सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो काही प्रकार सुरू आहे तो पाहिल्यानंतर नैतिकता हा शब्दच अनैतिक असल्याचा भास होऊ लागला आहे .केवळ सत्ता कायम राहावी यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील दिग्गज घरांना बिनबोभाटपणे प्रवेश दिला जात आहे. या प्रवेश मागे अनेक कारणं असली तरी दोन्ही पक्षातील निष्ठावंत मात्र कुठेतरी नाराज असल्याचे चित्र आहे. मात्र निष्ठवंतांना नेहमीच कमरेत लाथा बसतात आणि त्यांना सतरंज्या उचलाव्या लागतात हे त्रिकालाबाधित सत्य या दोन्ही पक्षांच्या निष्ठावंतांना सध्या अनुभवायला मिळत आहे .त्यामुळेच राजकारणात हा जो काही कारभार सुरू आहे तो पाहिल्यानंतर नागवी नैतिकता असंच म्हणावं वाटतं.
1999 पासून ते 2014 पर्यंत तब्बल 14 वर्षापेक्षा अधिक काळ राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कारभाराला आणि या दोन्ही पक्षातील खाऊन खाऊन सुस्त आणि मस्त झालेल्या पुढाऱ्यांना राज्यातील जनता वैतागली होती. त्यामुळेच या जनतेने शिवसेना आणि भाजपची युती फिसकटल्या नंतर देखील या दोघांच्या पदरात भरभरून दान दिलं आणि 2014 ला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस मुख्यमंत्रीपदी आरूढ झाला. गेल्या साडेचार वर्षात मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी जो कारभार केला आहे तो वाखाणण्याजोगा आहे .स्वपक्षीयांसोबतच विरोधी पक्षातील नेत्यांवर देखील त्यांनी अंकुश ठेवण्याचे काम केला आहे. मात्र देशभरात भाजपने फोडा आणि राज्य करा ही जी रणनीती अवलंबली त्यापासून फडणवीस स्वतःला वाचवू शकले नाहीत. 2014 च्या अगोदर चा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते भारतीय जनता पक्षामधील आज जे 123 आमदार सत्तेत आहेत त्यातील 50 पेक्षा अधिक जण हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील आहेत. मात्र त्यावेळी जनतेने त्यांना स्वीकारलं परंतु आज जो काही प्रकार भाजप आणि शिवसेनेकडून सुरू आहे ते पाहून जनता देखील हैराण झाली आहे.
सत्तेसाठी आम्ही कोणत्याही पातळीला आणि थराला जाऊ शकतो हेच भाजप आणि शिवसेनेनं दाखवून दिल आहे . कर्नाटक असो गोवा असो की इतर राज्य या ठिकाणी भाजपचे जे धोरण राहिले आहे तेच धोरण सध्या महाराष्ट्रात देखील राबवले जात असल्याचे चित्र आहे .आपल्या सोबत येणारा हा किती मोठा गुंड आहे,भ्रष्टाचारी आहे ,त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, तो राजकारणी म्हणून किती चारित्र्यवान आहे याकडे दुर्लक्ष करून आमच्या सोबत या आणि पवित्र व्हा अशीच काहीशी भूमिका भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी पासून सुरू केल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याच्या नावाखाली राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील असोत की विजयसिंह मोहिते पाटील यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा चाळीशी पार केली हीच अवस्था शिवसेनेची देखील झाली. एकेकाळी निष्ठावंत आणि गरीब प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष म्हणून महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या शिवसेनेला देखील दुसऱ्या पक्षातील आयाराम सोबत घेण्याची लागण झाली. भाजप सोबत राहून राहून वाण नाही पण गुण लागला आणि या पक्षाने देखील जयदत्त क्षीरसागर किंवा सचिन आहेर यांच्यासारख्या राष्ट्रवादी मध्ये असलेल्या लोकांना सोबत घेऊन सत्तेचा सोपान चढण्याचा निर्णय घेतला.
पुणे, सांगली ,सातारा ,कोल्हापूर, नाशिक ,नागपूर हे तसे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मजबूत किल्ले मानले जायचे मात्र 2014 पासून या किल्ल्यांना तडे जाऊ लागले आणि 2019 उजाडेपर्यंत हे किल्ले अक्षरशः ढासळले. विजयसिंह मोहिते पाटील असो नरेंद्र पाटील अथवा राधाकृष्ण विखे किंवा संजय काकडे अथवा लक्ष्मण जगताप, आझम पानसरे अनेक दिग्गज राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पुढार्यांना भाजप आणि शिवसेनेने गळाला लावत आपली सत्तेवरील मांड कायम करण्याचा निर्णय घेतला. हे करताना आपल्या सोबत आयुष्यभर राबणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेही विश्वासात घेण्याची गरज वरिष्ठ नेत्यांना वाटली नाही.
