मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

सरणावर जायची एवढी घाई कशाला ..........!


सरणावर जायची एवढी घाई कशासाठी .............!

माझ्या लाडक्या बीड वासीयांनो,लाडक्या एवढ्यासाठी म्हणलं की माझा जीव आहे बीडवर अन इथल्या माणसांवर,मात्र आज मला मी बीडकर असल्याची लाज वाटली,खरंच लाज वाटली,अरे ज्या महा भयंकर रोगापासून सुटका मिळावी म्हणून सगळं जग लढत आहे,लहानापासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सगळे घरात रहा,सुरक्षित रहा हे सांगत आहेत,तिथं आम्ही मात्र सगळी लाज नाकाला गुंडाळून मोक्कार वळू सारखे रस्त्यावर फिरत आहोत,त्यामुळे आज मला मी बीडकर असल्याचीच लाज वाटू लागली आहे .
तुम्ही म्हणाल तू आम्हाला शिकवणारा कोण शहाणा लागून गेलास,तू किती पथ्य पाळतोस,तर एक स्पष्ट सांगतो की या संकटाचा सामना करण्यासाठी मी माझ्या परीने जे शक्य आहे ते करतो आहे .मी पत्रकार असल्याने माझं कर्तव्य करतो आहे .मात्र बीडकर म्हणून तुम्ही जे वागताय ना ते योग्य नाही हे मात्र तितकंच खरं आहे .
कोरोना कोण आहे,तो कोणाचा भाऊबंद आहे का,की तो अमुक एका धर्माचा जातीचा आहे का,तर निश्चितच नाही,तो एक विषाणू आहे जो जग गिळंकृत करायला निघाला आहे .जगावर अधिराज्य गाजवण्याचं स्वप्न पाहणारी अमेरिका असो की चीन हे मोठं मोठे बलाढ्य देश या संकटासमोर गुडघे टेकवत आहेत,तिथं तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती. या आजारावर अजूनपर्यंत कोणताही ठोस असा इलाज सापडलेला नाही मात्र घरात राहून,ठराविक अंतर ठेवून,हात पाय धुवून,स्वतःच्या शरीराची स्वछता ठेवून आपण त्यापासून स्वतःचा बचाव करु शकतो .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वीस दिवसात अनेकवेळा मीडियाच्या माध्यमातून जनतेला घरात राहण्याच आवाहन करत आहेत,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत की आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सगळे तुम्हाला आम्हाला रिकामचोट वाटले का .देशासमोर आज अनेक प्रश्न आ वासून उभे असताना अचानक आलेल्या या मोठ्या संकटाच्या विरोधात सरकार असो की विरोधक सगळेच हातात हात घालून लढत आहेत,कोणत्याही देशावर जेव्हा संकट येत तेव्हा एक देशवासीय म्हणून आपलं कर्तव्य असतं की आपण सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे .
आज देशात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे,मृत्य होणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे,या आजारावर मात करण्यासाठी अमेरिका सारखा देश इतर देशाकडे मदत मागत आहे,सुदैवाने अजून भारतात याचे प्रमाण आटोक्यात आहे मात्र ते वाढणार नाही याची कोणीच खात्री देऊ शकत नाही .
बीड जिल्ह्यात देखील प्रशासनाच्या सजगतेमुळे कोरोना अजून आत शिरकाव करू शकलेला नाही मात्र उस्मानाबाद असो की नगर अथवा हिंगोली ,औरंगाबाद अशा सगळ्याच जिल्ह्यात म्हणजे बीडच्या वेशीवर कोरोना येऊन ठेपला आहे .
आपण मात्र गाव जलो हनुमान बाहेर या मानसिकतेतून बाहेर पडायला अजून तरी तयार नाहीत .बीड जिल्ह्यात नाकाबंदी मोडून दाखल झालेल्या काही लोकांच्या संपर्कात आलेल्या पोलीस बांधवांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सगळ्या बिडवासीयांनी आनंद व्यक्त केला .कारण हा आजार संपर्कातून जास्त वाढतो ,हे तुम्ही आमही सगळेच जाणतो .
मात्र जे कळतं ते वळत नाही अशी आपली अवस्था सध्या झाली आहे .निव्वळ कमरेच सोडून डोक्याला गुंडाळल्यानंतर कोण काय बोलणार .
लॉक डाऊन नंतर आज चौदा दिवस झाले आपण घरात आहोत,मात्र जणूकाही चौदा वर्षापासून आपण वनवासात आहोत अस वागू लागलो आहोंत,विचार करा प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवासात कसे राहिले असतील,घरदार ,आई वडील आणि प्रजेला सोडून .राम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा ते राजपुत्र होते मात्र चौदा वर्षाच्या वनवासानंतर ते प्रभू श्रीराम झाले .आपण मात्र त्यांना देव मानत असताना चौदा दिवस घरात राहू शकत नाहीत का,बर काय नाही आपल्याजवळ ,सगळं जग तुमच्या हातात आहे,मोबाईल मुळे आणि टिव्हीमुळे जगात काय सुरु आहे हे तुम्हाला एक सेकंदात कळतंय,बायका पोरं, आई वडील,सगळे तर जवळच आहेत,मग बाहेर झकमारी करण्याची एवढी गरज आहे का ?
पन्नास तासांच्या संचारबंदी नंतर मंगळवारी बीड,परळी,माजलगाव,अंबाजोगाई या भागात रस्त्यावर जे चित्र दिसले ना ते आपल्या अकलेची दिवाळखोरी दाखवणारे होते .मी म्हणतो तुम्ही आम्ही रोजच भाजी खातो का हो,एरवी आपण रोज दोन भाज्या,भात, वरण, पोळी ,चटणी,लोणचं अस जेवण जेवतो का, नाही ना,मग या लॉक डावूनच्या काळातच एवढी काय खाय खाय सुटली आहे .दुष्काळातून आल्यासारखे आपण वागतो आहोत .आठवड्यात एक दिवस भाजी खरेदी केली तरी चालू शकते,किराणा सामान तर आपण सहसा महिन्यातून एकदाच भरतो ना,मग बाहेर जाऊन एवढं काय करतो आहोत आपण .
रिकामं फिरण्यामध्ये कसली आली आहे मर्दुमकी कळत नाही मला,साला जान है तो जहाँ है हे माहीत असूनसुद्धा आपण का मरणाला आमंत्रण देत आहोत हे न उलगडणारे कोडे आहे .
बीड जिल्ह्यात गेल्या चौदा पंधरा दिवसात रस्त्यावर जी परिस्थिती दिसली ती बीडकर किती मूर्खपणा करू शकतात हे दाखवणारी आहे .
बीडच नव्हे तर जवळपास सगळ्याच शहरात लोक संचारबंदी मोडणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य असल्यासारखे वागू लागले आहेत .
शहरातील,चौका चौकात खाकी कपडे घालून जे लोक बसले आहेत ना त्यांनाही घरदार,लेकरबाळ आहेत,मात्र ते तुमच्या आमच्यासाठी उन्हातान्हात थांबून आपलं काम करत आहेत,आम्ही काय करतोय तर त्यांच्याशी दांडेलशाही करतोय,त्यांनाच भांडतोय .
अरे शहाण्यांनो तुम्ही ज्यांच्या नावाने आज खडे फोडत आहात ना ते जर रस्त्यावर थांबले नाहीत तर तुमच्या वेशीवर आलेला तो कोरोना नावाचा यम केव्हाच तुमच्या दारात येईल हे कळणार सुद्धा नाही . डॉक्टर, आरोग्य सेवेतील सगळा स्टाफ आणि महसूल,पोलीस प्रशासन हे डोळ्यात तेल घालून तुमच्या आमच्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत .आम्ही मात्र त्यांच्या मेहनतीवर भडाभडा पाणी ओतत आहोत,मी तर म्हणेल की बिडकरांचा हा प्रकार म्हणजे खंडीभर वरणात फळाफळा मूतन्या सारखाच आहे .
माफ करा पण आजच बीडच्या लोकांचं वागणं नाही पटलं मला,शहरातील रस्त्यावर किमान एक हजार ते दीड हजार मोटारसायकल,चारचाकी वाहन,टेम्पो,टमटम दिसून आल्या .
एकीकडे जिल्ह्यातील सगळे पेट्रोल पंप सामान्य नागरिकांना बंद केले असताना एवढ्या गाड्या आल्या कोठून,त्यांना पेट्रोल मिळाले कसे हा प्रश्न अनुत्तरित आहे .नियम तोडण्यात आम्हाला खूप फुशारकी वाटते .एवढ्या संचारबंदी च्या काळात सुद्धा आम्ही कसे बाहेर राउंड मारून आलो,पोलिसांच्या डोळ्यात कशी धूळफेक केली याच आम्हाला कोण कौतुक वाटतं, मात्र आपण घराबाहेर पडून,गर्दी करून,रस्त्यावर मोक्कार फिरून पोलीस आणि प्रशासन यांच्या डोळ्यात नाही तर आपल्या स्वतःच्या आयुष्यात माती फेकत आहोत हे आपल्याला का कळत नाही .
आपला मृत्यू दारावर,वेशीवर आ वासून उभा आहे,त्यांच्या अन आपल्या मध्ये जर कोणी उभं असेल ना तर ते आहेत पोलीस,डॉक्टर आणि प्रशासन .
आपण जर चार दोन दिवस भाज्या नाही खाल्या,बाहेर नाही पडलो,तर मरणार आहोत का,नाही आपल्याला बाहेर जाता आले तर जगबुडी होणार आहे का .इथं सगळं जग लॉक डाऊन आहे,एक एक जीव वाचवण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे आणि आपण मात्र अक्कल गहाण टाकल्यासारखं वागत आहोत .हा आजार आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना होऊ नये,यापासून सगळे सुरक्षित राहावेत म्हणून आरोग्य यंत्रणा जीवतोड मेहनत घेत आहे .अख्ख जिल्हा रुग्णालय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिकामं करण्यात आलंय, सगळीकडे भयाण शांतता अन भीतीचं वातावरण आहे,बाहेर गावाहून आलेले लोक म्हणजे दुसरे यम आल्यासारखं त्यांना आपण वागवतोय ,हे का होतय कारण कोरोना होण्याची भीती प्रत्येकालाच आहे,मग तरीही आपण न काळल्यासारखं का करतोय हा खरा मुद्दा आहे .
बीड सारख्या शहरात जर या आजाराची लागण झाली तर सरकारी सोडा खाजगी रुग्णालयात सुद्धा जागा पुरणार नाही,रुग्ण आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात मारामाऱ्या होतील ,मग हे जर ओढवून घ्यायचं नसेल तर आपण घरात राहील तर बरं होईल ना,मात्र बीडच्या रस्त्यावर रोज जे चित्र दिसत ना ते मन विषण्ण करणार आहे .पोलीस दलाचे कर्मचारी असोत की आरोग्य विभागाचे लोक कोणत्याही संरक्षक साहित्याशिवाय आपलं काम करीत आहेत,आपण मात्र घराबाहेर पडून चौकाचौकात गप्पांचे फड रंगवत आहोत अन त्यात धन्यता मानत आहोत .
जिथं मंदिरातल्या देवांनी स्वतःला क्वारान्टीन करून घेतलंय तिथं तुमची आमची काय कथा,परंतु हे सगळं समजून देखील बीड सेफ आहे,आपल्याकडे पॉझिटिव्ह लोक नाहीत,प्रशासन विनाकारण बाऊ करतंय, असले फालतू विषय चघळत बसण्यात आपण धन्यता माणतोय .
आपण चौकात बसून किंवा शहरभर उंडारत फिरून असा काय देशाचा विकास करणार आहोत का,नक्कीच नाही, उलट घरात बसल्यामुळे लेकरं खुश आहेत,बायको,आईवडील सगळे कितीतरी वर्षांनी एकमेकांच्या आवडीनिवडी जपत आहेत, जुने खेळ,जुने मित्र,मैत्रिणी यांच्या आठवणीत दिवस जात आहेत पण आम्हाला हें नकोय .आम्ही मोदी अन ठाकरे पेक्षा हुशार आहोत त्यामुळे आम्ही त्यांची अक्कल काढण्यात स्वतःला हुशार मानत आहोत .
गेल्या पंधरा दिवसात प्रत्येकाने ठरवलं असत तर निश्चितपणे या दिवसात काय काय अनुभवलं,कोणाचे स्वभाव आवडले,कोणाचं वागणं खटकलं या बाबत छान छान लिखाण करता आलं असत,ज्या आईबापाच तोंड पाहण्यासाठी मुलांना आठवडा लागायचा त्यामुलांच्या सोबत वेळ घालवण्याची संधी जर मिळाली आहे तर तीच सोनं करा ना, पण नाही,सहजासहजी एखादी गोष्ट मान्य करतील ते बीडकर कसले .
समजा तुम्ही बाहेर गेलात अन दुर्दैवाने तुम्हाला हा आजार झाला तर 14 दिवस ते 28 दिवस एकट्याने रुग्णालयात राहावे लागेल ते सोपे नाही मग कशाला विषाची परीक्षा घ्यायची .या जगात जो जन्माला आला तो प्रत्येक जण एक ना एक दिवस मरणारच आहे पण त्या मरणाची तयारी आपण स्वतःच का करा,सरणावर जायची एवढी घाई अन पुंगी वाजवून तो कोरोना नावाचा साप का घरात घुसवून घ्या.
त्यामुळे अतिशहानपणा न करता आयुष्यात कधी तुम्हाला बाहेर पडायला अन खरेदीला जाण्याची संधी मिळालीच नाही असं वागता गपगुमान घरात रहा,आज काही दिवस घरात राहिलात तर या जगात रहाल नाहीतर चांगला होता म्हणायला सुद्धा लोक धजवणार नाहीत,कारण या अशा काळात जर तुम्ही मेलात तर हाताने मस्ती केली ,जाऊ नको,फिरू नको म्हणत होते तरी गेला अन जीवाला मुकला असच लोक बोलतील अन ती वस्तुस्थिती असेल,म्हणून च नम्र विनंती आहे की या संकटकाळात बाहेर पडून आपल्यासोबतच कुटुंब आणो देशवासीय यांचे प्राण धोक्यात घालण्यापेक्षा घरी रहाणं प्रशासन आणि शासनाला सहकार्य करा .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

