शनिवार, १४ डिसेंबर, २०१९

एक पत्र पंकजा मुंडेंना ...............!


राज्याच्या फायरब्रँड नेत्या पंकजा मुंडे,स.न.वि.वी.

विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून आपल्याशी संवाद साधायचा होता,मात्र योग्य वेळ साधली जात नव्हती .सोशल मीडियाच्या जमान्यात मी आपणास अनावृत्त पत्र लिहीत असल्याबद्दल आपणास देखील आश्चर्य वाटेल,मात्र पत्रावरील मजकूर डिलीट करता येत नाही अन ते पत्र कायम जपून ठेवता येतं त्यामुळे हा पत्रप्रपंच .
लोकसभा निवडणुकीत आपण ज्या पद्धतीने आपल्या बहिणीसाठी मेहनत घेतली आणि दिड लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवले त्यानंतर आपला विधानसभा निवडणुकीत कोणी पराभव करू शकेल अशी शंका देखील येणे शक्य नव्हते .मात्र खरं सांगू का लोकसभा निवडणुकीत जे मताधिक्य मिळाले ना कदाचित त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि आपण स्वतः काहीशा जास्तच हवेत गेलात असं आता वाटू लागलं आहे .तुम्ही म्हणाल पराभव झाल्यावर हजारो कारणं अन चुका यावर उपदेश केले जातात,अस केलं असत तर बरं झालं असतं, तस का केलं नाही,आम्ही सांगत होतो पण आमचं ऐकलं नाही,कार्यकर्त्यांना किंमत नव्हती ना कोणाचा पायपोस कोणाला होता अस .मात्र मला यातलं काहीही म्हणायचं नाही कारण विजयाचे हजारो बाप असतात पराभवाला कोणी वाली नसतो असच काहीस आपल्या बाबतीत झालं आहे .
2009 मध्ये तुम्ही पहिल्यांदा निवडून आलात मात्र आपलं कर्तृत्व दाखवण्याची संधी आपल्याला 2014 मध्ये मिळाली .दुसरी टर्म असताना देखील आपल्याला थेट कॅबिनेट मंत्रिपद दिलं गेलं कारण आपल्या माग वारसा होता गोपीनाथ मुंडे यांचा .नाहीतर चार चार टर्म आमदार असणारे अनेक आहेत आपल्या पक्षात पण त्यांना बाजूला ठेवून आपल्या पक्षानं आपल्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली .आपण त्यासाठी सक्षम नव्हता अस नाही मात्र आपल्यातील सर्व गुणांसोबतच गोपीनाथ मुंडे हे नाव आपल्या मागे असल्याने आपला मंत्रिमंडळात समावेश झाला .ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याच स्व मुंडे यांच स्वप्न घेवून आपण देखील ग्रामविकासची जबाबदारी स्वीकारली .वास्तविक आपल्याला गृह विभाग अधिक आवडला असता मात्र आपण मिळेल त्याच सोनं करायचं म्हणून जबाबदारी घेतली .
गेल्या पाच वर्षात आपण राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो की जलयुक्त शिवार अभियान अथवा 25 /15 किंवा बचतगट चळवळ या माध्यमातून मोठं कार्य उभा केलं .पण हे राज्यभर करताना आपलं आपल्या होमपीचकडं कमालीच दुर्लक्ष झाल .राज्यात आपल्या नावाचा डंका वाजत असताना परळीत मात्र आपली पकड ढिली होत चालली होती .
ग्रामपंचायत पासून ते नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्वच निवडणुकीत आपल्या पक्षाला जोरदार धक्के बसत होते .हे छोटे छोटे धक्के म्हणजे भविष्यातील आपल्यासाठी होणाऱ्या मोठ्या भूकंपाची चेतावणी होती .मात्र आपला किल्ला अभेद्य आहे अशा छोट्या धक्यांनी त्याला तडे जातील पण किल्ला शाबूत राहील असा आपला होरा होता,पण आपला अंदाज खोटा ठरला अन आपला किल्ला पुरता जमीनदोस्त झाला .
या भूकंपाचे धक्के बीड,आष्टी,माजलगाव या ठिकाणी देखील बसले अन पाच वरून भाजपचे संख्याबळ थेट 2 वर आले .
आपला पराभव का झाला,काय कारण आहेत,काय करायला पाहिजे होतं, काय चुकलं,कोणाचं चुकलं यावर मला येथे फार लिहायचं नाही कारण पराभवाची कारणमीमांसा करायला आपण सक्षम आहात .एक मात्र नक्की की हा पराभव झाला तरी आपल्याला त्यात भाजप,स्वतः तुम्ही,कार्यकर्ते यांचा फारसा दोष नसल्याचं वाटत नाही हे म्हणजे जरा जास्तच होतंय .पराभव हा पराभव असतो त्यासाठी दोन दोन महिने लोकांपासून दूर राहायचं नसतं पण हे तुम्हाला कोण सांगणार,कारण तुम्ही फटकळ .कोणी सांगायला गेलं तर त्याला काय बोलताल याचा नेम नाही असं आपल्याबद्दल आजही वाटतं.त्यामुळं आपल्या जवळच्या म्हणणाऱ्या कोणीच यावर आपल्यासोबत चर्चा केली नसावी अस प्रकर्षाने जाणवलं .कारण याची जाणीव आपल्याला करून दिली  असती तर आपण आपल्या बाबांच्या कार्यक्रमात जे व्यक्त झालात ते कदाचित बोलला नसतात .याचा अर्थ आपण जे बोलला ते सगळंच चूक होत का तर नाही ,पण त्यात कुठेतरी मी पणाचा दर्प जास्त जाणवत होता .तुमचा पराभव हा परळीच्या जनतेसाठी तर सोडाच पण राज्यातील तुमच्या समर्थकांसाठी
देखील धक्कादायक होता .पण म्हणून तुम्ही त्याच खापर लोकांवर फोडून मोकळं व्हायचं अस होत नाही .किंवा समोरच्या व्यक्तीचा विजय खुजा होत नाही .
राजकारण असो की युद्ध,हारजित होतच असते मात्र ती जास्तकाळ मनाला लावून घ्यायची नसते,आपण गोपीनाथ मुंडे यांच्या पोटी जन्मलात त्यामुळे राजकारणाचं बाळकडू आईच्या पोटातूनच आपल्याला मिळालं यात शंका नाही,पण आपली अवस्था महाभारतामधील अभिमन्यू सारखी झाली,चक्रव्यूहात आपण यशस्वीपणे शिरलात पण बाहेर पडताना आपल्याला मार्गच सापडला नाही अन आपला पराभव झाला,हा पराभव आपल्याला स्वीकारावा लागला अस मी म्हणणार नाही कारण आपण तो अजून मनापासून स्वीकारलेला नाही हे वारंवार दिसून येत .कारण वरवर जरी आपण पराभव झाल्याचं स्वीकारलं अस सांगत असलात तरी मनाच्या एका कोपऱ्यात कुठंतरी आजही मान्य होत नाही हे सत्य आहे अन ते नाकारता येणार नाही .
ज्या गोपीनाथ मुंडे यांनी आपली हयात भाजपसाठी खर्ची घातली त्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारे देण्याएव्हढा हा विषय मोठा नव्हता .पक्षाची काही धोरणे,निर्णय चुकले असतीलच पण त्याची अशाप्रकारे जाहीर सभांमधून चर्चा होणे अपेक्षित नाही .राजकारणातील आपले वयोमान उणेपूरे दहा वर्षाचे आहे,त्यात पाच वर्षे आपली बाबांच्या सानिध्यात गेली अन पाच वर्षे मंत्रिपदाची झुल घेऊन वावरण्यात गेली .त्यामुळे आपण चाळीस पन्नास वर्षे लोकांसाठी झटत आहात अन आपला त्याच लोकांनी पराभव केला अस काही झालेलं नाही .पराभव विसरून आपण कामाला लागणं अपेक्षित होत मात्र आपण हट्ट करून बसलात अन लोकांना दोष देत त्यांच्याकडे पाठ फिरवलीत .
