रविवार, २ ऑगस्ट, २०२०

मित्र माने इत्र ............!



मित्र म्हणजे इत्र ..........!

अस म्हणतात की जी गोष्ट आपण आई वडील,भाऊ बहीण,गुरुजन यांना मनमोकळ्या पध्दतीने सांगू शकत नाहीत ती गोष्ट आपण सहजपणे ज्याच्याजवळ बोलून मोकळं होतो ती व्यक्ती म्हणजे मित्र .मी आणि इतर किंवा त्रयस्थ यांना जोडणारा म्हणजे मित्र .मित्र हा आरशासारखा असतो तुम्ही जे आहात,तुमच्यातले गुण दोष सगळं सगळं जसच्या तस दाखवतो,अन तो सावलीसारखा देखील असतो,जो कितीही कठीण प्रसंग येवो तुमची साथ सोडत नाही .
हा मित्र कोणत्याही वयाचा,कोणत्याही जाती धर्माचा,कोणत्याही वर्गाचा असू शकतो .मैत्रीला वयाच किंवा जाती धर्माच,गरीब श्रीमंती च बंधन नसतं. वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात शेजारी शेजारी काम करणारे दोघे चांगले मित्र असतीलच असे नाही .कारण एका क्षणात मैत्रीचे सूर जुळतात अन आयुष्याचे जीवणगाने गुणगुणायला सुरवात होते . मैत्रीला जस जात,धर्म,पैसा, संपत्ती याच बंधन नसतं तसच मैत्रीत लिंगभेदाला सुद्धा फार किंमत नसते .दोन पुरुष हे चांगले मित्र असतात तसेच स्त्री आणि पुरुष सुद्धा चांगले मित्र असू शकतात .
मैत्रीमध्ये नेहमी कृष्ण सुदम्याच उदाहरण दिलं जातं कारण या दोघांमधील सामाजिक अन आर्थिक अंतर हे पृथ्वी अन आकाश एवढं मोठं होतं पण म्हणून त्या दोघांच्या मैत्रीत कधी अंतर निर्माण झाले नाही .मैत्री ही कर्ण अन दुर्योधनाची देखील होती .जिथं स्वार्थ किंवा मतलब नसतो तिथंच मैत्रीची बीज अंकुरतात अन त्याला समाधानाची फुले अन फळे लगडतात .मैत्री हे अस झाडं आहे ज्याला केवळ दुसऱ्याच दुःख वाटून घेत आनंद पसरवणे माहीत असतं .
शक्यतो माणसाच्या आयुष्यात शालेय जीवनातील मित्र कायम स्मरणात राहतात किंवा त्या वयात जी मैत्री होते ती चिरकाल टिकते कारण त्या वयात माणसाला गरीब श्रीमंत, जात पात हे भेद माहीत नसतात .व्यवसाय किंवा नोकरीमुळे देखील अनेक मित्र जोडले जातात,मैत्रिणी जोडल्या जातात मात्र ते रिलेशन लिमिटेड असते,लहणपनी झालेली मैत्री अनलिमिटेड असते .या मैत्रीला कोणत्याही प्रकारे एक्सपायरी नसते .मनातला कोलाहल न सांगता सुद्धा ज्याला केवळ आपल्या डोळ्यातून किंवा हलचालीतून कळतो तो खरा मित्र असतो .या मैत्रीची अनेक रूपे आहेत .पृथ्वीवर असा एकही व्यक्ती नसेल ज्याला मित्र नाही .स्वार्थ अन परमार्थ यातील अंतर सहजपणे पार करून एका वेगळ्या भावविश्वात सुखद अनुभूती देणारा म्हणजे खरा मित्र .बर हा मित्र पैशाने विकत घेता येत नाही अन देता सुद्धा येत नाही .
मैत्री ही खळाळत्या झऱ्या प्रमाणे असते, त्याचा तळ स्पष्टपणे दिसतो अन चव देखील गोडच लागते .अडचणीत मदतीला येतो तोच खरा मित्र अस म्हणतात मात्र अडचणी येणारच नाहीत यासाठी छातीचा कोट करून उभा राहतो तो खरा मित्र अस मी मानतो .कारण अडचणी प्रत्येकाला असतातच त्यावर जो तो आपापल्या परीने मार्ग शोधून मात करतो पण यात मार्ग दाखवण्याच काम देखील एक सच्चा मित्रच करतो .
रक्ताची नाती ही जन्माने मिळतात तर मानलेली नाती मनाने जुळतात मात्र जिथं रक्त अन मान दोन्ही वेगळं असूनही सूर जुळतात, मन जुळतात ती नाती म्हणजे मैत्री होय .कोणी कितीही मोठ्या पदावर,हुद्यावर गेला तरी त्याला भेटल्यानंतर एक सणसणीत शिवी तोंडातून बाहेर पडते अन गच्च मिठीत घेतल्यावर सगळ्या तक्रारी दूर होतात तो असतो मित्र .मैत्रीत अहो जाओ, आपपर भाव नसतो,थेट काळजाला हात घालणारी अरे तुरे ची साद असते .हजार शत्रूशी सामना करण्यासाठी एक सच्चा मित्र खूप झाला .बुडत्याला काडीचा आधार अस जे म्हणतात त्याच पद्धतीने रोजच्या जगण्या मरण्यांच्या रेसमध्ये जो खंबीरपणे सोबत उभा असतो,ऊन वारा वादळ भूकंप काहीही होवो जो आपला हात सोडत नाही तो खरा मित्र .
आयुष्यात जेव्हा केव्हा अडचणी येतात ,आयुष्याची चार्जिंग संपत जाते ,नात्याचे चार्जर जेव्हा काम करत नाही तेव्हा पॉवर बँक बनून जो मदतीला धावून येतो तो म्हणजे मित्र .या मैत्रीच्या अनेक कथा कहाण्या आहेत पण आयुष्याच्या स्क्रिप्ट मध्ये अथ पासून इति पर्यंत जो सोबत असतो ना तो म्हणजे मित्र होय .
मित्र माने इत्र असंही काहीजण म्हणतात,कारण ज्याच्या सहवासाने आपलं आयुष्य दरवळून  जात तो म्हणजे मित्र .या मित्रामुळे आपल्या बेचव आयुष्याला एक खमंगपणा येतो,ज्याप्रमाणे कितीही सुगरण स्त्रीने अतिशय सुंदर स्वयंपाक केला पण त्यात मिठच नसेल तर तो स्वयंपाक बेचव लागतो तसच आयुष्यात मित्र नसेल तर आयुष्य निरस, बेचव होतं .मित्र म्हणजे ऑक्सिजन आहे,माणसाचा श्वास थांबू न देण्याच काम ऑक्सिजन करतो तसच आपल्या आयुष्यात कधीच कोणतीच बाधा येऊ नये यासाठी मित्र धडपडत असतो . मोबाईल अन इंटरनेट च्या जमान्यात आज जो तो धावपळीत अन घाईगडबडीत आहे मात्र अशाही वेळी एक निवांत क्षण,किंवा एक विसाव्याच ठिकाण म्हणजे मित्र होय .या मित्रांसाठी एक दिवस निश्चितच पुरेसा ठरणार नाही,ज्याने आपल्या आयुष्यात अविभाज्य अशी जागा मिळवली आहे त्याला एक दिवस शुभेच्छा देऊन कसे भागेल .तरीही आजच्या मैत्री दिनानिमित्त माझ्या सर्व मित्रांना सस्नेह शुभेच्छा !

