बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

अम्मा..........!

अम्मा.........!

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे हे खरे असले तरी या देशात व्यक्तिपूजा देखील मोठ्या प्रमाणात केली जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत,देशातील जनतेने आपल्या लाडक्या नेत्यांना एक सन्मान म्हणून टोपणनावाने उपाधी दिल्याचे अनेक वेळा दिसून आले,मोहनदास करमचंद गांधी यांना बापू हि उपाधी देणे असो की बाळ गंगाधर टिळक यांचे लोकमान्य हे नाव असो अथवा विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्यवीर असो तेव्हा पासून सुरु झालेला हा सिलसिला आजही कायम आहे .महाराष्ट्रात सुद्धा अनेकांना जाणता राजा,दादा,भैय्या,अण्णा,तात्या,साहेब अशा नावाने संबोधले जाते मात्र त्यांचा आवाका हा त्या त्या राज्यापुरता किंवा पक्षा पुरता लिमिटेड राहिल्याचे आपण सर्वांनीच पाहिले आहे मात्र याला अपवाद ठरल्या आहेत त्या जे . जयललिता अर्थात अम्मा.1983 पासून ते 2016 पर्यंत आपल्या राजकीय प्रवासात जयललिता यांची ओळख देशभर अम्मा या नावानेच झाली.
रील लाईफपासून ते रियल लाईफपर्यंत चा अम्मा चा प्रवास थक्क करणारा असाच आहे,वयाच्या सोळाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या जयललिता यांनी तब्बल 140 पेक्षा अधिक तामिळ चित्रपटातून काम केलं,तामिळनाडू जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जयललिता या एमजी रामचंद्रन यांच्या मुळेच चित्रपट क्षेत्रात आणि नंतर राजकारणात यशस्वी झाल्या.
1984 साली सर्वात प्रथम राज्यसभेवर निवड झालेल्या जयललिता या कधी तामिळनाडू च्या जनतेच्या अम्मा झाल्या हे त्यांनाही कळले नाही,एमजीआर यांच्या निधनावेळी अपमानित व्हावे लागलेल्या जयललिता यांनी आपल्या आयुष्यात एमजीआर यांनाच आपले गुरु मानले.
एमजीआर यांच्या नंतर एआएडिएमके ची सूत्र जयललिता यांच्याकडे आली मात्र त्यांना तामिळनाडू विधानसभेत अपमानित करून बाहेर काढले गेले तेव्हाच या महिलेने शपथ घेतली की आता येथे मुख्यमंत्री म्हणूनच प्रवेश करायचा आणि अवघ्या काही वर्षात त्या मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या,आपल्या 37 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री पद भूषवल .
तामिळनाडू च्या जयललिता यांचा जन्म ब्राह्मण अय्यर कुटुंबात झाला होता,तामिळनाडू राज्याला द्रविड  संस्कृती ची पार्श्वभूमी आहे म्हणजे येथे नास्तिक लोकांचा प्रभाव जास्त होता मात्र अशा परिस्थितीत जयललिता यांनी या भागात आपला प्रभाव वाढवला नव्हे चार दशकं कायम ठेवला,मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी ज्या योजना तयार केल्या त्या लोककल्याणकारी होत्या,अम्मा मिनरल वॉटर,अम्मा कँटीन,अम्मा मोबाईल अशा एक ना अनेक योजना मधून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात घर केलं . जनतेच्या मनावर आपल्या व्यक्तिमत्वाचे गारुड कायम करणाऱ्या अम्मा यांना उत्पनापेक्षा जास्त संपत्ती जमविल्याच्या आरोपावरून कारागृहात देखील जावे लागले ,त्यावेळी जयललिता यांच्याकडे पडलेल्या छाप्यात एक दोन नव्हे तर दहा हजार साड्या, पंचवीस किलो सोने,हिरे,जवाहिर सापडले होते मात्र  यावर मात करीत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर कब्जा केला,
