शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

बांगडीच दुःख .................!


बांगडीचं दुःख.....................!

रस्त्याने चालताना टचकन आवाज झाला अन माझी विचारांची तंद्री अचानक विस्कळीत झाली,पायाखाली काय आलं म्हणून पाहावं म्हटलं तर एक फुटकी बांगडी दिसली,चार पाच ठिकाणी तूटली होती बिचारी,का कोण जाणे पण आतून एक आवाज आल्यासारखा झाला अन तुटलेली,पिचलेली ती बांगडी मी सहज उचलून हातात घेतली,तिला मी स्पर्श करताना माझं मलाच काहीतरी विचित्र होत असल्याची जाणीव झाली ,कदाचित ती अंग चोरते आहे की काय अस मला वाटलं,तरी देखील मी तिला अलगद उचलून माझ्या जवळच्या एका स्वच्छ पांढऱ्या रुमालात व्यवस्थित ठेवलं अन मला लक्षात आलं की ती खरोखरच खूप घाबरलेली,सैरभैर झालेली आहे.तिची नजर ,तिचे विस्फारलेले डोळे माझ्याकडं ,माझ्या प्रत्येक हालचालीकड एकटक बघत होते,जणू काही मी आता नेमकं काय करणार आहे याचा ती हळुवारपणे अंदाज घेत होती.

तिच्या नजरेतील असह्यपणा मी देखील जाणू शकलो नाही असं काही नव्हतं,यापूर्वी मी अनेकदा रस्त्यावरून जाताना कित्येकदा रस्त्यात ,कडेला,दुकानाच्या बाहेर अनेक तुटलेल्या बांगड्या पाहिल्या होत्या,मात्र आजचा तिच्याबद्दलचा अनुभव काही निराळाच होता,मी रुमालात हळुवारपणे ठेवलेल्या तिच्याकडं बघितलं तर ती अद्यापही भेदरलेलीच दिसत होती,काही तरी अघटित झालं आहे याची कल्पना एव्हाना मला आली होती .

नेमकं काय झालं असेल याचा अंदाज बांधण्याचा मी प्रयत्न करीत होतो मात्र काहीच सुचत नव्हतं,मनात अनेक शंका कुशंका नि थैमान घातलं होत,यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं परंतु आज मात्र एक वेगळीच भीती तिच्या स्पर्शामुळं मनात तयार झाली होती.का कोण जाणे पण खूप काहीतरी भयानक घडलं आहे याचा अंदाज आला होता .डोक्यात सुरू असलेलं वादळ बाजूला ठेवून मी तिच्याकडं निरखून पाहू लागलो,बराच काळ गेल्यानंतर तिच्याही लक्षात आलं असावं की ज्या माणसानं आपल्याला आधार देऊन जवळ घेतलं आहे ते हात,तो माणूस भला असावा म्हणून ती देखील थोडी सावरली होती .

बराच काळ आमच्या दोघांमध्ये एक भयान शांतता होती,अगदी हळुवारपणे आपल्या पिलासाठी साखरेचा दाना घेऊन जाणाऱ्या मुंगीच्या पावलांचा देखील आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू यावा एवढी भयाणक शांतता होती.शेवटी मीच या शांततेला तोंड फोडलं अन नेमकं काय झालं हा प्रश्न केला,माझा प्रश्न एकूण इतका वेळ शांत असलेल्या तिने पुन्हा एकदा जोरात हंबरडा फोडला .

तिचा तो आवाज काळीज पिळवटून टाकणारा होता,इतक्या वेळ असलेल्या शांततेला भेदून या आवाजाने नभांगणातील ताऱ्यांना देखील घाम फुटला असावा .तिच्या त्या आवाजाने मला नेमकं काय झालं असेल याचा पूर्णपणे अंदाज आला,मी काहीही न बोलता फक्त तिच्याकडं बघत होतो,तिची प्रत्येक हालचाल टिपण्याचा प्रयत्न करीत होतो,न बोलताही तिनं त्या किंकाळीतून सगळं काही सांगितलं होतं .बराच काळ मी न बोलता थिजल्यासारखा जागच्या जागी बसून होतो,अखेर मी तिला प्रेमानं जवळ घेत नेमकं काय,कसं, कुठं,कधी घडलं,कोणी केलं,का केलं,असे एक ना अनेक प्रश्न एका दमात विचारले अन पुन्हा तिच्या उत्तराची वाट पाहत बसलो .

बराच काळ लोटल्यानंतर आणि मी कोणी तरी विश्वास ठेवण्यासारखा माणूस आहे याची खात्री पटल्यानंतर तिने मला आपली कर्मकहानी सांगायला सुरुवात केली,मी तुम्हाला दादा म्हणू शकते का ? या तिच्या प्रश्नाने मी देखील जरा स्थिरावलो .पण तिच्या त्या प्रश्नाने माझ्या मनाची मात्र चलबिचल झाली,कारण त्या प्रश्नांन माझं एक नातं निर्माण केलं होतं,तसा मी खूप नात्यात अडकून राहणारा नाही पण हे अनामिक नातं मात्र काळजात घर करणार होतं, तिच्या दादा या शब्दात जो विश्वास होता तो जाणवला मला.म्हणलं बोल बिनधास्त बोल,काय झालं तुला ,का अशी अवस्था झाली तुझी,रस्त्यात अशी का पडली होतीस विव्हळत .तशी ती म्हणाली दादा सांगते सगळं सांगते जरा श्वास तर घेऊ दे .

इतका वेळ शांत असलेला मी जरा स्थिरावलो आणि प्राण कानाशी आणून ऐकू लागलो,तिनं सांगायला सुरुवात केली,का रे दादा जेव्हा माणसाचा जन्म होतो तेव्हा पाचव्या दिवशीच मला हातात प्रेमानं घातलं जात,मुलगा असो की मुलगी माझ्या असण्यानं त्यांच्या सौंदर्यात भरच पडते,माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत सोबत असणारी मी आज मात्र पूर्णपणे खचून गेले आहे, सुवासिनींचा दागिना म्हणून मिरवताना मला कोण आनंद होतो ते शब्दात नाही सांगता येणार,एवढंच काय पण एखादी सुवासीन जेव्हा तीच कुंकू पुसलं जात तेव्हा देखील मला तिचा हात सोडून जाताना प्रचंड वेदना होतात .मात्र आज माझीच मला लाज वाटू लागली आहे,मी किती असाह्य आहे हे या समाजाने मला आज दाखवुन दिलं आहे .
मी तुझ्या लेकीची लाडकी असते,बायको मला हळुवारपणे सांभाळते तर आई अन बहीण या मला जीवापाड प्रेम देऊन जपतात,मैत्रीण देखील मला घरची वागणूक देतात हा सगळा आनंद असताना एक वेदना मात्र कायम मनात घर करून राहते आहे की ज्यांच्या हातात मी थाटात मिरवते तीच आयुष्य जेव्हा कोणी नराधम विस्कटून टाकतो ना तेव्हा माझीच मला लाज वाटते .
आजकाल माणूस ज्या पशूंच्या वृत्तीने वागतो आहे ना ते पाहिल्यावर आया बायांनो यापुढे तुम्ही हातात हात घालून मला मिरवण्यापेक्षा हाती शस्त्र घ्या अन तुमच्या इभ्रतीवर दरोडा घालणाऱ्या नरपशूंच्या नरडीचा घोट घ्या अस म्हणावं वाटत आहे .अरे आज मी जीच्यासोबत होते ना काय दोष होता तिचा,ती सुंदर होती दिसायला,लडिवाळ होती बोलायला,डोळे तिचे जुल्मीगडे असे होते,केशसंभार करून ती निघाली होती उच्च शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला .तिच्या जन्मापासून मी सोबत असल्याने कित्येकदा एकांतात तिने मला मनातल्या गोष्टी सांगितल्या आहेत,मात्र काही वासनांध लोकांची नजर तिच्या देहावर पडली अन त्यांनी ती कळी उमलण्याआधीच कुस्करून टाकली रे,तीच हे वाक्य ऐकलं अन माझं काळीज पिळवटून निघालं .
तस पाहिलं तर ती होती एक बांगडी,निर्जीव वस्तू पण लेकीबळींच्या स्पर्शाने ,कुरवळण्याने तिच्यात सुद्धा प्राण आले होते, म्हणूनच तिची वेदना आज माझ्या कानी पडली .अरे दादा,या तिच्या आवाजाने मी पुन्हा भानावर आलो,म्हणलं काही नाही ग,पण कोणी केलं हे सगळं,कोण होते ते,त्यांना आया बहिणी नव्हत्या का?या माझ्या प्रश्नावर ती कुस्तीक पणे हसली अन म्हणाली अरे आपलं ते लेकरू अन दुसऱ्याचं ते कार्ट ही जगाची रितच आहे वेड्या हे अजूनही तुला कसं नाही कळलं .
आपल्या आई,बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर तळपायाची आग मस्तकाला जाणारा पुरुष जेव्हा रस्त्याने जाताना ,येताना,कार्यालयात बसल्यावर,कामाच्या ठिकाणी,बाजारात,सार्वजनिक सभा ,समारंभात दुसऱ्या स्त्री ला पाहतो ना तेव्हा त्याच्या डोक्यात तो एक नर आणि समोरची स्त्री म्हणजे असते फक्त मादी .ती आपल्या वापरासाठी च आहे हा पक्का समज करून घेत तो लाळ घोटेपणा करत राहतो .हे करताना त्याला स्थळकाळ, वय,जातपात,धर्म याच कुठलच भान राहत नाही अन त्याच्या नजरेतून फक्त वासना टपकत राहते .जी दिसेल,जिथे दिसेल तिथे या पुरुष नावाच्या नरपशूंच्या डोक्यात वासना निर्माण होते अन मग माझ्यासारख्या लाखो बांगड्यांच्या नशिबी हे असं रस्त्यात विव्हळण येतं .
तिच्या बोलण्यातून तिच्या मनातील वेदना, अंगार लक्षात येत होता.कोणत्या समाजात आपण राहत आहोत याची चीड येत होती .ज्या समाजात स्त्री म्हणजे लक्ष्मी,सरस्वती,दुर्गा,अंबा, चण्डिका म्हणून स्त्री ची पूजा केली जाते,ज्या स्त्रीच्या उदरात नऊ महिने मनुष्य वाढतो त्याच स्त्री ला उपभोगाची वस्तू म्हणून पाहताना त्याला लाज कशी वाटत नाही हा तिचा सवाल माझ्यासमोर हजारो प्रश्न निर्माण करून गेला,तिच्या प्रत्येक शब्दात अंगार होता,तर शब्द शस्त्रप्रमाणे माझ्यावर वार करीत होते अन मी हतबल होतो .
कुठे प्रेमाला नकार दिला म्हणून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार सुरू आहे तर कुठे एकतर्फी प्रेमातून रिंकू पाटील सारखे अनेक जीव जाळून टाकले जात आहेत,काही मुलींना प्रेम का करत नाही म्हणून तेजाब टाकून विद्रुप केलं जातंय तर काही सावित्रीच्या लेकींची इभ्रत भर रस्त्यात लुटली जात आहे .स्त्री ही पुरुषाच्या वापराची,उपभोगाची,ऐशा आरामाची वस्तू असल्याप्रमाणे जिकडे तिकडे सध्या स्त्री ला लुटलं जात आहे,छळल जात आहे .
अरे दादा वासनेने ग्रासलेल्या या समाजातील काही नराधमांना तीन दिवसांपूर्वी जन्मलेलं लेकरू असो की नव्वद वर्षांची माझी आजी असो काहीच दिसत नाही त्यांना फक्त त्यांचा कंड जिरवायचा असतो.अशा घटना घडल्यानंतर निषेध, मोर्चे आंदोलने होतात आणि पुन्हा जणूकाही घडलेच नाही अस तुम्ही आम्ही सगळे वागू लागतो .
हा सगळा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे,काय दोष होता त्या कोवळ्या जीवाचा जिच्या हातात मी होते,ती देशाच्या,कुटुंबाच्या समाजाच्या प्रगतीची स्वप्न रंगवत आपल्या मार्गावर जात होती मात्र काही हरामखोर नराधमांना तीच सुख पाहवल नाही अन तिला कुस्करून टाकलं रे.कोणी अधिकार दिला या नालायक लोकांना अस तीच आयुष्य उध्वस्त करण्याचा.कायदा किती तकलादू आहे हे सुद्धा अशा घटनांमध्ये होणारी वाढ अधोरेखित करते .या देशात जिच्यावर अत्याचार,बलात्कार,अन्याय झाला आहे तिलाच प्रश्न विचारून,तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून पुन्हा एकदा कायद्याच्या मंदिरात निर्वस्त्र केलं जातं तेव्हा मी निर्जीव असून सुद्धा माझं मनही हेलावून जातं रे .कुठंतरी हे थांबल पाहिजे,कोणीतरी या अशा नराधमांना,लेकी बाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्या नरपशुना जिथल्या तिथे फासावर लटकवणारा माईचा लाल पैदा होणार आहे की नाही .आज देशात दररोज हजारो आया बहिणींच्या इभ्रतीवर दरोडे घातले जात आहेत मात्र समाज आणि कायदा डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे .लाज वाटते या अशा माणसांच्या जगात राहण्याची .
कानात शिस ओतल्याप्रमाणे तिचे शब्द माझ्या मनावर घणाचे घाव घालीत होते अन मी मात्र निशब्द झालो होतो .
सध्या जे चालू आहे ते खरच खूप चीड आणणार आहे,दिल्लीतील निर्भया असो की गल्लीतील निर्जला,कोणीच आज सुरक्षित राहिलेली नाही,ज्या स्त्रीच्या छातीला कवटाळून आपण लहानाचे मोठे झालो आहोत तिच्याच छातीवर घाव घालताना समाजातील या अशा लोकांना लाज कशी वाटत नाही हा खरा प्रश्न आहे .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404
                               