तीस हजार लोकांनी आपल्याला मतदान न केल्यानं आपण पराभूत झालात मात्र 92 हजार लोकांनी आपल्याला मतदान केलं हे आपण का विसरता आहात .त्यांचा काय दोष मात्र तुम्ही सगळ्यांनाच वाऱ्यावर सोडून दोन महिने लांब राहिलात .निवडणूक प्रचारात झालेल्या आरोपांमुळे व्यथित होत आपण राजकारणातून मुक्त होण्याची भाषा केली मात्र हा विषय आता काढून उपयोग नाही .मुक्त होता येईल एवढं हे क्षेत्र आता पवित्र राहिलेलं नाही .गंदा है पर धंदा है अशी म्हण आहे काहीस राजकारणाबाबत असच म्हणावं लागेल .तुम्ही कितीही ठरवलं तरी लोक तुमच्याकडे येतच असतात अन अपेक्षा ठेवतच असतात .त्या पूर्ण करण्याच काम आपल्याला करावंच लागतं त्याऐवजी त्रागा करून जमत नसतं .पण हे तुम्हाला कोण सांगणार ?
गेल्या पाच वर्षात तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की परळी मतदारसंघ म्हणून तुम्ही कितीवेळ लोकांना दिला,मला माहित आहे एक महिला म्हणून तुम्हाला काही बंधन आहेत पण परळीतील लग्नकार्य,सुख दुःख,लोकांच्या अडचणी यामध्ये आपण प्रत्यक्ष कितीवेळा धावू  गेलात,आता तुम्ही म्हणाल की विरोधक काय रोजच लोकांचे दार झाडत होते का,तर नक्कीच नाही पण विरोधक काय करतात यापेक्षा आपल्याला काय करता येईल यावर लक्ष दिले तर जास्त सोयीचं होत अन नेमकं इथंच आपलं गणित बिघडलं .
'मेरी कमीज से तेरी कमीज सफेद कैसी 'या प्रयत्नात आपण आपल्याकडे अन आपल्या माणसांकडे दुर्लक्ष करीत गेलो .आजही दोन महिन्यांनी आपण परळीत आलात त्यानंतर किती लोकांना आपण भेटलात,त्यांच्या अडचणी समजून घेतल्यात किंवा दोन महिन्यात आपल्या मागेपुढे फिरणाऱ्या पदाधिकारी असोत की कार्यकर्ते यांनी लोकांना विचारलं आहे .आपण आलात की आपल्या गाडीच्या मागेपुढे करायचे अन आपलं हेलिकॉप्टर उडाल की अंबाजोगाई,लातूर,पुणे ,औरंगाबाद कडे निघायचं हा आपल्या जवळच्या लोकांचा नित्यक्रम आहे .हे आपल्याला देखील माहीत नाही अस नाही पण आपण त्याकडे दुर्लक्ष केलं अन बगलबच्यानी  देखील सामान्य लोकांकडे दुर्लक्ष केलं .
आपण हजारो कोटी रुपये आणले अन विकास केला मात्र कम्युनिकेशन गॅप भरून काढता आला नाही .आजही आपण केलेलं काम ठासून लोकांना सांगण्यासारखे कार्यकर्ते,ब्लॉक लेव्हल चे लीडर,तालुका,जिल्हा पातळीवरील नेते आपल्याकडे नाहीत.आहेत ते सगळे खुसमस्करे अन तोंडपूजे आहेत .कुठेही जा तेच दहा पाच लोक आपल्या भोवती असणार किंवा दिसणार .सामान्य कार्यकर्ता,माणूस आपल्या गाडीत कधी बसला का हो,सामान्य माणूस आपल्याला कधी थेट भेटला का हो .नक्कीच नाही कारण आपल्या बाजूला जमा झालेली ही बडव्यांची जत्रा .हो हो बडव्यांची जत्रा,आजही लोक तुम्ही रस्त्याने जाताना दिसलात तर स्व गोपीनाथ मुंडे दिसल्याचा भास होऊन हात जोडतात,पण तुम्हाला ते दिसत नाही किंवा दिसू दिलं जात नाही .त्यामुळेच तुमचा जनसंपर्क कमी झाला अन पराभव पदरी पडला .
गेल्या दहा बारा दिवसापासून म्हणजे 1 डिसेंबर पासून तुम्ही अस्वस्थ आहात अस चित्र दिसून आलं,ते मीडियाने रंगवल अस आपण आज म्हणत असलात तरी मीडिया बातम्या करत असताना आपणही कुठेच स्पष्ट भूमिका घेतली नाही .
आपण सस्पेन्स कायम ठेवला अन शेवटी काय केलं तर "खाया पिया कुछ नही गिलास तोडा बारा आणा "अस झालं .एवढा सगळा द्रामा करण्याची काहीच गरज नव्हती .स्व मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त तुम्ही थेट पक्षाला आव्हान देण्याऐवजी किंवा माझ्या बापाचा पक्ष आहे अस सांगण्याऐवजी मी माझ्या पराभवावर मंथन करण्यासाठी काही वेळ घेणार आहे,मला माझ्या लोकांशी त्यांच्या घरात जाऊन बोलायचं आहे,त्यांची सुख दुःख जाणून घ्यायची आहेत,त्यांच्या अडचणी सोडवायच्या आहेत,मी पाच वर्षात त्यांना वेळ देऊ शकले नाही मात्र आता जी संधी मिळाली आहे तीच मी सोनं करणार आहे,त्यामुळे मी पुढची दोन तीन वर्षे मुंबई,पुण्याला न फिरता अन राहता मुक्काम पोस्ट यशश्री निवास,शिवाजी चौक परळी येथेच राहणार आहे अस म्हटलं असत तर ते लोकांना अन पक्षाच्या नेत्यांना अधिक रुचल अन भावलं असतं .
पण तुमचं कसं आहे ना की तुमच्या इगोला कोणी डिवचल की तुम्ही अस्वस्थ होतात अन मग त्या सिंघम मधील जयकांत शिक्रे सारख करून बसतात .तुम्ही त्या दिवशी थेट पक्ष ,संघ,मतदार या सगळ्यांनाच आव्हान दिलंत, मान्य आहे तुम्ही पाच वर्षांपूर्वी मोठा संघर्ष केलात, आपल्या बाबांनी सुद्धा संघर्ष केला मात्र म्हणून पक्ष आपली जहागिरी होत नाही .दीडशे वर्षाची परंपरा असणारा काँग्रेस असो की दहा बारा वर्षांपूर्वीचा मनसे अथवा आप ,हे सगळे पक्ष कोणी ना कोणी स्थापन केले,अनेकांनी ते वाढवण्यासाठी योगदान अन बलिदान दिलं .म्हणून पक्ष त्यांच्या बापाचा होत नाही .
पक्ष हा लोकांचा असतो नेते किंवा आमदार खासदार हे त्याचे फारतर ट्रस्टी असू शकतात,पण त्या ट्रस्टीनी जर पक्ष बळकवण्याची
भाषा सुरू केली तर ते नेतृत्वाला न शोभणार आहे .तुम्ही जिल्ह्यात पक्षवाढीसाठी किती योगदान दिले किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांनी किती गाव,वाडी,वस्तीवर पक्षाच्या शाखा काढल्या यावर चिंतन करण्याची हीच वेळ आहे मात्र अशावेळी आपण जर पक्षालाच आत्मचिंतन करण्याचा सल्ला देत असाल तर भविष्य अवघड आहे .
तुम्ही नाराज नाहीत हे जरी म्हणत असलात तरी तुमची नाराजी लपून राहिलेली नाही,आपल्याला आणखी मोठ्या संधी मिळू शकतात मात्र त्यासाठी संयम महत्वाचा आहे,यशस्वी राजकारणी हा संयमी असावा लागतो तरच अपेक्षित फळ मिळते हे नक्की .तुम्हाला शून्यापासून सुरवात करायची आहे हे चांगलं आहे मात्र हे करताना समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेण्याची क्षमता ठेवा तरच आपण लांबचा  पल्ला गाठू शकाल .
फार जास्त आणि सविस्तर लिहिलं असलं तरी आपण मजकुरातील भावना समजून घ्याल ही अपेक्षा आहे .शेवटी आपण सुज्ञ आहात अन मोठा पल्ला गाठायचा आहे हे लक्षात ठेवाल असा विश्वास आहे .काही खटकलं असल्यास निश्चित पणे सांगा कारण पत्र लिहिताना कमीजास्त होऊ शकतं .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

