बुधवार, १९ जून, २०१९

पावसाला पत्र ..............!

आम्हाला माहीत आहे तू आमच्यावर रुसला आहेस,आमच्या अक्षम्य अशा चूका झाल्या आहेत,अरे पण तू लेकरं म्हणतोस ना आम्हाला मग लेकरं चुकली तर त्याची एवढी मोठी शिक्षा द्यायची असते का रे.आम्ही तुला कधी गांभीर्याने घेतलंच नाही रे,तू सहज यायचास,बागडायचास,वाडी वस्ती असो की सिमेंट काँक्रीट ची मोठं मोठी जंगल,तू कधी अजेदुजे पणा केला नाहीस,प्रत्येकासाठी तू सारखाच होतास.गरीबाच्या झोपडीत सुद्धा तू तितकाच आनंद द्यायचास अन राजमहालात सुद्धा तसाच खेळायचास.
मग अचानक मागच्या काही वर्षात तुझं कुठं बिनसलं हेच कळायला मार्ग नाही.दरवर्षी तू न चुकता हजेरी लावायचास. अंगाची लाही लाही करणारं ऊन जेव्हा होरपळून काढायचं तेव्हा आम्हाला तुझ्या आगमनाची आतुरता असायची.माग पुढं होईल पण तू जरूर जरूर येणार ही खात्री असायची आम्हाला .
अरे ए 'पावसा' बस कर ना आता तुझा हा शिवणापाणीचा खेळ.किती छळणार आहेस,सगळीकडं स्मशान शांतता आहे रे,जो तो तुझ्या आगमनाकडं डोळे लावून बसलाय .कधी एकदा येतोस अन आमचं शेत शिवार,अंगण,नद्या नाले,ओढे भिजवून टाकतोस अस झालंय आता .
अरे एवढी विनवणी आम्ही प्रत्यक्ष देवाला जरी केली असती तरी तो ही प्रसन्न होऊन आमच्यासमोर आला असता पण तू इतका निष्ठुर झालास की तुला पाझरच फुटेना झालाय .
आमच्या आजी आजोबांच्या काळात  मिरगाच्या सुरवातीलाच तू यायचास.अगदी तू आला म्हणजे मिरग सुरू झाला अस समीकरण झालं होतं .त्याकाळात तू धो धो बरसायचास,अगदी नंतर नंतर नको नको वाटायचास,पण तू आपला रतीब पूर्ण केल्याशिवाय कधीच थांबायचा नाहीस .तो काळ आम्हाला आता पुसटसा आठवतो कारण पिढी बदलली की घडी बदलते अस म्हणतात तसाच तुही बदललास पण इतका बदलशील अस वाटलं नव्हतं रे .अगदी एखाद्यानं मोठ्या हौसेनं लव्ह मॅरेज करावं अन पहिल्याच रात्रीला ब्रेकअप व्हावं अस काहीस तुझं झालं आहे .आम्ही तुझ्या माग लागलोय,तुझी आतुरतेने वाट पाहतोय पण तू मात्र रुसलेल्या बायकोप्रमाणे फुरंगुटुन बसला आहेस .
अरे यार आमच्या चूका झाल्या ,आम्ही झाडं तोडली,जंगल नष्ट केली अन सिमेंट काँक्रीट ची जंगलं उभारली .आम्ही एवढे आपलपोटे झालो की तू यावं अस वातावरणच ठेवलं नाही .पूर्वी ज्या हिरव्यागार गालिचा वरून तू यायचास तो गालिचा नष्ट आम्हीच केलाय हे देखील आम्ही जाणतो पण चुकतो तो माणूसच ना .जे काहीच काम करत नाहीत त्यांच्याकडून चूका होणारच नाहीत .आम्ही चुकलो त्याबद्दल आम्हाला खूप लाज वाटते आहे,आम्ही आता शतकोटी वृक्षलागवड सुरू केली आहे,यातून किती झाडं लागतील अन जगतील हे तुलाही माहीत आहे पण काहीच नसल्यापेक्षा काहीतरी करीत आहोत ना रे, त्याला काही मार्क देणार की नाही तू ,गेल्या काही वर्षात औषधालासुद्धा झाडं दिसत नाहीत ही म्हण आमच्यामुळेच आणि आमच्या अप्पल पोटे पणा मुळंच रूढ झालीय याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे रे,पण म्हणून तू एवढा सूड उगवायचा हे बरं नव्ह रे .
जिथं जिथं म्हणून मोकळी जागा दिसेल तिथं तिथं आम्ही घर,दार,माड्या, इमारती उभारल्या,त्यामुळं तू आमच्यावर रुसलास .सरकार मग ते कोणतंही असो त्यातही माणसंच काम करतात ना ,त्यांनी आपलं पोट भरण्यासाठी विकासाच्या नावाखाली नद्या,नाले ,ओढे गिळंकृत केले.टेकड्या पोखरून काढल्या,जंगल भुईसपाट केली त्यामुळं व्हायचं तेच झालं अन तू आमच्यावर कोपलास. बरं तुला बोकड,कोंबड्या चा नेवैद्य दाखवावा म्हणलं तर तू त्यालासुद्धा तयार होईना .तुझं आपलं एकच,तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वागलात ना आता "मेरी मर्जी "म्हणत तू दडून बसलास .
अरे मित्रा राग नको मानू पण अलीकडच्या इंग्रजाळलेल्या संस्कृतीनुसार आम्ही बापाला मित्र म्हणू लागलो आहोत त्या अधिकारातून तुला मित्र म्हणलो .तर मित्रा अडीअडचणीला मदतीला धावून येतो तोच खरा मित्र अस आम्ही पुस्तकात वाचलं होतं त्याला तरी जाग अन ये बाबा एकदाचा जोरात . पूर्वी कसा तू अगदी न चुकता ठरलेल्या वेळेला यायचास आता मात्र तू आवसा पुनवेला सुद्धा येशील की नाही याचा भरवसा राहिलेला नाही .
आम्ही झाडं तोडली,जंगल संपवली,गगनचुंबी इमारती उभारल्या हे सगळं आम्हाला मान्य आहे मात्र आम्ही तुला कायम घरातलं मानलं आहे रे,तू आमच्या कवींचा,लेखकांचा आवडीचा आहेस,अगदी कालिदास असोत की तानसेन अथवा ग्रेस किंवा भीमसेन बुवा, अगदी अलीकडच्या काळातील स्वप्नील बांदोडकर असो की संदीप खरे प्रत्येकाने तुला त्यांच्या त्यांच्या नजरेतून पाहिलं आहे,चितारल आहे,शब्दबद्ध केलं आहे,पहिला पाऊस अन मातीचा सुगंध आजही आमच्या रोमारोमात एक वेगळी नशा निर्माण करतो हे सगळं कसं विसरलास तू .कोणतीही प्रेम कविता असो की प्रियकर-प्रियसी च पहिल्यांदा भेटणं असो तू कायम आमच्या हक्काचा वाटला आहेस आम्हाला .प्रत्यक्ष देवावर सुद्धा जेवढं लिहिलं गेलं नसेल तेवढं आम्ही तुझ्यावर लिहिलं,ऐकलं, चितारल आहे रे,हे सगळं आम्ही तुझ्यावर प्रेम आहे,तू हक्काचं आहेस,तुझ्याशिवाय आमचं जगणं अवघड आहे या जाणिवेतूनच आम्ही केलं ना रे .मग आमच्यातल्याच काही स्वार्थी लोकांनी तुझ्या वाटेत सिमेंटची जंगल उभारून हिरव्या गार गालिचा ऐवजी काटे पेरले असतील तर तू मूठभर लोकांमुळे आम्हा सगळ्यांना का असा त्रास देतो आहेस .
तू अवखळ आहेस,लडिवाळ आहेस,गोजिरवाणा आहेस म्हणून तर आम्हाला आवडतोस.अनेक महिन्याचा दुष्काळ तू एका क्षणात दूर करू शकतोस हा विश्वास आहे आम्हाला .तरीसुद्धा तू यंदा जरा जास्तच कोपला आहेस की रे .जिथं नको तिथं बेफाम होऊन बरसतोस अन जिथं गरज आहे तिथं तरसवतोस ,हे वागणं काही बरं नाही गड्या .आमची लेकरं कॉन्व्हेंट मधून " रेन रेन गो अवे " म्हणत असली तरी देखील तुझी चाहूल लागताच त्यांच्या तोंडी आजही "ये रे ये रे पावसा,तुला देतो पैसा "हेच बोल येतात रे .आम्ही यंदापासून तुला शब्द देतो की तू जर वेळेवर येणार असशील तर आम्ही सुद्धा यावेळपासून तुझ्या स्वागताला हिरवागार गालिचा तयार करण्यासाठी झाडांची लागवड अन संगोपन करू .
आता एवढंच सांगून थांबतो अन हात जोडून विनवणी करतो ये रे येरे पावसा,तुला देतो पैसा, ये रे येरे पावसा .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

