गुरुवार, २५ जुलै, २०१९

ति च राजकारणच वेगळं ...........!

ती संघर्ष कन्या आहे,ती बायको आहे,ती मोठी बहीण आहे,ती आई सुद्धा आहे,एवढंच काय पण ती लाखो लोकांची माय देखील आहे एवढं कमी की काय म्हणून ती आता राजकारणातील बाप देखील झाली आहे,तीच राजकारणच वेगळं आहे,कारण ती आहे स्व गोपीनाथ मुंडे यांची कन्या,पंकजा गोपीनाथ मुंडे, आज तिचा वाढदिवस आहे,तिच्या भविष्यातील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा

सहसा वडिलांचा वारसा हा मुलगा चालवतो असे म्हणतात मात्र राजकारणामध्ये मुला ऐवजी मुलीनं वारसा यशस्वीपणे चालवून आपल्या वडिलांचं नाव राजकीय पटलावर कायम ठेवल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे होय . 2009 सालापासून पंकजा मुंडे यांची राजकीय कारकीर्द खर्‍या अर्थाने सुरू झाली मात्र या राजकीय कारकिर्दीला विकासाचे आणि प्रगतीचे धुमारे फुटले ते 2014 नंतर, कारण पाच वर्ष विरोधी पक्षात राहिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी लोकांची नस ओळखली आणि 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने यश मिळत गेलं. गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिला आहे. ग्राम विकास सारख्या खात्याला आर आर पाटलां नंतर जर कोणी न्याय दिला असेल तर ते नाव आहे पंकजा मुंडे यांच. त्यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्यामुळेच राज्याच्या राजकारणात भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर मास लीडर म्हणून जर कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते नाव पंकजा मुंडे यांचंच आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत संघर्ष मधून आपलं नेतृत्व उभा केलं , आणीबाणीच्या काळात संघर्ष करून मुंडेंनी तीस चाळीस वर्षाच्या राजकारणात आपली वेगळी छाप महाराष्ट्रातून ठेवली .गोपीनाथ मुंडे यांचा वारसा कोण चालवणार असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा पंकजा मुंडे यांचं नाव पुढे आलं आणि बापानं लेकी वर टाकलेला विश्वास सार्थ करत "हम भी कुछ कम नही" अशा पद्धतीने त्यांनी गेल्या दहा वर्षात कारभार केला आहे .विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी गेल्या पाच वर्षात विकासाचे नवे आयाम प्रस्थापित केले आहेत ते पाहिल्यानंतर त्या मुरब्बी राजकारणी आहेत असंच म्हणावं वाटतं, पंकजा मुंडे यांनी स्वपक्षी यांसोबतच विरोधी पक्षातील लोकांना देखील निधी देताना कुठलाही दुजाभाव केला नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो की जलयुक्त शिवार अथवा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न त्यांनी विकास कामांमध्ये कधीच राजकारण केलं नाही स्वतःच्या परळी मतदार संघातील नगरपालिका विरोधी पक्षाच्या ताब्यात असताना देखील पंकजा मुंडे यांनी या नगरपालिकेला भरभरून निधी दिला, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचं नवं रूप त्यांच्या सहकाऱ्यांना नव्हे तर विरोधी पक्षाला देखील पाहायला मिळालं. एकीकडे जातीय वादावरून पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असताना थेट मतदारांशी नाळ जोडत पंकजा यांनी निर्भेळ यश मिळवले ,हे करताना त्यांनी महाराष्ट्रातील विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो खानदेश अथवा मराठवाडा सर्वच ठिकाणी प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली ,याचेच द्योतक म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी तीन जूनला बारा पेक्षा अधिक खासदार आणि 25 पेक्षा अधिक आमदार व्यासपीठावर हजर होते, आणि त्यातील बहुतांश आमदार हे बहुजन समाजातील होते हे विशेष या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी आपण राज्याचे नेतृत्व करू शकतो हेच दाखवून दिलं .राजकारणात ठंडा करके खाना चाहिए हे ब्रीद वाक्य कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि पंकजा यांनी त्याच पद्धतीने काम करत हजारो लोकांच्या साक्षीने देवेंद्र फडणवीस यांना पुढील पाच वर्षासाठी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देत लोकांच्या मनातील गैरसमज दूर केला. गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडे यांनी ज्या पद्धतीने राजकारण केल आहे ते पाहता त्या लंबी रेस का घोडा आहेत हे कोणीच नाकारणार नाही .पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला एक सक्षम असं महिला नेतृत्व महाराष्ट्रात मिळाल आहे ,गेल्या पाच वर्षात त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी सोडला नाही मात्र या प्रत्येक संकटातून पंकजा मुंडे यांचे नेतृत्व अधिकच सरस बनत गेलं आणि त्यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत केलं, एक महिला म्हणून त्यांच्या वागण्या बोलण्यावर त्यांच्या राहणीमानावर टीका केली गेली मात्र त्यांनी या टीकेला आपल्या कार्यातून सडेतोड उत्तर दिलं "हम हम है बाकी सब पानी कम है" अशा पद्धतीने कारभार करताना पंकजा यांनी कुठेही तोल ढळू दिला नाही राजकारणा सोबतच आपलं घर संसार सांभाळून यावरही त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि त्यामध्ये त्या यशस्वी देखील ठरल्या. लोकांच्या अडचणीत धावून जाण्याबरोबरच त्यांना योग्य ट्रॅक वर आणण्यासाठी पंकजा यांनी अहोरात्र मेहनत घेतली, पंकजा मुंडे या फटकळ आहेत कडक शब्दात बोलतात लोकांना भेटत नाहीत लोकांची कामे लवकर होत नाहीत असे अनेक आरोप त्यांच्यावर केले गेले मात्र लोकसभा निवडणुकीत दिड लाखापेक्षा जास्त मताधिक्‍य देऊन आपल्या बहिणीला म्हणजेच डॉक्टर प्रीतम मुंडे यांना संसदेत पाठवून पंकजा यांनी नवा इतिहास घडवला आहे .
गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे ग्राम विकास विकास विभागाचा कार्यभार आला या खात्याच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याच स्वप्न मुंडे यांनी पाहिलं होतं मात्र त्यांचं अकाली निधन झालं आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न अधुर राहते की काय अशी चर्चा सुरू झाली परंतु आपल्या बाबांचा विसर जगाला पडू देणार नाही अशी शपथ घेत पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेच जनजीवन सुव्यवस्थित करण्याचा विडा उचलला, त्याचा त्यांना फायदा देखील झाला आज गडचिरोलीपासून ते साताऱ्यापर्यंत आणि मुंबईपासून ते उदगीर पर्यंत असा एकही मतदारसंघ नाही की ज्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचे फॉलोवर्स नाहीत ,एक महिला म्हणून निश्चितपणे त्यांना कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी रात्री-अपरात्री त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अडचणी येतातच परंतु तरीदेखील पंकजा यांनी ज्या पद्धतीने कारभार केला आहे तो पाहता एका कसलेल्या मुरब्बी राजकारण्याला लाजवणारा आहे असंच म्हणावं लागेल. आपल्या बाबांच्या नावाने परळी येथे गोपीनाथ गड उभारून त्यांनी वडीला प्रती असलेली निष्ठा दाखवून दिली .गोपीनाथ मुंडे म्हणजे हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री होता हे नाव त्यांनी राजकारणात अजरामर केलं. केवळ गड उभारून त्या थांबल्या नाहीत तर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान असो की इतर सामाजिक संस्था या माध्यमातून पंकजा यांनी मुंडे साहेबांचं नाव अजरामर केलं .आजही घराघरात गोपीनाथ मुंडे यांचा फोटो देव्हाऱ्यात दिसतो त्याचं कारण मुंडे यांनी केलेलं कार्य आहे मात्र बाबांच्या पश्चात त्यांचं नाव मोठं करण्यासाठी लेकिन जी मेहनत घेतली आहे ती वादातीत आहे.
असं म्हणतात की टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देखील देवपण येत नाही तसंच काहीसं पंकजा मुंडे यांच्या आयुष्यात घडल आहे. राजकारणातला त्यांचा प्रवेश हा घरातील संघर्ष मधून समोर आला,भाऊ धनंजय याला डावल्ल्याने घरातच महाभारत सुरू झालं होतं,अशावेळी जुन्या नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधत त्यांनी विजय मिळवला .वडिलांच्या अकाली जाण्याने एखादी दुसरी मुलगी असती तर कोलमडून पडली असती,मात्र आईचा खंबीर आधार,दोन बहिणींचा बाप आणि लाखो चाहत्यांची पंकजा माय झाली,काही लोकांनी यावरही टिका करण्याची संधी सोडली नाही मात्र वाईटातून चांगलं निर्माण करण्याच बाळकडू बापाकडून मिळवलेल्या लेकीन आपलं वेगळेपण वारंवार सिद्ध केलं .
 "तू सामने से आकर वार कर,पिछे से तो कुत्ते भी भोंका करते है "अशा पद्धतीने वागत पंकजा यांनी विरोधकांना चारिमुंडया चित केलं .आज राज्यातील मुंडेंवर प्रेम करणारे लाखो अनुयायी पंकजा मध्येच गोपीनाथ मुंडे यांना पाहतात,त्यांनी देखील लोकांच्या मनातील मुंडेंची प्रतिमा कायम राहावी यासाठी धडपड सुरूच ठेवली आहे . आपलं काम थेट आणि स्ट्रेट असतं ,आपल्याला छक्के पंजे जमत नाहीत,काम होणार असेल तर हो नाहीतर स्पष्ट नाही म्हणून सांगण्याचा माझा स्वभाव आहे असं त्या नेहमी बोलताना सांगतात .
खरतर राजकारणात अपघातानेच आलेल्या पंकजा मुंडे यांनी दहा वर्षात जी प्रगती केली आहे ती डोळे दिपवणारी आहे,सत्ता आल्यानंतर माणसात थोडा बदल होतो हे मान्य आहे पण पंकजा यांनी आपल्यात बदल करण्यापेक्षा लोकांच्या वैचारिक पातळीत बदल करण्याचा प्रयत्न केला अन त्यात त्या यशस्वी देखील झाल्या .सततच्या निवडणुका अन जाहीर सभेतून होणारी चिखलफेक त्यांना मान्य नाही मात्र ठकास ठक अन सज्जनाशी सज्जन हे आपल्या जगण्याचं सूत्र त्यांनी कायम जपलं आहे त्यामुळे त्या काही जणांना उद्धट,फटकळ वाटतात मात्र त्या जे काही बोलतात त्यामागचा हेतू लक्षात घेतल्यानंतर त्यांची थेट बोलण्यामागची तळमळ दिसून येते.
सत्तेत असल्यानंतर विकासकामे होणारच आणि त्यासाठी कोट्यावधी चा निधी येणारच त्यात विशेष अस काही नाही मात्र या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने व्हावा हे पाहण्याची पंकजा यांची धडपड वादातीत आहे .रस्ते,वीज,पाणी,शाळा खोल्या,अंगणवाडी इमारती यासोबतच लोकांच्या राहणीमानात आणि विचारसरणीत फरक व्हावा यासाठी देखील त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचं दिसून येत .पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकता येतात हा समज त्यांनी लोकसभा निवडणुकीत खोटा ठरवला.
लोकांची कामं करताना बडे दिलवाला ही मुंडे यांची इमेज त्यांनी कायम जपली आहे मात्र लोक निवडणूक आली की पैशासाठी दलबदलू पणा करतात या गोष्टीचा त्यांना ताण येतो हे अनेकवेळा त्यांच्याशी बोलताना जाणवतं .लोकांची नाळ ओळखून त्याना काय हवे नको याचा अभ्यास केलेल्या या महाराष्ट्राच्या संघर्ष कन्येच्या माध्यमातून बीडकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं भावी नेतृत्व पाहतो आहे,त्यांना मनेच्छित पद मिळो अन बिडकरांनी स्व मुंडे साहेबांच्या माध्यमातून पाहिलेलं स्वप्न पूर्ण होवो याच वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड,9422744404