डाऊन टू अर्थ ..............!

डाऊन टू अर्थ .................!

राजकारण असो की युद्ध एक नियम पाळावाच लागतो नव्हे पाळायलाच हवा अन तो म्हणजे समोरच्याला कधी अंडर इस्टिमेट करू नका अन ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नका,नेमकं बीड असो की आष्टी अथवा परळी,तिन्ही ठिकाणी हेच झालं .आपला प्रतिस्पर्धी हा ताकदवान आहे किंवा टक्कर देऊ शकतो याकडे दुर्लक्ष करून आपणच किती बलाढ्य आहोत हे बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला .अन त्याची परिनिती धक्कादायक पराभवात झाली .या तिन्ही निकालाकडे पाहिल्यास विजयी झालेल्यांची मेहनत जेवढी आहे त्यापेक्षा जास्त पराभूत उमेदवारांचा ओव्हरकॉन्फिडन्स महत्वाचा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .

2019 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले अन भाजप शिवसेनेच्या नेत्यांचे हात स्वर्गाला टेकले .आता महाराष्ट्र एकहाती सत्ता देणार या अभिनिवेषात हे सगळे नेते हवेत राहिले .
पन्नास वर्षापेक्षा जास्त काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणाची नस ना नस माहीत असणारा शरद पवार नावाचा माणूस समोर आहे याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला अन धक्कादायक निकाल हाती आले .
बीड जिल्ह्याचा विचार केला तर हा जिल्हा स्व गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो .राज्यात सत्ता कोणाचीही असो जिल्ह्यात मुंडे म्हणतील अन ठरवतील तोच आमदार खासदार होणार हे ठरलेले होते .मात्र मुंडेंच्या माघारी त्यांचा करिष्मा कायम ठेवण्यात फारसे यश आले नाही .2014 ला भाजपचे पाच आमदार विजयी झाले मात्र पाच वर्षात हे यश कायम टिकवण्यात नेतृत्वाला अपयश आले .स्वतःसोबतच चार जागा महायुतीच्या पंकजा मुंडे यांनी गमावल्या .
राज्यात ज्या दोन लढतीकडे राजकीय धुरीणांचे लक्ष होते त्या म्हणजे बीड आणि परळी.आणि या दोन्ही ठिकाणचे जे निकाल लागले ते सर्वांना धक्का देणारे होते .या निकालांचा अन्वयार्थ लावायचा म्हणल्यास एकच वाक्य पुरेसे आहे आणि ते म्हणजे ओव्हरकॉन्फिडन्स आणि ओव्हरकॉन्फिडन्स .
पंकजा मुंडे यांना ओव्हरकॉन्फिडन्स होता की नाही माहीत नाही पण त्यांनी ग्राउंड रियालिटी अन ग्राउंड रिपोर्टकडे सपशेल दुर्लक्ष केले .धनंजय मुंडे हे चार वर्षांपासून परळीत नेटवर्क लावण्यात व्यस्त होते तर पंकजा मुंडे मात्र  लोकांपर्यंत पोहचण्यात कमी पडत होत्या .लोकसंपर्क हा राजकीय नेत्यांचा कमालीचा महत्वाचा गुण आहे याचा विसर त्यांना पडला असावा अन धनंजय यांनी मात्र दांडगा लोकसंपर्क ठेवण्यात यश मिळवले .त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला अन धनंजय यांनी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या लढतीत सहज अन मोठा विजय मिळवला .निवडणूक कोणतीही असो तुमचं होमवर्क व्यवस्थित पाहिजे हा वस्तुपाठच या निमित्तानं धनंजय मुंडे यांनी घालून दिला .पंकजा मुंडे या राज्यभर प्रचार करीत असताना धनंजय यांनी मात्र ग्राउंड पक्के करून राज्यात प्रचार केला,कुठेही प्रचार केला तरी त्यांचे परळीतील घटना घडामोडींवर बारीक लक्ष होत,दुसरीकडं पंकजा मुंडे या देखील लक्ष ठेवून होत्या मात्र यंत्रणा ज्यांच्याकडे होती ते सगळे ताई आल्यावर पुढे पुढे करणारे खुसमस्करे जमा झाल्याने त्यांचा ग्राउंडशी संपर्कच राहिला नाही .याचा व्हायचा तोच परिणाम झाला अन जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा वेळ निघून गेलेली होती .

बीडच्या बाबतीत सुद्धा हेच झाले,चार वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी खाली काय चालले आहे याकडे  लक्षच दिले नाही .अन सेनेत जाऊन मंत्रिपद मिळवल्यानंतर देखील त्यांचा बहुतांश वेळा हा मुंबईतच गेला,त्या काळात म्हणजे लोकसभा निकालानंतर संदिप ने मात्र डोअर टू डोअर जात लोकांशी थेट संपर्क वाढवला,दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर हे मात्र मुंबई,औरंगाबाद आणि कधी कधी पर्यटनाला आल्यासारखे ते बीडला धावती भेट द्यायचे .नगर पालिका असो की पंचायत समिती अथवा इतर संस्था यामध्ये नेमकं काय सुरू आहे,लोकांची भावना काय आहे,जनभावना काय म्हणते आहे ,याचा कधी त्यांनी विचारच केला नाही .जयदत्त क्षीरसागर यांना ठराविक लोकांनी घेरल्यामुळे लोकांशी असलेली नाळ तुटली अन दुसऱ्या फळीतील नेत्यांनी बिडकरांना गृहीत धरले .अमका एरिया आपलंच आहे,हा समाज आपल्याशिवाय जाऊच शकत नाही,व्यापाऱ्याच्या महत्वाच्या लोकांना सांगितले की सगळे सोबत येतात,शहरात जरी असुविधा असली तरी एका रात्रीत रोड करू अन मत मिळवू,बाहेरून आणलेले मतदार आपलेच आहेत,ग्रामीण भाग आपल्या पाठीशी आहे या आणि अशा सगळ्या भ्रमात जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे सहकारी राहिले .
गेल्या चार वर्षात विकासाच्या नावाखाली बीड शहराचे जे वाटोळे झाले आहे ते लोकांना खटकत होते पण समोर बोलून का दुश्मनी घ्यायची असा विचार लोकांनी केला .प्रभाग अकरा मधून ट्रेलर देखील दाखवला मात्र मोठ्या क्षीरसागर यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं किंवा सब कुछ अलबेल है असा भास त्यांच्या समोर निर्माण केला गेला .नगर पालिकेसारखी संस्था ताब्यात असल्यावर होत्याच नव्हतं होत हे बीडमध्ये दिसलं तर तीच नगरपालिका नव्हत्याच होत करू शकते हे परलीमध्ये स्पष्टपणे जाणवलं .दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांनी मात्र गढूळ पाण्याचा होणारा पुरवठा,रस्त्याची अर्धवट कामे,शहरातील तुंबलेल्या गटारी,नगर पालिकेचा बोगस अन भ्रष्ट कारभार हे विषय घेऊन थेट लोकांच्या घरात पोहचले अन इथं त्यांन लोकांच्या काळजाला हात घातला .तीस वर्षांपासून ताब्यात असणार शहर नेहमीच का मायनस जात याचा अभ्यास कदाचित सत्ताधारी करीत नसावेत अन त्यांचे कच्चे दुवे संदीपने हेरले असावेत त्यामुळे दहा हजारापेक्षा जास्त मताधिक्य संदीप ला शहरातून मिळालं .त्याचा डोअर तू डोअर प्रचार,संदीप म्हणजे आपण आमदार अस समजून जीवाच रान करणारी टीम ,हात दाखवा अन गाडी थांबवा ही इमेज ह्यामुळे संदीप महिला असोत की तरुण अथवा विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये लोकप्रिय झाला अन मोठया क्षीरसागर यांनी त्याला चिल्लर समजले अन स्वतःच्या पायावर धोंडा पडून घेतला .क्षीरसागर यांच्या पराभवाला धाकल्या क्षीरसागर यांचा कारभार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे मात्र विरोधकांच्या कच्या दुव्याच संधी समजून सोन करण्याचं जे काम संदीप ने केलं ते कौतुकास्पद आहे .भलेभले दिग्गज अन राजकीय पंडित जयदत्त क्षीरसागर यांच्या विजयाची खात्री देत होते मात्र संदीपसोबत असलेली टिम, प्रचंड इच्छाशक्ती,नेटके नियोजन,दांडगा जनसंपर्क, शेवटच्या क्षणापर्यंत विजय आपलंच आहे हा विश्वास यामुळे थोरल्या क्षीरसागर यांचा बुरुज ढासळला.

बीड परळी सारख आष्टी मध्ये देखील विद्यमान आमदार भीमराव धोंडे हे बिनधास्त राहिले,लोकसभेत मिळालेली 70 हजाराची लीड तुटली तरी अर्ध्यावर येईल मात्र समोरचा पहिलवान पक्का नाही त्यामुळे ते खुशालचेंडू सारखे वागले आणि नेमकं इथंच त्यांचा घात झाला .आता कटप्पा कोण अन बाहुबली कोण या चर्चा करण्यात काही मतलब नाही .धोंडे हे लोकांना भेटत नाहीत,सहा वाजताच त्यांच्या घराची दार बंद होतात,अनेक गावांत ते गेलेच नाहीत,लोकांचे फोन घेत नाहीत,ठेविले अनंते तैसेचि रहावे अस वागतात या त्यांच्या बद्दलच्या चर्चा मतदारांनी खऱ्या करून दाखवल्या अन ते उमेदवारी नको नको म्हणणाऱ्या बाळासाहेब आजबे सारख्या उमेदवाराकडून सपाटून पडले .इथदेखील धोंडे यांचा जनसंपर्क कमी पडला हे विशेष,शेवटपर्यंत ते लोकांमध्ये मिसळले नाहीत ही वस्तुस्थिती आहे अन त्यामुळेच त्यांचा पराभव झाला .
एकूणच बीड जिल्ह्याचा विचार केला तर गेवराई असो कि परळी अथवा बीड या सर्वच ठिकाणी शहराने ज्यांच्या पारड्यात माप टाकले त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे,आणि यावरून तुम्ही लोकांच्या अडीअडचणीच्या काळात किती धावून जातात यावर तुमच्या जय पराजयाच गणित अवलंबून असते हे नक्की .ज्यांचा विजय झाला ते बहुतांश लोकप्रतिनिधी हे डाऊन टू अर्थ अशा पद्धतिने वागणारे होते हे नाकारून चालणार नाही .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड,9422744404

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

चुनौती बडी लेकीन नामुमकीन नही .........!




