प्रोडक्ट नव्हे प्रोडक्टिव्ह .............!
दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर जॉनी लिव्हर यांचा एक व्हिडिओ पाहिला, म्हाताऱ्या झालेल्या आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती काय म्हणते आहे हे मुलांना कळत नाही अन ते चिडचिड करतात,शेजारी असलेले डॉक्टर सांगतात की तुम्ही आम्ही लहान असताना आपलं बोबड बोलणं ज्या आईला न सांगता कळतं तिचं म्हातारपणी च बोलणं आपल्याला कळू नये हे दुर्दैव आहे,तिच्या जवळ बसा, प्रेमाने हात हातात घ्या अन तिच्याशी बोला बास तिला काही नको .हा व्हिडीओ पाहिला अन मनात कालवाकालव झाली .स्त्री मग ती आई असो,बहीण असो नाहीतर पत्नी असो किंवा मैत्रीण ,किती सोसते पण तिच्या नशिबी मात्र कायम अवहेलना अन उपेक्षाच येते,तिला एक दिवस शुभेच्छा द्यायच्या अन वर्षभर अन आयुष्यभर मात्र मनःस्ताप द्यायचा किंवा तिने तो सोसायचा हे कुठवर चालणार .
अनादी काळापासून स्त्री ही शोषित आहे .मग ती रामायण महाभारतातील राजकन्या असो किंवा पट्टराणी ,तिच्या नशिबी कायम हाल अपेष्टा अन अवहेलना च आलेली आहे .स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून आजही तिच्याकडे पाहिले जाते .तिला काय कळतं अस म्हणून कायम तिला डावलल जातं. तिचा पदोपदी अपमान केला जातो .प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते अस म्हणलं जात मात्र हाच पुरुष एखाद्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभा असलेला अभावानेच जाणवतो किंवा दिसतो .हे अस का होतं याच उत्तर माहीत असूनही कोणीच पुढे येऊन देत नाही .
एखादी स्त्री सुंदर असेल,चांगलं रहात असेल ,व्यवस्थित बोलत असेल,तिच्या कामातून वेळ काढून जर सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असेल तर लगेच तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात .विशेष म्हणजे यात महिलांचाच मोठा सहभाग असतो .स्त्रियांना ईश्वरानेच सुंदर रूप दिलं आहे,ते सांभाळण्यासाठी ती जर प्रयत्न करत असेल,जगाच्या राहटगाडग्यात ती जर खंबीरपणे उभे राहून आपलं अस्तित्व सिद्ध करत असेल तर इतरांना अडचण असण्याच काहीच कारण नाही .पण समाजाला ते मान्य नसतं .अशी स्त्री लगेच बाहेरख्याली आहे,तीच कुणासोबत तरी लफडं आहे अस म्हणून तिला बदनाम केलं जातं .खरंतर स्त्री च रूप हे तिच्यासाठी एक वरदान आहे मात्र सुंदर स्त्रीबद्दल जेव्हा तिच्याच सारख्या स्त्रिया नको ती चर्चा करतात तेव्हा हेच सौंदर्य अभिशाप ठरतं .
आज भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात एकीकडे प्रतिभा पाटील,सोनिया गांधी,सुमित्रा महाजन अशा एक ना अनेक स्त्रिया आपलं अस्तित्व सिद्ध करत असताना दुसरीकडे स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जाण्याची अनेक उदाहरणे आपल्या आसपास दिसतात .महिलांच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या वाट्याला देखील समाजाकडून उपेक्षाच आली मात्र त्यांनी त्याला न जुमानता आपलं कार्य सुरू ठेवलं, ज्यामुळे आज महिला,मुली ताठ मानेने शिकत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत .
स्त्री भ्रूण हत्येचा विषय असो की हुंडाबळी अथवा मानसिक,शारीरिक छळाचा विषय असो,नीट अभ्यास केल्यास लक्षात येतं की या सगळ्या ठिकाणी एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीवर अन्याय करण्यासाठी पुढे असते .सासू सुनेचा छळ करते,मुलगी नको म्हणून तिच्यावर अन्याय अत्याचार केले जातात .हुंड्यासाठी सुनेचा छळ करणारी देखील एक स्त्रीच असते ,अठरा वीस वर्षे आपल्या घरात,आपल्या नजरेखाली वाढवलेल्या मुलीला सासरी पाठवल्यावर तिच्या संसारात लुडबुड करणारी आई देखील एक स्त्रीच असते,एवढच नव्हे तर बहुतांश वेश्या वस्त्या असोत की कुंटणखाने या ठिकाणी एक स्त्रीच पुढाकार घेताना दिसते .हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर मन विषण्ण होतं .
एक स्त्रीच दुसरीचा दुस्वास कसा करू शकते हा न सुटणारा प्रश्न आहे .तस पाहायला गेलं तर स्त्रीने ठरवलं तर ती होत्याच नव्हतं अन नव्हत्याच होतं करू शकते .ती सरस्वती आहे,अंबा आहे,तशीच ती दुर्गा देखील आहे .ती देघरातला नंदादीप आहे,मात्र तिच्यातील शक्ती ला व्यासपीठ मिळत नाही अन मिळालं तर तिथंही दुसरी कोणीतरी स्त्रीच तिला आडवी येते .हा सगळा प्रकार थांबला तर स्त्री ही नवदुर्गा होऊ शकते .याचा अर्थ स्त्रियांच्या या अवस्थेला पुरुष जबाबदार नाहीत असा होत नाही .स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे हा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे .प्रत्येक स्त्री ही स्वतंत्र आहे, तिला तीच अस्तित्व आहे हे पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे .रस्त्याने चालताना असो की एखाद्या सभा समारंभात असो,स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजेच .स्त्रीच शरीर म्हणजे पुरुषांचा हक्क आणि त्यांची वासना शमविण्यासाठी च स्त्रीचा जन्म आहे ही मानसिकता बदलली पाहिजे .
आपली आई,बहीण,बायको यांच्यानंतर प्रत्येक स्त्री ही आपल्या वासना शमविण्यासाठी आहे अस पुरुष जोपर्यंत मानतात तोपर्यंत स्त्री ही सबला होऊच शकत नाही .
आजही एकीकडे मोठं मोठ्या पदावर स्त्रिया यशोशिखर पादाक्रांत करीत असताना शेतात राबणारी,कचरा वेचणारी, भांडे धुणे करणारी स्त्री कायम उपेक्षित च राहिलेली दिसते .हे कुठंतरी थांबल पाहिजे .जी स्त्री नऊ महिने आपल्या पोटात गर्भाला वाढवते,वर्ष दोन वर्षे आपल्या छातीशी कवटाळून स्तनपान करून मुलाला ,मुलीला वाढवते,पोसते त्याच स्त्रीच्या बाबत आपण इतका राक्षसी विचार कसा करू शकतो याच आत्मपरीक्षण प्रत्येक पुरुषाने करण्याची गरज आहे .
पुरुषाने नोकरी करायची,चार पैसे कमवायचे अन स्त्रीने चूल अन मूल सांभाळायचं ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे .स्त्री ही उपभोगाची नव्हे तर उपयोगाची वस्तू आहे,तिला सोबत घेतल्यास जग जिंकता येतं हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं .देशात आज वाढते बलात्कार, अत्याचार अन्याय पाहिल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो की खरच आपण स्त्री ला माता मानतो का .कथा असो की कादंबरी किंवा सिनेमा, नाटक या ठिकाणी स्त्री ही शोषित ,पीडित दाखवली जाते .हे कुठंतरी थांबल पाहिजे .महिला दिन आहे म्हणून एक दिवस स्त्रीचा सन्मान करायचा,तिच्याबद्दल चांगलं चांगलं बोलायचं,लिहायचं,तिचा गौरव करायचा अन नंतर मात्र तिच्यावर सातत्याने अन्याय अत्याचार करायचे हे योग्य नाही .