रविवार, २१ जुलै, २०१९

राजकारणातील दोन ध्रुव !

राजकारणातील दोन दिग्गजांचा आज वाढदिवस, हे दोन्ही दिग्गज म्हणजे स्वभावाने अगदी दोन टोकं म्हणावी लागतील ,यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही  . एक कायम उपेक्षित दुर्लक्षित आणि दुष्काळी असलेल्या विदर्भातला तर दुसरा कायम संपन्न सुखी आणि सुजलाम-सुफलाम असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातला मात्र राजकीय पटलावर पश्चिम महाराष्ट्राच्या या सुजलाम सुफलाम असलेल्या नेत्यावर विदर्भ वीरांन मात केली अन मुख्यमंत्रिपद काबीज केलं . पश्चिम महाराष्ट्रातील नेते अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा अद्यापही अपूर्णच आहे तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीस या विदर्भवीर माणसानं मुख्यमंत्रीपदी आरूढ होत सर्वच राजकारण्यांना गेल्या साडेचार पाच वर्षात धक्का दिला आहे  . राज्याच्या राजकीय पटलावर आपल्या कारभाराचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या या दोन्ही नेत्यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस असावा हा देखील दैवी योगच म्हणावा लागेल .
राजकारणामध्ये शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 12 डिसेंबर ला असतो . त्यामुळे हे दोन्ही नावं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला कायम लक्षात आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षामध्ये राज्याच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे काम देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने केलं आणि पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी टाकली . शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस हा डिसेंबर महिन्यात असतो तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचा वाढदिवस 22 जुलैला असतो हा योगायोगच म्हणावा लागेल . मुंडे यांचा वारसा समर्थपणे चालवणारे फडणवीस आणि मोठ्या पवारांचा वारसा पुढे नेणारे अजित पवार यांचे वाढदिवस ही एकाच दिवशी आहेत राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांची सुरुवात नागपूर पासून झाली तर अजित पवार या दादा माणसानं राजकारणात पाऊल ठेवलं ते बारामती पासून . सुरुवातीला लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेत आपला वेगळा ठसा अजितदादांनी उमटवला तर दुसरीकडे नगरसेवक पदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली ती देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या पाच वर्षातील कार्यकाळ पाहिला तर स्वपक्षीय नव्हे तर विरोधी पक्षातील लोकांना देखील चांगल्या चांगल्या मुरलेल्या राजकारण्यांना देखील कात्रजचा घाट दाखवण्यात यशस्वी ठरले आहेत.फडणवीसांचा कारभार हा पहाटे चार वाजेपर्यंत चालतो सहसा ते राज्याच्या कोणत्याही भागात दौऱ्यावर असले तरी मुक्कामासाठी आपल्या वर्षा निवासस्थानी जातात त्याचं कारण रात्री दहानंतर महत्त्वाचे निर्णय महत्त्वाच्या फायली हातावेगळ्या करण्यासाठी वर्षावर पहाटे चार वाजेपर्यंत अधिकाऱ्यांचा राबता असतो .आपल्यावर पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून जनसेवेचे अखंड व्रत या देवेंद्राने अंगिकारल आहे . महाराष्ट्रात जलयुक्त शिवार असो की इतर कोणत्याही योजना ,सर्वसामान्य लोकांच्या दारात विकासाची गंगा नेण्याचं काम  फडणवीसांनी   केल आहे .राज्यातील पहिलाच मुख्यमंत्री असा असेल ज्याने दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी जिल्हावार बैठका घेतल्या आणि असा एकही जिल्हा नसेल ज्या ठिकाणी विकासकामासाठी फडणवीस गेले नाहीत. त्यांच्यावर जातीयवादाचा शिक्का लावून त्यांना नामोहरम करण्याचा देखील प्रयत्न झाला देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या जाणता राजाने फडणवीसांची जात काढण्यापर्यंत मजल मारली मात्र अशा कुठल्याही टीकेला आपल्या कार्यातून उत्तर देत फडणवीसांनी विरोधकांना नामोहरम केले .सत्ताधारी असो की विरोधक योग्य काम असेल तर त्यांनी कधीच आडवले नाही देशात 20 पेक्षा अधिक राज्यांमध्ये आज भाजप आणि मित्र पक्षाची सत्ता आहे मात्र या सर्व  मुख्यमंत्र्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे लाडके कोणी असतील तर ते आहेत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस . सलमान ज्या पद्धतीने म्हणतो की 'मेने एक बार कमिटमेंट कर ली तो मै अपने आप की भी नही सुनता 'तशाच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकदा निर्णय घेतला की तो बदलला आहे असे साडेचार वर्षात पाहायला मिळाले नाही.
