मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

जो बिकता है वो दिखता है .........!

 




जो बिकता है वो ही दिखता है .............!

साधारणपणे दिड शतकापूर्वी म्हणजे 1832 मध्ये आराठी वृत्तपत्र सुरू करण्याचा प्रयोग आदरणीय बाळशास्त्री जांभेकर यांनी केला तेव्हा त्यांचा हेतू उदात्त असाच होता,मात्र आज पत्रकारितेच्या नावाखाली जो धंदा मांडला गेला आहे तो पाहिल्यावर त्यांना देखील आपल्या कृतीचा पश्चाताप होत असेल हे निश्चित .वर्तमानपत्र असो की वृत्तवाहिन्या सगळ्यांनीच कमरेच सोडून डोक्याला गुंडाळत कोण किती खालची पातळी गाठू शकतो याची जणू स्पर्धाच लावली आहे .त्यामुळे पत्रकारितेचा स्तर खालावत चालला आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही .आजकालच्या काळातील मोठं मोठ्या शहरातील पत्रकारिता ही राजकारणी किंवा कॉर्पोरेट हाऊस ची बटीक बनल्याचे चित्र आहे,आजच्या दर्पणदिनी तरी हे मान्य करून त्यात थोडाफार बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास ही एक चांगली सुरवात ठरेल हे निश्चित .
साधारणपणे नव्वदच्या दशकात दुरचित्रवाहिन्या भारतात सुरू झाल्या अन गेल्या वीस वर्षांपासून भारतात शेकडो न्यूज चॅनेल अर्थात चोवीस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या सुरू झाल्या .चोवीस तास दळण दळायच म्हणल्यावर काही ना काही तरी द्यावच लागणार हे ओघाने आलंच, मात्र अलीकडच्या पाच सात वर्षात या वृत्तवाहिन्यांचा दर्जा इतका घसरला आहे की नको ते प्रेक्षकांच्या माथी आपण मारत आहोत याचा विसर त्यांना पडतो .टीआरपी च्या जीवघेण्या स्पर्धेत या वाहिन्यांनी कमरेच सोडून डोक्याला गुंडाळून ठेवलं आहे .टीआरपी साठी जो बिकता है वो ही दिखता है असच काहीसं सध्या तरी चालू आहे किंवा जो बिक सकता है वो ही दिखावो अस धोरण या वाहिन्यांनी स्वीकारलं असल्याचं लाजिरवाणे चित्र सध्या दिसून येत .
गेल्या वीस वर्षापेक्षा जास्त काळापासून मी पत्रकारितेमध्ये आहे .सुरवातीला प्रिंट मीडिया मध्ये काम केल्यानंतर तब्बल पंधरा वर्षे मी वृत्तवाहिनी मध्ये काम केलं,मात्र जो अनुभव आला तो निराश करणारा आहे असेच आज म्हणावं लागेल .अर्थात पत्रकारिता ही समाजोपयोगी होती याचा विसर अलीकडच्या काळात पडल्यामुळे प्रचंड निराशा निर्माण झाली आहे .
डॉ बाबासाहेब आंबेडकर असोत की टिळक आगरकर गोखले ,अगदी बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासूनचा इतिहास पाहिला तर पत्रकारिता हा धर्म आहे अस मानलं गेलं,मराठवाडा दैनिकात स्व अनंत भालेराव उर्फ अण्णा यांनी आणीबाणीच्या काळात विरोध म्हणून संपादकीय न छापता तो कॉलम पूर्णपणे ब्लॅक अर्थात काळा छापला होता .आपल्या शब्दलाच काय पण एका काळ्या शाईला सुद्धा किती मोठी किंमत असू शकते हे त्यावेळी अण्णांनी दाखवून दिले होते .मात्र अलीकडच्या काळात पत्रकारिता म्हणजे धंदा झाली आहे .
आर्थिक उदारीकरणाचा स्वीकार आपण केला अन या वृत्तवाहिन्या आपल्या मानगुटीवर बसल्या .बर यात प्रिंट मीडियाचा गळा घोटला जाईल असं वाटत होतं मात्र प्रिंट मीडियाने देखील आपलं रुपडं कालानुरूप बदललं आणि मथळ्याची, हेडलाईनची ,पहिल्या पानांची जागा जाहिरातीच्या पानांनी घेतली अन गंदा है पर धंदा है ही म्हण मीडियामध्ये सुद्धा लागू झाली .
प्रिंट मिडियामध्ये काही बंधने असल्याने थोडा विश्वास बाकी आहे मात्र इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये मात्र फक्त अन फक्त धंदा बघितला जातो हे वारंवार समोर येत आहे.
चोवीस तास बातम्या दाखवायच्या म्हणून कुकरी शो पासून ते ट्रॅफिक अपडेट पर्यंत अनेक विषय या वाहिन्यांनी हाताळले .नाटक,सिनेमा, साहित्य,डिबेट शो,आरोग्य,कॉलेज कॅम्पस,क्रीडा,क्राईम ,धर्म असे एक ना अनेक विषय अर्धा अर्धा तास लोकांच्या माथी मारले जाऊ लागले .कोणतीही नवी असो की जुनी वृत्तवाहिनी बातम्या त्याच त्याच असतात मात्र आमच्याकडे सर्वात आधी आहे अस म्हणून गळे फाडून प्रत्येक जण सांगत असतो .लोकांना काय हवे आहे,त्यांना काय द्यायला पाहिजे यापेक्षा या वाहिन्यांच्या एसी रूममध्ये लाखो रुपयांचा गलेलठ्ठ पगार रिचवणारे तथाकथित संपादक अन त्यांचे बगलबच्चे हे आपली अक्कल पाजळत लोकांचा जीव घेण्याचा कायम प्रयत्न करत असतात .
काडीची अक्कल नसलेले अन कवडीची किंमत नसलेले लोक संपादक म्हणून आपला कंडू जिरवण्यात धन्यता मानतात .देशासमोरील अनेक प्रश्न आ वासून उभे असताना हे दीड शहाणे संपादक अन त्यांचे चव्वे पावभाजी किंवा पार्थ पवार,सुशांतसिंग राजपूत,श्रीदेवीचा मृत्यू असे विषय चघळत बसलेले असतात .
