बुधवार, १३ जून, २०१८

जादूच्या कांडीने विरोधकांची दांडी गुल



जादूच्या कांडीने उडवली भल्या भल्यांची दांडी

 पुरेसे संख्याबळ नसतानाही विजय मिळवणे किंवा सत्ता ताब्यात घेणे हा नवीन पॅटर्न अलीकडच्या काळात भाजपने रूढ केला आहे,देशपातळीवर मोदी शहा यांची जोडगोळी यापद्धतीने काम करीत असताना महाराष्ट्रात विशेषतः विधान परिषदेच्या लातूर बीड उस्मानाबाद मतदार संघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील याच पद्धतीने करिष्मा करून दाखवला आहे,जादूची कांडी ही फक्त गोपीनाथ मुंडे यांच्याकडेच होती,त्यांच्यानंतर या कांडीचा प्रभाव ओसरला आहे ही चर्चा पंकजा मुंडे यांनी खोटी ठरवली आहे.पंकजा यांच्या जादूच्या कांडीचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की यामुळे विरोधकांची दांडी गुल झाली . अवघे 370 मत भाजप सेनेकडे असताना सुरेश धस यांनी 527 मत घेवुन विरोधकांच्या हातातील विजय खेचून आणला . या विजयामुळे पंकजा मुंडे यांच्या बेरजेच्या राजकारणाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही .

देशात कोठेही निवडणूक असली की ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अग्निपरीक्षा असल्याचे चित्र रंगवले जाते हा गेल्या चार वर्षातील अनुभव आहे,या अनुभवातून तावून सुलाखून निघत मोदी यांनी तब्बल 15 राज्यात भाजपचा झेंडा रोवला तरीदेखील विरोधक आणि मीडिया प्रत्येकवेळी त्यांची अग्निपरीक्षा असल्याचे सांगून लढत लक्षवेधी करतो .याच पद्धतीने मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत असो की विधानपरिषदेची निवडणूक प्रत्येक वेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागते किंवा तसे चित्र निर्माण केले जाते .अशावेळी कधी धनंजय मुंडे तर कधी पंकजा मुंडे सरस ठरतात.जिल्हा परिषद, नगर पालिकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदार संघात धनंजय मुंडे यांनी सफाया केल्यानंतर पंकजा यांच्या राजकीय कारकीर्दीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते,मात्र एका दर्शनाने देव म्हातारा होत नाही त्याप्रमाणे एक दोन पराभव झाल्याने आपण खचून जाणार नाही हेच पंकजा यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिले आहे .

21 मे रोजी राज्यातील सहा विधानपरिषदे च्या जागांसाठी मतदान झाले मात्र सगळ्यांचे लक्ष मराठवाड्यातील लातूर बीड उस्मानाबाद या मतदार संघाच्या निकालाकडे लागले होते,कारण सुरवातीपासूनच ही निवडणूक नाट्यमय घडामोडीमुळे चर्चेत होती .पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड यांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी जोरदार धक्का दिला होता,मात्र कराड यांच्या माघारीमुळे धनंजय यांनाच धक्का बसला,कराड यांच्या माघारीसाठी भाजप आणि विशेषतः पंकजा मुंडे यांना जबाबदार धरले गेले,वास्तव कराड यांनाच माहीत.मात्र कराडांची माघार हा पंकजा यांच्या धूर्त राजकारणाचा मास्टरस्ट्रोक ठरल्याची चर्चा झाली.

भाजपकडे या मतदार संघात केवळ 370 एवढे अत्यल्प संख्याबळ होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीच्या हक्काच्या जागेवर पाणी सोडत  लातूर बीड उस्मानाबाद मध्ये जोर लावला,रमेश कराड यांनी ऐनवेळी धोका दिल्यानंतर अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली .राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातील नेत्यांना एवढा आत्मविश्वास होता की त्यांनी पक्षाच्या ए बी फॉर्म वर दुसऱ्या उमेदवाराचे नाव सुद्धा टाकले नाही .

कराड यांनी दिलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत सावरली नाही हेच निकालानंतर स्पष्ट झाले .तब्बल 550 पेक्षा अधिक मतदान हातात असताना राष्ट्रवादीला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला तर भाजपने संख्याबळ नसतानाही योग्य नियोजन,मतदारांशी थेट संपर्क यावर भर देत विजय खेचुन आणला .

ट्वेन्टी ट्वेन्टी असो की वल्ड कप ची फायनल प्रत्येकवेळी कुल माईंडणे  खेळून विजय खेचून आणणाऱ्या महेंद्रसिंग धोनी प्रमाणे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी याठिकाणी थंड डोक्याने मेहनत घेत विजय मिळवला . या निवडणुकीची तयारी भाजपने वर्षभरा पासूनच सुरू केली होती,जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश धस यांनी भाजपला उघडपणे मदत केल्यानंतर स्पष्ट झाले होते की पंकजा मुंडे या धस यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांना विधानपरिषदेची संधी देणार म्हणून,मुख्यमंत्र्यांनी देखील तसा ग्रीन सिग्नल त्यावेळीच दिला होता,त्यामुळे धस कामाला लागले होते,तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे हे सहा आठ महिन्यापासून मेहनत घेत असताना ऐनवेळी कराड यांना आयात करून राष्ट्रवादीने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता,हे कराड यांच्या माघारीने अधिकच स्पष्टपणे अधोरेखित झाले .
समोर शत्रू पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेला असताना सेनापतीनेच पळ काढल्यानंतर काय अवस्था होते तशी काहीशी परिस्थिती कराड  यांच्या माघारीनंतर राष्ट्रवादीची झाली होती.मात्र तरीदेखील जगदाळे यांच्या पाठीशी राष्ट्रवादीने ताकद लावली पण मित्रपक्षाने हात दिला आणि सहज वाटणारा विजय पराभवाच्या रुपात पदरात पडला .

या निकालाने अनेकांचा हिशोब चुकता झाला आहे,पंकजा मुंडे या केवळ स्वतःपुरते राजकारण करतात,त्या अद्याप परिपक्व राजकारणी झालेल्या नाहीत,उथळ राजकारणाने त्यांना जी प ,प स,न प मध्ये फटका बसला आहे,त्यांचा फटकळ स्वभाव त्यांच्या राजकारणाचा घात करणार या सर्व चर्चांना या विजयाने पूर्णविराम मिळाला आहे .

गेल्या अनेक वर्षांपासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे,मात्र 2014 नंतर पंकजा मुंडे असोत की संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजपची ताकद वाढली होती,लातूर महापालिका असो की जिल्हा परिषद अथवा बीड जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी भाजपने यश मिळवले होते त्यामुळेच भाजपने या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आणि विजय मिळवून दाखवला .

राजकारणामध्ये कोणीच कायमचा शत्रू नसतो हे स्व गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे,विलासराव देशमुख असोत की जयदत्त क्षीरसागर यांच्याशी मुंडे साहेबाचे असलेले संबंध सर्वश्रुत होते,मात्र त्यांच्या नंतर पंकजा मुंडे यांनी सुरवातीच्या काळात जे राजकारण केले त्यामुळे त्यांना बेरजेचे राजकारण जमत नाही अशी चर्चा सुरू झाली,मोठ्या विजयासाठी प्रसंगी दोन पावलं मागं सरकाव लागतं हे त्यांना माहीतच नाही की काय,मुंडे साहेबांचे हे गुण त्यांनी कसे काय घेतले नाही अशा चर्चा रंगल्या होत्या ,परंतु या निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाबरोबरच राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील नेत्यांना ज्या पद्धतीने हँडल केले ते भविष्यातील त्यांच्या राजकीय वाटचालीची झलक दाखवून गेले .शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे सूत्र त्यांनी आत्मसात केले आणि विजय मिळवला .