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404




शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

आठवणीतला पाऊस .........!

आठवणीतला पाऊस ..........!

लक्ष्मीकांत रुईकर ,बीड

9422744404

मित्रा वर्षातले आठ महिने मी तुझी वाट पाहत असतो,का म्हणून काय विचारतोस वेड्या,तू आलास की ती माझ्याजवळ येऊन घट्ट मिठीत विसावते,अरे हो खरच सांगतोय,हसू नकोस लबाड,तुझी शपथ,तू आलास ना की तुझ्या प्रत्येक थेंबात मला तिची आठवण ओलं चिम्ब करते,आमच्या प्रेमाचा पहिला वहिला साक्षीदार आहेस तू,मी असाच एकट्याने रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक तू आलास अन ओला चिम्ब होत मी तुझ्याशी गप्पा मारत मारत मनमुराद भिजलो,अस म्हणतात की पावसात भरपूर रडून घेतलं तरी चालत कारण आपले अश्रू दुःख कोणाला दिसत नाही,पण हे त्या दिवशी साफ खोटं ठरलं,जेव्हा तू धो धो कोसळत होतास,मी मनमुराद भिजत होतो अन मनातलं दुःख लपवत होतो,तेव्हा एक गोड आवाज कानावर आला अन अचानक भानावर आलो तेव्हा लक्षात आलं की कोणीतरी पाठीमागून मोठ्याने आवाज देत आहे,अरे वेड्या तो आवाज अनोळखी होता,मात्र त्यात आपलेपणा होता,अन मी वळून पाहिल्यानंतर पडत्या पावसात सुद्धा कोरडाठाक झालो,कारण जिला रोज स्वप्नात पहात होतो,ती माझी सखी माझ्यासमोर उभी होती,अन माझ्या हाताला धरून मला तुझ्यापासून दूर नेत होती
तुही किती खट्याळ मित्रा,काहीवेळ विश्रांती घेतलीस अन जणू काही मला इशारा केलास की जा आता उद्या भेटू
आजही आभाळकडं नजर गेली की तू आठवतोस कारण आमच्या पहिल्या भेटीचा साक्षीदार होतास तू,मित्रा आयुष्यात तो दिवस अन त्या दिवशीचा तू कधीच नाही विसरू शकत मी,त्यामुळंच म्हणतो जेव्हा जेव्हा तू येतोस तेव्हा तेव्हा ती मला बिलगून असते अन आम्ही दोघंही पुन्हा तुला अन त्या दिवशीच्या भेटीला आठवत रमून जातो

मंगळवार, २८ जुलै, २०२०

संतोष हे पटलं नाही ...............!


संतोष ,हे पटलं नाही ..........!!

पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोबाईल हातात घेतला अन धक्काच बसला,गेवराईचा पत्रकार ,जिवलग मित्र संतोष भोसले याच्या अकाली निधनाची बातमी वाचली अन दोन मिनिटं पायाखालची जमीन सरकली .खर्जातला जाडा भरडा भारदस्त आवाज,आपल्याच ठेक्यात जय महाराष्ट्र म्हणण्याची पद्धत,बातमी मागची बातमी शोधून त्यावर वैचारिक चर्चा,राजकारण ,समाजकारण,साहित्य याबाबतीत असलेला अभ्यास या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर तरळून गेल्या.
संतोष म्हणजे समाधान ,सुख,शांती या सगळ्या गोष्टीसोबत जिज्ञासा असणारा व्यक्ती म्हणजे गेवराईच्या पत्रकारितेतील एक आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व संतोष भोसले .
संतोष पत्रकार असला तरी तो बाळासाहेब ठाकरे यांचा एक सैनिक म्हणूनच जगला,ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारा हा सैनिक आयुष्याचा सामना मात्र अर्ध्यातच सोडून मृत्यूसमोर शस्त्र खाली ठेवत निघून गेला हे खूप क्लेशदायक आहे .संतोष अन माझा स्नेह तसा वीस वर्षापासूनचा .गेवराईच्या पत्रकारिता क्षेत्रातील मित्र अय्युब बागवान,सुभाष सुतार,मधुकर तौर,सुभाष मुळे, गणेश क्षीरसागर, काझी अमान् या सगळ्यांमध्ये वेगळा असलेला संतोष लगेच लक्षात यायचा .
आपलं मत अत्यंत स्पष्टपणे मांडून प्रसंगी समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करून संतोष आपला मुद्दा त्या व्यक्तीच्या गळी उतरवायचा ही त्याची खासियत होती .बातमी मग ती गेवराईची असो की राज्य अथवा राष्ट्रीय पातळीवरील ,त्याच्यासोबत चर्चा करायला एक वेगळी मजा यायची,प्रत्येक बाबतीत चांगला,वाईट,बाजूने विरोधात विचार करून तो आपलं मत मांडायचा .
कधीही भेट झाली की भारदस्त आवाजात जय महाराष्ट्र घालून काय सर सेवेची संधी द्या,गरीबासोबत चार घास खा असं हक्कानं म्हणून खळखळून हसत आयुष्याची मजा घेणारा संतोष असा अचानक निघून गेला हे बुद्धीला अजूनही पटत नाही .गेवराईत एखादी घटना घडली की बातमी मागची बातमी काय असेल याची खबरबात जाणून घ्यायची असेल तर संतोष ला फोन केला की आपल्या खास शैलीत तो नेमकं का,कसं, कुठं,कधी घडलं हे सांगायचा .
गेवराई तालुक्यातील दोन्ही पंडित अन पवार यांच्यातील राजकीय वैरभाव असो की इतर कोणताही विषय हा माणूस अथ पासून इति पर्यंत खडा न खडा माहिती ठेवून असायचा .त्याची अन माझी भेट सुभाष सुतार सोबत बीडमध्ये व्हायची .ते दोघे आजही अगदी अलीकडच्या काळापर्यंत बीडमध्ये आले की माजीमंत्री  सुरेश नवले यांची भेट घेतल्याशिवाय जात नसतं .
एक वेगळं रसायन होता संतोष,अत्यंत लाघवी स्वभाव,आपलंसं करण्याची कला अवगत असलेला हा पत्रकार त्याच्या अनेक शोध बातम्यांमुळे प्रकाश झोतात आला मात्र त्याचा माज कधी त्याच्या वागण्या बोलण्यातून जाणवला नाही .राजकारणी असो की समाजकारणी प्रत्येक व्यक्तीसोबत त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते .पत्रकारितेत नव्याने आलेल्या तालुक्यातील अनेक पत्रमित्रांचा तो हक्काचा मामा होता .