सोमवार, १७ जून, २०१९

अव्यक्त ती ..............!

बऱ्याच दिवसांनी नव्हे तब्बल दोन अडीच महिन्यांनी आज तीच दर्शन झालं,कस आहे ना,की कोणतीही व्यक्ती असो,वस्तू असो,प्राणी असो आपल्याला त्याच्या सहवासाची सवय जडली ना की भेट नाही झाली तर अस्वस्थ होतं, तसच काहीस तीचंही झाल्याची मला जाणीव झाली .
कधी नव्हे ते आज मी आवरून सावरून लवकर उठून तिच्याकडे जायचं ठरवलं,लेकर सुद्धा होते सोबत,खरतर त्यांच्यामुळेच मला तिची रोजची सवय झाली होती,आज तिच्याकडे जात असताना वाटेत लागणारी झाड,वेगवेगळी दुकानं, त्यावरील पाट्या,गतिरोधक,एवढच काय तर रस्ता देखील मी तिच्याकडेच चाललोय या कल्पनेने मोहरून गेल्याची जाणीव मला क्षणोक्षणी होत होती .
बरं तीला भेटायचं म्हणजे वेळेच भान अन बंधन ठेवावं लागतं हे नक्की .उग आपलं उठलं की सुटलं तिला भेटलं अस चालत नाही .तब्बल अडीच महिन्यांचा विरह काय असतो हे तिच्या पहिल्याच शब्दातून मला जाणवलं ।
"अरे आलास का,काय केलंस दोन अडीच महिने,माझी साधी आठवण सुद्धा झाली नसेल ना,माझं नशीबच फुटक आहे म्हणा,दरवर्षी हा अडीच महिन्यांचा विरह मी पाचवीलाच लिहून आणलाय "तिचे हे शब्द सकाळी सकाळी कानावर पडले अन कुठंतरी मलाच माझी लाज वाटली .विचार आला की खरंय राव आपण गेल्या अडीच महिन्यात हिचा जरासुद्धा विचार केला नाही,आपण आपल्या संसारात एवढं गुरफटून गेलो की ही काय करत असेल,एकटी बोर होत असेल का,कोणी सोबत असेल की नाही,याचा जर सुद्धा विचार आपल्याला आला नाही .
"ए एवढा काय विचार करतोस,सोड यार,आलास ना,मला खूप छान वाटलं,आज एवढ्या मोठ्या कालावधीनंतर तू दिसलास अन माझं मन भरून आलं,कोणीतरी आपलं हक्काचं माणूस आलंय म्हणून अधिकाराने बोलले रे, नाहीतरी तुमच्याशिवाय आहे कोण मला,वर्षातले दहा महिने सोबत असते ना तुझी म्हणून राहवल नाही,आणि जरा जोरात बोलले,रागावलास का रे "या शब्दांनी मी पुन्हा भानावर आलो .
यावर्षी 17 जूनपासून लेकरांच्या शाळा सुरू होणार म्हणून मागच्या महिनाभर दप्तर,पुस्तकं, पाट्या,पेन्सिल, पेन,कव्हर,टिफिन बॅग,टिफिन बॉक्स अस काही काही खरेदी सुरू होती,त्या अगोदर महिनाभर रखरखत्या उन्हात कुठं बाहेर जाण्याचा मूड नसल्याने घरातच मस्त आय पी एल अन नंतर इलेक्शन चा आनंद घेतला .आज सकाळी सकाळी लेकीच्या शाळेत गेलो अन त्या शाळेनं अधिकार वाणींन मला मानतल सांगितलं .
खरंच तसं पाहिलं तर ती एक इमारत,दगड विटांनी बांधलेली, मात्र कच्चे बच्चे,शिक्षक,हेडमास्तर आणि हो पालक यांच्या गोंगाटाने ती फक्त इमारत राहतच नाही,ती आपल्या कुटुंबातिलच  एक बनून जाते.म्हणून तर तब्बल अडीच महिन्यांनी मी तिच्या समोर गेल्याने ती अधिकाराने बोलली .प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा हा अविभाज्य घटक आहे,कोणाला ती साहेब बनवते तर कोणाला व्यापारी अन कोणाला काही .शेकडो हजारो जण तिच्या अंगाखांद्यावर खेळून मोठे झालेले असतात .अलीकडच्या काळात तर लेकरू अडीच तीन वर्षांच झालं की त्याला तिच्या हवाली केलं जातं .
तस पाहिलं तर ती म्हणजे काळ्या कृष्णची जशी यशोदा तशीच या सगळ्या बालगोपाळांची यशोदा म्हणावी लागेल .कारण लेकरू जेवढ्या वेळ आई बापाकडे असतं तेवढाच वेळ तिच्या देखील कुशीत अन मुशीत असतं .आई बाप जसे आपल्या लेकरावर चांगले संस्कार करतात तसेच संस्कार ती सुद्धा त्याच्यावर करते .ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असते अन सोबतही असते म्हणून तर आपण सगळे पालक बिनधास्त असतो नाही का .
अशी ही शाळा आज जेव्हा मी तिच्या जवळ गेलो ना तेव्हा मला पाहून दिलखुलास हसली,काही क्षण प्रेयसी माझ्याकडे बघून हस्ते आहे असं वाटलं,काय फिलिंग होत राव ते काय सांगू .पोरीला सहावीच्या ,दुसऱ्या पोरीला दुसरीच्या अन तिसऱ्या कृतिकाला युकेजी च्या वर्गात सोडलं तेव्हा ती जेवढ्या आस्थेवाईकपणे बोलली ना त्याला तोड नव्हती .
तिच्या आवाजात आईची काळजी,बापाचा धाक होता.आता तब्बल दहा महिने माझी अन तिची रोज भेट होत राहील,न चुकता,हो हो न चुकता,कारण रविवार असला तरी मी कधी कधी तिला मुद्दाम भेटायला जातो .आपलं लेकरू रडल,पडलं,त्याला लागलं तर आपण जेवढं जपतो ना तेवढंच न पेक्षा अधिक ती करते,खरंच आपण कधीच विचार करीत नाही की उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन अडीच महिने ती काय करत असेल,रोज शेकडो हजारो पोरांच्या सोबतीची सवय लागलेल्या तिला हा अडीच महिन्याचा काळ खायला उठत असेल नाही का .आपलं घरातलं एक माणूस एक दोन तास नजरेआड गेलं तर आपण कावरेबावरे होतो, आपल्याला करमत नाही,मग शाळेची तर काय अवस्था होत असेल,विचार करूनच अंगावर काटा आला .
अव्यक्त अशा ती च्या मनातल्या भावना ऐकून खूप छान वाटलं,सजीव प्राणी,माणूस असो किंवा एखाद रोप,झाड,वेल, अथवा एखादी निर्जीव वस्तू,त्यांना सुद्धा कोणीतरी हक्काचं हवंच असतं ना,सहवासान जीव जडतो अन जीव जडला की विरहाचा त्रास होतो अस म्हणतात ते काही खोटं नाही हे मला तिच्याशी बोलल्यावर उमगलं .खूप काही बोललो आम्ही सांगेन पुन्हा कधी तरी निवांत,तोपर्यंत रोज तिच्या भेटीची ओढ कायम राहो हीच इच्छा !
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
942274440