शनिवार, २१ मार्च, २०२०

माज कराल तर जीवानिशी जाल ...........!


माज चांगला नाही ............!
संपूर्ण जग ज्या भीतीच्या सावटाखाली सध्या जगतंय ते पाहिल्यानंतर प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे मात्र काही लोक अजूनही याबाबत जागृत नसल्याचे दिसत आहे,सरकार,प्रशासन सामाजिक संस्था सगळेच दक्ष राहण्याची हात जोडून विनंती करत असताना दीड शहाणे लोक मात्र अजूनही रस्त्यावर फिरताना,प्रतिबंधक उपाययोजना पायदळी तुडवताना दिसत आहेत,हा माज चांगला नाही ,नाहीतर एकाच्या मुर्खपणामुळे हजारो,लाखोंना आपला जीव गमवावा लागेल .
कोणत्याही आपत्ती ला इष्टापत्ती मध्ये रूपांतर करण्याची मानवी मानसिकता आहे,कोरोना बाबतही अस करता येऊ शकतं पण त्यासाठी हवी आहे सामूहिक संघटनशक्ती आणि इच्छाशक्ती .कारण या आजारापासून दूर राहायचं असेल तर प्रत्येकाने आपल्याला गर्दीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे .
मानवी जन्म हा चौऱ्या ऐंशी योनी मधून गेल्यानंतर मिळतो अस म्हणतात मग हे माहीत असूनसुद्धा आपण एवढं अमूल्य अस जीवन हसतखेळत जगण्यापेक्षा ,चार आठ दिवस घरात बसण्यापेक्षा बाहेर फिरून का धोक्यात घालतोय हा न उलगडणारा प्रश्न आहे .
चीनमध्ये साधारणपणे डिसेंम्बर च्या सुमारास कोरोना व्हायरस ची लक्षणे दिसून आली,त्या देशाने या व्हायरस शी दोन हात करण्यासाठी उपाययोजना देखील सुरू केल्या,अगदी दहा हजार खाटांचे रुग्णालय अवघ्या एक महिन्यात उभारले,हे सगळं करण्यामागे अखंड मानवजातीचे रक्षण हाच हेतू त्यांचा होता .हा विषाणू भारतापर्यंत किंवा इतर देशापर्यंत येता येता फेब्रुवारी मार्च उजाडला .
मार्चच्या पहिल्या आठवड्यात ज्या इटलीमध्ये कोरोनाची नुकतीच लागण झाली .त्याच देशात 20 मार्चपर्यंत पन्नास हजारच्या घरात लोकांना लागण झाल्याचे समोर आले आहे .तर चीन सारख्या देशात देखील या विषाणू ने लाखो लोकांना आपल्या कवेत घेतले आहे .
भारतात देखील या विषाणूमुळे तिनशेच्या आसपास लोकांना लागण झाली आहे . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री हे जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहेत .
हा आजार संसर्गजन्य आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे,मात्र भारतासारख्या देशात अजूनतरी एखाद्या मोठ्या समूहाला हा आजार झाल्याचे समोर आलेले नाही हे सुदैव आहे .मात्र त्यामुळे धोका टळलेला नाही .धोका कायमच आहे,त्यासाठी गोळ्या औषधे तर आहेतच पण काळजी घेण जास्त महत्वाचं आहे .
जगाच्या पाठीवर हा एकमेव प्रसंग असा आहे की याचा कुठेही निषेध केला गेला नाही,किंवा याच्या विरोधात कुठेही आंदोलन,मोर्चे,उपोषण केले गेलेले नाही .सगळेजण हातात हात घालून याच्याशी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत .सरकार कोणाचे आहे अन विरोधात कोण आहे याचा विचार न करता,कोण कुठल्या धर्माचा,जातीचा,पंथाचा आहे याचाही विचार न करता लोक एकत्र येऊन या संकटाचा सामना करत आहेत हे विशेष आहे .
मराठवाड्यात 21 आणि 22 मार्च रोजी बंदचे आवाहन केले आहे .तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यु चे आवाहन केले आहे .याचे पालन करणे हे सजग नागरिक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे .परंतु लोक मात्र त्याकडे जास्त लक्ष देत नसल्याचे चित्र आहे .
या जगाच्या पाठीवर असा कोणताही मनुष्य प्राणी नाही की जो काही दिवस,महिने घराबाहेर पडला नाही तर जगबुडी होईल .जगाची आर्थिक वाढ खुंटल ,काही दिवस आपण जर घरात बसून राहिलो तर कोणाचं काहीच नुकसान होणार नाही मग आपण का आटापिटा करतोय ही न कळणारी बाब आहे .
या आजारापासून बचाव करायचा असेल तर समूहाने एकत्र येणे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक आहे, अशावेळी काही हौशी लोक मात्र सर्रास बाहेर बोंबलत फिरतानाचे चित्र आहे .बंद म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच असल्याचे ते समजत आहेत .लोकांना कळकळीने सांगितले तरी ते घराबाहेर पडत आहेत .स्वतः पंतप्रधान, मुख्यमंत्री सांगत आहेत की अन्न धान्याचा साठा करू नका,घरातच बसून रहा, लोकसंपर्क टाळा मात्र तरीही लोक शहाणपणा करून आपल्या सोबत इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत .जिथं मंदिर मस्जिद,चर्च,गुरुद्वारा बंद आहेत,देवदर्शन,सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे तिथं घराबाहेर पडून आपण अस काय साध्य करणार आहोत .विनाकारण बाहेर पडल्याने फार काही देशहिताचे काम आपण करणार नाहीत मात्र तरीही लोक मजाक म्हणून बाहेर निघत आहेत .
सध्याच्या इंटरनेट आणि सोशल मीडिया च्या जमान्यात घरबसल्या सगळं उपलब्ध असताना आपण बाहेर जाण्याचा अट्टहास का करतो आहोत हेच कळत नाही .एखाद्या आजारामुळे का होईना आपण घरात बसून आहोत याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपण घराबाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहोत हे लाजिरवाणे आहे .
लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करणे हे आपले परम कर्तव्य असताना त्यावेळी मात्र आपण घरात बसणे, पिकनिक ला जाणे पसंत करतो,मात्र आज घरी बसण्याची अत्यंत गरज असताना आपण घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत .घरात लेकरं बाळ आहेत,आईवडील,भाऊ बहीण आहेत,गावाकडे अनेक महिन्यांनी,वर्षांनी आलेले पै पाहुणे आहेत,त्यांच्याशी बोला, गप्पा मारा,खेळ खेळा, मनपसंत टीव्ही सिरीयल पहा,वाचन करा,जीवनाचा आनंद घ्या ना,कशाला पाहिजे बाहेर हिंडण, फिरणं.
एकीकडे आपण इंटरनेट आणि मोबाईलमुळे माणूस माणसापासून दूर चालल्याची रोजच चर्चा करतो अशावेळी निसर्गानेच आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिली आहे अस समजून जर घराबाहेर न पडता प्रशासन आणि सरकारला सहकार्य केले तर निश्चितपणे या संकटाला आपण सहजपणे दूर करू शकतो ,हे माहीत असूनसुद्धा आपण रस्त्याने अत्यन्त निष्काळजीपणे फिरत आहोत .हर कुठंतरी थांबल पाहिजे .
हा आजार वैयक्तिक काळजी घेतल्यास आटोक्यात येऊ शकतो हे सत्य आहे त्यामुळे माज न करता घरातच बसून रहा ,तुम्ही जर स्वतःची काळजी घेतली तर तुमच्यासोबतच समाज देखील सुदृढ आणि सक्षम राहील हे निश्चित .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

