रविवार, ११ डिसेंबर, २०१६

अन प्रिडिक्टेबल पवार

अनप्रिडिक्टेबल पवार !

मागील पन्नास वर्षापेक्षा जास्त राजकारणाचा अनुभव असलेले राज्यातील जे थोडे बहुत राजकारणी आहेत त्यात सर्वात जेष्ठ असा मान असणारे आहेत ते म्हणजे शरद पवार,1967 सालापासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले नाव म्हणजे शरद पवार.आमदार पदापासून ते केंद्रात मंत्रीपदापर्यंत सर्व पदांचा अनुभव घेणाऱ्या या लोकनेत्याला आजही एकच सल असेल ती म्हणजे देशाचे पंतप्रधान पद त्यांना मिळू शकले नाही.अडीच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींचा देशपातळीवर उदय झाल्यानंतर पासून काहीशे अस्वस्थ असणाऱ्या पवारांनी सध्या राज्याच्या राजकारणात विशेष लक्ष घातले असल्याचे दिसते,सध्याचे राजकीय वातावरण पाहता पवारांनी बुद्धिबळाचा डाव मांडून ठेवलाय यात त्यांची चाल यशस्वी होते की पुन्हा एकदा त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.एक मात्र नक्की आहे की पवारांनी डाव टाकला असून ते सत्ताधार्यांना चितपट करण्यासाठी कामाला लागले आहेत.
 घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी अशा पद्धतीने शरद पवार 1985 ते 2014 पर्यंत अनेकवेळा केंद्रीय राजकारणात गेले मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळा ते राज्यात परत आल्याचा इतिहास आहे,वसंत दादांच्या सरकारला हादरा देऊन पवारांनी केलेला पुलोद चा प्रयोग असो की 1987 मध्ये केलेले बंड असो शरद पवार इज ए अन प्रिडिक्टेबल पॉलिटीशियन असं आजही म्हटलं जातं.
पवारांना जे अगदी जवळून ओळखतात ते आजही त्यांच्या मनात काय सुरु आहे,ते कधी काय करतील,कधी कोणाचा गेम (राजकीय) हे सांगता येत नाही असं म्हणतात. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर तिनपेक्षा अधिक वेळा विराजमान होण्याचा मान जसा पवारांना आहे तसाच काँग्रेस ला देखील अनेकवेळा आस्मान दाखवण्याचा मान हि त्यांनाच आहे.पवारांनी वेळोवेळी काँग्रेस विरुद्ध बंड करून आपलेच हित साधल्याचा त्यांच्यावर आरोप होतो तो काही अंशी खरा देखील आहे.1978 चा पुलोद चा प्रयोग असो की 1987 मधील एस काँग्रेस चा विषय,पवारांनी प्रत्येक वेळी आपल्या पदरात काय पडते याकडेच लक्ष दिल्याचे दिसते .
1999 साली पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादीची स्थापना केली मात्र लगेच राज्यात काँग्रेस बरोबर आघाडी करीत  सत्तेचा सोपान चढला,लगोलग त्यांनी केंद्रात देखील आपल्याकडे मंत्रिपद घेण्यात यश मिळवले.
शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात अनेकांना पद दिली,मानसन्मान दिला,लक्ष्मण माने असोत कि लक्ष्मण ढोबळे किंवा ना धो महानोर अथवा जनार्दन वाघमारे अशा कितीतरी अभ्यासू,हुशार लोकांना त्यांनी सभागृहाचा मार्ग दाखवला,शेती असो की सहकार या क्षेत्रात पवारांनी आभाळाएव्हढं काम करून ठेवल आहे हे नक्की .सहकार चळवळीचा पाया भक्कमपणे राज्यात विस्तार करण्यात पवारांचा सिंहाचा वाटा आहे याबाबत कोणी शंका घेणार नाही,दीर्घकाळ सत्तेत राहिल्याचाही हा परिपाक असू शकतो मात्र त्यालाही दानत लागते जी पवारांमध्ये निश्चित आहे हे नक्की .
शरद पवार यांनी एखाद्याचे तोंड भरून कौतुक केले किंवा एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला तर त्याचा कार्यक्रम झाला असे लोक चेष्टेने म्हणतात ,कदाचित ते पवार यांच्या न समजणाऱ्या स्वभावामुळे असावं .कारण पवार कधी  कोठे कसा कोणाचा गेम करतील ते सांगणे कठीण आहे .एकीकडे भाजप च्या विरोधात दंड थोपटणारे पवार बारामती मध्ये नरेंद्र मोदींना पायघड्या घालताना बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या ,अनेकांनी तेव्हा पवार यांचा आता थेट राष्ट्रपती पदावर डोळा असल्याचं म्हटलं होत . पवार सत्तेत असोत कि नसोत त्यांचा शब्द अंतिम असतो हे अनेकांनी अनुभवले आहे .मात्र हेच पवार फार काळ सत्तेबाहेर राहू शकत नाहीत असा देखील अनेकांचा अनुभव आहे .
शरद पवार हे अजातशत्रू नेतृत्व आहेत हे त्यांनी अनेकवेळा दाखवून दिले आहे,राज्याच्या बाहेर हि त्यांनी देवेगौडा असोत कि ममता अथवा लालू प्रसाद यादव किंवा नितीशकुमार यांच्याशी कायम सख्य ठेवले आहे त्यामुळेच केंद्राच्या राजकारणात त्यांचा कायम दबदबा राहिलेला आहे,पवार यांनी राज्यात देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मैत्रीचे बंध कायम जपले आहेत हे सर्वश्रुत आहे .एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी स्नेह जपणारे पवार हे त्याचं वेळी नागपुरात जाऊन नितीन गडकरी यांच्याशी देखील मैत्री जपताना महाराष्ट्राने पाहिले आहे .त्यामुळे पवार कोणाशी कधी कसे वागतील आणि कोणाशी त्यांची मैत्री जमेल याबाबत सांगणे कठीण आहे . " एक बार उपर वाले के दिल में क्या है यह बताया जा सकता है किंतु पवार साहब के दिल में क्या है यह बताना मुश्किल है  " असं जाणकार म्हणतात .ते अगदी खरं आहे .
गेल्या दोन वर्षात राज्यातील देवेंद्र सरकार चा कारभार पाहता काय करावे हा यक्ष प्रश्न पडलेले पवार मध्येच पेशवे आणि छत्रपती यांच्याबाबत बोलून राजकारणात काही घडते का याचा अंदाज घेताना दिसतात तर मध्येच राज्यभर निघणारे मराठा मोर्चे हे सरकार विरोधातील असंतोष असल्याचे सांगून सरकार ला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात .
पाऊणशे वयोमान पार केलेल्या पवारांना हे बोलण्याची किंवा राज्यात पुन्हा लक्ष घालण्याची काय गरज असा प्रश्न अनेकांना पडू शकतो मात्र उत्तर एकच आहे की  " पवार पावर कर बिना नही रह सकते ".ऍट्रॉसिटी रद्द करा म्हणून बोलणारे पवार दुसऱ्याच दिवशी त्यात सुधारणा करण्याचा यू टर्न घेताना दलित समाज आपल्यापासून दूर जाणार नाही याची काळजी घेताना दिसतात . पूर्वी छत्रपती पेशव्यांना जहागिऱ्या वाटायचे आज उलटे होत आहे हे त्यांचे भाष्य असो की  भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष आहे हे वक्तव्य यातून पवारांना राज्यातील सत्तेवरून देवेंद्र फडणवीस यांना हटवायचे आहे हेच दिसून येते.
कोपर्डी च्या घटनेच्या पार्षवभूमीवर निघणाऱ्या मराठा मोर्चाचे पवारांनी समर्थन करताना सरकार अडचणीत कसे सापडेल याची पुरेपूर काळजी घेतली मात्र त्याच वेळी दलित आणि ओबीसी समाजाने देखील आपल्या अस्तित्वासाठी मोर्चे काढल्याने पवारांचा प्लॅन (राजकीय लाभ घेण्याचा ) फसल्याचे चित्र आहे .
राज्यात पूर्वीपासून मराठा समाजाचे स्व शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते   विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक मराठा नेते झाले ,आहेत मात्र महाराष्ट्र आणि मराठा समाज म्हटलं की शरद पवार यांचेच नाव समोर येते .त्याच शरद पवार यांनी यावेळी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात लक्ष घातले आहे,सारीपाटाचा डाव टाकला आहे आता त्यात ते कोणत्या प्याद्याचा वापर करून कोणत्या नेत्याला अडचणीत आणतात कि पुन्हा एकदा नवा डाव मांडतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे .
एकवेळ सागराचा तळ समजू शकतो किंवा आभाळाची उंची मोजता येईल मात्र शरद पवार यांच्या मनाचा थांग पत्ता लागणे कठीण आहे अशा या  महान व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
लक्ष्मीकांत रुईकर,झी मीडिया रिपोर्टर ,बीड
9422744404

बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

अम्मा..........!

अम्मा.........!

