गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

सायकल ........!



सायकल .....!

." सायकल वाल्या पुलीसवाल्या बिरीक लावून थांब,टोपी तुझी र हातात माझ्या , होईल कसं र काम ,जाऊया डबल सीट रे लांब लांब लांब "हे गाणं लक्ष्मीकांत बेर्डे आणि उषा चव्हाण यांच्यावर चित्रित केलं तेव्हा मुख्य आकर्षण होती ती सायकल .हे गाणं आणि सायकल आठवण्याच कारण म्हणजे आज लेकींसाठी दोन सायकल खरेदी केल्या,या सायकल पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो कोणत्याही शब्दात वर्णन करता येणारा नव्हता,अनमोल असा तो क्षण अनुभवला आणि लहानपणीचे दिवस आठवले .

लहानपणी बहुतांश लोकांकडे येण्या जाण्याच साधन म्हणजे सायकल असायची,ज्यांच्याकडे सायकल आहे तो सधन कुटुंबातील समजला जायचा,त्याला चारचौघात मानसन्मान असायचा . मला आजही आठवत की मी पहिल्यांदा सायकल चालवली ती सातवी आठवीत गेल्यानंतर,म्हणजे वयाच्या बारा तेराव्या वर्षी,आज मात्र लेकरू वर्षभराच झालं की त्याला सायकल ,बाबा गाडी,तीनचाकी सायकल खेळायला मिळते .सायकल सोबतच आता ट्रायसिकल ची मोठं मोठी शोरूम मेट्रो सिटी सोबतच बिडसारख्या शहरातही दिसून येतात .

पूर्वी म्हणजे 90 च्या दशकात ग्रामीण भागासह शहरातही भाड्याने / किरायाने सायकल मिळायची,सुरवातीला चार अणे,आठ अणे तास मिळणारी सायकल नंतर तीन चार रुपये तासांपर्यंत पोहचली.दिवसभर सायकल वापरायची असेल तर दहा वीस रुपये मोजावे लागत,त्यावेळी बीड शहरात नसीम सायकल मार्ट,ए वन सायकल मार्ट,नितीन सायकल मार्ट ,मोहारे सायकल मार्ट अशी मोजकीच दुकानं असायची. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही सायकल मार्ट,पंचर काढणे हे व्यवसाय तरुणांना आकर्षित करीत असत .

त्या काळात लेडीज आणि जेन्ट्स अशा दोनच सायकल असायच्या आज मात्र लहान मुलांच्याच सतराशे साठ सायकलचे प्रकार बाजारात आले आहेत .आमच्या लहानपणी आम्हाला खेळायला लाकडी गाडे होते, सुताराकडून चार लाकडं त्रिकोणी आकारात बांधून तयार केलेला गाडा हा मर्सिडीज पेक्षा भारी वाटायचा .

कालौघात मात्र सायकल हळूहळू मागे पडली . मोपेड,स्कुटर,बुलेट या गाड्या बाजारात आल्या आणि गरिबांची सायकल बाजारातून हळूहळू कमी होऊ लागली .सायकल ला असलेले कॅरियर वर बसून किंवा मधल्या दांडीवर बसून डबल सीट लॉंग ड्राइव्ह तुम्ही आम्ही अनेकांनी एन्जॉय केली असेल .काही गोड आठवणी देखील असतील अनेकांच्या .अगदी रुपेरी पडद्यावरील नायक नायिका यांनी  देखील आता आता पर्यंत सायकल चा वापर केल्याचे दिसून येते .

आजही चीन सारख्या देशात सायकल भाड्याने मिळते नव्हे तिथे बहुतांश लोक मोठं मोठ्या गाड्या ऐवजी सायकलचा सर्रास वापर करताना दिसतात,भारतात मात्र अद्यापही हे चित्र दिसत नाही .पूर्वीच्या काळी दूधवाला सायकलवर दूध घालायला येत असे,आज मात्र मोटारसायकल वर दूध घालणारेच दिसतात .आज सायकल फक्त पेपर टाकणाऱ्या मुलांकडेच सायकल दिसतात .

काही ध्येयवेडे लोक आजही सायकलवर भारत भ्रमण  करताना दिसतात,अनेक देशात सायकलच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात,बराक ओबामा सारखे लोकही सायकलचा वापर करताना दिसतात मात्र हे फार थोडे लोक आहेत,सायकल ही शरीराच्या सर्व अवयवांना चालना देणारे साधन आहे परंतु त्याकडे कोणी लक्ष देत नाही.पेट्रोल आणि डिझेल च्या वाढलेल्या किमती त्यातून होणारे वायू प्रदूषण या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर सायकल ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली पाहिजे .आठवडा भरातून एक दिवस तरी मोटार सायकल किंवा चारचाकी ऐवजी सायकलवर फिरण्याचा निर्णय प्रत्येकाने घेतला तर राष्ट्रीय संपत्ती तर वाचेलच परंतु आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होईल हर नक्की .

पूर्वी सायकल ही गरिबांची गरज होती आज सायकल ही श्रीमंतांच्या प्रतिष्टे च लक्षण झाली आहे,दिवसरात्र कामात व्यस्त असणाऱ्या माणसाकडे स्वतःच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम पाहायला देखील वेळ नाही,मग वाढलेलं पोट,शरीरातील बदल नियंत्रित करण्यासाठी मोठं मोठे उद्योगपती,राजकारणी सायकलिंग करताना दिसतात,अनेक शहरात तर सायकल चालवणाऱ्यांचे क्लब स्थापन झाले आहेत,कालचक्रात सायकलमध्ये अनेक बदल झाले आहेत, आता पारंपरिक सायकल बरोबरच गेयरच्या सायकल बाजारात आल्या आहेत,पूर्वी दोन चारशे रुपयांना मिळणारी साधी सायकल आजघडीला तीस चाळीस हजारापर्यंत गेली आहे .

माणूस तरुण पणात पैसे कमवण्यासाठी मरमर करतो आणि आयुष्याच्या मध्यानंतर कमावलेला पैसा शरीर व्यवस्थित राहावे,आरोग्य  टिकावे यासाठी खर्च करतो आणि त्यातूनच मग महागड्या सायकल ची फॅशन सुरू होते.आज बहुतांश लोक सकाळी मॉर्निंग वॊक सोबतच सायकलिंग करताना दिसून येतात,मात्र या सायकलिंग मध्ये जुन्या जमान्यातील सायकलची मजा नाही हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404 .

सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

गुजरातच्या निकालाचा अन्वयार्थ

काँग्रेस को हरा दिया,बीजेपी को डरा दिया !


केंद्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर तब्बल सतरा राज्य पादाक्रांत करणार्‍या भाजपच्या उधळलेल्या वारूला काही प्रमाणात वेसण घालण्याचं काम राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने गुजरातमध्ये केलं. गुजरातच्या निवडणूकीत मोठ्या फरकानं भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्ता राखेल असा राजकीय धुरीणांचा अंदाज सपशेल खोटा ठरवत मतदारांनी मोदींना देखिल जास्त हवेत उडू नका, जमिनीवर चाला असा इशाराच दिला आहे. 2012 च्या तुलनते तब्बल 16 जागा भाजपच्या कमी झाल्या आणि 99 जागांवर भाजपला समाधान मानावे लागले तर कॉंग्रेस 61 जागांवरून 80 जागांपर्यंत जावून पोहचली. 2012 पासून तब्बल 27 राज्यात पराभवाचे तोंड पहावे लागलेल्या राहुल गांधी यांच्या पदरी गुजरात आणि हिमाचलमध्ये देखिल पुन्हा एकदा निराशाच आली. मात्र गुजरातच्या निकालाने राहुल काठावर का होईना पास झाले असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर दुसरीकडे मोदींच मेरीट मात्र हुकलं हे देखिल तितकच खर आहे. एका वाक्यात या निकालाच विश्लेषण करायचं झाल्यास मतदारांनी "काँग्रेस को हरा दिया,भाजपा को डरा दिया "असच म्हणावं लागेल .