गेल्या आठ महिन्यात कोणतीही वृत्तवाहिनी सुरू केली की त्यावर कोरोना बाबत नको त्या अतिरंजित बातम्या दिसून येतात .अनेकांनी तर या बातम्यांमुळे कोरोनाची भीती वाढल्याचे टिपण केले आहे .मात्र कोण काय म्हणतो ,काय नाही,आम्हाला काही देणंघेणं नाही,आम्ही आमचा दुकानं चालवणार अस या लोकांनी ठरवलेलं असतं .अन ते कार्य ते अव्याहतपणे सुरू ठेवतात .
कोरोनाच्या अगोदर महाराष्ट्रात सरकार स्थापणेवरून जो काही रातचा गोंधळ सुरू होता त्यावर वाहिन्यांनी जे वृत्तसंकलन केले ते किळसवाणे होते .कोण कुठं गेला,काय बोलला,कुठून निघाला इथपासून ते कोणाला परसाकड लागली हे सांगायला सुद्धा या वाहिन्यांनी माग पुढं पाहिलं नाही .त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अक्षरशः काही पत्रकार (?) यांना तुम्ही अशाप्रकारे आमचा पाठलाग करणार असाल तर मला तुमच्या वरिष्टना बोलावं लागेल,आम्हला जगू द्या अन काही घडलं तर आम्ही कळवू पण हा पिच्छा करणं थांबवा अस सांगावं लागलं होतं यातच सगळं आलं .आपण काय दाखवतोय,लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे याचा हे लोक कधीच विचार करीत नाहीत हे मी जवळून पाहिलं आहे .काही वर्षांपूर्वी मुंबई वरून एका स्पेशल स्टोरीसाठी आलेल्या एका सहकाऱ्याने मला विचारलं होत की  "तुम्हारे बीड मे कुछ धमाकेदार नही होता क्या,कुछ एक्सक्लुसिव्ह चाहीये,"मी सांगितले की जिल्ह्यात सहा महिने पाच लाख लोक स्थलांतरित होतात ,त्यांच्या समस्या बाबत स्पेशल अर्धा तासाची स्टोरी होऊ शकते,तेव्हा दिलेलं उत्तर मला आजही स्मरणात आहे ."टीव्ही चॅनेल पर जो बिकता है वो दिखता है"कुछ धमाकेदार होगा तो जायेगा नही तो नही जायेगा .
मी डोक्याला हात लावून घेतला,काय करणार दुसरं,इथं लोकांचे प्रश्न,त्यांच्या दैनंदिन अडचणी ,बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत कोणाला काही देणंघेणं नाही .श्रीदेवी चा मृत्यू झाला तेव्हा एका वृत्तवाहिणीच्या पत्रकाराने ती ज्या बाथ टबमध्ये शेवटच्या क्षणी होती तशा अवस्थेत बाथ टब मध्ये झोपून बातमी दिली होती .विशेष म्हणजे तब्बल 72 तासापेक्षा जास्त काळ त्या चॅनलने दुसरी कोणतीच बातमी दाखवली नाही .
कोरोनाच्या काळात सुद्धा वाहिन्यांनी जो बाजार मांडला तो पाहून कोरोना सुद्धा विचारात पडला असेल की आपण खरच एवढे भयावह आहोत का .सिनेसृष्टीत दबदबा असणाऱ्या अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यानंतर सुद्धा वृत्तवाहिन्यांनी जो काही अतिरेक केला तो अनाकलनीय होता .अमिताभ ला कोरोना झाला तर तो मोठा कोरोना अन चार महिन्यात राज्यात 130 पेक्षा जास्त पोलीस बांधव आणि 15 ते 20 पेक्षा जास्त डॉक्टर लोकांचा मृत्यू झाला तर तो कोरोना चिल्लर असच चित्र वाहिन्यांनी उभं केलं .कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असताना काही वृत्तवाहिन्यांचे सो कोल्ड संपादक आणि अँकर ओरडू ओरडू आणि घसा ताणून सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आपले गळे फाडत बसल्याचे चित्र मनाला विषण्ण करणारे आहे .
मी स्वतः या मीडियामध्ये काम केलं आहे मात्र मीडिया किंवा पत्रकारितेचे काही इथिक्स आहेत याचा कधी विसर पडू दिला नाही .चार महिने कोरोनाबाबत गळे फडणारे अन सुशांत प्रकरणात नको तेवढा इंटरेस्ट घेणारे हे चॅनेल चे पत्रकार राममंदिर भूमीपूजनाच्या दिवशी किंवा चीनने भारताच्या सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यावर किंवा  इतर वेळी कोरोना सुट्टीवर असल्यासारखे वागले .
देशाच्या दृष्टीने महत्वाची असेल अशा घटनेवर कितीही दिवस पाठपुरावा केला तरी काही वाटत नाही मात्र केवळ कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून किंवा कोणाची तरी मर्जी राखायची म्हणून कमरेच सोडून डोक्याला गुंडाळायच याला काय म्हणणार .आम्ही जे दाखवतो तेच सत्य आहे अन आम्ही म्हणू तसच तुम्ही करा असा जो अट्टाहास या वाहिन्यांवरून सुरू आहे तो किळसवाणा आहे .गेल्या चार महिन्यात देशात आर्थिक संकट निर्माण झालं,बेरोजगारी वाढली,अनेक कंपन्या बंद झाल्या ,शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत .मात्र याच्याशी या वाहिन्यांवर वटवट करणाऱ्यांना काहीच देणंघेणं नाही .
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात जो काही नंगानाच या काही लोकांनी चालवला तो पाहून कदाचित सुशांत स्वतः खाली येऊन आता बास करा अन दुसरे विषय लोकांसमोर मांडा अस म्हणला नाही म्हणजे मिळवलं .दूरचित्रवाणी संच जेव्हा भारतात लॉन्च झाला तेव्हा त्याला इडियट बॉक्स म्हणलं गेलं होतं ते आज खर होताना दिसत आहे .
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