सामना सारख्या हिंदुत्ववादी दैनिकात वार्ताहर म्हणून काम करीत असताना सुद्धा सर्वपक्षीय नेते अन कार्यकर्ते यांचा तो जवळचा अन लाडका होता .कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर त्याने यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत लेख देखील लिहिला होता अन आज तोच मित्र कोरोनाच्या धास्तीने अचानक सोडून गेला .आयुष्याचा सामना धीरोदात्तपणे अन छातीठोकपणे उभं राहून लढायचा असतो अन जिंकायचा असतो हे इतरांना सांगणारा हा अवलिया मित्र आज मात्र स्वतःच अचानक निघून गेला अन आम्हा पत्रकारांनाच नव्हे तर गेवराईतील अनेकांना पोरकं करून गेला .मित्रा तुझं हे असं अचानक जाणं मनाला काही पटलं नाही बघ .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड.
9422744404


सोमवार, १५ जून, २०२०

लोड लेनेका नही देनेका ..........!



लोड लेनेका नही देने का ..........!

अस म्हणतात की जन्म आणि मृत्यू या दोनच गोष्टी माणसाच्या हातात नाहीत बाकी सगळं त्याच्या आवाक्यात आलं आहे,मात्र 21 व्या शतकात माणूस टेस्टट्युब बेबी च्या माध्यमातून जन्म अन आत्महत्येच्या माध्यमातून मृत्यू देखील आपल्या हातात ठेवण्यात यशस्वी झाला आहे,सुशांत ने केलेल्या आत्महत्येच्या प्रकारानंतर हे प्रकर्षाने जाणवू लागल आहे .मृत्यू मग तो नैसर्गिक असो की अनैसर्गिक तो चटका लावूनच जातो मात्र सुशांत सारख्या सेलिब्रिटी ने मरणाला कवटाळण जास्त वेदना देऊन  जातं. माणसानं दगडाशी का होईना पण बोललं पाहिजे अन आपलं मन मोकळं केलं पाहिजे हे तितकंच खरं आहे .

अवघ्या 30 -35 वर्षाच्या आयुष्यात सुशांत सिंग राजपूत इतका कंटाळला की त्याने अचानक एक्झिट घेतली .मोठे तितके खोटे अन जया अंगी मोठेपण तया यातना कठीण अस जे म्हणतात ते या घटनेने पुन्हा एकदा तंतोतंत खर ठरलं .लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा अस आपले आई बाप सांगतात ते काही खोटं नाही .चंदेरी दुनियेतील झगमगाट हा डोळ्यांना दिपवून टाकतो मात्र या झगमागटामागे किती काळ सत्य दडलेलं असत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं .
सुशांत सिंग राजपूत असो की भैयु महाराज अथवा मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी हिमांशू रॉय ,काय नव्हतं या लोकांजवळ, ऐश्वर्य म्हणजे काय असतं हे या लोकांकडे पाहिल्यावर कळतं, मात्र तरीही हे लोक आयुष्याला कंटाळले,प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतील ,मात्र आयुष्यात कोणत्याही अडचणींवर मात करता येत नाही अस नाही,पण तरीदेखील या लोकांनी आत्महत्या सारखा निर्णय घ्यावा म्हणजे खूप वाईट आहे .
माणूस जन्मल्यापासून तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेला असला किंवा आठरविश्व दारिद्र्य घेऊन जन्मलेला असो .अडचणी प्रत्येकाच्या नशिबात येतातच,अडचणी संकट नसली तर आयुष्य बेचव होईल .
सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच आयुष्याचा प्रवास करावा लागतो .ज्या अभिनेत्याने रील लाईफ मध्ये आत्महत्यापासून कस दूर राहायचं हे शिकवलं अन दाखवलं त्यानेच मृत्यूला कवटाळण योग्य नाही वाटत .एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी ला जवळच अस कोणीच नसावं हे केवढ दुर्दैव आहे .सुशांत असो की भैयु महाराज यांनी आपल्या क्षेत्रात लोकांना जगण्याची नवी उमेद शिकवली,त्यांच्या आदर्शावर अनेकजण आयुष्यात स्थिर झाले असतील मात्र याच लोकांनी असा निर्णय घेणे हे बुद्धीला पटत नाही .

आयुष्याच्या पटावर आपण प्यादेच असतो मात्र आपण वजीर म्हणून खंबीरपणे पाय रोवून उभं राहिल्यास येणारी संकट दूर करून संकटावर मात करता येते .हे साध गणित या सेलिब्रिटी लोकांना माहीत नसावं हे किती अवघड आहे .कितीही संकट आली तरी मनाने खंबीर असलेला माणूस शेवटपर्यंत संघर्ष करतो अन सुखाच्या शोधात शेवटपर्यंत राहतो अन जगतो .मात्र सुशांत सारखे लोक जर इतक्या लवकर हार मानणार असतील तर त्यांना फॉलो करणाऱ्या लोकांनी काय करायचं हा प्रश्नच आहे .
आत्महत्या हा उपाय असू शकत नाही,कारण माणसाला नेहमी अडचणी येतातच,नव्हे अडचणी आल्याशिवाय जगण्यात मजाच नाही मग या अडचणी आल्यावर त्यांना तोंड देण्यापेक्षा तो पळवाट का शोधतो हा संशोधनाचा विषय आहे .सुशांत हा सेलिब्रिटी आहे म्हणून त्याच्या मृत्यूवर अनेकांनी हळहळ व्यक्त केली मात्र देशात रोज शेकडो शेतकरी मरणाला कवटाळतात त्याबाबत कोणाला काही वाटत नाही अशा पोस्ट वाचण्यात आल्या,ते बरोबर आहे .मात्र सुशांत सारखे लोक चंदेरी दुनियेत असल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे म्हणून सोशल मीडियावर जास्त हळहळ व्यक्त झाली .याचा अर्थ शेतकऱ्यांची आत्महत्या कमी अन सुशांत सारख्या सेलिब्रिटी ची मोठी असा होत नाही .पण सोशल मीडियावर कोणी काय अन कस व्यक्त व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .
माणसाच्या आयुष्यात एक तरी जागा किंवा मित्र मैत्रिण अशी असावी की जिथं आपल्याला आपलं मन मोकळं करता येईल,एक तरी खांदा असा हवा की त्यावर आपलं डोकं ठेवून धायमोकलून रडता येईल .पण सिमेंट काँक्रीट च्या या जंगलात शहरं वाढली अन माणुसकी,आपुलकी,जवळीकता ,संवेदनशीलता कमी झाली .फ्लॅट संस्कृती मुळे माणसाची वृत्तीदेखील संकुचित झाली अन त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले .रोज कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणावरून आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात .अगदी टीव्हीवर कार्टून पाहू दिलं नाही म्हणून एका लहानग्यांन दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली,परीक्षेत अपयश आल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या असोत की प्रेम भंगातून होणारे मृत्यू,अथवा कर्जबाजरी पणाला कंटाळून होणाऱ्या आत्महत्या असोत,जीवन खूप सुंदर आहे,मात्र त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे याचा विसर या लोकांना पडतो अन मग हे अस पाऊल ते उचलतात .

