मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

लोकनेत्याचे वारसदार ..............!


लोकनेत्याचे वारसदार .............!
राजकारण असो की समाजकारण कोणतंही नेतृत्व घडायला किंवा तयार व्हायला एक कालावधी जावा लागतो,टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण मिळत नाही तर माणसाला मान ,मरातब,जगन्मान्यता कशी मिळेल .कोणतंही नेतृत्व हे वारसा हक्कानं मिळण्यासारखं नसत,ती काही वडिलोपार्जित संपत्ती नाही की जी मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आपोआप येईल मात्र काही लोकांना नेतृत्व देखील वारसा हक्कांनच मिळत आणि ते त्यासाठी लायक असतात असं म्हणावं लागेल ,असच एक वारसाहक्काने तयार झालेलं नेतृत्व म्हणजे पंकजा मुंडे .वडिलांच्या वाट्याला आलेला संघर्षाचा असो अथवा रंजल्या गांजल्या लोकांची सेवा करण्याचा वारसा असो , पंकजा यांना हा वारसा वडील गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच मिळाला आहे हे मात्र खरं .
राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर लोकनेते म्हणून मान्यता मिळालेले किंवा जनतेने ज्यांना लोकनेता म्हणून स्वीकारले असे फार थोडे लोक आहेत ज्यात स्व गोपीनाथ मुंडे यांच नाव सर्वोच्च शिखरावर आहे .महाविद्यालयीन जीवना पासून ते शेवटच्या श्वासापर्यंत गोपीनाथ मुंडे यांच्या नशिबी संघर्षच आला ,त्यानंतर तो संघर्ष पंकजा मुंडे यांच्या वाट्याला आला .सुखाचे अन सत्तेचे दिवस आलेले असताना अचानक पितृछत्र हरपल्यानंतर कोलमडून न पडता पंकजा यांनी स्वतःसह जनतेला देखील सावरलं आणि संघर्षाची वाट यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला .
आजच्या राजकारणी मंडळींमध्ये संघर्ष करण्याची तयारी फार कमी दिसून येते,आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारांची संख्या वाढत असताना पंकजा यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे .ज्या जनतेनं गोपीनाथ मुंडे यांना लोकनेते हे बिरुद लावलं त्याच लोकांनी पंकजा यांना देखील ताईसाहेब ही नवी ओळख दिली आहे .
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्याचा वारसा पंकजा मुंडे सक्षमपणे चालवताना दिसतात .मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा यांनी त्यांचं नाव लोकांच्या कायम लक्षात राहील पाहिजे यासाठी गोपीनाथ गडाची निर्मिती केली .
एरव्ही कितीही मोठा नेता असला तरी दोन चार ठिकाणी पुतळे,दोन चार शाळा कोलेजना नावं या पलीकडे त्या नेत्याचं अस्तित्व दिसत नाही .मात्र माझे बाबा जरी हे जग सोडून गेले असले तरी मी त्यांनी दाखवून दिलेली वाट सोडणार नाही अन त्यांचा विसर लोकांना पडू देणार नाही असं सांगत पंकजा यांनी आपल मार्गक्रमण सुरू ठेवल आहे .
गोपीनाथ मुंडे यांची स्मृती कायम राहावी म्हणून परळी येथे भव्यदिव्य अशा गोपीनाथ गडाची निर्मिती करण्यात आली,अवघ्या वर्षभरात हा गड उभा राहिला,गड ऊर्जेचा गड प्रेरणेचा म्हणून आज या गडावर लाखो लोक नतमस्तक होतात .

पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या प्रमाणे पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे हे नाव जनमानसात कायम राहील यासाठी गेल्या तीन वर्षात सातत्याने धडपड केली आहे .गडाची निर्मिती केली म्हणजे झालं असं न मानता त्यांनी या गडाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांना सक्षम करण्याबरोबरच शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जाण्यासाठी शेकडो गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे .
गोपीनाथ रावांच्या पुण्यतिथी आणि जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर लाखो लोक एकत्र येतातच मात्र एरव्ही सुद्धा त्यांचं नाव कायम लक्षात रहावं यासाठी पंकजा मुंडे यांचा मदतीचा यज्ञ कायम सुरू आहे .
 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा '
या उक्ती प्रमाणे पंकजा यांनी लोकनेत्याचा वारसा चालवला आहे .
पंकजा यांची चालण्याची,बोलण्याची लगबग पाहिल्यानंतर अनेकांना गोपीनाथ मुंडे हेच समोर असल्याचा भास होतो,निर्णय घेण्याचे क्षण असोत की लोकांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची वेळ असो पंकजा यांच्यात लोकांना कायम साहेब दिसतात .ग्रामीण भाग आणि या भागातील लोकांचा विकास हेच मुंडे यांच स्वप्न होतं, त्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला त्यांचं हे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच पंकजा यांनी राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून प्रयत्न चालवल्याचे दिसून येते .
अंगणवाडी असो की महिला बचत गट अथवा ग्रामीण भागातील बालकांच्या कुपोषणाचा विषय प्रत्येक विषयात खोलवर अभ्यास करून उपाय योजना करण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षात पंकजा यांनी केल्यानेच खुद्द पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा गौरव केला .
राजकारणात मी पैसा कमविण्यासाठी आलेले नाही तर माझ्या बाबांचं कार्य आणि त्यांचं नाव लोकांच्या मनात कायम रहावं यासाठी आलेले आहे हे पंकजा मुंडे सातत्याने सांगत असतात ते किती खरं आहे हे त्यांच्या काम करण्याच्या स्टाईल वरून लक्षात येत .
ज्याचं जेवढं नाव मोठं त्याच्या नशिबी संघर्षही तेवढाच मोठा हा निसर्गाचा नियमच आहे,त्यामुळे लोकनेते पदाचा वारसा मिळाल्यानंतर त्यासोबत येणारा संघर्षही पंकजा यांना सहन करावा लागला आणि त्यांनी तो केला हे विशेष .
मुंडे यांची पोरगी म्हणून त्यांना राज्याच्या सत्तेत मानाचं पान मिळालं असत यात शंका नाही मात्र आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यातला आपला स्वभाव नाही हे दाखवून देत विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी संघर्ष यात्रा काढली आणि त्या माध्यमातून आपलं नेतृत्व सिद्ध केलं .राज्याच्या राजकारणात आज जे काही बोटावर मोजण्याएव्हढे ओबीसी नेते आहेत त्यात पंकजा यांचा क्रमांक सर्वात वरचा आहे .ओघवत्या अन तेवढ्याच कडव्या शब्दात आपलं म्हणणं जनतेला पटवून देत लाखोंच्या सभा गाजवण्याचं कसब त्यांना वारश्याने मिळालं आहे हे त्यांनी नेहमी सिद्ध केलं आहे .
केवळ राज्यातच नव्हे तर मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश,कर्नाटक,तेलंगणा या भागात जाऊन पंकजा मुंडे जेव्हा लाखोंच्या सभा गाजवतात तेव्हा गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही .
'गुरू ने दिला ज्ञानरुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा 'या प्रमाणे आपल्या वडिलांना च आपले राजकारणातील गुरू मानणाऱ्या पंकजा मुंडे यांनी त्यांचा संघर्ष अन जनसेवेचा वारसा पुढे चालवला आहे त्यामुळेच त्यांना आज लोकनेत्याची वारसदार ओळखले जाऊ लागले आहे .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

शक्तींप्रदर्शनातून ओबीसींची वज्रमुठ ............!


शक्ती प्रदर्शनातून ओबीसींची वज्रमुठ !


बीड

राजकारणात आपला दबदबा कायम ठेवायचा असेल तर जनशक्ती सोबतच नेतृत्व गुण देखील आवश्यक असतात,आपण मास लीडर आहोत हे ओरडून सांगण्याऐवजी थेट दाखवून देण्यावर नेहमीच राजकारण्यांचा भर असतो,याचा प्रत्यय सावरगाव येथील दसरा मेळाव्यातून आला.साळी ,माळी ,कोळी,लिंगायत,ब्राम्हण ,शीख,मराठा  अशा सर्व संत महंतांची व्यासपीठावरील उपस्थिती आणि वंजारी पट्यातून निवडणूक लढवणाऱ्या आमदार,मंत्र्यांची हजेरी ही पंकजा मुंडे यांचे शक्तीप्रदर्शनाची झलक दाखवून गेली.हा मेळावा शक्तिप्रदर्शन नव्हे तर शक्तीचे दर्शन घडवण्यासाठी होता असा दावा पंकजा यांनी केला असला तरी मेळाव्याचे व्यासपीठ हे ओबीसींची वज्रमुठ आवळण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून गेले .

भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यावरून वाद झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या स्वभावाला काहीशी मुरड घालत दोन पावलं माग सरकत सावरगाव हे भगवान बाबांचं जन्मस्थळ आपल्या शक्तीप्रदर्शनाच ठिकाण निश्चित केलं .मात्र गतवर्षीचा मेळावा यशस्वी करून दाखवत त्यांनी आपण दोन पावलं माग सरकलो म्हणजे हार मानली नव्हती तर पुढे झेपावण्यासाठीची ती आपली रणनीती होती असाच संदेश  दिला होता .गतवर्षी घाई गडबडीत घेतलेल्या दसरा मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पंकजा मुंडे यांना उभारी देऊन गेला .त्यामुळे यावर्षीच्या दसरा मेळाव्याची तयारी महिना दीड महिन्यापासूनच सुरू होती .या ठिकाणी भगवान बाबांची भव्य 25 फुटाची मूर्ती आणि स्मारक तयार करून त्याचे लोकार्पण त्यांनी या मेळाव्यात केले .