पंकजा मुंडे अडचणीत आहेत का ?पंकजा मुंडेंना भीती वाटते का ?पंकजांसमोर धनंजय मुंडे यांचे आव्हान कितपत आहे ?या आणि अशा बातम्यांवर सध्या बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे .वास्तविक पाहता निवडणूक मग ती ग्रामपंचायत ची असो की विधानसभा, लोकसभा .प्रत्येकजण त्यात विजय मिळावा यासाठीच अहोरात्र मेहनत करत असतो .कोणतीही निवडणूक सोपी किंवा एकतर्फी कधीच नसते आणि ती तशी होऊ देखील नये .लोकशाही म्हणल्यावर त्यात आरोप प्रत्यारोप,एकमेकांच्या उकाळ्या पाकळ्या निघणारच .पण परळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे .असे असतानाही पंकजा मुंडे ज्या पद्धतीने राज्यात प्रचारसभा घेत फिरत आहेत ते पाहता त्या आपल्या मतदारसंघात मजबूत आहेत असच म्हणावं लागेल .
लोकसभा निवडणुकी नंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते .देशात मोदींचा करिष्मा चालल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे नेते बिनधास्त होते तर विरोधीपक्ष पुन्हा जमवाजमव करण्यात गुंतला होता .
एकीकडे भाजप शिवसेनेत होणारी इनकमिंग आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ला लागलेली गळती,अशा वातावरणात निकाल काय लागणार हे स्पष्ट होते .तरीदेखील शरद पवार यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली अन एकतर्फी वाटणारी ही निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे .
राज्यात ज्या काही महत्वपूर्ण लढती होत आहेत त्यात सर्वाधिक लक्षवेधी लढत आहे ती बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात .कारण येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे या बहीण भावात लढत होत आहे .
यापूर्वी देखील 2014 साली या दोघांमध्ये लढत झाली होती अन त्यात पंकजा यांनी भावाला चितपट केलं होतं .त्यानंतर झालेल्या नगर पालिका अन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत धनंजय यांनी विजय मिळवत विधानसभा निवडणुकीचा वचपा काढला होता .
मात्र गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले .पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे .गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे यांनी आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात देखील हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणला .गेल्या पंधरा वीस वर्षांत जी काम झाली नाहीत ती मागच्या पाच वर्षात झाली हे सत्य कोणी नाकारू शकत नाही,मात्र तरीदेखील प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय मुंडे यांनी यावेळी टाईट फिल्डिंग लावल्याने धक्कादायक निकाल लागतील की काय अशी चर्चा सुरू आहे .
पंकजा मुंडे या त्यांच्या स्पष्टवक्तेपणा मुळे अनेकवेळा मीडियामध्ये चर्चेत असतात,कोणत्याही मुद्यावरून विरोधक त्यांना अडचणीत आणायची एकही संधी सोडत नाहीत .या निवडणुकीत देखील पंकजा मुंडे या अडचणीत आहेत,त्यांच्यासमोर तगडे आव्हान धनंजय यांनी उभे केले आहे अशी चर्चा सुरू झाली .
गेल्या पाच वर्षात या दोन्ही बहीण भावांनी परळीच्या लोकांसाठी जे काही केले त्याचा लेखाजोखा मांडण्याची ही वेळ आहे ,मात्र नको ते आरोप करून,भावनिक राजकारणाचा आधार घेतला जात असल्याचे चित्र आहे .पंकजा मुंडे या अडचणीत आहेत,त्यांना निवडणुकीची भीती वाटते अशा वावड्या उठवल्या जात आहेत .
वस्तुस्थिती मात्र तशी नसल्याचे दिसते .
पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच परळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती .लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांनी 25 हजाराचे मताधिक्य घेत विधानसभा निवडणुकीत काय होणार हे दाखवून दिले होते .तब्बल 140 पेक्षा अधिक गावात 25 / 15 असो की मुख्यमंत्री ग्राम सडक योजना,अथवा जलयुक्त शिवार या माध्यमातून त्यांनी थेट लोकांच्या दारापर्यंत विकास नेला आहे,त्यामुळे त्यांच काम बोलत आहे .
लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आता त्यांच्यासाठी मागील दोन महिन्यांपासून प्रीतम मुंडे फिरत आहेत .पंकजा मुंडे यांच नेतृत्व राज्यव्यापी आहे,त्या गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मास लीडर म्हणून पुढे आल्या आहेत .लाखोंच्या सभा गाजवायच्या कशा याच बाळकडू बापाकडून मिळाल्याने त्या तयार झाल्या आहेत .त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सगळ्यात जास्त मागणी आहे ती पंकजा मुंडे यांना .
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूड मध्ये अडकून पडलेले असताना आणि भाजपचे इतर मंत्री आणि दिगग्ज नेते आपल्या मतदारसंघात तळ ठोकून असताना पंकजा मुंडे मात्र राज्यभर प्रचारसभा गाजवत फिरत आहेत .
अगदी राज्यात सभा गाजवणारे आणि हल्लाबोल असो की शिवस्वराज्य यात्रा या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडणारे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे देखील आपल्याच मतदारसंघात व्यस्त आहेत .
मला लोकांमध्ये गोपीनाथ मुंडे म्हणजे माझे बाबा दिसतात अस ठणकावून सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या पाठीशी राज्यभरातून जे जनसमर्थन उभे राहत आहे ते पाहिल्यानंतर त्यांना परळीची निवडणूक अवघड आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही .
ज्या नेत्याच्या ऐका हाकेवर सावरगाव सारख्या ठिकाणी लाखो लोक येतात,पक्षाचे प्रमुख अमित शहा येतात,दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याचं आणि त्यांच्या कामाच कौतुक करतात त्या नेत्याला परळीकर जनता धक्का देईल असे आज तरी चित्र दिसत नाही .फाईट तगडी आहे हे खरे आहे,कारण पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेच नव्हे तर अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत .कारण त्यांच्या पाठीशी असलेले जनसमर्थन आहे .अवघ्या पाच वर्षांच्या काळात वडील गेल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने लोकांचा विश्वास संपादन केला तो विरोधीपक्षाला तर सोडाच पण स्वपक्षीयांना देखील धडकी भरवणारा आहे हे स्पष्ट आहे .त्यामुळे त्यांना राज्यभर मिळणारे समर्थन रोखण्यासाठी प्रयत्न होत नसतील तर नवलच आहे .
तरीदेखील पंकजा मुंडे या ज्या पद्धतीने राज्यात प्रचारसभा गाजवत आहेत ते पाहिल्यानंतर ही पोरगी बापापेक्षा चार पावलं पुढं आहे असेच म्हणावे लागेल,कारण गोपीनाथ मुंडे हे दिवसभर राज्यात कुठेही प्रचाराला गेले तरी रात्री परळीत डेरेदाखल व्हायचे ,मात्र पंकजा मुंडे या ज्या पद्धतीने राज्यात बिनधास्त फिरत आहेत त्यावरून नक्कीच वाटते की त्यांना आपल्या मतदारसंघात काय होणार याची नक्कीच खात्री आहे .याला काही लोक कदाचित ओव्हरकॉन्फिडन्स देखील म्हणतील ,मात्र जे आहे ते स्पष्ट आहे की त्या राज्यभर फिरत आहेत अन त्यांच्या सभांना मागणी आणि गर्दी देखील होत आहे .
पंकजा मुंडे यांची सभा म्हणजे विजयाची मुहुर्तमेढ असेच समीकरण झाले आहे त्यामुळेच जिल्ह्यात तर सोडाच पण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ,खान्देश या भागातही त्यांच्या सभांची मागणी होत आहे .निवडणूक जाहीर झाल्यापासून पंकजा मुंडे या पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत आहेत .लोकांच्या मनातलं ओळखून त्यांना काय आवडत याचा त्यांना पक्का अंदाज आला आहे ,त्यामुळे त्यांच्या सभांना तुफान गर्दी होतानाचे चित्र दिसत आहे .
अस असलं तरी परळीवर देखील त्यांचं बारीक लक्ष आहे,निवडणूक म्हणजे एकप्रकारे युद्धच असते त्यात सगळ्याच गोष्टी थेट वार करून मिळवायच्या नसतात तर काही गोष्टी गनिमी कावा करून प्राप्त कराव्या लागतात हे त्यांनी नमिता मुंदडा यांच्या प्रवेशातुन दाखवून दिले तसेच टि पी मुंडे सारखा मोहरा सोबत घेत विरोधकांना जोरदार धक्का दिला . त्यामुळे परळीत जे काही व्हायचे ते 24 तारखेला समजेलच पण आज तरी या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात काटेकी टक्कर आहे हे वास्तव आहे पण शेवटी एवढंच म्हणावं वाटत की चुनौती बडी है लेकीन नामुमकीन नही !
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

तुझं ते हि माझंच ...........!