शनिवार, २५ मे, २०१९

स्वयंमेव मृगेंद्रता ; पंकजा मुंडे

स्वयंमेव मृगेंद्रता ; पंकजा मुंडे ..........!

न अभिषेकों न संस्कारः सिंघस्य कियते वने । विक्रमाजिर्तस्त्वस्य स्वयमेव मृगेंद्रता ।।
अर्थात सिंहाला जंगलाचा राजा बनण्यासाठी कोणत्याही राज्याभिषेकाची गरज नसते तो आपल्या कार्यकर्तृत्वानेच स्वतः राजा बनतो .असच काहीस पंकजा मुंडे यांच्याबाबत म्हणावं लागेल .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमेव सभा वगळता कोणत्याही दिग्गज नेत्याची ना सभा झाली ना काही ,  तरी देखील त्यांनी बीड लोकसभा निवडणुकीत डॉ प्रीतम मुंडे यांचा विजय एकहाती खेचून आणत आपली ताकद अन योग्यता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे .प्रचंड जातीयवाद,टोकाची व्यक्तिगत टीका टिप्पणी,वडिलांवरून केलं गेलेलं टार्गेट, भावनिक राजकारण अशा सर्व मार्गांनी त्यांना राजकारणाच्या रणांगणात घेरलं असताना देखील त्यांनी ज्या सफाईदार पणे विजय खेचून आणला ते पाहता स्वयंमेव मृगेंद्रता हाच शब्द त्यांच्यासाठी चपखल बसतो हे नक्की  .
लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर राज्याचे लक्ष बीडकडे लागले होते,वरवर ही लढत प्रीतम विरुद्ध बजरंग सोनवणे अशी वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र ही लढत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे विरुद्ध ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अशीच झाली .बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत असो की लोकसभा कोणत्याही निवडणुकीत या बहीण भावाची प्रतिष्टा पणाला लागते हे निश्चित .यावेळी तर लढाई लोकसभेची होती,त्यामुळे दोघांनीही आपलं सर्वस्व पणाला लावले होतं .
वरकरणी पाहता ही निवडणूक भाजपसाठी तशी खूप सोपी होती,कारण पाच आमदार,जिल्हा परिषद,पंचायत समित्या,नगर पालिका,जिल्हा बँक अशा सगळ्या सत्ता भाजपच्या म्हणजे पंकजा मुंडे यांच्या ताब्यात होत्या,त्यामुळे ही लढत एकतर्फी होईल असे वाटत होते अन निकालाने ते स्पष्टही केलं मात्र त्यापूर्वी प्रचारादरम्यान जो काही आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला तो राजकारणाची पातळी किती खालावली आहे हे दाखवणारा होता .
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या त्यांच्या वडिलांचे नाव लावतात इथपासून ते त्यांच्या वागण्या बोलण्यापर्यंत व्यक्तिगत स्वरूपाची टीका केली गेली .अगदी प्रीतम मुंडे यांचे नाव मुंबईतील मतदार यादीत लावण्याचा करंटेपणा देखील विरोधकांनी करून प्रचाराची परिसीमा गाठली .
पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या प्रचारासोबतच राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यात सुद्धा प्रचार दौरे केले,त्यांनी मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र देखील पिंजून काढला .पंकजा मुंडे या तुसड्या आहेत,त्या कार्यकर्त्यांना टाकून बोलतात,वेड म्हणतात अशा प्रकारे टीका केली गेली मात्र प्रचारादरम्यान त्यांनी याकडे दुर्लक्ष करीत आपले टार्गेट आचिव्ह करण्यावर लक्ष केंद्रित केलं .जिल्ह्यातील भाजपसह इतरही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला .त्यांनी योग्य रसद पुरवली नाही म्हणून मीडिया मधील काही लोकांनी देखील त्यांच्या नावाने बोट मोडली,अगदी प्रीतम यांच्या पराभवासाठी काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते .परंतु माश्याच्या लेकराला जसं पोहण्याच शिकवावं लागत नाही तसं गोपीनाथ मुंडे यांच्या पोटी जन्म घेतलेल्या पंकजा यांना राजकारण कस करायचं हे शिकवण्याची गरज नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे .
देशात मोदी यांची लाट नसली तरी अंडरकरंट आहे हे विरोधक मान्य करीत नव्हते .बीड जिल्ह्यात तर सुरवाती पासूनच प्रचार जातीयवादावर केला गेला .एकीकडे पंकजा मुंडे या मी विकास करताना कधीही जातपात पाहिली नाही हे सांगत होत्या तर दुसरीकडे विरोधक मात्र  जातीचा आधार घेताना दिसत होते .काहीही करून पंकजा यांचा चौखूर उधळलेला वारू रोखायचाच अशा योजना विरोधक आखत होते तर दुसरीकडे पंकजा या आपल्या बुद्धिकौशल्याने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कार्यरत होत्या .
बीड जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षाच्या काळात रस्ते,रेल्वे, यामाध्यमातून जो काही विकास केला तो होता तर दुसरीकडे राष्ट्रवादीने दिलेला नवखा उमेदवार होता .राष्ट्रवादी ने शरद पवार यांना मुक्काम ठोकायला लावून लढतीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला मात्र पवारांचा मुक्काम देखील पराभव वाचवू शकला नाही .