या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार,कोणावर वार करणार,कोणाला इशारा देणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते .या मेळाव्यात कोणाकोणाला आमंत्रित करायचे,व्यासपीठ कसे असेल,स्मारक कसे असेल,कोण केव्हा ,कधी भाषण करेल या सगळ्या गोष्टीवर पंकजा मुंडे स्वतः लक्ष ठेवून होत्या,एवढंच नाही तर मेळाव्यातून नेमका कोणावर निशाणा साधायचा हे देखील त्यांनी आधीच ठरवलं होतं की काय असं कार्यक्रमानंतर वाटून गेलं .

वाघाच्या पोटी वाघीणच जन्म घेणार ना असं लोकांना विचारत त्यांनी हो मी वाघीणच आहे अशी ललकारी देत आपल्या भाषणात विरोधी पक्षासोबतच स्वपक्षीयाना देखील आपली ताकद दाखवून दिली

"तू दबे पाव चोरी छुपे ना आणा,सामने से वार कर फिर मुझे आजमाना "असे म्हणत त्यांनी एकीकडे आपल्या विरोधकांना आव्हान दिलं तर दुसरीकडे कागदी सर्व्हे करून तिकीट दिल जात नसत तर माणसं पाहून तिकीट दिलं जात असे म्हणत स्वपक्षीयाना देखील इशारा दिला आहे .सावरगाव च्या मेळाव्याच वैशिष्ठ म्हणजे या मेळाव्यात व्यासपीठावर संत महंत आणि राजकारणी मोठ्या प्रमाणात दिसून आले .साळी, माळी, ब्राम्हण,लिंगायत अशा सगळ्या छोट्या छोट्या जाती समूहातील महाराज आणि संतांना व्यासपीठावर विशेष स्थान देण्यात आलं होतं .

राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार पंकजा मुंडे यांचा हा मास्टरस्ट्रोक आहे .कारण राज्यात भारतीय जनता पक्षात सध्या ओबीसी समाजाच नेतृत्व करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याशिवाय दुसरं कोणतंच नाव नाही,त्यामुळेच की काय त्यांनी मी कोणत्याही पदाची लालसा ठेवत नाही तर मी किंगमेकर आहे आणि राहू इच्छिते अस सांगत आपल्या भविष्यातील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .

गोपीनाथ मुंडे यांनी भाजप मध्ये असताना देखील छगन भुजबळ यांच्यासोबत मैत्री कायम ठेवत ओबीसींची ताकद आपल्या पाठीशी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता ,आता पंकजा यांनी देखील हाच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न चालविला आहे .सावरगाव येथे केवळ वंजारी समाजातीलच लोक हजर होते असे नाही तर विविध जातीचे लोक उपस्थित होते, नव्हे ते येतील याची देखील काळजी घेतली होती असे म्हणायला हरकत नाही .

मंत्री राम शिंदे असोत की आमदार कर्डीले,राजळे,मुरकुटे अथवा बीड जिल्ह्यातील धोंडे,धस,ठोंबरे,पवार या सगळ्याच आमदारांची उपस्थिती हेच दाखवून देत होती की आगामी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून सावरगावातून पंकजा यांनी ओबीसींची वज्रमुठ आवळत आपल्या ताकदीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत शंखनाद केला आहे .

दरवर्षी गोपीनाथ मुंडे यांना भगवान गडावरून मुंबई आणि दिल्ली दिसायची आणि ते स्पष्टपणे याची जाहीर कबुली द्यायचे ,त्याच प्रमाणे पंकजा यांना सावरगाव च्या मेळाव्यातून काही न काही तरी  दिसलं असेलच मात्र  हे त्यांनी सांगितलं नसलं तरी कुठं ना कुठं निश्चितच त्यांना सावरगावातून 'वर्षा' दिसलं असेल हे नक्की .

विशेष म्हणजे या मेळाव्यातील त्यांचा वावर हा प्रचंड आत्मविश्वास असल्यासारखा होता.सभेत घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना मध्येच दरडावून बोलणे असो की सभेला व्यासपीठावर आल्याबरोबर उपस्थित जनसमुदायाचे घेतलेले दर्शन असेल पंकजा मुंडे यांनी निवडणुका जवळ आल्या आहेत आणि जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हेच दाखवून दिले .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404 .


रविवार, १५ जुलै, २०१८


 फायरब्रॅंड .........!

"खुदी को कर बुलंद इतना की खुदा बंदे से पुछे के बता 'तेरी रजा क्या है "या प्रमाणे गेल्या साडेतीन चार वर्षात राज्याचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचे नेतृत्व भरारी घेत असल्याचे दिसून आले आहे .  गोपीनाथ मुंडे विरोधीपक्ष नेते असताना त्यांचा जो दबदबा होता त्याचीच आठवण आज धनंजय यांच्या कार्यशैलीकडे पाहिल्यावर येते .मुंडेंच्या घरात महाभारत सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांचा अधिकार होता पण कर्णाप्रमाणे येथेही ज्यांच्यावर अन्यायच झाला ते नाव होतं धनंजय मुंडे .मात्र त्यावेळी खचून न जाता धनंजय यांनी संघर्षाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध केलं.त्यामुळेच आज ते फायरब्रॅंड नेते म्हणून नावारूपाला आले आहेत .