तुझं ते ही माझंच .........!

सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमारच्या एका चित्रपटातील एक प्रसंग जोरदारपणे चर्चेत आहे,यामध्ये अक्षयकुमार हा त्याच्या पार्टनर सोबत पैशाची वाटणी करताना दाखवला आहे,तसेच राऊडी राठोड मध्ये सुद्धा तो अशाच पद्धतीने वाटणी करताना दाखवला आहे,यामध्ये वाटणी समसमान झाल्याचा आणि पार्टनर खुश झाल्याचं दिसत,मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळंच असत,यात फायदा होतो तो अक्षयकुमार याचाच .हे आठवण्याच कारण म्हणजे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांमध्ये झालेलं जागांच वाटप होय .

माझं ते माझं अन तुझं ते ही माझं असा खेळ सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू असल्याचं दिसत आहे.भाजप आणि शिवसेनेच्या यादीवर नजर टाकली तर लक्षात येते की आपल्या पक्षाचे म्हणजे आपल्याला मानणारे लोक तर फडणवीस यांनी भाजपकडून दिलेच पण शिवसेनेच्या यादीत सुद्धा फडणवीस यांना माणणाऱ्यांचा भरणा आहे,एवढंच नाही तर जे मित्रपक्षाकडून उमेदवार म्हणून दिले आहेत ते देखील फडणवीस यांच्याच जवळचे आहेत .काँग्रेस,राष्ट्रवादीकडून ऐनवेळी उमेदवारी मिळवलेले काहीजण सुद्धा फडणवीस यांच्या संपर्कात होते हे विशेष .त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत माझं ते माझ अन तुझं ते ही माझंच असाच खेळ फडणवीस यांनी मांडला आहे .त्यामुळे निकाल काय लागणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही हे नक्की .
राज्याच्या विधानसभा निवडणुकी कडे देशाचे लक्ष लागले आहे,देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई आणि राज्यावर आपली हुकूमत असावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . निवडणूक जाहीर होण्याच्या सहा महिने नव्हे वर्ष दोन वर्षे अगोदर पासूनच फडणवीस यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती अस म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही .
काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील असोत की विजयसिंह मोहिते पाटील अथवा जयदत्त क्षीरसागर किंवा ऐनवेळी पक्षात आलेले अनेकजण असोत प्रत्येकाशी फडणवीस यांनी एक वेगळीच लाईन लावून ठेवली होती .पाथरी विधानसभा मतदार संघातून रिपाई ची उमेदवारी मिळालेले मोहन फड हे अपक्ष म्हणून 2014 ला निवडून आले ,नंतर शिवसेना मार्गे भाजपात दाखल झाले आणि वाटाघाटीमध्ये हा मतदारसंघ मित्रपक्ष रिपाईकडे गेल्यानंतर त्यांना रिपाईकडून उमेदवारी देण्यात फडणवीस यशस्वी झाले .त्यांच्याच शेजारच्या जिंतूर मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या मेघना बोर्डीकर यांना देखील फडणवीस यांनी रासपची उमेदवारी मिळवून दिली .
गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सहभागी झालेल्या विनायक मेटे यांच्या वाट्याला जे तीन मतदारसंघ आले तेथेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलेच शिलेदार उभे केले .लोकसभा निवडणुकीच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील यांनी तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला .बीड आणि सिल्लोड मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला असल्याने जयदत्त क्षीरसागर आणि अब्दुल सत्तार यांना सेनेत पाठवत फडणवीस यांनी बाजी मारली .लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजेंद्र गावित या विद्यमान भाजप खासदाराला शिवसेनेत पाठवत त्यांना निवडून आणले .
राज्यात यावेळी भाजपकडून जे उमेदवार उभे आहेत आणि ज्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली अशा तब्बल वीस पेक्षा अधिक लोकांची उमेदवारी आणि मतदारसंघ फडणवीस यांनी च फायनल केले आहेत .शिवसेनेच्या वाट्याला ज्या 124 जागा आल्या आणि मित्रपक्षांना ज्या 18 जागा दिल्या गेल्या त्यातील तीस टाक्यांपेक्षा जास्त उमेदवार हे फडणवीस यांना मानणारे आहेत हे विशेष .
महायुतीमध्ये जे मित्रपक्ष सहभागी झाले त्यांना आमच्या कोट्यातून जागा दिल्या जातील हे मान्य करताना फडणवीस यांचा धुर्तपणा कोणाच्याच लक्षात आला नाही . रिपाई असो की रासप अथवा शिवसंग्राम सगळ्यांना जागा तर दिल्या मात्र त्यांचे उमेदवार आपल्या मर्जीतील देताना फडणवीस यांनी त्यांना आपल्याच पक्षाच्या चिन्हावर म्हणजे कमळावर उभे करून आपली खेळी यशस्वी केली .
मित्रपक्ष आणि सत्ताधारी असताना सुद्धा शिवसेनेने  साडेचार वर्ष भाजपच्या विरोधात रान उठवले,फडणवीस यांच्यापासून ते मोदी शहा यांच्यापर्यंत सगळ्यांचा यथेच्छ समाचार घेतला .लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती तुटते की काय असे वाटत असताना शहा आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अशी काही स्वप्न दाखवली की त्यात त्यांचा विरोध मावळला आणि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात देखील युती अभेद्य राहिली .
मध्यंतरी एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आमची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फायनल करणार आहेत अशी मिश्किल टिप्पणी केली होती,आज दोन्ही पक्षांसह मित्रपक्षांना दिलेल्या जागा आणि उभे असलेले उमेदवार पाहिल्यास यादी फडणवीस यांनी फायनल केल्याचे दिसून येते .
भाजपमध्ये शिस्त पाळली जाते अस म्हटलं जातं ,यादीवर नजर टाकली तर कॉग्रेसी संस्कृती मध्ये वाढलेल्या आणि अनेक बेशिस्त असणाऱ्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते .लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेनेने काही उमेदवार बदलावेत असा फडणवीस यांचा आग्रह होता मात्र सेनेने ती ऐकला नाही अन चार पाच जागांचा फटका त्यांना बसला .कॉग्रेसमुक्त भारत चा नारा नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर फडणवीस यांनी राज्यात राष्ट्रवादी मुक्त नारा दिला ,पण तो पूर्ण करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांचा सहारा घ्यावा लागला हे ढळढळीत सत्य आहे .विजयसिंह मोहिते असोत की राणा पाटील अनेक दिग्गजांना आपल्या गळाला लावताना फडणवीस यांनी आपल्या पक्षातील स्पर्धक बनू शकणाऱ्या खडसे,तावडे यांच्यासारख्यांचा पत्ता कापून आपणच किती प्रबळ आहोत हर दाखवून दिले .
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासारखा ऐंशी वर्षाचा तरुण मैदानात उतरला असताना राज ठाकरे असोत की राहुल गांधी यांच्यात मात्र तो उत्साह पाहायला मिळत नाही .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे ते भाजप सेनेच्या या दिग्गज लोकांसमोर कितपत टिकतील ही शंकाच आहे .अशावेळी येणाऱ्या 24 तारखेनंतर जे सरकार अस्तित्वात येईल त्यावर देखील फडणवीस यांचाच वरचष्मा असणार हे निश्चित आहे .सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यावयाचे अन कोणाला बाजूला बसवायचे,तसेच कोणाला कोणते खाते द्यायचे याचा मास्टर प्लॅन देखील फडणवीस यांच्याकडे तयार असल्यास आश्चर्य वाटायला नको .मध्यंतरी एका कार्यक्रमात फडणवीस यांना तुम्ही आजच्या काळातले शरद पवार आहात का,तुम्हाला पवार व्हायला आवडेल का अस विचारल्यावर मिश्कीलपणे हसत त्यांनी पवार यांचे दिवस आणि त्यांच राजकारण संपल्याच सांगितलं होतं,तेव्हाच खडसे,तावडे यांनी वाऱ्याचा वेग अन दिशा ओळखायला पाहिजे होती .अबकी बार फडणवीस सरकार असंच त्यांना सांगायचं होत मात्र ते ना स्वपक्षातील लोकांना समजलं ना मित्रपक्षांना .त्यामुळेच आज जी परिस्थिती दिसते आहे ती पूर्णपणे फडणवीस यांना पोषक अशीच असल्याचे जाणवते .त्यामुळेच येणाऱ्या काळात फडणवीस बोले अन मित्रपक्षासह विरोधीपक्ष सुद्धा चाले असे चित्र दिसले तर आश्चर्य वाटायला नको .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

जातीवाचक उल्लेख कितपत योग्य ?