प्रत्येक मतदार संघातील प्रमुख नेते किंवा समाजाचे मुकादम यांच्यासोबतच पंकजा मुंडे यांनी त्या त्या गावातील सरपंच,सोसायटीचे चेअरमन,बूथ लेव्हल चे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन एक पक्की मोट बांधली अन त्याच फलित एका दैदिप्यमान यशात झालं . राजकारण करताना किंवा युद्ध करताना समोर आपले आहेत की परके याचा विचार करायचा नसतो ही कृष्णाने अर्जुनाला शिकवलेली नीती पंकजा यांनी या निवडणुकीत तंतोतंत अंमलात आणली .समोरच्या बाजूने आपला भाऊच आपल्या विरोधात आहे हे माहीत असतानाही पंकजा डगमगल्या नाहीत .एखाद्या मुरब्बी राजकारण्याला लाजवेल अशी रणनीती त्यांनी आखली आणि यश खेचून आणलं .
"हम हम है बाकी सब पाणी कम है " हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं आहे .स्वपक्षीयांसोबतच मित्रपक्षातील लोकही त्यांच्या पराभवासाठी आतुर झालेले असताना या सगळ्यांना सणसणीत चपराक या विजयने बसली आहे . "बघतोस काय रागानं गड जिंकलाय वाघिणीनं "हेच पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं आहे .या वेळच्या निवडणुकीत भाजप चे कार्यकर्ते देखील साशंक होते,कारण जो भेटेल तो अवघड आहे,जातीयवाद खूप झाला,काठावर पास होऊ असच सांगत होता,एवढा मोठा विजय कोणालाच अपेक्षित नव्हता मात्र पंकजा यांनी ते करून दाखवलं आहे .
लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांनी रमेश कराड यांच्या माघारीपासून विरोधकांना दिलेल्या धक्यातून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत सावरलेच नाहीत.रमेश अप्पा ते बजरंग बप्पा अस एक वर्तुळ या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी पूर्ण केलं.या निवडणुकीत त्यांनी जादूच्या कांडीचा प्रयोग करीत जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याला आपल्या सोबत घेत विरोधकांना जोरदार धक्का दिला .सुरेश धस यांच्या रूपानं त्यांना एक रांगडा गडी लढण्यासाठी मिळाला अन त्यांचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला .धस यांनी ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली त्याच फलित निकालातून दिसून आलं .एकट्या आष्टी मतदार संघातून भाजपला 70 हजाराचे मताधिक्य मिळाले,त्याच बरोबर मोहन जगताप असोत की बदामराव पंडित या सगळ्यांना एकाच भात्यात घेत त्यांनी विरोधकांवर जे धनुष्य ताणले त्यामुळे विरोधक धारातीर्थी पडले .
या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी जे निर्विवाद यश मिळवले आहे ते पाहता  "आपला नाद नाही करायचा " हाच इशारा त्यांनी दिला आहे .या निकालामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू निश्चितपणे सरकली असणार यात शंका नाही ,कारण येत्या चार महिन्यावर विधानसभा निवडणुक येऊन ठेपली आहे,त्यामुळे ही बाई त्यावेळी काय करणार अन त्यावेळी देखील मोदी आणि फडणवीस यांचा करिष्मा चालला तर आपलं काय होणार या विचारानेच विरोधकांना धडकी भरली आहे .लोकसभा तो एक झांकी है विधानसभा अभि बाकी है अशीच चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे .
नेता ते सर्वसामान्य मतदार हा जो राजकारणाचा नवा ट्रेंड नरेंद मोदी यांनी या निवडणुकीत सुरू केला आहे काहीसं तसच काम पंकजा मुंडे यांनी या लोकसभा निवडणुकीत करून दाखवलं आहे,अधले मधले कोणालाही भाव न देता त्यांनी थेट रूट बेस च्या लोकांच्या मनाला हात घालीत राजकारणात आपणच शेर असल्याचं आणि आपल्याला कोणी रोखण्याचा प्रयत्न करू नये नसता तोंडावर पाडल्याशिवाय राहणार नाही हेच दाखवून दिलं आहे .या निकालाने अनेकांची दुकानदारी देखील कायमची बंद करण्यात पंकजा यांना यश आले आहे .जंगलाचा राजा सिंह हा जसा कोणाच्या इशाऱ्याने किंवा कोणाच्या सल्याने कारभार करीत नाही तो आपल्या मानाप्रमाणेच वागतो कारण तो राजा आहे आणि त्यामुळेच तो जंगलावर अधिराज्य गाजवतो हेच पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा या निकालाने सिद्ध केलं आहे .जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात त्यांचा एक मोठा दबदबा या निकालाने निर्माण झाला आहे याचा त्यांना आगामी राजकीय वाटचालीत निश्चितपणे मोठा लाभ होईल यात शंका नाही .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404 .

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

जातीयवादावर विकास वरचढ ठरणार !


ज्या बीड जिल्ह्याने रखमाजी गावडे यांच्यापासून ते केशरकाकू क्षीरसागर यांच्यापर्यंत अनेकांना त्यांची जातपात न पाहता लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याच बीड जिल्ह्यात आज जातीयवादाच भयानक विष पेरलं जात असल्याचे चित्र आहे, आपल्या जातीचा उमेदवार अस सर्रास सांगून ग्रामीण आणि शहरी भागात प्रचार सुरू आहे,एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार होणार असेल तर लोकशाही भविष्यात जिवंत आणि सुदृढ राहील का असा प्रश्न निर्माण होत आहे . सत्ताधारी असोत की विरोधक कधीही हा अमुक जातीचा तो तमुक जातीचा अस म्हणून लोकांची काम अडवत नाहीत ,प्रसंगी आपल्या जातीचा म्हणून काही लोक फेवर करीत असतील मग निवडणुकीतच का जात आठवते हे न उलगडणारे कोडे आहे.जातीयवाद काय असतो हे सध्या बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे मात्र त्यासाठी कान आणि डोळे उघडे असणे आवश्यक आहे .