हम करे सो कायदा या पद्धतीने शिवसेना आणि भाजपने सध्या वागणं सुरू केल आहे , हे करताना राजकारणामध्ये काही नैतिक मूल्य इथिक्स पाळावी लागतात याचा विसर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना पडला असल्याचे चित्र आहे राजकारण हे गलिच्छ आहे भ्रष्ट आहे त्यामुळे या दलदलीला साफ करायच असेल तर तरुणांनी दलदलीत उतरून नवा असा प्रयोग केला पाहिजे असे मत अनेक जाणकार व्यक्त करतात परंतु सध्या राज्याच्या राजकारणात जे काही सुरु आहे ते पाहिल्यानंतर कोणत्याही भविष्याची स्वप्न रंगवनाऱ्या तरुणाला या क्षेत्रात यायला आवडणार नाही. राजकारणामध्ये नैतिकता असते आणि ती पाळावी असे संकेत असतात मात्र कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणाऱ्या लोकांना नैतिकता या शब्दाचा विसर पडल्याचं सध्या तरी दिसून येत आहे .नैतिकतेचे धिंडवडे काढून भर चौकात नैतिकता नागवी केली जात आहे .विरोधी पक्षात जो मोठा दिग्गज आणि पैसेवाला आहे त्याला सोबत घ्या आणि आपला हेतू साध्य करून घ्या असंच या दोन्ही पक्षाच्या लोकांनी ठरवलेल आहे .राजकारणामध्ये आयाराम गयाराम ही संस्कृती काही नवीन नाही मात्र ज्या पद्धतीने महाराष्ट्रात या आयाराम-गयाराम ला पायघड्या घातल्या जात आहेत त्यांना सत्तेची ऊब दिली जात आहे ते पाहिल्यानंतर मूल्यांचा किती ऱ्हास झाला आहे हे लक्षात येतं.
मंत्र्याचा मुलगा मंत्री, आमदाराचा मुलगा आमदार ,पोरगी खासदार ,नातू नगराध्यक्ष ,पणतू नगरसेवक ही परंपरा तशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील त्यांच्या सत्तेच्या काळात कायम ठेवलेली आहे .एक व्यक्ती एक पद असं केवळ बोललं जातं मात्र एकाच घरात चार चार सत्तेची पद देताना सर्वच पक्षांना याचा विसर पडल्याचे दिसून येतं .जर शरद पवार यांनी एकाच घरात एक पद दिलं असतं तर आज सत्तेच्या साठी जी काही त्यांच्याजवळच्या नेत्यांची लगबग सुरू आहे ती दिसली नसती. पवारांनी देखील त्यांच्या कार्यकाळात मोहिते असोत शिंदे असोत विखे असोत ती क्षीरसागर अशी अनेक घराणी मोठी केली .एकाच घरात तीस चाळीस चाळीस वर्ष सत्तेची पदे दिली. हे करताना भविष्यात आपण उभा करीत असलेले भस्मासुर आपल्याच विरोधात उभा राहतील याची भीती पवारांना वाटली नाही. जे पवारांनी केलं तेच पुन्हा एकदा भाजप शिवसेनेकडून होताना दिसत आहे .भारतीय जनता पक्षामध्ये ज्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील लोक प्रवेश करत आहेत ते पाहिल्यानंतर लवकरच भाजप आणि शिवसेनेची देखील काँग्रेस झाल्यास आश्चर्य वाटायला नको .निष्ठा नैतिक मूल्य राजकीय कार्यकर्ता म्हणून केलेले कष्ट या सगळ्या गोष्टी खुंटीला टांगून आज केवळ संख्या वाढवण्याच्या मागे शिवसेना आणि भाजप लागली असल्याचं दिसून येतं.
सत्तेत कायम राहायचा असेल आणि सत्ता टिकवायची असेल तर पाशवी बहुमत आपल्याकडे पाहिजे या पद्धतीने ईर्षेला पेटलेल्या शिवसेना आणि भाजप कडून जो काही प्रकार सुरू आहे तो पाहिल्यानंतर हा राजकीय शिष्टाचार नसून राजकीय व्यभिचार असल्याचं म्हणावं वाटतं. लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवून भाजपने कर्नाटक असो की गोवा अशा राज्यांमध्ये आपली सत्ता काबीज केली मात्र हे करताना या लोकांना एका गोष्टीचा विसर पडला की सत्ता ही कायम एकाकडेच कधीच राहत नाही .त्यामुळे आज जे सुपात आहेत ते कधीतरी जात्यात जाणारच आहेत. भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांनी काही शेवटपर्यंत सत्ता लिहून आणलेली नाही .अस असतानाही राजकीय शिष्टाचाराच्या ऐवजी जो बाजार मांडला गेलाय तो मन विषण्ण करणारा आहे.