माणसाकड दोन वेळच भागेल एवढाच पैसा असावा अस नेहमी म्हंटल जात मात्र मनुष्य स्वभावानुसार तो गाडी,घोडी,घरदार,जमीन जुमला यासाठी मरमर करतो अन जाताना मात्र फुटका मनी तोंडात घेऊन जातो,हे सगळं माहीत असून सुद्धा माणूस पैशाच्या मागे धावतो हे किती मोठा दुर्दैव आहे .माणूस आपल्या स्वतःकड बघून  जगण्यापेक्षा दुसऱ्यासोबत स्पर्धा करण्यात धन्यता मानतो अन मग त्याचा शेवट दुर्दैवी होतो .

येताना नागवा अन जातानाही नागवच जाव लागतं मात्र तरीही आपण नेहमी दुसऱ्याच्या संपत्तीकडे पाहतो,अगदी भाऊ भाऊ असो,बहीण भाऊ असो की बाप लेक, जावा जावा ,प्रत्येकजण दुसऱ्याच्या ताटात काय अन किती आहे हे पाहण्यात तो आपल्या ताटाकड अन पोटाकड दुर्लक्ष करतो .किती लागत हो जगायला,दिवसभरात चार पोळ्या,भाजी किंवा चटणी,पण माणूस दुसऱ्याच्या नादात स्पर्धा करण्यासाठी म्हणून नको तेवढं कमवायच्या मागे लागतो अन मग नाही भेटलं की मरणाला कवटाळतो .
त्यामुळं एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे की मनुष्य जन्म एकदाच मिळतो त्यामुळे भेटलेल आयुष्य सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झोका घेत घेत जगायचं,कितिही मोठं संकट आलं, दुःख वाट्याला आलं,तरी हे आपल्या नशिबाचे भोग आहेत अस म्हणून सगळं काही नशिबाच्या माथी मारून मोकळं व्हायचं .लोड लेनेका नही देने का हे कायम लक्षात ठेवल्यास अशक्य अस काहीच नाही.तेव्हा खचून न जाता धैर्याने जगा अन आलेल्या परिस्थितीला तोंड देत आयुष्याचा प्रवास सुखाचा करा .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

शुक्रवार, १२ जून, २०२०

डी एम गेट वेल सून ...........!


डी एम गेट वेल सून ..........!
धनंजय मुंडे हे नाव आज राज्यातील कानाकोपऱ्यात परिचित झालं आहे ते त्यांच्या भाषणामुळे अन दांडग्या जनसंपर्कामुळे .तब्बल सहा सात वर्षांपूर्वी स्व गोपीनाथ मुंडे यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर ते टीकेचे धनी झाले,अगदी त्यांना खलनायक म्हणून काही वर्षे टिका सहन करावी लागली,मात्र कोशीष करनेवाले की हार नही होती हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ते लढत राहिले अन आज राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे .आयुष्यात कायम संघर्ष वाट्याला आलेल्या धनंजय यांना आता कोरोनाशी दोन हात करावे लागणार आहेत, मात्र नेहमीप्रमाणे ते कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा जनसेवेत रुजू होतील हे नक्की .
धनंजय मुंडे म्हणजे ग्राऊंडवरचा गडी, कायम लोकांत राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेला नेता म्हणून आज त्यांची राज्यभर ओळख आहे .रात्री अपरात्री कधीही ,कोणीही फोन केला तरी ते हजर असतात .आपले काका गोपीनाथ मुंडे आणि भाजपनेते प्रमोद महाजन यांच्याकडे बघून मोठे झालेले धनंजय यांच्या बोलण्यात मुंडे महाजन यांची छाप कायम जाणवते .
गोपीनाथ मुंडे म्हणजे आपले राजकीय गुरू अस मानून या एकलव्याने त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात जिल्हा परिषद पासून सुरवात केली .आज ते राज्याच्या मंत्रिमंडळात मानाच्या स्थानावर आहेत .
बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांना सोडल्या नंतर धनंजय हे टीकेचे धनी झाले,त्यांच्या समाजातच नव्हे तर राज्यात ते खलनायक ठरले .राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी टाकत गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर उभं केलं .धनंजय यांनीदेखील आपल्या पदाची प्रतिष्ठा राखत पदाला न्याय दिला,मात्र यावेळी त्यांच्यासमोर होत्या बहीण पंकजा मुंडे .ग्रामपंचायत असो की विधानसभा, लोकसभा प्रत्येक निवडणुकीत या बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली राज्याने याची देही याची डोळा पाहिलं आहे .गेल्या पाच वर्षात पंकजा आणि धनंजय यांच्यातील राजकीय वैरभाव अधिक गडद झाला,बहिणीच्या खात्यातील भ्रष्टाचार बाहेर काढताना धनंजय यांनी आरोपांच्या ज्या फैरी झाडल्या त्यामुळे नात्यातील कटुता अधिकच वाढली .मात्र तरीही ते मागे हटले नाहीत .प्रत्येकवेळी दोघेही एकमेकांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नव्हते .
धनंजय म्हणजे एक शापित राजकुमार अस बोललं जायचं,कायम संघर्ष आणि तोही रक्ताच्या नात्याशी,त्यामुळे वेळप्रसंगी ते अनेकदा भावुक अन व्यथित होत असलेल अनेकांनी पाहिलं आहे,तसच बहीण पंकजा यांच्याबाबतीत सुद्धा घडत होतं,मात्र दोघांचे पक्ष अन विचार वेगळे असल्याने संघर्ष योगायोगाने व्हायचाच, पण त्यामुळे राजकीय गणित मात्र अनेकदा बदलेली पाहिली गेली .
बहीण भावाच्या या संघर्षात कार्यकर्ते देखील भरडून निघाले,धनंजय यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले मात्र आगीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय जस सोन्याच मोल कळत नाही तसेच त्यांच्याबाबतीत सुद्धा झालं .लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था असो की बीड लोकसभा निवडणूक प्रत्येकवेळी धनंजय याना राजकीय मात देण्यात पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या, मात्र या पराभवामुळे खचून न जाता धनंजय मुंडे यांनी त्यातून प्रत्येकवेळी एक नवा धडा घेत आपली लढाई सुरू ठेवली .
परळी विधानसभा निवडणुकीच्या काळात पंकजा मुंडे यांचा पराभव होईल हे कोणालाच अपेक्षित नव्हते .कारण लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना दीड लाखापेक्षा अधिकचे मिळालेले मताधिक्य .मात्र प्रत्येक निवडणुकीची गणित ही वेगळी असतात,त्यामुळे मागच्या अनुभवातून शिकून पुढे जायचे असते,पराभवाने खचून अन विजयाने उन्मादुन न जाता संयमाने वाटचाल करायची असते हा धडा त्यांनी गिरवला होता,त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झाला .धनंजय मुंडे यांचा थेट असलेला जनसंपर्क त्यांना या निवडणुकीत कामाला आला अन त्यांनी विजयाची पताका फडकावली .
महाविकास आघाडीच्या सरकार पूर्वी मुंबईत ज्या घडामोडी घडल्या त्यातही धनंजय मुंडे हे टीकेचे धनी झाले .अजित पवार यांच्याशी असलेलं सख्य त्यांच्या टिकेसाठी कारणीभूत ठरले .मात्र त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली .सामाजिक न्यायमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी गरीब कल्याणासाठी काम सुरू केलं .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तळ ठोकून बसलेल्या धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले,यासह जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांनी प्रशासनाला कामाला लावले .कोरोना असताना देखील लोकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते कायम कार्यरत होते .मात्र मुंबईत गेल्यानंतर ते स्वतःच कोरोना बाधित झाले अन पुन्हा त्यांच्या संघर्षाची आठवण लोकांना झाली .
कोरोना हा आजार झालेले मुंडे हे महाविकास आघाडी सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत .त्यांना फार लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्या स्वास्थ्यासाठी समर्थकांनी पूजा,प्रार्थना सुरू केली आहे,कायम लोकांत रमणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्यांसाठी कार्यकर्ते चिंतेत पडले आहेत .या अशा काळात कोण आपला अन कोण परका  हे कळतं .धनंजय यांचा दांडगा जनसंपर्क पाहता आणि लढण्याची इच्छाशक्ती पाहता ते या संकटावर सुद्धा लीलया मात करतील यात शंका नाही .ते लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू होतील ही अपेक्षा आहे .जनसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या संघर्ष योध्याला प्रकृती स्वास्थ्यासाठी अन जनसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा !
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