शनिवार, ७ मार्च, २०२०

प्रोडक्ट नव्हे प्रोडक्टिव्ह ...............!


प्रोडक्ट नव्हे प्रोडक्टिव्ह .............!

दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर जॉनी लिव्हर यांचा एक व्हिडिओ पाहिला, म्हाताऱ्या झालेल्या आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती काय म्हणते आहे हे मुलांना कळत नाही अन ते चिडचिड करतात,शेजारी असलेले डॉक्टर सांगतात की तुम्ही आम्ही लहान असताना आपलं बोबड बोलणं ज्या आईला न सांगता कळतं तिचं म्हातारपणी च बोलणं आपल्याला कळू नये हे दुर्दैव आहे,तिच्या जवळ बसा, प्रेमाने हात हातात घ्या अन तिच्याशी बोला बास तिला काही नको .हा व्हिडीओ पाहिला अन मनात कालवाकालव झाली .स्त्री मग ती आई असो,बहीण असो नाहीतर पत्नी असो किंवा मैत्रीण ,किती सोसते पण तिच्या नशिबी मात्र कायम अवहेलना अन उपेक्षाच येते,तिला एक दिवस शुभेच्छा द्यायच्या अन वर्षभर अन आयुष्यभर मात्र मनःस्ताप द्यायचा किंवा तिने तो सोसायचा हे कुठवर चालणार .
अनादी काळापासून स्त्री ही शोषित आहे .मग ती रामायण महाभारतातील राजकन्या असो किंवा पट्टराणी ,तिच्या नशिबी कायम हाल अपेष्टा अन अवहेलना च आलेली आहे .स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून आजही तिच्याकडे पाहिले जाते .तिला काय कळतं अस म्हणून कायम तिला डावलल जातं. तिचा पदोपदी अपमान केला जातो .प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते अस म्हणलं जात मात्र हाच पुरुष एखाद्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभा असलेला अभावानेच जाणवतो किंवा दिसतो .हे अस का होतं याच उत्तर माहीत असूनही कोणीच पुढे येऊन देत नाही .
एखादी स्त्री सुंदर असेल,चांगलं रहात असेल ,व्यवस्थित बोलत असेल,तिच्या कामातून वेळ काढून जर सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असेल तर लगेच तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात .विशेष म्हणजे यात महिलांचाच मोठा सहभाग असतो .स्त्रियांना ईश्वरानेच सुंदर रूप दिलं आहे,ते सांभाळण्यासाठी ती जर प्रयत्न करत असेल,जगाच्या राहटगाडग्यात ती जर खंबीरपणे उभे राहून आपलं अस्तित्व सिद्ध करत असेल तर इतरांना अडचण असण्याच काहीच कारण नाही .पण समाजाला ते मान्य नसतं .अशी स्त्री लगेच बाहेरख्याली आहे,तीच कुणासोबत तरी लफडं आहे अस म्हणून तिला बदनाम केलं जातं .खरंतर स्त्री च रूप हे तिच्यासाठी एक वरदान आहे मात्र सुंदर स्त्रीबद्दल जेव्हा तिच्याच सारख्या स्त्रिया नको ती चर्चा करतात तेव्हा हेच सौंदर्य अभिशाप ठरतं .
आज भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात एकीकडे प्रतिभा पाटील,सोनिया गांधी,सुमित्रा महाजन अशा एक ना अनेक स्त्रिया आपलं अस्तित्व सिद्ध करत असताना दुसरीकडे स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जाण्याची अनेक उदाहरणे आपल्या आसपास दिसतात .महिलांच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या वाट्याला देखील समाजाकडून उपेक्षाच आली मात्र त्यांनी त्याला न जुमानता आपलं कार्य सुरू ठेवलं, ज्यामुळे आज महिला,मुली ताठ मानेने शिकत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत .
स्त्री भ्रूण हत्येचा विषय असो की हुंडाबळी अथवा मानसिक,शारीरिक छळाचा विषय असो,नीट अभ्यास केल्यास लक्षात येतं की या सगळ्या ठिकाणी एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीवर अन्याय करण्यासाठी पुढे असते .सासू सुनेचा छळ करते,मुलगी नको म्हणून तिच्यावर अन्याय अत्याचार केले जातात .हुंड्यासाठी सुनेचा छळ करणारी देखील एक स्त्रीच असते ,अठरा वीस वर्षे आपल्या घरात,आपल्या नजरेखाली वाढवलेल्या मुलीला सासरी पाठवल्यावर तिच्या संसारात लुडबुड करणारी आई देखील एक स्त्रीच असते,एवढच नव्हे तर बहुतांश वेश्या वस्त्या असोत की कुंटणखाने या ठिकाणी एक स्त्रीच पुढाकार घेताना दिसते .हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर मन विषण्ण होतं .
एक स्त्रीच दुसरीचा दुस्वास कसा करू शकते हा न सुटणारा प्रश्न आहे .तस पाहायला गेलं तर स्त्रीने ठरवलं तर ती होत्याच नव्हतं अन नव्हत्याच होतं करू शकते .ती सरस्वती आहे,अंबा आहे,तशीच ती दुर्गा देखील आहे .ती देघरातला नंदादीप आहे,मात्र तिच्यातील शक्ती ला व्यासपीठ मिळत नाही अन मिळालं तर तिथंही दुसरी कोणीतरी स्त्रीच तिला आडवी येते .हा सगळा प्रकार थांबला तर स्त्री ही नवदुर्गा होऊ शकते .याचा अर्थ स्त्रियांच्या या अवस्थेला पुरुष जबाबदार नाहीत असा होत नाही .स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे हा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे .प्रत्येक स्त्री ही स्वतंत्र आहे, तिला तीच अस्तित्व आहे हे पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे .रस्त्याने चालताना असो की एखाद्या सभा समारंभात असो,स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजेच .स्त्रीच शरीर म्हणजे पुरुषांचा हक्क आणि त्यांची वासना शमविण्यासाठी च स्त्रीचा जन्म आहे ही मानसिकता बदलली पाहिजे .
आपली आई,बहीण,बायको यांच्यानंतर प्रत्येक स्त्री ही आपल्या वासना शमविण्यासाठी आहे अस पुरुष जोपर्यंत मानतात तोपर्यंत स्त्री ही सबला होऊच शकत नाही .
आजही एकीकडे मोठं मोठ्या पदावर स्त्रिया यशोशिखर पादाक्रांत करीत असताना शेतात राबणारी,कचरा वेचणारी, भांडे धुणे करणारी स्त्री कायम उपेक्षित च राहिलेली दिसते .हे कुठंतरी थांबल पाहिजे .जी स्त्री नऊ महिने आपल्या पोटात गर्भाला वाढवते,वर्ष दोन वर्षे आपल्या छातीशी कवटाळून स्तनपान करून मुलाला ,मुलीला वाढवते,पोसते त्याच स्त्रीच्या बाबत आपण इतका राक्षसी विचार कसा करू शकतो याच आत्मपरीक्षण प्रत्येक पुरुषाने करण्याची गरज आहे .
पुरुषाने नोकरी करायची,चार पैसे कमवायचे अन स्त्रीने चूल अन मूल सांभाळायचं ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे .स्त्री ही उपभोगाची नव्हे तर उपयोगाची वस्तू आहे,तिला सोबत घेतल्यास जग जिंकता येतं हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं .देशात आज वाढते बलात्कार, अत्याचार अन्याय पाहिल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो की खरच आपण स्त्री ला माता मानतो का .कथा असो की कादंबरी किंवा सिनेमा, नाटक या ठिकाणी स्त्री ही शोषित ,पीडित दाखवली जाते .हे कुठंतरी थांबल पाहिजे .महिला दिन आहे म्हणून एक दिवस स्त्रीचा सन्मान करायचा,तिच्याबद्दल चांगलं चांगलं बोलायचं,लिहायचं,तिचा गौरव करायचा अन नंतर मात्र तिच्यावर सातत्याने अन्याय अत्याचार करायचे हे योग्य नाही .
कोणतीही स्त्री ही स्वखुशीने वेश्या व्यवसाय किंवा व्यभिचार करत नाही किंबहुना तिला या दलदलीतून बाहेरच पडायचं असतं, मात्र समाजाचे ठेकेदार,पुरुष मंडळी तिला या दलदलीत घट्ट रोवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत .झोपडीत राहणारी असो की राजमहालात राहणारी असो कोणत्याही स्त्री चा सगळ्यात मोठा दागिना तिची इभ्रत असते ,त्यासाठी ती प्रसंगी आपला जीव देखील द्यायला तयार असते मग तीच स्त्री या अशा कामात कशी खुश असू शकेल .याचा विचार झालाच पाहिजे .
अलीकडच्या काळात वाढते अत्याचार,अन्याय यावर बोलताना बहुतांश वेळा महिला,मुलींच्या पेहरावाबद्दल आक्षेप घेतला जातो .कदाचित तो योग्यही असेल पण उघड नागड फिरायचा ठेका काय फक्त पुरुषांनाच आहे का याचा विचार का केला जात नाही .स्त्री ने आपला पदर सांभाळावा अस म्हटलं जातं .मुली जीन्स,टॉप,वनपीस,टू पीस घालतात त्यामुळे पुरुषांची मानसिकता बिघडते अस सांगून सर्रास या अशा नराधम लोकांच्या समर्थनार्थ बोललं जातं.मग हेच जर आपल्या आई,बहिणीबद्दल किंवा बायको बद्दल कोणी बोललं तर मात्र आमचा इगो जागा होतो ,हे अस का होत याचाही विचार व्हायला हवा .स्त्रियांनी राहणीमान बदलले आहे कारण ती आजची गरज आहे,त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे,पण तस न करता कोणीही उठतो अन स्त्रीच्या राहणीमानाबद्दल टिकटिपनी सुरू करतो .हे करताना आपण विसरतो की आपण काय पेहराव करतो,आपली मानसिकता काय आहे याचा आपल्याला का विसर पडतो .
एक मुलगा शिकला तर एक कुटुंब सुधारू शकतं पण एक स्त्री शिकली तर एक पिढि सुधारते हे आपण केवळ भाषणापूरत का लिमिटेड करून ठेवतो .
आज अस कोणतं क्षेत्र आहे ज्यात महिला,मुली या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत नाहीत .राजकारण असो की समाजकारण ,विज्ञान असो की तंत्रज्ञान, व्यवसाय असो की उद्योग या प्रत्येक क्षेत्रात मुली,महिला बरोबरीने नव्हे काकणभर पुढेच आहेत .तरीदेखील स्त्री ही अबला आहे,तिला काही कळत नाही,ती भित्री भागूबाई आहे अस म्हणून तिला हिनवल जातं, हे चूक आहे .स्त्री ही घराचा आधार असते,स्त्री ही समाजाला शिस्त लावणारी हेडमास्तर असते,स्त्री ही समाजाचा आरसा असते त्यामुळं ती स्त्री जर अबला असेल तर समाज सुदृढ आणि सक्षम कसा होऊ शकेल .या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास निश्चितपणे स्त्री ही दीन न राहता सक्षम,खम्बीर ,धाडसी होऊ शकेल यात शंका नाही .
स्त्री ही एक प्रॉडक्ट् नसून ती प्रोडक्टिव्ह आहे,ती नवनिर्मितीचा स्रोत आहे, तिच्या पोटातून मनुष्याची निर्मिती होते याचा विसर अलीकडच्या काळात पडल्याने स्त्री चा जागोजागी अवमान होत असल्याचं चित्र आहे .स्त्री फक्त शोषणासाठीच असते ही भावना वाढीस लागल्याने ती पोषण देखील करू शकते हे समाज विसरत चालला आहे .स्त्रीच शरीर हे कमनीय बांधा नसून सहनशक्तीच आगार आहे हे कायम लक्षात ठेवायला हवे .तरच खऱ्या अर्थाने स्त्रीचा मान,सन्मान राखला जाईल अन ती समाजाला पुढे घेऊन जाईल .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड .
9422744404 .