जात नाही ती जात असं म्हणल जातं , कारण नको त्या ठिकाणी माणसाला जात आठवते किंवा जात दाखवायची सवय असते,विशेषतः निवडणुकीच्या काळात ही जात जास्तच प्रकर्षाने जाणवते नव्हे प्रदर्शित केली जाते.निवडणूक मग ती ग्रामपंचायत ची असो किंवा विधानसभा ,लोकसभेची ,प्रत्येकवेळी उमेदवार,त्याच शिक्षण,त्याचं भाषण कौशल्य,त्याची विकासाची भूमिका याकडे दुर्लक्ष करून लोक जातीचा विचार करतात तेव्हा लोकशाही आहे यावरील विश्वास डळमळीत होतो ,सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून बीडसह बहुतांश ठिकाणी जातीय समीकरणावरच भर दिला जात असल्याच चित्र आहे .यावर मतदारांनी लक्ष दिलं पाहिजे हे नक्की .

लोकसभेचा रणसंग्राम जाहीर झाला अन लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात प्रत्येक पक्ष जोशात मैदानात उतरला असल्याचं दिसून येत आहे .राज्यात बहुतांश ठिकाणी दुरंगी किंवा तिरंगी लढती असल्याचं चित्र आहे,भाजप सेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी यांच्यात प्रमुख लढत दिसते आहे,काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ने तगडे,लोकसंग्रह असलेले उमेदवार दिल्याने लढत रंगतदार होणार यात शंका नाही .बीड जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी विद्यमान खासदार डॉ प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यातच प्रमुख लढत असल्याचं चित्र आहे .

निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा किंवा वचननामा जाहीर करून मोठं मोठी आश्वासन देतो मात्र प्रचाराच्या काळात मुद्यावरची निवडणूक कधी जातीवर येते हे मतदारांच्या सुद्धा लक्षात येत नाही .बीड जिल्ह्यात एकीकडे पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासावर बोलत असताना विरोधक मात्र जिल्हा भकास केल्याची टीका करीत असताना दिसत आहेत .
आगामी काळात जिल्ह्यात मोठं मोठे प्रकल्प,उद्योग,शैक्षणिक संस्था कशा आणता येतील यावर बोलण्याऐवजी एकमेकांची उणी दुणी काढण्यात पुढारी मग्न असल्याचे चित्र आहे .जातीयवादातून राष्ट्रवाद धोक्यात येऊ शकतो याची फिकीर नसल्याचे दिसत आहे .विशेषतः पंकजा मुंडे यांच्यावर जाणीवपूर्वक मराठा विरोधी असल्याचं चित्र निर्माण केले जात आहे ज्यात फारसं तथ्य नसल्याचं दिसत कारण त्यांनी जातीयवाद केला असता तर वंजारेत्तर गावात विकासकामे किंवा निधी पोहचलाच नसता,आज जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून रस्ते,पाणी,शासकीय इमारती यांची कामे होताना दिसत आहेत,तरीदेखील त्यांच्याबाबत जी ओरड होते आहे ती राजकारणाचा दर्जा किती खालावला आहे याचेच द्योतक आहे .

स्व गोपीनाथ मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळात देखील जातीयवाद पसरवून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न झाला होता आणि यावेळी देखील तोच प्रयत्न असल्याचे दिसत आहे .मात्र मागच्यावेळी सुज्ञ मतदारांनी जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती हे विसरून चालणार नाही . बीड जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी मराठा आणि वंजारी असा जातीभेद दरवेळी निर्माण केला जातो हे जाणवत.कोणत्याही जातीचे लोक एकाच पक्षात असतात असे नाही आणि जातीचा म्हणून पक्षभेद विसरून सगळे एकत्र आल्याचे देखील उदाहरण नाही.पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे दोघे दोन वेगवेगळ्या पक्षात मोठ्या पदावर कार्यरत आहेत .त्यामुळे अमुक एक समाज आमच्याच पाठीशी आहे असा दावा कोणी करण्याची गरज नाही .

राज्यात सर्वाधिक आमदार हे मराठा समाजाचे आहेत मात्र ते एकाच पक्षात आहेत असे नाही,त्यामुळे सध्या बीड जिल्ह्यात जे चित्र निर्माण केले जात आहे त्यात फारसे तथ्य नसल्याचेच जाणवते .राष्ट्रवादी म्हणजे मराठ्यांचा पक्ष आणि भाजप म्हणजे शेटजी भटजी चा पक्ष असे आता राहिलेले नाही.मात्र निवडणूक जिंकायची असेल तर जातीय गणितं हमखास पाहिली जातात हे स्पष्ट आहे .तसे नसते तर संभाजी महाराज यांची भूमिका करणाऱ्या डॉ अमोल कोल्हे यांच्या जातीची चर्चा झालीच नसती किंवा आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागले आहेत असे विधान पन्नास वर्षे राजकारणात असलेल्या शरद पवार यांनी केलेच नसते .

बीड जिल्ह्यातील मतदारांनी कधीच उमेदवारांची जात पाहून मतदान केलेलं नाही अन्यथा अत्यल्प समाज असलेल्या केशरकाकू तीन वेळा बीडच्या खासदार झाल्याचं नसत्या किंवा मारवाडी समाजाचे द्वारकदास मंत्री कधीच खासदार झाले नसते .याच बीड जिल्ह्याने गंगाधर अप्पा बुरांडे यांना तसेच रखमाजी गावडे यांना सुद्धा लोकसभेत पाठवलं आहे .

अलीकडच्या काळात मात्र जातीयवादाच बीज जाणीवपूर्वक पेरलं जात असल्याच चित्र आहे .मुंडे विरुद्ध आडसकर असो की मुंडे विरुद्ध धस या दोन्ही निवडणुकीत मराठा वंजारा वाद निर्माण केला गेला,त्याचा फायदा त्या त्या पक्षांना किती झाला हे सर्वश्रुत आहे .यावेळी देखील हळूहळू जातीय स्वरूप निवडणुकीला दिल जात असल्याच दिसून येत आहे .त्यात सोशल मीडियाची भर पडल्याने वातावरण अधिकच गढूळ होणार अशी शक्यता आहे .कदाचित त्यामुळेच पालकमंत्री पंकजा मुंडे यांना विकास करताना आम्ही जात पाहिली नाही मग मतदान करताना जात का पाहिली जाते असा प्रश्न पडला असावा .पंकजा यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण केल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे,मात्र निवडणुकीत बोलायला मुद्दे नसले की समोरच्या उमेदवाराला जातीच्या चौकटीत कसं बसवायचं हे बीडमधल्या काही राजकीय  मंडळींना चांगलच माहीत आहे,त्याचाच वापर सध्या सुरू असल्याचे दिसतं .
मात्र पंधरा वीस वर्षांपूर्वी जसे जातीचे ठेकेदार होते तशी परिस्थिती आज नक्कीच नाही,आज कोणीही छातीठोकपणे माझ्या मागे इतका समाज आहे असे सांगू शकत नाही,तरीदेखील सध्या उमेदवाराची जात हा विषय विशेष चर्चेचा असल्याचे चित्र आहे .