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे हे खरे असले तरी या देशात व्यक्तिपूजा देखील मोठ्या प्रमाणात केली जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत,देशातील जनतेने आपल्या लाडक्या नेत्यांना एक सन्मान म्हणून टोपणनावाने उपाधी दिल्याचे अनेक वेळा दिसून आले,मोहनदास करमचंद गांधी यांना बापू हि उपाधी देणे असो की बाळ गंगाधर टिळक यांचे लोकमान्य हे नाव असो अथवा विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्यवीर असो तेव्हा पासून सुरु झालेला हा सिलसिला आजही कायम आहे .महाराष्ट्रात सुद्धा अनेकांना जाणता राजा,दादा,भैय्या,अण्णा,तात्या,साहेब अशा नावाने संबोधले जाते मात्र त्यांचा आवाका हा त्या त्या राज्यापुरता किंवा पक्षा पुरता लिमिटेड राहिल्याचे आपण सर्वांनीच पाहिले आहे मात्र याला अपवाद ठरल्या आहेत त्या जे . जयललिता अर्थात अम्मा.1983 पासून ते 2016 पर्यंत आपल्या राजकीय प्रवासात जयललिता यांची ओळख देशभर अम्मा या नावानेच झाली.
रील लाईफपासून ते रियल लाईफपर्यंत चा अम्मा चा प्रवास थक्क करणारा असाच आहे,वयाच्या सोळाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या जयललिता यांनी तब्बल 140 पेक्षा अधिक तामिळ चित्रपटातून काम केलं,तामिळनाडू जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जयललिता या एमजी रामचंद्रन यांच्या मुळेच चित्रपट क्षेत्रात आणि नंतर राजकारणात यशस्वी झाल्या.
1984 साली सर्वात प्रथम राज्यसभेवर निवड झालेल्या जयललिता या कधी तामिळनाडू च्या जनतेच्या अम्मा झाल्या हे त्यांनाही कळले नाही,एमजीआर यांच्या निधनावेळी अपमानित व्हावे लागलेल्या जयललिता यांनी आपल्या आयुष्यात एमजीआर यांनाच आपले गुरु मानले.
एमजीआर यांच्या नंतर एआएडिएमके ची सूत्र जयललिता यांच्याकडे आली मात्र त्यांना तामिळनाडू विधानसभेत अपमानित करून बाहेर काढले गेले तेव्हाच या महिलेने शपथ घेतली की आता येथे मुख्यमंत्री म्हणूनच प्रवेश करायचा आणि अवघ्या काही वर्षात त्या मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या,आपल्या 37 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री पद भूषवल .
तामिळनाडू च्या जयललिता यांचा जन्म ब्राह्मण अय्यर कुटुंबात झाला होता,तामिळनाडू राज्याला द्रविड  संस्कृती ची पार्श्वभूमी आहे म्हणजे येथे नास्तिक लोकांचा प्रभाव जास्त होता मात्र अशा परिस्थितीत जयललिता यांनी या भागात आपला प्रभाव वाढवला नव्हे चार दशकं कायम ठेवला,मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी ज्या योजना तयार केल्या त्या लोककल्याणकारी होत्या,अम्मा मिनरल वॉटर,अम्मा कँटीन,अम्मा मोबाईल अशा एक ना अनेक योजना मधून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात घर केलं . जनतेच्या मनावर आपल्या व्यक्तिमत्वाचे गारुड कायम करणाऱ्या अम्मा यांना उत्पनापेक्षा जास्त संपत्ती जमविल्याच्या आरोपावरून कारागृहात देखील जावे लागले ,त्यावेळी जयललिता यांच्याकडे पडलेल्या छाप्यात एक दोन नव्हे तर दहा हजार साड्या, पंचवीस किलो सोने,हिरे,जवाहिर सापडले होते मात्र  यावर मात करीत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर कब्जा केला,
आज देशात अनेक मोठे नेते आहेत,अनेक राज्यात मोठं मोठे पक्ष आहेत मात्र अम्मा एकमेवाद्वितीय म्हणाव्या लागतील,38 लोकसभा जागा पैकी तब्बल 36 जागा जिंकत त्यांनी मोदी लाटेत देखील आपला गड 2014 मध्ये कायम ठेवला होता,त्याला कारण त्यांचे जनतेप्रति असलेलं प्रेम आहे हे नक्की.जयललिता या कारागृहात असताना तत्कालीन मुख्यमंत्री पनिरसेलवम यांनी त्यांच्या खुर्चीवर न बसता कारभार पाहिला होता.
एक विशेष बाब म्हणजे आजपासून तीस वर्षांपूर्वी जेव्हा एमजीआर हे अपोलो रुग्णालयात होते तेव्हा जयललिता यांनी केंद्राला साकडे घालून उपचारवर लक्ष देण्याची मागणी केली होती,"हिस्ट्री रिपीट अगेन्स्ट"असं जे म्हणतात ते अम्मा च्या बाबतीत तंतोतंत खरं ठरलं आहे,सप्टेंबर महिन्यात जेव्हा अम्मा अपोलो रुग्णालयात दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक वावड्या उठल्या तेव्हा जयललिता यांच्या विश्वासू शशिकला यांनी केंद्राला साकडे घातले आणि केंद्राने या प्रकरणात लक्ष घातले.
एकीकडे देशात भाजप,काँग्रेस या सारख्या पक्षांचा बोलबाला असताना तामिळनाडू मध्ये मात्र जयललिता यांनी आपली पकड मजबूत केली होती,देशात आजपर्यंत कोणत्याही पक्षात एवढी व्यक्तिपूजा पाहायला मिळाली नसेल जेवढी तामिळनाडू मध्ये दिसते.इथं सरकार अम्मा,प्रशासन अम्मा,जनजीवन अम्मा असच चित्र पाहायला मिळतं. आपला लाडका नेता रुग्णालयात असताना लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उत्तरल्याचे चित्र फक्त तामिळनाडू मध्येच दिसू शकते,तामिळनाडू मधील लोक कोणत्याही बाबतीत खुपचं इमोशनल आहेत हे दिसून येते मग तो सुपरस्टार रजनीकांत असो की जया अम्मा, जनतेने आपले आयकॉन कोण असावेत आणि ते कसे असावेत हे दाखवून दिलं आहे,
"कौण कहता है के आस्मान में छेद नही हो सकता एक पत्थर तो तबियत से उच्छलो यारो " या प्रमाणे जयललिता यांच्या साठी कोणतीही गोष्ट अशक्य नव्हती,शिकून वकील व्हायचं ठरवणाऱ्या जयललिता यांना अचानक सगळं सोडून सिनेक्षेत्रात यावं लागलं त्यानंतर राजकारणातील त्यांचा प्रवेश देखील इच्छेविरुद्ध असाच होता मात्र त्यांनी येथेही आपली छाप सोडली, राजकारणात महिला यशस्वी होत नाहीत ,त्यांना पुरुषांच्या कुबड्यांचा आधार घ्यावाच लागतो हा इतिहास आहे मात्र हा इतिहास जयललिता यांनी खोटा ठरविला, एक महिला असतानाही त्यांनी तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री पद भूषवल आणि एवढंच नव्हे तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या पासून ते नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत सगळ्यांशी त्यांनी सलोख्याचे संबंध कायम ठेवले,वाजपेयी सरकारला पाठिंबा देण्यावरून वादात सापडलेल्या जयललिता यांनी अचानक पाठिंबा काढून घेत सर्वानाच धक्का दिला,
राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही असं म्हणत नाकं मुरडनाऱ्या व्हाईट कॉलर लोकांसाठी जयललिता यांनी एक आदर्श निर्माण केला आहे,जनकल्याण करायचे असेल तर माध्यम म्हणून राजकारण सुद्धा चालू शकते हे त्यांनी दाखवून दिलं.लोकनेता हा एका दिवसात तयार होत नसतो तर त्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या करावी लागते,त्याग करावा लागतो,समर्पण करावे लागते आणि त्यानंतरच एखादीच जया शतकात तयार होत असते आणि त्यामुळेच रुपेरी पडद्यावरील हि जया करोडो लोकांची अम्मा होऊ शकते.

लक्ष्मीकांत रुईकर,बीड 9422744404

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

उद्धरली कोटी कुळे.......

उद्धरली कोटी कुळे

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे या भीमगीताची आठवण व्हावी असं वातावरण आज बीड शहरात  आलेल्या निळ्या वादळाने आली,निमित्त होत दलित ऐक्य महामोर्चाचे,ऍट्रॉसिटी रद्द करू नये उलट अधिक कडक कायदा करावा यासह मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज बीड मध्ये महामोर्चाचे आयोजन केले होते.सहसा भीमसैनिक म्हटलं की बेंबीच्या देठापासून दिल्या जाणाऱ्या घोषणा,गगनभेदी आवाज असे वातावरण डोळ्यासमोर दिसते मात्र बीड च्या या मोर्चात शिस्त,शांतता आणि स्वच्छता यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळाला.
मराठा क्रांती मोर्चा नंतर बीड मध्ये होणाऱ्या दलित महामोर्चा कडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या,हा प्रतिमोर्चा आहे अशी देखील टीका काहींनी केली मात्र या टिकाकारांची थोबाड मोर्चेकऱ्यांनी फोडली.आमचा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही तर आमच्या न्याय्य हक्कासाठी आहे हेच या जमावाने दाखवून दिले.
प्रज्ञा शील करुणा या त्रिसूत्री चा अनोखा संगम यावेळी पाहायला मिळाला,लाखोंच्या संख्येने जमलेले दलित बांधव,भगिनी,मुली यांनी अत्यन्त शिस्तबद्ध पद्धतीने आपला आवाज सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मौलिक सल्ला दिला होता त्याचा अवलंब या मोर्चेकऱ्यांनी केल्याचं दिसून आलं.सकाळी आठ नऊ वाजेपासून जिल्हा स्टेडियम च्या मैदानावर हातात निळे झेंडे,डोक्यावर निळ्या टोप्या,पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले लोकांचे जथेच्या जथे जमा होत होते,कोणीही घोषणा देऊ नयेत,गडबड करू नये,एकमेकाला मदत करा अशा सूचना दिल्या जात होत्या,मोठ्या संख्येने लोक जमा होणार म्हणून पोलीस प्रशासन देखील तणावात होते मात्र शांतत्तेत मोर्चा संपन्न झाला आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला,मागील साठ सत्तर वर्षात दलित समाजाने किती सहन केले आहे,आक्रोश काय असतो ते या मोर्चात आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होत,खरोखर दृष्ट लागावी असाच हा मोर्चा होता,विशेष म्हणजे या मोर्चात ग्रामीण भागातील महिलांची उपस्थिती लक्षणीय अशीच होती,घरच खायचं अन लष्कराच्या भाकरी भाजायच्या अशीच अवस्था या लोकांची आजवर होती,प्रत्येक पक्ष असो की संघटना दलित समाजाकडे केवळ व्होट बँक म्हणूनच पाहिलं गेलं आहे,गेल्या सत्तर वर्षात या समाजात फार काही बदल झालेला नाही किंवा तथाकथित समाजाच्या ठेकेदारांनी केला नाही,मात्र आजच्या घडीला या समाजाला आपल्या हक्काची जाणीव होऊ लागली आहे.
संघर्ष पाचवीलाच पुजलेल्या या समाजाने प्रत्येक गोष्ट संघर्षातूनच मिळवली आहे,मग ते मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असो की गायरान जमिनींवरील ताबा,प्रत्येक वेळी समाजाला रस्त्यावरच उतरावे लागले आहे,अनेक वर्षे गावकुसाबाहेर या समाजाला ठेवण्यात अनेकांनी धन्यता मानली आहे,आज कुठे तरी समाजातील लोकांना आपल्या हक्काची जाणीव झाली आणि त्यांनी वादळ रस्त्यावर उतरवलं,सहसा हा समाज केवळ आंबेडकर जयंती किंवा नामांतर दिन या दिवशीच एकत्रित आलेला पाहायला मिळाला आहे ,एरवी एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज रस्त्यावर आणायचा म्हटलं तर लाखो रुपये खर्च होतील,मात्र आज मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी मनातून आपला सहभाग नोंदवला असे दिसून आले,निव्वळ गावागावातुन लोक घरच कार्य असल्यासारखे मोर्चात सहभागी झाले होते,कोठेही काहीही अनुचित घडणार नाही यासाठी स्वयंसेवकांची मोठी फळी रस्त्यावर तैनात होती,विशेष म्हणजे आलेल्या लोकांमुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेली.
कुठलीही गोष्ट जास्त काळ साठवली कि कुजते आणि पेरली तर रुजते असे म्हणतात त्याच पद्धतीने आजच्या मोर्चाच्या माध्यमातून दलित समाजाने एक व्यापक विचार रुजवण्याचा प्रयत्न केला आहे,त्यांच्या या विचाराचे पीक निश्चितपणे सर्व समाजाचे भले करेल यात शंका नाही.शेवटी काय
संघटन हे काळाची गरज असते हे नेहमीच सिद्ध झालं आहे,मात्र या संघटनाला योग्य दिशा मिळणे आवश्यक  असते ,येणाऱ्या काळात या समाजाच्या संघटनाला यश मिळेल हीच अपेक्षा .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