ज्या सरकारच्या कारभाराला साडेतीन वर्षाचा काळ लोटत आला असतांना राष्ट्रवादी काँग्रेस ने सरकार विरोधात रान पेटवायला सुरवात केली आहे,कर्जमाफी असो की अच्छे दिन या विषयावरून सरकार किती खोटारडे आहे हे रस्त्यावर उतरून सांगण्यासाठी राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे आणि या सगळ्यांसाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल चा मार्ग निवडला आहे .विदर्भ ,मराठवाड्यानंतर, उत्तर महाराष्ट्र्र आणि शेवटचा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात नुकताच झाला .या सगळ्यामध्ये आकर्षण ठरले आहेत ते विधान परिषद चे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे.राष्ट्रवादी काँग्रेस चा नवा ओबीसी चेहरा म्हणून महाराष्ट्रानं धनंजय मुंडेंना स्वीकारलंय अस म्हणल्यास वावग ठरणार नाही .

हुबेहूब प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची छाप आपल्या भाषणातून सोडणाऱ्या धनंजय यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब हल्लाबोलच्या माध्यमातून झालं आहे हे नक्की .

गोपीनाथ मुंडे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर अवघ्या तीन साडेतीन वर्षाच्या काळात धनंजय यांनी आपली वेगळी ओळख राज्यात निर्माण केली आहे,विधान परिषदेत ते बोलायला उभे राहिले की सत्ताधाऱ्यांना धडकी भरते हे राज्यानं पाहिलं आहे ,अनुभवलं आहे.राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे असोत की सरकारची शेतकरी विरोधी धोरणं यावर भरभरून बोलणारा नेता म्हणून आज धनंजय यांच्याकडे पाहिलं जातं आहे.

भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ हे दोघेच ओबीसीचे नेते म्हणून राज्याला परिचित होते,ओबीसींच्या प्रश्नावर दिल्लीपर्यंत धडक या दोघांनी मारली होती,मात्र मुंडे यांच्या अकाली निधनानंतर आणि भुजबळांवरील आरोपानंतर राज्यातील ओबीसीला चेहरा राहिला नव्हता,मुंडेंची जागा पंकजा मुंडे यांनी भरून काढली मात्र राष्ट्रवाडीकडं ती जागा रिकामीच होती,मात्र धनंजय यांच्या रुपानं आता राष्ट्रवादीला नवा भिडू मिळाला आहे .

अवघ्या साडेतीन वर्षात धनंजय यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केल्यानं आज अजित पवार यांना सुद्धा त्यांची दखल घ्यावी लागली आहे.हल्लाबोल यात्रेदरम्यान धनंजय मुंडे हे एका सभेच्या ठिकाणी उशिरा पोहचले,तेव्हा अजित पवार यांचे भाषण सुरू होते,ते बोलल्यानंतर लोकांमधून धनंजय मुंडे यांच्या नावाचा आग्रह झाला तेव्हा आपण हरभजनसिंग आहोत आपण दादांच्या बॅटिंग नंतर काय बोलणार असं धनंजय म्हणताच  "अरे धनंजय हरभजन सुद्धा मॅच जिंकून देतो "असं मिश्किल उत्तर देत अजित पवारांनी धनंजय यांना बोलण्यास लावले,यावरूनच धनंजय मुंडे हे सर्वमान्य नेते झाल्याचं सिद्ध होतं .

गोपीनाथ मुंडे यांना सोडून पवारांच्या साथीला बसल्यानंतर राज्यातील ओबीसी विशेषतः वंजारी समाजात धनंजय मुंडेंबद्दल प्रचंड रोष होता,मात्र गेल्या साडेतीन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे,आपण गोपीनाथ मुंडे यांना सोडण्यामागे काही कारणं होती हे आता लोकांना पटवून देण्यात ते यशस्वी होत असल्याचं चित्र आहे.धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ अशी त्यांची प्रतिमा तयार होऊ लागली आहे, ठाकरे कुटुंबातील राजकीय महाभारतानंतर राज्यात गाजलं ते मुंडेंच्या घरातील महाभारत.यात कोण कौरव आणि कोण पांडव हे जनता वेळ आल्यानंतर ठरवेल मात्र आजतरी राष्ट्रवादी काँग्रेसला धनंजय यांच्या रुपानं एक फायरब्रँड नेता मिळाला आहे हे दिसू लागलं आहे.