बीड जिल्ह्यात भाजपचे जे सहा आमदार आहेत त्यातील आर टी, धस आणि पवार हे तिघे ही मराठा समाजाचे आहेत तरी देखील या समाजावर अन्याय झाला असे म्हणणे योग्य आहे का ? नक्कीच नाही तरीदेखील काही लोक जाणीवपूर्वक जातीयवाद पसरवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत,अशा प्रचारापेक्षा विकास,नवनवीन प्रकल्प,उद्योग याबाबतीत चर्चा व्हायला हवी असे वाटते .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड

गुरुवार, १४ मार्च, २०१९

राजकीय शत्रुत्व ..........!

राजकीय शत्रुत्व ...........!

राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो अस म्हंटल जातं नव्हे असे अनेकदा अनुभव आलेले आहेत ,मात्र देशाचं नेतृत्व करण्याची आस मनात बाळगणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या राजकीय धुरंधर व्यक्तीनं राजकीय शत्रुत्व किती खोल असत हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे,नगरच्या राजकारणात पवार आणि विखे कुटुंबातील कलह अवघ्या महाराष्ट्रानं 90 च्या दशकात पाहिला अन त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही होणार असे दिसते आहे .

महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठी घराणी कायम सत्तेत किंवा चर्चेत राहिलेली आहेत,त्यात शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील यांचा मोठा वाटा आहे,विखे आणि पवार हे दोघेही पश्चिम महाराष्ट्रात राहणारे ,एकाच पक्षात असून देखील या दोघांमधील संघर्ष लपून राहिलेला नाही .90 च्या काळात पवार आणि विखे यांच्यातील या संघर्षाला अधिकच धार आली,बाळासाहेब विखे यांचा पराभव करण्यासाठी तेव्हा मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवार यांनी गडाख कुटुंबाला जवळ करीत नगरच्या राजकारणात भूकंप घडवला ,मात्र पराभव जिव्हारी लागलेल्या बाळासाहेब विखे यांनी गडाख आणि पवार यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित करीत आपल्या पराभवाचे उट्टे काढले .सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पवार वाचले मात्र गडाख कुटुंबाचे राजकारण सहा वर्षासाठी थांबले.

90 च्या दशकात सुरू झालेला पवार विखे कुटुंबातील संघर्ष आज 20 वर्षानंतर देखील सुरूच आहे यावरून राजकारणात शत्रुत्व कसे असू शकते हे स्पष्ट होते .देशाच्या राजकारणात एकमेकाला पाण्यात पाहणारे मायावती,अखिलेश असोत की एकेकाळी भाजपशी जवळीक साधत नंतर त्यांच्यावरच टीकास्त्र सोडणाऱ्या ममता बॅनर्जी असोत,बदलत्या राजकीय परिस्थिती नुसार प्रत्येक राजकीय नेत्याने आपल्या भूमिका कायम बदलेल्या आहेत, मात्र राज्याच्या राजकारणात विखे पवार कुटुंबातील कलह काही थांबण्याची चिन्हे नाहीत .

शरद पवार हे नेहमीच पक्षाबाहेर राजकीय संबंध ठेवणारे म्हणून परिचित आहेत,देशपातळीवर सर्वपक्षीय आघाडी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे,मात्र असे असतानाही विखे कुटुंबाशी असलेली खानदानी दुष्मनी विसरण्यास पवार तयार नाहीत यातच सगळे काही आले .त्यातूनच पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला, हा नकार देताना पवार यांनी विखे पाटील कुटुंबाबद्दल जी वक्तव्य केली त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी च्या आघाडीवर देखील आविश्वासाचे ढग दाटले आहेत .

राजकारणात एक अधिक एक दोन न होता अकरा होतात हे न समजण्याएवढे पवार दुधखुळे निश्चितच नाहीत,मात्र ज्यांनी आपल्याला राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला त्या विखेंबद्दल पवार दोन पावलं माघार घ्यायला तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे .पवार नेहमी जे बोलतात त्याच्या विपरीत वागतात अस म्हणलं जात मात्र नगरच्या बाबतीत ते जे बोलले त्यावर ते कायम राहणार हे स्पष्ट दिसल्याने सुजय विखे यांनी भाजपची वाट धरली .

सुजय यांच्या निर्णयामुळे नगरची लढाई प्रतिष्टेची होणार यात शंका नाही .नगर मधून राष्ट्रवादीकडून अरुण जगताप यांचे नाव निश्चित मानले जात आहे ,मात्र दुसरीकडे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये आपण राष्ट्रवादी चा प्रचार करणार नाही असे सांगून आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली आहे .त्यांच्या या निर्णयामुळे नगरमध्ये काय होणार हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यकाराची गरज नाही .

नगरच्या संघर्षामुळे कदाचित काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला देखील मोठा फटका बसू शकतो .मात्र नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे अशी भूमिका जाणत्या नेत्यांनी घेतल्यास परिणाम दुर्दैवीच होणार हे निश्चित .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

डॉन......!डॉन......!!डॉन.........!!!

डॉन..........! डॉन........!!डॉन ......!!!

काही माणसांच्या नशिबात कायम सत्तेचा लाभ असतो किंवा त्यांना कायम जे मनात आणलं ते मिळतं, ते जिथं जातील तिथं आपली वेगळी छाप सोडतात,असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आमदार सुरेश धस होय .जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ते तीन वेळा आष्टी पाटोद्याचे आमदार,महसूल राज्यमंत्री आणि पुन्हा विधानपरिषद आमदार,हा धस यांचा यशाचा आलेख चढताच आहे .गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने जी प उपाध्यक्ष झालेल्या धस यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही,त्यामुळेच सत्तेच्या सारीपाटावरील डॉन म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली
 आहे .