सोमवार, ११ मे, २०२०

गायछापच्या खारवड्या ...........!



गायछापच्या खारवड्या .................!

तुम्ही सगळ्यांनी म्हणजे बहुतांश जणांनी पापड्या ,कुरडया,खारवड्या खाल्याचं असतील ना,उपवासाच्या पापड्या,ज्वारी,बाजरी,बटाटे अशा वेगवेगळ्या पापड्या खाल्या असतील अन खारवड्या सुद्धा नाही का,या खारवड्या बाजरीपासून बनतात हे सगळ्यांना माहीत आहे मात्र तुम्ही गायछापच्या खारवड्या खाल्या आहेत का कधी, नाही ना,मी पण नाही खाल्या मात्र आमच्या एका मित्राने लॉक डाऊन च्या काळात त्या केल्या असाव्यात अशी आम्हाला शंका आहे .
आम्ही दोन चार मित्र सकाळी सहज गप्पा मारत बसलो असताना अचानक गाय छापचा विषय निघाला अन लगेच उदय जोशीने सिक्सर मारला,तो म्हणला त्यांनी गायछापच्या खारवड्या घातल्या असतील अन आम्ही सगळे पोट धरून हसू लागलो,हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे या कोरोनाच्या महामारीने अनेकांना अनेक अनुभव दिले आहेत,म्हणलं आज यातील काही अनुभव लिहून काढावेत .
साधारणपणे मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून देशावर कोरोनाचे काळे ढग जमू लागले होते  .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यु जाहीर करून भारतवासियानो आता महिना दीड महिना घरातच रहा असा संदेश दिला .कधीही  आठ दहा तासापेक्षा जास्त काळ घरात बसू न शकणाऱ्या,त्यातही अर्धवेळ झोपेतच घालवणाऱ्या बहुतांश भारतीयांना हे पचनी पडणार नव्हतं मात्र तरीही गेल्या पन्नास दिवसापासून तमाम लोक हे सरकारी आदेशाचे शक्य तेवढे पालन करीत आहेत .
मात्र शेवटी आपण  सगळे भारतीयच आहोत ,सरकारने कितीही बंधन घातली,आर्जव केली,कायदे केले,एवढंच काय पण गुन्हे दाखल केले तरी आपण या घरबंदी मधून बाहेर पडण्याचा येनकेन प्रकारे प्रयत्न करीतच असतो अन त्यातून मग घडतात वेगवेगळे किस्से .

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा थुंकल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून सरकारने तंबाखू,गुटखा,सिगारेट च्या विक्रीवर बंदी घातली,सर्व दुकाने टपऱ्या बंद केल्या नव्हे सील केल्या मात्र कोणत्याही बंदी घातलेल्या गोष्टी सहज उपलब्ध करून घेण्यात आम्हा भारतीयांना एक वेगळाच आनंद मिळतो तसा या गोष्टीतही का नाही मिळणार,म्हणून मग मागच्या दाराने, चोरी छुपे या वस्तूंची खरेदी विक्री सुरू झाली,त्यातल्या त्यात भाव दुप्पट होऊन देखील आजही या वस्तू सहजपणे मिळू लागल्या आहेत हे विशेष .मध्यंतरी बीडच्या पोलीस खात्याने तब्बल चाळीस कोटी रुपयांचे गुटख्याचे कुपन पकडले होते,त्यात वरकरणी आरोपी वेगळे असले तरी यात एका जिल्हाप्रमुखाचा हात होता अन तो हा धंदा पार्टनर शिप मध्ये करत होता असे नंतर कळले मात्र या कारवाईचे पुढे काय झाले ते काही समोर आले नाही ,असो .तर विषय हा आहे की गुटखा,सिगारेट,पान, तंबाखू,दारू विक्रीवर बंदी घातलेली असली तरी या सगळ्या गोष्टी सर्रास उपलब्ध होत आहेत,भाव फक्त जास्त आहेत एवढंच .
काही ठिकाणी अन्नधान्याच्या नावाखाली सर्रास तंबाखू अन गुटख्याची तस्करी केली गेली तर अनेक लोक हे दुधाचे टँकर,टेम्पो,जनावरांची वाहतूक करणारी वाहने यातून गावाकडे जाताना पकडले गेले .अनेक बियरबार, वाईन शॉप मालकांनी स्टोक घरी घेऊन जात होम डिलिव्हरी करून यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक केली .