पॉवर कंट्रोलर पवार ........!

 





पॉवर कंट्रोलर पवार .........!

बायको सरपंच किंवा नगरसेवक अथवा जिल्हा परिषद सभापती,एवढंच काय अध्यक्ष असेल तरी सगळा कारभार तिचा नवराच पाहत असल्याची हजारो उदाहरणे आपण रोज उघड्या डोळ्यांनी पाहतो मात्र मुख्यमंत्री म्हणून एक व्यक्ती अन फायनल डिसीजन मेकर म्हणून दुसरीच व्यक्ती असं पाहिलं नसेल कधी,मात्र हे पहायचं असेल तर महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर लक्ष दिल्यास हे स्पष्टपणे दिसून येईल .मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे बसले असले तरी निर्णय घेण्याचे अधिकार मात्र शरद पवार यांनाच असल्याचं चित्र सध्या दिसत आहे .राजकारणातील पतीराजांचा हस्तक्षेप थांबावा यासाठी महिला धोरणाचा पुरस्कार करणारे पवार मात्र आज पॉवर कंट्रोलर आहेत अस म्हटल्यास वावग ठरणार नाही .

महाविकास आघाडीच सरकार राज्यात येऊन आता आठ महिने होत आले आहेत,या काळात सरकार म्हणून काय चमकदार कामगिरी केली यापेक्षा एक गोष्ट अधिक तीव्रतेने जाणवली ती म्हणजे शरद पवार यांचा राज्य सरकारच्या निर्णयामधील हस्तक्षेप .विषय कोणताही असो पवार हेच रिमोट कंट्रोल असल्याचे वारंवार समोर आले आहे .कदाचित महाविकास आघाडी सरकारमधील पवार हे समन्वयक किंवा महाविकास आघाडीचे अध्यक्ष असावेत,त्यामुळे मंत्रालयातील प्रिन्सिपल सेक्रेटरी पासून ते थेट एखाद्या जिल्हाधिकारी पर्यंत सगळ्यांकडून पवार हे ब्रिफिंग घेत असल्याचे सध्या दिसून येत आहे .राज्यसभा खासदार असल्याने कदाचित त्यांना हे अधिकार असावेत .पण या सरकारचे कंट्रोलर शरद पवार आहेत हे मात्र नक्की .आता त्यांनी भविष्यात मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली नाही म्हणजे मिळवले .

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली अन सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप हा सत्तेपासून दूर राहिला .कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी काही सूत्र फिरवली की संजय राऊत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी भाजपची शिकार केली. हे करताना पवार यांनी काँग्रेस ला देखील आपल्या दावणीला बांधण्यात यश मिळवले .या त्यांच्या प्रयोगातून राज्यातील भाजप नेते आणखीनही सावरलेले नाहीत .

राज्यातील सरकार मध्ये कोणाला मंत्रिपद द्यायचे इथपासून ते अजित पवार यांचे बंड कसे मोडून काढायचे इथपर्यंत शरद पवार हेच लीड रोल मध्ये होते .पवारांनी या काळात आपली पन्नास वर्षांची राजकीय कारकीर्द अन डावपेच पणाला लावत भाजपला धक्का दिला .शिवसेनेत दुसऱ्याला मुख्यमंत्री पद दिल्यास बंडाळी होऊ शकते हे ओळखून पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पद घालण्यात यश मिळवले .अत्यंत शांत,सुस्वभावी हळू बोलणारे,विचारपूर्वक निर्णय घेणारे पण त्याच सोबत संघटन शक्ती मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे उद्धव ठाकरे हे देखील पवारांच्या गुगली ला समजू शकले नाहीत .ठाकरे सरकारचा राज्याभिषेक पार पडला अन शरद पवार यांनी सगळी महत्वाची खाती आपल्या पक्षाकडे घेत पहिला डाव टाकला .

त्यानंतर पहिल्या दिवसापासून शरद पवार यांचा राज्य सरकार मधील हस्तक्षेप सामान्य माणसाला देखील जाणवू लागला .एक दोन महिने होत नाहीत तोच कोरोनाच संकट देशासमोर उभं राहिलं आणि राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभे राहिले .या संकटातून बाहेर काढण्यासाठी पवार यांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली .सह्याद्री अतिथीगृह असो की सिल्व्हर ओक इथं पॅरालल बैठका घेण्याचा धडाका पवारांनी सुरू केला .

राज्याच्या बहुतांश सर्व खात्याचा आढावा पवार हे कोणत्या अधिकारात घेत होते हा प्रश्न विचारण्याची हिम्मत कोणातच नव्हती .कारण ज्या माणसांमुळे आपल्याला सत्तेची अन खुर्चीची ऊब मिळाली आहे त्याला जाब कसा विचारणार .पवार यांची खेळी यशस्वी झाली होती .सत्तेत प्रत्यक्ष कोणतंही पद नसताना ज्या पद्धतीने सोनिया गांधी यांनी दहा वर्षे केंद्र सरकारमध्ये युपीए सरकारवर नियंत्रण ठेवलं अगदी त्याच पद्धतीने पवार यांनी राज्य सरकारमध्ये सध्या लक्ष घातले आहे .

राज्यातील कोणताही निर्णय ,कोणत्याही खात्याचा विषय असो त्यावर पवार यांनी शेवटची मोहर उठवल्याशिवाय काहीच होत नाही हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे .कोरोनाच्या काळात आरोग्यमंत्री असणारे राजेश टोपे हे सुरवातीच्या काळात मीडियावर चांगलेच लोकप्रिय झाले मात्र अचानकच ते मीडियातून गायब झाले .याचे कारण ते स्वतः किंवा पक्षप्रमुख पवारच देऊ शकतील .पवार यांनी राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये पुढाकार घेतला असला तरी कोणत्या अधिकारात ते या बैठका अन निर्णय घेतात हे मात्र न उलगडणारे कोडे आहे .विशेष म्हणजे याबाबत ते एक काळजी नक्की घेतात की त्यांच्या बहुतांश बैठकांना कोणत्या ना कोणत्या खात्याचा मंत्री हजर असतो,म्हणजे उद्या कोणी आक्षेप घेतला तर राज्यसभा सदस्य म्हणून आपण हजर होतो अस म्हणायला पवार मोकळे .मात्र पवारांच्या या खेळी लहान लेकराला सुद्धा कळण्यासारख्या आहेत .

शरद पवार यांनी कोल्हापूर,पुणे,नाशिक,औरंगाबाद या ठिकाणी जाऊन गेल्या चार महिन्यात अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना देत सगळ्यांना कामाला लावले .काही दिवसांपूर्वी पुण्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत आढावा घेतला .कोरोना असो की अवकाळी झालेला पाऊस,एवढंच काय पण मध्यंतरी अजोय मेहता यांची पुन्हा नियुक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर बरेचशे सेक्रेटरी पवार यांना जावून भेटले अन मेहता यांच्याबाबत तोडगा काढण्याची आग्रही मागणी केली .प्रशासनातील मोठं मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यात देखील त्यांचा शब्द अंतिम असतो हे पोलीस दलातील बदल्यावरून जेव्हा तणाव निर्माण झाला तेव्हा समोर आले .

विधानपरिषद निवडणूक लागल्यानंतर देखील पवार यांचाच शब्द अंतिम असल्याचे स्पष्ट झाले .काँग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री आमची कामे करत नाहीत अशी नाराजी व्यक्त केल्यानंतर पवार यांनीच समज काढली होती .राज्याचे मुख्यमंत्री हे घराबाहेर पडत नाहीत मात्र मी स्वतः आढावा घेतो आहे हे चांगले नाही का असा सवाल त्यांनी स्वतः मध्यंतरी केला होता .