गरजने वाले बरस ते भी है

गरजने वाले बरसते भी है

जो गरजते है वो कभी बरस ते नही असं म्हटलं जातं मात्र काल भारतीय सैनिकांनी ज्या पद्धतीने पाकिस्तान मध्ये घुसून त्यांना जशास तसे उत्तर दिले ते पाहता जो गरजते है वो बरस ते भी है हेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे.मोदी यांनी आणि भारतीय सैन्याने जो पराक्रम केला तो ओसामा बिन लादेन याला कंठस्नान घालताना अमेरिकेने जी युद्धनीती अवलंबिली तीच पद्धत फॉलो केल्याचे दिसून येते.देशहितार्थ एखादा निर्णय हा चॅनेल च्या वोर रूममध्ये बसून होत नसतो तर त्यासाठी ठराविक स्टॅटिजी असते हेच मोदी यांनी दाखवून दिलं आहे.मोदी यांच्या डिनर डिप्लोमसी बद्दल जेवढी चर्चा झाली तेवढीच नव्हे त्यापेक्षा जास्त चर्चा आता मोदी यांच्या या गनिमी काव्याची होईल यात शंका नाही.
उरी येथे पाकिस्तानने पोसलेल्या अतिरेक्यांनी हल्ला करीत 18 भारतीय जवानांना मारले,त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या क्षमतेबद्दल अनेक बोरू बहाद्दर आणि पॅनल पंडितांनी आठ दहा दिवस चर्चेचे गुऱ्हाळ चालवले,थेट हल्ला करून जशास तसे उत्तर द्या,आता युद्धच करा,पाकला धडा शिकवा अशा एक ना अनेक सूचना केल्या जात होत्या.कोणी सांगितलं की पाकिस्तान सोबत असलेला सिंधू करार मोडून टाका तर कोणी म्हटलं पाकिस्तान सोबतचे संबंध तोडून टाका मात्र मोदी शांत होते,परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्क येथे जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितले तरी देखील अनेकांनी भारताच्या भूमिकेवर शंका घेतली,मोदी शांत आहेत याचा अर्थ त्यांनी माघार घेतली आहे असा काहींनी अर्थ काढला मात्र "शेर जब दो कदम पिछे जाता है तो वो  हार नाही मानता बल कि एक कदम आगे बढकर हमले कि तैयारी करता है"असच काहीसं मोदी यांनी केलं.
पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून भारतीय लष्कराने पाकड्यांची जी शस्त्रक्रिया केली ती बिनतोड होती यात शंका नाही,साधारण पणे अडीच वर्षांपूर्वी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पाकिस्तान मध्ये घबराट निर्माण झाली होती,जणू काही मोदी आता जगाच्या नकाशावरून पाकचे नामोनिशाण मिटवून टाकणार असे वातावरण भारत आणि पाक या दोन्ही देशात निर्माण करण्यात आले होते,मात्र शपथविधीला पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावून मोदी यांनी आपली जागतिक इमेज मोठी केली,त्यांनतर शरीफ यांना शाल भेट दिली तर त्यांच्या वाढदिवसाला अचानक भेट देवून सगळ्यांनाच धक्का दिला.
मोदी यांनी हे सगळं करताना नेपाळ,अफगाणिस्थान,अमेरिका,या सारख्या देशांचे दौरे करीत भारताचे जागतिक संबंध अधिक दृढ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला,मोदी हे जेवढ्या काळ बाहेर देशाच्या दौऱ्यावर राहिले तेवढे काळ भारतात देखील राहिले नाही म्हणून त्यांच्यावर टीका देखील झाली,मात्र या दौऱ्यांमधून त्यांनी पाकिस्तान ची अतिरेक्यांना पोसणार राष्ट्र म्हणून इमेज अधिक गडद करण्याचा प्रयत्न केला,त्यात त्यांना यशही मिळालं,
आज अमेरिका असो की इतर देश यांना पाकिस्तान ने पोसलेल्या दहशतवादाचा फटका बसला आहे,त्यामुळे उरी हल्ल्यानंतर पाकला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करावे ही मागणी खुद्द अमेरिकेच्या संसदेत त्यांच्याच खासदारांनी केली,पाकचे पंतप्रधान मियाँ शरीफ हे कितीही शरीफ पणाचा बुरखा पांघरत असले तरी उरी हल्ल्यानंतर त्यांचा हा बुरखा टराटरा फाटला,
जखमी शेर बहोत खतरनाक होता है याचा प्रत्यय मोदी यांनी सर्जिकल  स्ट्राईक मधून दाखवून दिल आहे,अगोदर भारताने सार्क संमेलनावर बहिष्कार टाकून पाकची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी केली तर दुसरीकडे सिंधू कराराबाबत पुनर्विचार करण्याची चर्चा सुरु करून पाकला गाफील ठेवले,अवघ्या चार तासात लाईन ऑफ कंट्रोल पार करून घरात घुसून त्यांना त्यांची औकात दाखवून दिली.
नरेंद्र मोदी हे गुळमुळीत पंतप्रधान आहेत ते केवळ बोलघेवडे आहेत,चाय पे चर्चा करणाऱ्या माणसाने काहीच केले नाही पाकच्या कुरापती चालूच आहेत अशा चर्चा देशात सुरु होत्या मात्र मौका सभी को मिलता है या डायलॉगची आठवण मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक च्या माध्यमातून जगाला दाखवून दिले आहे ,ज्या अमेरिकेने मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना व्हिसा नाकारला होता मात्र आज तीच अमेरिका त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहे,हा काळाचा महिमा आहे,अवघ्या चार तासात मोदी यांनी जे केलं ते या अगोदर मागील वर्षी म्यानमार मध्ये करून पाकला एक सूचक इशारा दिला होता मात्र पाकने सुधारण्याचा प्रयत्न केलाच नाही,घरात एखादं कारट व्रात्य असेल तर त्याला दोन चार दा समजून सांगावे लागते नंतर मात्र त्याला त्याची शिक्षा करावीच लागते हाच प्रकार शेजारी देशाबाबत म्हणता येईल,"हम खामोश है इसका मतलब हम डरते है "असा समज पाकने भारताबाबत करून घेतला होता,पण मोदी यांनी आज जे केलं त्यानं पाकड्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे हे निश्चित.
लक्ष्मीकांत रुईकर,9422744404.

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

सलाम बळीराजा तुझ्या हिमतीला सलाम

सलाम बळीराजा तुला त्रिवार सलाम बीड जिल्हा तसा मागासलेला म्हणूनच राज्यात प्रसिद्ध आहे,या जिल्ह्याने गोपीनाथ मुंडे सारखा लढवय्या लोकप्रतिनिधी दिला,तसेच मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवणारे वीर योध्ये देखील दिले,याच बीड जिल्ह्याने मागील चार वर्षात 1972 पेक्षाही भयानक दुष्काळ अनुभवला,आज मात्र बीड जिल्ह्याचा हा कलंक पुसला गेला आहे,जिल्ह्यातील धरणं ओसंडून वाहत आहेत.
मागच्या तीन चार वर्षात कधीही बातम्या करण्याची वेळ आली तर मनावर दगड ठेवून कराव्या लागायच्या,कारण केवळ भेगाळलेली जमीन,रापलेले चेहरे,भकास अन पांढरी फट पडलेली कपाळ, अनेक घरचे करते पुरुष फासावर गेलेलं या डोळ्यांनी पाहिलं आहे,अनेक शेतकऱ्यांच्या चिता जळत असताना त्याच्या घरात चाललेला आक्रोश पाहून मन हेलावून जात होतं.
वाटायचं काय एवढं पाप केलंय आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी कि हा दुष्काळाचा कलंक पुसतच नाहीए, जनावरांचे अनेक बाजार फिरलो,लाखाचे सर्जा राजा कवडीमोल भावाने विकताना पाहिल्यानंतर मन विषण व्हायचं,कधी फिटणार हे दिवस असं वाटायचं,दुष्काळाचा फटका केवळ शेतकार्यालाच बसला होता असे नाही तर संपूर्ण बाजारावर त्याचा विपरीत परिणाम जाणवत होता,बियाणे बाजार असो की किराणा अथवा कापड बाजार प्रत्येक ठिकाणी दुष्काळाचे दशावतार दिसत होते.अगदी रियल इस्टेट वर देखील याचा गंभीर परिणाम दिसत होता,प्रत्येक जण दुष्काळाने पिचलेला दिसत होता,या दुष्काळानं बीड जिल्ह्याला दहा वर्षे मागं ढकललं,
यंदा मात्र मिरगाचा पाऊस जोरदार बरसला,त्यामुळे पिचलेल्या बळीराजाने मोठ्या उमेदीने काळ्या आईची ओटी भरली,वरूनराजांना देखील कृपा केली शेतकऱ्याच्या पदरात यंदा चांगलं दान पडणार असं दिसतं होत,मात्र महिनाभर पावसानं ताण दिला आणि बळीराजाच्या चिंतेत भर पडली,मात्र पोळ्याच्या अमावस्येला पावसाचं पुनरागमन झालं आणि बळीराजाचा जीव भांड्यात पडला.मात्र गणपती विसर्जनापासून पावसानं मनावर घेतलं आणि मागील तीन चार दिवसात पावसानं अक्षरशः बीड जिल्ह्याला झोडपून काढलं.जिल्ह्यात मागील आठ दहा वर्षांपासून कोरडा पडलेला बिंदुसरा तलाव भरभरून वाहिला एवढंच नाही तर मृत साठ्यात असलेली माजलगाव आणि मांजरा सारखी मोठी धरणं देखील ओव्हरफ्लो झाली.
उपर वाला जब भी देता ,देता छप्पर फाडके असं म्हणतात ते बीड करांनी मागील दोन दिवसात अनुभवलं,48 तासात मागच्या चार वर्षाचा दुष्काळ फिटला, सगळीकडे पाणीच पाणी झालं,नद्या ,नाले ,ओढे ,खळखळून वाहू लागले,बिंदुसरा,मांजरा,माजलगाव सारखी कोरडी ठाक पडलेली धरण भरली,भूगर्भाची पाण्याची भूक भागली,पुढच्या चार पाच वर्षांची चिंता मिटली,पावसाने सगळ्यांचं कल्याण केलं,
बीड जिल्ह्यातील 144 छोटे आणि मोठे तलाव भरून वाहू लागले आहेत,जलयुक्त शिवार च्या कामामुळे शिवारात पाणी खेळू लागलं आहे, जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळी देखील चांगलीच वाढली आहे,जिल्ह्यातील विहिरी ,आड आणि बोअर ला भरपूर पाणी आलं आहे, पावसानं समद रान आबादानी केलं आहे,काळ्या मातीत मातीत तिफन चालते,तिफन चालते,मैना राघूच्या जोडीला हिरवं सपान पाहते अशी परिस्थिती आज जिकडे तिकडे झाली आहे .
मात्र या पावसानं बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला,आज दिवसभर गुडघाभर चिखलात रानावनात हिंडलो,बातमी शोधताना शेतकऱ्यांच्या व्यथा काय आणि किती असू शकतात हे जाणवलं,पाऊस नाही पडला तर दुष्काळ,आणि जास्त झाला तर ओला दुष्काळ,जगायचं कास हाच खरा प्रश्न मात्र तरीही बळीराजा आपले पाय घट्ट मातीत रोवून उभा आहे,अनेक शेतात जमीन खरवडून गेली आहे,तर शेकडो हेक्टर क्षेत्रावरील मळणी साठी आलेली बाजरी आडवी झाली आहे,फुलं आणि बोन्ड लागलेला कापूस पार जमिनीवर झोपलाय,अनेक शेतात तर पाणीच बाहेर निघालेलं नाही,सोयाबीन पुरतं संपलंय,
चार दिवस झाले शेतात जायला रस्ता देखील ठेवला नाही या पावसानं,अक्षरश धूळधाण झाल्याचं चित्र दिसून आलं,आता काय करायचं हा प्रश्न बळीराजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता मात्र सलाम त्याच्या जिद्दीला,अनेकांनी सांगितलं" साहेब यंदा बक्कळ पाऊस झाला,खरीप हातचं गेलं,मातर अवनदा जे गेलं ते म्होरल्या टायमाला जोमानं यील कि,असला पाऊस लई गरजेचा हुता,आता बघा म्होरला हंगाम रब्बी कशी येति ते,पुढच्या तीन चार वर्षाची ददाद  मिटविली बघा या पावसानं 'असं म्हणून त्यांनी पावसाचं स्वागत केलं,तेव्हा वाटलं खरच बारा महिने शेतीत राब राब राबणाऱ्या या माणसाला बळीराजा का म्हणतात ते कदाचित या मुळेच असावं,सलाम बळीराजा तुला आणि तुझ्या धैर्याला ,सलाम तुझ्या मोठ्या मनाला,सलाम तुझ्या मोडण्यातून हि उभं राहण्याच्या जिद्दीला,सलाम तुझ्या सकारात्मक दृष्टीला,तू असाच खंबीर रहा, मग बघ कोणी तुझं काहीच वाकडं करू शकणार नाही.
लक्ष्मीकांत रुईकर
9422744404

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

संदीप क्षीरसागर मऊ मेणाहून कठीण वज्राहून

संदीप बद्दल थोडंसं......
काही लोकांबद्दल काय लिहावं असा प्रश्न कधी कधी पडतो,कावळ्याला कधी गरुडाचे पंख लावताही येतील पण आकाशाला गवसणी घालण्याचं बळ  आणि जिद्द मनातच असावी लागते असं म्हटलं जातं,कारण कोणीही उठून आकाशाला गवसणी घालू शकत नाही मात्र आमचे मित्र तथा हजारो तरुणांचे हृदयस्थान असणारे संदीप क्षीरसागर यांच्यात मात्र नक्कीच आकाशाला गवसणी घालण्याची ताकद आहे हे नक्की.