एका राजकीय नेत्याला मालिश करण्याची हुक्की आली,मग काय शेठने मालिश करणाऱ्याला चारचाकी गाडी पाठवली अन घरी बोलावून घेतलं,सगळ्या अंगाची मालिश झाली अन नेत्याला झोप लागली,मालिश करणारा पायी पायी निघाला घराकडे अन त्याला गाठलं पोलिसांनी आणि त्याची एवढी धुलाई केली की त्याला स्वतःचीच मालिश करण्याची वेळ आली .

अशाच आमच्या एका मित्राने गेल्या महिनाभरात तब्बल ऐंशी च्या आसपास गायछाप तंबाखूच्या पुड्या फस्त केल्याचा विषय निघाला,आता एवढ्या पुड्या त्याने एकट्याने खाल्या की गावजेवन दिल्याप्रमाणे वाटल्या .हे त्यालाच माहीत,मात्र हा विषय निघाला अन आम्हालाही आश्चर्य वाटलं,तेवढ्यात उदय जोशी ने आपल्या खास शैलीत सांगितले की कदाचित त्यांनी गायछापच्या खारवड्या घातल्या असतील,ही कल्पनाच भारी आहे,गायछाप तंबाखुला चुना लावायचा,त्या मिश्रणाला खारवड्या प्रमाणे वाळत घालायचं अन झाल्या गायछापच्या खारवड्या तयार,तर आजकाल या गायछाप ला सोन्याचा भाव आला आहे,दहा रुपये किरकोळ किंमत असलेली ही पुडी आज शौकीन अन व्यसनी लोक तीस चाळीस रुपयांना खरेदी करत आहेत .
हे झालं गायछापच,इतरही सगळ्याच न मिळणाऱ्या किंवा समोरून शटर बंद असलेल्या गोष्टीसुद्धा या कोरोनाच्या संकटात बेभाव मिळू लागल्या आहेत .आता दारुचच घ्या ना,राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व बियर बार अन वाईन शॉप ला।सील केलं असल तरी देखील तळीरामांना सहजपणे मदिरा उपलब्ध होत आहे,दीडशे रुपयांची बाटली पाचशे रुपयांना मिळत असली तरी देणारा उपकार केल्याप्रमाणे अन घेणारा कृतकृत्य झाल्याप्रमाणे भाव चेहऱ्यावर आणून याचा आनंद घेतात हे नक्की .
देशात लॉक डाऊन असताना बीडच काय पण जिल्ह्यात अन राज्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे दारू मिळत आहे,अट फक्त एकच आहे जी स्टोक मध्ये असेल तिच्यावर भागवावे लागत आहे,नही मामु से नकटे मामु सही याप्रमाणे जी मिळेल ती गोड मानून तळीराम आपला घसा ओला करत आहेत हे नक्की .ही दारू उपलब्ध व्हावी म्हणून जुने जाणते मित्र,नातेवाईक,जुने कस्टमर अशांच्या ओळखी काढून हौस भागवली जात आहे .एकंदर काय तर रोज नाइंटि का होईना मिळाली पाहिजे हे खरं,बाकी ती ओरिजिनल आहे की डुप्लिकेट याला सध्या कोणी महत्व देत नाही .
संचारबंदी शिथिल असल्याच्या काळात अनेकजण सहलीला निघाल्याप्रमाणे बाहेर पडत असून काहीजण बँकेत गार्डन मध्ये फिरायला आल्यासारखे येतात,शंभर दोनशे रुपये भरतात किंवा काढतात नाहीतर एक तासभर लाईनमध्ये उभं राहून  बॅलन्स किती आहे चेक करा अन पासबुक भरून द्या अस सांगत आपली बाहेर फिरण्याची हौस भागवून घेत आहेत .काही महाभाग तर एक बिस्किटंचा पुडा किंवा एक कोथिंबीर ची जुडी घेण्यासाठी बाहेर पडतात.
एका मित्राने तर भन्नाट किस्सा सांगितला, लॉक डाऊन च्या काळात बायकोने गाऊन घेण्याची फर्माईश केली मग काय दुकानात घेऊन जावं लागलं,दुकानात सोडून साहेब पत्नीला आणायला गेले तर दुकानात पाच पंचवीस बायका तोंडाला बांधून खरेदी करत होत्या,याची अडचण झाली कोण आपली बायको अन कोण दुसऱ्याची,शेवटी याने आवाज दिला अन बायकोला घेऊन घर जवळ केलं.आता मला सांगा गाऊन नसला तर एवढं काही बिघडत का पण नाही लॉक डाऊन च्या काळात खरेदी केली हे मैत्रिणींना सांगायला पाहिजे ना म्हणून कदाचित वहिणीसाहेबांनी गाऊन खरेदीची फर्माईश केली असावी,बर आणल्यावर मैत्रिणी म्हणल्या अग हा चांगला नाही,कलर धुरकट आहे बदलून आण, मग पुन्हा साहेब दुकानात .
काही महाभाग हे घरच खाऊन खाऊन बोर झाले म्हणून त्यांनी सरळ खानावळ किंवा हॉटेल ला फोन केला ,मग तिथं वेगवेगळ्या पदार्थासोबत घसा ओला करण्याची सोय असणाऱ्या हॉटेल किंवा खानावळीला प्राधान्य दिलं गेलं .कुलर असो की एसी अथवा कॉम्प्युटर खरेदी सगळं काही आतल्या दारान किंवा मागच्या दारान सुरूच आहे .
या महिन्यात अनेकांचे वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस देखील आहेत त्यामुळे त्यातील काही जणांनी टरबूज कापून केक कापल्याचा आनंद मिळवला तर काहींनी स्वीट होम मधून केक आणून सेलिब्रेशन केलं .अनेकांनी आपल्या नातेवाईकांना ,कुटुंबियांना आजारी पाडल अन त्यांच्या जुन्या फाईल सोबत घेऊन गावातून एक फेरफटका मारण्यात धन्यता मानली .
सरकारी कर्मचारी देखील यामध्ये मागें नाहीत,सरकारी कार्यालयात केवळ दहा किंवा 33 टक्के कर्मचारी हजर असावेत असा आदेश असताना काही महाभाग गळ्यात कार्यालयाचे ओळखपत्र घालून फिरताना दिसून आले .अगदी या काळात पत्रकार देखील मोठ्या संख्येने झाले,कोणीही सोम्या गोम्या गळ्यात प्रेस च कार्ड घालून पोलिसांसमोर बिनधास्त फिरताना दिसून आले .
अनेकांनी पोलीस आणि इतर गोरगरिबांना अन्नदान करण्याच्या नावाखाली पास मिळवले अन ते रस्त्यावर बिनधास्त उंडारू लागल्याचं चित्र पहावयास मिळालं .काही पोलीस बांधवांनी देखील मग अंतर्वस्त्रे खरेदी करण्याची हौस भागवून घेतली .हे सगळं पाहिल्यानंतर एक प्रश्न पडला की खरच आपण कोरोना बाबत किती जागरूक आहोत,देशावर मोठं संकट आलेलं असताना आपण मात्र या संकटात घरात बसून सरकारला सहकार्य करण्याऐवजी बाहेर उंडारत फिरण्यात धन्यता मानली आहे .दोन महिने नाही पिली दारू,नाही कपडे खरेदी केले,नाही व्यसन केले तर आपण मरणार आहोत का ,नक्कीच नाही पण कायदा मोडण्यात आपल्याला मोठा चेव येतो ना त्यामुळे आपण गायछापच्या खारवड्या सुद्धा करून टाकुत हे या संकटकाळात प्रकर्षाने दिसून आलं .कधी सुधारणार आहोत आपण हे देवालाच माहीत अस यानंतर म्हणावं वाटतं .या सगळ्या संकट काळात आपण घरात राहावं,बाहेर पडू नये,गर्दी करू नये यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र झटत आहे आपण मात्र हे सगळे नियम,कायदे धाब्यावर बसवून कसे नियम मोडले याचे किस्से रंगवण्यात आघाडीवर आहोत,काय मिळवणार आहोत यातून आपण,कोणतं मेडल मिळणार आहे,हे सगळं करून आपण आपलंच नाही तर आपल्या कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं आरोग्य बिघडवत आहोत हे आपल्याला कधी कळणार आहे .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

