लोड लेनेका नही देने का ..........!
अस म्हणतात की जन्म आणि मृत्यू या दोनच गोष्टी माणसाच्या हातात नाहीत बाकी सगळं त्याच्या आवाक्यात आलं आहे,मात्र 21 व्या शतकात माणूस टेस्टट्युब बेबी च्या माध्यमातून जन्म अन आत्महत्येच्या माध्यमातून मृत्यू देखील आपल्या हातात ठेवण्यात यशस्वी झाला आहे,सुशांत ने केलेल्या आत्महत्येच्या प्रकारानंतर हे प्रकर्षाने जाणवू लागल आहे .मृत्यू मग तो नैसर्गिक असो की अनैसर्गिक तो चटका लावूनच जातो मात्र सुशांत सारख्या सेलिब्रिटी ने मरणाला कवटाळण जास्त वेदना देऊन जातं. माणसानं दगडाशी का होईना पण बोललं पाहिजे अन आपलं मन मोकळं केलं पाहिजे हे तितकंच खरं आहे .
अवघ्या 30 -35 वर्षाच्या आयुष्यात सुशांत सिंग राजपूत इतका कंटाळला की त्याने अचानक एक्झिट घेतली .मोठे तितके खोटे अन जया अंगी मोठेपण तया यातना कठीण अस जे म्हणतात ते या घटनेने पुन्हा एकदा तंतोतंत खर ठरलं .लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा अस आपले आई बाप सांगतात ते काही खोटं नाही .चंदेरी दुनियेतील झगमगाट हा डोळ्यांना दिपवून टाकतो मात्र या झगमागटामागे किती काळ सत्य दडलेलं असत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं .
सुशांत सिंग राजपूत असो की भैयु महाराज अथवा मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी हिमांशू रॉय ,काय नव्हतं या लोकांजवळ, ऐश्वर्य म्हणजे काय असतं हे या लोकांकडे पाहिल्यावर कळतं, मात्र तरीही हे लोक आयुष्याला कंटाळले,प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतील ,मात्र आयुष्यात कोणत्याही अडचणींवर मात करता येत नाही अस नाही,पण तरीदेखील या लोकांनी आत्महत्या सारखा निर्णय घ्यावा म्हणजे खूप वाईट आहे .
माणूस जन्मल्यापासून तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेला असला किंवा आठरविश्व दारिद्र्य घेऊन जन्मलेला असो .अडचणी प्रत्येकाच्या नशिबात येतातच,अडचणी संकट नसली तर आयुष्य बेचव होईल .
सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच आयुष्याचा प्रवास करावा लागतो .ज्या अभिनेत्याने रील लाईफ मध्ये आत्महत्यापासून कस दूर राहायचं हे शिकवलं अन दाखवलं त्यानेच मृत्यूला कवटाळण योग्य नाही वाटत .एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी ला जवळच अस कोणीच नसावं हे केवढ दुर्दैव आहे .सुशांत असो की भैयु महाराज यांनी आपल्या क्षेत्रात लोकांना जगण्याची नवी उमेद शिकवली,त्यांच्या आदर्शावर अनेकजण आयुष्यात स्थिर झाले असतील मात्र याच लोकांनी असा निर्णय घेणे हे बुद्धीला पटत नाही .
आयुष्याच्या पटावर आपण प्यादेच असतो मात्र आपण वजीर म्हणून खंबीरपणे पाय रोवून उभं राहिल्यास येणारी संकट दूर करून संकटावर मात करता येते .हे साध गणित या सेलिब्रिटी लोकांना माहीत नसावं हे किती अवघड आहे .कितीही संकट आली तरी मनाने खंबीर असलेला माणूस शेवटपर्यंत संघर्ष करतो अन सुखाच्या शोधात शेवटपर्यंत राहतो अन जगतो .मात्र सुशांत सारखे लोक जर इतक्या लवकर हार मानणार असतील तर त्यांना फॉलो करणाऱ्या लोकांनी काय करायचं हा प्रश्नच आहे .