कोरोनाचा विषय असो की सुशांतसिंग राजपूत प्रकरण अथवा अगदी काल परवा पुढे आलेले कंगना राणावत प्रकरण,प्रत्येक ठिकाणी शरद पवार हेच पुढाकार घेऊन दिशा निर्देश देत असल्याचे दिसून आले आहे .पवार यांना प्रशासन आणि सत्तेचा मोठा अनुभव आहे हे मान्य आहेच पण त्यांच्या या सत्तेतील हस्तक्षेपामुळे राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .ठाकरे हे निर्णय घेण्यास सक्षम नाहीत की त्यांनी दिलेल्या आदेशानंतरही पवार यांची फायनल डिसीजन आवश्यक असते असे गेल्या सहा आठ महिन्यात वाटू लागले आहे .

राज्यसभा सदस्य म्हणून बैठकांना हजर राहण्याचा नक्कीच अधिकार पवार यांना असेल परंतु सगळी बैठक स्वतःच्या निर्देशानुसार घ्यायची,अधिकाऱ्यांना कामाला लावायचे हे कसे चालेल .उद्या आणखी एखाद्या राज्यसभा सदस्याने अशा पद्धतींने कारभार केला तर तो मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना चालेल का .राज्याचे पोलिस प्रमुख हे पवार यांना सकाळीच जाऊन ब्रिफ करतात,सगळ्या खात्यात काय काय सुरू आहे याची माहिती मंत्री तर देतातच परंतु अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून पवार हे देखील माहिती घेतात,याला कंट्रोलर नाही म्हणायचे तर काय म्हणायचे .

राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे प्रमुख म्हणून ते जर अशा पध्दतीने कारभार करणार असतील तर उद्या काँग्रेस किंवा शिवसेनेचे राज्यसभा सदस्य देखील बैठका घेतील मग हे पवार यांना चालेल का हे आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत .पवार यांनी सरकारच्या कामात किती हस्तक्षेप करावा आणि सरकारमध्ये बसलेल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांनी त्यांचे किती ऐकावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी पवार हे राज्यात एक नवे सत्ताकेंद्र निर्माण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सक्षम नाहीत यावर शिक्कामोर्तब करत आहेत हे सुद्धा ठाकरे यांना कळू नये का ?आणि कळत असूनही जर असेच चालू राहणार असेल तर बाहेर बसून सरकार चालवण्यापेक्षा पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी अन मग सगळा कारभार बिनबोभाट पणे हकावा, पण या पद्धतीने बाहेरून नियंत्रण ठेवून ते नेमकं काय साध्य करीत आहेत हे न उलगडणारे कोडे आहे .

महिलांना समान आरक्षण देण्याचं श्रेय शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतो कारण ग्रामपंचायत पासून ते महापालिका अगदी आमदारकी पर्यंत अनेक महिला निवडून आल्या तरी त्यांचा कारभार मात्र त्यांचे पतीराज च चालवत असत हे नेहमी समोर आले आहे .त्यामुळे पवार यांनी महिलांना सत्तेत समान वाटा देण्याचा निर्णय घेत पाळण्याची दोरी ते झेंड्याची दोरी असा सन्मान त्यांना मिळवून दिला कारण नवरोबा चा होणारा हस्तक्षेप त्यांना मान्य नव्हता .मात्र आज ते याच पद्धतीने कारभार करत आहेत याला काय म्हणायचे .म्हणजे आपण दुसऱ्याला शहाणपण शिकवायचे अन स्वतः मात्र मन मानेल त्या पद्धतीने वागायचे हे योग्य वाटत नाही .असो शेवटी पवार हे पॉवर मध्ये आहेत त्यामुळे सध्या ते जे करतील अन म्हणतील तीच पूर्वदिशा म्हणावी लागेल मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे हे नक्की .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड

9422744404

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

मित्र माने इत्र ............!



मित्र म्हणजे इत्र ..........!