काळ सोकावतो आहे ...........!




काळ सोकावतो आहे .............!

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो मात्र या चौथ्या स्थम्भाला कायम अडचणीत आणण्याचे उद्योग अलीकडच्या काळात होत असल्याचे दिसून येत आहे,बातमीमुळे अफवा पसरली गेली किंवा एखाद्या पोस्टवरून समाजात दुही निर्माण झाली अशी कारणे देऊन पुन्हा एकदा एका पत्रकाराला राज्यात पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागले,झालेली कारवाई चूक की बरोबर यावर वाद विवाद होऊ शकतात मात्र ज्या पद्धतीने सूडबुद्धीने प्रशासन वागत आहे ते पाहता म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आहे हे वाईट आहे असेच म्हणावे लागेल .

एबीपी माझा चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या एका तथाकथित बातमीमुळे गर्दी जमली अन गोंधळ निर्माण झाला असे तारे सरकार अन प्रशासनाने तोडले आणि राहुलला अटक केली,त्यानंतर बुधवारी दुसरे प्रकरण समोर आले ते बीडला .
गेल्या तीस वर्षांपासून पार्श्वभूमी नावाचे दैनिक चालवणारे संपादक गंमत भंडारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करीत रात्रभर कोठडीत डांबून ठेवले .काय गुन्हा केला त्यांनी तर एक पोलीस कर्मचारी हा मुंबई भागातून बीड जिल्ह्यात आल्याची आणि त्यांच्यामुळे कोरोना फैलावू शकतो का अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्याची चार ओळीची बातमी व्हायरल केली .