धनंजय मुंडे यांच्या मतदार संघात कदाचित ब्राम्हण मतदार नसावेत किंवा ते ज्या राज्यात राहतात तेथे सुद्धा त्यांच्या पक्षाला ब्राम्हणांची मत मिळत नसावीत त्यामुळेच ते अनाजी पंत ,अनाजी पंत असं बोलत फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत,एखाद्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या जातीचा हीन भाषेत उल्लेख का करावा हे न कळणारे आहे,अनाजी पंत ही प्रवृत्ती आहे मात्र मुंडे त्याला जातीची जोड देऊन वातावरण अधिक दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत,शेवटी त्यांच्या नेत्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक पुणेरी पगडी, फुले पगडी,पेशवे छत्रपतींना जहागिरी देऊ लागले अशी वक्तवे करून ब्राम्हण द्वेष दाखवून दिला होता .

कोणताही माणूस कोणत्या जातीत जन्माला यावा हे कोणाच्या हातात नसते मात्र तरीही त्याला तो ठराविक जातीत जन्माला आला म्हणून दोष देणे योग्य नाही .
अनाजी पंत ज्या पद्धतीने कारभार करीत होते तसा फडणवीस यांनी केला का,त्याची काही उदाहरणे आहेत का,जेव्हा छत्रपती उदयनराजे हे काँग्रेस मधून राष्ट्रवादी त आले आणि गेली दहा वर्षे शरद पवार ,अजित पवार आणि सगळ्याच पवार समर्थकांनी त्यांना सहन केले तेव्हा राजेंना जो मानसन्मान दिला तो कोणत्या अधिकाराने दिला हे सांगावे,पवार असोत की मुंडे यांनी काहीही वक्तव्य केले तर ते सेक्युलर आणि इतरांनी कोणतेही कृत्य केले की ते धर्मांध हा काय प्रकार आहे .

निवडणुका येतात अन जातात ,मात्र प्रचाराचा दर्जा इतका खाली जावा हे योग्य नाही,बरं ते ज्या फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत त्यांनी स्वतःच्या जातीला खूप काही मिळवून दिल आहे असंही नाही,उलट कटाक्षाने त्यांनी आपल्या स्वजातीयांच्या कार्यक्रमांना किंवा स्टेजवर जाणे टाळले आहे मग तरी हा पोटशूळ का .
मुंडे यांना पुरस्कार मिळाला किंवा कार्यक्रम असला की बंजारा महिलांनी त्यांचे पारंपरिक वेशात स्वागत केले तर चालते,शरद पवार यांना मराठा म्हणून जाणता राजा ही पदवी दिली तर चालते,छगन भुजबळ असोत की महादेव जानकर अथवा राम शिंदे यांना  त्यांच्या जातीच्या नावावर मोठमोठी पदे,संस्थान दिली तर कोणीच आक्षेप घेत नाही मात्र एक फडणवीस त्याच्या कर्तृत्वावर आणि पक्षनिष्टेवर जर मुख्यमंत्री पदावर पोहचला असेल तर त्यात त्याचा काय दोष .
आपण टीका करताना समोरच्या माणसाच्या मनाला भोक पडतील अस बोलू नये हा साधा संकेत आहे,मात्र राजकारणात सगळेच संकेत पायदळी तुडवले तरच आम्हाला साहेबांच्या दरबारात किंमत मिळते हा समज असलेल्या धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना हेच प्रिय वाटले तर आश्चर्य वाटायला नको .मुंडे हे अत्यन्त चांगले वक्ते,अभ्यासू राजकारणी आहेत,परखड टीका करणारा स्व गोपीनाथ मुंडे यांच्या नंतरचा नेता म्हणून त्यांनी नाव कमावले आहे .त्यामुळे त्यांनी या पद्धतीने भाषा वापरून काय साध्य करावयाचे आहे हे ठरवावे .
राजकारणात आम्ही जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करतो ,आमच्या साहेबांनी गवई, आठवले,कवाडे,प्रकाश आंबेडकर यांना खुल्या जागेवरून निवडून आणलं हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर जी एक स्वाभिमानाची लकेर उमटते ना त्यानंतर ते जेव्हा फडणवीस यांचे नाव न घेता टीका करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील छद्मी हावभाव खूप काही सांगून जातात .
राजकारण हे समाजाच्या उद्धारासाठी,उत्थानासाठी असावं असं म्हटलं जातं मात्र धनंजय मुंडे यांना कदाचित त्याचा विसर पडला असावा .मी एका ठराविक जातीचा आहे आणि मला राग आला म्हणून मी हे लिहितो आहे असं नाही,कारण मी पत्रकारिता करताना जात धर्म याहीपेक्षा पैसा या गोष्टीला कधीच महत्व दिले नाही.
मात्र ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की फडणवीस म्हणजे ब्राम्हण,मोदी म्हणजे तेली,शहा म्हणजे गुजराती, मुंडे म्हणजे वंजारी,पवार म्हणजे मराठा ,राऊत म्हणजे माळी याचा खरच विचार झाला पाहिजे .
छत्रपती शिवाजी महाराज असोत की जिजामाता अथवा राजे संभाजी हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत याबद्दल कोणाला काहीच अडचण असण्याचे कारण नाही,त्या छत्रपतींनी कधी जातीभेद पाहिला नाही त्यांच्या वंशजांबद्दल बोलताना जर जाणीवपूर्वक असा जातीवाचक उलेलख जात असेल तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा आहे .

देव ,देश अन धर्मापायी प्राण हाती घेणारे छत्रपतींचे मावळे कुठं अन फुटकळ सत्तेतील पद मिळावीत म्हणून स्वतःला एखाद्या व्यक्तीच्या चरणी लिन करून मावळे म्हणवून घेणारे धनंजय मुंडे यांच्यासारखे किंवा इतर तथाकथित पुढारी,कार्यकर्ते कुठं .
हा सगळा जो प्रचाराचा दर्जा घसरतो आहे तो बुद्धीला न पटणारा आहे,निवडणूक येते अन जाते मात्र त्यामुळे मनभेद होता कामा नयेत,पत्रकारितेत एखाद्या बातमीमुळे कोणाचे आयुष्य बरबाद होणार असेल तर ती बातमी टाळलेली बरी किंवा त्यातील भाषा सौम्य वापरलेली बरी असं साधं इथिक्स शिकवलं जातं तस राजकारणात देखील टिका टिप्पणी करताना भाषेचा समतोल राखला पाहिजे हा साधा संकेत आहे,मात्र तो संकेत पायदळी तुडवण्यासाठीच असतो हा समज मुंडेंसारख्या नेत्यांमुळे अलीकडच्या काळात रूढ होऊ लागला आहे .
अनाजी पंत ज्या पद्धतीने वागले किंवा त्यांनी जी कारस्थान केली त्यामागे त्यांचा हेतू काय होता,परिस्थिती काय होती,त्यांनी का अशा पद्धतीने निर्णय घेतला हे त्यांनाच माहीत परंतु ते एका जातीचे आहेत म्हणून संपूर्ण जातीला दोष देत साप साप म्हणून भुई धोपटणे किती योग्य आहे याचा विचार ज्याचा त्याने करावा एवढीच अपेक्षा .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

शब्दावाचून कळले सारे .............!