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

देवदरबारी सेवेस निघाला कीर्तनकार ..............!


किर्तनसूर्य निघाला देवदरबारी 
सेवा रुजू करण्यासी ........!!

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या गाथेत मृत्यूचे वर्णन करताना सांगतात की,
"झाला प्रतिरूप शरीराचा भाव |लक्षीयेला ठाव स्मशाणीचा ||रडती रात्रंदिवस कामक्रोध माय|
म्हणती हाय हाय यमधर्म ||वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा| ज्ञानाग्नि लागला ब्रम्हत्वेसी ||
फिरविला घाट फोडीला चरणी |महावाक्य ध्वनी बोंब झाली || दिली तिलांजली कुलनामरूपासी | शरीर ज्याचे त्यासी समर्पिले || तुका म्हणे रक्षा झाली आपोआप | उजळीला दिप गुरुकृपा ||

याप्रमाणे राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी हे वैकुंठाच्या प्रवासाला निघून गेले असले तरी त्यांची कीर्ती अन त्यांचं देव,देश अन धर्माप्रतीच कार्य अनादी काळापर्यंत स्मरणात राहील हे निश्चित .
जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणारच आहे,शरीर हे नश्वर आहे आत्मा अमर आहे हे कटुसत्य आहे पण काही लोकांचं जाणं मनाला चटका लावून जातं, राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्या निधनाची बातमी काळजाचा ठोका चुकवणारी होती,प्रकांड पंडित असणारा,कोणताही विषय लीलया पेलणारा ,कोणत्याही दुःखावर सहज मात करून सुखाशी हातमिळवणी करणाऱ्या या माणसाला मृत्यूवर मात्र विजय मिळवता आला नाही,बुवा अस अर्ध्यावर सोडून जाणं काही पटलं नाही हे मात्र खरं .
गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या छोट्याशा गावातून कीर्तनाच्या माध्यमातून आपलं नाव सातासमुद्रापार नेण्याचा भीमपराक्रम भरतबुवा रामदासी यांनी केला होता .त्यांच्याबद्दल काही लिहीन म्हणजे सूर्याला त्याच्या तेजस्वी पणाबद्दल आरसा दाखवण्या सारख आहे .साधारणपणे पाच फूट उंची,अंगावर नेहरू,शुभ्र धोतर आणि गळ्यात पांढरा गमजा, कपाळावर चंदनाचा टिळा अन बुक्का अस त्यांचं रूप पाहिल्या नंतर कोणालाही ते तेजस्वी पुरुष आहेत हे लक्षात यायचं .
भरतबुवा म्हणजे एक चालत बोलत विद्यापीठ होते,अध्यात्मिक,ऐतिहासिक, साहित्यिक,सांस्कृतिक,पौराणिक असा कोणताही विषय असला तरी ते हजारो,लाखो लोकांच्या काळजाला भिडेल अन मनाला पटेल असं कीर्तन करायचे .माणूस येताना रिकाम्या हाताने येतो अन जातानाही रिकाम्या हातानेच जातो हे खरं असलं तरी गेल्यानंतरही तुम्ही तुमच्या कीर्ती,कार्यामुळे कायम स्मरणात राहू शकतात .मरावे परी कीर्ती रुपी उरावे अस काहीस बुवांच्या बाबतीत म्हणावं लागेल .एक आदर्श ते समाजासमोर ठेवून गेले आहेत .बुवा कीर्तनकार होते,बुवा हभप होते,बुवा माणुसकीचा झरा होते,बुवा पितृतुल्य होते,बुवा समाजाचा आधार होते,बुवा संतसाहित्याचे गाढे अभ्यासक होते .
रामकृष्ण ही आले गेले त्याविन का जग हे बुडाले अस म्हणतात हे सत्य असले तरी भरतबुवा यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबासोबतच समाजाचे अपरिमीत नुकसान झाले आहे ते कधीही भरून निघणार  नाही  हे नक्की .भरतबुवा रामदासी हे रामदासी पंथातील होते,सहसा कीर्तनकार हे  सहजपणे लोकांत मिसळून त्यांना देवाधर्माच्या कार्यात सहभागी करून घेणारे असतात .मात्र भरतबुवा हे देव आणि मनुष्य यांच्या मधील महामार्गावरील मैलाचा दगड होते .नारदीय असो की वारकरी अथवा सांप्रदायिक कीर्तन,ते चौकोनी चिरा होते .सर्वच कीर्तनातून ते समाजप्रबोधन करण्यासोबतच भगवंत भक्तीचे धडे देत असत .
भरतबुवा अन माझं एक वेगळं नातं होत कारण ते माझ्या गावचे म्हणजे रुईचे होते,कधीही कुठेही भेटले की सुहास्य मुद्रेने स्वागत करून मला तुमचा अभिमान वाटतो अस म्हणत पाठीवर थाप देणार .मात्र आता पाठीवर थाप देणारा तो हात अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे .
पृथ्वीवर हजारो लाखो मंदिर आहेत की ज्यांच्या कळसाचे दर्शन झालं तरी आपण हात जोडतो मात्र असे पाय खूप कमी आहेत की जिथं आपण नतमस्तक होतो,ते पाय होते भरतबुवा,जे भेटले की आपसूक हात जोडले जायचे .
माणूस कितीही मोठा झाला,पैसा ,संपत्ती कमावली तरी त्याला भेटल्यावर जर आपलेपण वाटत नसेल तर त्याच्या जगण्याला काही अर्थ नसतो मात्र भरतबुवा याला अपवाद होते .त्यांना भेटल्यावर नेहमी आपण देवदूताला भेटत आहोत असा भास व्हायचा .लहान मूल असो की तरुण अथवा वृद्ध ते सगळ्यांसोबत एडजेस्ट व्हायचे,आपल्या ज्ञानाचा त्यांना कधीही दुराभिमान नव्हता,गर्व नव्हता .माणूस म्हणून एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते बुवा . बुवा केवळ किर्तनच करायचे अस नाही तर ते छान लिहायचे सुद्धा,लोकमत असो की लोकसत्ता अथवा महाराष्ट्र टाईम्स अशा अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी सातत्याने संत साहित्यावर लिखाण केले आहे .
काही दिवसांपूर्वी त्यांची भेट एका बैठकीनिमित्त झाली होती तेव्हा त्यांनी स्वतःबद्दल बोलताना सांगितले होते की मी कोण आहे,किती मोठा आहे यापेक्षा मी माणूस आहे अन ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती माझं काही देणं लागत अस मानतो म्हणून मी समाजकार्यात सहभागी होतो .बुवा शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक कार्यात सहभागी होते हे मात्र खरं आहे .अगदी दोन दिवस अगोदर त्यांनी महेश कुलकर्णी यांच्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले होते .
ठेविले अनंते तैसेचि रहावे ,चित्ती असू द्यावे समाधान या प्रमाणे भरतबुवा आयुष्य जगले . त्यामुळे ईश्वराने देखील त्यांना काहीच कमी पडू दिले नाही . ऋतुपर्ण सारखा पुत्र दिला ज्याने आईबापांच्या नावाचा झेंडा अटकेपार नेला .मुलाच्या कीर्तनाचे गुणगान करीत सूत्र संचलन करण्याचा योग बिडकरांनी कीर्तन महोस्तवात याची देही याची डोळा अनुभवला आहे .त्यांच्या पत्नी देखील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत .
"जिंदगी जिंदादिली का नाम है,मुर्दादिल क्या खाक जिया करते है " हे ब्रह्मवाक्य त्यांनी आपल्या काळजात कोरून ठेवलं होतं,त्यामुळे ते नेहमी समाधानी होते .ईश्वरी साक्षात्कार ते जेव्हा कीर्तनातून  लोकांपुढे मांडायचे तेव्हा आपण जणूकाही देवाच्या दरबारात उभे आहोत असा भास व्हायचा .तुकाराम गाथा असो की ज्ञानेश्वरी अथवा भगवतगीता त्यांना मुखोदगत होती .शरीराची उंची कमी असली तरी समाजातील उंची मात्र त्यांनी हिमालयएव्हढी गाठली होती .देव आणि मनुष्य यांच्या मार्गातील या मैलाच्या दगडाने परिस्थितीचे अनेक घाव सोसले आहेत मात्र त्याबद्दल कधीही तक्रार न करता त्यांनी संघर्ष करीत सुखाचे दिवस निर्माण केले .
बुवा इतक्या अकाली जातील हे कोणालाही स्वप्नात सुद्धा वाटले नसेल .शरीर हे नश्वर आहे हे सगळ्यांना सांगणारे बुवा इतक्या सहजपणे संसाराचा त्याग करून निघून जातील यावर अजूनही विश्वास बसत नाही .जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला हे जरी सत्य असले तरी बुवा तुम्ही इतक्या अकाली जाण्याने आम्ही पोरके झालो हो .देवाकडे घेऊन जाणारा देवदूतच देवाने आमच्यातून खेचून नेला आता आम्ही कोणामार्फत आमचं गाऱ्हाणं देवाकडे मांडायचे .
भरतबुवा यांनी सांगली,सातारा,पंढरपूर या भागात हजारो विद्यार्थ्यांना कीर्तनाचे मोफत शिक्षण दिले आहे,जिथे जिथे जातील तिथे तिथे कीर्तनाच्या माध्यमातून देव,देश अन धर्मसेवा करण्याचं अखंड व्रत त्यांनी घेतलं होतं . ते कीर्तन करताना असा अनुभव यायचा की जणूकाही आपण देवाच्या दरबारात उभे आहोत .भाषाप्रभु,वाणीवर सरस्वतीचा वास असलेला हा विठ्ठलाचा भक्त आपल्या सावळ्याच्या सेवेसाठी एवढ्या लवकर अनंताच्या प्रवासाला निघून जाईल यावर अजूनही विश्वास बसत नाही .बुवा एकच शब्द देतोत की तुम्ही चेतवलेली भगवतभक्तीची ही मशाल कायम तेवत राहील अन तुम्ही आमच्या मनात कायम रहाल .तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली !

लक्ष्मीकांत रुईकर, बीड

9422744404 .

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

बांगडीच दुःख .................!


बांगडीचं दुःख.....................!

रस्त्याने चालताना टचकन आवाज झाला अन माझी विचारांची तंद्री अचानक विस्कळीत झाली,पायाखाली काय आलं म्हणून पाहावं म्हटलं तर एक फुटकी बांगडी दिसली,चार पाच ठिकाणी तूटली होती बिचारी,का कोण जाणे पण आतून एक आवाज आल्यासारखा झाला अन तुटलेली,पिचलेली ती बांगडी मी सहज उचलून हातात घेतली,तिला मी स्पर्श करताना माझं मलाच काहीतरी विचित्र होत असल्याची जाणीव झाली ,कदाचित ती अंग चोरते आहे की काय अस मला वाटलं,तरी देखील मी तिला अलगद उचलून माझ्या जवळच्या एका स्वच्छ पांढऱ्या रुमालात व्यवस्थित ठेवलं अन मला लक्षात आलं की ती खरोखरच खूप घाबरलेली,सैरभैर झालेली आहे.तिची नजर ,तिचे विस्फारलेले डोळे माझ्याकडं ,माझ्या प्रत्येक हालचालीकड एकटक बघत होते,जणू काही मी आता नेमकं काय करणार आहे याचा ती हळुवारपणे अंदाज घेत होती.

तिच्या नजरेतील असह्यपणा मी देखील जाणू शकलो नाही असं काही नव्हतं,यापूर्वी मी अनेकदा रस्त्यावरून जाताना कित्येकदा रस्त्यात ,कडेला,दुकानाच्या बाहेर अनेक तुटलेल्या बांगड्या पाहिल्या होत्या,मात्र आजचा तिच्याबद्दलचा अनुभव काही निराळाच होता,मी रुमालात हळुवारपणे ठेवलेल्या तिच्याकडं बघितलं तर ती अद्यापही भेदरलेलीच दिसत होती,काही तरी अघटित झालं आहे याची कल्पना एव्हाना मला आली होती .

नेमकं काय झालं असेल याचा अंदाज बांधण्याचा मी प्रयत्न करीत होतो मात्र काहीच सुचत नव्हतं,मनात अनेक शंका कुशंका नि थैमान घातलं होत,यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं परंतु आज मात्र एक वेगळीच भीती तिच्या स्पर्शामुळं मनात तयार झाली होती.का कोण जाणे पण खूप काहीतरी भयानक घडलं आहे याचा अंदाज आला होता .डोक्यात सुरू असलेलं वादळ बाजूला ठेवून मी तिच्याकडं निरखून पाहू लागलो,बराच काळ गेल्यानंतर तिच्याही लक्षात आलं असावं की ज्या माणसानं आपल्याला आधार देऊन जवळ घेतलं आहे ते हात,तो माणूस भला असावा म्हणून ती देखील थोडी सावरली होती .

बराच काळ आमच्या दोघांमध्ये एक भयान शांतता होती,अगदी हळुवारपणे आपल्या पिलासाठी साखरेचा दाना घेऊन जाणाऱ्या मुंगीच्या पावलांचा देखील आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू यावा एवढी भयाणक शांतता होती.शेवटी मीच या शांततेला तोंड फोडलं अन नेमकं काय झालं हा प्रश्न केला,माझा प्रश्न एकूण इतका वेळ शांत असलेल्या तिने पुन्हा एकदा जोरात हंबरडा फोडला .

तिचा तो आवाज काळीज पिळवटून टाकणारा होता,इतक्या वेळ असलेल्या शांततेला भेदून या आवाजाने नभांगणातील ताऱ्यांना देखील घाम फुटला असावा .तिच्या त्या आवाजाने मला नेमकं काय झालं असेल याचा पूर्णपणे अंदाज आला,मी काहीही न बोलता फक्त तिच्याकडं बघत होतो,तिची प्रत्येक हालचाल टिपण्याचा प्रयत्न करीत होतो,न बोलताही तिनं त्या किंकाळीतून सगळं काही सांगितलं होतं .बराच काळ मी न बोलता थिजल्यासारखा जागच्या जागी बसून होतो,अखेर मी तिला प्रेमानं जवळ घेत नेमकं काय,कसं, कुठं,कधी घडलं,कोणी केलं,का केलं,असे एक ना अनेक प्रश्न एका दमात विचारले अन पुन्हा तिच्या उत्तराची वाट पाहत बसलो .

बराच काळ लोटल्यानंतर आणि मी कोणी तरी विश्वास ठेवण्यासारखा माणूस आहे याची खात्री पटल्यानंतर तिने मला आपली कर्मकहानी सांगायला सुरुवात केली,मी तुम्हाला दादा म्हणू शकते का ? या तिच्या प्रश्नाने मी देखील जरा स्थिरावलो .पण तिच्या त्या प्रश्नाने माझ्या मनाची मात्र चलबिचल झाली,कारण त्या प्रश्नांन माझं एक नातं निर्माण केलं होतं,तसा मी खूप नात्यात अडकून राहणारा नाही पण हे अनामिक नातं मात्र काळजात घर करणार होतं, तिच्या दादा या शब्दात जो विश्वास होता तो जाणवला मला.म्हणलं बोल बिनधास्त बोल,काय झालं तुला ,का अशी अवस्था झाली तुझी,रस्त्यात अशी का पडली होतीस विव्हळत .तशी ती म्हणाली दादा सांगते सगळं सांगते जरा श्वास तर घेऊ दे .

