माज चांगला नाही ............!
संपूर्ण जग ज्या भीतीच्या सावटाखाली सध्या जगतंय ते पाहिल्यानंतर प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे मात्र काही लोक अजूनही याबाबत जागृत नसल्याचे दिसत आहे,सरकार,प्रशासन सामाजिक संस्था सगळेच दक्ष राहण्याची हात जोडून विनंती करत असताना दीड शहाणे लोक मात्र अजूनही रस्त्यावर फिरताना,प्रतिबंधक उपाययोजना पायदळी तुडवताना दिसत आहेत,हा माज चांगला नाही ,नाहीतर एकाच्या मुर्खपणामुळे हजारो,लाखोंना आपला जीव गमवावा लागेल .
कोणत्याही आपत्ती ला इष्टापत्ती मध्ये रूपांतर करण्याची मानवी मानसिकता आहे,कोरोना बाबतही अस करता येऊ शकतं पण त्यासाठी हवी आहे सामूहिक संघटनशक्ती आणि इच्छाशक्ती .कारण या आजारापासून दूर राहायचं असेल तर प्रत्येकाने आपल्याला गर्दीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे .
मानवी जन्म हा चौऱ्या ऐंशी योनी मधून गेल्यानंतर मिळतो अस म्हणतात मग हे माहीत असूनसुद्धा आपण एवढं अमूल्य अस जीवन हसतखेळत जगण्यापेक्षा ,चार आठ दिवस घरात बसण्यापेक्षा बाहेर फिरून का धोक्यात घालतोय हा न उलगडणारा प्रश्न आहे .
चीनमध्ये साधारणपणे डिसेंम्बर च्या सुमारास कोरोना व्हायरस ची लक्षणे दिसून आली,त्या देशाने या व्हायरस शी दोन हात करण्यासाठी उपाययोजना देखील सुरू केल्या,अगदी दहा हजार खाटांचे रुग्णालय अवघ्या एक महिन्यात उभारले,हे सगळं करण्यामागे अखंड मानवजातीचे रक्षण हाच हेतू त्यांचा होता .हा विषाणू भारतापर्यंत किंवा इतर देशापर्यंत येता येता फेब्रुवारी मार्च उजाडला .
मार्चच्या पहिल्या आठवड्यात ज्या इटलीमध्ये कोरोनाची नुकतीच लागण झाली .त्याच देशात 20 मार्चपर्यंत पन्नास हजारच्या घरात लोकांना लागण झाल्याचे समोर आले आहे .तर चीन सारख्या देशात देखील या विषाणू ने लाखो लोकांना आपल्या कवेत घेतले आहे .
भारतात देखील या विषाणूमुळे तिनशेच्या आसपास लोकांना लागण झाली आहे . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री हे जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहेत .
हा आजार संसर्गजन्य आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे,मात्र भारतासारख्या देशात अजूनतरी एखाद्या मोठ्या समूहाला हा आजार झाल्याचे समोर आलेले नाही हे सुदैव आहे .मात्र त्यामुळे धोका टळलेला नाही .धोका कायमच आहे,त्यासाठी गोळ्या औषधे तर आहेतच पण काळजी घेण जास्त महत्वाचं आहे .
जगाच्या पाठीवर हा एकमेव प्रसंग असा आहे की याचा कुठेही निषेध केला गेला नाही,किंवा याच्या विरोधात कुठेही आंदोलन,मोर्चे,उपोषण केले गेलेले नाही .सगळेजण हातात हात घालून याच्याशी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत .सरकार कोणाचे आहे अन विरोधात कोण आहे याचा विचार न करता,कोण कुठल्या धर्माचा,जातीचा,पंथाचा आहे याचाही विचार न करता लोक एकत्र येऊन या संकटाचा सामना करत आहेत हे विशेष आहे .
मराठवाड्यात 21 आणि 22 मार्च रोजी बंदचे आवाहन केले आहे .तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यु चे आवाहन केले आहे .याचे पालन करणे हे सजग नागरिक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे .परंतु लोक मात्र त्याकडे जास्त लक्ष देत नसल्याचे चित्र आहे .
या जगाच्या पाठीवर असा कोणताही मनुष्य प्राणी नाही की जो काही दिवस,महिने घराबाहेर पडला नाही तर जगबुडी होईल .जगाची आर्थिक वाढ खुंटल ,काही दिवस आपण जर घरात बसून राहिलो तर कोणाचं काहीच नुकसान होणार नाही मग आपण का आटापिटा करतोय ही न कळणारी बाब आहे .
या आजारापासून बचाव करायचा असेल तर समूहाने एकत्र येणे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक आहे, अशावेळी काही हौशी लोक मात्र सर्रास बाहेर बोंबलत फिरतानाचे चित्र आहे .बंद म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच असल्याचे ते समजत आहेत .लोकांना कळकळीने सांगितले तरी ते घराबाहेर पडत आहेत .स्वतः पंतप्रधान, मुख्यमंत्री सांगत आहेत की अन्न धान्याचा साठा करू नका,घरातच बसून रहा, लोकसंपर्क टाळा मात्र तरीही लोक शहाणपणा करून आपल्या सोबत इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत .जिथं मंदिर मस्जिद,चर्च,गुरुद्वारा बंद आहेत,देवदर्शन,सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे तिथं घराबाहेर पडून आपण अस काय साध्य करणार आहोत .विनाकारण बाहेर पडल्याने फार काही देशहिताचे काम आपण करणार नाहीत मात्र तरीही लोक मजाक म्हणून बाहेर निघत आहेत .
सध्याच्या इंटरनेट आणि सोशल मीडिया च्या जमान्यात घरबसल्या सगळं उपलब्ध असताना आपण बाहेर जाण्याचा अट्टहास का करतो आहोत हेच कळत नाही .एखाद्या आजारामुळे का होईना आपण घरात बसून आहोत याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपण घराबाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहोत हे लाजिरवाणे आहे .
लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करणे हे आपले परम कर्तव्य असताना त्यावेळी मात्र आपण घरात बसणे, पिकनिक ला जाणे पसंत करतो,मात्र आज घरी बसण्याची अत्यंत गरज असताना आपण घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत .घरात लेकरं बाळ आहेत,आईवडील,भाऊ बहीण आहेत,गावाकडे अनेक महिन्यांनी,वर्षांनी आलेले पै पाहुणे आहेत,त्यांच्याशी बोला, गप्पा मारा,खेळ खेळा, मनपसंत टीव्ही सिरीयल पहा,वाचन करा,जीवनाचा आनंद घ्या ना,कशाला पाहिजे बाहेर हिंडण, फिरणं.
एकीकडे आपण इंटरनेट आणि मोबाईलमुळे माणूस माणसापासून दूर चालल्याची रोजच चर्चा करतो अशावेळी निसर्गानेच आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिली आहे अस समजून जर घराबाहेर न पडता प्रशासन आणि सरकारला सहकार्य केले तर निश्चितपणे या संकटाला आपण सहजपणे दूर करू शकतो ,हे माहीत असूनसुद्धा आपण रस्त्याने अत्यन्त निष्काळजीपणे फिरत आहोत .हर कुठंतरी थांबल पाहिजे .
हा आजार वैयक्तिक काळजी घेतल्यास आटोक्यात येऊ शकतो हे सत्य आहे त्यामुळे माज न करता घरातच बसून रहा ,तुम्ही जर स्वतःची काळजी घेतली तर तुमच्यासोबतच समाज देखील सुदृढ आणि सक्षम राहील हे निश्चित .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404