शब्दावाचून कळले सारे ..........!
भरतनाट्यम म्हणजे भाव ताल आणि रागाचा संगम,यामाध्यमातून दक्षिणेत ही कला जोपासली गेली,भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित असलेली ही नृत्यशैली असून या नृत्यपद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे .या नृत्यशैलीच्या माध्यमातून बीडमध्ये एक सांस्कृतिक वातावरण तयार होत आहे,साई नृत्यालयाच्या अनुराधा चिंचोलकर यांनी गेल्या 19 वर्षात ही परंपरा जपली आहे .कोणत्याही संवादाशिवाय मनातले भाव व्यक्त करण्याचं एक उत्तम साधन म्हणजे भरतनाट्यम अस म्हणलं तर वावगं ठरणार नाही .याचा प्रत्यय बिडकरांनी रविवारी अनुभवला .साई नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यनाटिकेद्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले .
21 व्या शतकाकडे झेपावणारा भारत देश,संगणकीकरणाचा झालेला विस्फोट,ग्लोबलायजेशनमुळे एक वैश्विक खेड बनत असलेलं जग,मोबाईल,इंटरनेट मुळे घरापर्यंत नव्हे तर बेडरूममध्ये इंग्रजी संस्कृतीचा झालेला शिरकाव पाहता डी जे च्या तालावर बेधुंद होणारी तरुणाई पाहिल्यानंतर भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होऊन परकीय संस्कृतीच आक्रमण पुन्हा होत की काय अशी शंका येते,गणपती असोत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी होणारा धांगडधिंगा पाहिल्यानंतर मन विषन्न होत,मात्र कोणत्याही संवादाविना केवळ हावभाव,नेत्रकटाक्ष,हस्तमुद्रा आणि अप्रतिम पदलालित्य याद्वारे समोरच्यांशी थेट बोलता येत,आपल्या मनातल्या भावना व्यक्त करता येतात आणि ते माध्यम म्हणजे भरतनाट्यम होय .

दक्षिण भारतातून उदयास आलेल्या भरतनाट्यम या नृत्यप्रकाराने आज जगात आपला वेगळा ठसा उमटवला आहे .स्वातंत्र्यपूर्व काळात दादासाहेब फाळके असोत की चार्ली चॅप्लिन यांनी मुकचित्रपटाद्वारे रसिकांचे मनोरंजन केलं,नंतरच्या काळात संवादातून सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना  चित्रपट आणि नाटकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला .या चित्रपटांमध्ये नायक नायिकांच्या प्रेमाची खलबत नृत्य आणि गीताच्या माध्यमातून व्यक्त करण्यास सुरुवात झाली .90 च्या दशकापर्यंत संगीत नाटकांनी देखील रसिकांच्या मनावर गारुड घातलं होत .अलीकडच्या काळात व्यावसायिक रंगभूमीला मोठे महत्व प्राप्त झाल्याने संगीत नाटकांकडे रसिकांनी आणि निर्माता,दिग्दर्शकांनी देखील पाठ फिरवली .
या सगळ्या उलथापालथी मध्ये आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं ते भरतनाट्यम या नृत्यप्रकाराने .
बीडच्या नाट्यगृहात साई नृत्यालयाच्या वतीने आयोजित द्वैवार्षिक कार्यक्रमात जे कलाप्रकार सादर केले गेले ते डोळ्यांचे पारणे फेडणारे होते .
पार्वतीचे वडील राजा दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञाचे निमंत्रण आपले पती भगवान शंकर यांना नसल्याचे समजल्यानंतर पार्वतीने वडिलांकडे धाव घेऊन जाब विचारला तेव्हा त्या गोसावड्याला,अंगाला राख फासून फिरणाऱ्याला मी निमंत्रण देणार नाही अस सांगत दक्ष राजाने पार्वती आणि शंकर यांचा अवमान केला,क्रोधीत झालेल्या पार्वतीने यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली ,ही वार्ता भगवान शंकरांना समजल्यानंतर त्यांनी तांडव करीत उपासना केली अन पार्वती पुन्हा गौरीच्या रुपात प्रकट झाली, ही आख्यायिका साई नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी ज्या सहजपणे सादर केली ती अवर्णनीय होती,कोणताही संवाद नसताना ही नृत्य नाटिका केवळ आपल्या हावभावातून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहचवण्याचं कसब थक्क करणारं होतं .ही नाटिका सादर करणाऱ्या विद्यार्थिनींच जेवढं कौतुक आहे तेवढंच यासाठी मेहनत घेणाऱ्या अनुराधा चिंचोलकर यांचंही आहेच .
या संपूर्ण कार्यक्रमात मुलींनी शारदास्तवन,श्लोकम, शिरोदृष्टी,पुष्पांजली,अलारीपू, मधुराष्ट्कम, पदम,तिल्लना,आडावं असे विविध नृत्य प्रकार सादर केले .हे सगळे नृत्यप्रकार म्हणजे बीडकर रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती .
कोणताही संवाद नसताना केवळ भावमुद्रा आणि हावभाव याद्वारे रसिकांच्या काळजाला हात घालण्याचा हा प्रकार म्हणजे शब्दवाचून कळले सारे,शब्दांच्या पलीकडले अशी अनुभूती देणारा होता .
भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यप्रकाराबाबत केवळ ऐकून असणाऱ्या श्रोत्यांना देखील या नृत्यसादरीकरणाने खिळवून ठेवले यातच याचे यश सामावले आहे .गेल्या 19 वर्षापासून सौ अनुराधा चिंचोलकर या किती मेहनत घेत असतील अन काय काय द्राविडी प्राणायाम त्यांना घालावे लागत असतील हे दिसून येत होते .अत्यन्त शांत,संयमी कुठलाही बडेजाव पणा अंगी न बाळगता त्या भगवान नटराजाची सेवा  करीत आहेत त्या किती श्रद्धेने करतात हे रविवारी दिसून आले .
आपल्या शिष्याने नाव कमावलं आणि दिलेली शिक्षा प्रत्यक्षात उतरवल्यानंतर गुरूच्या चेहऱ्यावर जो कृतार्थतेचा भाव असतो तो नक्कीच चिंचोलकर ताईंच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला .
या संपूर्ण कार्यक्रमात मनाला भावलं ते सती झाली गौरी ही नृत्यनाटिका,खरोखर हा जो काही प्रकार या मुलींनी सादर केला त्यांना शतशः नमन .मनातल्या भावना व्यक्त करण्याचं संवाद हेच एकमेव साधन नाही तर चेहऱ्यावरील हावभाव,नेत्रकटाक्ष, हस्तमुद्रा याद्वारे तसेच त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी आपल्या मनातल्या भावना पदम च्या माध्यमातून कशा मांडल्या असत्या याच सादरीकरण आणि पदलालित्य एकमेवाद्वितीय असंच होत .त्यामुळेच ते मनाला भावलं अन रसिकांची दाद मिळवून गेलं .शब्दही जिथे अपुरे पडतात किंवा शब्दांची गरज जिथे पडत नाही त्यालाच कदाचित भरतनाट्यम म्हणत असावेत .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड .
9422744404

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

अभाव .....;नियोजनाचा आणि दुरदर्शीपणाचा !



अभाव .....दुरदर्शीपणाचा अन निर्णयक्षमतेचा सुद्धा !

