच शकत नाही पण म्हणून त्यांच्यावर आकसबुद्धीने कारवाई अपेक्षित नाही,ती तशी केली गेली अशी चर्चा होते आहे . वृत्तपत्र असो की इ मीडिया या लोकांमुळे हजारो लोकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत,अनेकांचे संसार उभे राहिले आहेत,सत्ताधारी,विरोधक,प्रशासन यांच्यातील लूप होल्स बाहेर आले आहेत .मीडिया अनेकवेळा अतिरंजित पणा करतो हे मान्य केलं तरी याच मीडियाच्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत हे विसरून चालणार नाही .
मग तरीसुद्धा मीडियाला टार्गेट करून नेमकं काय साध्य करायचे आहे हे न उलगडणारे कोडे आहे .
अनेकदा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ,कर्मचारी हे आपल्या बदल्या,बढती यासाठी तसेच एखाद्या कारवाईत सुटका मिळावी म्हणून पुढाऱ्यांचे उंबरे झिजवताना आपण पाहतो .पुढाऱ्यांच्या हातचे खेळणे असल्यासारखे अधिकारी वागतात पण नियम फक्त सामान्य माणसाला लागू असतात प्रशासनाला नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे .गंमत भंडारी असोत की इतर पत्रकार प्रत्येक बाबतीत कायद्याचा धाक दाखवून उपयोग नसतो,मात्र हे कोण सांगणार . कारण सध्या पत्रकार असो की सामान्य माणूस प्रत्येकाचाच हात प्रशासन आणि सरकार या दोन यंत्रणेखाली अडकलेला आहे,तरीदेखील अशा पद्धतीने होणाऱ्या कारवायांमुळे मनोबल ढासळू शकते हे नक्की .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404