गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

राहुल,तुझं चुकलंच .............!


राहुल तुझं चुकलंच ...........!

पत्रकारिता हे सतीचं वाण आहे अस म्हणतात त्याचप्रमाणे पत्रकार सोडून इतर सगळ्यांनी कमरेच सोडून डोक्याला गुंडाळल तरी त्यांना तो अधिकार असतो मात्र पत्रकारांना नसतो असा एक अलिखित नियम आहे,राहुल ,मित्रा गेल्या वीस वर्षाच्या काळात तू संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देश पालथा घातलास, रावापासून रंकापर्यंत अनेकांच्या कहाण्या जगासमोर मांडल्यास मात्र हे करताना तू सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याच्या व्रतामध्ये अनेकांना अंगावर घेतलेस अन त्यातूनच तुझ्यावर कारवाईसाठी टपून बसलेल्या गिधाडांच्या हाती तू सापडलास, त्यामुळेच म्हणतो राहुल तू चुकलास .
पत्रकार हा समाजमनाचा आरसा असतो अस म्हणलं जात,समाजात कुठं काही चांगल ,वाईट घडत असेल तर ते दाखवणं हे आपलं काम आहे,अगदी त्यासाठी आपण आपला जीव देखील धोक्यात घालतो .पत्रकार म्हणलं की दिसतो तो त्याला मिळणारा मान, अधिकारी असोत की पुढारी सगळेच त्याला झुकून सलाम करतात एवढंच सगळ्यांना दिसत. मात्र एक पत्रकार बातमी देण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी किती धडपड करतो हे कोणालाच दिसत नाही .म्हणतात ना माशाचे अश्रू कधीच दिसत नाहीत म्हणून त्याला दुःखच माहीत नाही अस नसतं तसच काहीस आपल्या पत्रकारिता जमातीचं आहे .आजही शहरी,निमशहरी,ग्रामीण भागातील पत्रकार हे कसाबसा चरितार्थ चालवतात,नुसत्या सन्मानाने त्यांचंच काय कोणाचच पोट भरत नाही हो . पत्रकारितेच्या क्षेत्रात चमक धमक खूप आहे पण त्यामागे त्रास किती आहे हे कोणालाच माहीत नाही,अनेकवेळा दिवसेदिवस उन्हा तान्हात, न खतापिता शेकडो मैल एका बतमीसाठी पत्रकारांना हिंडावे लागते,एखादा शब्द चुकला तर पत्रकाराला बोल लावणारे लोक त्या बतमीसाठी त्याने किती मेहनत घेतली आहे याचा कधीच विचार करीत नाहीत .
आज इलेक्ट्रॉनिक मीडिया मुळे अन सोशल मीडियामुळे प्रत्येक जण पत्रकार झाले आहेत,पत्रकारितेला एक सवंगपणा आला आहे.मात्र राहुल तुझी पत्रकारिता ही वेगळी आहे,पानिपत ची लढाई कशी अन कुठून सुरू झाली इथपासून ते अंदमान निकोबार मध्ये सावरकर यांना किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या .इथपर्यंत अनेक चांगल्या वाईट गोष्टी तू समाजासमोर मांडल्यास .एवढंच काय पण शरद पवार असोत की इतर राजकारणी यांना आपल्या वेगळ्या आणि अनोख्या शैलीने तू बोलत केलं आहेस .त्यावेळी अनेकांनी तुझं तोंडभरून कौतुक केलं आहे .जिल्ह्याच्या बातमीला राज्य पातळीवरील संदर्भ कसे द्यायचे अन जिल्ह्या जिल्ह्यातून इनपुट घेऊन बातमीच सोनं कस करायचं हे तुझं कसब वादातीत आहे . पांढऱ्या शुभ्र कापड्यावरील एक काळा डाग शोधण्यासाठी तुझी नेहमी धडपड सुरू असते,काही जणांना तो तुझा आगाऊपणा वाटतो, काही जण तुला अतिशहाणा म्हणतात, काही जणांना तू तिरसट वाटतोस पण पत्रकारितेच्या बाबतीत तू वेगळा आहेस हे मात्र खरं आहे .
मात्र दोन दिवसांपूर्वी जे घडलं त्यात तुला दोषी धरून अटकेची कारवाई करून सरकारने आपली मर्दुमकी दाखवून दिली आहे .सरकार किंवा अधिकारी कोणाचंही असो आपल्या अंगाशी आलं की ते त्या माकडीनिप्रमाणे वागतात .आपला जीव वाचवण्यासाठी या लोकांनी तुला बळीचा बकरा बनवलं .एबीपी माझा ने वाधवान प्रकरणात सरकारला जे प्रश्न विचारले ते सरकार आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना चांगलेच झोम्बले .त्या दिवसाचा वचपा काढण्यासाठी संधी शोधणाऱ्यांच्या हातात आयत कोलीत मिळाल .
राहुल कुलकर्णी यांनी बातमी दिली सकाळी नऊ वाजता,अकरा वाजता रेल्वे विभागाने ट्रेन सुरू होणार नाहीत हे स्पष्ट केलं त्यानंतर चार वाजता हा जमाव जमला .मग यात राहुल किंवा एबीपी च्या बातमीचा संबंध येतो कुठे.पण म्हणतात ना सरकार आपलं असल्यावर ओलं आणि वाळल कसंही जळतं. तस काहीस तुझ्या प्रकरणात झालं.
ज्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तुला अटक झाल्याची माहिती तातडीने ट्विट केली त्याच देशमुख यांनी वाधवान प्रकरणात अमिताभ गुप्ता यांचा बोलविता धनी कोण याचा शोध घेण्यासाठी ही तत्परता दाखवली नाही .अधिकारी कितीही मोठ्या पदावर असला तरी तो मनाने शहाणपणा करीत नाही,त्याला या प्रकरणात कोणी ऑफ द रेकॉर्ड आदेश दिले याचा खुलासा देशमुख करणार आहेत का,त्यांनी जर वाढवान आणि गुप्ता यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर कळून जाईल की गुप्ता कोणाच्या इशाऱ्यावर या प्रकरणात नागवं नाचले ते,मात्र ते करण्यापेक्षा देशमुख यांनी तुला 24 तासात अटक करून जग जिंकल्याचा आव आणला .