स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात तब्बल 60 वर्षापेक्षा अधिक काळ कॉंग्रेसने एक हाती सत्ता राखल्याचा इतिहास आहे. अट्टल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सहा-साडेसहा वर्षाचा काळ आणि देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल आणि चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील तीन-साडेतीन वर्षाचा काळ सोडला तर कॉंग्रेसला पराभूत करण्याची किमया कोणीच दाखवली नाही. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र दामोधरदास मोदी नावाच्या व्यक्तीचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला आणि त्याने कॉंग्रेसच्या सुर्याला ग्रहण लावत कॉंग्रेसी सत्तेचा अस्त केला. ज्या भाजपच्या कधीकाळी देशात केवळ दोन जागा निवडूण आल्या होत्या त्या भाजपने 2014 च्या निवडणूकीत 282 जागांपर्यंत मजल मारत एनडीएच्या माध्यमातून 300 चा टप्पा पार करत देशात कॉंग्रेसला नेस्तनाबुत केलं. कॉंग्रेसची अवस्था एवढी केवीलवाणी झाली की, विरोधी पक्षासाठी लागणारं 10 टक्के संख्याबळा एवढा आकडा देखिल कॉंग्रेसला गाठता आला नाही. 2014 च्या धक्क्यातून कॉंग्रेस तीन वर्ष झाले तरी देखिल सावरलेली नाही.
लोकसभा निवडणूकीतील अभुतपुर्व यशानंतर भाजपचा अश्वमेध चौखूर उधळला आणि पाहता-पाहता केवळ पाच राज्यात सत्ता असलेल्या भाजपने तब्बल 14 राज्य पादाक्रांत करत 19 राज्यांमध्ये आपला सत्तेचा झेंडा रोवला. जम्मु काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत कॉंग्रेसमुक्त भारत हा नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा गेल्या तीन वर्षात भाजपच्या कार्यकर्त्यांनी खरा करण्यासाठी रात्रीचा दिवस केला. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, जम्मु काश्मिर, बिहार, उत्तरप्रदेश यासारख्या मोठ-मोठ्या राज्यांमधून कॉंग्रेसला घरचा रस्ता दाखवत भाजपने आपले बस्तान बसवले. आज 29 पैकी 19 राज्यात भाजप आणि एनडीएची सत्ता आहे तर कॉंग्रेसच्या ताब्यात केवळ 4 राज्य शिल्लक राहिलेले आहेत.
अशा परिस्थितीत देशातील जनतेच्या नजरा या गुजरात निवडणूकीकडे लागल्या होत्या. तब्बल 22 वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपला यंदा फटका बसणार का? नोटाबंदी आणि जीएसटीमुळे वैतागलेली जनता कॉंग्रेसच्या हाताला साथ देणार का?, गुजरातमध्ये यश मिळवून कॉंग्रेस 2019 च्या दृष्टीने वाटचाल सुरू करणार का? असे प्रश्न निवडणूकी दरम्यान उपस्थित होत होते. तीन महिने अगोदर गुजरातमध्ये प्रचाराला सुरूवात करून कधी नव्हे ते राहुल गांधी यांनी ही निवडणूक सिरअस घेतल्याचे दाखविले. पाटीदार आंदोलनाचा मुद्दा असो की बेरोजगारी अथवा विकास गांडो थयो च्छे असं म्हणत मोदींना टार्गेट करण्याची एकही संधी राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने सोडली नाही. गुजरातच्या रणसंग्रामामध्ये राहुल यांनी तब्बल 115 पेक्षा जास्त सभा घेतल्या. अगदी प्रत्येक मंदिराच्या उंबर्‍यावर डोकं टेकवत आपण हिंदु असल्याचा दावाही त्यांनी केला. अगदी जाणवे घालायलाही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यामुळे यावेळी गुजरातमध्ये नक्कीच परिवर्तन होणार आणि कॉंग्रेसला अच्छे दिन येणार अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती .मात्र राहुल यांनी हे सगळं करताना ज्या हार्दिक पटेल नावाच्या 23 वर्षीय पोराला साथीला घेतलं त्याचा म्हणावा तेवढा फायदा राहुल यांना झालाच नाही,त्याच बरोबर जिग्नेश आणि अलपेश ठाकूर यांच्या मागेही लोक मोठ्या प्रमाणात न आल्याने काँग्रेस ला म्हणावा तेवढा लाभ झाला नाही .

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 36 सभा घेवून कॉंग्रेसच्या प्रचारातील हवा काढून घेत भाजपचे कमळ पुन्हा एकदा गुजरातमध्ये कसे फुलेल यासाठी प्रयत्न केले. आणि त्याचा परिणाम म्हणून 22 वर्षानंतर पुन्हा एकदा जनतेने मोदींच्या हातात सत्तेचे सुत्र सोपवली. राजकीयदृष्ट्या भाजपने गुजरात आपल्याकडे राखली असली तरी नैतिकदृष्ट्या मात्र भाजपचा पराभवच झाला असेच म्हणावे लागेल. कारण ज्या गुजरात मॉडेलच्या नावाखाली मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडूकीत आणि त्यानंतर झालेल्या प्रत्येक राज्याच्या निवडणूकीत भाजपला बहुमताकडे नेले. त्याच गुजरातमध्ये त्यांना पुन्हा सत्ता आपल्याकडेच राखण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपचे जणू सिझर झाले असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही.
भाजपच्या या विजयानंतरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नरेंद्र मोदी यांचा एक कलमी कार्यक्रम सहकारी मंत्र्यांना विचारा न घेण्याचा उद्योग, मोठ-मोठ्या घोषणा, नोटबंदी आणि जीएसटी सारखे जनतेच्या माथी लादलेले निर्णय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मतदारांना गृहीत धरण्याचा उद्योग कसा अंगाशी येवू शकतो हेच गुजरातच्या आकड्यावरून स्पष्ट झाले आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी तसेच सर्वसामान्य माणूस भरडला गेला हे भाजपचे कार्यकर्ते देखिल खाजगीत मान्य करतात. मात्र बोलायला कोणीच तयार नव्हते. गुजरातच्या जनतेने मोदींना मतपेटीतून याचा जवाब दिला आहे. दुसरीकडे सतत 27 निवडणूकांमध्ये पराभवाचे तोंड पाहणार्‍या राहुल यांच्या नेतृत्वाला थोड्या फार प्रमाणात साथ देण्याचा प्रयत्नही जनतेने गुजरातच्या माध्यमातून केला आहे. 2012 च्या निवडणूकीत  61 जागा असणार्‍या कॉंग्रेस यंदा 80 पर्यंत मजल मारता आली. याचाच अर्थ पप्पू पास हो गया असा लावल्यास वावगे ठरणार नाही. दुसरीकडे 115 वरून 99 वर का यावे लागले याचा विचारही जर मोदींनी केला तर आणि तरच 2019 ला पुन्हा एकदा निर्भेळ यश भाजपला मिळू शकेल असे वाटते.

लक्ष्मीकांत रुईकर,बीड .