भाजपचे संख्याबळ पाहिल्यास कोणालाही येथे भाजप यश मिळवेल असे स्वप्नातही वाटले नसते मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील नाराजांची मोट बांधण्यात पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बीड आणि लातूर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंदित केले तर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी उस्मानाबादला टार्गेट केले,जगदाळे हे उस्मानाबाद चे असल्याने या भागातील नाराजांची संख्या मोठी होती,त्यातच राष्ट्रवादी मधील बेबनाव भाजपच्या पथ्यावर पडला .तब्बल 20 ते 22 दिवस धस हे स्वतः यंत्रणा हातात घेऊन लढत होते तर जगदाळे यांची मदार त्या त्या भागातील नेत्यांवर होती .

आपल्या हक्काची जागा राष्ट्रवादीने घेतली ही काँग्रेसची नाराजी आणि आपल्या ताटात आणखी एक वाटेकरी नको ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची मानसिकता याचा अचूक फायदा पंकजा मुंडे यांनी घेतला .कोणाला कोठे कसे ऍडजस्ट करायचे,कोणाला भविष्यातील मदतीचा शब्द द्यायचा,कोणाच्या दुखऱ्या बाजूवर दाब द्यायचा हे अगदी कसलेल्या राजकारण्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी केले त्यामुळे यशाने त्यांच्यापुढे लोटांगण घातले . युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असत अस म्हणतात त्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीत सगळी अस्त्र अचूकपणे वापरली.पंधरा वीस दिवस मतदारांच्या, त्यांच्या नेत्यांच्या,नाराजांच्या , मतदारांच्या मुकादमांच्या  भेटी गाठी घेऊन त्यांनी विजयाला गवसणी घातली,दुसरीकडे धनंजय मुंडे हे एकाकी पडल्याचे चित्र दिसून आले,पक्षाच्या बड्या नेत्यांनी या निवडणुकीकडे फारसे लक्ष दिले नाही असे दिसून आले.नाही म्हणायला स्वतः शरद पवार यांनी स्वपक्षासाहित काँग्रेसच्याही अनेक नेत्यांना संपर्क केला मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता .

या निडणूकीकडे विधानसभेची लिटमस टेस्ट म्हणून देखील पाहिले गेले मात्र आज तरी तसे म्हणणे धाडसाचे होईल,कारण हजार मताची निवडणूक आणि लाखो मतांची निवडणूक यात निश्चितच फरक आहे परंतु  या निकालाने पंकजा मुंडे यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढण्यास मदत झाली आहे तर धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होणार हे अघोरखीत झाले आहे .

धस होते म्हणूनच विजय सोपा झाला

या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ पाहता सुरेश धस यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार असता तर कदाचित निकाल उलटा लागला असता कारण धस हे वीस पंचवीस वर्षांपासून राजकारणात आहेत,त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आलेले आहेत,राज्यमंत्री पदाच्या काळात अनेकांना अंधारातून तर काहींना उघडपणे मदत केलेली आहे,कोण कोणाचा नातेवाईक,कोणाला काय पाहिजे,कोणाला कोणी बोलल्यास फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा होमवर्क धस यांचा पक्का होता .त्याच बरोबर अनेकांच्या अपेक्षा,आकांशा काय आहेत आणि त्या कशा पद्धतीने पूर्ण कराव्या लागतात हे धस यांना सांगण्याची गरज नव्हती,धनंजय मुंडे हे कोणती चाल खेळतील आणि त्याला कशा पद्धतीने मात द्यायची हे धस यांना चांगलेच माहीत होते त्यामुळे भाजपला हा विजय सोपा गेला .

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

लाडक्या श्री ला एका रसिकाच पत्र ..........!


प्रिय श्री,चटका लावून गेलीस ग !

1980 -90 च्या काळात जेव्हा हेमामालिनी नावाचं सुखद स्वप्न आम्हा भारतीयांना रुंजी घालत होत तेंव्हा शिवकाशी सारख्या भागातून मुंबई गाठत प्रिय श्री  तू फिल्मी दुनियेत अवतरलीस, त्या अगोदर शिवकाशी ची आम्हाला ओळख ही केवळ फटाक्याचं गाव म्हणूनच  होती ,मात्र त्यानंतर तू शिवकाशी ला एक नवी ओळख दिलीस .त्या अगोदर तू तुझ्या अदाकारीने तामिळ चित्रपट सृष्टी गाजवायला सुरवात केली होतीस मात्र कमल हसन सोबत तू सदमा च्या रुपानं तुझ्या अभिनयाचं  कसब दाखवून दिलंस आणि बॉलिवूड ला तुझी दखल घ्यायला भाग पाडलेस ."ताकी हो ताकी हो ताकी ताकी रे,जब से तू मेरे दिल मे झाकी "असं म्हणत जेव्हा तू जितू ला थिरकवायला लावलंस तेव्हा जितू च काय पण अख्खा देश तुझ्या तालावर नाचायला लागला .
नागीण मधील तुझे जुल्मी डोळे बघून प्रत्येक जण तुझ्या प्रेमातच पडला .तुझ्या अदाकारीच गारुड असं काही होत की प्रत्येक जण आपल्या घरात सुद्धा तूच माझी श्रीदेवी असं म्हणून संसारसुखाचा आनंद घेऊ लागला .

आजही आठवत की कॉलेज असो की तरुणांचा कट्टा कोणीही एखादी सुंदर तरुणी दिसली की आली बघा श्रीदेवी म्हणून टोंट मारायचे .तू एखाद्या वादळासारखी बॉलिवूड मध्ये आलीस आणि तुझी मोहिनी तमाम रसिक प्रेक्षकांवर घातलीस . सदमा पासून सुरू झालेला तुझा प्रवास मॉम पर्यंत येऊन थांबला .चालबाज असो की मिस्टर इंडिया अथवा आखरी रास्ता, प्रत्येक चित्रपटात तू नेहमीच वेगळी वाटलीस. चांदणी मधील तुझा अल्लड अभिनय आजही आठवणीत राहतो,लम्हे मधील अनिल कपूर सोबतची शांत अभिनेत्री अजूनही आमच्या मनात घर करून राहिली आहे .
रेखा,जयाप्रदा, हेमामालिनी यांच्या नंतर बॉलिवूड ने तुझ्यावर भरभरून प्रेम केलं,रसिकांनी तुझ्या अभिनयाचं तोंड भरून कौतुक केलं,90 च्या दशकात रसिकांच्या मनावर तू अधिराज्य गाजवलस .तुझ्या बॉलिवूड मधील एन्ट्री ने ड्रीमगर्ल हेमामालिनी च आसन देखील डळमळीत केलं होतंस. तुझ्या एका एका चित्रपटाचं पारायण करणारे हजारो चाहते आजही सापडतील .तू म्हणजे बॉलिवूड ला पडलेलं एक सोनेरी स्वप्न होतीस,प्रत्येक जण तुझ्यात आपली मैत्रीण,सहचारिणी पाहत होता.उत्कृष्ट अभिनयाचं तू विद्यापीठ होतीस,नवीन कलाकारांसाठी तू एक आदर्श होतीस,तामिळ,तेलगू या सोबतच तू बॉलिवूड आणि छोटा पडदा सुद्धा गाजवलास.