एकीकडं अर्धा मराठवाडा दुष्काळामुळे होरपळत असताना दुसरीकडे सांगली सातारा कोल्हापूर अमरावती यासह तब्बल नऊ ते दहा जिल्हे पुराने वेढले गेले आहेत, हे संकट अस्मानी असलं तरी या संकटाला सरकार देखील तेवढच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. कारण योग्य नियोजन आणि योग्यवेळी निर्णय घेण्याची क्षमता दाखवली असती तर आज लाखो हेक्टर जमीन ,लाखो लोक आणि हजारो जनावरांचा जीव मेटाकुटीला आला नसता. बैल गेला आणि झोपा केला ही पद्धत प्रत्येकच सरकारची रूढ झाल्यामुळे बळी जातोय तो सर्वसामान्य गरीब माणसाचा.
महाराष्ट्रातील कोल्हापूर ,सांगली ,सातारा, अमरावती, मुंबई-पुणे या भागात न भूतो न भविष्यती असा पाऊस कोसळला पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला रस्ते नद्या नाले ओढे तलाव जलमय झाले. जिथं नजर जाईल तिथे फक्त पाणी आणि पाणी असंच दृश्य गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळते तर दुसरीकडे बीड ,जालना, औरंगाबाद ,उस्मानाबाद, लातूर अर्धा मराठवाडा दुष्काळाच्या दिशेने वाटचाल करतो आहे,पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने उलटत आले तरी देखील मराठवाड्यातील या चार-पाच जिल्ह्यात पन्नास टक्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अद्यापही बहुतांश ठिकाणी चारा छावण्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेली मदत केंद्र सुरूच आहेत. टँकरवर आपली तहान भागवण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे .एकीकडे हे दृश्य असताना दुसरीकडे मात्र पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुराच्या पाण्यात वेढले गेले आहे. हे पुराचं पाणी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे ,लोकांचे संसार उघड्यावर पडले ,पुराच्या पाण्याने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. विशेषतः गेल्या पंचवीस-तीस वर्षांत ज्या सांगलीकरांनी कधीच पूर पाहिला नव्हता त्या सांगलीकरांचे दोन-चार मजल्याची घरं पाण्याखाली आहेत लोक घराच्या छतावर जाऊन गेल्या चार दिवसापासून मदतीची वाट पाहत आहेत, शेतकऱ्याला आवश्यक असलेलं पशुधन अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून जाताना पाहून त्याचं हृदय हेलावल आहे मात्र अशाही परिस्थितीत मदतीसाठी उशिरा आलेले मंत्री-संत्री हे आपल्या अकलेचे तारे तोडताना आणि नको त्या ठिकाणी सेल्फी घेत दाताड काढताना पाहून मन विषण्ण होतं. लाज वाटली पाहिजे या मंत्र्याना, तुम्ही मदत करत आहेत म्हणजे उपकार करीत नाहीत लोक अडचणीत आहे तेव्हा ते सरकार म्हणून तुमच्याकडेच आशेने पाहणार, त्यांना मदत करता येत नसेल तर करू नका पण मदतीच्या नावाखाली सेल्फी घेत नाकाला गुंडाळण्याचा अतिशहानपणा तरी किमान दाखवू नका.
एकीकडे महाराष्ट्रातील जिल्हे पुराच्या पाण्यात वेढले गेले असताना दुसरीकडे शिवसेनेची आदित्य संवाद यात्रा सुरू होती तर मुख्यमंत्री सगळी कामधंदे सोडून महाजनादेश यात्रेवर निघाले होते, त्यात कमी की काय म्हणून राष्ट्रवादीने देखील शिवस्वराज्य यात्रा काढून मता चा जोगवा मागायला सुरुवात केली होती .सांगली कोल्हापूरचे लाखो लोक जेव्हा पाण्यामध्ये बुडत होते तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक मात्र मतासाठी दारोदार फिरत असल्याचे चित्र दुर्दैवी होत.
सांगली कोल्हापूर सातारा या भागावर ही वेळ का आली याचा विचार आज तरी कोणी करायला तयार नाही. महाराष्ट्रातील जे पाणी कर्नाटकात वाहून जात ते पाणी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन जर मराठवाडा विदर्भ या भागात वळवल असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती ,एवढेच काय परंतु अलमट्टी धरणातून आज जो 500000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय तोच निर्णय पहिल्याच दिवशी पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा घेतला असता तर आज लाखो सांगलीकर आणि कोल्हापूरकर यांचा जीव टांगणीला लागला नसता. मात्र वेळेत निर्णय घेईल ते सरकार कसे म्हणायचे, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात आणि नैसर्गिक आपत्तीत भरभरून राज्यातील जनतेला मदत केली ते देखील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडून विदर्भात भाषणे ठोकत फिरताना पाहून महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्रा आता बस कर रे असं म्हणण्याची वेळ आली .
सरकारने ठरवलं तर काय होऊ शकतो याचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेने किल्लारीच्या भूकंपानंतर घेतला आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत किल्लारी मध्ये शासकीय मदत घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार पोहोचले होते आज मात्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांना पोहोचण्यासाठी पाच दिवसाचा वेळ लागला कारण ते मत मागण्यात मश्गुल होते. सांगलीचे पालकमंत्री असलेले सुभाषबापू देशमुख हे पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीची तयारी कशी करायची हे शिकवत होते तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्र्यांसोबत महाजनादेश यात्रेवर होते. एकीकडे भाजपचा हा प्रकार सुरू असताना शिवसेनेत मातोश्रीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधल्या नाराजांना शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश दिला जात होता हा सगळा प्रकार चीड आणणारा आणि संताप येईलअसाच आहे.
इतर पक्षातील दिग्गज पुढारी मोठमोठे आमदार खासदार यांना पदाची पैशाची आमिषे दाखवून तसेच त्यांच्या मागील चौकशीचा ससेमिरा थांबवण्याच आश्वासन देऊन आपल्या पक्षात घेण्याचा  प्रकार जितका सहज आहे तितकाच महापूर आणि त्यावरील उपाय योजना सोपे आहेत असा कदाचित समज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा झाला असावा आणि त्यामुळेच कोल्हापूर आणि सांगली मधील लोक पाण्‍यात बुडत असताना हे मंत्री महोदय मात्र बोटीत बसून चक्क दात काढून हसत हसत सेल्फी घेत असल्याचं ओंगळवाणे चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आणि या राजकारणामुळे राज्याची मान शरमेनं खाली गेली.
राजकारणी म्हणजे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे असं सहज लोक म्हणतात त्याला असे काही प्रकार कारणीभूत ठरतात असे म्हणायला हरकत नाही .लोकांच्या दुःखामध्ये त्यांना मदतीचा हात पुढे करण्याऐवजी अशा पद्धतीने पाच दिवसानंतर येऊन दुष्काळी पर्यटन किंवा महापूर पर्यटन मंत्री-संत्री करत असतील तर या लोकांना वेळीच वेसण घालणं हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे . जनता पाण्यात बुडत असताना प्रशासकीय यंत्रणा ठप्प झालेली असताना केंद्राकडे मदतीची याचना करण्याबरोबरच राज्यातील सगळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या भागात पोहोचून लोकांना धीर देणे गरजेचे आहे परंतु राजकारणी मात्र एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे.
मराठवाड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी मिळावं यासाठी अनेक आंदोलन मोर्चे रास्ता रोको झाले मात्र त्या त्या वेळच्या सरकारने केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच केलं नाही .कृष्णा खोऱ्यातील जे पानी मराठवाड्याला दिले जाणार आहे त्याचे नियोजन गेल्या दहा-पंधरा वर्षात केलं गेलं असतं तर पावसाअभावी मराठवाड्याचं होणार वाळवंट आणि महापुरामुळे कोल्हापूर-सांगली सातारकरांची होणारी त्रेधातिरपीट निश्चितपणे थांबली असती. परंतु प्रत्येक गोष्टीत स्वतःचा आणि पक्षाचा फायदा बघणाऱ्या राजकारण्यांमुळे आज महाराष्ट्रात काही जिल्हे पाण्यात आहेत आणि काही जिल्ह्यात थेंबभर पाण्यासाठी लोकांना जीव द्यावा लागत आहे .हे सगळे चित्र पाहिल्यानंतर लाज वाटते की खरंच महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे का ? आणि ते का समजावे ? या राज्यातील पुढाऱ्यांनी कर्नाटक मध्ये जे पाणी सोडायचं होतं त्याचं नियोजन पावसाळ्यापूर्वीच केलं असतं किंवा आठवडाभरापूर्वी तरी त्याबाबत योग्य ते निर्देश प्रशासनाला दिले असते तर आज अब्जावधी रुपयांच झालेलं नुकसान आहे ते टाळता आलं असतं. या महापुरामुळे लाखो हेक्टर जमीन खरडून गेली आहे, व्यापारी, उद्योजक, छोटे छोटे व्यावसायिक रहिवाशी यांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे .या भागातील शेतकरी तर तब्बल दहा ते पंधरा वर्ष मागे फेकला गेला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने दप्तर दिरंगाई न करता तातडीने या भागातील लोकांना भरघोस मदत देऊन आर्थिक आणि मानसिक आधार द्यायला पाहिजे नाहीतर मुंबईत बसलेले बाबू लोक नियम आणि अटी दाखवून या पूरग्रस्तांची कुचेष्टा करण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा या व्हाईट कॉलर बाबू लोकांना निक्षून पणे सांगत सरकारने कोणत्याही अटी आणि शर्ती न घालता शेतकरी व्यापारी उद्योजक छोटे व्यवसायिक मजूर यांना तातडीने मदत देणे आवश्यक आहे
 त्याचबरोबर पुराचे पाणी उतरल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात रोग ,आजार, साथीचे रोग पसरण्याची भीती आहे त्यामुळे जीवित हानी देखील होण्याचा धोका आहे हे वेळीच रोखायच असेल तर याठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि यंत्रणा कामाला लावावी लागेल .कारण योग्यवेळी या उपाययोजना केल्या नाहीत तर हजारो लोकांना साथरोग होण्याची शक्यता आहे आजार झाल्यानंतर त्यावर उपाय योजना करून पाठ थोपटून घेण्यापेक्षा आजार होणार नाही यासाठी काळजी घेणे कधीही चांगलं एकूणच पश्चिम महाराष्ट्रात झोपलेला निसर्ग आणि त्यामुळे निर्माण झालेली महापुराची परिस्थिती आणि मराठवाड्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झालेलं दुष्काळाचं संकट या दोन्ही परिस्थितींना हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं हे खेदाने म्हणावे लागते नियोजन आणि दूरदर्शीपणा चा अभाव असल्यामुळेच हा सगळा प्रकार झाला हे मात्र नक्की.

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...