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

संघर्षयोध्याची वारसदार !

संघर्षयोध्याची वारसदार !


बीड सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातून ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करीत दिल्लीच्या तख्ताला गवसणी घालण्याची ताकद ठेवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यात कायम संघर्ष करावा लागला,त्यांच्या नंतर त्यांचा राजकीयच नव्हे तर संघर्षाचा वारसा देखील पंकजा मुंडे यांच्या वाट्याला आल्याचे मागील तीन वर्षात दिसून आले आणि त्यांनी या संघर्षाला धीरोदत्तपणे तोंड दिल्याचं देखील वेळोवेळी दिसून आलं,वैद्यनाथ कारखान्यावर घडलेल्या दुर्घटनेनंतर देखील हेच प्रकर्षाने दिसलं.पंकजा मुंडे यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना खंबीरपणे आधार देऊन मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला. रुके ना तू थके ना तू,संघर्ष के आगे झुके ना तू हा मूलमंत्रच जणू गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा यांना दिल्याचं वेळोवेळी  त्यांनी दाखवून दिलं आहे हे नक्की .आज मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांच्यातील नेतृत्व गुणांची चुणूक जागोजागी पंकजा यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येते हे ही तितकच खरं आहे.मुंडेंची ही कन्या साहेबांच्या नावाचा जनतेला विसर पडू देणार नाही याची पुन्हा एकदा खात्री या निमित्ताने पटली हे कोणीच नाकारू शकणार नाही .

मराठवाड्यासारख्या मागास भागातून राजकीय पटलावर अनेक दिग्गज नेते पुढे आले,स्व शंकरराव चव्हाण असोत की प्रमोद महाजन अथवा विलासराव देशमुख या नेत्यांच्या तोडीसतोड नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली ती गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी .बीड जिल्ह्यातील परळी सारख्या भागात जन्मलेल्या या माणसाने महाविद्यालयीन काळापासूनच संघर्षाला सुरवात केली,आणीबाणीचा प्रसंग असो की इतर कोणतेही आंदोलन गोपीनाथ मुंडे यांनी त्यात हिरीरीने सहभाग घेतला,पुण्यात शिक्षण घेत असताना ते प्रमोद महाजन आणि विलासराव देशमुख यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी राजकारणाची वाट धरली .चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत उनेपुरे साडेचार वर्ष सत्ताधारी म्हणून त्यांच्या वाट्याला आले मात्र या काळात मेन गेट टू रामटेक ही ओळख त्यांनी निर्माण केली .गृहमंत्री पदाचा दरारा काय असतो हे मुंडेंनी दाखवून दिलं .कायम दिन दलीत ,पीडित ,उपेक्षित लोकांसाठी झगडणाऱ्या या माणसाने लोकांचं प्रेम कमावलं आणि माणसं कमावली,जीवाला जीव देणारे लोक निर्माण केले जे आजही त्यांच्या माघारी पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,त्यामुळेच त्यांच्या निधनांनातर वाट्याला आलेल्या संघर्षात पंकजा मुंडे यांना दहा हत्तीचं बळ मिळालं .

गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाचे दुःख बाजूला सारून पंकजा यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काढला,भाजप च सरकार येण्यामध्ये पंकजा यांचा वाटाही मोठा आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही .गोपीनाथ मुंडे यांनी 1995 मध्ये संघर्षयात्रा काढली होती,त्याच पद्धतीने पंकजा यांनी 2014 साली संघर्षयात्रा काढून उपेक्षितांचा आवाज बुलंद केला .

सत्तेत आल्यानंतर त्यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातुन ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा कसोशीने प्रयत्न केला .मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो की जलयुक्त शिवार सारखी योजना,सामान्य माणसाला थेट सत्तेचा लाभ मिळावा म्हणून पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केला आणि त्यात त्यांना मोठे यशही मिळाले .

गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न असणारा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना त्यांच्या अकाली निधनानंतर पोरका झाला होता मात्र पंकजा यांनी दोन वर्षांपासून बंद असणारा हा कारखाना या वर्षी मोठ्या हिमतीने सुरू केला,महिनाभरात जवळपास एक लाख साखर पोत्यांचे उत्पादन करण्यात आले होते मात्र अचानक काळाने घाला घातला आणि कारखान्यात झालेल्या अपघाताने पाच कामगारांचा बळी गेला .एकीकडे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना हा आघात झाल्याने पंकजा या मोडून पडल्या,मात्र घरावर संकट कोसळले तर कर्त्या माणसाने हतबल व्हायचं नसतं हे पंकजा यांनी दाखवून दिलं .या मोठ्या अपघातानंतर अवघ्या काही तासात पंकजा मुंडे यांनी लातूर आणि अंबाजोगाई येथे जाऊन जखमींची भेट घेतली तसेच घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या घरी जाऊन सांत्वन करीत मोठा आधार दिला .ज्यावेळी पंकजा मुंडे यांनी लातूर येथे जाऊन जखमींची नातेवाईकांची भेट घेतली तेव्हा त्या लोकांना जणू देवदूतच आपल्या मदतीला आल्याची भावना निर्माण झाली.अनेक महिलांनी त्यांना ही भावना बोलून देखील दाखवली .ताई तुम्ही आलात आता सगळं व्यवस्थित होईल,तुम्ही काळजी करू नका ,आमच्या घरात जर अशी घटना घडली असती तर आम्ही काय केलं असत,तुमचा यात काहीच दोष नाही असं म्हणून अनेक माता भगिनींनी पंकजा यांनाच आधार देण्याचा प्रयत्न केला .या आधारावरच अवघ्या काही तासात त्यांनी परिस्थिती यशस्वीपणे हाताळत या अपघातात सापडलेल्या लोकांना आधार देत त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला .घरातील कर्ता माणूस गमावण्याचे दुःख काय असते हे त्या अजून विसरलेल्या नाहीत त्यामुळे त्यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या पाठीवर हात ठेवत घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल असा विश्वास दिला .

एवढा मोठा आघात झाल्यानंतर कितीही हिम्मतवान पुरुष असता तरी तो खचला असता मात्र पंकजा मुंडे यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती त्यांच्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच रक्त आहे याची साक्ष देते. राजकीय संघर्ष तर पाचवीलाच पुजलेला असताना अचानक येणाऱ्या अशा संकटांना देखील खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे हेच त्यांनी दाखवून दिले आहे .

गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारावेळी प्रक्षुब्ध झालेल्या जमावाला मुंडे साहेबांची शपथ घालून शांत करणाऱ्या या बहाद्दर मुलीनं त्यांच्या नंतर देखील समाजाला सातत्यानं आपल्या पंखाखाली घेतल्याचं दाखवून दिलं आहे .राजकीय माणसाच्या आयुष्यात चढउतार हे नेहमीच येत असतात मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आघात झाल्यानंतर ही त्यातून समाजासाठी सगळं विसरून उभं राहणं यालाच कदाचित संघर्षयोद्धा म्हणत असावेत .आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने पंकजा मुंडे याच सक्षमपणे चालवू शकतात हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

डागाळलेली वर्दी ...........!

डागाळलेली वर्दी ......!