फडणवीस यांनी आपल्या कारभाराचा जसा वेगळा ठसा राज्यात उमटवला तसाच काहीसा एक वेगळा थाट अजित पवारांनी मिरवला असं म्हणायला हरकत नाही. अजित पवार यांना राजकारणात दादा म्हणूनही संबोधले जात. कदाचित त्यांच्या स्वभावाला अनुसरून हे नाव असावं. अजित म्हणजे सर्व आघाड्यांवर विजय मिळवणारा अशाच पद्धतीने पंधरा वर्ष राज्याच्या राजकारणात सत्तेत असताना अजित पवारांनी स्वपक्षीय आणि विरोधी पक्षातील अनेक आघाड्यांवर आपली निरंकुश सत्ता कायम ठेवली. जे आहे ते थेट आणि रोखठोक बोलून मोकळं व्हायचं इतरांना काय वाटेल याचा विचार न करता निर्णय घेण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते काही वेळा अडचणीतही आले मात्र अजित पवारांनी त्याची कधी तमा बाळगली नाही. त्यांच्या पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील लोकही शब्द पाळण्याबद्दल अजित पवारांचं पाठीमागे देखील कौतुक करतात कारण त्यांना एखादं काम सांगितलं तर ते तातडीने झालंच पाहिजे असा त्यांचा स्वभाव आहे. आजही मंत्रालयातील नव्हे तर राज्यातील महसूल अधिकारी अजित पवार यांचं नाव निघताच आदरयुक्त भीतीने थरथर कापतात. प्रचंड अभ्यास राजकारणावरील घट्ट पकड यामुळे अजित पवार हे नाव महाराष्ट्राला सुपरिचित झालं .दुष्काळी मराठवाड्याला गोदावरी नदीवर बॅरेजेस बांधून सुजलाम सुफलाम करण्याचा अजित पवारांचा निर्णय मराठवाड्यातील जनता कधीच विसरू शकणार नाही. भलेही त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे हे बदनाम झाले असतील परंतु वरून नारळासारखा दिसणारा हा माणूस आतून मात्र मृदू आहे असाच अनेकांचा अनुभव आहे
राजकारण म्हणलं की टीकाटिपणी आरोप-प्रत्यारोप या गोष्टी आल्याच मात्र आरोप करताना ही पातळी सोडली नाही पाहिजे हे कायम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवल आहे .लोकसभेच्या काळात आपल्याच पक्षातील एका महिला कार्यकर्तीने फडणवीस आणि मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका सुरू केल्यानंतर तिला मध्येच थांबवत टीका करतानाही भाषा सभ्य वापरा असा वडिलकीचा सल्ला अजित पवारांनी दिल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल  आहे तर दुसरीकडे आपल्या पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील लोकांचं नावही यांनी आदराने घेतल आहे . शरद पवार असोत की विखे पाटील विकासाच्या कामांमध्ये कुठलाही आडपडदा न ठेवता निसंकोचपणे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सल्ला घेतला आहे.
या दोन्ही नेत्यांच्या स्वभावात मोठा फरक आहे,अजित पवार थेट बोलणारे तर देवेंद्र फडणवीस हसून काम करणारे आहेत, मात्र आपल्या आपल्या पक्षात आज या दोघांचे स्थान अढळ आहे हे निश्चित .राजकारणात विरोधकांना कसे रोखायचे यावर  विरोधकांनी फडणवीस यांच्याकडे क्लास लावायला हवेत .कारण प्रत्येक अधिवेशनापूर्वी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना माझ्याकडे तुम्ही मारलेल्या डल्याच्या फाईली आहेत अस छातीठोकपणे सांगणारा मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस होय .फडणवीस यांनी प्रशासनामध्ये जे मोठे बदल केले त्यामुळे ते कायम लक्षात राहतील .
राज्याच्या राजकारणावर आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटवणाऱ्या या नेत्यांमधील एकाने साठी ओलांडली आहे तर दुसरा पन्नाशीच्या घरात पोहचला आहे,या दोन्ही नेत्यांच्या हातून महाराष्ट्राचे महान राष्ट्र व्हावे,राज्य सुजलाम सुफलाम व्हावे हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