आत्महत्या हा उपाय असू शकत नाही,कारण माणसाला नेहमी अडचणी येतातच,नव्हे अडचणी आल्याशिवाय जगण्यात मजाच नाही मग या अडचणी आल्यावर त्यांना तोंड देण्यापेक्षा तो पळवाट का शोधतो हा संशोधनाचा विषय आहे .सुशांत हा सेलिब्रिटी आहे म्हणून त्याच्या मृत्यूवर अनेकांनी हळहळ व्यक्त केली मात्र देशात रोज शेकडो शेतकरी मरणाला कवटाळतात त्याबाबत कोणाला काही वाटत नाही अशा पोस्ट वाचण्यात आल्या,ते बरोबर आहे .मात्र सुशांत सारखे लोक चंदेरी दुनियेत असल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे म्हणून सोशल मीडियावर जास्त हळहळ व्यक्त झाली .याचा अर्थ शेतकऱ्यांची आत्महत्या कमी अन सुशांत सारख्या सेलिब्रिटी ची मोठी असा होत नाही .पण सोशल मीडियावर कोणी काय अन कस व्यक्त व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .
माणसाच्या आयुष्यात एक तरी जागा किंवा मित्र मैत्रिण अशी असावी की जिथं आपल्याला आपलं मन मोकळं करता येईल,एक तरी खांदा असा हवा की त्यावर आपलं डोकं ठेवून धायमोकलून रडता येईल .पण सिमेंट काँक्रीट च्या या जंगलात शहरं वाढली अन माणुसकी,आपुलकी,जवळीकता ,संवेदनशीलता कमी झाली .फ्लॅट संस्कृती मुळे माणसाची वृत्तीदेखील संकुचित झाली अन त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले .रोज कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणावरून आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात .अगदी टीव्हीवर कार्टून पाहू दिलं नाही म्हणून एका लहानग्यांन दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली,परीक्षेत अपयश आल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या असोत की प्रेम भंगातून होणारे मृत्यू,अथवा कर्जबाजरी पणाला कंटाळून होणाऱ्या आत्महत्या असोत,जीवन खूप सुंदर आहे,मात्र त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे याचा विसर या लोकांना पडतो अन मग हे अस पाऊल ते उचलतात .
माणसाकड दोन वेळच भागेल एवढाच पैसा असावा अस नेहमी म्हंटल जात मात्र मनुष्य स्वभावानुसार तो गाडी,घोडी,घरदार,जमीन जुमला यासाठी मरमर करतो अन जाताना मात्र फुटका मनी तोंडात घेऊन जातो,हे सगळं माहीत असून सुद्धा माणूस पैशाच्या मागे धावतो हे किती मोठा दुर्दैव आहे .माणूस आपल्या स्वतःकड बघून जगण्यापेक्षा दुसऱ्यासोबत स्पर्धा करण्यात धन्यता मानतो अन मग त्याचा शेवट दुर्दैवी होतो .
येताना नागवा अन जातानाही नागवच जाव लागतं मात्र तरीही आपण नेहमी दुसऱ्याच्या संपत्तीकडे पाहतो,अगदी भाऊ भाऊ असो,बहीण भाऊ असो की बाप लेक, जावा जावा ,प्रत्येकजण दुसऱ्याच्या ताटात काय अन किती आहे हे पाहण्यात तो आपल्या ताटाकड अन पोटाकड दुर्लक्ष करतो .किती लागत हो जगायला,दिवसभरात चार पोळ्या,भाजी किंवा चटणी,पण माणूस दुसऱ्याच्या नादात स्पर्धा करण्यासाठी म्हणून नको तेवढं कमवायच्या मागे लागतो अन मग नाही भेटलं की मरणाला कवटाळतो .
त्यामुळं एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे की मनुष्य जन्म एकदाच मिळतो त्यामुळे भेटलेल आयुष्य सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झोका घेत घेत जगायचं,कितिही मोठं संकट आलं, दुःख वाट्याला आलं,तरी हे आपल्या नशिबाचे भोग आहेत अस म्हणून सगळं काही नशिबाच्या माथी मारून मोकळं व्हायचं .लोड लेनेका नही देने का हे कायम लक्षात ठेवल्यास अशक्य अस काहीच नाही.तेव्हा खचून न जाता धैर्याने जगा अन आलेल्या परिस्थितीला तोंड देत आयुष्याचा प्रवास सुखाचा करा .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404