एखादा किरकोळ पाकिटमार, चोर,घरफोड्या करणारा पकडायचा अन आपण फार मोठी कामगिरी केल्याचा आव आणायचा मात्र त्याचवेळी खून,दरोडा,बलात्कार,अपहार या सारख्या गंभीर गुन्ह्यात एखाद्या खादी डगले घातलेल्याचा फोन आला की शेपूट घालून कारवाई टाळायची हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे,नोकरीत लागताना अंगावर घातलेली खाकी वर्दी पहिल्या काही वर्षातच एवढी निलाजरी होते की तिच्यावर पडलेले रक्ताचे डागही अच्छे वाटू लागतात ही अवस्था सध्या पोलीस दलाची झाली आहे.राज्यातील पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत हा  विश्वासच लोकांमध्ये राहिलेला नाही.सांगली प्रकरणानंतर तर "खुनी खाकी वर्दी"अशी नवी नकोशी ओळख या खात्याची निर्माण झाली आहे,भविष्यात ही ओळख पुसून काढण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाला विशेष मेहनत घ्यावी लागेल .

एखाद छोटं खेडे गाव असो की मुंबई सारखी माया नगरी, सगळे लोक रात्री शांत झोपतात कारण त्यांच्या रक्षणासाठी पोलीस नावाची यंत्रणा डोळ्यात तेल घालून 24 तास जागी असते . खून,दरोडा,अपघात,महापूर,आंदोलन,नैसर्गिक आपत्ती अशी कोणतीही घटना घडली तर सर्वात अगोदर घटनास्थळी पोहचणारी यंत्रणा म्हणजे पोलीस होय.तलाठी,मंडळ अधिकारी हे महसूल चे लोक उशिरा आले तरी चालते मात्र पोलीस वेळेतच पोहचला पाहिजे ही सर्वांचीच अपेक्षा असते. बहुतांश वेळा पोलीस जनतेची ही अपेक्षा पूर्ण देखील करतात.लाखो लोक रस्त्यावर उतरले असले तरी शंभर पन्नास खाकी वर्दी वाले दिसले की वातावरण शांत होते,कारण या वर्दीचा आदर आजही कायम आहे .  कितीही मोठा गुंड,चोर,मवाली  असला तरी खादीचा धाक त्याच्या मनात कायम असतो .

मात्र अलीकडच्या काळात खाकी आणि खादी हातात हात घालून प्रशासन चालवीत असल्याची अनेक उदाहरणे समोर येतात आणि त्यातून मग खाकीने खादी  समोर गुडघे टेकल्याचे आपण पाहतो . 'ए पुलीस स्टेशन है,तुम्हारे बाप का घर नही, हा अमिताभ चा जंजिर मधील डायलॉग असो की " मेरे जमीर मे दम है,क्यूकी मेरी जरूरते कम है,"हा सिंघम मधील अजय देवगण चा  डायलॉग पहिला की आपल्याला आपण स्वतःदेखील खाकी घालावी असे वाटते,या खाकी चा अभिमान वाटतो रक्त सळसळ करते मात्र याच चित्रपटात खकिमधील काही लोक कसे खादीवाल्यांचे पाय चाटतात हे देखील दाखवले आहे तेव्हा आपल्याला सिंघम चा अभिमान वाटताना इतर सहकारी पोलीस ज्या प्रकारे वागतात ते खरं असल्याचं जाणवत आणि त्यात तथ्य देखील आहे याची खात्री पटते .

पोलीस कोठडीत आरोपीला त्याने  केलेल्या  गुन्ह्याची कबुली द्यावी अन मुद्देमाल ,घटनास्थळ, वापरलेले शस्त्र दाखवावे यासाठी खाकीकडून सुंदरी चा पाहुणचार मिळतो,दोन चार फटके पडले की आरोपी पोपटासारखं बोलू लागतो.आजही चांगले चांगले दादा,भाई,डॉन पोलिसांच्या माराला थरथर कापतात ही वस्तुस्थिती आहे मात्र गेल्या दहा पंधरा वर्षात पोलीस दलातील खाबू गिरी,चाटुगिरी, झेलेगिरी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की या वर्दीचा धाकच राहिला नाही.

पूर्वी खाकी सोडा पण साध्या कपड्यातील पोलीस आला आहे हे जरी कळलं तरी प्रक्षुब्ध झालेला जमाव शांत होत असे आज मात्र जमाव मिळून वर्दी भरदिवसा भररस्त्यात टराटरा फाडत असल्याचे आपण अनेकदा पाहतो,अनुभवतो .

देशात पोलीस कोठडीत मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात पाहिले तर त्यात महाराष्ट्राचा क्रमांक वरचा लागतो हे दुर्दैव म्हणावे लागेल .2015 साली केलेल्या पाहणीत देशात 1087 मृत्यू पोलीस कोठडीत झाल्याचे समोर आले आहे,त्यात सर्वाधिक 127 पेक्षा अधिक मृत्यू हे महाराष्ट्र्रात झाले आहेत हे विशेष .या सगळ्याच मृत्यूला पोलिसच जबाबदार आहेत असे नाही बहुतांश मृत्यू हे आरोपीने आत्महत्या केल्याने झाले आहेत मात्र पोलिसांच्या मारहाणीत किंवा टॉर्चर करण्यामुळे झालेले मृत्यू देखील दुर्लक्षून चालणार नाहीत एवढे आहेत .

गृह विभागाच्या पाहणीनुसार कोठडीतील मृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी विदेशात आरोपींना कागदाचे कपडे घालायला दिले जातात,तसेच त्याला ज्या ठिकाणी म्हणजे जेल मध्ये ठेवले आहे तिथे सुद्धा अशी कोणतीच वस्तू ठेवली जात नाही ज्यामुळे त्याचा मृत्यू होईल .आपल्या देशात मात्र पोलीस दलात अद्याप खूप सुधारणा व्हायच्या आहेत .

पोलीस कोठडीत असताना होणारे सगळेच मृत्यू हे पोलिसांच्या मारहाणीमुळे होतात असे नाही मात्र सांगली सारखी प्रकरणे देखील अधून मधून होत असतात हे खरे आहे. सांगलीच्या प्रकरणात पोलिसांनी एखाद्या क्रूरकर्मा सराईत खून करणाऱ्याला देखील लाजवेल असे नीच आणि घृणास्पद कृत्य केले आहे .किरकोळ गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला टॉर्चर करण्याची एवढी कसली घाई पोलिसांना झाली होती,त्याच्याकडून असा कोणता देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा घडला होता की ज्यासाठी पोलीस एवढ्या खालच्या थराला गेले हे न उलगडणारे कोडे आहे .एकदा मृतदेह जळाला नाही म्हणून दोनदा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,हा प्रकार म्हणजे खाकीची संघटित गुन्हेगारीच  म्हणावी लागेल .

देशातच नव्हे तर आशिया खंडात ज्या मुंबई पोलिसांचे नाव आणि दबदबा होता त्याच मुंबई पोलीस दलात दया नायक सारखे डॉन लोकांच्या तालावर नाचणारे अधिकारी होते हे देखील समोर आले आहे.नोकरीला लागल्यानंतर प्रशिक्षण घेतानाच बहुतेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पैसे कसे खायचे,पैसे कशात कमवायचे याचेही प्रशिक्षण दिले जाते की काय अशी शंका आजकाल येऊ लागली आहे.

पोलीस महासंचालकपासून ते साध्या  कॉन्स्टेबल पर्यंत सगळेचजण त्यांच्या त्यांच्या औकातीनुसार पैसे खाण्याच्या मागे लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते .बीड सारख्या मागास जिल्ह्यात देखील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे महिन्याचे कलेक्शन पंचवीस ते पन्नास लाखाच्या घरात असते हे ऐकून धक्का बसतो .

