शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

अभाव .....;नियोजनाचा आणि दुरदर्शीपणाचा !



अभाव .....दुरदर्शीपणाचा अन निर्णयक्षमतेचा सुद्धा !

एकीकडं अर्धा मराठवाडा दुष्काळामुळे होरपळत असताना दुसरीकडे सांगली सातारा कोल्हापूर अमरावती यासह तब्बल नऊ ते दहा जिल्हे पुराने वेढले गेले आहेत, हे संकट अस्मानी असलं तरी या संकटाला सरकार देखील तेवढच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. कारण योग्य नियोजन आणि योग्यवेळी निर्णय घेण्याची क्षमता दाखवली असती तर आज लाखो हेक्टर जमीन ,लाखो लोक आणि हजारो जनावरांचा जीव मेटाकुटीला आला नसता. बैल गेला आणि झोपा केला ही पद्धत प्रत्येकच सरकारची रूढ झाल्यामुळे बळी जातोय तो सर्वसामान्य गरीब माणसाचा.
महाराष्ट्रातील कोल्हापूर ,सांगली ,सातारा, अमरावती, मुंबई-पुणे या भागात न भूतो न भविष्यती असा पाऊस कोसळला पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला रस्ते नद्या नाले ओढे तलाव जलमय झाले. जिथं नजर जाईल तिथे फक्त पाणी आणि पाणी असंच दृश्य गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळते तर दुसरीकडे बीड ,जालना, औरंगाबाद ,उस्मानाबाद, लातूर अर्धा मराठवाडा दुष्काळाच्या दिशेने वाटचाल करतो आहे,पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने उलटत आले तरी देखील मराठवाड्यातील या चार-पाच जिल्ह्यात पन्नास टक्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अद्यापही बहुतांश ठिकाणी चारा छावण्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेली मदत केंद्र सुरूच आहेत. टँकरवर आपली तहान भागवण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे .एकीकडे हे दृश्य असताना दुसरीकडे मात्र पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुराच्या पाण्यात वेढले गेले आहे. हे पुराचं पाणी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे ,लोकांचे संसार उघड्यावर पडले ,पुराच्या पाण्याने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. विशेषतः गेल्या पंचवीस-तीस वर्षांत ज्या सांगलीकरांनी कधीच पूर पाहिला नव्हता त्या सांगलीकरांचे दोन-चार मजल्याची घरं पाण्याखाली आहेत लोक घराच्या छतावर जाऊन गेल्या चार दिवसापासून मदतीची वाट पाहत आहेत, शेतकऱ्याला आवश्यक असलेलं पशुधन अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून जाताना पाहून त्याचं हृदय हेलावल आहे मात्र अशाही परिस्थितीत मदतीसाठी उशिरा आलेले मंत्री-संत्री हे आपल्या अकलेचे तारे तोडताना आणि नको त्या ठिकाणी सेल्फी घेत दाताड काढताना पाहून मन विषण्ण होतं. लाज वाटली पाहिजे या मंत्र्याना, तुम्ही मदत करत आहेत म्हणजे उपकार करीत नाहीत लोक अडचणीत आहे तेव्हा ते सरकार म्हणून तुमच्याकडेच आशेने पाहणार, त्यांना मदत करता येत नसेल तर करू नका पण मदतीच्या नावाखाली सेल्फी घेत नाकाला गुंडाळण्याचा अतिशहानपणा तरी किमान दाखवू नका.
एकीकडे महाराष्ट्रातील जिल्हे पुराच्या पाण्यात वेढले गेले असताना दुसरीकडे शिवसेनेची आदित्य संवाद यात्रा सुरू होती तर मुख्यमंत्री सगळी कामधंदे सोडून महाजनादेश यात्रेवर निघाले होते, त्यात कमी की काय म्हणून राष्ट्रवादीने देखील शिवस्वराज्य यात्रा काढून मता चा जोगवा मागायला सुरुवात केली होती .सांगली कोल्हापूरचे लाखो लोक जेव्हा पाण्यामध्ये बुडत होते तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक मात्र मतासाठी दारोदार फिरत असल्याचे चित्र दुर्दैवी होत.
सांगली कोल्हापूर सातारा या भागावर ही वेळ का आली याचा विचार आज तरी कोणी करायला तयार नाही. महाराष्ट्रातील जे पाणी कर्नाटकात वाहून जात ते पाणी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन जर मराठवाडा विदर्भ या भागात वळवल असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती ,एवढेच काय परंतु अलमट्टी धरणातून आज जो 500000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय तोच निर्णय पहिल्याच दिवशी पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा घेतला असता तर आज लाखो सांगलीकर आणि कोल्हापूरकर यांचा जीव टांगणीला लागला नसता. मात्र वेळेत निर्णय घेईल ते सरकार कसे म्हणायचे, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात आणि नैसर्गिक आपत्तीत भरभरून राज्यातील जनतेला मदत केली ते देखील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडून विदर्भात भाषणे ठोकत फिरताना पाहून महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्रा आता बस कर रे असं म्हणण्याची वेळ आली .