आता सरकारवर टीका केल्यावर त्याची किंमत तर मोजवीच लागेल ना .अरे आजही मुंबई असो की दिल्ली शेकडो पत्रकार हे सरकारच्या तुकड्यावर आपला चरितार्थ चालवतात अस हे राजकारणी सर्रास सांगतात,कारण आपलेच अनेक संपादक,ज्येष्ठ पत्रकार यांनी मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट असतील किंवा इतर लाभ मिळवले आहेत,तू मात्र सातत्यानं सरकारच्या विरोधात ,जे चूक आहे ते समोर आणण्यात आपली पत्रकारिता केलीस अन आज त्याचाच फटका तुला बसतो आहे .
राहुल कुलकर्णी यांच्याबाबत जे घडले तेच किंवा कमी अधिक प्रमाणात हे अनेकांच्या बाबतीत नेहमी घडते मात्र इतरवेळी पत्रकारांना सन्मान,खुर्ची देणारे अधिकारी ,राजकारणी आपली 'जात'हा पत्रकार अडचणीत आल्यावर बरोबर दाखवतात .कारण त्यांचा इगो कधी ना कधी त्या पत्रकारकडून दुखावलं गेलेला असतो .आज दिल्ली असो की उत्तर प्रदेश अथवा मध्यप्रदेश किंवा तेलंगणा अनेक राज्यांनी त्या त्या भागातील मजूर,शेतकरी,कष्टकरी अशा श्रमजीवी लोकांना पाचदहा हजार रुपये थेट मदत केली आहे,महाराष्ट्रात मात्र अद्याप तरी केवळ गहू तांदूळ वाटण्यापालिकडे काहीही झालेले नाही,मग अशा बातम्या आपण केल्या की आपण विरोधकांच्या ओंजळीने पाणी पिणारे म्हणून हिनवले जाते .शिवभोजन असो की इतर योजना याबाबत आपण छान छान ,गोडगोड बातम्या केल्या तर आपण ग्रेट पत्रकार अन थोडं विरोधात लिहिलं की लगेच सरकार विरोधी हे अस गणित होवुन बसला आहे .
"चूप बैठ नही तो कान काट दुंगा"अशी भूमिका कोणत्याही सत्ताधाऱ्यांची असते .मात्र निरंकुश आणि मदांध झालेल्या सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकारांच असत .आणि त्यांनी त्यांचं काम केलं की त्यांना बदनाम करण्याचा,त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान करण्याचा ,त्यांच्यावर हल्ले करण्याचा उद्योग सत्ताधारी करतात .राहुल तुझ्या बाबत सुद्धा हेच झाले आहे .देशात लॉक डाऊन असताना केवळ पैसा आहे ,राजकारणी लोकांच्या ओळखी आहेत म्हणून वाढवान कुटुंबाला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली,सामान्य माणूस घराबाहेर भाजीपाला घ्यायला पडला तर त्याच्या पार्श्वभागावर सटके देणारे पोलीस वाढवान सारख्या धनाढ्य लोकांना मात्र कमरेत वाकून मुजरा करतात .जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राबविण्याची जबाबदारी असणाऱ्या एस पी सारख्या अधिकाऱ्याने लॉक डाऊन च्या काळात घराचे बांधकाम काढले तर कलेक्टर सारखे अधिकारी सुद्धा काहीवेळा पाठराखण करतात अन याचा जाब विचारायला गेलं तर पत्रकार कुठं अडचणीत आणता येतो का याची संधी शोधली जाते .हा सगळा प्रकारचं किळसवाणा आहे .
लोकांनी मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये अन्यथा एक हजार रुपये दंड केला जाईल अस सांगणारे जिल्हाधिकारी जर मास्क न घालता रस्त्यावर येत असतील तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार अन हे विचारणाऱ्या पत्रकाराला मात्र दमदाटी होत असेल तर दाद मागायची कोणाकडे हे देखील अनुत्तरीत असे प्रश्न आहेत .