कोणत्याही कार्यक्रमात असो किंवा मुंबईमध्ये धनंजय ज्या सहजतेने लोकांना भेटतात ,त्यांचं ऐकून घेतात त्यामुळे ते तरुणांचे आकर्षण ठरू लागले आहेत .विषय कोणताही असो त्यावर सखोल माहिती घेऊन अभ्यासपूर्ण बोलणारा नेता म्हणून मीडियामध्ये सुद्धा ते परिचित होऊ लागले आहेत,एका एका दिवसात शेकडो किलोमीटर चा प्रवास केल्यानंतरही शेवटच्या कार्यकर्त्याला भेटल्याशिवाय या माणसाचा दिवस संपत नाही .मतदारसंघातील लोक असोत की राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक प्रत्येकाला भेटून त्याच्याशी संवाद साधून,त्याची अडचण समजून घेऊन त्याला आश्वस्त करणारा नेता म्हणून त्यांची इमेज डेव्हलप होऊ लागली आहे .

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील हाडवैर अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे,पंकजा या त्यांच्या पक्षात मास लीडर म्हणून पुढे आल्या आहेत तर धनंजय यांनी देखील हम भी किसिसे कम नही हे सिद्ध करून दाखवलं आहे .गोपीनाथ मुंडे ज्या प्रमाणे लोकांना सभांमधून बोलत करायचे,त्यांच्याशी संवाद साधायचे त्याच पद्धतीने सध्या धनंजय मुंडे हे लोकांना आपलंसं करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

प्रत्येक सभेत बोलायला उभं राहिल्यानंतर आले का अच्छे दिन,खात्यात पंधरा लाख जमा झाले का म्हणताच लोकांचा मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे .राज्य सरकारवर टीका करतांना धनंजय यांच्याकडून केले जाणारे हावभाव,चालू घडामोडीचा संदर्भ यावरून ते पक्के राजकारणी झाले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .

हल्लाबोल यात्रेचा नुकताच समारोप झाला आहे ,या सर्व ठिकाणी तरुण,वृद्ध,महिला यांच्या आकर्षणाचे केंद्र धनंजय मुंडे झाले आहेत.राष्ट्रवादीने सुरू केलेला हल्लाबोल सरकारवर किती परिणाम करील हे येणारा काळच ठरवेल मात्र या माध्यमातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चार्ज झाले आणि मुख्य म्हणजे धनंजय मुंडे यांच्या रुपानं राष्ट्रवादीला एक नवा ओबीसी चेहरा मिळाला हे मात्र नक्की .

येणाऱ्या निवडणुकानंतर सत्ता कोणाची येणार हे आज तरी सांगणे अवघड असले तरी धनंजय मुंडे यांच्या रुपानं राज्याला एक नवा ओबीसी चेहरा मिळाला आहे हे मात्र विसरून चालणार नाही .त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, राज्याचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना प्रभू वैद्यनाथ देवो याच सदिच्छा !

लक्ष्मीकांत रुईकर,बीड .9422744404 .

बुधवार, १३ जून, २०१८

जादूच्या कांडीने विरोधकांची दांडी गुल



जादूच्या कांडीने उडवली भल्या भल्यांची दांडी

 पुरेसे संख्याबळ नसतानाही विजय मिळवणे किंवा सत्ता ताब्यात घेणे हा नवीन पॅटर्न अलीकडच्या काळात भाजपने रूढ केला आहे,देशपातळीवर मोदी शहा यांची जोडगोळी यापद्धतीने काम करीत असताना महाराष्ट्रात विशेषतः विधान परिषदेच्या लातूर बीड उस्मानाबाद मतदार संघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील याच पद्धतीने करिष्मा करून दाखवला आहे,जादूची कांडी ही फक्त गोपीनाथ मुंडे यांच्याकडेच होती,त्यांच्यानंतर या कांडीचा प्रभाव ओसरला आहे ही चर्चा पंकजा मुंडे यांनी खोटी ठरवली आहे.पंकजा यांच्या जादूच्या कांडीचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की यामुळे विरोधकांची दांडी गुल झाली . अवघे 370 मत भाजप सेनेकडे असताना सुरेश धस यांनी 527 मत घेवुन विरोधकांच्या हातातील विजय खेचून आणला . या विजयामुळे पंकजा मुंडे यांच्या बेरजेच्या राजकारणाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही .

देशात कोठेही निवडणूक असली की ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अग्निपरीक्षा असल्याचे चित्र रंगवले जाते हा गेल्या चार वर्षातील अनुभव आहे,या अनुभवातून तावून सुलाखून निघत मोदी यांनी तब्बल 15 राज्यात भाजपचा झेंडा रोवला तरीदेखील विरोधक आणि मीडिया प्रत्येकवेळी त्यांची अग्निपरीक्षा असल्याचे सांगून लढत लक्षवेधी करतो .याच पद्धतीने मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत असो की विधानपरिषदेची निवडणूक प्रत्येक वेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागते किंवा तसे चित्र निर्माण केले जाते .अशावेळी कधी धनंजय मुंडे तर कधी पंकजा मुंडे सरस ठरतात.जिल्हा परिषद, नगर पालिकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदार संघात धनंजय मुंडे यांनी सफाया केल्यानंतर पंकजा यांच्या राजकीय कारकीर्दीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते,मात्र एका दर्शनाने देव म्हातारा होत नाही त्याप्रमाणे एक दोन पराभव झाल्याने आपण खचून जाणार नाही हेच पंकजा यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिले आहे .