इतका वेळ शांत असलेला मी जरा स्थिरावलो आणि प्राण कानाशी आणून ऐकू लागलो,तिनं सांगायला सुरुवात केली,का रे दादा जेव्हा माणसाचा जन्म होतो तेव्हा पाचव्या दिवशीच मला हातात प्रेमानं घातलं जात,मुलगा असो की मुलगी माझ्या असण्यानं त्यांच्या सौंदर्यात भरच पडते,माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत सोबत असणारी मी आज मात्र पूर्णपणे खचून गेले आहे, सुवासिनींचा दागिना म्हणून मिरवताना मला कोण आनंद होतो ते शब्दात नाही सांगता येणार,एवढंच काय पण एखादी सुवासीन जेव्हा तीच कुंकू पुसलं जात तेव्हा देखील मला तिचा हात सोडून जाताना प्रचंड वेदना होतात .मात्र आज माझीच मला लाज वाटू लागली आहे,मी किती असाह्य आहे हे या समाजाने मला आज दाखवुन दिलं आहे .
मी तुझ्या लेकीची लाडकी असते,बायको मला हळुवारपणे सांभाळते तर आई अन बहीण या मला जीवापाड प्रेम देऊन जपतात,मैत्रीण देखील मला घरची वागणूक देतात हा सगळा आनंद असताना एक वेदना मात्र कायम मनात घर करून राहते आहे की ज्यांच्या हातात मी थाटात मिरवते तीच आयुष्य जेव्हा कोणी नराधम विस्कटून टाकतो ना तेव्हा माझीच मला लाज वाटते .
आजकाल माणूस ज्या पशूंच्या वृत्तीने वागतो आहे ना ते पाहिल्यावर आया बायांनो यापुढे तुम्ही हातात हात घालून मला मिरवण्यापेक्षा हाती शस्त्र घ्या अन तुमच्या इभ्रतीवर दरोडा घालणाऱ्या नरपशूंच्या नरडीचा घोट घ्या अस म्हणावं वाटत आहे .अरे आज मी जीच्यासोबत होते ना काय दोष होता तिचा,ती सुंदर होती दिसायला,लडिवाळ होती बोलायला,डोळे तिचे जुल्मीगडे असे होते,केशसंभार करून ती निघाली होती उच्च शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला .तिच्या जन्मापासून मी सोबत असल्याने कित्येकदा एकांतात तिने मला मनातल्या गोष्टी सांगितल्या आहेत,मात्र काही वासनांध लोकांची नजर तिच्या देहावर पडली अन त्यांनी ती कळी उमलण्याआधीच कुस्करून टाकली रे,तीच हे वाक्य ऐकलं अन माझं काळीज पिळवटून निघालं .
तस पाहिलं तर ती होती एक बांगडी,निर्जीव वस्तू पण लेकीबळींच्या स्पर्शाने ,कुरवळण्याने तिच्यात सुद्धा प्राण आले होते, म्हणूनच तिची वेदना आज माझ्या कानी पडली .अरे दादा,या तिच्या आवाजाने मी पुन्हा भानावर आलो,म्हणलं काही नाही ग,पण कोणी केलं हे सगळं,कोण होते ते,त्यांना आया बहिणी नव्हत्या का?या माझ्या प्रश्नावर ती कुस्तीक पणे हसली अन म्हणाली अरे आपलं ते लेकरू अन दुसऱ्याचं ते कार्ट ही जगाची रितच आहे वेड्या हे अजूनही तुला कसं नाही कळलं .
आपल्या आई,बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर तळपायाची आग मस्तकाला जाणारा पुरुष जेव्हा रस्त्याने जाताना ,येताना,कार्यालयात बसल्यावर,कामाच्या ठिकाणी,बाजारात,सार्वजनिक सभा ,समारंभात दुसऱ्या स्त्री ला पाहतो ना तेव्हा त्याच्या डोक्यात तो एक नर आणि समोरची स्त्री म्हणजे असते फक्त मादी .ती आपल्या वापरासाठी च आहे हा पक्का समज करून घेत तो लाळ घोटेपणा करत राहतो .हे करताना त्याला स्थळकाळ, वय,जातपात,धर्म याच कुठलच भान राहत नाही अन त्याच्या नजरेतून फक्त वासना टपकत राहते .जी दिसेल,जिथे दिसेल तिथे या पुरुष नावाच्या नरपशूंच्या डोक्यात वासना निर्माण होते अन मग माझ्यासारख्या लाखो बांगड्यांच्या नशिबी हे असं रस्त्यात विव्हळण येतं .
तिच्या बोलण्यातून तिच्या मनातील वेदना, अंगार लक्षात येत होता.कोणत्या समाजात आपण राहत आहोत याची चीड येत होती .ज्या समाजात स्त्री म्हणजे लक्ष्मी,सरस्वती,दुर्गा,अंबा, चण्डिका म्हणून स्त्री ची पूजा केली जाते,ज्या स्त्रीच्या उदरात नऊ महिने मनुष्य वाढतो त्याच स्त्री ला उपभोगाची वस्तू म्हणून पाहताना त्याला लाज कशी वाटत नाही हा तिचा सवाल माझ्यासमोर हजारो प्रश्न निर्माण करून गेला,तिच्या प्रत्येक शब्दात अंगार होता,तर शब्द शस्त्रप्रमाणे माझ्यावर वार करीत होते अन मी हतबल होतो .
कुठे प्रेमाला नकार दिला म्हणून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार सुरू आहे तर कुठे एकतर्फी प्रेमातून रिंकू पाटील सारखे अनेक जीव जाळून टाकले जात आहेत,काही मुलींना प्रेम का करत नाही म्हणून तेजाब टाकून विद्रुप केलं जातंय तर काही सावित्रीच्या लेकींची इभ्रत भर रस्त्यात लुटली जात आहे .स्त्री ही पुरुषाच्या वापराची,उपभोगाची,ऐशा आरामाची वस्तू असल्याप्रमाणे जिकडे तिकडे सध्या स्त्री ला लुटलं जात आहे,छळल जात आहे .
अरे दादा वासनेने ग्रासलेल्या या समाजातील काही नराधमांना तीन दिवसांपूर्वी जन्मलेलं लेकरू असो की नव्वद वर्षांची माझी आजी असो काहीच दिसत नाही त्यांना फक्त त्यांचा कंड जिरवायचा असतो.अशा घटना घडल्यानंतर निषेध, मोर्चे आंदोलने होतात आणि पुन्हा जणूकाही घडलेच नाही अस तुम्ही आम्ही सगळे वागू लागतो .
हा सगळा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे,काय दोष होता त्या कोवळ्या जीवाचा जिच्या हातात मी होते,ती देशाच्या,कुटुंबाच्या समाजाच्या प्रगतीची स्वप्न रंगवत आपल्या मार्गावर जात होती मात्र काही हरामखोर नराधमांना तीच सुख पाहवल नाही अन तिला कुस्करून टाकलं रे.कोणी अधिकार दिला या नालायक लोकांना अस तीच आयुष्य उध्वस्त करण्याचा.कायदा किती तकलादू आहे हे सुद्धा अशा घटनांमध्ये होणारी वाढ अधोरेखित करते .या देशात जिच्यावर अत्याचार,बलात्कार,अन्याय झाला आहे तिलाच प्रश्न विचारून,तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून पुन्हा एकदा कायद्याच्या मंदिरात निर्वस्त्र केलं जातं तेव्हा मी निर्जीव असून सुद्धा माझं मनही हेलावून जातं रे .कुठंतरी हे थांबल पाहिजे,कोणीतरी या अशा नराधमांना,लेकी बाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्या नरपशुना जिथल्या तिथे फासावर लटकवणारा माईचा लाल पैदा होणार आहे की नाही .आज देशात दररोज हजारो आया बहिणींच्या इभ्रतीवर दरोडे घातले जात आहेत मात्र समाज आणि कायदा डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे .लाज वाटते या अशा माणसांच्या जगात राहण्याची .
कानात शिस ओतल्याप्रमाणे तिचे शब्द माझ्या मनावर घणाचे घाव घालीत होते अन मी मात्र निशब्द झालो होतो .
सध्या जे चालू आहे ते खरच खूप चीड आणणार आहे,दिल्लीतील निर्भया असो की गल्लीतील निर्जला,कोणीच आज सुरक्षित राहिलेली नाही,ज्या स्त्रीच्या छातीला कवटाळून आपण लहानाचे मोठे झालो आहोत तिच्याच छातीवर घाव घालताना समाजातील या अशा लोकांना लाज कशी वाटत नाही हा खरा प्रश्न आहे .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404
                               

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

प्रेमाचा पंचनामा ..............!

प्रेमाचा पंचनामा ....................!