तब्बल पन्नास वर्षे तू रुपेरी पडद्यावर आपल्या अदाकारीने वर्चस्व गाजवलंस, पन्नास वर्षाचा काळ थोडा थोडका नसतो ग,मात्र एवढ्या लवकर जगाचा निरोप घेण्यासारखा देखील नसतो.
तू अशी अचानक आम्हाला सोडून एक्झिट घेशील हे स्वप्नातही आम्हाला वाटलं नव्हतं .तुझं अस जाणं आम्हाला सदमा देणारं आहे.मेरे हाथो में नौ नौ चुडीया है अस म्हणत आजही अनेक तरुण पोरी तुझ्या सारखा अभिनय करण्याचा प्रयत्न करतात.

तू तुझ्या सौन्दर्याच्या बाबतीस आणि शरीर प्रकृतीच्या बाबतीस भलतीच काँशियस होतीस ग ,तरीसुद्धा तू अशी अचानक एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाशील अस वाटलं नव्हतं .तुझ्या एक्झिट ची खबर घेऊन आजचा सूर्य उगवला आणि रसिकांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला .श्री खरोखरच तू एक दैवी देणगी होतीस,अजूनही विश्वास बसत नाही की तू आम्हाला सोडून गेलीस. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हणतात मात्र देवही एवढा निष्ठुर कसा होऊ शकतो हाच प्रश्न आम्हाला पडला आहे .

तुझाच एक चाहता

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

डोळे हे जुल्मी गडे ..............!

डोळे हे जुल्मी गडे ..................!

तुम्ही आम्ही सर्वांनीच कधी न कधी कोणावर तरी पहिल्यांदा प्रेम केलंच असेल ना,हां आता प्रत्येकाच्याच आयुष्यात जिच्यावर किंवा ज्याच्यावर प्रेम केलं त्याची साथ आयुष्यभरासाठी मिळालीच असेल असं मात्र झालं नसणार तरी सुद्धा पहिलं प्रेम काही केल्या विसरता येत नाही हा सगळ्यांचाच अनुभव आहे .मनाच्या एका कोपऱ्यात ते पहिलं प्रेम,तो किंवा ती कायम असते,ते दिवस कधीही केव्हाही ,कुठेही आठवतात आणि प्रत्येक जण काही क्षणासाठी का होईना भूतकाळातल्या त्या सुखद आठवणीत रममाण होतो यात शंकाच नाही,हे आठवण्याचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी हृदयांचा चुराडा करणारी प्रिया होय .तिच्या भुवया उडवत केले जाणारे इशारे अनेकांना जुन्या आठवणीत घेऊन गेले असतील हे नाकारून चालणार नाही ."इन आखोंकी मस्ती के मस्ताने हजारों हैं "या गीताची आठवण पुन्हा एकदा प्रियाच्या डोळ्यांनी करून दिली हे मात्र नक्की .

कोण कधी केव्हा आणि कसं फेमस होईल हे सांगता येत नाही,मध्यंतरी "सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय "अस म्हणणारी आर जे मलिष्का सोशल मीडियावर धुमाकूळ घालून गेली तर मागील चार पाच दिवसांपासून एक भुवयी उडवीत आपल्या नयन बाणांनी समोरच्याला घायाळ करणारी प्रिया सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे .डोळे हे जुल्मी गडे याचा प्रत्यय प्रियाकडे पाहिल्यावर येत आहे हे मात्र नक्की .

प्रिया प्रकाश वरीयार ही अभिनेत्री सध्या लाखो तरुण तरुणींच्या दिलाची धडकन बनली आहे,मूळची केरळ मधील रहिवाशी असणारी प्रिया आपल्या पहिल्याच मल्याळम सिनेमातील केवळ 27 सेकंदाच्या व्हिडीओ ने  रातोरात स्टार बनली आहे,तिची भुवयी उडवण्याची स्टाईल पाहून लाखो लोकांना आपलं तरुणपण आठवलं असणार यात शंकाच नाही,काश हमे भी कोई इस नजर से देखणे वाली मिल जाती असंच प्रियाकडे पाहिल्यावर अनेकांच्या तोंडून निघालं असणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही .

पाच सात वर्षांपूर्वी अचानक आलेल्या कोलावरी या गाण्याने धुमाकूळ घातला होता,काही दिवसात या गाण्याने कोट्यवधी लोकांना भुरळ घातली होती,गाण्याचे बोल आणि त्याचा अर्थ कळत असो अथवा नसो पण त्यासाठीच्या संगीतामध्ये, त्याच्या सुरावटीमध्ये एक वेगळीच जादू होती,त्यामुळे लहानग्यापासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी कोलावरी होत, आज तशीच काहीशी परिस्थिती असल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसत आहे .

प्रियाच्या या व्हिडीओ ने दोन तीन दिवसात कतरीना,सनी लिओनी ,दीपिका पदुकोण यांना मागे टाकलं आहे,तब्बल एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी ट्विटर,फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर तिला फॉलो केलं आहे .कधीकाळी आम्हीपण तरुण होतो,आम्हाला सुद्धा शाळा, कॉलेज,गल्ली किंवा शहरातील एखादी पोरगी आवडायची,तिच्या एका दर्शनासाठी आम्ही दिवसभर एका पायावर उभे असायचो हे किस्से सांगून सांगून म्हातारे झालेल्यांना प्रियाच्या या व्हिडीओ ने पुन्हा एकदा आपले जुने दिवस आणि तरुणपण आठवायला लावले असतील हे नक्की .

1970 ते 90 च्या दशकात आशा पारेख,झीनत अमान,रेखा,मुमताज,सायराबानो, वहिदा रहेमान अशा नायिकांनी तरुणांच्या हृदयावर राज्य केलं,त्यानंतर आलेली धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही कित्येक वर्षे मुलामुलींची आयडॉल होती,अलीकडच्या काळात काजोल असो की दीपिका पदुकोण अथवा इतर कोणतीही अभिनेत्री,प्रत्येकीनं त्या त्या काळात आपल्या अदाकारीने लाखो लोकांना वेड लावलं होतं, मात्र प्रियाच्या व्हिडीओ ने सध्या धुमाकूळ घातला आहे.

मराठी चित्रपटातील लावण्या पाहिल्यानंतर डोळ्यांचे इशारे काय असतात आणि ते काय करू शकतात हे लक्षात येतं, या रावजी बसा भावजी,कशी मी राखू तुमची महरजी, अस म्हणत नयन बाणांनी घायाळ करणाऱ्या लावण्य तारका पाहिल्यानंतर अनेकांनी फेटे आणि टोप्या उडवल्या आहेत,लावणीमध्ये अदाकारी ला नृत्या एवढेच महत्व आहे हे आजपर्यंत सगळ्यांनीच अनुभवलं आहे ,सध्या प्रियाबाबतही सर्वांचा हाच अनुभव आहे .या पोरीच्या नयन बाणांनी अनेकजण घायाळ झाले आहेत .