संदीप चा आणि माझा प्रथम संबंध आला तो दहा वर्षांपूर्वी आम्ही दोघे काठोडा या गावी एका क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाला गेलो होतो तेव्हा,तेव्हा संदीप ला जास्त बोलता देखील येत नव्हतं,आज हे कोणाला खरंही वाटणार नाही,गेल्या दहा वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, संदीप आज कमालीचा प्रगल्भ झालाय, काही जणांना असं वाटणार नाही परंतु ते त्यांचं मत असेल,माझ्या मते एक राजकारणी,समाजकारणी, मित्र,अनेकांचा युवा नेता म्हणून संदीप खरोखर प्रगल्भ झालाय यात शंका नाही,
क्षीरसागर घराण्यातील हा तरुण आज राजकारणाच्या पटलावरील अढळ स्थान निर्माण केलेला ध्रुव तारा झालाय हे नक्की,जिल्हा परिषद मध्ये येण्याअगोदर संदिप ने पाच वर्षे पंचायत समिती मध्ये काम केलं,एक पंचायत समिती म्हणजे पूर्ण मतदारसंघ,त्यामुळे त्याला लोकांचे स्वभाव कळले,त्यांची काम कळली,कसं वागायचं,कसं बोलायचं ते कळलं,त्यानंतर त्याची खरी इनींग सुरु झाली ती जिल्हा परिषदच्या राजकारणापासून.
जिल्हा परिषदेत निवडून आल्यानंतर त्याच्यावर सभापती पदाची जबाबदारी आली,खरं तर नशिबानं कमी आणि राजकारणाच्या कुटील डावपेचामुळे त्याची जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी हुकली,संदीप च्या जागी कोणी दुसरा असता तर त्याने आकांडतांडव केलं असत मात्र एका कसलेल्या राजकारण्याप्रमाणे त्याने हा वार छातीवर झेलला आणि लोंकांच्या कामात स्वतःला झोकून देत त्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.
असं म्हणतात की,
"ऊबड़ खाबड़ रस्ते भी, समतल हो सकते हैं,
कोशिश की जाए तो मुद्दे हल हो सकते हैं.
शर्त यही है कोई प्यासा हार न माने, तो
हर प्यासे की मुट्ठी मेँ बादल हो सकते है "
या प्रमाणे संदीप ने काम सुरु ठेवलं.आपण सर्वच लोक नेहमी राजकारण्यांबद्दल चांगली कमी आणि वाईटच चर्चा जास्त करतो मात्र त्यांच्या सोबत एक दिवस राहील तर त्यांना काय काय सहन कराव लागत हे मी अनेकदा संदीप बरोबर अनुभवलंय, कोणाची पोरगी नांदत नाही,तर कोणाची बायको सोडून गेलीय,कोणाचे बांधावरून भांडणं झालीयत तर कोणाला पोलिसांनी पकडलं आहे,एक ना अनेक तक्रारी कायम असतात त्या सगळ्या लोकांना मदत करायची त्यांच्या अडचणी सोडवायच्या,सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि कधी कधी झोपेतही लोकांची काम करायची,वैताग नुसता मात्र प्रत्येकाला हसून बोलावच लागत."राजकारणी हा अस्सल आणि खराखुरा अभिनेता असतो" असे मला  वाटत कारण दुःख असो की सुख त्याला चेहऱ्यावर दाखवायला परमिशन नसते,असच काहीसं संदीप च्या बाबतीत जाणवतं.
संदीप हा जेवढा डॅशिंग आहे तेवढाच तो संवेदनशील आणि कुटुंब वत्सल आहे हे मी अनेकदा अनुभवलंय,काही महिन्यांपूर्वीच त्याला सह कुटुंब फिरायला जायचे होते मात्र वेळच मिळत नव्हता तेव्हा बायको चा फोन आल्यानंतर त्याचा जो समजावून सांगण्याचा स्वर होता तो प्रत्येक कॉमन नवर्यासारखाच होता,बाप म्हणून देखील संदीप खूप इमोशनल आहे,मुलगा म्हणून त्याला वडीलांबद्दल वाटणारी काळजी मी कमालनयन  बजाज च्या मोकळ्या मैदानात त्याच्या डोळ्यात पाहिली आहे.
संदीप ला बोन्साय झाडं आणि प्राणी यांच्याबद्दल प्रचंड माहिती आहे हे बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं,कुत्रे,मांजर,साप, चिमण्या,घुबड,कावळे,कुठं मिळतात,त्यांची निगा कशी राखायची हे तो सांगत असताना मी फक्त ऐकत होतो,त्याला बंदूक ,पिस्टल याबद्दल देखील चांगलीच जाण असल्याचं पाहून मी आश्चर्य चकित झालो,
स्वतःच्या राहण्या,खाण्याबद्दल देखील संदीप फार चुझी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत झालेल्या या युवा नेत्याला आता आकाश पादाक्रांत करण्याची स्वप्न पडू लागली आहेत,कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारा हा माणूस आपल्या इमेज ला धक्का लागणार नाही याची देखील काळजी करत असल्याचं अनेकवेळा पाहिलं आहे,अलीकडच्या काळात आपल्या इमेज बिल्डिंग वर त्याने विशेष भर दिलाय हे विशेष.आपल्या कार्यकर्त्यांकडून कोणालाही त्रास होणार नाही यासाठी संदीप स्वतः जातीनं लक्ष देत असल्याचं मी पाहिलंय, विशेष म्हणजे त्याने केवळ गॅंग जमा केली आहे हा समज दूर करण्याचा सातत्याने त्याच्याकडून प्रयत्न होताना अलीकडच्या काळात अनेकांनी पाहिलं आहे.
काही महिन्यांपूर्वी संदीप च्या नेतृत्वाखाली शहरात साजरी झालेली शिवजयंती आज ही अनेकांच्या स्मरणात आहे,त्या मिरवणुकीत ज्या पद्धतीने महिलांनी फेटे घालून सहभाग नोंदवला तो पाहता संदीप ची इमेज बदलली आहे हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नक्कीच नाही.
कोणी तरी म्हटलं आहे की ,
"जिनकी बुनियादों में खट्टापन है, मत भूलो,
पकने पर सब के सब मीठे फल हो सकते हैं.
ये दुनिया इन्सानों की है थोड़ा  तो रुकिए,
पत्थर दिल वाले भी सब कोमल हो सकते हैं"
संदीप बाबत देखील असच म्हणावं लागेल,अनेक जण मी संदीप असा एकेरी उल्लेख करतो म्हणून भुवया उंचावतील मात्र तो माझा स्वभाव आहे,त्याला इलाज नाही,माझ्यापेक्षा संदीप ला जवळून ओळखणारे अनेक जण असतील मात्र मागच्या काही वर्षात त्याच्या बद्दल जे मला जाणवलं,जे समजलं,त्यातलं जेवढं मांडता येईल ते मी मांडल शेवटी म्हणतात ना ......
" सपनों के सच होने की तारीख नहीं होती,
आज न जो सच हो पाए वो कल हो सकते है
जीवन के हर पल को यूँ ही जीते चलिए बस, इनमें ही कुछ महके महके पल हो सकते है "
माझ्या या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,त्याच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण होवोत आणि त्यासाठी ईश्वर त्याला बळ देवो,त्याच्याकडून विधायक कामं होवोत याच शुभेच्छा .....!
लक्ष्मीकांत रुईकर,झी मीडिया ,बीड
9422744404.

सोमवार, २५ जुलै, २०१६

स्वयमेव मृगेंद्रता .........!

स्वयमेव मृगेंद्रता.........!