पोलिसांच्या डोळ्यादेखत मटका,जुगार,वेश्याव्यवसाय, या बरोबरच अनेक अवैध धंदे बिनबोभाट सुरू असतात मात्र त्यांच्यावर काहीच आणि कधीच कारवाई होताना दिसून येत नाही याउलट हेच पोलीस सामान्य माणसाला वर्दीचा रिकामा धाक दाखवताना जिथे तिथे दिसतात .प्रत्येक खेड्यापासून ते मुंबई सारख्या मेट्रो सिटी पर्यंत सगळीकडे पोलिसांची पैसे कमविण्याची पद्धत एकच असल्याचे दिसते फरक फक्त शहरातील गुन्हेगार, दादा ,भाई यांच्या नुसार होताना दिसते .

स्थानिक गुन्हे शाखा असो की दहशतवाद विरोधी पथक कोणत्याही ठिकाणी बदली किंवा बढती हवी असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाखो रुपये द्यावे लागतात हे पोलीस दलातील उघड सत्य आहे.पोलीस निरीक्षक म्हणून स्वतंत्र पदभार पाहिजे असेल तर सध्या बीड सारख्या जिल्ह्यात किमान पाच आणि कमाल आठ लाखाचा रेट आहे,ठाण्याच्या हद्दीत किती बार,दारू दुकाने,मटका,पत्याचे क्लब आहेत यावर त्या त्या ठाण्याच्या इंचार्ज चे कलेक्शन ठरवले जाते आणि त्यानुसार त्याच्याकडून तेव्हडे घेतले जाते .अधिकारी,त्यांच्या बायका ,पोरं, नातेवाईक हे जिल्ह्यात दौऱ्यावर आले की त्यांना साड्या,कपडे,उंची भेटवस्तू द्याव्याच लागतात,निलाजरे आणि बेशरम अधिकारी देखील कोणताही विचार न करता या भेटवस्तू स्वीकारतात हे विशेष .ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार वीस पंचवीस हजार नाही तो लॅपटॉप,सोनसाखळी,मोबाईल आशा वस्तू भेट म्हणून कशा देऊ शकतो याचा विचार ना देणारा करतो ना घेणारा .

अनेक ठिकाणी तर नवा अधिकारी आला की जुन्यापेक्षा लाख पन्नास हजार वाढवून घेतो असे अनेकांचे अनुभव आहेत .अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहन असोत की वाळू,खडी, दगड,मुरूम वाहतूक करणारी वाहन,एवढंच काय अनेक वरिष्ठ अधिकारी हे प्लॉटिंग,भिशी ब्रोकिंग,सट्टा ,हॉटेलिंग अशा अनेक व्यवसायात भागीदार असल्याची अनेक उदाहरणे आहेत .

ज्यांच्या डोक्यावर खादी घालणाऱ्यांचा वरदहस्त आहे किंवा त्यांच्या भागीदारीनेच अवैध व्यवसाय सुरू आहे त्यांच्या पुढे पुढे करण्यात धन्यता मानणारे पोलीस सामान्य माणसाने ट्राफिक सिग्नल तोडला तरी बॉर्डर क्रॉस केल्याचा कांगावा करीत त्याच्यावर कारवाई करताना दिसतात एवढेच काय पण सामान्य माणूस चोरी,दरोडा किंवा अन्यायाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला तर फिर्यादीलाच एवढे उलट सुलट प्रश्न विचारले जातात की कुठून अवदसा आठवली अन तक्रार द्यायला आलो असे त्याला वाटते . प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या करणारे,पाकिटमार,मंगळसूत्र चोरणारे,बॅग लंपास करणारे लोक कोण आहेत हे पोलिसांना माहीत असते,एखाद्या भागात चोरी झाली की त्या भागात कोण आहे रे रामू की शामु, बाळू की बंडू त्याला धरा, माल वसूल करा आणि केस रफा दफा करा हेच धोरण पोलोसांचे ठरलेले असते .

अशाच प्रकरणामुळे शेवटी सांगली सारख्या घटना समोर येतात अन पोलिसांची अब्रू पार चव्हाट्यावर येते ,साध्या चोरीचा आरोप असणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ज्या प्रकारे मारून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला  तो पाहता यातील दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करून चालणार नाही तर त्यांना सेवेतून बडतर्फ करीत असे खटले देखील फास्टट्रेक  कोर्टात चालवून या लोकांना जबर शिक्षा होणे आवश्यक आहे तरच खुनाचे पडलेले डाग धुवून निघण्यास मदत होईल .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७

देवेंद्राचा कार 'भार'..........!

देवेंद्राचा कार 'भार'


तुम्ही आम्ही देवेंद्राचा जो काही अवतार पाहिला आहे तो केवळ सिनेमा किंवा वेगवेगळ्या डेली सोपं मधूनच ,त्यात देवेंद्राचे जे दर्शन घडते त्यानुसार हा देवांचा देव ,स्वर्गाचा मालक,राजा किती हतबल,ऍडजस्ट करून घेणारा आहे हे लक्षात येते,राजाची खुर्ची दुरून साजरी दिसत असली तरी त्यावर बसून कारभार करणे किती अवघड आहे हे काल्पनिक कथांमधून का होईना लक्षात येतं, अशीच काहीशी अवस्था राज्याचा कारभार हाकणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची झाल्याचे तीन वर्षांच्या कारभारानंतर दिसते.सहकाऱ्यांच्या चुकांवर पांघरून घालत आपली इमेज जपताना फडणवीस यांना मोठी कसरत करावी लागल्याचे दिसते मात्र तरी देखील सामान्य माणसाच्या मनात एक चांगलं सरकार ही इमेज निर्माण करण्यात ते यशस्वी झाले हाच त्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा प्लस पॉईंट म्हणावा लागेल.

राज्यातील दहा वर्षांच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारभाराला जनता कंटाळली होती,त्यामुळे भाजपने लावलेला जोर आणि मोदी लाट यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या गलबताचा बुडून शेवट होणार हे निश्चित होते,त्यानंतर सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकार समोर अनेक आव्हान होती,विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जरा जास्तच होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही,काँग्रेस राष्ट्रवादी सारखे दृश्य आणि शिवसेनेसारखे अदृश्य विरोधक यांना तोंड देता देता पक्षांतर्गत संघर्षाला देखील त्यांना सामोरे जावे लागणार होते,गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर ते या सर्व आघाड्यावर यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल.

सत्तेत असूनही कायम फडणवीस यांच्या सरकारवर तोंडसुख घेणारे शिवसेनेचे नेते असोत की विनाकारण नको त्या गोष्टी करून किंवा बडबड करून सरकारवर नामुष्की ची वेळ आणणारे सहकारी मंत्री असोत देवेंद्र यांच्या डोक्याला कायम ताण च राहिला आहे.कुठे नेवून ठेवलाय  महाराष्ट्र माझा अस पोटतिडकीने म्हणणाऱ्या माणसाला सुखी करण्याचं खडतर काम देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर होतं. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसून येते .

सरकारने जे लोकाभिमुख निर्णय घेतले त्यात सामान्य माणसाचे किती कल्याण झाले हा संशोधनाचा भाग असला तरी चित्र निर्माण करण्यात मात्र फडणवीस यशस्वी झाले हे नक्की.दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या बळीराजाला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून संपन्न करण्याचा प्रयत्न असो की कर्जमाफीचा विषय,सरकार ने आपली इमेज निर्माण केली हे खरे आहे .