डोळा मारणं हे आपल्या संस्कृती मध्ये प्रेम व्यक्त करण्याचं प्रतिक मानलं जातं,संस्कृतीचे रक्षक म्हणवून घेणारे मात्र याला अश्लील म्हणतात हा भाग अलहिदा . डोळा मारणं हे जस प्रेम व्यक्त करण्याचं प्रतिक आहे तसच वेगळं काही तरी सांगणं किंवा एखादी गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी सुद्धा समजलं जातं . आय लव्ह यु म्हणण्यापेक्षा सहजपणे डोळ्याने केलेले इशारे अधिक काही सांगून जातात हे मात्र निश्चित आहे. डोळे हे जुल्मी गडे असो की तेरे नैना बडे दगाबाज रे हे अलीकडच्या काळातील सलमान च गाणं असो,डोळ्यांच्या अदाकारीवर शेकडो गाणी,कविता,लेख लिहिले गेले आहेत ,अगदी घालीन लोटांगण,वंदीन चरण,डोळ्यानं पाहीन रूप तुझे यात सुद्धा डोळ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केल आहे हे विसरून चालणार नाही .त्यामुळेच कदाचित डोळ्यात डोळे घालणे,डोळ्याच्या धाकात असणे,डोळे वटारने,डोळेझाक करणे आदी शब्द प्रचलित झाले असावेत .

प्रिया वरीयार चा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण वेडापिसा झाला असणार आणि प्रत्येकाने तिचं हे रूप डोळ्यात साठवून घेतलं असणार यात शंका नाही, डोळे हे न बोलताही खूप काही सांगून जातात हे अनेकांच्या अनुभवातून समोर आलेलं आहे त्यामुळे प्रियाच्या डोळ्यांची उघडझाप प्रत्येकाला आपली वाटल्यास नवल वाटायला नको .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404 .

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

सायकल ........!



सायकल .....!

." सायकल वाल्या पुलीसवाल्या बिरीक लावून थांब,टोपी तुझी र हातात माझ्या , होईल कसं र काम ,जाऊया डबल सीट रे लांब लांब लांब "हे गाणं लक्ष्मीकांत बेर्डे आणि उषा चव्हाण यांच्यावर चित्रित केलं तेव्हा मुख्य आकर्षण होती ती सायकल .हे गाणं आणि सायकल आठवण्याच कारण म्हणजे आज लेकींसाठी दोन सायकल खरेदी केल्या,या सायकल पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो कोणत्याही शब्दात वर्णन करता येणारा नव्हता,अनमोल असा तो क्षण अनुभवला आणि लहानपणीचे दिवस आठवले .

लहानपणी बहुतांश लोकांकडे येण्या जाण्याच साधन म्हणजे सायकल असायची,ज्यांच्याकडे सायकल आहे तो सधन कुटुंबातील समजला जायचा,त्याला चारचौघात मानसन्मान असायचा . मला आजही आठवत की मी पहिल्यांदा सायकल चालवली ती सातवी आठवीत गेल्यानंतर,म्हणजे वयाच्या बारा तेराव्या वर्षी,आज मात्र लेकरू वर्षभराच झालं की त्याला सायकल ,बाबा गाडी,तीनचाकी सायकल खेळायला मिळते .सायकल सोबतच आता ट्रायसिकल ची मोठं मोठी शोरूम मेट्रो सिटी सोबतच बिडसारख्या शहरातही दिसून येतात .

पूर्वी म्हणजे 90 च्या दशकात ग्रामीण भागासह शहरातही भाड्याने / किरायाने सायकल मिळायची,सुरवातीला चार अणे,आठ अणे तास मिळणारी सायकल नंतर तीन चार रुपये तासांपर्यंत पोहचली.दिवसभर सायकल वापरायची असेल तर दहा वीस रुपये मोजावे लागत,त्यावेळी बीड शहरात नसीम सायकल मार्ट,ए वन सायकल मार्ट,नितीन सायकल मार्ट ,मोहारे सायकल मार्ट अशी मोजकीच दुकानं असायची. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही सायकल मार्ट,पंचर काढणे हे व्यवसाय तरुणांना आकर्षित करीत असत .

त्या काळात लेडीज आणि जेन्ट्स अशा दोनच सायकल असायच्या आज मात्र लहान मुलांच्याच सतराशे साठ सायकलचे प्रकार बाजारात आले आहेत .आमच्या लहानपणी आम्हाला खेळायला लाकडी गाडे होते, सुताराकडून चार लाकडं त्रिकोणी आकारात बांधून तयार केलेला गाडा हा मर्सिडीज पेक्षा भारी वाटायचा .

कालौघात मात्र सायकल हळूहळू मागे पडली . मोपेड,स्कुटर,बुलेट या गाड्या बाजारात आल्या आणि गरिबांची सायकल बाजारातून हळूहळू कमी होऊ लागली .सायकल ला असलेले कॅरियर वर बसून किंवा मधल्या दांडीवर बसून डबल सीट लॉंग ड्राइव्ह तुम्ही आम्ही अनेकांनी एन्जॉय केली असेल .काही गोड आठवणी देखील असतील अनेकांच्या .अगदी रुपेरी पडद्यावरील नायक नायिका यांनी  देखील आता आता पर्यंत सायकल चा वापर केल्याचे दिसून येते .

आजही चीन सारख्या देशात सायकल भाड्याने मिळते नव्हे तिथे बहुतांश लोक मोठं मोठ्या गाड्या ऐवजी सायकलचा सर्रास वापर करताना दिसतात,भारतात मात्र अद्यापही हे चित्र दिसत नाही .पूर्वीच्या काळी दूधवाला सायकलवर दूध घालायला येत असे,आज मात्र मोटारसायकल वर दूध घालणारेच दिसतात .आज सायकल फक्त पेपर टाकणाऱ्या मुलांकडेच सायकल दिसतात .

काही ध्येयवेडे लोक आजही सायकलवर भारत भ्रमण  करताना दिसतात,अनेक देशात सायकलच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात,बराक ओबामा सारखे लोकही सायकलचा वापर करताना दिसतात मात्र हे फार थोडे लोक आहेत,सायकल ही शरीराच्या सर्व अवयवांना चालना देणारे साधन आहे परंतु त्याकडे कोणी लक्ष देत नाही.पेट्रोल आणि डिझेल च्या वाढलेल्या किमती त्यातून होणारे वायू प्रदूषण या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर सायकल ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली पाहिजे .आठवडा भरातून एक दिवस तरी मोटार सायकल किंवा चारचाकी ऐवजी सायकलवर फिरण्याचा निर्णय प्रत्येकाने घेतला तर राष्ट्रीय संपत्ती तर वाचेलच परंतु आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होईल हर नक्की .