अस म्हणतात की जी गोष्ट आपण आई वडील,भाऊ बहीण,गुरुजन यांना मनमोकळ्या पध्दतीने सांगू शकत नाहीत ती गोष्ट आपण सहजपणे ज्याच्याजवळ बोलून मोकळं होतो ती व्यक्ती म्हणजे मित्र .मी आणि इतर किंवा त्रयस्थ यांना जोडणारा म्हणजे मित्र .मित्र हा आरशासारखा असतो तुम्ही जे आहात,तुमच्यातले गुण दोष सगळं सगळं जसच्या तस दाखवतो,अन तो सावलीसारखा देखील असतो,जो कितीही कठीण प्रसंग येवो तुमची साथ सोडत नाही .
हा मित्र कोणत्याही वयाचा,कोणत्याही जाती धर्माचा,कोणत्याही वर्गाचा असू शकतो .मैत्रीला वयाच किंवा जाती धर्माच,गरीब श्रीमंती च बंधन नसतं. वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात शेजारी शेजारी काम करणारे दोघे चांगले मित्र असतीलच असे नाही .कारण एका क्षणात मैत्रीचे सूर जुळतात अन आयुष्याचे जीवणगाने गुणगुणायला सुरवात होते . मैत्रीला जस जात,धर्म,पैसा, संपत्ती याच बंधन नसतं तसच मैत्रीत लिंगभेदाला सुद्धा फार किंमत नसते .दोन पुरुष हे चांगले मित्र असतात तसेच स्त्री आणि पुरुष सुद्धा चांगले मित्र असू शकतात .
मैत्रीमध्ये नेहमी कृष्ण सुदम्याच उदाहरण दिलं जातं कारण या दोघांमधील सामाजिक अन आर्थिक अंतर हे पृथ्वी अन आकाश एवढं मोठं होतं पण म्हणून त्या दोघांच्या मैत्रीत कधी अंतर निर्माण झाले नाही .मैत्री ही कर्ण अन दुर्योधनाची देखील होती .जिथं स्वार्थ किंवा मतलब नसतो तिथंच मैत्रीची बीज अंकुरतात अन त्याला समाधानाची फुले अन फळे लगडतात .मैत्री हे अस झाडं आहे ज्याला केवळ दुसऱ्याच दुःख वाटून घेत आनंद पसरवणे माहीत असतं .
शक्यतो माणसाच्या आयुष्यात शालेय जीवनातील मित्र कायम स्मरणात राहतात किंवा त्या वयात जी मैत्री होते ती चिरकाल टिकते कारण त्या वयात माणसाला गरीब श्रीमंत, जात पात हे भेद माहीत नसतात .व्यवसाय किंवा नोकरीमुळे देखील अनेक मित्र जोडले जातात,मैत्रिणी जोडल्या जातात मात्र ते रिलेशन लिमिटेड असते,लहणपनी झालेली मैत्री अनलिमिटेड असते .या मैत्रीला कोणत्याही प्रकारे एक्सपायरी नसते .मनातला कोलाहल न सांगता सुद्धा ज्याला केवळ आपल्या डोळ्यातून किंवा हलचालीतून कळतो तो खरा मित्र असतो .या मैत्रीची अनेक रूपे आहेत .पृथ्वीवर असा एकही व्यक्ती नसेल ज्याला मित्र नाही .स्वार्थ अन परमार्थ यातील अंतर सहजपणे पार करून एका वेगळ्या भावविश्वात सुखद अनुभूती देणारा म्हणजे खरा मित्र .बर हा मित्र पैशाने विकत घेता येत नाही अन देता सुद्धा येत नाही .
मैत्री ही खळाळत्या झऱ्या प्रमाणे असते, त्याचा तळ स्पष्टपणे दिसतो अन चव देखील गोडच लागते .अडचणीत मदतीला येतो तोच खरा मित्र अस म्हणतात मात्र अडचणी येणारच नाहीत यासाठी छातीचा कोट करून उभा राहतो तो खरा मित्र अस मी मानतो .कारण अडचणी प्रत्येकाला असतातच त्यावर जो तो आपापल्या परीने मार्ग शोधून मात करतो पण यात मार्ग दाखवण्याच काम देखील एक सच्चा मित्रच करतो .
रक्ताची नाती ही जन्माने मिळतात तर मानलेली नाती मनाने जुळतात मात्र जिथं रक्त अन मान दोन्ही वेगळं असूनही सूर जुळतात, मन जुळतात ती नाती म्हणजे मैत्री होय .कोणी कितीही मोठ्या पदावर,हुद्यावर गेला तरी त्याला भेटल्यानंतर एक सणसणीत शिवी तोंडातून बाहेर पडते अन गच्च मिठीत घेतल्यावर सगळ्या तक्रारी दूर होतात तो असतो मित्र .मैत्रीत अहो जाओ, आपपर भाव नसतो,थेट काळजाला हात घालणारी अरे तुरे ची साद असते .हजार शत्रूशी सामना करण्यासाठी एक सच्चा मित्र खूप झाला .बुडत्याला काडीचा आधार अस जे म्हणतात त्याच पद्धतीने रोजच्या जगण्या मरण्यांच्या रेसमध्ये जो खंबीरपणे सोबत उभा असतो,ऊन वारा वादळ भूकंप काहीही होवो जो आपला हात सोडत नाही तो खरा मित्र .
आयुष्यात जेव्हा केव्हा अडचणी येतात ,आयुष्याची चार्जिंग संपत जाते ,नात्याचे चार्जर जेव्हा काम करत नाही तेव्हा पॉवर बँक बनून जो मदतीला धावून येतो तो म्हणजे मित्र .या मैत्रीच्या अनेक कथा कहाण्या आहेत पण आयुष्याच्या स्क्रिप्ट मध्ये अथ पासून इति पर्यंत जो सोबत असतो ना तो म्हणजे मित्र होय .
मित्र माने इत्र असंही काहीजण म्हणतात,कारण ज्याच्या सहवासाने आपलं आयुष्य दरवळून  जात तो म्हणजे मित्र .या मित्रामुळे आपल्या बेचव आयुष्याला एक खमंगपणा येतो,ज्याप्रमाणे कितीही सुगरण स्त्रीने अतिशय सुंदर स्वयंपाक केला पण त्यात मिठच नसेल तर तो स्वयंपाक बेचव लागतो तसच आयुष्यात मित्र नसेल तर आयुष्य निरस, बेचव होतं .मित्र म्हणजे ऑक्सिजन आहे,माणसाचा श्वास थांबू न देण्याच काम ऑक्सिजन करतो तसच आपल्या आयुष्यात कधीच कोणतीच बाधा येऊ नये यासाठी मित्र धडपडत असतो . मोबाईल अन इंटरनेट च्या जमान्यात आज जो तो धावपळीत अन घाईगडबडीत आहे मात्र अशाही वेळी एक निवांत क्षण,किंवा एक विसाव्याच ठिकाण म्हणजे मित्र होय .या मित्रांसाठी एक दिवस निश्चितच पुरेसा ठरणार नाही,ज्याने आपल्या आयुष्यात अविभाज्य अशी जागा मिळवली आहे त्याला एक दिवस शुभेच्छा देऊन कसे भागेल .तरीही आजच्या मैत्री दिनानिमित्त माझ्या सर्व मित्रांना सस्नेह शुभेच्छा !

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404




शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

आठवणीतला पाऊस .........!

आठवणीतला पाऊस ..........!

लक्ष्मीकांत रुईकर ,बीड

9422744404

मित्रा वर्षातले आठ महिने मी तुझी वाट पाहत असतो,का म्हणून काय विचारतोस वेड्या,तू आलास की ती माझ्याजवळ येऊन घट्ट मिठीत विसावते,अरे हो खरच सांगतोय,हसू नकोस लबाड,तुझी शपथ,तू आलास ना की तुझ्या प्रत्येक थेंबात मला तिची आठवण ओलं चिम्ब करते,आमच्या प्रेमाचा पहिला वहिला साक्षीदार आहेस तू,मी असाच एकट्याने रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक तू आलास अन ओला चिम्ब होत मी तुझ्याशी गप्पा मारत मारत मनमुराद भिजलो,अस म्हणतात की पावसात भरपूर रडून घेतलं तरी चालत कारण आपले अश्रू दुःख कोणाला दिसत नाही,पण हे त्या दिवशी साफ खोटं ठरलं,जेव्हा तू धो धो कोसळत होतास,मी मनमुराद भिजत होतो अन मनातलं दुःख लपवत होतो,तेव्हा एक गोड आवाज कानावर आला अन अचानक भानावर आलो तेव्हा लक्षात आलं की कोणीतरी पाठीमागून मोठ्याने आवाज देत आहे,अरे वेड्या तो आवाज अनोळखी होता,मात्र त्यात आपलेपणा होता,अन मी वळून पाहिल्यानंतर पडत्या पावसात सुद्धा कोरडाठाक झालो,कारण जिला रोज स्वप्नात पहात होतो,ती माझी सखी माझ्यासमोर उभी होती,अन माझ्या हाताला धरून मला तुझ्यापासून दूर नेत होती
तुही किती खट्याळ मित्रा,काहीवेळ विश्रांती घेतलीस अन जणू काही मला इशारा केलास की जा आता उद्या भेटू
आजही आभाळकडं नजर गेली की तू आठवतोस कारण आमच्या पहिल्या भेटीचा साक्षीदार होतास तू,मित्रा आयुष्यात तो दिवस अन त्या दिवशीचा तू कधीच नाही विसरू शकत मी,त्यामुळंच म्हणतो जेव्हा जेव्हा तू येतोस तेव्हा तेव्हा ती मला बिलगून असते अन आम्ही दोघंही पुन्हा तुला अन त्या दिवशीच्या भेटीला आठवत रमून जातो

मंगळवार, २८ जुलै, २०२०

संतोष हे पटलं नाही ...............!