आज देशात अनेक मोठे नेते आहेत,अनेक राज्यात मोठं मोठे पक्ष आहेत मात्र अम्मा एकमेवाद्वितीय म्हणाव्या लागतील,38 लोकसभा जागा पैकी तब्बल 36 जागा जिंकत त्यांनी मोदी लाटेत देखील आपला गड 2014 मध्ये कायम ठेवला होता,त्याला कारण त्यांचे जनतेप्रति असलेलं प्रेम आहे हे नक्की.जयललिता या कारागृहात असताना तत्कालीन मुख्यमंत्री पनिरसेलवम यांनी त्यांच्या खुर्चीवर न बसता कारभार पाहिला होता.
एक विशेष बाब म्हणजे आजपासून तीस वर्षांपूर्वी जेव्हा एमजीआर हे अपोलो रुग्णालयात होते तेव्हा जयललिता यांनी केंद्राला साकडे घालून उपचारवर लक्ष देण्याची मागणी केली होती,"हिस्ट्री रिपीट अगेन्स्ट"असं जे म्हणतात ते अम्मा च्या बाबतीत तंतोतंत खरं ठरलं आहे,सप्टेंबर महिन्यात जेव्हा अम्मा अपोलो रुग्णालयात दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक वावड्या उठल्या तेव्हा जयललिता यांच्या विश्वासू शशिकला यांनी केंद्राला साकडे घातले आणि केंद्राने या प्रकरणात लक्ष घातले.
एकीकडे देशात भाजप,काँग्रेस या सारख्या पक्षांचा बोलबाला असताना तामिळनाडू मध्ये मात्र जयललिता यांनी आपली पकड मजबूत केली होती,देशात आजपर्यंत कोणत्याही पक्षात एवढी व्यक्तिपूजा पाहायला मिळाली नसेल जेवढी तामिळनाडू मध्ये दिसते.इथं सरकार अम्मा,प्रशासन अम्मा,जनजीवन अम्मा असच चित्र पाहायला मिळतं. आपला लाडका नेता रुग्णालयात असताना लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उत्तरल्याचे चित्र फक्त तामिळनाडू मध्येच दिसू शकते,तामिळनाडू मधील लोक कोणत्याही बाबतीत खुपचं इमोशनल आहेत हे दिसून येते मग तो सुपरस्टार रजनीकांत असो की जया अम्मा, जनतेने आपले आयकॉन कोण असावेत आणि ते कसे असावेत हे दाखवून दिलं आहे,
"कौण कहता है के आस्मान में छेद नही हो सकता एक पत्थर तो तबियत से उच्छलो यारो " या प्रमाणे जयललिता यांच्या साठी कोणतीही गोष्ट अशक्य नव्हती,शिकून वकील व्हायचं ठरवणाऱ्या जयललिता यांना अचानक सगळं सोडून सिनेक्षेत्रात यावं लागलं त्यानंतर राजकारणातील त्यांचा प्रवेश देखील इच्छेविरुद्ध असाच होता मात्र त्यांनी येथेही आपली छाप सोडली, राजकारणात महिला यशस्वी होत नाहीत ,त्यांना पुरुषांच्या कुबड्यांचा आधार घ्यावाच लागतो हा इतिहास आहे मात्र हा इतिहास जयललिता यांनी खोटा ठरविला, एक महिला असतानाही त्यांनी तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री पद भूषवल आणि एवढंच नव्हे तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या पासून ते नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत सगळ्यांशी त्यांनी सलोख्याचे संबंध कायम ठेवले,वाजपेयी सरकारला पाठिंबा देण्यावरून वादात सापडलेल्या जयललिता यांनी अचानक पाठिंबा काढून घेत सर्वानाच धक्का दिला,
राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही असं म्हणत नाकं मुरडनाऱ्या व्हाईट कॉलर लोकांसाठी जयललिता यांनी एक आदर्श निर्माण केला आहे,जनकल्याण करायचे असेल तर माध्यम म्हणून राजकारण सुद्धा चालू शकते हे त्यांनी दाखवून दिलं.लोकनेता हा एका दिवसात तयार होत नसतो तर त्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या करावी लागते,त्याग करावा लागतो,समर्पण करावे लागते आणि त्यानंतरच एखादीच जया शतकात तयार होत असते आणि त्यामुळेच रुपेरी पडद्यावरील हि जया करोडो लोकांची अम्मा होऊ शकते.

लक्ष्मीकांत रुईकर,बीड 9422744404

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...