पूर्वी सायकल ही गरिबांची गरज होती आज सायकल ही श्रीमंतांच्या प्रतिष्टे च लक्षण झाली आहे,दिवसरात्र कामात व्यस्त असणाऱ्या माणसाकडे स्वतःच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम पाहायला देखील वेळ नाही,मग वाढलेलं पोट,शरीरातील बदल नियंत्रित करण्यासाठी मोठं मोठे उद्योगपती,राजकारणी सायकलिंग करताना दिसतात,अनेक शहरात तर सायकल चालवणाऱ्यांचे क्लब स्थापन झाले आहेत,कालचक्रात सायकलमध्ये अनेक बदल झाले आहेत, आता पारंपरिक सायकल बरोबरच गेयरच्या सायकल बाजारात आल्या आहेत,पूर्वी दोन चारशे रुपयांना मिळणारी साधी सायकल आजघडीला तीस चाळीस हजारापर्यंत गेली आहे .

माणूस तरुण पणात पैसे कमवण्यासाठी मरमर करतो आणि आयुष्याच्या मध्यानंतर कमावलेला पैसा शरीर व्यवस्थित राहावे,आरोग्य  टिकावे यासाठी खर्च करतो आणि त्यातूनच मग महागड्या सायकल ची फॅशन सुरू होते.आज बहुतांश लोक सकाळी मॉर्निंग वॊक सोबतच सायकलिंग करताना दिसून येतात,मात्र या सायकलिंग मध्ये जुन्या जमान्यातील सायकलची मजा नाही हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404 .

सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

गुजरातच्या निकालाचा अन्वयार्थ

काँग्रेस को हरा दिया,बीजेपी को डरा दिया !


केंद्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर तब्बल सतरा राज्य पादाक्रांत करणार्‍या भाजपच्या उधळलेल्या वारूला काही प्रमाणात वेसण घालण्याचं काम राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने गुजरातमध्ये केलं. गुजरातच्या निवडणूकीत मोठ्या फरकानं भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्ता राखेल असा राजकीय धुरीणांचा अंदाज सपशेल खोटा ठरवत मतदारांनी मोदींना देखिल जास्त हवेत उडू नका, जमिनीवर चाला असा इशाराच दिला आहे. 2012 च्या तुलनते तब्बल 16 जागा भाजपच्या कमी झाल्या आणि 99 जागांवर भाजपला समाधान मानावे लागले तर कॉंग्रेस 61 जागांवरून 80 जागांपर्यंत जावून पोहचली. 2012 पासून तब्बल 27 राज्यात पराभवाचे तोंड पहावे लागलेल्या राहुल गांधी यांच्या पदरी गुजरात आणि हिमाचलमध्ये देखिल पुन्हा एकदा निराशाच आली. मात्र गुजरातच्या निकालाने राहुल काठावर का होईना पास झाले असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर दुसरीकडे मोदींच मेरीट मात्र हुकलं हे देखिल तितकच खर आहे. एका वाक्यात या निकालाच विश्लेषण करायचं झाल्यास मतदारांनी "काँग्रेस को हरा दिया,भाजपा को डरा दिया "असच म्हणावं लागेल .

स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात तब्बल 60 वर्षापेक्षा अधिक काळ कॉंग्रेसने एक हाती सत्ता राखल्याचा इतिहास आहे. अट्टल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सहा-साडेसहा वर्षाचा काळ आणि देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल आणि चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील तीन-साडेतीन वर्षाचा काळ सोडला तर कॉंग्रेसला पराभूत करण्याची किमया कोणीच दाखवली नाही. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र दामोधरदास मोदी नावाच्या व्यक्तीचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला आणि त्याने कॉंग्रेसच्या सुर्याला ग्रहण लावत कॉंग्रेसी सत्तेचा अस्त केला. ज्या भाजपच्या कधीकाळी देशात केवळ दोन जागा निवडूण आल्या होत्या त्या भाजपने 2014 च्या निवडणूकीत 282 जागांपर्यंत मजल मारत एनडीएच्या माध्यमातून 300 चा टप्पा पार करत देशात कॉंग्रेसला नेस्तनाबुत केलं. कॉंग्रेसची अवस्था एवढी केवीलवाणी झाली की, विरोधी पक्षासाठी लागणारं 10 टक्के संख्याबळा एवढा आकडा देखिल कॉंग्रेसला गाठता आला नाही. 2014 च्या धक्क्यातून कॉंग्रेस तीन वर्ष झाले तरी देखिल सावरलेली नाही.
लोकसभा निवडणूकीतील अभुतपुर्व यशानंतर भाजपचा अश्वमेध चौखूर उधळला आणि पाहता-पाहता केवळ पाच राज्यात सत्ता असलेल्या भाजपने तब्बल 14 राज्य पादाक्रांत करत 19 राज्यांमध्ये आपला सत्तेचा झेंडा रोवला. जम्मु काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत कॉंग्रेसमुक्त भारत हा नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा गेल्या तीन वर्षात भाजपच्या कार्यकर्त्यांनी खरा करण्यासाठी रात्रीचा दिवस केला. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, जम्मु काश्मिर, बिहार, उत्तरप्रदेश यासारख्या मोठ-मोठ्या राज्यांमधून कॉंग्रेसला घरचा रस्ता दाखवत भाजपने आपले बस्तान बसवले. आज 29 पैकी 19 राज्यात भाजप आणि एनडीएची सत्ता आहे तर कॉंग्रेसच्या ताब्यात केवळ 4 राज्य शिल्लक राहिलेले आहेत.
अशा परिस्थितीत देशातील जनतेच्या नजरा या गुजरात निवडणूकीकडे लागल्या होत्या. तब्बल 22 वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपला यंदा फटका बसणार का? नोटाबंदी आणि जीएसटीमुळे वैतागलेली जनता कॉंग्रेसच्या हाताला साथ देणार का?, गुजरातमध्ये यश मिळवून कॉंग्रेस 2019 च्या दृष्टीने वाटचाल सुरू करणार का? असे प्रश्न निवडणूकी दरम्यान उपस्थित होत होते. तीन महिने अगोदर गुजरातमध्ये प्रचाराला सुरूवात करून कधी नव्हे ते राहुल गांधी यांनी ही निवडणूक सिरअस घेतल्याचे दाखविले. पाटीदार आंदोलनाचा मुद्दा असो की बेरोजगारी अथवा विकास गांडो थयो च्छे असं म्हणत मोदींना टार्गेट करण्याची एकही संधी राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने सोडली नाही. गुजरातच्या रणसंग्रामामध्ये राहुल यांनी तब्बल 115 पेक्षा जास्त सभा घेतल्या. अगदी प्रत्येक मंदिराच्या उंबर्‍यावर डोकं टेकवत आपण हिंदु असल्याचा दावाही त्यांनी केला. अगदी जाणवे घालायलाही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यामुळे यावेळी गुजरातमध्ये नक्कीच परिवर्तन होणार आणि कॉंग्रेसला अच्छे दिन येणार अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती .मात्र राहुल यांनी हे सगळं करताना ज्या हार्दिक पटेल नावाच्या 23 वर्षीय पोराला साथीला घेतलं त्याचा म्हणावा तेवढा फायदा राहुल यांना झालाच नाही,त्याच बरोबर जिग्नेश आणि अलपेश ठाकूर यांच्या मागेही लोक मोठ्या प्रमाणात न आल्याने काँग्रेस ला म्हणावा तेवढा लाभ झाला नाही .