बुधवार, १९ जून, २०१९

पावसाला पत्र ..............!

आम्हाला माहीत आहे तू आमच्यावर रुसला आहेस,आमच्या अक्षम्य अशा चूका झाल्या आहेत,अरे पण तू लेकरं म्हणतोस ना आम्हाला मग लेकरं चुकली तर त्याची एवढी मोठी शिक्षा द्यायची असते का रे.आम्ही तुला कधी गांभीर्याने घेतलंच नाही रे,तू सहज यायचास,बागडायचास,वाडी वस्ती असो की सिमेंट काँक्रीट ची मोठं मोठी जंगल,तू कधी अजेदुजे पणा केला नाहीस,प्रत्येकासाठी तू सारखाच होतास.गरीबाच्या झोपडीत सुद्धा तू तितकाच आनंद द्यायचास अन राजमहालात सुद्धा तसाच खेळायचास.
मग अचानक मागच्या काही वर्षात तुझं कुठं बिनसलं हेच कळायला मार्ग नाही.दरवर्षी तू न चुकता हजेरी लावायचास. अंगाची लाही लाही करणारं ऊन जेव्हा होरपळून काढायचं तेव्हा आम्हाला तुझ्या आगमनाची आतुरता असायची.माग पुढं होईल पण तू जरूर जरूर येणार ही खात्री असायची आम्हाला .
अरे ए 'पावसा' बस कर ना आता तुझा हा शिवणापाणीचा खेळ.किती छळणार आहेस,सगळीकडं स्मशान शांतता आहे रे,जो तो तुझ्या आगमनाकडं डोळे लावून बसलाय .कधी एकदा येतोस अन आमचं शेत शिवार,अंगण,नद्या नाले,ओढे भिजवून टाकतोस अस झालंय आता .
अरे एवढी विनवणी आम्ही प्रत्यक्ष देवाला जरी केली असती तरी तो ही प्रसन्न होऊन आमच्यासमोर आला असता पण तू इतका निष्ठुर झालास की तुला पाझरच फुटेना झालाय .
आमच्या आजी आजोबांच्या काळात  मिरगाच्या सुरवातीलाच तू यायचास.अगदी तू आला म्हणजे मिरग सुरू झाला अस समीकरण झालं होतं .त्याकाळात तू धो धो बरसायचास,अगदी नंतर नंतर नको नको वाटायचास,पण तू आपला रतीब पूर्ण केल्याशिवाय कधीच थांबायचा नाहीस .तो काळ आम्हाला आता पुसटसा आठवतो कारण पिढी बदलली की घडी बदलते अस म्हणतात तसाच तुही बदललास पण इतका बदलशील अस वाटलं नव्हतं रे .अगदी एखाद्यानं मोठ्या हौसेनं लव्ह मॅरेज करावं अन पहिल्याच रात्रीला ब्रेकअप व्हावं अस काहीस तुझं झालं आहे .आम्ही तुझ्या माग लागलोय,तुझी आतुरतेने वाट पाहतोय पण तू मात्र रुसलेल्या बायकोप्रमाणे फुरंगुटुन बसला आहेस .
अरे यार आमच्या चूका झाल्या ,आम्ही झाडं तोडली,जंगल नष्ट केली अन सिमेंट काँक्रीट ची जंगलं उभारली .आम्ही एवढे आपलपोटे झालो की तू यावं अस वातावरणच ठेवलं नाही .पूर्वी ज्या हिरव्यागार गालिचा वरून तू यायचास तो गालिचा नष्ट आम्हीच केलाय हे देखील आम्ही जाणतो पण चुकतो तो माणूसच ना .जे काहीच काम करत नाहीत त्यांच्याकडून चूका होणारच नाहीत .आम्ही चुकलो त्याबद्दल आम्हाला खूप लाज वाटते आहे,आम्ही आता शतकोटी वृक्षलागवड सुरू केली आहे,यातून किती झाडं लागतील अन जगतील हे तुलाही माहीत आहे पण काहीच नसल्यापेक्षा काहीतरी करीत आहोत ना रे, त्याला काही मार्क देणार की नाही तू ,गेल्या काही वर्षात औषधालासुद्धा झाडं दिसत नाहीत ही म्हण आमच्यामुळेच आणि आमच्या अप्पल पोटे पणा मुळंच रूढ झालीय याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे रे,पण म्हणून तू एवढा सूड उगवायचा हे बरं नव्ह रे .