हा सगळा प्रकार भंडारी यांनी जाणीवपूर्वक केला होता का तर निश्चितच नाही,त्यामागे दोन समाजात किंवा जनतेत गोंधळ निर्माण व्हावा असा हेतू होता का तर नाही,किंवा आपल्या बातमीमुळे दैनिकाचा खप वाढावा असंही त्यांचं मत नसावं पण तरीदेखील पोलीस प्रशासनाने अशा पध्दतीने कारवाई केली की जणूकाही भंडारी हे अट्टल दरोडेखोर किंवा चोर आहेत .गंमत भंडारी यांना जे लोक ओळखतात त्यांना माहीत आहे की कडक बोलणारा,कडक शब्दात लिहिणारा,जे लोकांना वाटते ते त्यांच्याच शब्दात मांडणारा हा संपादक आहे .
काहीवेळा ते एकांगी लिहितात,स्वतःला न्यायाधीश असल्यासारख्या ऑर्डर सोडतात,नको ते सल्ले देतात हे देखील।सत्य आहे मात्र त्यामागे त्यांचा स्वतःचा काही स्वार्थ नेहमीच असतो असे नाही .
पार्श्वभूमी मध्ये मुख्य बातमी हीच मुख्य आकर्षण असते ,या बातमीत संपादक हे स्वतःच मत व्यक्त करतात त्यामुळे अनेकवेळा ती अतिरंजित वाटते .घटना जशी घडली त्यापेक्षा ती का घडली,रोखण्यासाठी काय करता आले असते,कोणती खबरदारी घेतली गेली किंवा नाही गेली यावर बातमीत जास्त भर दिलेला असतो ,जो अनेकांना खटकतो .बातमी किंवा पत्रकारितेच्या इथिक्स मध्ये हि गोष्ट बसत नाही .मात्र तरीही ती भंडारी यांची स्टाईल झाली आहे त्यामुळे आता त्यांची ओळख निर्माण झाली आहे .पुढारी असो की प्रशासन अथवा सामान्य माणूस अनेकांना पार्श्वभूमी ची ही स्टाईल पचनी पडत नाही .त्यामुळे अनेकदा संपादक हे मोहम्मद तुघलक वाटतात,अतिशहाणे वाटतात,ते संपादक कमी आणि सल्लागार जास्त वाटतात ."अगर मेरी सरकार आयेगी तब भी मै विपक्ष मे  बैठुंगा"हे राम मनोहर लोहिया यांच ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या भंडारी यांनी आपल्या स्वभावामुळे अनेकांचा इसार घेऊन ठेवलेला आहे .
त्यांनी जी बातमी व्हायरल केली त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी मुंबई परिसरातून बीड जिल्ह्यात आल्याचा उल्लेख होता,या बातमीमुळे अफवा पसरली आणि लोक भयभीत झाले असा दावा करून पोलिसांनी भंडारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला,तातडीने त्यांना अटक करण्यात आली .आता हे एवढं आवश्यक होतं का,की समज देऊन अथवा प्रतिबंधात्मक कारवाई करून प्रकरण मिटवता आलं असतं .पण पोलीस कारवाई बाबत आपण काय बोलणार त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं,कायद्यापुढे कोणी लहान मोठं नाही सगळे समान आहेत हे यावरून दाखवून द्यायचं असेल म्हणून सुद्धा ही कारवाई झाली असेल .
पण अलीकडच्या काळात पत्रकार हे सगळ्यांसाठी सॉफ्ट टार्गेट झाले आहेत,सगळेच पत्रकार लाचखोर,पीत पत्रकारिता करणारे,पुढपुढं करणारे ,पाकीट घेऊन पत्रकारिता करणारे नसतात मात्र सब घोडे बारा टक्के अशा पद्धतीने मानसिकता करून पुढारी,अधिकारी आणि सामान्य माणूस या वर्गाकडे पाहतो .पत्रकारिता पहिल्यासारखी राहिली नाही अस नेहमी म्हणलं जात मात्र अशावेळी पत्रकारांना येणाऱ्या अडचणी कोण समजून घेत का .एखाद्या पुढाऱ्यांविरोधात बातमी दिली की तो पत्रकार जातीयवादी, धर्मवेडा, सरकारच्या किंवा विरोधकांच्या हातचं बाहुल म्हणून बदनाम केला जातो .ज्या पत्रकाराने शरद पवार यांना पदमसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला अन पवार चिडले त्या पत्रकाराची कुंडली सोशल मीडियावर टाकून त्याला बदनाम केलं गेलं,मात्र हे करताना त्याने यापूर्वी अनेक चांगले प्रश्न धसास लावले असतील याकडे दुर्लक्ष केलं गेलं .असच काहीस अनेकवेळा होतं मात्र सगळे पत्रकार हे पैशापुढं आपलं इमान विकणारे आहेत असा समज करून घेतला जातो अन त्यांना त्रास देण्यासाठी संधी शोधली जाते .
राहुल कुलकर्णी असो की गंमत भंडारी या लोकांनी आणि इतरही पत्रकारांनी चांगली काम केलेली आहेत,पण त्यांच्याकडून एक चूक झाली की लगेच प्रशासन त्यांना धडा शिकवण्याची संधी मिळल्यागत काम करतं .मात्र अस जर प्रशासनाकडून झालं तर दिलगिरी व्यक्त करून किंवा चुकून झालं अस म्हणून मुद्दा पुढे ढकलला जातो .कोरोना झालेल्या किंवा निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीच नाव जाहीर करू नये असा आदेश असताना जिल्हाधिकारी बीड यांनी मात्र गुरुवारी नगरमध्ये उपचार घेणाऱ्या पिंपळा येथील रुग्णाचे नाव जाहीर केले,मग पुन्हा सुधारणा केली,अशावेळी ते स्वतःवर कायद्याचा बडगा उगरणार का?हा सवाल कोणी उपस्थित केला तर तो लगेच कायद्याच्या दृष्टीने कायदा मोडणारा म्हणून संबोधित केलं जातं .याचाच अर्थ प्रशासनाने किंवा सरकारने केलेली चूक ही मागे घेता येऊ शकते,माफी मागून प्रकरण सोडून देता येते पण इतरांनी चूक केली तर थेट गुन्हा दाखल केला जातो .एखाद्या मंत्र्याने प्रक्षोभक विधान केले तर किंवा पुढाऱ्यांची जीभ घसरली तर आमचं विधान तोडून मोडून दाखवलं,आम्हाला तस म्हणायचं नव्हतं,आमच्या विधानाचा गैरअर्थ लावला गेला अस म्हणून पांघरून घातलं जात,मात्र पत्रकारांनी काही केलं की लगेच त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं हे कितपत योग्य आहे .
आज जिथं सगळ्या बाजूने सामान्य माणुस हताश झालेला असतो त्यावेळी केवळ पत्रकारिता या क्षेत्राकडून च लोकांना न्यायाची अपेक्षा आहे .पण त्याच वर्गाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय हे देखील दुर्दैवी आहे .राहुल कुलकर्णी आणि गंमत भंडारी यांच्या अगोदर सुद्धा बीडमध्ये महेंद्र मुधोळकर या पत्रकारावर देखील एक पोस्ट केली म्हणून कारवाई केली गेली .मग जर पत्रकारकडून चूक झाली तर कारवाई करणारे प्रशासन त्यांच्या एखाद्या अधिकाऱ्याकडून चूक झाली तर का कारवाई करत नाही हा प्रश्न निर्माण होतो .
मास्क वापरला नाही म्हणून सामान्य माणसाला दंड करणारे अधिकारीच जर स्वतः मास्क लावणार नसतील तर मग त्यांच्यावर कारवाई कोण करणार,जिथं देशात लॉक डाऊन आहे तिथं कोणी अधिकारी जर बांधकाम करत असेल अन त्याला परवानगी आहे अशी सबब दिली जात असेल तर मग या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार .
हे म्हणजे हम करे सो कायदा अस झालं .गंमत भंडारी यांनी जे केलं त्याच समर्थन होऊच शकत नाही पण म्हणून त्यांच्यावर आकसबुद्धीने कारवाई अपेक्षित नाही,ती तशी केली गेली अशी चर्चा होते आहे . वृत्तपत्र असो की इ मीडिया या लोकांमुळे हजारो लोकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत,अनेकांचे संसार उभे राहिले आहेत,सत्ताधारी,विरोधक,प्रशासन यांच्यातील लूप होल्स बाहेर आले आहेत .मीडिया अनेकवेळा अतिरंजित पणा करतो हे मान्य केलं तरी याच मीडियाच्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत हे विसरून चालणार नाही .
मग तरीसुद्धा मीडियाला टार्गेट करून नेमकं काय साध्य करायचे आहे हे न उलगडणारे कोडे आहे .
अनेकदा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ,कर्मचारी हे आपल्या बदल्या,बढती यासाठी तसेच एखाद्या कारवाईत सुटका मिळावी म्हणून पुढाऱ्यांचे उंबरे झिजवताना आपण पाहतो .पुढाऱ्यांच्या हातचे खेळणे असल्यासारखे अधिकारी वागतात पण नियम फक्त सामान्य माणसाला लागू असतात प्रशासनाला नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे .गंमत भंडारी असोत की इतर पत्रकार प्रत्येक बाबतीत कायद्याचा धाक दाखवून उपयोग नसतो,मात्र हे कोण सांगणार . कारण सध्या पत्रकार असो की सामान्य माणूस प्रत्येकाचाच हात प्रशासन आणि सरकार या दोन यंत्रणेखाली अडकलेला आहे,तरीदेखील अशा पद्धतीने होणाऱ्या कारवायांमुळे मनोबल ढासळू शकते हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...