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 36 सभा घेवून कॉंग्रेसच्या प्रचारातील हवा काढून घेत भाजपचे कमळ पुन्हा एकदा गुजरातमध्ये कसे फुलेल यासाठी प्रयत्न केले. आणि त्याचा परिणाम म्हणून 22 वर्षानंतर पुन्हा एकदा जनतेने मोदींच्या हातात सत्तेचे सुत्र सोपवली. राजकीयदृष्ट्या भाजपने गुजरात आपल्याकडे राखली असली तरी नैतिकदृष्ट्या मात्र भाजपचा पराभवच झाला असेच म्हणावे लागेल. कारण ज्या गुजरात मॉडेलच्या नावाखाली मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडूकीत आणि त्यानंतर झालेल्या प्रत्येक राज्याच्या निवडणूकीत भाजपला बहुमताकडे नेले. त्याच गुजरातमध्ये त्यांना पुन्हा सत्ता आपल्याकडेच राखण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपचे जणू सिझर झाले असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही.
भाजपच्या या विजयानंतरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नरेंद्र मोदी यांचा एक कलमी कार्यक्रम सहकारी मंत्र्यांना विचारा न घेण्याचा उद्योग, मोठ-मोठ्या घोषणा, नोटबंदी आणि जीएसटी सारखे जनतेच्या माथी लादलेले निर्णय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मतदारांना गृहीत धरण्याचा उद्योग कसा अंगाशी येवू शकतो हेच गुजरातच्या आकड्यावरून स्पष्ट झाले आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी तसेच सर्वसामान्य माणूस भरडला गेला हे भाजपचे कार्यकर्ते देखिल खाजगीत मान्य करतात. मात्र बोलायला कोणीच तयार नव्हते. गुजरातच्या जनतेने मोदींना मतपेटीतून याचा जवाब दिला आहे. दुसरीकडे सतत 27 निवडणूकांमध्ये पराभवाचे तोंड पाहणार्‍या राहुल यांच्या नेतृत्वाला थोड्या फार प्रमाणात साथ देण्याचा प्रयत्नही जनतेने गुजरातच्या माध्यमातून केला आहे. 2012 च्या निवडणूकीत  61 जागा असणार्‍या कॉंग्रेस यंदा 80 पर्यंत मजल मारता आली. याचाच अर्थ पप्पू पास हो गया असा लावल्यास वावगे ठरणार नाही. दुसरीकडे 115 वरून 99 वर का यावे लागले याचा विचारही जर मोदींनी केला तर आणि तरच 2019 ला पुन्हा एकदा निर्भेळ यश भाजपला मिळू शकेल असे वाटते.

लक्ष्मीकांत रुईकर,बीड .

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

संघर्षयोध्याची वारसदार !

संघर्षयोध्याची वारसदार !


बीड सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातून ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करीत दिल्लीच्या तख्ताला गवसणी घालण्याची ताकद ठेवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यात कायम संघर्ष करावा लागला,त्यांच्या नंतर त्यांचा राजकीयच नव्हे तर संघर्षाचा वारसा देखील पंकजा मुंडे यांच्या वाट्याला आल्याचे मागील तीन वर्षात दिसून आले आणि त्यांनी या संघर्षाला धीरोदत्तपणे तोंड दिल्याचं देखील वेळोवेळी दिसून आलं,वैद्यनाथ कारखान्यावर घडलेल्या दुर्घटनेनंतर देखील हेच प्रकर्षाने दिसलं.पंकजा मुंडे यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना खंबीरपणे आधार देऊन मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला. रुके ना तू थके ना तू,संघर्ष के आगे झुके ना तू हा मूलमंत्रच जणू गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा यांना दिल्याचं वेळोवेळी  त्यांनी दाखवून दिलं आहे हे नक्की .आज मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांच्यातील नेतृत्व गुणांची चुणूक जागोजागी पंकजा यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येते हे ही तितकच खरं आहे.मुंडेंची ही कन्या साहेबांच्या नावाचा जनतेला विसर पडू देणार नाही याची पुन्हा एकदा खात्री या निमित्ताने पटली हे कोणीच नाकारू शकणार नाही .

मराठवाड्यासारख्या मागास भागातून राजकीय पटलावर अनेक दिग्गज नेते पुढे आले,स्व शंकरराव चव्हाण असोत की प्रमोद महाजन अथवा विलासराव देशमुख या नेत्यांच्या तोडीसतोड नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली ती गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी .बीड जिल्ह्यातील परळी सारख्या भागात जन्मलेल्या या माणसाने महाविद्यालयीन काळापासूनच संघर्षाला सुरवात केली,आणीबाणीचा प्रसंग असो की इतर कोणतेही आंदोलन गोपीनाथ मुंडे यांनी त्यात हिरीरीने सहभाग घेतला,पुण्यात शिक्षण घेत असताना ते प्रमोद महाजन आणि विलासराव देशमुख यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी राजकारणाची वाट धरली .चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत उनेपुरे साडेचार वर्ष सत्ताधारी म्हणून त्यांच्या वाट्याला आले मात्र या काळात मेन गेट टू रामटेक ही ओळख त्यांनी निर्माण केली .गृहमंत्री पदाचा दरारा काय असतो हे मुंडेंनी दाखवून दिलं .कायम दिन दलीत ,पीडित ,उपेक्षित लोकांसाठी झगडणाऱ्या या माणसाने लोकांचं प्रेम कमावलं आणि माणसं कमावली,जीवाला जीव देणारे लोक निर्माण केले जे आजही त्यांच्या माघारी पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,त्यामुळेच त्यांच्या निधनांनातर वाट्याला आलेल्या संघर्षात पंकजा मुंडे यांना दहा हत्तीचं बळ मिळालं .

गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाचे दुःख बाजूला सारून पंकजा यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काढला,भाजप च सरकार येण्यामध्ये पंकजा यांचा वाटाही मोठा आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही .गोपीनाथ मुंडे यांनी 1995 मध्ये संघर्षयात्रा काढली होती,त्याच पद्धतीने पंकजा यांनी 2014 साली संघर्षयात्रा काढून उपेक्षितांचा आवाज बुलंद केला .

सत्तेत आल्यानंतर त्यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातुन ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा कसोशीने प्रयत्न केला .मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो की जलयुक्त शिवार सारखी योजना,सामान्य माणसाला थेट सत्तेचा लाभ मिळावा म्हणून पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केला आणि त्यात त्यांना मोठे यशही मिळाले .

गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न असणारा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना त्यांच्या अकाली निधनानंतर पोरका झाला होता मात्र पंकजा यांनी दोन वर्षांपासून बंद असणारा हा कारखाना या वर्षी मोठ्या हिमतीने सुरू केला,महिनाभरात जवळपास एक लाख साखर पोत्यांचे उत्पादन करण्यात आले होते मात्र अचानक काळाने घाला घातला आणि कारखान्यात झालेल्या अपघाताने पाच कामगारांचा बळी गेला .एकीकडे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना हा आघात झाल्याने पंकजा या मोडून पडल्या,मात्र घरावर संकट कोसळले तर कर्त्या माणसाने हतबल व्हायचं नसतं हे पंकजा यांनी दाखवून दिलं .या मोठ्या अपघातानंतर अवघ्या काही तासात पंकजा मुंडे यांनी लातूर आणि अंबाजोगाई येथे जाऊन जखमींची भेट घेतली तसेच घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या घरी जाऊन सांत्वन करीत मोठा आधार दिला .ज्यावेळी पंकजा मुंडे यांनी लातूर येथे जाऊन जखमींची नातेवाईकांची भेट घेतली तेव्हा त्या लोकांना जणू देवदूतच आपल्या मदतीला आल्याची भावना निर्माण झाली.अनेक महिलांनी त्यांना ही भावना बोलून देखील दाखवली .ताई तुम्ही आलात आता सगळं व्यवस्थित होईल,तुम्ही काळजी करू नका ,आमच्या घरात जर अशी घटना घडली असती तर आम्ही काय केलं असत,तुमचा यात काहीच दोष नाही असं म्हणून अनेक माता भगिनींनी पंकजा यांनाच आधार देण्याचा प्रयत्न केला .या आधारावरच अवघ्या काही तासात त्यांनी परिस्थिती यशस्वीपणे हाताळत या अपघातात सापडलेल्या लोकांना आधार देत त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला .घरातील कर्ता माणूस गमावण्याचे दुःख काय असते हे त्या अजून विसरलेल्या नाहीत त्यामुळे त्यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या पाठीवर हात ठेवत घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल असा विश्वास दिला .

एवढा मोठा आघात झाल्यानंतर कितीही हिम्मतवान पुरुष असता तरी तो खचला असता मात्र पंकजा मुंडे यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती त्यांच्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच रक्त आहे याची साक्ष देते. राजकीय संघर्ष तर पाचवीलाच पुजलेला असताना अचानक येणाऱ्या अशा संकटांना देखील खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे हेच त्यांनी दाखवून दिले आहे .

गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारावेळी प्रक्षुब्ध झालेल्या जमावाला मुंडे साहेबांची शपथ घालून शांत करणाऱ्या या बहाद्दर मुलीनं त्यांच्या नंतर देखील समाजाला सातत्यानं आपल्या पंखाखाली घेतल्याचं दाखवून दिलं आहे .राजकीय माणसाच्या आयुष्यात चढउतार हे नेहमीच येत असतात मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आघात झाल्यानंतर ही त्यातून समाजासाठी सगळं विसरून उभं राहणं यालाच कदाचित संघर्षयोद्धा म्हणत असावेत .आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने पंकजा मुंडे याच सक्षमपणे चालवू शकतात हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

डागाळलेली वर्दी ...........!

डागाळलेली वर्दी ......!

एखादा किरकोळ पाकिटमार, चोर,घरफोड्या करणारा पकडायचा अन आपण फार मोठी कामगिरी केल्याचा आव आणायचा मात्र त्याचवेळी खून,दरोडा,बलात्कार,अपहार या सारख्या गंभीर गुन्ह्यात एखाद्या खादी डगले घातलेल्याचा फोन आला की शेपूट घालून कारवाई टाळायची हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे,नोकरीत लागताना अंगावर घातलेली खाकी वर्दी पहिल्या काही वर्षातच एवढी निलाजरी होते की तिच्यावर पडलेले रक्ताचे डागही अच्छे वाटू लागतात ही अवस्था सध्या पोलीस दलाची झाली आहे.राज्यातील पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत हा  विश्वासच लोकांमध्ये राहिलेला नाही.सांगली प्रकरणानंतर तर "खुनी खाकी वर्दी"अशी नवी नकोशी ओळख या खात्याची निर्माण झाली आहे,भविष्यात ही ओळख पुसून काढण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाला विशेष मेहनत घ्यावी लागेल .

एखाद छोटं खेडे गाव असो की मुंबई सारखी माया नगरी, सगळे लोक रात्री शांत झोपतात कारण त्यांच्या रक्षणासाठी पोलीस नावाची यंत्रणा डोळ्यात तेल घालून 24 तास जागी असते . खून,दरोडा,अपघात,महापूर,आंदोलन,नैसर्गिक आपत्ती अशी कोणतीही घटना घडली तर सर्वात अगोदर घटनास्थळी पोहचणारी यंत्रणा म्हणजे पोलीस होय.तलाठी,मंडळ अधिकारी हे महसूल चे लोक उशिरा आले तरी चालते मात्र पोलीस वेळेतच पोहचला पाहिजे ही सर्वांचीच अपेक्षा असते. बहुतांश वेळा पोलीस जनतेची ही अपेक्षा पूर्ण देखील करतात.लाखो लोक रस्त्यावर उतरले असले तरी शंभर पन्नास खाकी वर्दी वाले दिसले की वातावरण शांत होते,कारण या वर्दीचा आदर आजही कायम आहे .  कितीही मोठा गुंड,चोर,मवाली  असला तरी खादीचा धाक त्याच्या मनात कायम असतो .

मात्र अलीकडच्या काळात खाकी आणि खादी हातात हात घालून प्रशासन चालवीत असल्याची अनेक उदाहरणे समोर येतात आणि त्यातून मग खाकीने खादी  समोर गुडघे टेकल्याचे आपण पाहतो . 'ए पुलीस स्टेशन है,तुम्हारे बाप का घर नही, हा अमिताभ चा जंजिर मधील डायलॉग असो की " मेरे जमीर मे दम है,क्यूकी मेरी जरूरते कम है,"हा सिंघम मधील अजय देवगण चा  डायलॉग पहिला की आपल्याला आपण स्वतःदेखील खाकी घालावी असे वाटते,या खाकी चा अभिमान वाटतो रक्त सळसळ करते मात्र याच चित्रपटात खकिमधील काही लोक कसे खादीवाल्यांचे पाय चाटतात हे देखील दाखवले आहे तेव्हा आपल्याला सिंघम चा अभिमान वाटताना इतर सहकारी पोलीस ज्या प्रकारे वागतात ते खरं असल्याचं जाणवत आणि त्यात तथ्य देखील आहे याची खात्री पटते .

पोलीस कोठडीत आरोपीला त्याने  केलेल्या  गुन्ह्याची कबुली द्यावी अन मुद्देमाल ,घटनास्थळ, वापरलेले शस्त्र दाखवावे यासाठी खाकीकडून सुंदरी चा पाहुणचार मिळतो,दोन चार फटके पडले की आरोपी पोपटासारखं बोलू लागतो.आजही चांगले चांगले दादा,भाई,डॉन पोलिसांच्या माराला थरथर कापतात ही वस्तुस्थिती आहे मात्र गेल्या दहा पंधरा वर्षात पोलीस दलातील खाबू गिरी,चाटुगिरी, झेलेगिरी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की या वर्दीचा धाकच राहिला नाही.

पूर्वी खाकी सोडा पण साध्या कपड्यातील पोलीस आला आहे हे जरी कळलं तरी प्रक्षुब्ध झालेला जमाव शांत होत असे आज मात्र जमाव मिळून वर्दी भरदिवसा भररस्त्यात टराटरा फाडत असल्याचे आपण अनेकदा पाहतो,अनुभवतो .

देशात पोलीस कोठडीत मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात पाहिले तर त्यात महाराष्ट्राचा क्रमांक वरचा लागतो हे दुर्दैव म्हणावे लागेल .2015 साली केलेल्या पाहणीत देशात 1087 मृत्यू पोलीस कोठडीत झाल्याचे समोर आले आहे,त्यात सर्वाधिक 127 पेक्षा अधिक मृत्यू हे महाराष्ट्र्रात झाले आहेत हे विशेष .या सगळ्याच मृत्यूला पोलिसच जबाबदार आहेत असे नाही बहुतांश मृत्यू हे आरोपीने आत्महत्या केल्याने झाले आहेत मात्र पोलिसांच्या मारहाणीत किंवा टॉर्चर करण्यामुळे झालेले मृत्यू देखील दुर्लक्षून चालणार नाहीत एवढे आहेत .