मराठा आरक्षण असो की वेगवेगळे संप,आंदोलन ,मुख्यमंत्री म्हणून ते व्यवस्थित हाताळण्याचे कसब फडणवीस यांनी दाखवले हे मान्य करावेच लागेल,एकीकडे राज्यातील स्वपक्षीय,मित्रपक्षांना खुश करण्याची सर्कस करताना दिल्लीकरांची मर्जी सांभाळणे देखील महत्वाचे होते,त्यात फडणवीस शंभर टक्के उत्तीर्ण झाल्याचे दिसते.राज्य सरकार लोकाभिमुख झाले आहे,या सरकारला सामान्य माणसाची काळजी आहे,पारदर्शक पणा दिसतो आहे अशी भावना आज तरी सामान्य मराठी माणसाच्या मनात निर्माण झाली आहे कदाचित त्यामुळेच थेट नगराध्यक्ष असोत की थेट सरपंच यामध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचे दिसून येते.

गेल्या तीन वर्षात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या सरकारचा चेहरा मोहरा हे एकटे फडनविसच आहेत,बाकी सगळे मंत्री खूप लांब आहेत,देवेंद्र फडणवीस यांची क्लीन इमेज,पंधरा अठरा तास काम करण्याची क्षमता,थेट प्रत्येक खात्यात काय चालले आहे याची इत्यंभूत माहिती देणारी यंत्रणा यामुळे आज तरी फडणवीस हे सर्वांपेक्षा उजवे ठरतात .राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर अनेकवेळा थेट हल्ला करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना मात देण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले हे नक्की.

सरकारला तीन वर्षे पूर्ण होताना शिक्षण ,सार्वजनिक आरोग्य,बांधकाम,नगरविकास,ऊर्जा या खात्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक वाटते,जनतेशी थेट संबंध असणाऱ्या या खात्यात आजही आघाडी सरकारच्या काळातीलच बजबजपुरी कायम आहे,रोज नवे नवे निघणारे जी आर,शिक्षकांच्या बदल्या असोत की बढत्या, यावरून मोठी नाराजी आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आजही सलाईनवर आहे,राज्यात एकही प्रमुख राज्य किंवा राष्ट्रीय मागमार्ग असा नाही की त्यावर खड्डा नाही,लोडशेंडिंग मुळे जनता नाराज आहे त्यामुळे येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या विभागात अधिक चांगले लक्ष देऊन रिझल्ट द्यावे लागतील,केवळ स्वच्छ कारभार,पारदर्शक पणा या गोष्टीवर पुन्हा सत्तेचा सोपान चढता येणे अवघड आहे,त्यामुळे सत्तेचा थेट लाभ ज्या विभागामार्फत जनतेपर्यंत पोहचतो त्या विभागावर जास्त लक्ष देऊन गतिमान कारभार करावा लागेल हे निश्चित .

कापूस ,सोयाबीन,मूग,उडीद यासारख्या पिकांच्या खरेदी साठी सरकारने ऑनलाईन नोंदणी चा घेतलेला निर्णय व्यापारी आणि दलालांच्या जोखडातून बळीराजाला मुक्त करणारा आहे,मात्र ही गोष्ट सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात सरकारी आणि पक्षीय यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

एकूणच काय तर आता यापुढे फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मागील सरकारवर खापर फोडून आपल्या चुका झाकता येणार नाहीत,तसेच शासन हे सामान्य माणसाची काळजी करणारे आहे हे अधिक गडद पणे दाखवून द्यावे लागेल,कारण येणाऱ्या वर्षभरात कधीही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजू शकतो त्या दृष्टीने वाटचाल भविष्यात करावी लागेल हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404



रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

लेकीनं गड राखला ......!

लेकीनं गड राखला ........!

कौन कहता है की आसमान मे छेद नही हो सकता, एक पत्थर तो तबियत से उच्छालो यारो ! अस जे म्हटलं गेलं आहे ते सार्थ ठरविणार दृश्य शनिवारी सावरगाव येथे दिसून आलं.स्व गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा वादात अडकली अन खंडित झाली,मात्र त्यामुळे न डगमगता पंकजा मुंडे यांनी अवघ्या दोन दिवसात हाच दसरा मेळावा भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत यशस्वी करून दाखवला अन समाज आपल्याच पाठीशी असल्याचे दाखवत विरोधकांचे दात घशात घातले .त्याच बरोबर कितीही संकट आली तरी " बघतोस काय रागानं गड राखलाय लेकीनं " हा संदेश देण्यात त्या यशस्वी झाल्या.

महाराष्ट्राच्या राजकारणात कायम या ना त्या कारणाने चर्चेत असणाऱ्या नावांपैकी एक नाव म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे होय.बेधडक बोलणे,निर्णय घेतांनाचा बिनधास्तपणा,परिणामाची फिकीर न करता मनात आलं ते बोलणे ,सभा समारंभात लोकांना काय अपेक्षित आहे तेच बोलणे यामुळे पंकजा नेहमीच मीडियामध्ये आपलं वेगळं स्थान टिकवून आहेत.राज्याच्या राजकारणात त्यांना मानणारा एक मोठा समूह आहे,कदाचित ती स्व गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई देखील असेल मात्र त्यांच्या नंतर ती जपण्याचं काम पंकजा मुंडे यांनी केलं आहे .लाखोंच्या सभा आपल्या वक्तृत्व शैली ने कशा गाजवायच्या हे गोपीनाथ मुंडेंना कधी सांगावे लागले नाही तशीच परिस्थिती पंकजा यांच्या बाबतीत ही आहे . आजही त्यांच्या सभांचे रेकॉर्ड कोणी  तोडू शकेल असे वाटत नाही .मात्र नेता जेवढा मोठा होत जातो तेवढाच तो सत्य परिस्थिती आणि वास्तवापासून दूर जातो की काय असे वाटण्यासारखे पंकजा यांच्याबाबतीत घडू लागले ,त्यातूनच मग भगवान गडाच्या वादाचा जन्म झाला .

पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील मतभेद मागच्या वर्षी राज्याने पाहिले, मात्र तरीदेखील यावर्षी भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याचा अट्टहास पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी धरला होता,स्वतः पंकजा मुंडे मात्र याबाबत कमालीच्या शांत होत्या,अनेकांनी त्यांना याबाबत बोलत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी संयम ढळू दिला नाही.गड ही आपली श्रद्धा आहे अन भक्त ,समाज ही शक्ती आहेत हे त्यांनी वारंवार ठासून सांगितले.त्याच बरोबर महंत यांच्या नावे एक पत्र लिहून त्यांनी चेंडू महंतांच्या कोर्टात ढकलला ,मी लहान झाले मात्र ते ऐकत नाहीत हा  मॅसेज देण्यात त्या यशस्वी झाल्या.

साधारणपणे दोन  दशकांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी समाजाच्या उत्थानासाठी भगवान गडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली,त्याचा त्यांना राजकीय आयुष्यात देखील मोठा फायदा झाला,आपल्याच नव्हे तर विरोधी पक्षात देखील त्यांनी समाजाच्या जीवावर एक दबदबा निर्माण केला होता . त्यांच्या मेळाव्यातून चेतविलेलं स्फुल्लिंग राजकीय उलथापालथी घडवून आणण्यास उपयोगी पडत असे.