जिथं जिथं म्हणून मोकळी जागा दिसेल तिथं तिथं आम्ही घर,दार,माड्या, इमारती उभारल्या,त्यामुळं तू आमच्यावर रुसलास .सरकार मग ते कोणतंही असो त्यातही माणसंच काम करतात ना ,त्यांनी आपलं पोट भरण्यासाठी विकासाच्या नावाखाली नद्या,नाले ,ओढे गिळंकृत केले.टेकड्या पोखरून काढल्या,जंगल भुईसपाट केली त्यामुळं व्हायचं तेच झालं अन तू आमच्यावर कोपलास. बरं तुला बोकड,कोंबड्या चा नेवैद्य दाखवावा म्हणलं तर तू त्यालासुद्धा तयार होईना .तुझं आपलं एकच,तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वागलात ना आता "मेरी मर्जी "म्हणत तू दडून बसलास .
अरे मित्रा राग नको मानू पण अलीकडच्या इंग्रजाळलेल्या संस्कृतीनुसार आम्ही बापाला मित्र म्हणू लागलो आहोत त्या अधिकारातून तुला मित्र म्हणलो .तर मित्रा अडीअडचणीला मदतीला धावून येतो तोच खरा मित्र अस आम्ही पुस्तकात वाचलं होतं त्याला तरी जाग अन ये बाबा एकदाचा जोरात . पूर्वी कसा तू अगदी न चुकता ठरलेल्या वेळेला यायचास आता मात्र तू आवसा पुनवेला सुद्धा येशील की नाही याचा भरवसा राहिलेला नाही .
आम्ही झाडं तोडली,जंगल संपवली,गगनचुंबी इमारती उभारल्या हे सगळं आम्हाला मान्य आहे मात्र आम्ही तुला कायम घरातलं मानलं आहे रे,तू आमच्या कवींचा,लेखकांचा आवडीचा आहेस,अगदी कालिदास असोत की तानसेन अथवा ग्रेस किंवा भीमसेन बुवा, अगदी अलीकडच्या काळातील स्वप्नील बांदोडकर असो की संदीप खरे प्रत्येकाने तुला त्यांच्या त्यांच्या नजरेतून पाहिलं आहे,चितारल आहे,शब्दबद्ध केलं आहे,पहिला पाऊस अन मातीचा सुगंध आजही आमच्या रोमारोमात एक वेगळी नशा निर्माण करतो हे सगळं कसं विसरलास तू .कोणतीही प्रेम कविता असो की प्रियकर-प्रियसी च पहिल्यांदा भेटणं असो तू कायम आमच्या हक्काचा वाटला आहेस आम्हाला .प्रत्यक्ष देवावर सुद्धा जेवढं लिहिलं गेलं नसेल तेवढं आम्ही तुझ्यावर लिहिलं,ऐकलं, चितारल आहे रे,हे सगळं आम्ही तुझ्यावर प्रेम आहे,तू हक्काचं आहेस,तुझ्याशिवाय आमचं जगणं अवघड आहे या जाणिवेतूनच आम्ही केलं ना रे .मग आमच्यातल्याच काही स्वार्थी लोकांनी तुझ्या वाटेत सिमेंटची जंगल उभारून हिरव्या गार गालिचा ऐवजी काटे पेरले असतील तर तू मूठभर लोकांमुळे आम्हा सगळ्यांना का असा त्रास देतो आहेस .
तू अवखळ आहेस,लडिवाळ आहेस,गोजिरवाणा आहेस म्हणून तर आम्हाला आवडतोस.अनेक महिन्याचा दुष्काळ तू एका क्षणात दूर करू शकतोस हा विश्वास आहे आम्हाला .तरीसुद्धा तू यंदा जरा जास्तच कोपला आहेस की रे .जिथं नको तिथं बेफाम होऊन बरसतोस अन जिथं गरज आहे तिथं तरसवतोस ,हे वागणं काही बरं नाही गड्या .आमची लेकरं कॉन्व्हेंट मधून " रेन रेन गो अवे " म्हणत असली तरी देखील तुझी चाहूल लागताच त्यांच्या तोंडी आजही "ये रे ये रे पावसा,तुला देतो पैसा "हेच बोल येतात रे .आम्ही यंदापासून तुला शब्द देतो की तू जर वेळेवर येणार असशील तर आम्ही सुद्धा यावेळपासून तुझ्या स्वागताला हिरवागार गालिचा तयार करण्यासाठी झाडांची लागवड अन संगोपन करू .
आता एवढंच सांगून थांबतो अन हात जोडून विनवणी करतो ये रे येरे पावसा,तुला देतो पैसा, ये रे येरे पावसा .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