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

प्रेमाचा पंचनामा ..............!

प्रेमाचा पंचनामा ....................!

प्रेम,लव्ह,इश्क,प्यार दोन अक्षरं, मात्र यात दोन जीवांच आयुष्य बांधल जातं, नव्हे दोन जीव शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहतात,प्रेम ही काही करायची गोष्ट नाही की ती ठरवून केली जाईल,प्रेम हे सहजपणे होतं, नकळतपणे दोन भिन्नलिंगी,समलिंगी व्यक्ती एकमेकांच्या सहवासाने सुखावतात अन आपली सुख दुःख वाटून घेतात,मात्र हे प्रेम समाज मान्य करीत नाही.अगदी अनादी काळापासून प्रेमाला समाजाचा कायमच विरोध राहिलेला आहे,अलीकडच्या काळात तर सोशल मीडिया आणि तत्सम गोष्टींमुळे प्रेम करणं म्हणजे जणू काही गुन्हाच झाला आहे,समाजाचे तथाकथित ठेकेदार अशा प्रेम करणाऱ्यांना विनाकारण त्रास देतात अन त्यातूनच मग जालन्या सारख्या घटना समोर येतात .त्याने प्रेम केलं,तीन प्रेम केलं,मग तुमच्या बापाच काय गेलं अस मंगेश पाडगावकर यांनी त्याकाळी लिहून ठेवलेलं आजही तंतोतंत लागू पडत ते यामुळेच .अशा विकृत पध्दतीने वागणाऱ्या लोकांना कठोर शासन तर व्हाययलाच पाहिजे पण यामध्ये ज्यांच्यावर हा प्रसंग गुदरला आहे त्यांनाही आधार द्यायला हवा अस वाटतं .
देवादिकापासून प्रेमाच्या कोमल अन मुलायम जाळ्यात कोणी अडकल नाही अस झालेलं नाही .अनेकदा सहवासातून तर कित्येकदा पहिल्याच भेटीत प्रेम निर्माण होतं .कोणाला स्वभाव आवडतो तर कोणाला रुबाब अन कोणाला मन आवडतं, ज्याची त्याची आवड असते शेवटी.त्यामुळेच म्हणत असतील कदाचित की 'दिलं आया गधी पे ,तो परी क्या चीज है '.
प्रेम ही भावनाच अशी आहे की ती मारून मुटकून,जबरदस्तीने कोणावर लादता येत नाही .प्रेमाला वयाचं देखील बंधन नसतं .पहिलं प्रेम हे नशीबवान व्यक्तीच्या पदरात पडतं अस नेहमी म्हणतात कारण पहिलं प्रेम हे शालेय जीवनात होत सहसा,त्यामुळेच ते चिरकाल सोबत राहील याची शाश्वती नसते .मात्र काही लोक याबाबत देखील नशीबवान असतात .पण एक मात्र खरं आहे की प्रेम हे ठरवून होऊच शकत नाही .
मात्र या प्रेमाला विरोध करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.अन प्रेम शेवटपर्यंत पदरात पडणाऱ्यांची संख्या देखील कमीच आहे .जिच्यावर किंवा ज्याच्यावर प्रेम असतं ती व्यक्ती सहजीवनात सोबत असेलच अस फार कमी वेळा होतं अन मग पदरात पडलं अन पवित्र झालं या भावनेतून माणूस जगत राहतो .कृष्णाचं राधेवर प्रेम होतं पण ती त्याच्या नशिबात नव्हती तर मिरेच्या नशिबात कृष्ण नव्हता पण याचा अर्थ त्यांचं एकमेकांवर प्रेम नव्हतं असा होत नाही .
प्रेम ही भावना सहज निर्माण होणारी आहे पण समाज नावाची जी व्यवस्था आहे तिला ही भावना मान्य नाही .झाकून लपून, चोरी चोरी केलं तर चालत पण उघड झाल की बोंबाबोंब होते .अन अशी बोंब करणारे आपल्या खाली काय जळतंय याचा कधीच विचार न करता प्रेम करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मोकळे होतात .
ऐतिहासिक घटना असोत की रुपेरी पडदा अथवा वास्तव जीवन यामध्ये प्रेम ही कल्पना खूप सुखद मानली गेली आहे .प्यार किया तो डरना क्या अस म्हणत हसत हसत मृत्यूला कवटाळणारे अनेक प्रेमीयुगुल आपण पाहिले आहेत .प्रेमाला जस वयाचं बंधन नसत तस जातीपातीच, धर्माच,लिंगभेदाच सुद्धा बंधन नसतं पण तरीही समाजाला ते मान्य नसतं .प्रेम करणाऱ्यांना समाज आणि त्याचे ठेकेदार गुन्हा ठरवतात अन ते करणारे गुन्हेगार .मग त्यातून अशा लोकांना एक अनभिषिक्त अधिकार मिळतो अन त्यातूनच ते प्रेम करणाऱ्यांना स्वतः न्यायाधीश असल्याप्रमाणे शिक्षा देऊन मोकळे होतात .
हिर रांझा असोत की रोमियो ज्युलियट अथवा सोनी महिवाल ही रुपेरी पडद्यावर अजरामर झालेली प्रेमाची प्रतीक किंवा पात्र .सलीम अनारकली यांच प्रेम देखील असच आहे .पारो देवदास हे देखील त्याच पठडीतले .मात्र या सगळ्यांमध्ये एक दुवा एकसारखा आहे तो म्हणजे या सगळ्याच प्रेम समाजाला मान्य नव्हत .दोन व्यक्तींना एकमेकांच्या आवडीनिवडी,स्वभाव,राहणीमान,बोलणं चालणं पटत असेल अन त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण ,ओढ वाटत असेल तर इतरांना त्याविषयी वाईट वाटण्याचं कारण नाही मात्र इथंच खरी गोम आहे .त्याला ती भेटते,तिला तो मान्य होतो मग आम्हाला का नाही भेटत किंवा आम्ही काय त्याच्यापेक्षा वाईट आहोत का या अहंगंडातून सुरू होतो विरोध अन त्याला नाव दिले जात चारचौघांचं .चार लोक काय म्हणतील या सबबीखाली अन ओझ्याखाली मनासारखं वागता आलं नाही म्हणून कुढुन कुढुन मरणाऱ्यांची संख्या 99 टक्के असेल .कोणी कोणावर प्रेम करावे,कोणी कोणाशी कसं वागावं हे ठरवण्याचा अधिकार या चारचौघाना कोणी दिला .प्रत्येक माणूस जन्मल्यावर त्याने काय करावं,कसं वागावं,कसं जगावं हे ठरवण्याचा अधिकार त्याला आहे परंतु समाज नावाची जी व्यवस्था आहे ना ती माणसाच्या या मूलभूत अधिकारावरच गदा आणते.विनाकारण दोन भिन्नलिंगी व्यक्ती बोलत असतील तर त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते .
जालना जिल्ह्यातील गुंडेगाव येथे जो प्रकार झाला तो अत्यंत चीड आणणारा अन हिडीस असा आहे .सुशिक्षित सज्ञानी असणारे दोघे जण एखाद्या निर्जन ठिकाणी फिरावयास जाऊ शकत नाहीत का,कायद्याने त्यांना अशी परवानगी नाकारली आहे का,नाही ना,मग ते दोघेजण तिथे गेले तर  समाजाच्या तथाकथित ठेकेदारांना हा अधिकार कोणी दिला की त्यांना पकडून,मारहाण करून डांबून ठेवायचा .मात्र एक मुलगा अन एक मुलगी,किंवा एक स्त्री अन एक पुरुष एकत्र दिसले की काही लोकांचे मस्तक हलते अन त्यातून मग या अशा घटना घडतात .आता यावर काही लोक असाही दावा करतील की अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्यानेच महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत,मात्र हा त्यांचा दावा पोकळ आहे .दोन व्यक्ती एकमेकांच्या परवानगीने जर एकत्र भेटत,बोलत असतील तर त्यात गैर काय आहे .परंतु समाजाला ते मान्य नसतं अन त्यातुनच मग अशी जोडपी दिसली की त्यांना मारहाण,धमकावणे, डांबून ठेवणे असे प्रकार होतात,काही वर्षांपूर्वी शिवसेनेने अशाच पद्धतीने व्हॅलेंटाईन डे ला विरोध केला होता तेव्हाही त्याचा मोठ्या प्रमाणात अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध केला होता .
मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने काय करावे अन काय नको याचा अधिकार कायद्याने त्याला दिला आहे मात्र कायदा न मानणारे मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे असले प्रकार होऊ लागले आहेत .
त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत,गरीब,मध्यमवर्गीय घरातील लेकरांनी प्रेम केलं तर ते समाजाच्या दृष्टीने लफडं ठरतं अन थोरा मोठ्यांच्या लेकरांनी केलं तर ते अफेयर असत अन त्याला मान्यता दिली जाते .अरे काय हा वेडेपणा आहे,कुणी कुणावर प्रेम करावं याला काही बंधन नाहीत मात्र प्रेम करताना आजूबाजूचे वातावरण ,जागा,स्थळकाळ याच भान ठेवलं पाहिजे हे नक्की .पण ते सांगण्यासाठी सुद्धा पद्धत आहे,प्रेम हे झाडावर करा झाडाखाली नको अस चेष्टेने म्हटलं जातं ते आज खर होताना दिसत आहे कारण प्रेम करणाऱ्यांना बंधन घालणारे,त्यांच्यावर एखाद्या गुप्तहेराप्रमाणे नजर ठेवणाऱ्यांची संख्या मोठी आहे,बर या प्रेम करणाऱ्यांसाठी निश्चित अशी जागाही नाही की तिथं त्यांना कोणी अडवणार नाही .
जालना येथे घडलेला प्रकार हा हिमनगाचे एक टोक आहे,देशात,राज्यात,जिल्ह्याजिल्ह्यात,अगदी वाडी वस्ती तांड्यावर अशा प्रकारे प्रेम करणाऱ्यांना विरोध करणारे उपलब्ध आहेत .जणूकाही यांनी हे काम नाही केलं तर जगबुडी होईल अशा पद्धतीने हे लोक वागतात .मात्र हे करताना त्या दोन व्यक्तींच्या व्यक्तिगत आयुष्यावर त्याचा किती खोलवर आणि गंभीर परिणाम होईल याचा विचार कोणी करीत नाही .जालना येथे ज्या मुलामुलींच्या बाबतीत हा प्रकार घडला त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला,त्यातून त्या मुलाची,मुलीची किती बदनामी होणार याच्याशी या ठेकेदारांना काही देणंघेणं नाही .आयुष्यभर हे दोघे सामाजिक दडपणाखाली वावरत राहणार,समाज त्यांना पावलापावलावर टीका टिपणी करीत राहणार,त्यांच्या कुटुंबियांना देखील त्रास होणार आणि हे सगळं का तर प्रेम केलं म्हणून .त्यामुळेच मंगेश पाडगावकर यांच्या कवितेच्या या ओळी चपखलपणे या ठिकाणी आठवतात
"त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !"
मात्र समाजाला हे मान्य नाही कारण त्यांना दोन भिन्नलिंगी लोक कोणत्याही नात्याशिवाय एकत्र आलेले चालत नाहीत,आणि मग त्या दोन जीवांचा जीव घेण्यासाठी सुद्धा समाज मागेपुढे पाहत नाही .अन त्यातूनच मग ऑनर किलिंग सारखे प्रकार सुद्धा समोर येतात,वास्तविक पाहता असे कोणतेही प्रकार जर समाजाच्या निदर्शनास आले तर या दोन व्यक्तींना समोर बसवून त्यांचं समुपदेशन करून,समजावून सांगून,त्यांच्या कुटुंबियांना बोलून हा विषय मार्गी लावला जाऊ शकतो .पण अस केलं तर समाज सुसंकृत झाला आहे हे दिसेल ना अन ते होऊ द्यायचं नाही म्हणून मग हा असा प्रेमाचा पंचनामा केला जातो अन आपला कंडू शमवून घेत समाज नावाची व्यवस्था आपलीच पाठ थोपटून घेते,हे कुठेतरी थांबायला पाहिजे हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड.
9422744404

बुधवार, २९ जानेवारी, २०२०

(अ)जाणता राजा ...........!