21 मे रोजी राज्यातील सहा विधानपरिषदे च्या जागांसाठी मतदान झाले मात्र सगळ्यांचे लक्ष मराठवाड्यातील लातूर बीड उस्मानाबाद या मतदार संघाच्या निकालाकडे लागले होते,कारण सुरवातीपासूनच ही निवडणूक नाट्यमय घडामोडीमुळे चर्चेत होती .पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड यांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी जोरदार धक्का दिला होता,मात्र कराड यांच्या माघारीमुळे धनंजय यांनाच धक्का बसला,कराड यांच्या माघारीसाठी भाजप आणि विशेषतः पंकजा मुंडे यांना जबाबदार धरले गेले,वास्तव कराड यांनाच माहीत.मात्र कराडांची माघार हा पंकजा यांच्या धूर्त राजकारणाचा मास्टरस्ट्रोक ठरल्याची चर्चा झाली.

भाजपकडे या मतदार संघात केवळ 370 एवढे अत्यल्प संख्याबळ होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीच्या हक्काच्या जागेवर पाणी सोडत  लातूर बीड उस्मानाबाद मध्ये जोर लावला,रमेश कराड यांनी ऐनवेळी धोका दिल्यानंतर अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली .राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातील नेत्यांना एवढा आत्मविश्वास होता की त्यांनी पक्षाच्या ए बी फॉर्म वर दुसऱ्या उमेदवाराचे नाव सुद्धा टाकले नाही .

कराड यांनी दिलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत सावरली नाही हेच निकालानंतर स्पष्ट झाले .तब्बल 550 पेक्षा अधिक मतदान हातात असताना राष्ट्रवादीला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला तर भाजपने संख्याबळ नसतानाही योग्य नियोजन,मतदारांशी थेट संपर्क यावर भर देत विजय खेचुन आणला .

ट्वेन्टी ट्वेन्टी असो की वल्ड कप ची फायनल प्रत्येकवेळी कुल माईंडणे  खेळून विजय खेचून आणणाऱ्या महेंद्रसिंग धोनी प्रमाणे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी याठिकाणी थंड डोक्याने मेहनत घेत विजय मिळवला . या निवडणुकीची तयारी भाजपने वर्षभरा पासूनच सुरू केली होती,जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश धस यांनी भाजपला उघडपणे मदत केल्यानंतर स्पष्ट झाले होते की पंकजा मुंडे या धस यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांना विधानपरिषदेची संधी देणार म्हणून,मुख्यमंत्र्यांनी देखील तसा ग्रीन सिग्नल त्यावेळीच दिला होता,त्यामुळे धस कामाला लागले होते,तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे हे सहा आठ महिन्यापासून मेहनत घेत असताना ऐनवेळी कराड यांना आयात करून राष्ट्रवादीने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता,हे कराड यांच्या माघारीने अधिकच स्पष्टपणे अधोरेखित झाले .
समोर शत्रू पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेला असताना सेनापतीनेच पळ काढल्यानंतर काय अवस्था होते तशी काहीशी परिस्थिती कराड  यांच्या माघारीनंतर राष्ट्रवादीची झाली होती.मात्र तरीदेखील जगदाळे यांच्या पाठीशी राष्ट्रवादीने ताकद लावली पण मित्रपक्षाने हात दिला आणि सहज वाटणारा विजय पराभवाच्या रुपात पदरात पडला .

या निकालाने अनेकांचा हिशोब चुकता झाला आहे,पंकजा मुंडे या केवळ स्वतःपुरते राजकारण करतात,त्या अद्याप परिपक्व राजकारणी झालेल्या नाहीत,उथळ राजकारणाने त्यांना जी प ,प स,न प मध्ये फटका बसला आहे,त्यांचा फटकळ स्वभाव त्यांच्या राजकारणाचा घात करणार या सर्व चर्चांना या विजयाने पूर्णविराम मिळाला आहे .

गेल्या अनेक वर्षांपासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे,मात्र 2014 नंतर पंकजा मुंडे असोत की संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजपची ताकद वाढली होती,लातूर महापालिका असो की जिल्हा परिषद अथवा बीड जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी भाजपने यश मिळवले होते त्यामुळेच भाजपने या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आणि विजय मिळवून दाखवला .