सोमवार, १७ जून, २०१९

अव्यक्त ती ..............!

बऱ्याच दिवसांनी नव्हे तब्बल दोन अडीच महिन्यांनी आज तीच दर्शन झालं,कस आहे ना,की कोणतीही व्यक्ती असो,वस्तू असो,प्राणी असो आपल्याला त्याच्या सहवासाची सवय जडली ना की भेट नाही झाली तर अस्वस्थ होतं, तसच काहीस तीचंही झाल्याची मला जाणीव झाली .
कधी नव्हे ते आज मी आवरून सावरून लवकर उठून तिच्याकडे जायचं ठरवलं,लेकर सुद्धा होते सोबत,खरतर त्यांच्यामुळेच मला तिची रोजची सवय झाली होती,आज तिच्याकडे जात असताना वाटेत लागणारी झाड,वेगवेगळी दुकानं, त्यावरील पाट्या,गतिरोधक,एवढच काय तर रस्ता देखील मी तिच्याकडेच चाललोय या कल्पनेने मोहरून गेल्याची जाणीव मला क्षणोक्षणी होत होती .
बरं तीला भेटायचं म्हणजे वेळेच भान अन बंधन ठेवावं लागतं हे नक्की .उग आपलं उठलं की सुटलं तिला भेटलं अस चालत नाही .तब्बल अडीच महिन्यांचा विरह काय असतो हे तिच्या पहिल्याच शब्दातून मला जाणवलं ।
"अरे आलास का,काय केलंस दोन अडीच महिने,माझी साधी आठवण सुद्धा झाली नसेल ना,माझं नशीबच फुटक आहे म्हणा,दरवर्षी हा अडीच महिन्यांचा विरह मी पाचवीलाच लिहून आणलाय "तिचे हे शब्द सकाळी सकाळी कानावर पडले अन कुठंतरी मलाच माझी लाज वाटली .विचार आला की खरंय राव आपण गेल्या अडीच महिन्यात हिचा जरासुद्धा विचार केला नाही,आपण आपल्या संसारात एवढं गुरफटून गेलो की ही काय करत असेल,एकटी बोर होत असेल का,कोणी सोबत असेल की नाही,याचा जर सुद्धा विचार आपल्याला आला नाही .
"ए एवढा काय विचार करतोस,सोड यार,आलास ना,मला खूप छान वाटलं,आज एवढ्या मोठ्या कालावधीनंतर तू दिसलास अन माझं मन भरून आलं,कोणीतरी आपलं हक्काचं माणूस आलंय म्हणून अधिकाराने बोलले रे, नाहीतरी तुमच्याशिवाय आहे कोण मला,वर्षातले दहा महिने सोबत असते ना तुझी म्हणून राहवल नाही,आणि जरा जोरात बोलले,रागावलास का रे "या शब्दांनी मी पुन्हा भानावर आलो .
यावर्षी 17 जूनपासून लेकरांच्या शाळा सुरू होणार म्हणून मागच्या महिनाभर दप्तर,पुस्तकं, पाट्या,पेन्सिल, पेन,कव्हर,टिफिन बॅग,टिफिन बॉक्स अस काही काही खरेदी सुरू होती,त्या अगोदर महिनाभर रखरखत्या उन्हात कुठं बाहेर जाण्याचा मूड नसल्याने घरातच मस्त आय पी एल अन नंतर इलेक्शन चा आनंद घेतला .आज सकाळी सकाळी लेकीच्या शाळेत गेलो अन त्या शाळेनं अधिकार वाणींन मला मानतल सांगितलं .
खरंच तसं पाहिलं तर ती एक इमारत,दगड विटांनी बांधलेली, मात्र कच्चे बच्चे,शिक्षक,हेडमास्तर आणि हो पालक यांच्या गोंगाटाने ती फक्त इमारत राहतच नाही,ती आपल्या कुटुंबातिलच  एक बनून जाते.म्हणून तर तब्बल अडीच महिन्यांनी मी तिच्या समोर गेल्याने ती अधिकाराने बोलली .प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा हा अविभाज्य घटक आहे,कोणाला ती साहेब बनवते तर कोणाला व्यापारी अन कोणाला काही .शेकडो हजारो जण तिच्या अंगाखांद्यावर खेळून मोठे झालेले असतात .अलीकडच्या काळात तर लेकरू अडीच तीन वर्षांच झालं की त्याला तिच्या हवाली केलं जातं .
तस पाहिलं तर ती म्हणजे काळ्या कृष्णची जशी यशोदा तशीच या सगळ्या बालगोपाळांची यशोदा म्हणावी लागेल .कारण लेकरू जेवढ्या वेळ आई बापाकडे असतं तेवढाच वेळ तिच्या देखील कुशीत अन मुशीत असतं .आई बाप जसे आपल्या लेकरावर चांगले संस्कार करतात तसेच संस्कार ती सुद्धा त्याच्यावर करते .ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असते अन सोबतही असते म्हणून तर आपण सगळे पालक बिनधास्त असतो नाही का .
अशी ही शाळा आज जेव्हा मी तिच्या जवळ गेलो ना तेव्हा मला पाहून दिलखुलास हसली,काही क्षण प्रेयसी माझ्याकडे बघून हस्ते आहे असं वाटलं,काय फिलिंग होत राव ते काय सांगू .पोरीला सहावीच्या ,दुसऱ्या पोरीला दुसरीच्या अन तिसऱ्या कृतिकाला युकेजी च्या वर्गात सोडलं तेव्हा ती जेवढ्या आस्थेवाईकपणे बोलली ना त्याला तोड नव्हती .
तिच्या आवाजात आईची काळजी,बापाचा धाक होता.आता तब्बल दहा महिने माझी अन तिची रोज भेट होत राहील,न चुकता,हो हो न चुकता,कारण रविवार असला तरी मी कधी कधी तिला मुद्दाम भेटायला जातो .आपलं लेकरू रडल,पडलं,त्याला लागलं तर आपण जेवढं जपतो ना तेवढंच न पेक्षा अधिक ती करते,खरंच आपण कधीच विचार करीत नाही की उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन अडीच महिने ती काय करत असेल,रोज शेकडो हजारो पोरांच्या सोबतीची सवय लागलेल्या तिला हा अडीच महिन्याचा काळ खायला उठत असेल नाही का .आपलं घरातलं एक माणूस एक दोन तास नजरेआड गेलं तर आपण कावरेबावरे होतो, आपल्याला करमत नाही,मग शाळेची तर काय अवस्था होत असेल,विचार करूनच अंगावर काटा आला .
अव्यक्त अशा ती च्या मनातल्या भावना ऐकून खूप छान वाटलं,सजीव प्राणी,माणूस असो किंवा एखाद रोप,झाड,वेल, अथवा एखादी निर्जीव वस्तू,त्यांना सुद्धा कोणीतरी हक्काचं हवंच असतं ना,सहवासान जीव जडतो अन जीव जडला की विरहाचा त्रास होतो अस म्हणतात ते काही खोटं नाही हे मला तिच्याशी बोलल्यावर उमगलं .खूप काही बोललो आम्ही सांगेन पुन्हा कधी तरी निवांत,तोपर्यंत रोज तिच्या भेटीची ओढ कायम राहो हीच इच्छा !
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
942274440

शनिवार, २५ मे, २०१९

स्वयंमेव मृगेंद्रता ; पंकजा मुंडे

स्वयंमेव मृगेंद्रता ; पंकजा मुंडे ..........!