(अ ) जाणता राजा .............!
राजकारणात कोण कधी कोणाचा कसा वापर करेल याचा नेम नाही,आपल्या स्वार्थासाठी हे राजकारणी देव,दानव एवढंच काय पण थोर महापुरुषांना सुद्धा सोडत नाहीत,अनेकदा या थोर विभूतींच्या नावे आपलं उखळ पांढर करण्याचा उद्योग हे राजकारणी करत असतात .अनेकदा देशापुढील महत्वाच्या समस्या वरून जनतेच लक्ष दूर करण्यासाठी हे असले उद्योग केले जातात,सध्या सुद्धा ज्या पुस्तकावरून देशात आगडोंब उसळला आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाने अधिकच भर पडली आहे .समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते असा दावा पवार यांनी करून नेमकं काय साधल हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे .
शरद गोविंदराव पवार हे नाव गेल्या पाच दशकापासून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपला वेगळा दबदबा निर्माण करून आहे .राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून ते देशाच्या संरक्षण, कृषी मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे शरद पवार हे जाणता राजा म्हणून राज्यात त्यांच्या अनुयायांकडून ठासून सांगितले जाते .आता जाणता राजा म्हणजे काय या विषयावर वाद प्रतिवाद होऊ शकतात पण इतिहासाची पानं चाळली तर हा शब्दप्रयोग केवळ आणि केवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदराने केला जातो नव्हे जनतेनेच त्यांना ही उपाधी दिल्याचे स्पष्ट होते,तरीसुद्धा अलीकडच्या काळात ही उपाधी पवार यांच्यासारख्याना दिली गेली आणि लोकांनीही त्यावर फार काही आक्षेप घेतला नाही .
मात्र शरद पवार हे गेल्या पन्नास वर्षात अनेकदा ऐतिहासिक असो की सांस्कृतिक अथवा पौराणिक विषयात नको ते बोलून समाजात दुही निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात असे अनेकदा आरोप झालेले आहेत .मात्र पवार यांनी कधी त्याची तमा बाळगलेली नाही .त्यांनी जातपात किंवा जातीयता स्वच्छपणे दिसेल किंवा जाणवेल अशी वक्तव्य करून आपल्या राजकारणाचा गाडा हाकलेला आहे .
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असताना पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूट वर झालेला हल्ला असो की दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्याचे प्रकरण असो प्रत्येकवेळी पवार यांनी यातून आपल्या बोलण्याने तेल ओतण्याचेच काम केलेले आहे .अगदी अलीकडच्या काळातील दाखला द्यायचा झाल्यास छत्रपती संभाजी राजे यांच्या खासदारकीवरून पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावताना पेशवे कधीपासून छत्रपतींना जहागिरी बहाल करु लागले अस वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती .एवढंच काय पण त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात चक्क पुणेरी पगडी हद्दपार करून यापुढे फुले पगडीचा वापर करावा अस सांगून आपले इरादे स्पष्ट केले होते .
पवार जे बोलतात त्यामागे त्यांचा नेमका असा राजकीय हेतू असतो हे आजवर लपून राहिलेलं नाही .एकीकडे राजकीय व्यसपीठावरून अथवा सामाजिक कार्यक्रमामधून जातीयतेच्या विरोधात आरोळ्या ठोकायच्या अन दुसरीकडे जातीय विद्वेष पसरेल अशी वक्तव्य करायची हा प्रकार पवार नेहमी करतात हे राज्यातील जनतेला माहीत झालेलं आहे .पवार नेहमी कोड्यात बोलतात अस म्हटलं जातं पण ज्यांनी त्यांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे त्यांना हे नक्कीच माहीत आहे की पवार हे कधीही हेतुशिवाय बोलत नाहीत .
महाराष्ट्र राज्य हे बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यांच्यासह सर्वांच राज्य आहे हे वेगळं सांगायची गरज नाही .दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील या सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेत स्वराज्य घडवण्यासाठी आपली हयात घालवली,ज्या राजेंनी जातीयता निर्मूलन व्हावी यासाठी आपल्या काळात आटोकाट प्रयत्न केले ,आपल्या सोबत सर्व जातीधर्माच्या मावळ्यांना घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली .मात्र त्यांच्याच राज्यात त्यांच्याच नावावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या राजकारण्यांचे आलेले पीक काही कमी होण्याचे नाव घेत नाही .
कोणताही मनुष्यप्राणी जन्माला आल्यानंतर आई हीच त्यांची पहिली गुरू असते कारण आपल्या उदरात नऊ महिने सांभाळ करून जन्म दिल्यानंतर देखील तीच त्याच्यावर संस्कार करत असते,त्यानंतर शिक्षक किंवा गुरुजन,समाज,मित्र हे त्याचे गुरू समजले जातात .मग त्यात वेगळं अस काय आहे .पण कोणत्याही गोष्टीत राजकारण करणाऱ्या पवार यांना या अशा गोष्टीत राजकीय भांडवल नाही सापडलं तर नवलच .त्यामुळे सध्या देशात जय भगवान गोयल यांच्या तथाकथित पुस्तकावरून जो वाद रंगला आहे त्यात शरद पवार हे उडी घेणार नाहीत हे कसं शक्य आहे .गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील नेत्यांमध्ये जे वाकयुद्ध सुरू आहे त्यात पवार यांनी वेगळाच विषय मांडून चर्चा तिसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो अजनातेपणे नव्हे तर जाणीवपूर्वक केल्याचे स्पष्ट दिसते .
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते तर जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरू होत्या अस सांगून पवार यांनी पुन्हा एकदा एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे .
छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्यकाळ सोळाव्या शतकातला आहे,त्यानंतर चार पाच दशक झाली तरीदेखील आजही या महापुरुषांच्या नावाने गाजर दाखवत जनतेला वेड्यात काढण्याचा उद्योग हे राजकारणी करीत आहेत अन हे माहीत असूनही लोक त्यांच्यामागे जातात यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असावी .
शरद पवार यांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी मोठा वाटा उचलला यात शंकाच नाही मात्र वेळोवेळी जेव्हा केव्हा गरज वाटेल तेव्हा तेव्हा त्यांनी जातीय विधान करून राज्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो .हा सगळाच प्रकार किळसवाणा म्हणावा लागेल असा आहे .आज जग हे एका खेड्याप्रमाणे झालेले असतानाही आपण नको त्या विषयावरून वाद विवाद,जातीयता,धार्मिक तेढ निर्माण करण्यात वेळ वाया घालवत आहोत .शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला अस म्हणलं जात असेल तरी त्यांनी राजकीय,सहकारी,खाजगी अशा अनेक ठिकाणी आपले पाहुणे रावळे चिकटवले अन स्थिरस्थावर केले .
पवार हे केवळ समर्थ रामदास यांच्याबाबत बोलूनच शांत राहिले नाहीत तर अल्पसंख्याक समाजाने संगीतल्यानेच आपण शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन केली अस सांगून पुन्हा एकदा आपले मनसुबे उघड केले .
पवार यांना राज्यातील राजकारणात जातपात आणून आपला हेतू साध्य करायचा असेल तर तो त्यांनी जरूर करावा मात्र त्यासाठी दुसऱ्या समाजाला दूषणे देणं भूषणावह नाही,पण हे त्यांना सांगणार कोण . निव्वळ जातीय ध्रुवीकरण करून आपला हेतू साध्य करायचा हेच त्यांच्या राजकारणाचे गणित राहिलेले आहे .समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते की नाही हा विषय कुठेच नव्हता मात्र पवार यांनी जाणीवपूर्वक हा विषय काढून आपल घोड दामटल .
कोणाच्याही ध्यानी मनी नसणारी गोष्ट पवार हे लोकांसमोर मांडतात अन मग त्यावरून राजकीय धुळवड रंगली की मग त्यात आपले हात धुवून घ्यायचे .राजकारण किती गलिच्छ पातळीवर जाऊन केलं जाऊ शकत हे जर शिकायचं असेल तर महाराष्ट्र आणि पवार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे .पवार हे आयुष्याच्या एका अशा टप्यावर आहेत की आता त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असायला हवं आणि राज्याच्या राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीला धडे द्यायला हवेत मात्र पवार हे जातीयवादाच जे बीज रुजवू पाहत आहेत त्यामुळे महाराष्ट्र आणि इथली सहिष्णू संस्कृती धोक्यात येऊ शकते हे नक्की .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड,9422744404

शनिवार, १४ डिसेंबर, २०१९

एक पत्र पंकजा मुंडेंना ...............!


राज्याच्या फायरब्रँड नेत्या पंकजा मुंडे,स.न.वि.वी.

विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून आपल्याशी संवाद साधायचा होता,मात्र योग्य वेळ साधली जात नव्हती .सोशल मीडियाच्या जमान्यात मी आपणास अनावृत्त पत्र लिहीत असल्याबद्दल आपणास देखील आश्चर्य वाटेल,मात्र पत्रावरील मजकूर डिलीट करता येत नाही अन ते पत्र कायम जपून ठेवता येतं त्यामुळे हा पत्रप्रपंच .
लोकसभा निवडणुकीत आपण ज्या पद्धतीने आपल्या बहिणीसाठी मेहनत घेतली आणि दिड लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवले त्यानंतर आपला विधानसभा निवडणुकीत कोणी पराभव करू शकेल अशी शंका देखील येणे शक्य नव्हते .मात्र खरं सांगू का लोकसभा निवडणुकीत जे मताधिक्य मिळाले ना कदाचित त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि आपण स्वतः काहीशा जास्तच हवेत गेलात असं आता वाटू लागलं आहे .तुम्ही म्हणाल पराभव झाल्यावर हजारो कारणं अन चुका यावर उपदेश केले जातात,अस केलं असत तर बरं झालं असतं, तस का केलं नाही,आम्ही सांगत होतो पण आमचं ऐकलं नाही,कार्यकर्त्यांना किंमत नव्हती ना कोणाचा पायपोस कोणाला होता अस .मात्र मला यातलं काहीही म्हणायचं नाही कारण विजयाचे हजारो बाप असतात पराभवाला कोणी वाली नसतो असच काहीस आपल्या बाबतीत झालं आहे .
2009 मध्ये तुम्ही पहिल्यांदा निवडून आलात मात्र आपलं कर्तृत्व दाखवण्याची संधी आपल्याला 2014 मध्ये मिळाली .दुसरी टर्म असताना देखील आपल्याला थेट कॅबिनेट मंत्रिपद दिलं गेलं कारण आपल्या माग वारसा होता गोपीनाथ मुंडे यांचा .नाहीतर चार चार टर्म आमदार असणारे अनेक आहेत आपल्या पक्षात पण त्यांना बाजूला ठेवून आपल्या पक्षानं आपल्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली .आपण त्यासाठी सक्षम नव्हता अस नाही मात्र आपल्यातील सर्व गुणांसोबतच गोपीनाथ मुंडे हे नाव आपल्या मागे असल्याने आपला मंत्रिमंडळात समावेश झाला .ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याच स्व मुंडे यांच स्वप्न घेवून आपण देखील ग्रामविकासची जबाबदारी स्वीकारली .वास्तविक आपल्याला गृह विभाग अधिक आवडला असता मात्र आपण मिळेल त्याच सोनं करायचं म्हणून जबाबदारी घेतली .
गेल्या पाच वर्षात आपण राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो की जलयुक्त शिवार अभियान अथवा 25 /15 किंवा बचतगट चळवळ या माध्यमातून मोठं कार्य उभा केलं .पण हे राज्यभर करताना आपलं आपल्या होमपीचकडं कमालीच दुर्लक्ष झाल .राज्यात आपल्या नावाचा डंका वाजत असताना परळीत मात्र आपली पकड ढिली होत चालली होती .
ग्रामपंचायत पासून ते नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्वच निवडणुकीत आपल्या पक्षाला जोरदार धक्के बसत होते .हे छोटे छोटे धक्के म्हणजे भविष्यातील आपल्यासाठी होणाऱ्या मोठ्या भूकंपाची चेतावणी होती .मात्र आपला किल्ला अभेद्य आहे अशा छोट्या धक्यांनी त्याला तडे जातील पण किल्ला शाबूत राहील असा आपला होरा होता,पण आपला अंदाज खोटा ठरला अन आपला किल्ला पुरता जमीनदोस्त झाला .
या भूकंपाचे धक्के बीड,आष्टी,माजलगाव या ठिकाणी देखील बसले अन पाच वरून भाजपचे संख्याबळ थेट 2 वर आले .
आपला पराभव का झाला,काय कारण आहेत,काय करायला पाहिजे होतं, काय चुकलं,कोणाचं चुकलं यावर मला येथे फार लिहायचं नाही कारण पराभवाची कारणमीमांसा करायला आपण सक्षम आहात .एक मात्र नक्की की हा पराभव झाला तरी आपल्याला त्यात भाजप,स्वतः तुम्ही,कार्यकर्ते यांचा फारसा दोष नसल्याचं वाटत नाही हे म्हणजे जरा जास्तच होतंय .पराभव हा पराभव असतो त्यासाठी दोन दोन महिने लोकांपासून दूर राहायचं नसतं पण हे तुम्हाला कोण सांगणार,कारण तुम्ही फटकळ .कोणी सांगायला गेलं तर त्याला काय बोलताल याचा नेम नाही असं आपल्याबद्दल आजही वाटतं.त्यामुळं आपल्या जवळच्या म्हणणाऱ्या कोणीच यावर आपल्यासोबत चर्चा केली नसावी अस प्रकर्षाने जाणवलं .कारण याची जाणीव आपल्याला करून दिली  असती तर आपण आपल्या बाबांच्या कार्यक्रमात जे व्यक्त झालात ते कदाचित बोलला नसतात .याचा अर्थ आपण जे बोलला ते सगळंच चूक होत का तर नाही ,पण त्यात कुठेतरी मी पणाचा दर्प जास्त जाणवत होता .तुमचा पराभव हा परळीच्या जनतेसाठी तर सोडाच पण राज्यातील तुमच्या समर्थकांसाठी
देखील धक्कादायक होता .पण म्हणून तुम्ही त्याच खापर लोकांवर फोडून मोकळं व्हायचं अस होत नाही .किंवा समोरच्या व्यक्तीचा विजय खुजा होत नाही .
राजकारण असो की युद्ध,हारजित होतच असते मात्र ती जास्तकाळ मनाला लावून घ्यायची नसते,आपण गोपीनाथ मुंडे यांच्या पोटी जन्मलात त्यामुळे राजकारणाचं बाळकडू आईच्या पोटातूनच आपल्याला मिळालं यात शंका नाही,पण आपली अवस्था महाभारतामधील अभिमन्यू सारखी झाली,चक्रव्यूहात आपण यशस्वीपणे शिरलात पण बाहेर पडताना आपल्याला मार्गच सापडला नाही अन आपला पराभव झाला,हा पराभव आपल्याला स्वीकारावा लागला अस मी म्हणणार नाही कारण आपण तो अजून मनापासून स्वीकारलेला नाही हे वारंवार दिसून येत .कारण वरवर जरी आपण पराभव झाल्याचं स्वीकारलं अस सांगत असलात तरी मनाच्या एका कोपऱ्यात कुठंतरी आजही मान्य होत नाही हे सत्य आहे अन ते नाकारता येणार नाही .
ज्या गोपीनाथ मुंडे यांनी आपली हयात भाजपसाठी खर्ची घातली त्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारे देण्याएव्हढा हा विषय मोठा नव्हता .पक्षाची काही धोरणे,निर्णय चुकले असतीलच पण त्याची अशाप्रकारे जाहीर सभांमधून चर्चा होणे अपेक्षित नाही .राजकारणातील आपले वयोमान उणेपूरे दहा वर्षाचे आहे,त्यात पाच वर्षे आपली बाबांच्या सानिध्यात गेली अन पाच वर्षे मंत्रिपदाची झुल घेऊन वावरण्यात गेली .त्यामुळे आपण चाळीस पन्नास वर्षे लोकांसाठी झटत आहात अन आपला त्याच लोकांनी पराभव केला अस काही झालेलं नाही .पराभव विसरून आपण कामाला लागणं अपेक्षित होत मात्र आपण हट्ट करून बसलात अन लोकांना दोष देत त्यांच्याकडे पाठ फिरवलीत .