साधारपणे चार पाच दिवसापूर्वी राष्ट्रसंत भय्यू महाराज यांना भेटण्याचा योग आला,नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे महाराज येणार आहेत अस कळल्यानंतर तेथे जाऊन भेट घेतली,इतक्या दिवस महाराजांबद्दल फक्त ऐकून होतो,प्रत्यक्ष भेट चार पाच वेळा झाली होती,मात्र ती जुजबी अशीच होती,मात्र कोपर्डी येथे काहीशी निवांत भेट झाली,त्यांच्या बरोबर चर्चा करण्याचा योग आला,तब्बल एक दीड तास वेगवेगळ्या विशेषतः शेती आणि शेतकरी या विषयावर चर्चा झाली,त्यानंतर मनात विचार आला महाराजांची जी प्रतिमा आहे ती म्हणजे ते राजकीय गुरू आहेत त्यापेक्षा ते कितीतरी वेगळे आहेत,त्यांचा प्रत्येक क्षेत्रात गाढा अभ्यास आहे याची जाणीव झाली,अस कोणतंच क्षेत्र नाही ज्याची माहिती महाराजांना नाही,प्रत्येक क्षेत्राचा त्यांचा अभ्यास आणि अधिकारवाणीने बोलणं पाहून एका श्लोकाची आठवण झाली "नाभिषेको न संस्कारःसिहंस्य क्रियते नने । विक्रमार्जित सत्वस्य " 'स्वयमेव मृगेंद्रता '। अर्थात सिंहाला कोणत्याही अभिषेक किंवा संस्कार करून राजा हि उपाधी घेण्याची गरज पडत नाही कारण तो जंगलाचा अनभिषिक्त सम्राट हा आपल्या कार्यकौशल्यामुळे असतो,असच काहीस मला भय्यू महाराजांबद्दल जाणवलं .
आमचे मित्र डॉ सतीश लड्डा यांनी महाराज कोपर्डी ला येणार असल्याचं सांगितलं आणि मी त्यांच्यासोबत रवाना झालो,साडेचार पाच वाजेपासून महाराजांची भेट होईल यासाठीची प्रतीक्षा तब्बल रात्री नऊ वाजता संपली, खरं तर एवढा वेळ लागल्यामुळे मी काहीसा निराश झालो होतो,कदाचित मी पत्रकार असल्यामुळे माझ्यातील इगो मला त्याची सातत्याने जाणीव करून देत असावा कारण एवढा वेळ कोणाची भेट घेण्यासाठी थांबणं आमच्या (पत्रकार )स्वभावात नाही,अगोदर आम्ही नंतर सगळे हाच आमचा आजपर्यंतचा समज त्यामुळे लागणारा वेळ असह्य होत होता,उद्विग्न करीत होता ,पण दुसर मन थांबण्यासाठी  आग्रह करीत होत, शेवटी थांबूया काही वेळ काय होईल थोडा उशीरच होईल मात्र भय्यूजींच्या भेटीचा योग् पुन्हा कधी येईल हे सांगता येणार नाही म्हणून थांबलो आणि एका विचारवंत,प्रकांड पंडित,सर्वगुणसंपन्न,माणुसकीचा झरा असणाऱ्या महान दैवी योगपुरुषाला भेटण्याची संधी मिळाली
येणारा प्रत्येक जण महाराजांना अडचण सांगत होता ते त्याच्याशी बोलतं होते,मी मात्र कुळधरन गावातील शाळेत कधी एकदा हा सगळा प्रकार थांबतो याचाच विचार करीत होतो,महाराज कर्जत येथे निवांत भेटतील अस कळल्यानंतर आम्ही कर्जत ला गेलो,मात्र तेथेही गर्दी असल्यामुळे न भेटताच जावे असा विचार केला पण डॉ लड्डा याना महाराजांशी बोलायचे होते त्यामुळे थांबावे लागले मात्र महाराजांची भेट झाली आणि थकवा ,निराशा कुठल्या कुठे दूर पळून गेली,किती लोकांना तुम्ही इंटरटेन करता,जरा तब्येतीची काळजी घ्या,लोकांना समस्या कायम राहणारच आहेत मात्र आपल्याही काही मर्यादा आहेत अस त्यांना सांगावं असा विचार एकदा मनात आला मात्र त्यांची भेट झाल्यानंतर सगळं विसरून त्यांच्याशी बोलण्यात किती आणि कसा वेळ गेला ते कळलेच नाही,महाराज कर्जत येथे एका भक्ताच्या घरी गेले तेव्हा श्रीकांत चव्हाण यांनी माझी ओळख करून दिली,महाराजांनी सहजपणे वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली ते गेल्याचं सांगितल्यानंतर गंभीर होत महाराजांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.
कोपर्डीच्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत अशा घटना का घडतात त्या कशा रोखता येतील,समाजाने काय केले पाहिजे,महिलांच्या रक्षणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील या विषयावर ते भरभरून बोलत होते,महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा दल स्थापन करण्याचा त्यांचा विचार आणि तळमळ यातून ते किती कोमल मनाचे आहेत याची जाणीव झाली.
आज पर्यंत महाराजांचा एकच चेहरा जगासमोर होता तो म्हणजे ते राजकीय गुरू आहेत,राजकारणी लोकांचा,उद्योजकांचा त्यांच्याकडे मोठा राबता असतो,ते अनाथ ,निराधार मुले,महिला यांच्यासाठी सेवाव्रतीने कार्य करतात,मात्र एवढ्या सगळ्या धावपळीत ते महिलांच्या सुरक्षेबाबत इतके जागरूक असतील याची कल्पना नव्हती,कोपर्डी येथे त्यांनी दोन बस मुलींना शाळेत ने आण करण्यासाठी दिल्या,या बस मध्ये सीसीटीव्ही ,हजेरी रजिस्टर,मोबाईल,अलार्म अशा सुविधा दिल्या आहेत, दोन बस त्यांनी बीड साठी दिल्याचं देखील आवर्जून सांगितलं आणि त्यांचं बीडवर किती बारीक लक्ष आहे हे लक्षात आलं.
कोपर्डी घटनेवर  चर्चा झाल्यानंतर  मीच त्यांना शेतीचा विषय काढला,दिवसभर हजारो लोकांना भेटून ते काहीशे थकले होते,त्यांना नगर ला जाऊन आराम करायचा होता मात्र शेतीचा विषय निघाला आणि महाराजांची पावलं थबकली,बीड जिल्ह्यातील शेती,शेतकरी,त्याच जीवनमान या विषयावर ते पोटतिडकीने बोलत होते,बीडसह मराठवाड्यात रासायनिक खताचा अतिरेकी वापर झाल्याने तेथील जमीन नापीक झाली आहे,कापूस आणि ऊस या दोनच पिकांवर शेतकऱ्याचा भर असल्याने इतर पिकं तो घेत नाही,त्यामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे तो सेंद्रिय खताच्या माध्यमातून सुधारण्यासाठी पुढील नऊ वर्ष परिश्रम घ्यावे लागतील हे सांगतांना त्यांची बळीराजसाठीची तळमळ दिसून आली.
मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्याबरोबरच रासायनिक खतांचा अति वापर थांबला पाहिजे यासाठी काय करता येईल याची चिंता त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती,शासन शेतकऱ्याला ठिबक सिंचनासाठी अनुदान देत मात्र त्यात शेतकरी कसा नागवला जातो आणि बँकांचे उखळ कसे पांढरे होते हे त्यांनी उदाहरण देऊन पटवून दिले तेव्हा मी अचंबित झालो,ठिबक सिंचन असो कि पीक कर्ज वाटप यामध्ये शेतकरी कसा भरडला जातो हे त्यांनी सांगितल्यानंतर आश्चर्य वाटले,त्यांच्या बोलण्यातून सरकार,त्यातील सत्ताधारी,प्रशासन ,लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल अपेक्षाभंगाचं दुःख दिसून आलं,सत्ता कोणाची असो शेतकर्याच्या आयुष्यात काही फरक पडत नाही त्यामुळेच आपण  मध्यंतरी सगळं सोडून देण्याचा विचार केल्याच त्यांनी बोलण्याच्या ओघात सांगितलं आणि मनात कालवा कालव झाली,महाराज लोकांना देखील दुःख ,चिंता,निराशा असते याचा अनुभव आला,
     दरम्यान आता शेती आणि शेतकरी याविषयावर  ते विचार करत असून शाश्वत शेती कशी करता येईल यासाठी पुढाकार घेण्याचं त्यांनी सांगितलं आणि मनाला बरं वाटलं .
गावगावांचा अभ्यास करून तेथील जमिनीमध्ये कोणती पीकं घेता येऊ शकतात,त्यासाठी कोणती खत आवश्यक आहेत,गटशेती केली तर काय फायदा होईल याविषयावर त्यांचा अभ्यास थक्क करणारा होता,महाराज म्हणजे लोकांना पाया पडून दक्षिणा घेऊन आशीर्वाद देणारा असा माणूस हे भय्यू जी बरोबर चर्चा केल्यानंतर खोटे वाटते.हे विश्वचि माझे घर हि ज्ञानोबा माउलींची संकलपना महाराज सत्यात आणत असल्याची जाणीव नक्कीच होते,त्यांना सर्वसामान्य माणूस,त्याच्या अडचणी  त्यावरील उपाय याबाबत किती आपुलकी चिंता आहे हे दिसत होते .
महाराज केवळ राजकीय गुरू नाहीत तर ते जगाच्या कल्याणाची चिंता वाहणारे आहेत याची त्या दिवशी खात्री पटली, म्हणजे मी काही त्यांचं मूल्यमापन करणारा नाही किंवा ती माझी पात्रता देखील नाही परंतु जे जाणवलं ते मी मांडल, "उद्योगमं, साहसम, धैर्यमं, बुद्धिहीं, शक्ती,पराक्रमः,षडेते यत्र वर्तन्ते,तत्र देव सहायकृत " ,अस जे म्हणतात ते भय्यूजींच्या सारख्या पुण्यशील व्यक्ती बद्दलच असावे यावर शिक्कामोर्तब झाले.त्यांचं हे कार्य असच अखण्डपणे सुरु राहावे यासाठी ईश्वर त्यांना बळ देतोच आहे यात शन्का नाही मात्र समाजानेही त्यांच्या या राष्ट्रबांधणीच्या कार्यात सहभाग घ्यावा एवढीच माफक अपेक्षा .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड.9422744404.