आष्टी तालुक्यातील जामगाव येथून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरवात करणारे सुरेश धस हे इंजिनियर आहेत यावर कोणाचा विश्वास बसणार नाही,बीडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका सायकलवर बसून त्यांनी बजरंग सोनवणे, सतीश परभणीकर  (कुलकर्णी) सारख्या सवंगड्या सोबत शिक्षण पूर्ण केले,महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणाची आवड असणारे धस जामगाव चे सरपंच झाले,त्यानंतर साहेबराव दरेकर यांच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणात प्रवेश केला अन पुढे मुंबईसह राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले .
ज्या दरेकरांनी त्यांना राजकारणात स्थिर होण्यास मदत केली त्यांनाच या शिष्यांन 1999 साली मात देत आमदारकी मिळवली,सुरवातीला भाजपकडून आमदार झालेल्या धस यांनी सत्तेचा लाभ मिळवण्यासाठी अजित पवार यांच्याशी सलगी केली अन गोपीनाथ मुंडे सारख्या दिग्गज राजकारण्यांच्या हातातून बीड जिल्हा परिषदेची सत्ता हिसकावून घेतली,धस यांनी एवढा मोठा धक्का दिल्यानंतरही त्यांच्यात अन मुंडे साहेबांमध्ये कधी मनभेद पहायला मिळाले नाहीत,धस यांच्या पुतनीच्या लग्नात स्वतः मुंडे यांनी हजेरी लावून सुरेश धस यांच्यावर माझे विशेष प्रेम आहे हे जाहीरपणे सांगितले होते तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या,
काळाच्या ओघात धस यांनी राष्ट्रवादीची कास धरत शेवटच्या काही काळासाठी का होईना मंत्रिपद पदरात पाडून घेतलं .महसूल मंत्रिपदाची त्यांची कारकीर्द असो की महानंद च्या चेअरमन पदाचा कालावधी ते आपल्या बेधडक निर्णयामुळे कायम चर्चेत राहिले .
आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्याला ताकद भेटली तरच तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकतो या हेतूने त्यांनी अनेक कार्यकर्ते मोठे केले .भीषण दुष्काळाच्या काळात जनावरं जगली पाहिजेत म्हणून राज्यातील सर्वात मोठी 55 हजार जनावरांची छावणी उभारण्याचा विक्रम आजही त्यांच्या नावावर आहे .या छावणीतून त्यांच्या पदरात मात्र बदनामीच जास्त पडली .
जिल्हा परिषद पासून काम केल्यामुळे मुंबई असो की दिल्ली विकासकामे कशी करायची,त्यासाठी निधी कसा आणायचा,प्रस्ताव कसे तयार करायचे याचा त्यांच्याएव्हढा दांडगा अभ्यास दुसऱ्या कोणाचा नसेल .
आष्टी पाटोद्याचे आमदार असतानाही कायम जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा कायम राहिला पाहिजे या हेतूने त्यांनी अनेकांना अंधारातून मदत अन उघडपणे विरोधही केला,त्यामुळे अनेक हितशत्रू देखील तयार झाले .मात्र या माणसाने त्यांची कधीच फिकीर केली नाही .
रात्री अपरात्री कधीही केव्हाही कोणाचाही फोन उचलून त्याच काम मार्गी लावण्याची त्यांची वेगळी हातोटी आहे .ज्या पक्षात असतील त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी कसे जुळवून घ्यायचे अन काम कशी करून घ्यायची हे खरेच धस यांच्याकडून शिकण्यासारखे आहे .
राजकारणात निर्णय घेण्यापूर्वी हजार वेळा विचार करावा लागतो,एक चुकीचा निर्णय राजकीय करियर उध्वस्त करणारा ठरू शकतो मात्र धस यांनी जेव्हा जेव्हा निर्णय घेतले तेव्हा तेव्हा परिणामाची तमा बाळगली नाही .त्यातूनच मुंडे यांच्या विरुद्धचे जिल्हा परिषद मधील बंड असो की नुकत्याच झालेल्या जी प अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय असो,प्रत्येक वेळी त्यांनी बेधडक अन बिनधास्तपणे निर्णय घेतले अन ते नेहमीच त्यांच्या पथ्यावर पडले .
राजकारणात नेत्याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता लागू न देण्याचा गुण असावा लागतो,धस यांच्याकडे अशा गुणांची खाण आहे .पोटातील पाणी हलू न देणारा राजकारणी,समोरच्याला गोड बोलून आपलं इप्सित
साध्य करणारा माणूस म्हणून धस यांचा उल्लेख करावा लागेल .
लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य मतदार संघात त्यांनी ज्या पद्धतीने विजय मिळवला तो चांगल्या चांगल्या राजकीय धुरंधर व्यक्तींना विचार करायला लावणारा आहे .राजकारण हे व्यावसायिक पद्धतीने कसे करायचे हे धस यांच्याकडून शिकले पाहिजे .प्रचंड लोकसंग्रह ,मास लीडर म्हणून त्यांनी आपले नाव कमावले आहे.भुईवर बसून कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणारा अन प्रसंगी कामासाठी समोरच्याच्या अंगावर जात दोन हात करणारा राजकारणी अशी त्यांची इमेज असल्यानेच त्यांना राजकारणातील डॉन म्हटलं जातं .त्यांच्या या बिनधास्त स्वभावामुळे प्रशासनातील अधिकारी देखील त्यांना टरकून राहतात,एखाद काम हाती घेतल की ते पूर्ण झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही हा त्यांचा मूळ स्वभाव ."हम हम है,बाकी सब पाणी कम है "अशा पद्धतीने ते आजपर्यंत वागत आले आहेत,कर्म कर फल की चिंता मत कर अस म्हटलं जातं मात्र धस यांच्या बाबतीत फल मिलणेवाला हो तो ही कर्म करणा चाहीये अस म्हणावं लागेल,कारण काम होणार असेल तरच हा माणूस त्यात हात घालतो नाहीतर दुसऱ्या राजकारण्यासारखं नुसतं नादी लावण्याचं काम यांना जमत नाही .
लोकसेवेचा वारसा अन वसा घेऊन बारा महिने अठरा काळ जनतेच्या कामासाठी तत्पर असणाऱ्या या सालगड्यास  मनःपूर्वक शुभेच्छा !

लक्ष्मीकांत रुईकर, बीड

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

लोकनेत्याचे वारसदार ..............!