तीस हजार लोकांनी आपल्याला मतदान न केल्यानं आपण पराभूत झालात मात्र 92 हजार लोकांनी आपल्याला मतदान केलं हे आपण का विसरता आहात .त्यांचा काय दोष मात्र तुम्ही सगळ्यांनाच वाऱ्यावर सोडून दोन महिने लांब राहिलात .निवडणूक प्रचारात झालेल्या आरोपांमुळे व्यथित होत आपण राजकारणातून मुक्त होण्याची भाषा केली मात्र हा विषय आता काढून उपयोग नाही .मुक्त होता येईल एवढं हे क्षेत्र आता पवित्र राहिलेलं नाही .गंदा है पर धंदा है अशी म्हण आहे काहीस राजकारणाबाबत असच म्हणावं लागेल .तुम्ही कितीही ठरवलं तरी लोक तुमच्याकडे येतच असतात अन अपेक्षा ठेवतच असतात .त्या पूर्ण करण्याच काम आपल्याला करावंच लागतं त्याऐवजी त्रागा करून जमत नसतं .पण हे तुम्हाला कोण सांगणार ?
गेल्या पाच वर्षात तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की परळी मतदारसंघ म्हणून तुम्ही कितीवेळ लोकांना दिला,मला माहित आहे एक महिला म्हणून तुम्हाला काही बंधन आहेत पण परळीतील लग्नकार्य,सुख दुःख,लोकांच्या अडचणी यामध्ये आपण प्रत्यक्ष कितीवेळा धावू  गेलात,आता तुम्ही म्हणाल की विरोधक काय रोजच लोकांचे दार झाडत होते का,तर नक्कीच नाही पण विरोधक काय करतात यापेक्षा आपल्याला काय करता येईल यावर लक्ष दिले तर जास्त सोयीचं होत अन नेमकं इथंच आपलं गणित बिघडलं .
'मेरी कमीज से तेरी कमीज सफेद कैसी 'या प्रयत्नात आपण आपल्याकडे अन आपल्या माणसांकडे दुर्लक्ष करीत गेलो .आजही दोन महिन्यांनी आपण परळीत आलात त्यानंतर किती लोकांना आपण भेटलात,त्यांच्या अडचणी समजून घेतल्यात किंवा दोन महिन्यात आपल्या मागेपुढे फिरणाऱ्या पदाधिकारी असोत की कार्यकर्ते यांनी लोकांना विचारलं आहे .आपण आलात की आपल्या गाडीच्या मागेपुढे करायचे अन आपलं हेलिकॉप्टर उडाल की अंबाजोगाई,लातूर,पुणे ,औरंगाबाद कडे निघायचं हा आपल्या जवळच्या लोकांचा नित्यक्रम आहे .हे आपल्याला देखील माहीत नाही अस नाही पण आपण त्याकडे दुर्लक्ष केलं अन बगलबच्यानी  देखील सामान्य लोकांकडे दुर्लक्ष केलं .
आपण हजारो कोटी रुपये आणले अन विकास केला मात्र कम्युनिकेशन गॅप भरून काढता आला नाही .आजही आपण केलेलं काम ठासून लोकांना सांगण्यासारखे कार्यकर्ते,ब्लॉक लेव्हल चे लीडर,तालुका,जिल्हा पातळीवरील नेते आपल्याकडे नाहीत.आहेत ते सगळे खुसमस्करे अन तोंडपूजे आहेत .कुठेही जा तेच दहा पाच लोक आपल्या भोवती असणार किंवा दिसणार .सामान्य कार्यकर्ता,माणूस आपल्या गाडीत कधी बसला का हो,सामान्य माणूस आपल्याला कधी थेट भेटला का हो .नक्कीच नाही कारण आपल्या बाजूला जमा झालेली ही बडव्यांची जत्रा .हो हो बडव्यांची जत्रा,आजही लोक तुम्ही रस्त्याने जाताना दिसलात तर स्व गोपीनाथ मुंडे दिसल्याचा भास होऊन हात जोडतात,पण तुम्हाला ते दिसत नाही किंवा दिसू दिलं जात नाही .त्यामुळेच तुमचा जनसंपर्क कमी झाला अन पराभव पदरी पडला .
गेल्या दहा बारा दिवसापासून म्हणजे 1 डिसेंबर पासून तुम्ही अस्वस्थ आहात अस चित्र दिसून आलं,ते मीडियाने रंगवल अस आपण आज म्हणत असलात तरी मीडिया बातम्या करत असताना आपणही कुठेच स्पष्ट भूमिका घेतली नाही .
आपण सस्पेन्स कायम ठेवला अन शेवटी काय केलं तर "खाया पिया कुछ नही गिलास तोडा बारा आणा "अस झालं .एवढा सगळा द्रामा करण्याची काहीच गरज नव्हती .स्व मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त तुम्ही थेट पक्षाला आव्हान देण्याऐवजी किंवा माझ्या बापाचा पक्ष आहे अस सांगण्याऐवजी मी माझ्या पराभवावर मंथन करण्यासाठी काही वेळ घेणार आहे,मला माझ्या लोकांशी त्यांच्या घरात जाऊन बोलायचं आहे,त्यांची सुख दुःख जाणून घ्यायची आहेत,त्यांच्या अडचणी सोडवायच्या आहेत,मी पाच वर्षात त्यांना वेळ देऊ शकले नाही मात्र आता जी संधी मिळाली आहे तीच मी सोनं करणार आहे,त्यामुळे मी पुढची दोन तीन वर्षे मुंबई,पुण्याला न फिरता अन राहता मुक्काम पोस्ट यशश्री निवास,शिवाजी चौक परळी येथेच राहणार आहे अस म्हटलं असत तर ते लोकांना अन पक्षाच्या नेत्यांना अधिक रुचल अन भावलं असतं .
पण तुमचं कसं आहे ना की तुमच्या इगोला कोणी डिवचल की तुम्ही अस्वस्थ होतात अन मग त्या सिंघम मधील जयकांत शिक्रे सारख करून बसतात .तुम्ही त्या दिवशी थेट पक्ष ,संघ,मतदार या सगळ्यांनाच आव्हान दिलंत, मान्य आहे तुम्ही पाच वर्षांपूर्वी मोठा संघर्ष केलात, आपल्या बाबांनी सुद्धा संघर्ष केला मात्र म्हणून पक्ष आपली जहागिरी होत नाही .दीडशे वर्षाची परंपरा असणारा काँग्रेस असो की दहा बारा वर्षांपूर्वीचा मनसे अथवा आप ,हे सगळे पक्ष कोणी ना कोणी स्थापन केले,अनेकांनी ते वाढवण्यासाठी योगदान अन बलिदान दिलं .म्हणून पक्ष त्यांच्या बापाचा होत नाही .
पक्ष हा लोकांचा असतो नेते किंवा आमदार खासदार हे त्याचे फारतर ट्रस्टी असू शकतात,पण त्या ट्रस्टीनी जर पक्ष बळकवण्याची
भाषा सुरू केली तर ते नेतृत्वाला न शोभणार आहे .तुम्ही जिल्ह्यात पक्षवाढीसाठी किती योगदान दिले किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांनी किती गाव,वाडी,वस्तीवर पक्षाच्या शाखा काढल्या यावर चिंतन करण्याची हीच वेळ आहे मात्र अशावेळी आपण जर पक्षालाच आत्मचिंतन करण्याचा सल्ला देत असाल तर भविष्य अवघड आहे .
तुम्ही नाराज नाहीत हे जरी म्हणत असलात तरी तुमची नाराजी लपून राहिलेली नाही,आपल्याला आणखी मोठ्या संधी मिळू शकतात मात्र त्यासाठी संयम महत्वाचा आहे,यशस्वी राजकारणी हा संयमी असावा लागतो तरच अपेक्षित फळ मिळते हे नक्की .तुम्हाला शून्यापासून सुरवात करायची आहे हे चांगलं आहे मात्र हे करताना समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेण्याची क्षमता ठेवा तरच आपण लांबचा  पल्ला गाठू शकाल .
फार जास्त आणि सविस्तर लिहिलं असलं तरी आपण मजकुरातील भावना समजून घ्याल ही अपेक्षा आहे .शेवटी आपण सुज्ञ आहात अन मोठा पल्ला गाठायचा आहे हे लक्षात ठेवाल असा विश्वास आहे .काही खटकलं असल्यास निश्चित पणे सांगा कारण पत्र लिहिताना कमीजास्त होऊ शकतं .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