रविवार, १९ जून, २०१६

पाणी गावाला गेलं

पाणी गावाला गेलं

माझी मुलगी तिच्या काकूला दुपारच्या वेळी सहज विचारत होती,काकू आपल्या बोअर च पाणी कुठं गेलं,तिच्या काकूने जे उत्तर दिलं ते मलाच नव्हे तर आजच्या परिस्थितीला चपखल बसणारे असेच होते,"पाणी गावाला गेलं"हे तिच्या काकूंचे उत्तर माझ्या मनाला चटका लावून गेलं.
आमच्या बोअर च पाणी मे च्या अखेरीस अचानक कमी झालं,कॉलनीत सगळे बोअर कोरडे पडले असताना आम्ही मात्र नशीबवान होतो कारण भीषण दुष्काळात आमच्या बोअर ला भरपूर पाणी होत,बटन दाबलं कि पाणी सुरु व्हायचं,मात्र आमच्या पाण्याला नजर लागली अन पावसाळ्याच्या तोंडावर बोअर च पाणी कमी झालं,आजूबाजूला कोणी तरी बोअर घेतला असेल त्यामुळे पाणी कमी झालं असेल,जमिनीखालच पाणी आपली जागा बदलत असे एक ना अनेक विषय मग घरात चर्चिले गेले,
खऱ्या परिस्थिती बद्दल मात्र कोणीच बोलायला तयार नव्हतं,आज भूगर्भातील पाणी पातळी जी खोल गेली आहे ती काही एका रात्रीत झालेली जादू नाही,माणूस नैसर्गिक संपत्ती चा वापर योग्य प्रमाणात करीत नसल्याने आज माणसावर पाण्यासाठी दारोदार हिंडण्याची वेळ आली आहे,पाणी म्हणजे नीर जे विवेकाने वापरावे असे म्हणतात मात्र माणूस नेमकं याच्या उलट वागत गेला ज्यामुळे आज पाण्याच्या एका थेंबासाठी तरसावे लागत आहे
इतिहासाचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल कि अगदी राम कृष्णाचा काळ असो अथवा छत्रपती शिवरायांचा काळ या काळात पाण्याचं योग्य नियोजन कस करावं याला विशेष महत्व दिल गेलं होत,आजही शिवकालीन पाणी पुरवठा योजना नावाने जी योजना कार्यरत आहे ती शिवरायांच्या काळातील संदर्भावर आधारित अशीच आहे,
राज्याच्या मराठवाडा,विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग मागील तीन चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करतो आहे,सातत्यानं कमी होणारा पाऊस,पाण्याचं बिघडलेले नियोजन,भूगर्भातील घसरत चाललेली पाणी पातळी,पाण्याचा बेसुमार उपसा यामुळे या भागात दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत,हा सगळा भूभाग हा शेतीवर आधारलेला असाच आहे,आणि शेती हि लहरी पावसाच्या जीवावर केली जाते त्यामुळे पाऊसाने दगा दिला कि शेती पिकतं नाही आणि बळीराजाच्या गळ्याला फास लागतो
     मराठवाडा असो कि विदर्भ या भागात मागील दहा बारा वर्षात किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून शेतीमध्ये नगदी पिकाच्या नावाखाली शेतकरी ऊस आणि कापूस याच पिकांवर जोर देतानाचे चित्र दिसते,एक एकर ऊस लागवडीसाठी साधारणपणे जेवढे पाणी लागते तेवढे पाणी एका गावाची महिनाभराची तहान भागवू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे तरी देखील आम्ही उसाची शेती करणं सोडलेलं नाही,ते सोडावं असा अट्टहास नाही मात्र ठिबक वर उसाची शेती केली तर पाण्याची बचत होऊ शकते,दुसर म्हणजे या उसाच्या शेतीत अंतर पीक घेतल्यास चार पैसे गाठीला राहू शकतात,मात्र एवढा बारकाईनं विचार कोण करतो आज काल ज्याला त्याला आजचा आताचा विचार सुचतो,त्यामुळे आज पाणी आहे ना मग वापरा बेसुमार नसेल तेव्हा बघू हि बेफिकीर वृत्ती वाढीस लागली आहे त्यामुळे आज पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
     केवळ शेतिमध्येच पाण्याचा बेसुमार उपसा होतो अस नाही तर शहरी भागातील लोकही भविष्याचा विचार न करता पाण्याचा अतिरेकी वापर करताना दिसून येतात,आज शहरीकरण वाढू लागलं आहे,फ्लॅट संस्कृती वाढीस लागल्याने घर तिथं बोअर पद्धत रूढ झाली आहे त्यामुळे फुटाफुटावर बोअर दिसू लागले आहेत,जमिनीची अक्षरशः चाळण केली जात आहे,शंभर किंवा दोनशे फुटापर्यंत  बोअर खोदण्यास परवानगी आहे मात्र  नियम तोडण्यात धन्यता मानणाऱ्या आम्ही लोकांनी पाण्याच्या थेंबासाठी हजार फुटापर्यंत जमिनीला छिद्र पाडली, तरी देखील पाणी लागेनास झालं आहे,बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात देवी निमगाव या गावात एका शेतकऱ्याने दहा वर्षात त्याच्या शेतात 48 बोअर घेतले आहेत विशेष म्हणजे त्यातील फक्त चार ते पाच बोअर ला आज पाणी आहे,यासाठी त्याने किमान पंचवीस लाख रुपये खर्च केले असतील,हि वेळ आज मराठवाडा ,विदर्भ या भागातील लोकांवर का आली याचा कधीतरी गांभीर्यानं विचार होणार आहे कि नाही .
वाढत्या शहरीकरणामुळे शहर बकाल होत आहेत,अवाढव्य वाढणाऱ्या शहरांना आणि शहर वासियांना मूलभूत सोयी सुविधा पुरवणे नगर परिषद प्रशासनाला कठीण होत आहे मात्र त्यांनी जो नागरिक बांधकाम परवानगी मागण्यास येईल त्याने जल पुनर्भरण अथवा पावसाच्या पाण्याचं बोअर मध्ये पुनर्भरण करण्याचं मान्य केल्यास आणि ते केलं आहे कि नाही याची खात्री करूनच परवानगी देण्याचा नियम लावल्यास काही प्रमाणात लोकांवर वचक बसेल असे वाटते.
एका पाचशे फुटाच्या गच्चीवर एका रात्रीत साधारण पाऊस झाल्यास दीड ते दोन हजार लिटर पाणी जमा होऊ शकते,हेच पाणी प्रत्येकाने आपल्या बोअर अथवा आडात किंवा जमिनीत मुरवले तर खालावत चाललेली पाणी पातळी काही प्रमाणात का होईना पण सुधारण्यास मदत होईल यात शंका नाही.शहरात बेसिन असो अथवा संडास बाथरूम सर्वत्र जे फ्लश वापरले जातात त्याद्वारे रोज हजारो लिटर पाणी नालीत वाया जात मात्र याचा विचार ना लातूर करांनी केला ना बीड करांनी मग आज हे सगळे लोक बसले आहेत बोंबा मारत,तेव्हा विनाकारण निसर्गाचा लहरीपणा ,देवाची अवकृपा या गोष्टीवर चर्चा करीत  बसण्यापेक्षा पाण्याचा योग्य वापर,शेतीमध्ये पाण्याचं योग्य नियोजन,भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी जलपुनर्भरण यासारखे प्रयोग राबवणे आवश्यक आहे,
    आज प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अथवा इतर माध्यमातून पाणी साठवण्याची काम केली जात आहेत  त्यामुळे यंदाचा पावसाळा शिवारातील पाणी शिवारात साठवण्यासाठी उपयोगी ठरेल यात शंका नाही,प्रत्येक गावात जे सांडपाणी रस्त्यावर अथवा नालीमध्ये सोडलं जात ते  गावातील मोकळ्या जागेवर एक मोठा खड्डा खोदून त्यात सोडले तर  गावातील पाणी पातळी वाढण्यास मदत होऊ शकते , त्याच पद्धतीने गावातील प्रत्येक घरासमोर सांडपाण्याचा वापर करून झाडं लावली तर ती सावली बरोबरच पाऊस पाडण्यास मदत करू शकतील .
     माणसाने पाणी हे जीवन आहे ते जपून वापरावे लागते याचा धडा घेतल्यास आणि पाण्याच्या वापराचे नियम काटेकोर पणे पाळल्यास पाणी पुन्हा कधी गावाला जाण्याचा विचार करणार नाही अशी आशा करायला हरकत नाही,आज पाणी काही दिवस गावाला अथवा सुट्टीवर गेलं तर आपले हाल बेहाल सुरु आहेत विचार करा पाण्यानं जर संप अथवा बेमुदत गावाला जाण्याचा विचार केला तर आपले कसे होईल.तेव्हा पाणी गावाला जाणार नाही यासाठी सर्वजण प्रयत्न करूया आणि पाणी वाचवूया .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड

रविवार, १७ एप्रिल, २०१६

सुपारी पत्रकारिता म्हणजे काय

सुपारी पत्रकारिता म्हणजे काय?
आज काल पत्रकारांना किंवा चॅनेल ला नाव ठेवणे,त्यांच्या नावाने बोंब मारणे हि एक फॅशन झाली आहे,वर्षातील 365 दिवसांपैकी 350 दिवस ज्या नेत्यांच्या बातम्या हि वर्तमानपत्र किंवा चॅनेल लोकांपर्यंत पोहचवतात त्या नेत्यांना एखादी दुसरी बातमी विरोधात आली कि त्यांचा तिळपापड होतो,मग त्यांचे कार्यकर्ते माध्यमांच्या नावाने बोटं मोडायला सुरवात करतात,वास्तविक पाहता माध्यमं हि लोकांमध्ये जागृती करण्याचं काम करतात पण ज्या लोकांच्या जीवावर आपलं राजकारण (दुकान)सुरु आहे त्या लोकांच्या समस्या मांडून त्याबद्दल नेत्यांना जाब विचारला तर या नेत्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते
काल परवा असाच प्रकार बीड मध्ये घडला,जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांची बीड ला खरीप आढावा बैठक होती,या बैठकीनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना बियर च्या कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला,तसा हा प्रश्न काही वावगा नव्हता ,त्यांनी त्याचे उत्तर दिले,ज्यामध्ये त्यांनी कारखान्यांना लागणारे पाणी आरक्षित असते त्यामुळे ते पाणी बंद करणे योग्य होणार नाही कारण त्यामुळे अनेक लोक बेरोजगार होतील असं मत मांडल, त्यांचं मत वाईट नव्हतं,मात्र एकीकडे मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळ असताना आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना रेल्वेने पाणी आणावं लागत असताना कारखान्यांना जर कोट्यवधी लिटर पाणी दिले जात असेल तर त्याबाबतीत विचार केला जाऊ शकतो,मात्र मंत्री मुंडे यांनी वेगळी भूमिका मांडली, त्यांची भूमिका माध्यमांनी दाखवली आणि मुंडे यांचा संताप झाला
माझी बदनामी करण्याचा विडा उचलला आहे,सुपारी घेऊन पत्रकारिता केली जात आहे,या पत्रकारांसमोर तुकडे फेकले कि हे शांत होतील अस आणि इतर बरच काही त्या बोलल्या,वास्तविक पाहता माध्यमांनी ज्या बातम्या दाखवल्या त्यात काय चूक होत हे त्या सांगू शकल्या नाहीत,जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पदाचा विषय असो कि शनी शिंगणापूर चा विषय असो मला विनाकारण बदनाम केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला ज्यात तथ्य काहीच नाही असं दिसत ,
पंकजा मुंडे या राज्यात संघर्ष यात्रेच्या निमित्ताने असो कि जलयुक्त शिवार च्या माध्यमातून असो फिरल्या तेव्हा याच माध्यमांनी त्यांना मोठा स्पेस दिला,भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना संबोधलं,त्या गावागावात गेल्या तेव्हा त्याची बातमी कव्हर केली अस असताना कधीच पंकजा यांना मीडिया किंवा पत्रकार सुपारी घेऊन बातम्या करतात अस वाटलं नाही,बरं त्यांच्या विरोधात सुपारी देणार कोण आणि घेणार कोण कारण केवळ त्यांची बदनामी करायचा विषयच नाही मग त्यांनी हा आरोप कशाच्या आधारावर केला,असा अनुभव त्यांना कोणत्या जिल्ह्यात किंवा माध्यमाच्या बाबतीत आला असेल तर त्यांनी तस जाहीर सांगावं,राज्यात आज अनेक समस्या आहेत,पाण्याचं संकट भीषण आहे अशा वेळी सरकार वर टीका टिप्पणी होणारच,सरकार म्हणून घेणारे मंत्री ,अधिकारी याना प्रश्न विचारले जाणारच त्यात वावगं अस काय आहे,पाण्याची समस्या आ वासून उभी असताना खडसे सारख्या मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी हेलिकॉप्टर साठी हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असेल तर त्याची बातमी होणारच,मोबाईल च बिल भरायला शेतकऱ्याकडे पैसे आहेत अस वक्तव्य खडसेंनी केल्यानंतर त्याचा समाचार घेतला जाणारच मग त्यावरून माध्यम बेजबाबदार कशी ठरवायची,
राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी टोल मुक्ती असो कि कर्जमाफी च्या घोषणा करणाऱ्या सेना भाजप च्या पुढार्यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडला असेल तर माध्यमांनी त्याची आठवण करून दिली तर माध्यम सुपारी घेऊन बातम्या करतात हे म्हणन कितपत योग्य आहे,माध्यमांनी केवळ सरकार,मंत्री ,अधिकारी यांचे गोडवे गावेत आणि मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करावे अस यांचं म्हणन असेल तर ते करण योग्य होणार नाही,माध्यम हि जागल्याची भूमिका करीत असतात,मग त्यात काही लोक अपवाद असू शकतात मात्र त्यामुळे सगळे एक जात चोर आहेत अस कस म्हणता येईल,पंकजा मुंडे यांच्या कामाचा झपाटा पाहिला तर थक्क व्हायला होत,त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले तेव्हा याच माध्यमांनी किंवा प्रतिनिधींनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे याचा त्यांना विसर पडला कि काय,99 चांगल्या बातम्या छापल्या नंतर कधीच त्याची दखल न घेणाऱ्या या नेत्यांना एक बातमी विरोधात आली कि जमत नाही अस का?
पंकजा मुंडे यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी जे निर्णय घेतले,किंवा ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याची दखल नेहमीच मीडिया ने घेतली आहे,बीड ला त्या जे बोलल्या तेच चॅनेल वरून दाखवलं गेलं,मात्र त्यांचं म्हणन तोडून मोडून ट्विस्ट करून दाखवल्याचा आरोप त्यांनी केला ज्यात काही तथ्य नाही,त्यांच्या विभागाने जे काम केलं,किंवा सरकार जे काम करत ते माध्यमांनी दाखवायचं नाही अस ठरवलं तर चाललं का?अस कोणी करणार नाही मात्र सुपारी घेऊन पत्रकारिता केली जात असल्याचा त्यांचा आरोप दुर्दैवी म्हणावा लागेल,बीड सारख्या जिल्ह्यात बहुतांश पत्रकार या वृत्तीचे नाहीत,बरं जे इ मीडिया प्रतिनिधी आहेत त्यांना पंकजा मुंडे यांनी कितीवेळा त्यांच्या भाषेत तुकडे टाकले,कार्यक्रम कव्हर करणे ऑफिसला पाठवणे हे काम ते बिचारे करतात,मात्र आमच्या कार्यक्रमाला या किंवा कव्हर करा अस देखील खुद्द मंत्री महोदया किंवा त्यांच्या यंत्रणेकडून कधीच सांगितलं जात नाही,मंत्र्यांना नसेल वेळ मिळत पण खालची यंत्रणा तर हे काम करू शकते ना,मग ते देखील होत नाही,बरं निरोप आलाच तर त्यांच्या कडून कधी काही मिळण्याची अपेक्षा केली जात नाही,काही लोक असतीलही ज्यांना मंत्री आले कि दारात उभं राहायची सवय आहे,ते स्वतःच्या स्वार्थासाठी असले उद्योग करीत असतीलही म्हणून सगळेच तसे आहेत हे म्हणन योग्य नाही,पत्रकार परिषदेत यायचे मंत्री,पुढारी जे सांगतील ते ऐकायचे आणि नंतर त्यांच्या कानाला लागून त्यांना हव्या तश्या बातम्या करायच्या हा उद्योग काही लोक करीत असतील,मात्र बहुतांश पत्रकार वेगळी काही बातमी मिळते का यासाठी प्रयत्नशील असतात,अशावेळी प्रश्न,उपप्रश्न विचारले जातात,मात्र त्यामुळे त्या पत्रकारांचा संबधित नेत्यांबद्दल पर्सनल काही मतभेद आहे असं नसत,केवळ प्रसंगानुरुप ते प्रश्न विचारलेले असतात पण असे प्रश्न विनाकारण बदनाम करण्यासाठी विचारले जात असल्याचा या नेत्यांचा गैरसमज होतो किंबहुना करून दिला जातो,त्यामध्ये काही तोंडपूजे कार्यकर्ते तर असतातच मात्र काही पत्रकारही आघाडीवर असतात आशा वेळी खऱ्या पत्रकारांची अडचण होते.
मागील पंधरा सोळा वर्षाच्या पत्रकरितेमध्ये मला तरी अजून सुपारी पत्रकारिता कशी करायची असते हे समजलेले नाही,माझ्यासारखा माणूस तोंडावर प्रश्न विचारून मोकळा होतो अनेक वेळा समोरच्या व्यक्तीला ते पटत नाही म्हणून मी प्रश्नच विचारायचे नाही हे कितपत योग्य आहे,प्रश्न विचारणं माझं काम आहे उत्तर द्यायचे कि नाही हे त्यांनी ठरवावं,बीड च्या पत्रकरितेमध्ये सगळेच धुतल्या तांडळासारखे आहेत असंही म्हणन नाही मात्र त्याच वेळी सगळेच चूक आहेत हे म्हणन देखील संयुक्तिक नाही अस मला वाटत,शेवटी काय हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा भाग आहे,पण मीडिया ने केलेली टीका हि एवढी पर्सनल घेत नसतात हे मात्र नक्की
लक्ष्मीकांत रुईकर,झी मीडिया बीड