गृह विभागाच्या पाहणीनुसार कोठडीतील मृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी विदेशात आरोपींना कागदाचे कपडे घालायला दिले जातात,तसेच त्याला ज्या ठिकाणी म्हणजे जेल मध्ये ठेवले आहे तिथे सुद्धा अशी कोणतीच वस्तू ठेवली जात नाही ज्यामुळे त्याचा मृत्यू होईल .आपल्या देशात मात्र पोलीस दलात अद्याप खूप सुधारणा व्हायच्या आहेत .

पोलीस कोठडीत असताना होणारे सगळेच मृत्यू हे पोलिसांच्या मारहाणीमुळे होतात असे नाही मात्र सांगली सारखी प्रकरणे देखील अधून मधून होत असतात हे खरे आहे. सांगलीच्या प्रकरणात पोलिसांनी एखाद्या क्रूरकर्मा सराईत खून करणाऱ्याला देखील लाजवेल असे नीच आणि घृणास्पद कृत्य केले आहे .किरकोळ गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला टॉर्चर करण्याची एवढी कसली घाई पोलिसांना झाली होती,त्याच्याकडून असा कोणता देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा घडला होता की ज्यासाठी पोलीस एवढ्या खालच्या थराला गेले हे न उलगडणारे कोडे आहे .एकदा मृतदेह जळाला नाही म्हणून दोनदा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,हा प्रकार म्हणजे खाकीची संघटित गुन्हेगारीच  म्हणावी लागेल .

देशातच नव्हे तर आशिया खंडात ज्या मुंबई पोलिसांचे नाव आणि दबदबा होता त्याच मुंबई पोलीस दलात दया नायक सारखे डॉन लोकांच्या तालावर नाचणारे अधिकारी होते हे देखील समोर आले आहे.नोकरीला लागल्यानंतर प्रशिक्षण घेतानाच बहुतेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पैसे कसे खायचे,पैसे कशात कमवायचे याचेही प्रशिक्षण दिले जाते की काय अशी शंका आजकाल येऊ लागली आहे.

पोलीस महासंचालकपासून ते साध्या  कॉन्स्टेबल पर्यंत सगळेचजण त्यांच्या त्यांच्या औकातीनुसार पैसे खाण्याच्या मागे लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते .बीड सारख्या मागास जिल्ह्यात देखील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे महिन्याचे कलेक्शन पंचवीस ते पन्नास लाखाच्या घरात असते हे ऐकून धक्का बसतो .

पोलिसांच्या डोळ्यादेखत मटका,जुगार,वेश्याव्यवसाय, या बरोबरच अनेक अवैध धंदे बिनबोभाट सुरू असतात मात्र त्यांच्यावर काहीच आणि कधीच कारवाई होताना दिसून येत नाही याउलट हेच पोलीस सामान्य माणसाला वर्दीचा रिकामा धाक दाखवताना जिथे तिथे दिसतात .प्रत्येक खेड्यापासून ते मुंबई सारख्या मेट्रो सिटी पर्यंत सगळीकडे पोलिसांची पैसे कमविण्याची पद्धत एकच असल्याचे दिसते फरक फक्त शहरातील गुन्हेगार, दादा ,भाई यांच्या नुसार होताना दिसते .

स्थानिक गुन्हे शाखा असो की दहशतवाद विरोधी पथक कोणत्याही ठिकाणी बदली किंवा बढती हवी असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाखो रुपये द्यावे लागतात हे पोलीस दलातील उघड सत्य आहे.पोलीस निरीक्षक म्हणून स्वतंत्र पदभार पाहिजे असेल तर सध्या बीड सारख्या जिल्ह्यात किमान पाच आणि कमाल आठ लाखाचा रेट आहे,ठाण्याच्या हद्दीत किती बार,दारू दुकाने,मटका,पत्याचे क्लब आहेत यावर त्या त्या ठाण्याच्या इंचार्ज चे कलेक्शन ठरवले जाते आणि त्यानुसार त्याच्याकडून तेव्हडे घेतले जाते .अधिकारी,त्यांच्या बायका ,पोरं, नातेवाईक हे जिल्ह्यात दौऱ्यावर आले की त्यांना साड्या,कपडे,उंची भेटवस्तू द्याव्याच लागतात,निलाजरे आणि बेशरम अधिकारी देखील कोणताही विचार न करता या भेटवस्तू स्वीकारतात हे विशेष .ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार वीस पंचवीस हजार नाही तो लॅपटॉप,सोनसाखळी,मोबाईल आशा वस्तू भेट म्हणून कशा देऊ शकतो याचा विचार ना देणारा करतो ना घेणारा .

अनेक ठिकाणी तर नवा अधिकारी आला की जुन्यापेक्षा लाख पन्नास हजार वाढवून घेतो असे अनेकांचे अनुभव आहेत .अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहन असोत की वाळू,खडी, दगड,मुरूम वाहतूक करणारी वाहन,एवढंच काय अनेक वरिष्ठ अधिकारी हे प्लॉटिंग,भिशी ब्रोकिंग,सट्टा ,हॉटेलिंग अशा अनेक व्यवसायात भागीदार असल्याची अनेक उदाहरणे आहेत .

ज्यांच्या डोक्यावर खादी घालणाऱ्यांचा वरदहस्त आहे किंवा त्यांच्या भागीदारीनेच अवैध व्यवसाय सुरू आहे त्यांच्या पुढे पुढे करण्यात धन्यता मानणारे पोलीस सामान्य माणसाने ट्राफिक सिग्नल तोडला तरी बॉर्डर क्रॉस केल्याचा कांगावा करीत त्याच्यावर कारवाई करताना दिसतात एवढेच काय पण सामान्य माणूस चोरी,दरोडा किंवा अन्यायाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला तर फिर्यादीलाच एवढे उलट सुलट प्रश्न विचारले जातात की कुठून अवदसा आठवली अन तक्रार द्यायला आलो असे त्याला वाटते . प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या करणारे,पाकिटमार,मंगळसूत्र चोरणारे,बॅग लंपास करणारे लोक कोण आहेत हे पोलिसांना माहीत असते,एखाद्या भागात चोरी झाली की त्या भागात कोण आहे रे रामू की शामु, बाळू की बंडू त्याला धरा, माल वसूल करा आणि केस रफा दफा करा हेच धोरण पोलोसांचे ठरलेले असते .

अशाच प्रकरणामुळे शेवटी सांगली सारख्या घटना समोर येतात अन पोलिसांची अब्रू पार चव्हाट्यावर येते ,साध्या चोरीचा आरोप असणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ज्या प्रकारे मारून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला  तो पाहता यातील दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करून चालणार नाही तर त्यांना सेवेतून बडतर्फ करीत असे खटले देखील फास्टट्रेक  कोर्टात चालवून या लोकांना जबर शिक्षा होणे आवश्यक आहे तरच खुनाचे पडलेले डाग धुवून निघण्यास मदत होईल .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...