सरकारने ठरवलं तर काय होऊ शकतो याचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेने किल्लारीच्या भूकंपानंतर घेतला आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत किल्लारी मध्ये शासकीय मदत घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार पोहोचले होते आज मात्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांना पोहोचण्यासाठी पाच दिवसाचा वेळ लागला कारण ते मत मागण्यात मश्गुल होते. सांगलीचे पालकमंत्री असलेले सुभाषबापू देशमुख हे पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीची तयारी कशी करायची हे शिकवत होते तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्र्यांसोबत महाजनादेश यात्रेवर होते. एकीकडे भाजपचा हा प्रकार सुरू असताना शिवसेनेत मातोश्रीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधल्या नाराजांना शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश दिला जात होता हा सगळा प्रकार चीड आणणारा आणि संताप येईलअसाच आहे.
इतर पक्षातील दिग्गज पुढारी मोठमोठे आमदार खासदार यांना पदाची पैशाची आमिषे दाखवून तसेच त्यांच्या मागील चौकशीचा ससेमिरा थांबवण्याच आश्वासन देऊन आपल्या पक्षात घेण्याचा  प्रकार जितका सहज आहे तितकाच महापूर आणि त्यावरील उपाय योजना सोपे आहेत असा कदाचित समज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा झाला असावा आणि त्यामुळेच कोल्हापूर आणि सांगली मधील लोक पाण्‍यात बुडत असताना हे मंत्री महोदय मात्र बोटीत बसून चक्क दात काढून हसत हसत सेल्फी घेत असल्याचं ओंगळवाणे चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आणि या राजकारणामुळे राज्याची मान शरमेनं खाली गेली.
राजकारणी म्हणजे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे असं सहज लोक म्हणतात त्याला असे काही प्रकार कारणीभूत ठरतात असे म्हणायला हरकत नाही .लोकांच्या दुःखामध्ये त्यांना मदतीचा हात पुढे करण्याऐवजी अशा पद्धतीने पाच दिवसानंतर येऊन दुष्काळी पर्यटन किंवा महापूर पर्यटन मंत्री-संत्री करत असतील तर या लोकांना वेळीच वेसण घालणं हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे . जनता पाण्यात बुडत असताना प्रशासकीय यंत्रणा ठप्प झालेली असताना केंद्राकडे मदतीची याचना करण्याबरोबरच राज्यातील सगळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या भागात पोहोचून लोकांना धीर देणे गरजेचे आहे परंतु राजकारणी मात्र एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे.
मराठवाड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी मिळावं यासाठी अनेक आंदोलन मोर्चे रास्ता रोको झाले मात्र त्या त्या वेळच्या सरकारने केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच केलं नाही .कृष्णा खोऱ्यातील जे पानी मराठवाड्याला दिले जाणार आहे त्याचे नियोजन गेल्या दहा-पंधरा वर्षात केलं गेलं असतं तर पावसाअभावी मराठवाड्याचं होणार वाळवंट आणि महापुरामुळे कोल्हापूर-सांगली सातारकरांची होणारी त्रेधातिरपीट निश्चितपणे थांबली असती. परंतु प्रत्येक गोष्टीत स्वतःचा आणि पक्षाचा फायदा बघणाऱ्या राजकारण्यांमुळे आज महाराष्ट्रात काही जिल्हे पाण्यात आहेत आणि काही जिल्ह्यात थेंबभर पाण्यासाठी लोकांना जीव द्यावा लागत आहे .हे सगळे चित्र पाहिल्यानंतर लाज वाटते की खरंच महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे का ? आणि ते का समजावे ? या राज्यातील पुढाऱ्यांनी कर्नाटक मध्ये जे पाणी सोडायचं होतं त्याचं नियोजन पावसाळ्यापूर्वीच केलं असतं किंवा आठवडाभरापूर्वी तरी त्याबाबत योग्य ते निर्देश प्रशासनाला दिले असते तर आज अब्जावधी रुपयांच झालेलं नुकसान आहे ते टाळता आलं असतं. या महापुरामुळे लाखो हेक्टर जमीन खरडून गेली आहे, व्यापारी, उद्योजक, छोटे छोटे व्यावसायिक रहिवाशी यांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे .या भागातील शेतकरी तर तब्बल दहा ते पंधरा वर्ष मागे फेकला गेला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने दप्तर दिरंगाई न करता तातडीने या भागातील लोकांना भरघोस मदत देऊन आर्थिक आणि मानसिक आधार द्यायला पाहिजे नाहीतर मुंबईत बसलेले बाबू लोक नियम आणि अटी दाखवून या पूरग्रस्तांची कुचेष्टा करण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा या व्हाईट कॉलर बाबू लोकांना निक्षून पणे सांगत सरकारने कोणत्याही अटी आणि शर्ती न घालता शेतकरी व्यापारी उद्योजक छोटे व्यवसायिक मजूर यांना तातडीने मदत देणे आवश्यक आहे
 त्याचबरोबर पुराचे पाणी उतरल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात रोग ,आजार, साथीचे रोग पसरण्याची भीती आहे त्यामुळे जीवित हानी देखील होण्याचा धोका आहे हे वेळीच रोखायच असेल तर याठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि यंत्रणा कामाला लावावी लागेल .कारण योग्यवेळी या उपाययोजना केल्या नाहीत तर हजारो लोकांना साथरोग होण्याची शक्यता आहे आजार झाल्यानंतर त्यावर उपाय योजना करून पाठ थोपटून घेण्यापेक्षा आजार होणार नाही यासाठी काळजी घेणे कधीही चांगलं एकूणच पश्चिम महाराष्ट्रात झोपलेला निसर्ग आणि त्यामुळे निर्माण झालेली महापुराची परिस्थिती आणि मराठवाड्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झालेलं दुष्काळाचं संकट या दोन्ही परिस्थितींना हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं हे खेदाने म्हणावे लागते नियोजन आणि दूरदर्शीपणा चा अभाव असल्यामुळेच हा सगळा प्रकार झाला हे मात्र नक्की.

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...