डाऊन टू अर्थ ..............!

डाऊन टू अर्थ .................!

राजकारण असो की युद्ध एक नियम पाळावाच लागतो नव्हे पाळायलाच हवा अन तो म्हणजे समोरच्याला कधी अंडर इस्टिमेट करू नका अन ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नका,नेमकं बीड असो की आष्टी अथवा परळी,तिन्ही ठिकाणी हेच झालं .आपला प्रतिस्पर्धी हा ताकदवान आहे किंवा टक्कर देऊ शकतो याकडे दुर्लक्ष करून आपणच किती बलाढ्य आहोत हे बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला .अन त्याची परिनिती धक्कादायक पराभवात झाली .या तिन्ही निकालाकडे पाहिल्यास विजयी झालेल्यांची मेहनत जेवढी आहे त्यापेक्षा जास्त पराभूत उमेदवारांचा ओव्हरकॉन्फिडन्स महत्वाचा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .

2019 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले अन भाजप शिवसेनेच्या नेत्यांचे हात स्वर्गाला टेकले .आता महाराष्ट्र एकहाती सत्ता देणार या अभिनिवेषात हे सगळे नेते हवेत राहिले .
पन्नास वर्षापेक्षा जास्त काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणाची नस ना नस माहीत असणारा शरद पवार नावाचा माणूस समोर आहे याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला अन धक्कादायक निकाल हाती आले .
बीड जिल्ह्याचा विचार केला तर हा जिल्हा स्व गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो .राज्यात सत्ता कोणाचीही असो जिल्ह्यात मुंडे म्हणतील अन ठरवतील तोच आमदार खासदार होणार हे ठरलेले होते .मात्र मुंडेंच्या माघारी त्यांचा करिष्मा कायम ठेवण्यात फारसे यश आले नाही .2014 ला भाजपचे पाच आमदार विजयी झाले मात्र पाच वर्षात हे यश कायम टिकवण्यात नेतृत्वाला अपयश आले .स्वतःसोबतच चार जागा महायुतीच्या पंकजा मुंडे यांनी गमावल्या .
राज्यात ज्या दोन लढतीकडे राजकीय धुरीणांचे लक्ष होते त्या म्हणजे बीड आणि परळी.आणि या दोन्ही ठिकाणचे जे निकाल लागले ते सर्वांना धक्का देणारे होते .या निकालांचा अन्वयार्थ लावायचा म्हणल्यास एकच वाक्य पुरेसे आहे आणि ते म्हणजे ओव्हरकॉन्फिडन्स आणि ओव्हरकॉन्फिडन्स .
पंकजा मुंडे यांना ओव्हरकॉन्फिडन्स होता की नाही माहीत नाही पण त्यांनी ग्राउंड रियालिटी अन ग्राउंड रिपोर्टकडे सपशेल दुर्लक्ष केले .धनंजय मुंडे हे चार वर्षांपासून परळीत नेटवर्क लावण्यात व्यस्त होते तर पंकजा मुंडे मात्र  लोकांपर्यंत पोहचण्यात कमी पडत होत्या .लोकसंपर्क हा राजकीय नेत्यांचा कमालीचा महत्वाचा गुण आहे याचा विसर त्यांना पडला असावा अन धनंजय यांनी मात्र दांडगा लोकसंपर्क ठेवण्यात यश मिळवले .त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला अन धनंजय यांनी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या लढतीत सहज अन मोठा विजय मिळवला .निवडणूक कोणतीही असो तुमचं होमवर्क व्यवस्थित पाहिजे हा वस्तुपाठच या निमित्तानं धनंजय मुंडे यांनी घालून दिला .पंकजा मुंडे या राज्यभर प्रचार करीत असताना धनंजय यांनी मात्र ग्राउंड पक्के करून राज्यात प्रचार केला,कुठेही प्रचार केला तरी त्यांचे परळीतील घटना घडामोडींवर बारीक लक्ष होत,दुसरीकडं पंकजा मुंडे या देखील लक्ष ठेवून होत्या मात्र यंत्रणा ज्यांच्याकडे होती ते सगळे ताई आल्यावर पुढे पुढे करणारे खुसमस्करे जमा झाल्याने त्यांचा ग्राउंडशी संपर्कच राहिला नाही .याचा व्हायचा तोच परिणाम झाला अन जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा वेळ निघून गेलेली होती .

बीडच्या बाबतीत सुद्धा हेच झाले,चार वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी खाली काय चालले आहे याकडे  लक्षच दिले नाही .अन सेनेत जाऊन मंत्रिपद मिळवल्यानंतर देखील त्यांचा बहुतांश वेळा हा मुंबईतच गेला,त्या काळात म्हणजे लोकसभा निकालानंतर संदिप ने मात्र डोअर टू डोअर जात लोकांशी थेट संपर्क वाढवला,दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर हे मात्र मुंबई,औरंगाबाद आणि कधी कधी पर्यटनाला आल्यासारखे ते बीडला धावती भेट द्यायचे .नगर पालिका असो की पंचायत समिती अथवा इतर संस्था यामध्ये नेमकं काय सुरू आहे,लोकांची भावना काय आहे,जनभावना काय म्हणते आहे ,याचा कधी त्यांनी विचारच केला नाही .जयदत्त क्षीरसागर यांना ठराविक लोकांनी घेरल्यामुळे लोकांशी असलेली नाळ तुटली अन दुसऱ्या फळीतील नेत्यांनी बिडकरांना गृहीत धरले .अमका एरिया आपलंच आहे,हा समाज आपल्याशिवाय जाऊच शकत नाही,व्यापाऱ्याच्या महत्वाच्या लोकांना सांगितले की सगळे सोबत येतात,शहरात जरी असुविधा असली तरी एका रात्रीत रोड करू अन मत मिळवू,बाहेरून आणलेले मतदार आपलेच आहेत,ग्रामीण भाग आपल्या पाठीशी आहे या आणि अशा सगळ्या भ्रमात जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे सहकारी राहिले .
गेल्या चार वर्षात विकासाच्या नावाखाली बीड शहराचे जे वाटोळे झाले आहे ते लोकांना खटकत होते पण समोर बोलून का दुश्मनी घ्यायची असा विचार लोकांनी केला .प्रभाग अकरा मधून ट्रेलर देखील दाखवला मात्र मोठ्या क्षीरसागर यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं किंवा सब कुछ अलबेल है असा भास त्यांच्या समोर निर्माण केला गेला .नगर पालिकेसारखी संस्था ताब्यात असल्यावर होत्याच नव्हतं होत हे बीडमध्ये दिसलं तर तीच नगरपालिका नव्हत्याच होत करू शकते हे परलीमध्ये स्पष्टपणे जाणवलं .दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांनी मात्र गढूळ पाण्याचा होणारा पुरवठा,रस्त्याची अर्धवट कामे,शहरातील तुंबलेल्या गटारी,नगर पालिकेचा बोगस अन भ्रष्ट कारभार हे विषय घेऊन थेट लोकांच्या घरात पोहचले अन इथं त्यांन लोकांच्या काळजाला हात घातला .तीस वर्षांपासून ताब्यात असणार शहर नेहमीच का मायनस जात याचा अभ्यास कदाचित सत्ताधारी करीत नसावेत अन त्यांचे कच्चे दुवे संदीपने हेरले असावेत त्यामुळे दहा हजारापेक्षा जास्त मताधिक्य संदीप ला शहरातून मिळालं .त्याचा डोअर तू डोअर प्रचार,संदीप म्हणजे आपण आमदार अस समजून जीवाच रान करणारी टीम ,हात दाखवा अन गाडी थांबवा ही इमेज ह्यामुळे संदीप महिला असोत की तरुण अथवा विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये लोकप्रिय झाला अन मोठया क्षीरसागर यांनी त्याला चिल्लर समजले अन स्वतःच्या पायावर धोंडा पडून घेतला .क्षीरसागर यांच्या पराभवाला धाकल्या क्षीरसागर यांचा कारभार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे मात्र विरोधकांच्या कच्या दुव्याच संधी समजून सोन करण्याचं जे काम संदीप ने केलं ते कौतुकास्पद आहे .भलेभले दिग्गज अन राजकीय पंडित जयदत्त क्षीरसागर यांच्या विजयाची खात्री देत होते मात्र संदीपसोबत असलेली टिम, प्रचंड इच्छाशक्ती,नेटके नियोजन,दांडगा जनसंपर्क, शेवटच्या क्षणापर्यंत विजय आपलंच आहे हा विश्वास यामुळे थोरल्या क्षीरसागर यांचा बुरुज ढासळला.