कोणतीही स्त्री ही स्वखुशीने वेश्या व्यवसाय किंवा व्यभिचार करत नाही किंबहुना तिला या दलदलीतून बाहेरच पडायचं असतं, मात्र समाजाचे ठेकेदार,पुरुष मंडळी तिला या दलदलीत घट्ट रोवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत .झोपडीत राहणारी असो की राजमहालात राहणारी असो कोणत्याही स्त्री चा सगळ्यात मोठा दागिना तिची इभ्रत असते ,त्यासाठी ती प्रसंगी आपला जीव देखील द्यायला तयार असते मग तीच स्त्री या अशा कामात कशी खुश असू शकेल .याचा विचार झालाच पाहिजे .
अलीकडच्या काळात वाढते अत्याचार,अन्याय यावर बोलताना बहुतांश वेळा महिला,मुलींच्या पेहरावाबद्दल आक्षेप घेतला जातो .कदाचित तो योग्यही असेल पण उघड नागड फिरायचा ठेका काय फक्त पुरुषांनाच आहे का याचा विचार का केला जात नाही .स्त्री ने आपला पदर सांभाळावा अस म्हटलं जातं .मुली जीन्स,टॉप,वनपीस,टू पीस घालतात त्यामुळे पुरुषांची मानसिकता बिघडते अस सांगून सर्रास या अशा नराधम लोकांच्या समर्थनार्थ बोललं जातं.मग हेच जर आपल्या आई,बहिणीबद्दल किंवा बायको बद्दल कोणी बोललं तर मात्र आमचा इगो जागा होतो ,हे अस का होत याचाही विचार व्हायला हवा .स्त्रियांनी राहणीमान बदलले आहे कारण ती आजची गरज आहे,त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे,पण तस न करता कोणीही उठतो अन स्त्रीच्या राहणीमानाबद्दल टिकटिपनी सुरू करतो .हे करताना आपण विसरतो की आपण काय पेहराव करतो,आपली मानसिकता काय आहे याचा आपल्याला का विसर पडतो .
एक मुलगा शिकला तर एक कुटुंब सुधारू शकतं पण एक स्त्री शिकली तर एक पिढि सुधारते हे आपण केवळ भाषणापूरत का लिमिटेड करून ठेवतो .
आज अस कोणतं क्षेत्र आहे ज्यात महिला,मुली या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत नाहीत .राजकारण असो की समाजकारण ,विज्ञान असो की तंत्रज्ञान, व्यवसाय असो की उद्योग या प्रत्येक क्षेत्रात मुली,महिला बरोबरीने नव्हे काकणभर पुढेच आहेत .तरीदेखील स्त्री ही अबला आहे,तिला काही कळत नाही,ती भित्री भागूबाई आहे अस म्हणून तिला हिनवल जातं, हे चूक आहे .स्त्री ही घराचा आधार असते,स्त्री ही समाजाला शिस्त लावणारी हेडमास्तर असते,स्त्री ही समाजाचा आरसा असते त्यामुळं ती स्त्री जर अबला असेल तर समाज सुदृढ आणि सक्षम कसा होऊ शकेल .या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास निश्चितपणे स्त्री ही दीन न राहता सक्षम,खम्बीर ,धाडसी होऊ शकेल यात शंका नाही .
स्त्री ही एक प्रॉडक्ट् नसून ती प्रोडक्टिव्ह आहे,ती नवनिर्मितीचा स्रोत आहे, तिच्या पोटातून मनुष्याची निर्मिती होते याचा विसर अलीकडच्या काळात पडल्याने स्त्री चा जागोजागी अवमान होत असल्याचं चित्र आहे .स्त्री फक्त शोषणासाठीच असते ही भावना वाढीस लागल्याने ती पोषण देखील करू शकते हे समाज विसरत चालला आहे .स्त्रीच शरीर हे कमनीय बांधा नसून सहनशक्तीच आगार आहे हे कायम लक्षात ठेवायला हवे .तरच खऱ्या अर्थाने स्त्रीचा मान,सन्मान राखला जाईल अन ती समाजाला पुढे घेऊन जाईल .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड .
9422744404 .


1 टिप्पणी:
छान लिहीलंय बाळासाहेब👌👌💐💐
टिप्पणी पोस्ट करा