किर्तनसूर्य निघाला देवदरबारी
सेवा रुजू करण्यासी ........!!
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या गाथेत मृत्यूचे वर्णन करताना सांगतात की,
"झाला प्रतिरूप शरीराचा भाव |लक्षीयेला ठाव स्मशाणीचा ||रडती रात्रंदिवस कामक्रोध माय|
म्हणती हाय हाय यमधर्म ||वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा| ज्ञानाग्नि लागला ब्रम्हत्वेसी ||
फिरविला घाट फोडीला चरणी |महावाक्य ध्वनी बोंब झाली || दिली तिलांजली कुलनामरूपासी | शरीर ज्याचे त्यासी समर्पिले || तुका म्हणे रक्षा झाली आपोआप | उजळीला दिप गुरुकृपा ||
याप्रमाणे राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी हे वैकुंठाच्या प्रवासाला निघून गेले असले तरी त्यांची कीर्ती अन त्यांचं देव,देश अन धर्माप्रतीच कार्य अनादी काळापर्यंत स्मरणात राहील हे निश्चित .
जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणारच आहे,शरीर हे नश्वर आहे आत्मा अमर आहे हे कटुसत्य आहे पण काही लोकांचं जाणं मनाला चटका लावून जातं, राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्या निधनाची बातमी काळजाचा ठोका चुकवणारी होती,प्रकांड पंडित असणारा,कोणताही विषय लीलया पेलणारा ,कोणत्याही दुःखावर सहज मात करून सुखाशी हातमिळवणी करणाऱ्या या माणसाला मृत्यूवर मात्र विजय मिळवता आला नाही,बुवा अस अर्ध्यावर सोडून जाणं काही पटलं नाही हे मात्र खरं .
गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या छोट्याशा गावातून कीर्तनाच्या माध्यमातून आपलं नाव सातासमुद्रापार नेण्याचा भीमपराक्रम भरतबुवा रामदासी यांनी केला होता .त्यांच्याबद्दल काही लिहीन म्हणजे सूर्याला त्याच्या तेजस्वी पणाबद्दल आरसा दाखवण्या सारख आहे .साधारणपणे पाच फूट उंची,अंगावर नेहरू,शुभ्र धोतर आणि गळ्यात पांढरा गमजा, कपाळावर चंदनाचा टिळा अन बुक्का अस त्यांचं रूप पाहिल्या नंतर कोणालाही ते तेजस्वी पुरुष आहेत हे लक्षात यायचं .
भरतबुवा म्हणजे एक चालत बोलत विद्यापीठ होते,अध्यात्मिक,ऐतिहासिक, साहित्यिक,सांस्कृतिक,पौराणिक असा कोणताही विषय असला तरी ते हजारो,लाखो लोकांच्या काळजाला भिडेल अन मनाला पटेल असं कीर्तन करायचे .माणूस येताना रिकाम्या हाताने येतो अन जातानाही रिकाम्या हातानेच जातो हे खरं असलं तरी गेल्यानंतरही तुम्ही तुमच्या कीर्ती,कार्यामुळे कायम स्मरणात राहू शकतात .मरावे परी कीर्ती रुपी उरावे अस काहीस बुवांच्या बाबतीत म्हणावं लागेल .एक आदर्श ते समाजासमोर ठेवून गेले आहेत .बुवा कीर्तनकार होते,बुवा हभप होते,बुवा माणुसकीचा झरा होते,बुवा पितृतुल्य होते,बुवा समाजाचा आधार होते,बुवा संतसाहित्याचे गाढे अभ्यासक होते .
रामकृष्ण ही आले गेले त्याविन का जग हे बुडाले अस म्हणतात हे सत्य असले तरी भरतबुवा यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबासोबतच समाजाचे अपरिमीत नुकसान झाले आहे ते कधीही भरून निघणार नाही हे नक्की .भरतबुवा रामदासी हे रामदासी पंथातील होते,सहसा कीर्तनकार हे सहजपणे लोकांत मिसळून त्यांना देवाधर्माच्या कार्यात सहभागी करून घेणारे असतात .मात्र भरतबुवा हे देव आणि मनुष्य यांच्या मधील महामार्गावरील मैलाचा दगड होते .नारदीय असो की वारकरी अथवा सांप्रदायिक कीर्तन,ते चौकोनी चिरा होते .सर्वच कीर्तनातून ते समाजप्रबोधन करण्यासोबतच भगवंत भक्तीचे धडे देत असत .
भरतबुवा अन माझं एक वेगळं नातं होत कारण ते माझ्या गावचे म्हणजे रुईचे होते,कधीही कुठेही भेटले की सुहास्य मुद्रेने स्वागत करून मला तुमचा अभिमान वाटतो अस म्हणत पाठीवर थाप देणार .मात्र आता पाठीवर थाप देणारा तो हात अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे .
पृथ्वीवर हजारो लाखो मंदिर आहेत की ज्यांच्या कळसाचे दर्शन झालं तरी आपण हात जोडतो मात्र असे पाय खूप कमी आहेत की जिथं आपण नतमस्तक होतो,ते पाय होते भरतबुवा,जे भेटले की आपसूक हात जोडले जायचे .