बीड परळी सारख आष्टी मध्ये देखील विद्यमान आमदार भीमराव धोंडे हे बिनधास्त राहिले,लोकसभेत मिळालेली 70 हजाराची लीड तुटली तरी अर्ध्यावर येईल मात्र समोरचा पहिलवान पक्का नाही त्यामुळे ते खुशालचेंडू सारखे वागले आणि नेमकं इथंच त्यांचा घात झाला .आता कटप्पा कोण अन बाहुबली कोण या चर्चा करण्यात काही मतलब नाही .धोंडे हे लोकांना भेटत नाहीत,सहा वाजताच त्यांच्या घराची दार बंद होतात,अनेक गावांत ते गेलेच नाहीत,लोकांचे फोन घेत नाहीत,ठेविले अनंते तैसेचि रहावे अस वागतात या त्यांच्या बद्दलच्या चर्चा मतदारांनी खऱ्या करून दाखवल्या अन ते उमेदवारी नको नको म्हणणाऱ्या बाळासाहेब आजबे सारख्या उमेदवाराकडून सपाटून पडले .इथदेखील धोंडे यांचा जनसंपर्क कमी पडला हे विशेष,शेवटपर्यंत ते लोकांमध्ये मिसळले नाहीत ही वस्तुस्थिती आहे अन त्यामुळेच त्यांचा पराभव झाला .
एकूणच बीड जिल्ह्याचा विचार केला तर गेवराई असो कि परळी अथवा बीड या सर्वच ठिकाणी शहराने ज्यांच्या पारड्यात माप टाकले त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे,आणि यावरून तुम्ही लोकांच्या अडीअडचणीच्या काळात किती धावून जातात यावर तुमच्या जय पराजयाच गणित अवलंबून असते हे नक्की .ज्यांचा विजय झाला ते बहुतांश लोकप्रतिनिधी हे डाऊन टू अर्थ अशा पद्धतिने वागणारे होते हे नाकारून चालणार नाही .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड,9422744404

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

चुनौती बडी लेकीन नामुमकीन नही .........!




पंकजा मुंडे अडचणीत आहेत का ?पंकजा मुंडेंना भीती वाटते का ?पंकजांसमोर धनंजय मुंडे यांचे आव्हान कितपत आहे ?या आणि अशा बातम्यांवर सध्या बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे .वास्तविक पाहता निवडणूक मग ती ग्रामपंचायत ची असो की विधानसभा, लोकसभा .प्रत्येकजण त्यात विजय मिळावा यासाठीच अहोरात्र मेहनत करत असतो .कोणतीही निवडणूक सोपी किंवा एकतर्फी कधीच नसते आणि ती तशी होऊ देखील नये .लोकशाही म्हणल्यावर त्यात आरोप प्रत्यारोप,एकमेकांच्या उकाळ्या पाकळ्या निघणारच .पण परळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे .असे असतानाही पंकजा मुंडे ज्या पद्धतीने राज्यात प्रचारसभा घेत फिरत आहेत ते पाहता त्या आपल्या मतदारसंघात मजबूत आहेत असच म्हणावं लागेल .
लोकसभा निवडणुकी नंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते .देशात मोदींचा करिष्मा चालल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे नेते बिनधास्त होते तर विरोधीपक्ष पुन्हा जमवाजमव करण्यात गुंतला होता .
एकीकडे भाजप शिवसेनेत होणारी इनकमिंग आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ला लागलेली गळती,अशा वातावरणात निकाल काय लागणार हे स्पष्ट होते .तरीदेखील शरद पवार यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली अन एकतर्फी वाटणारी ही निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे .
राज्यात ज्या काही महत्वपूर्ण लढती होत आहेत त्यात सर्वाधिक लक्षवेधी लढत आहे ती बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात .कारण येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे या बहीण भावात लढत होत आहे .
यापूर्वी देखील 2014 साली या दोघांमध्ये लढत झाली होती अन त्यात पंकजा यांनी भावाला चितपट केलं होतं .त्यानंतर झालेल्या नगर पालिका अन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत धनंजय यांनी विजय मिळवत विधानसभा निवडणुकीचा वचपा काढला होता .
मात्र गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले .पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे .गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे यांनी आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात देखील हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणला .गेल्या पंधरा वीस वर्षांत जी काम झाली नाहीत ती मागच्या पाच वर्षात झाली हे सत्य कोणी नाकारू शकत नाही,मात्र तरीदेखील प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय मुंडे यांनी यावेळी टाईट फिल्डिंग लावल्याने धक्कादायक निकाल लागतील की काय अशी चर्चा सुरू आहे .
पंकजा मुंडे या त्यांच्या स्पष्टवक्तेपणा मुळे अनेकवेळा मीडियामध्ये चर्चेत असतात,कोणत्याही मुद्यावरून विरोधक त्यांना अडचणीत आणायची एकही संधी सोडत नाहीत .या निवडणुकीत देखील पंकजा मुंडे या अडचणीत आहेत,त्यांच्यासमोर तगडे आव्हान धनंजय यांनी उभे केले आहे अशी चर्चा सुरू झाली .
गेल्या पाच वर्षात या दोन्ही बहीण भावांनी परळीच्या लोकांसाठी जे काही केले त्याचा लेखाजोखा मांडण्याची ही वेळ आहे ,मात्र नको ते आरोप करून,भावनिक राजकारणाचा आधार घेतला जात असल्याचे चित्र आहे .पंकजा मुंडे या अडचणीत आहेत,त्यांना निवडणुकीची भीती वाटते अशा वावड्या उठवल्या जात आहेत .
वस्तुस्थिती मात्र तशी नसल्याचे दिसते .
पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच परळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती .लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांनी 25 हजाराचे मताधिक्य घेत विधानसभा निवडणुकीत काय होणार हे दाखवून दिले होते .तब्बल 140 पेक्षा अधिक गावात 25 / 15 असो की मुख्यमंत्री ग्राम सडक योजना,अथवा जलयुक्त शिवार या माध्यमातून त्यांनी थेट लोकांच्या दारापर्यंत विकास नेला आहे,त्यामुळे त्यांच काम बोलत आहे .
लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आता त्यांच्यासाठी मागील दोन महिन्यांपासून प्रीतम मुंडे फिरत आहेत .पंकजा मुंडे यांच नेतृत्व राज्यव्यापी आहे,त्या गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मास लीडर म्हणून पुढे आल्या आहेत .लाखोंच्या सभा गाजवायच्या कशा याच बाळकडू बापाकडून मिळाल्याने त्या तयार झाल्या आहेत .त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सगळ्यात जास्त मागणी आहे ती पंकजा मुंडे यांना .
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूड मध्ये अडकून पडलेले असताना आणि भाजपचे इतर मंत्री आणि दिगग्ज नेते आपल्या मतदारसंघात तळ ठोकून असताना पंकजा मुंडे मात्र राज्यभर प्रचारसभा गाजवत फिरत आहेत .
अगदी राज्यात सभा गाजवणारे आणि हल्लाबोल असो की शिवस्वराज्य यात्रा या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडणारे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे देखील आपल्याच मतदारसंघात व्यस्त आहेत .
मला लोकांमध्ये गोपीनाथ मुंडे म्हणजे माझे बाबा दिसतात अस ठणकावून सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या पाठीशी राज्यभरातून जे जनसमर्थन उभे राहत आहे ते पाहिल्यानंतर त्यांना परळीची निवडणूक अवघड आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही .
ज्या नेत्याच्या ऐका हाकेवर सावरगाव सारख्या ठिकाणी लाखो लोक येतात,पक्षाचे प्रमुख अमित शहा येतात,दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याचं आणि त्यांच्या कामाच कौतुक करतात त्या नेत्याला परळीकर जनता धक्का देईल असे आज तरी चित्र दिसत नाही .फाईट तगडी आहे हे खरे आहे,कारण पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेच नव्हे तर अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत .कारण त्यांच्या पाठीशी असलेले जनसमर्थन आहे .अवघ्या पाच वर्षांच्या काळात वडील गेल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने लोकांचा विश्वास संपादन केला तो विरोधीपक्षाला तर सोडाच पण स्वपक्षीयांना देखील धडकी भरवणारा आहे हे स्पष्ट आहे .त्यामुळे त्यांना राज्यभर मिळणारे समर्थन रोखण्यासाठी प्रयत्न होत नसतील तर नवलच आहे .
तरीदेखील पंकजा मुंडे या ज्या पद्धतीने राज्यात प्रचारसभा गाजवत आहेत ते पाहिल्यानंतर ही पोरगी बापापेक्षा चार पावलं पुढं आहे असेच म्हणावे लागेल,कारण गोपीनाथ मुंडे हे दिवसभर राज्यात कुठेही प्रचाराला गेले तरी रात्री परळीत डेरेदाखल व्हायचे ,मात्र पंकजा मुंडे या ज्या पद्धतीने राज्यात बिनधास्त फिरत आहेत त्यावरून नक्कीच वाटते की त्यांना आपल्या मतदारसंघात काय होणार याची नक्कीच खात्री आहे .याला काही लोक कदाचित ओव्हरकॉन्फिडन्स देखील म्हणतील ,मात्र जे आहे ते स्पष्ट आहे की त्या राज्यभर फिरत आहेत अन त्यांच्या सभांना मागणी आणि गर्दी देखील होत आहे .
पंकजा मुंडे यांची सभा म्हणजे विजयाची मुहुर्तमेढ असेच समीकरण झाले आहे त्यामुळेच जिल्ह्यात तर सोडाच पण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ,खान्देश या भागातही त्यांच्या सभांची मागणी होत आहे .निवडणूक जाहीर झाल्यापासून पंकजा मुंडे या पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत आहेत .लोकांच्या मनातलं ओळखून त्यांना काय आवडत याचा त्यांना पक्का अंदाज आला आहे ,त्यामुळे त्यांच्या सभांना तुफान गर्दी होतानाचे चित्र दिसत आहे .
अस असलं तरी परळीवर देखील त्यांचं बारीक लक्ष आहे,निवडणूक म्हणजे एकप्रकारे युद्धच असते त्यात सगळ्याच गोष्टी थेट वार करून मिळवायच्या नसतात तर काही गोष्टी गनिमी कावा करून प्राप्त कराव्या लागतात हे त्यांनी नमिता मुंदडा यांच्या प्रवेशातुन दाखवून दिले तसेच टि पी मुंडे सारखा मोहरा सोबत घेत विरोधकांना जोरदार धक्का दिला . त्यामुळे परळीत जे काही व्हायचे ते 24 तारखेला समजेलच पण आज तरी या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात काटेकी टक्कर आहे हे वास्तव आहे पण शेवटी एवढंच म्हणावं वाटत की चुनौती बडी है लेकीन नामुमकीन नही !
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

तुझं ते हि माझंच ...........!