प्रेम,लव्ह,इश्क,प्यार दोन अक्षरं, मात्र यात दोन जीवांच आयुष्य बांधल जातं, नव्हे दोन जीव शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहतात,प्रेम ही काही करायची गोष्ट नाही की ती ठरवून केली जाईल,प्रेम हे सहजपणे होतं, नकळतपणे दोन भिन्नलिंगी,समलिंगी व्यक्ती एकमेकांच्या सहवासाने सुखावतात अन आपली सुख दुःख वाटून घेतात,मात्र हे प्रेम समाज मान्य करीत नाही.अगदी अनादी काळापासून प्रेमाला समाजाचा कायमच विरोध राहिलेला आहे,अलीकडच्या काळात तर सोशल मीडिया आणि तत्सम गोष्टींमुळे प्रेम करणं म्हणजे जणू काही गुन्हाच झाला आहे,समाजाचे तथाकथित ठेकेदार अशा प्रेम करणाऱ्यांना विनाकारण त्रास देतात अन त्यातूनच मग जालन्या सारख्या घटना समोर येतात .त्याने प्रेम केलं,तीन प्रेम केलं,मग तुमच्या बापाच काय गेलं अस मंगेश पाडगावकर यांनी त्याकाळी लिहून ठेवलेलं आजही तंतोतंत लागू पडत ते यामुळेच .अशा विकृत पध्दतीने वागणाऱ्या लोकांना कठोर शासन तर व्हाययलाच पाहिजे पण यामध्ये ज्यांच्यावर हा प्रसंग गुदरला आहे त्यांनाही आधार द्यायला हवा अस वाटतं .
देवादिकापासून प्रेमाच्या कोमल अन मुलायम जाळ्यात कोणी अडकल नाही अस झालेलं नाही .अनेकदा सहवासातून तर कित्येकदा पहिल्याच भेटीत प्रेम निर्माण होतं .कोणाला स्वभाव आवडतो तर कोणाला रुबाब अन कोणाला मन आवडतं, ज्याची त्याची आवड असते शेवटी.त्यामुळेच म्हणत असतील कदाचित की 'दिलं आया गधी पे ,तो परी क्या चीज है '.
प्रेम ही भावनाच अशी आहे की ती मारून मुटकून,जबरदस्तीने कोणावर लादता येत नाही .प्रेमाला वयाचं देखील बंधन नसतं .पहिलं प्रेम हे नशीबवान व्यक्तीच्या पदरात पडतं अस नेहमी म्हणतात कारण पहिलं प्रेम हे शालेय जीवनात होत सहसा,त्यामुळेच ते चिरकाल सोबत राहील याची शाश्वती नसते .मात्र काही लोक याबाबत देखील नशीबवान असतात .पण एक मात्र खरं आहे की प्रेम हे ठरवून होऊच शकत नाही .
मात्र या प्रेमाला विरोध करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.अन प्रेम शेवटपर्यंत पदरात पडणाऱ्यांची संख्या देखील कमीच आहे .जिच्यावर किंवा ज्याच्यावर प्रेम असतं ती व्यक्ती सहजीवनात सोबत असेलच अस फार कमी वेळा होतं अन मग पदरात पडलं अन पवित्र झालं या भावनेतून माणूस जगत राहतो .कृष्णाचं राधेवर प्रेम होतं पण ती त्याच्या नशिबात नव्हती तर मिरेच्या नशिबात कृष्ण नव्हता पण याचा अर्थ त्यांचं एकमेकांवर प्रेम नव्हतं असा होत नाही .
प्रेम ही भावना सहज निर्माण होणारी आहे पण समाज नावाची जी व्यवस्था आहे तिला ही भावना मान्य नाही .झाकून लपून, चोरी चोरी केलं तर चालत पण उघड झाल की बोंबाबोंब होते .अन अशी बोंब करणारे आपल्या खाली काय जळतंय याचा कधीच विचार न करता प्रेम करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मोकळे होतात .
ऐतिहासिक घटना असोत की रुपेरी पडदा अथवा वास्तव जीवन यामध्ये प्रेम ही कल्पना खूप सुखद मानली गेली आहे .प्यार किया तो डरना क्या अस म्हणत हसत हसत मृत्यूला कवटाळणारे अनेक प्रेमीयुगुल आपण पाहिले आहेत .प्रेमाला जस वयाचं बंधन नसत तस जातीपातीच, धर्माच,लिंगभेदाच सुद्धा बंधन नसतं पण तरीही समाजाला ते मान्य नसतं .प्रेम करणाऱ्यांना समाज आणि त्याचे ठेकेदार गुन्हा ठरवतात अन ते करणारे गुन्हेगार .मग त्यातून अशा लोकांना एक अनभिषिक्त अधिकार मिळतो अन त्यातूनच ते प्रेम करणाऱ्यांना स्वतः न्यायाधीश असल्याप्रमाणे शिक्षा देऊन मोकळे होतात .
हिर रांझा असोत की रोमियो ज्युलियट अथवा सोनी महिवाल ही रुपेरी पडद्यावर अजरामर झालेली प्रेमाची प्रतीक किंवा पात्र .सलीम अनारकली यांच प्रेम देखील असच आहे .पारो देवदास हे देखील त्याच पठडीतले .मात्र या सगळ्यांमध्ये एक दुवा एकसारखा आहे तो म्हणजे या सगळ्याच प्रेम समाजाला मान्य नव्हत .दोन व्यक्तींना एकमेकांच्या आवडीनिवडी,स्वभाव,राहणीमान,बोलणं चालणं पटत असेल अन त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण ,ओढ वाटत असेल तर इतरांना त्याविषयी वाईट वाटण्याचं कारण नाही मात्र इथंच खरी गोम आहे .त्याला ती भेटते,तिला तो मान्य होतो मग आम्हाला का नाही भेटत किंवा आम्ही काय त्याच्यापेक्षा वाईट आहोत का या अहंगंडातून सुरू होतो विरोध अन त्याला नाव दिले जात चारचौघांचं .चार लोक काय म्हणतील या सबबीखाली अन ओझ्याखाली मनासारखं वागता आलं नाही म्हणून कुढुन कुढुन मरणाऱ्यांची संख्या 99 टक्के असेल .कोणी कोणावर प्रेम करावे,कोणी कोणाशी कसं वागावं हे ठरवण्याचा अधिकार या चारचौघाना कोणी दिला .प्रत्येक माणूस जन्मल्यावर त्याने काय करावं,कसं वागावं,कसं जगावं हे ठरवण्याचा अधिकार त्याला आहे परंतु समाज नावाची जी व्यवस्था आहे ना ती माणसाच्या या मूलभूत अधिकारावरच गदा आणते.विनाकारण दोन भिन्नलिंगी व्यक्ती बोलत असतील तर त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते .
जालना जिल्ह्यातील गुंडेगाव येथे जो प्रकार झाला तो अत्यंत चीड आणणारा अन हिडीस असा आहे .सुशिक्षित सज्ञानी असणारे दोघे जण एखाद्या निर्जन ठिकाणी फिरावयास जाऊ शकत नाहीत का,कायद्याने त्यांना अशी परवानगी नाकारली आहे का,नाही ना,मग ते दोघेजण तिथे गेले तर  समाजाच्या तथाकथित ठेकेदारांना हा अधिकार कोणी दिला की त्यांना पकडून,मारहाण करून डांबून ठेवायचा .मात्र एक मुलगा अन एक मुलगी,किंवा एक स्त्री अन एक पुरुष एकत्र दिसले की काही लोकांचे मस्तक हलते अन त्यातून मग या अशा घटना घडतात .आता यावर काही लोक असाही दावा करतील की अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्यानेच महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत,मात्र हा त्यांचा दावा पोकळ आहे .दोन व्यक्ती एकमेकांच्या परवानगीने जर एकत्र भेटत,बोलत असतील तर त्यात गैर काय आहे .परंतु समाजाला ते मान्य नसतं अन त्यातुनच मग अशी जोडपी दिसली की त्यांना मारहाण,धमकावणे, डांबून ठेवणे असे प्रकार होतात,काही वर्षांपूर्वी शिवसेनेने अशाच पद्धतीने व्हॅलेंटाईन डे ला विरोध केला होता तेव्हाही त्याचा मोठ्या प्रमाणात अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध केला होता .
मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने काय करावे अन काय नको याचा अधिकार कायद्याने त्याला दिला आहे मात्र कायदा न मानणारे मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे असले प्रकार होऊ लागले आहेत .
त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत,गरीब,मध्यमवर्गीय घरातील लेकरांनी प्रेम केलं तर ते समाजाच्या दृष्टीने लफडं ठरतं अन थोरा मोठ्यांच्या लेकरांनी केलं तर ते अफेयर असत अन त्याला मान्यता दिली जाते .अरे काय हा वेडेपणा आहे,कुणी कुणावर प्रेम करावं याला काही बंधन नाहीत मात्र प्रेम करताना आजूबाजूचे वातावरण ,जागा,स्थळकाळ याच भान ठेवलं पाहिजे हे नक्की .पण ते सांगण्यासाठी सुद्धा पद्धत आहे,प्रेम हे झाडावर करा झाडाखाली नको अस चेष्टेने म्हटलं जातं ते आज खर होताना दिसत आहे कारण प्रेम करणाऱ्यांना बंधन घालणारे,त्यांच्यावर एखाद्या गुप्तहेराप्रमाणे नजर ठेवणाऱ्यांची संख्या मोठी आहे,बर या प्रेम करणाऱ्यांसाठी निश्चित अशी जागाही नाही की तिथं त्यांना कोणी अडवणार नाही .
जालना येथे घडलेला प्रकार हा हिमनगाचे एक टोक आहे,देशात,राज्यात,जिल्ह्याजिल्ह्यात,अगदी वाडी वस्ती तांड्यावर अशा प्रकारे प्रेम करणाऱ्यांना विरोध करणारे उपलब्ध आहेत .जणूकाही यांनी हे काम नाही केलं तर जगबुडी होईल अशा पद्धतीने हे लोक वागतात .मात्र हे करताना त्या दोन व्यक्तींच्या व्यक्तिगत आयुष्यावर त्याचा किती खोलवर आणि गंभीर परिणाम होईल याचा विचार कोणी करीत नाही .जालना येथे ज्या मुलामुलींच्या बाबतीत हा प्रकार घडला त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला,त्यातून त्या मुलाची,मुलीची किती बदनामी होणार याच्याशी या ठेकेदारांना काही देणंघेणं नाही .आयुष्यभर हे दोघे सामाजिक दडपणाखाली वावरत राहणार,समाज त्यांना पावलापावलावर टीका टिपणी करीत राहणार,त्यांच्या कुटुंबियांना देखील त्रास होणार आणि हे सगळं का तर प्रेम केलं म्हणून .त्यामुळेच मंगेश पाडगावकर यांच्या कवितेच्या या ओळी चपखलपणे या ठिकाणी आठवतात
"त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !"
मात्र समाजाला हे मान्य नाही कारण त्यांना दोन भिन्नलिंगी लोक कोणत्याही नात्याशिवाय एकत्र आलेले चालत नाहीत,आणि मग त्या दोन जीवांचा जीव घेण्यासाठी सुद्धा समाज मागेपुढे पाहत नाही .अन त्यातूनच मग ऑनर किलिंग सारखे प्रकार सुद्धा समोर येतात,वास्तविक पाहता असे कोणतेही प्रकार जर समाजाच्या निदर्शनास आले तर या दोन व्यक्तींना समोर बसवून त्यांचं समुपदेशन करून,समजावून सांगून,त्यांच्या कुटुंबियांना बोलून हा विषय मार्गी लावला जाऊ शकतो .पण अस केलं तर समाज सुसंकृत झाला आहे हे दिसेल ना अन ते होऊ द्यायचं नाही म्हणून मग हा असा प्रेमाचा पंचनामा केला जातो अन आपला कंडू शमवून घेत समाज नावाची व्यवस्था आपलीच पाठ थोपटून घेते,हे कुठेतरी थांबायला पाहिजे हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड.
9422744404

बुधवार, २९ जानेवारी, २०२०

(अ)जाणता राजा ...........!