संतोष ,हे पटलं नाही ..........!!

पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोबाईल हातात घेतला अन धक्काच बसला,गेवराईचा पत्रकार ,जिवलग मित्र संतोष भोसले याच्या अकाली निधनाची बातमी वाचली अन दोन मिनिटं पायाखालची जमीन सरकली .खर्जातला जाडा भरडा भारदस्त आवाज,आपल्याच ठेक्यात जय महाराष्ट्र म्हणण्याची पद्धत,बातमी मागची बातमी शोधून त्यावर वैचारिक चर्चा,राजकारण ,समाजकारण,साहित्य याबाबतीत असलेला अभ्यास या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर तरळून गेल्या.
संतोष म्हणजे समाधान ,सुख,शांती या सगळ्या गोष्टीसोबत जिज्ञासा असणारा व्यक्ती म्हणजे गेवराईच्या पत्रकारितेतील एक आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व संतोष भोसले .
संतोष पत्रकार असला तरी तो बाळासाहेब ठाकरे यांचा एक सैनिक म्हणूनच जगला,ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारा हा सैनिक आयुष्याचा सामना मात्र अर्ध्यातच सोडून मृत्यूसमोर शस्त्र खाली ठेवत निघून गेला हे खूप क्लेशदायक आहे .संतोष अन माझा स्नेह तसा वीस वर्षापासूनचा .गेवराईच्या पत्रकारिता क्षेत्रातील मित्र अय्युब बागवान,सुभाष सुतार,मधुकर तौर,सुभाष मुळे, गणेश क्षीरसागर, काझी अमान् या सगळ्यांमध्ये वेगळा असलेला संतोष लगेच लक्षात यायचा .
आपलं मत अत्यंत स्पष्टपणे मांडून प्रसंगी समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करून संतोष आपला मुद्दा त्या व्यक्तीच्या गळी उतरवायचा ही त्याची खासियत होती .बातमी मग ती गेवराईची असो की राज्य अथवा राष्ट्रीय पातळीवरील ,त्याच्यासोबत चर्चा करायला एक वेगळी मजा यायची,प्रत्येक बाबतीत चांगला,वाईट,बाजूने विरोधात विचार करून तो आपलं मत मांडायचा .
कधीही भेट झाली की भारदस्त आवाजात जय महाराष्ट्र घालून काय सर सेवेची संधी द्या,गरीबासोबत चार घास खा असं हक्कानं म्हणून खळखळून हसत आयुष्याची मजा घेणारा संतोष असा अचानक निघून गेला हे बुद्धीला अजूनही पटत नाही .गेवराईत एखादी घटना घडली की बातमी मागची बातमी काय असेल याची खबरबात जाणून घ्यायची असेल तर संतोष ला फोन केला की आपल्या खास शैलीत तो नेमकं का,कसं, कुठं,कधी घडलं हे सांगायचा .
गेवराई तालुक्यातील दोन्ही पंडित अन पवार यांच्यातील राजकीय वैरभाव असो की इतर कोणताही विषय हा माणूस अथ पासून इति पर्यंत खडा न खडा माहिती ठेवून असायचा .त्याची अन माझी भेट सुभाष सुतार सोबत बीडमध्ये व्हायची .ते दोघे आजही अगदी अलीकडच्या काळापर्यंत बीडमध्ये आले की माजीमंत्री  सुरेश नवले यांची भेट घेतल्याशिवाय जात नसतं .
एक वेगळं रसायन होता संतोष,अत्यंत लाघवी स्वभाव,आपलंसं करण्याची कला अवगत असलेला हा पत्रकार त्याच्या अनेक शोध बातम्यांमुळे प्रकाश झोतात आला मात्र त्याचा माज कधी त्याच्या वागण्या बोलण्यातून जाणवला नाही .राजकारणी असो की समाजकारणी प्रत्येक व्यक्तीसोबत त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते .पत्रकारितेत नव्याने आलेल्या तालुक्यातील अनेक पत्रमित्रांचा तो हक्काचा मामा होता .

सामना सारख्या हिंदुत्ववादी दैनिकात वार्ताहर म्हणून काम करीत असताना सुद्धा सर्वपक्षीय नेते अन कार्यकर्ते यांचा तो जवळचा अन लाडका होता .कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर त्याने यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत लेख देखील लिहिला होता अन आज तोच मित्र कोरोनाच्या धास्तीने अचानक सोडून गेला .आयुष्याचा सामना धीरोदात्तपणे अन छातीठोकपणे उभं राहून लढायचा असतो अन जिंकायचा असतो हे इतरांना सांगणारा हा अवलिया मित्र आज मात्र स्वतःच अचानक निघून गेला अन आम्हा पत्रकारांनाच नव्हे तर गेवराईतील अनेकांना पोरकं करून गेला .मित्रा तुझं हे असं अचानक जाणं मनाला काही पटलं नाही बघ .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड.
9422744404


सोमवार, १५ जून, २०२०

लोड लेनेका नही देनेका ..........!



लोड लेनेका नही देने का ..........!

अस म्हणतात की जन्म आणि मृत्यू या दोनच गोष्टी माणसाच्या हातात नाहीत बाकी सगळं त्याच्या आवाक्यात आलं आहे,मात्र 21 व्या शतकात माणूस टेस्टट्युब बेबी च्या माध्यमातून जन्म अन आत्महत्येच्या माध्यमातून मृत्यू देखील आपल्या हातात ठेवण्यात यशस्वी झाला आहे,सुशांत ने केलेल्या आत्महत्येच्या प्रकारानंतर हे प्रकर्षाने जाणवू लागल आहे .मृत्यू मग तो नैसर्गिक असो की अनैसर्गिक तो चटका लावूनच जातो मात्र सुशांत सारख्या सेलिब्रिटी ने मरणाला कवटाळण जास्त वेदना देऊन  जातं. माणसानं दगडाशी का होईना पण बोललं पाहिजे अन आपलं मन मोकळं केलं पाहिजे हे तितकंच खरं आहे .