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

राजकारण गडाचं

राजकारण गडाचं
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या वेगळ्या कार्यशैली मुळे परिचित असलेले स्व.गोपीनाथ मुंडे यांची ओळख महाराष्ट्राला आणखी एका कारणामुळे आहे,ती म्हणजे भगवानगड.पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पाथर्डी तालुक्यात असलेला भगवानगड विशेष चर्चेत आला तो मुंडे यांच्या मुळेच,साधारण पणे 12 वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगड च्या गादीवर नामदेव शास्त्री सानप यांना बसवले,मुंडे आणि गड हे समीकरण राज्याच्या राजकारणात मागील दहा बारा वर्षात परिचित झाले होते,दरवर्षी भगवान बाबाच्या पुण्यतिथी आणि जयंती निमित्त गडावर मोठी यात्रा भरते,तसेच विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी मुंडे देशात कोठेही असले तरी गडावर येत,आणि त्या ठिकाणी त्यांची टोलेजंग सभा होई,अगदी दीड वर्षांपूर्वी मुंडे केंद्रात मंत्री झाल्यानंतर राज्यात सर्वप्रथम आले ते भगवान गडावर,या गडाने मुंडेंच्या मागे मोठी ताकद उभी केली,विशेषतः वंजारी समाजाची एकगठ्ठा मते मुंडेंच्या मागे गडामुळे राहिली ,त्यामुळेच राज्यातील सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षातील लोकही मुंडेंच्या या ताकदीपुढे नतमस्तक होत असत,
मुंडे यांच्या अकाली निधनानंतर भगवान गडावरून महंत नामदेव शास्त्री सानप यांनी पंकजा मुंडे यांना गडाची मानसकन्या जाहीर केले,मुंडेंच्या दहाव्या आणि तेराव्या दिवशी नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका मांडली होती,तेथेच गोपीनाथ गडाची मुहूर्त मेढ रोवली गेली आणि सुरु झाला भगवान गड (नामदेव शास्त्री)आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष.
गोपीनाथ गड हा येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरावा हा पंकजा यांचा उद्देश होता,त्यात वावगे असे काहीच नव्हते,मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी शास्त्री यांनी गोपीनाथ गड हा राजकीय गड असेल आणि भगवानगड हा धार्मिक गड असेल,या पुढे भगवान गडावर राजकीय भाषणे होणार नाहीत असे जाहीर केले आणि उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या,आजपर्यंत भगवान गडावरून मुंडे राजकारण करतात अशी दबक्या आवाजात होणारी चर्चा शास्रीनच्या घोषणेमुळे खुलेआम झाली,कदाचित येथेच पंकजा आणि शास्त्री यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली असावी,
राज्यामध्ये भगवानगड ला मानणारा मोठा समाज आहे,केवळ वंजारी समाजाचा गड अशी असणारी प्रतिमा आजही कायम आहे ,वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे,या गडावर सर्व जाती धर्मातील लोक श्रद्धेने येतात,परंतु मुंडे यांचा गडावरील वावर पाहता हा गड वंजारी समाजाचा असावा असा अनेकांचा समज आहे,
भगवान गडावरून यापुढे दसरा मेळाव्यात राजकीय भाषण होणार नाही असा निर्णय नुकताच नामदेव शास्त्री यांनी जाहीर केला,मध्यंतरी पंकजा आणि शास्त्री यांच्यात धुसफूस सुरु असल्याच्या बातम्या होत्या,काही कार्यक्रमानिमित्त पंकजा या गडावर गेल्या तेव्हा शास्त्री आणि त्यांच्यात विसंवाद वाढल्याच्या सुरस बातम्या आल्या होत्या,त्याचे खंडन ना पंकजा यांनी केले ना शास्रीनी केले,दसरा मेळावा होणार कि नाही यावरून शास्त्री विरुद्ध काही पुढाऱ्यांनी शेरेबाजी देखील केली होती,पंकजा यांना मानस कन्या जाहीर केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील गडावर झाला होता हे सर्वश्रुत आहे,अशा वातावरणात गड ,शास्त्री आणि पंकजा यांच्यात दुरावा आल्याचे स्पष्ट जाणवत होते,
पंकजा यांना गड ताब्यात घ्यायचा आहे तर शास्रीना कोणाची लुडबुड नको आहे अशा चर्चा जोरात सुरु आहेत, कोण चूक कोण बरोबर यावर मतमतांतरे असू शकतील मात्र सुरु असलेला वाद समाजाला देखील मान्य नसल्याचे दिसते, राज्याच्या राजकारणात आपला दबाव कायम ठेवायचा असेल तर समाजाची ताकद आपल्या मागे कायम कशी राहील यासाठी गड आपल्या ताब्यात कसा राहील यासाठी पंकजा यांचा प्रयत्न सुरु असल्यास त्यात वावगे काहीच नाही,कारण स्व गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात दबदबा निर्माण करण्यात गडाचा सिंहाचा वाटा होता हे कोणीच अमान्य करणार नाही,त्यामुळे गडाची ताकद आपल्या मागे राहावी यासाठी पंकजा यांचा प्रयत्न असल्यास चुकीचे काहीच नाही मात्र त्यासाठी त्यांनी जो मार्ग निवडला आहे तो कदाचित चुकीचा असू शकतो,
कोणी काहीही म्हणो भगवान गडावरून एकदा आदेश मिळाला कि मग समाज कोणाचेच ऐकत नाही हे सर्वच राजकीय पक्षांना चांगलेच माहित आहे,त्यामुळे गडावर दसरा मेळावा होणारच आणि तेथे आपण भाषण करणारच असा जर पंकजा यांचा आग्रह असेल तर त्यात त्यांचा काही दोष नाही असेच म्हणावे लागेल
मात्र त्यासाठी थेट नामदेव शास्त्री सानप यांना आव्हान देणे पंकजा यांना निश्चितच न परवडणारे आहे,कारण गड कि पंकजा असा निवाडा करावयाचा झाल्यास समाज गडाच्या पाठीशी राहील यात शंका नाही,त्यामुळे पंकजा यांना सध्यातरी शांतपणेच निर्णय घ्यावा लागेल.
निवडणुकांना अद्याप साडेतीन वर्षाचा कालावधी असला तरी पंकजा यांची घाई त्यांच्या पुढील राजकारणाला मारक ठरू शकते असे राजकीय धुरिणांचे मत आहे,पंकजा यांनी गड आपल्याला सर्वोच्च आहे,त्याचे कोणी राजकारण करू नये अशीच भूमिका घेणे क्रमप्राप्त आहे असे अनेकांचे मत आहे,मात्र पंकजा यांचा एकंदर कारभार आणि राजकारण करण्याची पद्धत पाहता त्या असे वागतील याबाबत अनेकांना शंका आहे,त्यामुळे आगामी काळात गड (शास्त्री)विरुद्ध पंकजा असा संघर्ष अटळ असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे

रविवार, २४ जानेवारी, २०१६

आत्महत्येस कारण की .......