माणूस कितीही मोठा झाला,पैसा ,संपत्ती कमावली तरी त्याला भेटल्यावर जर आपलेपण वाटत नसेल तर त्याच्या जगण्याला काही अर्थ नसतो मात्र भरतबुवा याला अपवाद होते .त्यांना भेटल्यावर नेहमी आपण देवदूताला भेटत आहोत असा भास व्हायचा .लहान मूल असो की तरुण अथवा वृद्ध ते सगळ्यांसोबत एडजेस्ट व्हायचे,आपल्या ज्ञानाचा त्यांना कधीही दुराभिमान नव्हता,गर्व नव्हता .माणूस म्हणून एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते बुवा . बुवा केवळ किर्तनच करायचे अस नाही तर ते छान लिहायचे सुद्धा,लोकमत असो की लोकसत्ता अथवा महाराष्ट्र टाईम्स अशा अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी सातत्याने संत साहित्यावर लिखाण केले आहे .
काही दिवसांपूर्वी त्यांची भेट एका बैठकीनिमित्त झाली होती तेव्हा त्यांनी स्वतःबद्दल बोलताना सांगितले होते की मी कोण आहे,किती मोठा आहे यापेक्षा मी माणूस आहे अन ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती माझं काही देणं लागत अस मानतो म्हणून मी समाजकार्यात सहभागी होतो .बुवा शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक कार्यात सहभागी होते हे मात्र खरं आहे .अगदी दोन दिवस अगोदर त्यांनी महेश कुलकर्णी यांच्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले होते .
ठेविले अनंते तैसेचि रहावे ,चित्ती असू द्यावे समाधान या प्रमाणे भरतबुवा आयुष्य जगले . त्यामुळे ईश्वराने देखील त्यांना काहीच कमी पडू दिले नाही . ऋतुपर्ण सारखा पुत्र दिला ज्याने आईबापांच्या नावाचा झेंडा अटकेपार नेला .मुलाच्या कीर्तनाचे गुणगान करीत सूत्र संचलन करण्याचा योग बिडकरांनी कीर्तन महोस्तवात याची देही याची डोळा अनुभवला आहे .त्यांच्या पत्नी देखील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत .
"जिंदगी जिंदादिली का नाम है,मुर्दादिल क्या खाक जिया करते है " हे ब्रह्मवाक्य त्यांनी आपल्या काळजात कोरून ठेवलं होतं,त्यामुळे ते नेहमी समाधानी होते .ईश्वरी साक्षात्कार ते जेव्हा कीर्तनातून लोकांपुढे मांडायचे तेव्हा आपण जणूकाही देवाच्या दरबारात उभे आहोत असा भास व्हायचा .तुकाराम गाथा असो की ज्ञानेश्वरी अथवा भगवतगीता त्यांना मुखोदगत होती .शरीराची उंची कमी असली तरी समाजातील उंची मात्र त्यांनी हिमालयएव्हढी गाठली होती .देव आणि मनुष्य यांच्या मार्गातील या मैलाच्या दगडाने परिस्थितीचे अनेक घाव सोसले आहेत मात्र त्याबद्दल कधीही तक्रार न करता त्यांनी संघर्ष करीत सुखाचे दिवस निर्माण केले .
बुवा इतक्या अकाली जातील हे कोणालाही स्वप्नात सुद्धा वाटले नसेल .शरीर हे नश्वर आहे हे सगळ्यांना सांगणारे बुवा इतक्या सहजपणे संसाराचा त्याग करून निघून जातील यावर अजूनही विश्वास बसत नाही .जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला हे जरी सत्य असले तरी बुवा तुम्ही इतक्या अकाली जाण्याने आम्ही पोरके झालो हो .देवाकडे घेऊन जाणारा देवदूतच देवाने आमच्यातून खेचून नेला आता आम्ही कोणामार्फत आमचं गाऱ्हाणं देवाकडे मांडायचे .
भरतबुवा यांनी सांगली,सातारा,पंढरपूर या भागात हजारो विद्यार्थ्यांना कीर्तनाचे मोफत शिक्षण दिले आहे,जिथे जिथे जातील तिथे तिथे कीर्तनाच्या माध्यमातून देव,देश अन धर्मसेवा करण्याचं अखंड व्रत त्यांनी घेतलं होतं . ते कीर्तन करताना असा अनुभव यायचा की जणूकाही आपण देवाच्या दरबारात उभे आहोत .भाषाप्रभु,वाणीवर सरस्वतीचा वास असलेला हा विठ्ठलाचा भक्त आपल्या सावळ्याच्या सेवेसाठी एवढ्या लवकर अनंताच्या प्रवासाला निघून जाईल यावर अजूनही विश्वास बसत नाही .बुवा एकच शब्द देतोत की तुम्ही चेतवलेली भगवतभक्तीची ही मशाल कायम तेवत राहील अन तुम्ही आमच्या मनात कायम रहाल .तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली !
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404 .