अवघ्या 30 -35 वर्षाच्या आयुष्यात सुशांत सिंग राजपूत इतका कंटाळला की त्याने अचानक एक्झिट घेतली .मोठे तितके खोटे अन जया अंगी मोठेपण तया यातना कठीण अस जे म्हणतात ते या घटनेने पुन्हा एकदा तंतोतंत खर ठरलं .लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा अस आपले आई बाप सांगतात ते काही खोटं नाही .चंदेरी दुनियेतील झगमगाट हा डोळ्यांना दिपवून टाकतो मात्र या झगमागटामागे किती काळ सत्य दडलेलं असत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं .
सुशांत सिंग राजपूत असो की भैयु महाराज अथवा मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी हिमांशू रॉय ,काय नव्हतं या लोकांजवळ, ऐश्वर्य म्हणजे काय असतं हे या लोकांकडे पाहिल्यावर कळतं, मात्र तरीही हे लोक आयुष्याला कंटाळले,प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतील ,मात्र आयुष्यात कोणत्याही अडचणींवर मात करता येत नाही अस नाही,पण तरीदेखील या लोकांनी आत्महत्या सारखा निर्णय घ्यावा म्हणजे खूप वाईट आहे .
माणूस जन्मल्यापासून तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेला असला किंवा आठरविश्व दारिद्र्य घेऊन जन्मलेला असो .अडचणी प्रत्येकाच्या नशिबात येतातच,अडचणी संकट नसली तर आयुष्य बेचव होईल .
सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच आयुष्याचा प्रवास करावा लागतो .ज्या अभिनेत्याने रील लाईफ मध्ये आत्महत्यापासून कस दूर राहायचं हे शिकवलं अन दाखवलं त्यानेच मृत्यूला कवटाळण योग्य नाही वाटत .एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी ला जवळच अस कोणीच नसावं हे केवढ दुर्दैव आहे .सुशांत असो की भैयु महाराज यांनी आपल्या क्षेत्रात लोकांना जगण्याची नवी उमेद शिकवली,त्यांच्या आदर्शावर अनेकजण आयुष्यात स्थिर झाले असतील मात्र याच लोकांनी असा निर्णय घेणे हे बुद्धीला पटत नाही .

आयुष्याच्या पटावर आपण प्यादेच असतो मात्र आपण वजीर म्हणून खंबीरपणे पाय रोवून उभं राहिल्यास येणारी संकट दूर करून संकटावर मात करता येते .हे साध गणित या सेलिब्रिटी लोकांना माहीत नसावं हे किती अवघड आहे .कितीही संकट आली तरी मनाने खंबीर असलेला माणूस शेवटपर्यंत संघर्ष करतो अन सुखाच्या शोधात शेवटपर्यंत राहतो अन जगतो .मात्र सुशांत सारखे लोक जर इतक्या लवकर हार मानणार असतील तर त्यांना फॉलो करणाऱ्या लोकांनी काय करायचं हा प्रश्नच आहे .
आत्महत्या हा उपाय असू शकत नाही,कारण माणसाला नेहमी अडचणी येतातच,नव्हे अडचणी आल्याशिवाय जगण्यात मजाच नाही मग या अडचणी आल्यावर त्यांना तोंड देण्यापेक्षा तो पळवाट का शोधतो हा संशोधनाचा विषय आहे .सुशांत हा सेलिब्रिटी आहे म्हणून त्याच्या मृत्यूवर अनेकांनी हळहळ व्यक्त केली मात्र देशात रोज शेकडो शेतकरी मरणाला कवटाळतात त्याबाबत कोणाला काही वाटत नाही अशा पोस्ट वाचण्यात आल्या,ते बरोबर आहे .मात्र सुशांत सारखे लोक चंदेरी दुनियेत असल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे म्हणून सोशल मीडियावर जास्त हळहळ व्यक्त झाली .याचा अर्थ शेतकऱ्यांची आत्महत्या कमी अन सुशांत सारख्या सेलिब्रिटी ची मोठी असा होत नाही .पण सोशल मीडियावर कोणी काय अन कस व्यक्त व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .
माणसाच्या आयुष्यात एक तरी जागा किंवा मित्र मैत्रिण अशी असावी की जिथं आपल्याला आपलं मन मोकळं करता येईल,एक तरी खांदा असा हवा की त्यावर आपलं डोकं ठेवून धायमोकलून रडता येईल .पण सिमेंट काँक्रीट च्या या जंगलात शहरं वाढली अन माणुसकी,आपुलकी,जवळीकता ,संवेदनशीलता कमी झाली .फ्लॅट संस्कृती मुळे माणसाची वृत्तीदेखील संकुचित झाली अन त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले .रोज कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणावरून आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात .अगदी टीव्हीवर कार्टून पाहू दिलं नाही म्हणून एका लहानग्यांन दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली,परीक्षेत अपयश आल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या असोत की प्रेम भंगातून होणारे मृत्यू,अथवा कर्जबाजरी पणाला कंटाळून होणाऱ्या आत्महत्या असोत,जीवन खूप सुंदर आहे,मात्र त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे याचा विसर या लोकांना पडतो अन मग हे अस पाऊल ते उचलतात .

माणसाकड दोन वेळच भागेल एवढाच पैसा असावा अस नेहमी म्हंटल जात मात्र मनुष्य स्वभावानुसार तो गाडी,घोडी,घरदार,जमीन जुमला यासाठी मरमर करतो अन जाताना मात्र फुटका मनी तोंडात घेऊन जातो,हे सगळं माहीत असून सुद्धा माणूस पैशाच्या मागे धावतो हे किती मोठा दुर्दैव आहे .माणूस आपल्या स्वतःकड बघून  जगण्यापेक्षा दुसऱ्यासोबत स्पर्धा करण्यात धन्यता मानतो अन मग त्याचा शेवट दुर्दैवी होतो .

येताना नागवा अन जातानाही नागवच जाव लागतं मात्र तरीही आपण नेहमी दुसऱ्याच्या संपत्तीकडे पाहतो,अगदी भाऊ भाऊ असो,बहीण भाऊ असो की बाप लेक, जावा जावा ,प्रत्येकजण दुसऱ्याच्या ताटात काय अन किती आहे हे पाहण्यात तो आपल्या ताटाकड अन पोटाकड दुर्लक्ष करतो .किती लागत हो जगायला,दिवसभरात चार पोळ्या,भाजी किंवा चटणी,पण माणूस दुसऱ्याच्या नादात स्पर्धा करण्यासाठी म्हणून नको तेवढं कमवायच्या मागे लागतो अन मग नाही भेटलं की मरणाला कवटाळतो .
त्यामुळं एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे की मनुष्य जन्म एकदाच मिळतो त्यामुळे भेटलेल आयुष्य सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झोका घेत घेत जगायचं,कितिही मोठं संकट आलं, दुःख वाट्याला आलं,तरी हे आपल्या नशिबाचे भोग आहेत अस म्हणून सगळं काही नशिबाच्या माथी मारून मोकळं व्हायचं .लोड लेनेका नही देने का हे कायम लक्षात ठेवल्यास अशक्य अस काहीच नाही.तेव्हा खचून न जाता धैर्याने जगा अन आलेल्या परिस्थितीला तोंड देत आयुष्याचा प्रवास सुखाचा करा .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

शुक्रवार, १२ जून, २०२०

डी एम गेट वेल सून ...........!