राजकारणामध्ये कोणीच कायमचा शत्रू नसतो हे स्व गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे,विलासराव देशमुख असोत की जयदत्त क्षीरसागर यांच्याशी मुंडे साहेबाचे असलेले संबंध सर्वश्रुत होते,मात्र त्यांच्या नंतर पंकजा मुंडे यांनी सुरवातीच्या काळात जे राजकारण केले त्यामुळे त्यांना बेरजेचे राजकारण जमत नाही अशी चर्चा सुरू झाली,मोठ्या विजयासाठी प्रसंगी दोन पावलं मागं सरकाव लागतं हे त्यांना माहीतच नाही की काय,मुंडे साहेबांचे हे गुण त्यांनी कसे काय घेतले नाही अशा चर्चा रंगल्या होत्या ,परंतु या निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाबरोबरच राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील नेत्यांना ज्या पद्धतीने हँडल केले ते भविष्यातील त्यांच्या राजकीय वाटचालीची झलक दाखवून गेले .शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे सूत्र त्यांनी आत्मसात केले आणि विजय मिळवला .

भाजपचे संख्याबळ पाहिल्यास कोणालाही येथे भाजप यश मिळवेल असे स्वप्नातही वाटले नसते मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील नाराजांची मोट बांधण्यात पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बीड आणि लातूर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंदित केले तर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी उस्मानाबादला टार्गेट केले,जगदाळे हे उस्मानाबाद चे असल्याने या भागातील नाराजांची संख्या मोठी होती,त्यातच राष्ट्रवादी मधील बेबनाव भाजपच्या पथ्यावर पडला .तब्बल 20 ते 22 दिवस धस हे स्वतः यंत्रणा हातात घेऊन लढत होते तर जगदाळे यांची मदार त्या त्या भागातील नेत्यांवर होती .

आपल्या हक्काची जागा राष्ट्रवादीने घेतली ही काँग्रेसची नाराजी आणि आपल्या ताटात आणखी एक वाटेकरी नको ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची मानसिकता याचा अचूक फायदा पंकजा मुंडे यांनी घेतला .कोणाला कोठे कसे ऍडजस्ट करायचे,कोणाला भविष्यातील मदतीचा शब्द द्यायचा,कोणाच्या दुखऱ्या बाजूवर दाब द्यायचा हे अगदी कसलेल्या राजकारण्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी केले त्यामुळे यशाने त्यांच्यापुढे लोटांगण घातले . युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असत अस म्हणतात त्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीत सगळी अस्त्र अचूकपणे वापरली.पंधरा वीस दिवस मतदारांच्या, त्यांच्या नेत्यांच्या,नाराजांच्या , मतदारांच्या मुकादमांच्या  भेटी गाठी घेऊन त्यांनी विजयाला गवसणी घातली,दुसरीकडे धनंजय मुंडे हे एकाकी पडल्याचे चित्र दिसून आले,पक्षाच्या बड्या नेत्यांनी या निवडणुकीकडे फारसे लक्ष दिले नाही असे दिसून आले.नाही म्हणायला स्वतः शरद पवार यांनी स्वपक्षासाहित काँग्रेसच्याही अनेक नेत्यांना संपर्क केला मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता .

या निडणूकीकडे विधानसभेची लिटमस टेस्ट म्हणून देखील पाहिले गेले मात्र आज तरी तसे म्हणणे धाडसाचे होईल,कारण हजार मताची निवडणूक आणि लाखो मतांची निवडणूक यात निश्चितच फरक आहे परंतु  या निकालाने पंकजा मुंडे यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढण्यास मदत झाली आहे तर धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होणार हे अघोरखीत झाले आहे .

धस होते म्हणूनच विजय सोपा झाला

या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ पाहता सुरेश धस यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार असता तर कदाचित निकाल उलटा लागला असता कारण धस हे वीस पंचवीस वर्षांपासून राजकारणात आहेत,त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आलेले आहेत,राज्यमंत्री पदाच्या काळात अनेकांना अंधारातून तर काहींना उघडपणे मदत केलेली आहे,कोण कोणाचा नातेवाईक,कोणाला काय पाहिजे,कोणाला कोणी बोलल्यास फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा होमवर्क धस यांचा पक्का होता .त्याच बरोबर अनेकांच्या अपेक्षा,आकांशा काय आहेत आणि त्या कशा पद्धतीने पूर्ण कराव्या लागतात हे धस यांना सांगण्याची गरज नव्हती,धनंजय मुंडे हे कोणती चाल खेळतील आणि त्याला कशा पद्धतीने मात द्यायची हे धस यांना चांगलेच माहीत होते त्यामुळे भाजपला हा विजय सोपा गेला .

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

लाडक्या श्री ला एका रसिकाच पत्र ..........!


प्रिय श्री,चटका लावून गेलीस ग !