(अ ) जाणता राजा .............!
राजकारणात कोण कधी कोणाचा कसा वापर करेल याचा नेम नाही,आपल्या स्वार्थासाठी हे राजकारणी देव,दानव एवढंच काय पण थोर महापुरुषांना सुद्धा सोडत नाहीत,अनेकदा या थोर विभूतींच्या नावे आपलं उखळ पांढर करण्याचा उद्योग हे राजकारणी करत असतात .अनेकदा देशापुढील महत्वाच्या समस्या वरून जनतेच लक्ष दूर करण्यासाठी हे असले उद्योग केले जातात,सध्या सुद्धा ज्या पुस्तकावरून देशात आगडोंब उसळला आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाने अधिकच भर पडली आहे .समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते असा दावा पवार यांनी करून नेमकं काय साधल हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे .
शरद गोविंदराव पवार हे नाव गेल्या पाच दशकापासून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपला वेगळा दबदबा निर्माण करून आहे .राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून ते देशाच्या संरक्षण, कृषी मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे शरद पवार हे जाणता राजा म्हणून राज्यात त्यांच्या अनुयायांकडून ठासून सांगितले जाते .आता जाणता राजा म्हणजे काय या विषयावर वाद प्रतिवाद होऊ शकतात पण इतिहासाची पानं चाळली तर हा शब्दप्रयोग केवळ आणि केवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदराने केला जातो नव्हे जनतेनेच त्यांना ही उपाधी दिल्याचे स्पष्ट होते,तरीसुद्धा अलीकडच्या काळात ही उपाधी पवार यांच्यासारख्याना दिली गेली आणि लोकांनीही त्यावर फार काही आक्षेप घेतला नाही .
मात्र शरद पवार हे गेल्या पन्नास वर्षात अनेकदा ऐतिहासिक असो की सांस्कृतिक अथवा पौराणिक विषयात नको ते बोलून समाजात दुही निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात असे अनेकदा आरोप झालेले आहेत .मात्र पवार यांनी कधी त्याची तमा बाळगलेली नाही .त्यांनी जातपात किंवा जातीयता स्वच्छपणे दिसेल किंवा जाणवेल अशी वक्तव्य करून आपल्या राजकारणाचा गाडा हाकलेला आहे .
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असताना पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूट वर झालेला हल्ला असो की दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्याचे प्रकरण असो प्रत्येकवेळी पवार यांनी यातून आपल्या बोलण्याने तेल ओतण्याचेच काम केलेले आहे .अगदी अलीकडच्या काळातील दाखला द्यायचा झाल्यास छत्रपती संभाजी राजे यांच्या खासदारकीवरून पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावताना पेशवे कधीपासून छत्रपतींना जहागिरी बहाल करु लागले अस वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती .एवढंच काय पण त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात चक्क पुणेरी पगडी हद्दपार करून यापुढे फुले पगडीचा वापर करावा अस सांगून आपले इरादे स्पष्ट केले होते .
पवार जे बोलतात त्यामागे त्यांचा नेमका असा राजकीय हेतू असतो हे आजवर लपून राहिलेलं नाही .एकीकडे राजकीय व्यसपीठावरून अथवा सामाजिक कार्यक्रमामधून जातीयतेच्या विरोधात आरोळ्या ठोकायच्या अन दुसरीकडे जातीय विद्वेष पसरेल अशी वक्तव्य करायची हा प्रकार पवार नेहमी करतात हे राज्यातील जनतेला माहीत झालेलं आहे .पवार नेहमी कोड्यात बोलतात अस म्हटलं जातं पण ज्यांनी त्यांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे त्यांना हे नक्कीच माहीत आहे की पवार हे कधीही हेतुशिवाय बोलत नाहीत .
महाराष्ट्र राज्य हे बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यांच्यासह सर्वांच राज्य आहे हे वेगळं सांगायची गरज नाही .दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील या सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेत स्वराज्य घडवण्यासाठी आपली हयात घालवली,ज्या राजेंनी जातीयता निर्मूलन व्हावी यासाठी आपल्या काळात आटोकाट प्रयत्न केले ,आपल्या सोबत सर्व जातीधर्माच्या मावळ्यांना घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली .मात्र त्यांच्याच राज्यात त्यांच्याच नावावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या राजकारण्यांचे आलेले पीक काही कमी होण्याचे नाव घेत नाही .
कोणताही मनुष्यप्राणी जन्माला आल्यानंतर आई हीच त्यांची पहिली गुरू असते कारण आपल्या उदरात नऊ महिने सांभाळ करून जन्म दिल्यानंतर देखील तीच त्याच्यावर संस्कार करत असते,त्यानंतर शिक्षक किंवा गुरुजन,समाज,मित्र हे त्याचे गुरू समजले जातात .मग त्यात वेगळं अस काय आहे .पण कोणत्याही गोष्टीत राजकारण करणाऱ्या पवार यांना या अशा गोष्टीत राजकीय भांडवल नाही सापडलं तर नवलच .त्यामुळे सध्या देशात जय भगवान गोयल यांच्या तथाकथित पुस्तकावरून जो वाद रंगला आहे त्यात शरद पवार हे उडी घेणार नाहीत हे कसं शक्य आहे .गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील नेत्यांमध्ये जे वाकयुद्ध सुरू आहे त्यात पवार यांनी वेगळाच विषय मांडून चर्चा तिसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो अजनातेपणे नव्हे तर जाणीवपूर्वक केल्याचे स्पष्ट दिसते .
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते तर जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरू होत्या अस सांगून पवार यांनी पुन्हा एकदा एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे .
छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्यकाळ सोळाव्या शतकातला आहे,त्यानंतर चार पाच दशक झाली तरीदेखील आजही या महापुरुषांच्या नावाने गाजर दाखवत जनतेला वेड्यात काढण्याचा उद्योग हे राजकारणी करीत आहेत अन हे माहीत असूनही लोक त्यांच्यामागे जातात यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असावी .
शरद पवार यांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी मोठा वाटा उचलला यात शंकाच नाही मात्र वेळोवेळी जेव्हा केव्हा गरज वाटेल तेव्हा तेव्हा त्यांनी जातीय विधान करून राज्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो .हा सगळाच प्रकार किळसवाणा म्हणावा लागेल असा आहे .आज जग हे एका खेड्याप्रमाणे झालेले असतानाही आपण नको त्या विषयावरून वाद विवाद,जातीयता,धार्मिक तेढ निर्माण करण्यात वेळ वाया घालवत आहोत .शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला अस म्हणलं जात असेल तरी त्यांनी राजकीय,सहकारी,खाजगी अशा अनेक ठिकाणी आपले पाहुणे रावळे चिकटवले अन स्थिरस्थावर केले .
पवार हे केवळ समर्थ रामदास यांच्याबाबत बोलूनच शांत राहिले नाहीत तर अल्पसंख्याक समाजाने संगीतल्यानेच आपण शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन केली अस सांगून पुन्हा एकदा आपले मनसुबे उघड केले .
पवार यांना राज्यातील राजकारणात जातपात आणून आपला हेतू साध्य करायचा असेल तर तो त्यांनी जरूर करावा मात्र त्यासाठी दुसऱ्या समाजाला दूषणे देणं भूषणावह नाही,पण हे त्यांना सांगणार कोण . निव्वळ जातीय ध्रुवीकरण करून आपला हेतू साध्य करायचा हेच त्यांच्या राजकारणाचे गणित राहिलेले आहे .समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते की नाही हा विषय कुठेच नव्हता मात्र पवार यांनी जाणीवपूर्वक हा विषय काढून आपल घोड दामटल .
कोणाच्याही ध्यानी मनी नसणारी गोष्ट पवार हे लोकांसमोर मांडतात अन मग त्यावरून राजकीय धुळवड रंगली की मग त्यात आपले हात धुवून घ्यायचे .राजकारण किती गलिच्छ पातळीवर जाऊन केलं जाऊ शकत हे जर शिकायचं असेल तर महाराष्ट्र आणि पवार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे .पवार हे आयुष्याच्या एका अशा टप्यावर आहेत की आता त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असायला हवं आणि राज्याच्या राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीला धडे द्यायला हवेत मात्र पवार हे जातीयवादाच जे बीज रुजवू पाहत आहेत त्यामुळे महाराष्ट्र आणि इथली सहिष्णू संस्कृती धोक्यात येऊ शकते हे नक्की .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड,9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...