डी एम गेट वेल सून ..........!
धनंजय मुंडे हे नाव आज राज्यातील कानाकोपऱ्यात परिचित झालं आहे ते त्यांच्या भाषणामुळे अन दांडग्या जनसंपर्कामुळे .तब्बल सहा सात वर्षांपूर्वी स्व गोपीनाथ मुंडे यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर ते टीकेचे धनी झाले,अगदी त्यांना खलनायक म्हणून काही वर्षे टिका सहन करावी लागली,मात्र कोशीष करनेवाले की हार नही होती हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ते लढत राहिले अन आज राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे .आयुष्यात कायम संघर्ष वाट्याला आलेल्या धनंजय यांना आता कोरोनाशी दोन हात करावे लागणार आहेत, मात्र नेहमीप्रमाणे ते कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा जनसेवेत रुजू होतील हे नक्की .
धनंजय मुंडे म्हणजे ग्राऊंडवरचा गडी, कायम लोकांत राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेला नेता म्हणून आज त्यांची राज्यभर ओळख आहे .रात्री अपरात्री कधीही ,कोणीही फोन केला तरी ते हजर असतात .आपले काका गोपीनाथ मुंडे आणि भाजपनेते प्रमोद महाजन यांच्याकडे बघून मोठे झालेले धनंजय यांच्या बोलण्यात मुंडे महाजन यांची छाप कायम जाणवते .
गोपीनाथ मुंडे म्हणजे आपले राजकीय गुरू अस मानून या एकलव्याने त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात जिल्हा परिषद पासून सुरवात केली .आज ते राज्याच्या मंत्रिमंडळात मानाच्या स्थानावर आहेत .
बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांना सोडल्या नंतर धनंजय हे टीकेचे धनी झाले,त्यांच्या समाजातच नव्हे तर राज्यात ते खलनायक ठरले .राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी टाकत गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर उभं केलं .धनंजय यांनीदेखील आपल्या पदाची प्रतिष्ठा राखत पदाला न्याय दिला,मात्र यावेळी त्यांच्यासमोर होत्या बहीण पंकजा मुंडे .ग्रामपंचायत असो की विधानसभा, लोकसभा प्रत्येक निवडणुकीत या बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली राज्याने याची देही याची डोळा पाहिलं आहे .गेल्या पाच वर्षात पंकजा आणि धनंजय यांच्यातील राजकीय वैरभाव अधिक गडद झाला,बहिणीच्या खात्यातील भ्रष्टाचार बाहेर काढताना धनंजय यांनी आरोपांच्या ज्या फैरी झाडल्या त्यामुळे नात्यातील कटुता अधिकच वाढली .मात्र तरीही ते मागे हटले नाहीत .प्रत्येकवेळी दोघेही एकमेकांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नव्हते .
धनंजय म्हणजे एक शापित राजकुमार अस बोललं जायचं,कायम संघर्ष आणि तोही रक्ताच्या नात्याशी,त्यामुळे वेळप्रसंगी ते अनेकदा भावुक अन व्यथित होत असलेल अनेकांनी पाहिलं आहे,तसच बहीण पंकजा यांच्याबाबतीत सुद्धा घडत होतं,मात्र दोघांचे पक्ष अन विचार वेगळे असल्याने संघर्ष योगायोगाने व्हायचाच, पण त्यामुळे राजकीय गणित मात्र अनेकदा बदलेली पाहिली गेली .
बहीण भावाच्या या संघर्षात कार्यकर्ते देखील भरडून निघाले,धनंजय यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले मात्र आगीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय जस सोन्याच मोल कळत नाही तसेच त्यांच्याबाबतीत सुद्धा झालं .लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था असो की बीड लोकसभा निवडणूक प्रत्येकवेळी धनंजय याना राजकीय मात देण्यात पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या, मात्र या पराभवामुळे खचून न जाता धनंजय मुंडे यांनी त्यातून प्रत्येकवेळी एक नवा धडा घेत आपली लढाई सुरू ठेवली .
परळी विधानसभा निवडणुकीच्या काळात पंकजा मुंडे यांचा पराभव होईल हे कोणालाच अपेक्षित नव्हते .कारण लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना दीड लाखापेक्षा अधिकचे मिळालेले मताधिक्य .मात्र प्रत्येक निवडणुकीची गणित ही वेगळी असतात,त्यामुळे मागच्या अनुभवातून शिकून पुढे जायचे असते,पराभवाने खचून अन विजयाने उन्मादुन न जाता संयमाने वाटचाल करायची असते हा धडा त्यांनी गिरवला होता,त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झाला .धनंजय मुंडे यांचा थेट असलेला जनसंपर्क त्यांना या निवडणुकीत कामाला आला अन त्यांनी विजयाची पताका फडकावली .
महाविकास आघाडीच्या सरकार पूर्वी मुंबईत ज्या घडामोडी घडल्या त्यातही धनंजय मुंडे हे टीकेचे धनी झाले .अजित पवार यांच्याशी असलेलं सख्य त्यांच्या टिकेसाठी कारणीभूत ठरले .मात्र त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली .सामाजिक न्यायमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी गरीब कल्याणासाठी काम सुरू केलं .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तळ ठोकून बसलेल्या धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले,यासह जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांनी प्रशासनाला कामाला लावले .कोरोना असताना देखील लोकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते कायम कार्यरत होते .मात्र मुंबईत गेल्यानंतर ते स्वतःच कोरोना बाधित झाले अन पुन्हा त्यांच्या संघर्षाची आठवण लोकांना झाली .
कोरोना हा आजार झालेले मुंडे हे महाविकास आघाडी सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत .त्यांना फार लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्या स्वास्थ्यासाठी समर्थकांनी पूजा,प्रार्थना सुरू केली आहे,कायम लोकांत रमणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्यांसाठी कार्यकर्ते चिंतेत पडले आहेत .या अशा काळात कोण आपला अन कोण परका  हे कळतं .धनंजय यांचा दांडगा जनसंपर्क पाहता आणि लढण्याची इच्छाशक्ती पाहता ते या संकटावर सुद्धा लीलया मात करतील यात शंका नाही .ते लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू होतील ही अपेक्षा आहे .जनसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या संघर्ष योध्याला प्रकृती स्वास्थ्यासाठी अन जनसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा !
लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...