1980 -90 च्या काळात जेव्हा हेमामालिनी नावाचं सुखद स्वप्न आम्हा भारतीयांना रुंजी घालत होत तेंव्हा शिवकाशी सारख्या भागातून मुंबई गाठत प्रिय श्री  तू फिल्मी दुनियेत अवतरलीस, त्या अगोदर शिवकाशी ची आम्हाला ओळख ही केवळ फटाक्याचं गाव म्हणूनच  होती ,मात्र त्यानंतर तू शिवकाशी ला एक नवी ओळख दिलीस .त्या अगोदर तू तुझ्या अदाकारीने तामिळ चित्रपट सृष्टी गाजवायला सुरवात केली होतीस मात्र कमल हसन सोबत तू सदमा च्या रुपानं तुझ्या अभिनयाचं  कसब दाखवून दिलंस आणि बॉलिवूड ला तुझी दखल घ्यायला भाग पाडलेस ."ताकी हो ताकी हो ताकी ताकी रे,जब से तू मेरे दिल मे झाकी "असं म्हणत जेव्हा तू जितू ला थिरकवायला लावलंस तेव्हा जितू च काय पण अख्खा देश तुझ्या तालावर नाचायला लागला .
नागीण मधील तुझे जुल्मी डोळे बघून प्रत्येक जण तुझ्या प्रेमातच पडला .तुझ्या अदाकारीच गारुड असं काही होत की प्रत्येक जण आपल्या घरात सुद्धा तूच माझी श्रीदेवी असं म्हणून संसारसुखाचा आनंद घेऊ लागला .

आजही आठवत की कॉलेज असो की तरुणांचा कट्टा कोणीही एखादी सुंदर तरुणी दिसली की आली बघा श्रीदेवी म्हणून टोंट मारायचे .तू एखाद्या वादळासारखी बॉलिवूड मध्ये आलीस आणि तुझी मोहिनी तमाम रसिक प्रेक्षकांवर घातलीस . सदमा पासून सुरू झालेला तुझा प्रवास मॉम पर्यंत येऊन थांबला .चालबाज असो की मिस्टर इंडिया अथवा आखरी रास्ता, प्रत्येक चित्रपटात तू नेहमीच वेगळी वाटलीस. चांदणी मधील तुझा अल्लड अभिनय आजही आठवणीत राहतो,लम्हे मधील अनिल कपूर सोबतची शांत अभिनेत्री अजूनही आमच्या मनात घर करून राहिली आहे .
रेखा,जयाप्रदा, हेमामालिनी यांच्या नंतर बॉलिवूड ने तुझ्यावर भरभरून प्रेम केलं,रसिकांनी तुझ्या अभिनयाचं तोंड भरून कौतुक केलं,90 च्या दशकात रसिकांच्या मनावर तू अधिराज्य गाजवलस .तुझ्या बॉलिवूड मधील एन्ट्री ने ड्रीमगर्ल हेमामालिनी च आसन देखील डळमळीत केलं होतंस. तुझ्या एका एका चित्रपटाचं पारायण करणारे हजारो चाहते आजही सापडतील .तू म्हणजे बॉलिवूड ला पडलेलं एक सोनेरी स्वप्न होतीस,प्रत्येक जण तुझ्यात आपली मैत्रीण,सहचारिणी पाहत होता.उत्कृष्ट अभिनयाचं तू विद्यापीठ होतीस,नवीन कलाकारांसाठी तू एक आदर्श होतीस,तामिळ,तेलगू या सोबतच तू बॉलिवूड आणि छोटा पडदा सुद्धा गाजवलास.

तब्बल पन्नास वर्षे तू रुपेरी पडद्यावर आपल्या अदाकारीने वर्चस्व गाजवलंस, पन्नास वर्षाचा काळ थोडा थोडका नसतो ग,मात्र एवढ्या लवकर जगाचा निरोप घेण्यासारखा देखील नसतो.
तू अशी अचानक आम्हाला सोडून एक्झिट घेशील हे स्वप्नातही आम्हाला वाटलं नव्हतं .तुझं अस जाणं आम्हाला सदमा देणारं आहे.मेरे हाथो में नौ नौ चुडीया है अस म्हणत आजही अनेक तरुण पोरी तुझ्या सारखा अभिनय करण्याचा प्रयत्न करतात.

तू तुझ्या सौन्दर्याच्या बाबतीस आणि शरीर प्रकृतीच्या बाबतीस भलतीच काँशियस होतीस ग ,तरीसुद्धा तू अशी अचानक एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाशील अस वाटलं नव्हतं .तुझ्या एक्झिट ची खबर घेऊन आजचा सूर्य उगवला आणि रसिकांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला .श्री खरोखरच तू एक दैवी देणगी होतीस,अजूनही विश्वास बसत नाही की तू आम्हाला सोडून गेलीस. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हणतात मात्र देवही एवढा निष्ठुर कसा होऊ शकतो हाच प्रश्न आम्हाला पडला आहे .

तुझाच एक चाहता

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...