राहुल कुलकर्णी यांनी जर चूक केली असेल तर त्यांना शिक्षा व्हायला हरकत नाही मात्र सरकार आणि  गृह विभाग आपल्या निष्क्रियतेवर पांघरुन घालण्यासाठी हे असले उद्योग करत आहे .रेल्वेचा अपघात झाला म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या मंत्रिपदाचा तेव्हा राजीनामा दिला होता .आज ही नैतिकता दाखवून अनिल देशमुख हे वाढवान प्रकरणात गृह विभागाचा गलथानपणा मान्य करून राजीनामा देण्याची हिंमत दाखवतील का,तर उत्तर आहे नाही .कारण अलीकडच्या काळात नैतिकता हा शद्बच राजकारणातून हद्दपार झाला आहे,मग अशा लोकांकडून सूडबुद्धीने कारवाई होण्याशिवाय दुसरी काय अपेक्षा करणार .
राहुल कुलकर्णी यांनी जी बातमी दिली त्यामागे त्यांचा हेतू राज्यात हजारो लोक एकत्र यावेत ,पॅनिक निर्माण व्हावे,गोंधळ उडावा असा नक्कीच नव्हता याची जाणीव सगळ्यांनाच आहे पण तरीही तातडीने मुंबईवरून पोलीस येऊन अटकेची कारवाई करतात म्हणजे यामागे राजकीय सूड आहे हे दूध पित्या लेकराला सुद्धा कळेल .जर राहुल यांच्या बातमीमुळे एवढं सगळं घडल अस सरकार म्हणत असेल तर मग सरकारच्या बुद्धीची करावी तेवढी कीव थोडीच आहे .
या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने दिसून आली ती म्हणजे एबीपी माझाची संपूर्ण टीम राहुलच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली,इतर चॅनेलच्या प्रतिनिधींबाबत अस घडलं असत तर मॅनेजमेंट ने हात झटकले असते कदाचित,पण राजीव खांडेकर यांनी सुद्धा या आपल्या सहकाऱ्यांची जी सत्य बाजू मांडली ती कौतुकास्पद आहे .
हे सगळं असलं तरी राहुल तू चुकलासच अस मी अजूनही म्हणेल कारण टिळक,आगरकर,अत्रे,भालेराव यांची पत्रकारिता आता राहिलेली नाही रे,जे दिसतंय ते दाखवायचं नाही तर जे विकतंय ते दाखवायचं,राजकारणी,पुढारी,अधिकारी यांच्या पूढेपुढे करायचे,टीका टिप्पणी,शिवराळ भाषा वापरायची नाही,सरकारला जाब विचारायचा नाही,म्हणजे मग तुम्ही आम्ही ग्रेट नाहीतर तुरुंग थेट .असो पण सरकारच्या या तुघलकी कारभाराचा एक पत्रकार म्हणून मी निषेध करतो .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404 .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...