लोकनेत्याचे वारसदार .............!
राजकारण असो की समाजकारण कोणतंही नेतृत्व घडायला किंवा तयार व्हायला एक कालावधी जावा लागतो,टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण मिळत नाही तर माणसाला मान ,मरातब,जगन्मान्यता कशी मिळेल .कोणतंही नेतृत्व हे वारसा हक्कानं मिळण्यासारखं नसत,ती काही वडिलोपार्जित संपत्ती नाही की जी मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आपोआप येईल मात्र काही लोकांना नेतृत्व देखील वारसा हक्कांनच मिळत आणि ते त्यासाठी लायक असतात असं म्हणावं लागेल ,असच एक वारसाहक्काने तयार झालेलं नेतृत्व म्हणजे पंकजा मुंडे .वडिलांच्या वाट्याला आलेला संघर्षाचा असो अथवा रंजल्या गांजल्या लोकांची सेवा करण्याचा वारसा असो , पंकजा यांना हा वारसा वडील गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच मिळाला आहे हे मात्र खरं .
राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर लोकनेते म्हणून मान्यता मिळालेले किंवा जनतेने ज्यांना लोकनेता म्हणून स्वीकारले असे फार थोडे लोक आहेत ज्यात स्व गोपीनाथ मुंडे यांच नाव सर्वोच्च शिखरावर आहे .महाविद्यालयीन जीवना पासून ते शेवटच्या श्वासापर्यंत गोपीनाथ मुंडे यांच्या नशिबी संघर्षच आला ,त्यानंतर तो संघर्ष पंकजा मुंडे यांच्या वाट्याला आला .सुखाचे अन सत्तेचे दिवस आलेले असताना अचानक पितृछत्र हरपल्यानंतर कोलमडून न पडता पंकजा यांनी स्वतःसह जनतेला देखील सावरलं आणि संघर्षाची वाट यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला .
आजच्या राजकारणी मंडळींमध्ये संघर्ष करण्याची तयारी फार कमी दिसून येते,आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारांची संख्या वाढत असताना पंकजा यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे .ज्या जनतेनं गोपीनाथ मुंडे यांना लोकनेते हे बिरुद लावलं त्याच लोकांनी पंकजा यांना देखील ताईसाहेब ही नवी ओळख दिली आहे .
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्याचा वारसा पंकजा मुंडे सक्षमपणे चालवताना दिसतात .मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा यांनी त्यांचं नाव लोकांच्या कायम लक्षात राहील पाहिजे यासाठी गोपीनाथ गडाची निर्मिती केली .
एरव्ही कितीही मोठा नेता असला तरी दोन चार ठिकाणी पुतळे,दोन चार शाळा कोलेजना नावं या पलीकडे त्या नेत्याचं अस्तित्व दिसत नाही .मात्र माझे बाबा जरी हे जग सोडून गेले असले तरी मी त्यांनी दाखवून दिलेली वाट सोडणार नाही अन त्यांचा विसर लोकांना पडू देणार नाही असं सांगत पंकजा यांनी आपल मार्गक्रमण सुरू ठेवल आहे .
गोपीनाथ मुंडे यांची स्मृती कायम राहावी म्हणून परळी येथे भव्यदिव्य अशा गोपीनाथ गडाची निर्मिती करण्यात आली,अवघ्या वर्षभरात हा गड उभा राहिला,गड ऊर्जेचा गड प्रेरणेचा म्हणून आज या गडावर लाखो लोक नतमस्तक होतात .

पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या प्रमाणे पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे हे नाव जनमानसात कायम राहील यासाठी गेल्या तीन वर्षात सातत्याने धडपड केली आहे .गडाची निर्मिती केली म्हणजे झालं असं न मानता त्यांनी या गडाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांना सक्षम करण्याबरोबरच शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जाण्यासाठी शेकडो गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे .
गोपीनाथ रावांच्या पुण्यतिथी आणि जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर लाखो लोक एकत्र येतातच मात्र एरव्ही सुद्धा त्यांचं नाव कायम लक्षात रहावं यासाठी पंकजा मुंडे यांचा मदतीचा यज्ञ कायम सुरू आहे .
 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा '
या उक्ती प्रमाणे पंकजा यांनी लोकनेत्याचा वारसा चालवला आहे .
पंकजा यांची चालण्याची,बोलण्याची लगबग पाहिल्यानंतर अनेकांना गोपीनाथ मुंडे हेच समोर असल्याचा भास होतो,निर्णय घेण्याचे क्षण असोत की लोकांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची वेळ असो पंकजा यांच्यात लोकांना कायम साहेब दिसतात .ग्रामीण भाग आणि या भागातील लोकांचा विकास हेच मुंडे यांच स्वप्न होतं, त्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला त्यांचं हे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच पंकजा यांनी राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून प्रयत्न चालवल्याचे दिसून येते .
अंगणवाडी असो की महिला बचत गट अथवा ग्रामीण भागातील बालकांच्या कुपोषणाचा विषय प्रत्येक विषयात खोलवर अभ्यास करून उपाय योजना करण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षात पंकजा यांनी केल्यानेच खुद्द पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा गौरव केला .
राजकारणात मी पैसा कमविण्यासाठी आलेले नाही तर माझ्या बाबांचं कार्य आणि त्यांचं नाव लोकांच्या मनात कायम रहावं यासाठी आलेले आहे हे पंकजा मुंडे सातत्याने सांगत असतात ते किती खरं आहे हे त्यांच्या काम करण्याच्या स्टाईल वरून लक्षात येत .
ज्याचं जेवढं नाव मोठं त्याच्या नशिबी संघर्षही तेवढाच मोठा हा निसर्गाचा नियमच आहे,त्यामुळे लोकनेते पदाचा वारसा मिळाल्यानंतर त्यासोबत येणारा संघर्षही पंकजा यांना सहन करावा लागला आणि त्यांनी तो केला हे विशेष .
मुंडे यांची पोरगी म्हणून त्यांना राज्याच्या सत्तेत मानाचं पान मिळालं असत यात शंका नाही मात्र आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यातला आपला स्वभाव नाही हे दाखवून देत विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी संघर्ष यात्रा काढली आणि त्या माध्यमातून आपलं नेतृत्व सिद्ध केलं .राज्याच्या राजकारणात आज जे काही बोटावर मोजण्याएव्हढे ओबीसी नेते आहेत त्यात पंकजा यांचा क्रमांक सर्वात वरचा आहे .ओघवत्या अन तेवढ्याच कडव्या शब्दात आपलं म्हणणं जनतेला पटवून देत लाखोंच्या सभा गाजवण्याचं कसब त्यांना वारश्याने मिळालं आहे हे त्यांनी नेहमी सिद्ध केलं आहे .
केवळ राज्यातच नव्हे तर मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश,कर्नाटक,तेलंगणा या भागात जाऊन पंकजा मुंडे जेव्हा लाखोंच्या सभा गाजवतात तेव्हा गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही .
'गुरू ने दिला ज्ञानरुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा 'या प्रमाणे आपल्या वडिलांना च आपले राजकारणातील गुरू मानणाऱ्या पंकजा मुंडे यांनी त्यांचा संघर्ष अन जनसेवेचा वारसा पुढे चालवला आहे त्यामुळेच त्यांना आज लोकनेत्याची वारसदार ओळखले जाऊ लागले आहे .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...