तुझं ते ही माझंच .........!

सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमारच्या एका चित्रपटातील एक प्रसंग जोरदारपणे चर्चेत आहे,यामध्ये अक्षयकुमार हा त्याच्या पार्टनर सोबत पैशाची वाटणी करताना दाखवला आहे,तसेच राऊडी राठोड मध्ये सुद्धा तो अशाच पद्धतीने वाटणी करताना दाखवला आहे,यामध्ये वाटणी समसमान झाल्याचा आणि पार्टनर खुश झाल्याचं दिसत,मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळंच असत,यात फायदा होतो तो अक्षयकुमार याचाच .हे आठवण्याच कारण म्हणजे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांमध्ये झालेलं जागांच वाटप होय .

माझं ते माझं अन तुझं ते ही माझं असा खेळ सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू असल्याचं दिसत आहे.भाजप आणि शिवसेनेच्या यादीवर नजर टाकली तर लक्षात येते की आपल्या पक्षाचे म्हणजे आपल्याला मानणारे लोक तर फडणवीस यांनी भाजपकडून दिलेच पण शिवसेनेच्या यादीत सुद्धा फडणवीस यांना माणणाऱ्यांचा भरणा आहे,एवढंच नाही तर जे मित्रपक्षाकडून उमेदवार म्हणून दिले आहेत ते देखील फडणवीस यांच्याच जवळचे आहेत .काँग्रेस,राष्ट्रवादीकडून ऐनवेळी उमेदवारी मिळवलेले काहीजण सुद्धा फडणवीस यांच्या संपर्कात होते हे विशेष .त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत माझं ते माझ अन तुझं ते ही माझंच असाच खेळ फडणवीस यांनी मांडला आहे .त्यामुळे निकाल काय लागणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही हे नक्की .
राज्याच्या विधानसभा निवडणुकी कडे देशाचे लक्ष लागले आहे,देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई आणि राज्यावर आपली हुकूमत असावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . निवडणूक जाहीर होण्याच्या सहा महिने नव्हे वर्ष दोन वर्षे अगोदर पासूनच फडणवीस यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती अस म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही .
काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील असोत की विजयसिंह मोहिते पाटील अथवा जयदत्त क्षीरसागर किंवा ऐनवेळी पक्षात आलेले अनेकजण असोत प्रत्येकाशी फडणवीस यांनी एक वेगळीच लाईन लावून ठेवली होती .पाथरी विधानसभा मतदार संघातून रिपाई ची उमेदवारी मिळालेले मोहन फड हे अपक्ष म्हणून 2014 ला निवडून आले ,नंतर शिवसेना मार्गे भाजपात दाखल झाले आणि वाटाघाटीमध्ये हा मतदारसंघ मित्रपक्ष रिपाईकडे गेल्यानंतर त्यांना रिपाईकडून उमेदवारी देण्यात फडणवीस यशस्वी झाले .त्यांच्याच शेजारच्या जिंतूर मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या मेघना बोर्डीकर यांना देखील फडणवीस यांनी रासपची उमेदवारी मिळवून दिली .
गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सहभागी झालेल्या विनायक मेटे यांच्या वाट्याला जे तीन मतदारसंघ आले तेथेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलेच शिलेदार उभे केले .लोकसभा निवडणुकीच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील यांनी तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला .बीड आणि सिल्लोड मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला असल्याने जयदत्त क्षीरसागर आणि अब्दुल सत्तार यांना सेनेत पाठवत फडणवीस यांनी बाजी मारली .लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजेंद्र गावित या विद्यमान भाजप खासदाराला शिवसेनेत पाठवत त्यांना निवडून आणले .
राज्यात यावेळी भाजपकडून जे उमेदवार उभे आहेत आणि ज्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली अशा तब्बल वीस पेक्षा अधिक लोकांची उमेदवारी आणि मतदारसंघ फडणवीस यांनी च फायनल केले आहेत .शिवसेनेच्या वाट्याला ज्या 124 जागा आल्या आणि मित्रपक्षांना ज्या 18 जागा दिल्या गेल्या त्यातील तीस टाक्यांपेक्षा जास्त उमेदवार हे फडणवीस यांना मानणारे आहेत हे विशेष .
महायुतीमध्ये जे मित्रपक्ष सहभागी झाले त्यांना आमच्या कोट्यातून जागा दिल्या जातील हे मान्य करताना फडणवीस यांचा धुर्तपणा कोणाच्याच लक्षात आला नाही . रिपाई असो की रासप अथवा शिवसंग्राम सगळ्यांना जागा तर दिल्या मात्र त्यांचे उमेदवार आपल्या मर्जीतील देताना फडणवीस यांनी त्यांना आपल्याच पक्षाच्या चिन्हावर म्हणजे कमळावर उभे करून आपली खेळी यशस्वी केली .
मित्रपक्ष आणि सत्ताधारी असताना सुद्धा शिवसेनेने  साडेचार वर्ष भाजपच्या विरोधात रान उठवले,फडणवीस यांच्यापासून ते मोदी शहा यांच्यापर्यंत सगळ्यांचा यथेच्छ समाचार घेतला .लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती तुटते की काय असे वाटत असताना शहा आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अशी काही स्वप्न दाखवली की त्यात त्यांचा विरोध मावळला आणि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात देखील युती अभेद्य राहिली .
मध्यंतरी एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आमची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फायनल करणार आहेत अशी मिश्किल टिप्पणी केली होती,आज दोन्ही पक्षांसह मित्रपक्षांना दिलेल्या जागा आणि उभे असलेले उमेदवार पाहिल्यास यादी फडणवीस यांनी फायनल केल्याचे दिसून येते .
भाजपमध्ये शिस्त पाळली जाते अस म्हटलं जातं ,यादीवर नजर टाकली तर कॉग्रेसी संस्कृती मध्ये वाढलेल्या आणि अनेक बेशिस्त असणाऱ्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते .लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेनेने काही उमेदवार बदलावेत असा फडणवीस यांचा आग्रह होता मात्र सेनेने ती ऐकला नाही अन चार पाच जागांचा फटका त्यांना बसला .कॉग्रेसमुक्त भारत चा नारा नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर फडणवीस यांनी राज्यात राष्ट्रवादी मुक्त नारा दिला ,पण तो पूर्ण करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांचा सहारा घ्यावा लागला हे ढळढळीत सत्य आहे .विजयसिंह मोहिते असोत की राणा पाटील अनेक दिग्गजांना आपल्या गळाला लावताना फडणवीस यांनी आपल्या पक्षातील स्पर्धक बनू शकणाऱ्या खडसे,तावडे यांच्यासारख्यांचा पत्ता कापून आपणच किती प्रबळ आहोत हर दाखवून दिले .
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासारखा ऐंशी वर्षाचा तरुण मैदानात उतरला असताना राज ठाकरे असोत की राहुल गांधी यांच्यात मात्र तो उत्साह पाहायला मिळत नाही .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे ते भाजप सेनेच्या या दिग्गज लोकांसमोर कितपत टिकतील ही शंकाच आहे .अशावेळी येणाऱ्या 24 तारखेनंतर जे सरकार अस्तित्वात येईल त्यावर देखील फडणवीस यांचाच वरचष्मा असणार हे निश्चित आहे .सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यावयाचे अन कोणाला बाजूला बसवायचे,तसेच कोणाला कोणते खाते द्यायचे याचा मास्टर प्लॅन देखील फडणवीस यांच्याकडे तयार असल्यास आश्चर्य वाटायला नको .मध्यंतरी एका कार्यक्रमात फडणवीस यांना तुम्ही आजच्या काळातले शरद पवार आहात का,तुम्हाला पवार व्हायला आवडेल का अस विचारल्यावर मिश्कीलपणे हसत त्यांनी पवार यांचे दिवस आणि त्यांच राजकारण संपल्याच सांगितलं होतं,तेव्हाच खडसे,तावडे यांनी वाऱ्याचा वेग अन दिशा ओळखायला पाहिजे होती .अबकी बार फडणवीस सरकार असंच त्यांना सांगायचं होत मात्र ते ना स्वपक्षातील लोकांना समजलं ना मित्रपक्षांना .त्यामुळेच आज जी परिस्थिती दिसते आहे ती पूर्णपणे फडणवीस यांना पोषक अशीच असल्याचे जाणवते .त्यामुळेच येणाऱ्या काळात फडणवीस बोले अन मित्रपक्षासह विरोधीपक्ष सुद्धा चाले असे चित्र दिसले तर आश्चर्य वाटायला नको .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...