जे लोक भाजप शिवसेनेमध्ये जात आहेत त्यांना मोठमोठी आमिषं दाखवली जात आहेत तसेच चौकशीच्या धमक्या दिल्या जात आहेत अस विरोधी पक्ष सांगतो मात्र घेणाऱ्यांना अक्कल नसली तरी जाणाऱ्यांना तर आहेच परंतु दोघांनीही नाकाला गुंडाळून ठेवल्या नंतर हे असच होणार हे निश्चित ."पार्टी विथ डिफरन्स" हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या भाजपमध्ये हा जो काही नवीन प्रवाह आला आहे तो भाजपच्या निष्ठावंतांना निश्चितच रुचणारा नाही तसेच "80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण" असं म्हणून मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेकडून ज्या पद्धतीने 100% राजकारणासाठीच आयाराम गयाराम यांना पायघड्या घातल्या जात आहेत ते पाहिल्यानंतर मराठी माणसाचं मन देखील कुठेतरी दुखावला गेल आहे .मात्र जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनाशी आम्हाला काही देणे घेणे नाही "हम हम है बाकी सब पानी कम है" अशा पद्धतीने वागण्याचा निर्णय या दोन्ही पक्षांनी घेतल्यामुळे लोकशाहीदेखील निर्वस्त्र होतानाचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
सत्ता ही सर्वसामान्य माणसाचं जगणं सुलभ करून त्याच्या घरापर्यंत विकास पोचवण्यासाठी असते याचा विसर शिवसेना आणि भाजप ला पडला आहे .आम्ही सत्तेत आल्यानंतर विरोधक नसलाच पाहिजे म्हणजे आम्ही माजलेल्या वळू सारखे वागायला मोकळे असे ठरवूनच या दोन्ही पक्षांनी सध्या कारभार सुरू केला आहे. "अगर मेरी सत्ता आई तो भी मै विरोधी पक्ष मे बैठू गा "असं म्हणणाऱ्या लोहिया यांचा आदर्श आज शिवसेना आणि भाजप सारख्या पक्ष्यांमुळे खुंटीला टांगला गेला आहे .आम्हाला सत्ता पाहिजे त्यासाठी वाटेत जो येईल तो सोबत आला तर ठीक अथवा त्याला आडवा करून आम्ही सत्ता काबीज करू हा जो काही नवा प्रकार राज्यात सुरू झाला आहे तो पाहिल्यानंतर कुठेतरी फडणवीस साहेब हे वागणं बरं नव्हं असंच म्हणाव वाटतय.
गावागावातील खेड्यापाड्यातील सर्वसामान्य शिवसैनिक हाच माझा प्राण आणि श्वास आहे असं म्हणणारे बाळासाहेब ठाकरे असोत की सत्तेसाठी खरेदी विक्री करणार नाही भलेही माझं सरकार कोसळले तरी चालेल असं सांगून एका मतानं बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे राजीनामा देणारे अटल बिहारी वाजपेयी हे जर आज हयात असते तर त्यांनी हा प्रकार पाहून निश्चितच आपल्याच पक्षातील असं काम करणाऱ्या लोकांना कडेलोटाची शिक्षा दिली असती. बाळासाहेब ठाकरे यांनी रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरा पासून ते साखर कारखान्यावर चिठ्ठ्या लिहिणाऱ्या कामगारापर्यंत अनेकांना आमदार खासदार केलं. मात्र सत्तेच्या माध्यमातून प्रचंड पैसा आणि संपत्ती गोळा करता येते आणि सत्तेच रक्त जिभेला लागलेल्या या सत्तेतील लांडग्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी सगळी नैतिकता गुंडाळून ठेवत केवळ सत्तेसाठी आपल्याच विरोधकांत सोबत बदफैली करण्याचं ठरवलं.
त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते पाहिल्यानंतर नैतिकता नागवी झाली आहे आणि जनता डोळ्यावर पट्टी बांधून मुकाटपणे हे पहात आहे असं वाटतं.
लक्ष्मीकांत रुईकर,बीड,9422744404