मुंडे यांनी समाजाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केल्याने कोठे काय बोलायचे,कधी बोलायचे हे त्यांना पक्के माहीत होते,मात्र त्यांच्या अकाली जाण्यानंतर एकाकी पडलेल्या पंकजा यांची सुरवातीला चिडचिड झाली,त्याचा फायदा घेत विरोधकांनी त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला अन त्यात ते यशस्वी झाले,त्यातूनच मग भगवान गडाचा वाद घडवून आणला गेला अन त्यात पंकजा मुंडे यांच्या नशिबी नको तेवढी टीका आली,वास्तविक पाहता त्याला कारण पंकजा यांचा स्वभाव देखील होताच ,मात्र वडीलकीच्या नात्यानं शास्त्री यांच्याकडून समाजाला जास्त अपेक्षा होत्या,पण त्यांनी देखील उभा दावा असल्यासारखं सुरू केलं अन त्यात गड बदनाम झाला.महंत यांनी अधिकार वाणीने या वादावर पडदा टाकणे अपेक्षित होते मात्र नियतीला कदाचित ते मान्य नसावे म्हणूनच गडावर वंजारी समाजाचे दोन गट निर्माण झाले,त्यातून पंकजा यांच्या नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते .पंकजा यांच्या मागे समाज आहे की नाही असा देखील सवाल उपस्थित केला गेला .

दरम्यान यावर्षी  दसरा दोन दिवसावर आला असताना पंकजा मुंडे यांनी हा मेळावा सावरगाव या भगवान बाबा यांच्या जन्मगावी घेण्याचा निर्णय घेतला अन वादावर पडदा पडल्याचे काही जणांना वाटले,मात्र हा वाद इथेच संपेल असे वाटत नाही .कारण राजकीय आकांक्षा ,अपेक्षा एकीकडे आहेत तर दुसरीकडे धार्मिक श्रेष्ठत्व आहे, त्यामुळे हा वादाचा निखारा कायमस्वरूपी धगधगत राहणार असे आज तरी दिसते .

सावरगाव येथे अवघ्या दोन दिवसात लाखो लोक येतील अन सामावतील याची पुरेपूर काळजी घेतली गेली .
नेटके नियोजन,अल्पकाळात समाजात मेळाव्याच्या नव्या स्थळाबाबत गेलेला मॅसेज यामुळे लाखो लोक याठिकाणी पंकजा काय बोलतात,कोणती भूमिका घेतात हे ऐकण्यासाठी आले होते,अगदी नाशिक,बुलढाणा,सोलापूर आशा दूरवरून लोक आले होते . मेळावा यशस्वी होणार की नाही,लोक जमतील की नाही या बाबत अनेकांच्या मनात शंका होती मात्र समाजाने पंकजा यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.

एवढ्या मोठ्या समाजासमोर काय बोलावे अशा गोंधळलेल्या अवस्थेत पंकजा यांनी जो ट्रॅक पकडला तो निश्चित पणे समाजाला दिशा देणारा असाच होता,जास्त भडक ही नाही अन जास्त मिळमिळीत ही नाही अशा पद्धतीने त्यांनी समाजाचे ब्रेन वॉश केले.संघटन कौशल्य कसे करावे हे कोणत्याही मुंडे ला कोणी सांगायची गरज नाही याची प्रचिती पुन्हा एकदा पंकजा यांच्या रूपाने दिसून  आली .आपलं अख्ख आयुष्य संघर्षात घालवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाचा सुद्धा वारसा पंकजा या समर्थपणे चालवीत आहेत नव्हे त्यासाठी त्याच योग्य आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवले .हुबेहूब गोपीनाथ मुंडे यांची स्टाईल,तसेच हावभाव,त्याच पद्धतीने भाषणाची लकब,हातवारे ही आता पंकजा मुंडे यांची सुद्धा ओळख होऊ लागली आहे.

उघड्या जीप मधून कार्यक्रम स्थळी आल्यानंतर  दोन्ही हाताच्या मुठी आवळून ज्या स्टाईलने त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले त्यामुळे तेथे हजर असणाऱ्या लोकांमध्ये नवा जोश निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले ,त्या ज्या पद्धतीने जीप मधून उतरल्या ते पाहिल्यानंतर अनेकांना मुंडे साहेबांची आठवण झाली असेल .त्यानंतर जळगाव चे कोण आलेत,बुलढण्याचे आलेत ना अस म्हणून समोर बसलेल्या लोकांशी थेट संवाद साधण्याच त्यांचं कौशल्य दिसून आलं.सावरगाव या तशा दुर्गम भागाने काल मुंडे नावाच्या जादूचा अनुभव घेतला . पंकजा यांच्या या निर्णयामुळे सावरगाव हे  नवीन श्रद्धास्थान निर्माण होणार यात शंका नाही मात्र त्याचवेळी भगवान गड देखील समाजाच्या मनात कायम राहावा यासाठी पंकजा यांनी पुढील काळात प्रयत्न करायला हवेत .मात्र पंकजा मुंडे यांचा राजकीय स्वभाव पाहता ते कितपत होईल यात शंकाच आहे,पण अपेक्षा ठेवायला हरकत नाही,कारण उम्मीद पे दुनिया कायम है अस नेहमीच म्हटलं जातं .मेळावा रेकॉर्ड ब्रेक झाला यात शंका च नाही मात्र या मांडव वाऱ्यातून लवकर बाहेर पडून त्यांना जमिनीवर येत समाजासाठी कायम परिश्रम घ्यावे लागतील ,त्यांच्याकडून आता लोकांच्या,समाजाच्या अपेक्षा कितीतरी पटीने वाढल्या आहेत,त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना झटाव लागेल अन्यथा समाजाचा भ्रमनिरास व्हायला वेळ लागणार नाही .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

एका दर्शनाने देव म्हातारा होत नाही

गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्यानंतर खंडित होणार की सुरू राहणार हे खरं तर मागच्या वर्षीच स्पष्ट झालं आहे,दरवर्षी गडावर होणारा हा मेळावा गतवर्षी पायथ्यावर घ्यावा लागला मग पुन्हा या वर्षी त्याच विषयावर एवढा गहजब का केला जातोय हे न कळणारे आहे.पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री या दोघांनी आपल्या भूमिकेवर कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे मात्र त्यामुळे जणू काही खूप मोठं संकट कोसळणार आहे असं जे चित्र उभं केलं जातं आहे ते विनाकारण असल्याचं वाटत.एकवर्षी मेळावा घेतला नाही तर काही गड ओस पडणार नाही किंवा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये घट होणार नाही,त्यामुळे या विषयावर जो चर्चेचा फड रंगवला जात आहे तो  विनाकारण आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही.

महाराष्ट्राच्या मातीतून दिल्ली पाहणार नेतृत्व म्हणजे गोपीनाथ पांडुरंग मुंडे होय.प्रमोद महाजन यांच्या सोबत चळवळीतून पुढं आलेलं नेतृत्व म्हणून मुंडेंच नाव घेतलं जातं.संघर्ष जणू पाचवीलाच पूजल्यासारखे मुंडे शेवटपर्यंत लढत राहिले .राज्यात मुंडे यांनी आपल्या पाठीशी समाजाची मूठ बांधली ,त्यामध्ये त्यांना भगवान गडाची मोठी मदत झाली हे नाकारून चालणार नाही,मुंडे वर्षभर कुठेही असोत दरवर्षी दसरा मेळाव्याला ते न चुकता भगवान गडावर यायचे.मुंडे येणार म्हणून लाखोंच्या संख्येने समाजबांधव गडावर गर्दी करायचे,हा करिश्मा मुंडेंचा होता यात शंकाच नाही मात्र गडाच्या गादीचा देखील होता हे विसरता येणार नाही .मुंडे यांनी गडावरून आणीबाणीच्या राजकीय परिस्थिती मध्ये आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रत्येक वर्षी गडावरील दसरा मेळावा हा मुंडेंच्या भूमिकेमुळे चर्चेत असायचा,त्यांनी गडावर भुजबळापासून ते अगदी सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांना आणले.गडाचा आज जो विकास झाला आहे त्यात मुंडे यांच्या नावाचा मोठा वाटा आहे,मात्र त्याचवेळी गडाने देखील त्यांच्या मागे समाजाची जी ताकद उभी केली ती देखील दुर्लक्षित करून चालणार नाही.

मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देखील व्यस्त वेळेत त्यांनी गडाचे दर्शन घेतले त्यावेळीच त्यांनी यावेळी मला गडावरून पंकजा दिसते आहे असे सांगून यापुढे समाजाने पंकजा यांच्या पाठीशी रहावे हेच अप्रत्यक्षपणे सांगितले होते .त्यांच्या निधनानंतर नामदेवशास्त्री यांनी पंकजा याना गडाची लेक असल्याचं जाहीर केलं होतं तेव्हा समाजाने त्यांच जाहीर कौतुक केलं होतं,मात्र अवघ्या वर्षभराच्या काळात अस काय झालं की ज्यामुळे हीच लेक माहेरपणाला दुरावली गेली.पंकजा मुंडे आणि शास्त्री यांच्यात नेमकं काय घडलं हे आजही एक कोडंच आहे,कदाचित त्याला गोपीनाथ गडाची झालेली निर्मिती देखील कारणीभूत असेल कारण त्याच वेळी शास्त्री यांनी यापुढे भगवान गडावरून राजकीय भाष्य होणार नाही हे स्पष्ट केलं होतं,मग त्यानंतर ही गडावर मेळावा घेण्याचा अट्टहास पंकजा मुंडे यांनी का केला असेल,आणि लेक मेळावा घेणार आहे तर काय फरक पडतो असा विचार शास्त्रींनी का केला नसेल हे प्रश्न अनुत्तरित आहेत.खरंतर गडावर मेळावा घेतल्याने गडाची महती कमी होणार नव्हती किंवा पंकजा यांना त्याचा फार मोठा राजकीय फायदा होणार नव्हता,दरवर्षी सारखा हा कार्यक्रम होता मात्र नेमका कोणाचा इगो जागा झाला आणि मेळावा न घेण्याचा निर्णय घेतला गेला हे न कळणारे आहे.

गडाच्या गादीवर असणारे नामदेव शास्त्री हे न्यायाचार्य आहेत,त्यांनीच पंकजा ही गडाची लेक असल्याचे जाहीर केलं होतं असं असताना नेमकी माशी शिंकली कुठं ? पंकजा यांचा स्वभाव बघता त्यांनी शास्त्री बाबत काही वक्तव्य केले असेल तर हे चार भिंतीतले मतभेद बसून मिटवता आले असते मात्र ते चव्हाट्यावर आणून काय हाशील झाले तर काहीच नाही.

आज मेळावा होणार की नाही यावरून वादंग माजले आहे,मात्र नाही घेतला मेळावा तर काही बिघडणार आहे का,बरं मेळावा घेतल्यानंदेखील काही आगळंवेगळं घडण्याची शक्यता नाही मग का हा अट्टहास ,मेळावा घ्यायचा की नाही हा जसा पंकजा मुंडे यांचा प्रश्न आहे तसा तो गडावर घेऊ द्यायचा की नाही हा अधिकार आज तरी विश्वस्त यांचा आहे.मात्र या सगळ्यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा काही लोक  प्रयत्न करीत आहेत . मेळावा घ्यावा म्हणत काहींनी पंकजा यांच्या पुढे पुढे करण्याचा जो प्रयत्न चालविला आहे तो केविलवाणा असल्याचं दिसत आहे .मुंडे यांनी कोणाच्या सांगण्यावरून कधी मेळावा सुरू केला नव्हता,त्यांना समाजाची वज्रमुठ बांधायची होती,त्यासाठी गडावरील मेळावा हे निमित्त योग्य होत म्हणून त्यांनी मेळावा सुरू केला, आज मेळावा झाला तरच पंकजा यांच्या पाठीशी जनाधार कायम राहणार आहे अन्यथा त्यांचं नेतृत्व संपेल अशी परिस्थिती नाही मग का विनाकारण हे केलं जातंय.

पंकजा मुंडे यांचा राज्याच्या राजकारणात एक वेगळा दबदबा आहे,ग्रामविकास च्या माध्यमातून त्यांना राज्यातील जनतेचा विकास करण्याची मोठी संधी आहे,कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे,केवळ दसरा मेळावा त्या घेतात म्हणून त्यांच्यावर समाज प्रेम करतो,त्यांचं नेतृत्व मान्य करतो अस काही नाही.त्या गडावर आल्या नाहीत,मेळावा घेतला नाही तर सगळं काही संपणार आहे असंही नाही.

त्या गडावर आल्या नाहीत तर गड ओस पडेल असंही काही नाही,गडावर लोक भगवान बाबा यांच्या समाधीच्या दर्शनाला येतात,शास्त्री हे गडाचे महंत आहेत त्यामुळे त्यांना लोक सन्मान देतात याचा अर्थ तर गडावरून पायउतार झाले तर गडावर भक्त येणार नाहीत असाही काही नाही.हे सगळं समजत असतानादेखील आज वाद घातला जात आहे.

मेळावा भगवान गडावर घेतला तरच समाजाला संदेश देता येतो अस काही नाही,पंकजा मुंडे यांनी त्यांच्या संकल्पनेतून गोपीनाथ गडाचा जी वेगळी ओळख निर्माण केली आहे  ती पाहता मेळाव्यासाठी आज तरी त्यांना भगवान गडाची गरज आहे असे वाटत नाही.गोपीनाथ मुंडे यांनी आपली हयात समाजाच्या उत्थानासाठी घालवली मग हा समाज भगवान गडावर एकत्र आला काय अन गोपीनाथ गडावर एकत्र आला काय काहीच फरक पडत नाही. खरंतर गोपीनाथ गड हा मेळावा,सभा ,संमेलन यासाठी योग्य आहे .लोकभावना विचारात घेता आज पंकजा यांचं नेतृत्व एवढं मोठं नक्कीच आहे की त्यांनी आदेश दिला तर समाज खडकावर देखील एकत्र येऊ शकतो .
तरीदेखील हा वाद वाढवून त्या आपल्याच नेतृत्वाविषयी संभ्रम निर्माण करीत आहेत .एका वर्षी नाही घेतला मेळावा तर समाजात त्यांची प्रतिष्ठा कमी होईल अशी परिस्थिती नक्कीच नाही .मात्र हे त्यांना अधिकार वाणीने सांगणार कोणीच नाही.वडिलांच्या मागे आपणच समाजाची माता असल्याचं त्यांनी मागच्या वेळी पायथ्याच्या मेळाव्यात स्पष्ट केलं होतं,त्यामुळे मातेला कोण सांगणार,बाप म्हणणारे शास्त्री आज लेकीला माहेरी मेळावा घेण्यापासून  रोखत आहेत अशा वेळी दुसरं कोणी पंकजा यांना सांगेल अशी स्थिती नाही अन शास्त्री हे तर स्वतःच न्यायाचार्य असल्याने त्यांना कोण बोलणार तेव्हा सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवून पंकजा यांनीच दोन पावलं मागे आल्यास त्यांना त्याचा फायदा होईल असं दिसतं कारण राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते हे त्यांनी लक्षात घ्यावे .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...