झी 24 तास ने काही महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील अल्प भू धारक ,गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला,आम्हा रिपोर्टर लोकांना असे शेतकरी कुटुंब शोधण्याचं काम सोपवलं,संपादकांचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही कामाला लागलो,पण मनात शंका होती,खरोखर गरज असणारे शेतकरी कुटुंब शोधायचे कसे,कारण आत्महत्या केलेल्या कुटुंबांचा समावेश टाळावा अस सांगितलं होत,तेव्हा मी बीड जिल्ह्यातील सहा कुटुंब शोधून काढली ,मात्र त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली,कारण कोणता क्रायटेरिया लावणार,बरं काम सोप वाटत असलं तरी महा कठीण होत,कारण त्या कुटुंबाला दोन तीन एकर जमीन असावी,ती पडीक किंवा नापीक असावी,आर्थिक बाजू कमकुवत असावी,असे काहीसे निकष होते,असे लोक शोधणं तस अवघड होत मात्र सहा कुटुंब शोधली किंवा सापडली म्हणा,त्या कुटुंबांची पार्श्वभूमी पाहिली तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या,मात्र त्या नजरेआड करून निवड करावी लागली,याचा अर्थ निवड चुकीची करावी लागली असा नाही मात्र कुठं तरी मनात अनेक प्रश्नाचं काहूर माजलं होत,आर्थिक बाजू कमकुवत असताना देखील एकाही कुटुंबाची सदस्य संख्या मर्यादित म्हणजे दोन मुलं, आई वडील अशी नव्हती,सहा कुटुंबात किमान चार मुलं, मुली आई वडील,सासू सासरे अशी परिस्थिती होती,एक कुटुंब तर 11 मुलं, मुली ,आई वडील,कुडाच घर,अस होत.
हि सगळी स्थिती पाहिल्यानंतर काही प्रश्न पडले,या लोकांची आर्थिक बाजू कमकुवत होती तर कुटुंब नियोजन किंवा मर्यादित कुटुंब का नाही,बरं कुटुंब मर्यादित नाही तर नसू दे मात्र पिकांचं नियोजनही दिसलं नाही,दोन तीन एकर जमिनीवर कापूस किंवा ऊस हि दोनच पीक दहा वर्षापासून घेतली जात असल्याचं दिसून आलं.अशा वेळी जर नियोजन कोलमडून पडलं तर दोष कोणाला द्यायचा ,अरे बाबांनो जमिनीत जर नियोजन करून पीक घेतलं तर आर्थिक परिस्थिती डबघाईला येणार नाही,दहा पंधरा वर्षांपूर्वी शेतात ज्वारी ,बाजरी,मूग,उडीद,तूर,भुईमूग अशी पीक घेतली जायची,वर्षातून दोन पीक घेतली जायची,त्यातील चार पाच क्विंटल माल विकून उरलेला माल वर्षभर घरी खायला पुरवायचा अस ठरलेलं गणित असायचं,त्या काळात ग्रामीण भागात पै पाहुणा आला तरच गव्हाची पोळी ताटात दिसायची,पुरण पोळी तर सण वाराला पहायला मिळायची,आज रोज गव्हाची पोळी ताटात दिसते,काही जण म्हणतील कि तुम्हाला शेतकऱ्यांनी पोळ्या खाऊ नयेत अस वाटत का?तर निश्चित नाही,त्यांनीही पोळ्या खाव्यात वावगं काहीच नाही मात्र सांगण्याचा उद्देश एवढाच कि पूर्वी शेतात पिकलेल धान्य,डाळी दुळी वर्षभर घरात पुरतील एवढ्या व्हायच्या आज मात्र प्रत्येक गोष्ट विकत आणावी लागते,पूर्वी शेतात बांधावर वांगी,मेथी,करडी,कांदा,आळू ,बटाटे अशा भाज्या लावल्या जायच्या,रोज जेवणात त्याचा वापर केला जायचा,वाण्याच्या दुकानात तेल,तूप,साखर पत्ती यासाठी जावं लागायचं,त्याला खर्चही कमी लागायचा,आज मात्र शेतकर्याच्या हातात भाजी ची पिशवी आणि किराणा सामानाची यादी सोबतच असते मग पैसा पुरणार कोठून.
शेतकरी आत्महत्या हा अत्यन्त संवेदनशील विषय आज झाला आहे,दहा पंधरा वर्षांपूर्वी शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताना दिसत नव्हते आज मात्र रोज कोठे ना कोठे आत्महत्या केल्याची बातमी वाचायला,ऐकायला मिळते,एखादा माणूस एवढ्या सहजपणे आपलं जीवन कस संपवू शकतो ?हा न उलगडणारा प्रश्न आहे, आत्महत्या करण्यामागे अनेक कारण असतात,नापिकी,कर्जबाजारी पणा, सावकाराच कर्ज इथपासून ते अगदी व्यसनाधीनता इथपर्यन्त अनेक कारण आहेत,मात्र त्याला शेतकरी आत्महत्या हे गोंडस नाव देऊन त्या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतानाचे चित्र दिसते.
ग्रामीण भागात आजही शेतकरी असो कि शेतमजूर लग्न सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याचे फॅड दिसून येते,मुलीच्या लग्नात ऋण काढून सण साजरा करण्याचे प्रकार सर्रास दिसून येतात याला काय म्हणायचं.दोन तीन एकर जमीन सावकाराकडे गहाण टाकायची आणि मुलीच लग्न थाटात लावायचं,कारण पै पाहुण्या मध्ये आपला रुबाब कायम राहावा यासाठी हा सगळा थाट माट असल्याचं दिसत.येणारा माणूस खुश झाला पाहिजे ,पाहुण्या रावळ्यानी आपलं नाव घेतलं पाहिजे या साठी केलेला हा सगळा खटाटोप शेवटी वधुपित्याच्या गळयाला फास देऊन जातो.एक लग्न शेतकऱ्याला चार पाच वर्ष मागं घेऊन जात,पाहुण्यांचे आहेर,नवरदेवाच्या घरच्यांचा मानपान,जेवणावळी,यावर लाखो रुपये खर्च होतात,जेवणारे जेवून जातात,हे कमी पडलं,ते जास्त झालं अशा चर्चा करतात,ग्रामीण भाषेत सांगायचं तर खातात पितात अन टेरी ला हात पुसून जातात अशी अवस्था असते मात्र तरी देखील मागील पाच पंन्नास वर्षात लग्नावरील खर्च कमी झालेला नाही.
कर्ज काढून लग्न सोहळे उरकायचे अन ते फेडताना नाकीनऊ आले कि गळ्याला फास लावायचा असा कार्यक्रम ठरलेला दिसतो,गळफास लावताना कोणीही नंतर काय होईल याचा विचार करताना दिसून येत नाही,लग्न करू नयेत अस नाही मात्र ते करताना आपलं अंथरून पाहून पाय पसरावेत हे नक्की.सामूहिक विवाह हा देखील एक चांगला पर्याय आहे किंवा एक गाव एक लग्नतिथी हा देखील उपाय होऊ शकतो.यावर सर्वानीच गांभीर्याने विचार करायला हवा,
ग्रामीण भागाचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते कि जमीन खरेदी किंवा विक्री चे व्यवहार झालेच नाहीत अस एकही गाव आढळणार नाही,ज्याच्याकडे दहा पंधरा एकर जमीन आहे तो वर्ष दोन वर्षात एक एकर का होईना जमीन विक्री करतो,बरं हि जमीन कोणी मुंबई पुण्यावाले विकत घेतात अस नाही तर गावातीलच दोन तीन एकर शेती असलेला माणूस हि जमीन विकत घेतो,त्याला ते कसे शक्य आहे याचा अभ्यास केल्यास लक्षात येईल कि त्याच्याकडे काम करण्याची इच्छा शक्ती आहे अन 24 तास तो घाम गाळण्यात घालवतो,काम करील त्याला दाम मिळतील किंवा करा काम गाळा घाम मिळवा दाम असा सृष्टीचा नियम आहे आज अनेकांना त्याचा विसर पडल्याचे चित्र दिसते .
शेतकरी आत्महत्या करताना परिवाराचा विचार करीत नाही असही दिसून येत,बरं ग्रामीण भागात काम करणारे भटके ,विमुक्त ,सालगडी,मजूर कधीही अशा वाटेने जाण्याचा विचार करीत नाहीत अस दिसत मग शेतकरीच का असा विचार करतो,त्याला अनेक कारण आहेत, असतील मात्र शेतकऱ्यांनी जर ठराविक पिकाचा अट्टहास सोडून शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर शेती आतबट्याची होण्याऐवजी फायद्याची होऊ शकते ,अनेक जण सांगतात शेतीसाठी पाणी मुबलक मिळत नाही म्हणून शेती परवडत नाही ,मान्य आहे मात्र पाण्याचं योग्य नियोजन करन कोणाच्या हातात आहे,आहे पाणी म्हणून चोवीस तास उपसा करायचा आणि संपलं कि बोंबा मारायच्या हे कस मान्य होईल,ठिबक सिंचन सारखा प्रयोग केल्यास कमी पाण्यात हि शेती पिकवता येते परंतु शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो,
आज काल एक हजार फुटापर्यंत बोअर घेण्याचा नवा नाद अनेकांना लागला आहे मात्र आडातच नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार अशी स्थिती आहे,जमिनीतील पाणी पातळी कमालीची घटत चालली आहे अशा वेळी किती खोल खोदायच याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
शेती पूरक उद्योग धंदे फारसे होत नसल्याचं चित्र देखील प्रकर्षाने दिसून येत,फार फार तर दुधाचा धंदा दिसतो मात्र शेळी पालन ,कुक्कुट पालन,वराह पालन,खत बी बियाणांची दुकान असा व्यवसाय करताना शेतकरी दिसत नाहीत.बहुतांश ग्रामीण भागात लोक सकाळी तीन चार भाकरीचा मुडपा पाडून गाडीला किक मारून शहरात येतात तिथं येऊन एखाद्या नेत्याच्या माग पुढं फिरायचं,चार दोन कप चहा प्यायचा ,गावगप्पा मारायच्या ,फार तर तहसील किंवा कलेक्टर कचेरीत चक्कर मारायची अन दिवस मावळतीला गावाकडचा रस्ता धरायचा असा नित्यक्रम दिसतो,गावात गेल्यावरही शहरात काय झालं,दिल्लीत काय चालू आहे,सी एम च कस चुकलं यावर गप्पांचा फड रंगवायचा अन झोपायचं अस चित्र दिसत.
दिवस भरात हाच वेळ जर शेतात दिला तर काही चांगलं होऊ शकत मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असताना दिसत, आज ग्रामीण भागात कापूस वेचणी असो कि तण काढणी अथवा पीक कापणी यासाठी मजूर मिळत नाहीत,शहरातून मजूर न्यावे लागतात ,मनरेगा च्या कामावर हि मजूर मिळत नाहीत असे चित्र आहे,एकीकडे काम नाही म्हणून बोंब मारायची अन दुसरीकडे असलेल्या कामावर जायचं नाही अशी परिस्थिती दिसते,शेतीत जर वेळ दिला तर पोटापुरत पिकत अन कुटुंबाच भागत अस गणित आहे मात्र शेती परवडत नाही म्हणायचं अन काहीच न करता मरणाला कवटाळायच हे काही बरोबर नाही.
शेती हि परवडत नाही अस म्हणून नोकरीच्या मागे लागणारे अनेक जण दिसतात मात्र दहा पाच हजाराची चाकरी करण्यापेक्षा शेतीत कष्ट केले तर मालक बनता येत याची अनेक उदाहरण आहेत त्यांचा आदर्श सर्वांनी घेणं गरजेचं आहे.शेतकर्याच्या पोरानं शेतीच करावी असा काही नियम नाही हे मान्य आहे मात्र ती केली त्यात नवनवीन प्रयोग केले तर काही बिघडत नाही पण हे करणार कोण.
शेत मालाला योग्य भाव मिळत नाही हा देखील एक गहन विषय। आहे मात्र तो मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी मार्केटचा अभ्यास करून शेतीत ,तिच्या तंत्रात बदल करन अपेक्षित आहे,पण ते होताना दिसून येत नाही.कापूस आणि ऊस याशिवाय अनेक पीक आहेत मात्र त्याकडे कानाडोळा केला जातो.
एकंदरच काय तर शेतकरी आत्महत्या का करतो याकडे त्याने स्वतः देखील गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे,प्रत्येक गोष्ट सरकारच्या माथी मारायची अन मोकळं व्हायचं हे काही बरोबर नाही,थाटात लग्न करा,कर्ज काढून घर बांधा, कापूस अन ऊस च लावा,हजार हजार फूट बोअर खोदा, अस सरकार म्हणत नाही मग हे का करता ,जरा विचार करा जीवन हे अमूल्य आहे,एवढ्या सहज संपवू नका,पीक,पाणी,कुटुंब याच नियोजन करा,एवढंच सांगण आहे.

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...