न अभिषेकों न संस्कारः सिंघस्य कियते वने । विक्रमाजिर्तस्त्वस्य स्वयमेव मृगेंद्रता ।।
अर्थात सिंहाला जंगलाचा राजा बनण्यासाठी कोणत्याही राज्याभिषेकाची गरज नसते तो आपल्या कार्यकर्तृत्वानेच स्वतः राजा बनतो .असच काहीस पंकजा मुंडे यांच्याबाबत म्हणावं लागेल .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमेव सभा वगळता कोणत्याही दिग्गज नेत्याची ना सभा झाली ना काही ,  तरी देखील त्यांनी बीड लोकसभा निवडणुकीत डॉ प्रीतम मुंडे यांचा विजय एकहाती खेचून आणत आपली ताकद अन योग्यता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे .प्रचंड जातीयवाद,टोकाची व्यक्तिगत टीका टिप्पणी,वडिलांवरून केलं गेलेलं टार्गेट, भावनिक राजकारण अशा सर्व मार्गांनी त्यांना राजकारणाच्या रणांगणात घेरलं असताना देखील त्यांनी ज्या सफाईदार पणे विजय खेचून आणला ते पाहता स्वयंमेव मृगेंद्रता हाच शब्द त्यांच्यासाठी चपखल बसतो हे नक्की  .
लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर राज्याचे लक्ष बीडकडे लागले होते,वरवर ही लढत प्रीतम विरुद्ध बजरंग सोनवणे अशी वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र ही लढत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे विरुद्ध ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अशीच झाली .बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत असो की लोकसभा कोणत्याही निवडणुकीत या बहीण भावाची प्रतिष्टा पणाला लागते हे निश्चित .यावेळी तर लढाई लोकसभेची होती,त्यामुळे दोघांनीही आपलं सर्वस्व पणाला लावले होतं .
वरकरणी पाहता ही निवडणूक भाजपसाठी तशी खूप सोपी होती,कारण पाच आमदार,जिल्हा परिषद,पंचायत समित्या,नगर पालिका,जिल्हा बँक अशा सगळ्या सत्ता भाजपच्या म्हणजे पंकजा मुंडे यांच्या ताब्यात होत्या,त्यामुळे ही लढत एकतर्फी होईल असे वाटत होते अन निकालाने ते स्पष्टही केलं मात्र त्यापूर्वी प्रचारादरम्यान जो काही आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला तो राजकारणाची पातळी किती खालावली आहे हे दाखवणारा होता .
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या त्यांच्या वडिलांचे नाव लावतात इथपासून ते त्यांच्या वागण्या बोलण्यापर्यंत व्यक्तिगत स्वरूपाची टीका केली गेली .अगदी प्रीतम मुंडे यांचे नाव मुंबईतील मतदार यादीत लावण्याचा करंटेपणा देखील विरोधकांनी करून प्रचाराची परिसीमा गाठली .
पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या प्रचारासोबतच राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यात सुद्धा प्रचार दौरे केले,त्यांनी मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र देखील पिंजून काढला .पंकजा मुंडे या तुसड्या आहेत,त्या कार्यकर्त्यांना टाकून बोलतात,वेड म्हणतात अशा प्रकारे टीका केली गेली मात्र प्रचारादरम्यान त्यांनी याकडे दुर्लक्ष करीत आपले टार्गेट आचिव्ह करण्यावर लक्ष केंद्रित केलं .जिल्ह्यातील भाजपसह इतरही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला .त्यांनी योग्य रसद पुरवली नाही म्हणून मीडिया मधील काही लोकांनी देखील त्यांच्या नावाने बोट मोडली,अगदी प्रीतम यांच्या पराभवासाठी काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते .परंतु माश्याच्या लेकराला जसं पोहण्याच शिकवावं लागत नाही तसं गोपीनाथ मुंडे यांच्या पोटी जन्म घेतलेल्या पंकजा यांना राजकारण कस करायचं हे शिकवण्याची गरज नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे .
देशात मोदी यांची लाट नसली तरी अंडरकरंट आहे हे विरोधक मान्य करीत नव्हते .बीड जिल्ह्यात तर सुरवाती पासूनच प्रचार जातीयवादावर केला गेला .एकीकडे पंकजा मुंडे या मी विकास करताना कधीही जातपात पाहिली नाही हे सांगत होत्या तर दुसरीकडे विरोधक मात्र  जातीचा आधार घेताना दिसत होते .काहीही करून पंकजा यांचा चौखूर उधळलेला वारू रोखायचाच अशा योजना विरोधक आखत होते तर दुसरीकडे पंकजा या आपल्या बुद्धिकौशल्याने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कार्यरत होत्या .
बीड जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षाच्या काळात रस्ते,रेल्वे, यामाध्यमातून जो काही विकास केला तो होता तर दुसरीकडे राष्ट्रवादीने दिलेला नवखा उमेदवार होता .राष्ट्रवादी ने शरद पवार यांना मुक्काम ठोकायला लावून लढतीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला मात्र पवारांचा मुक्काम देखील पराभव वाचवू शकला नाही .
प्रत्येक मतदार संघातील प्रमुख नेते किंवा समाजाचे मुकादम यांच्यासोबतच पंकजा मुंडे यांनी त्या त्या गावातील सरपंच,सोसायटीचे चेअरमन,बूथ लेव्हल चे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन एक पक्की मोट बांधली अन त्याच फलित एका दैदिप्यमान यशात झालं . राजकारण करताना किंवा युद्ध करताना समोर आपले आहेत की परके याचा विचार करायचा नसतो ही कृष्णाने अर्जुनाला शिकवलेली नीती पंकजा यांनी या निवडणुकीत तंतोतंत अंमलात आणली .समोरच्या बाजूने आपला भाऊच आपल्या विरोधात आहे हे माहीत असतानाही पंकजा डगमगल्या नाहीत .एखाद्या मुरब्बी राजकारण्याला लाजवेल अशी रणनीती त्यांनी आखली आणि यश खेचून आणलं .
"हम हम है बाकी सब पाणी कम है " हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं आहे .स्वपक्षीयांसोबतच मित्रपक्षातील लोकही त्यांच्या पराभवासाठी आतुर झालेले असताना या सगळ्यांना सणसणीत चपराक या विजयने बसली आहे . "बघतोस काय रागानं गड जिंकलाय वाघिणीनं "हेच पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं आहे .या वेळच्या निवडणुकीत भाजप चे कार्यकर्ते देखील साशंक होते,कारण जो भेटेल तो अवघड आहे,जातीयवाद खूप झाला,काठावर पास होऊ असच सांगत होता,एवढा मोठा विजय कोणालाच अपेक्षित नव्हता मात्र पंकजा यांनी ते करून दाखवलं आहे .
लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांनी रमेश कराड यांच्या माघारीपासून विरोधकांना दिलेल्या धक्यातून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत सावरलेच नाहीत.रमेश अप्पा ते बजरंग बप्पा अस एक वर्तुळ या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी पूर्ण केलं.या निवडणुकीत त्यांनी जादूच्या कांडीचा प्रयोग करीत जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याला आपल्या सोबत घेत विरोधकांना जोरदार धक्का दिला .सुरेश धस यांच्या रूपानं त्यांना एक रांगडा गडी लढण्यासाठी मिळाला अन त्यांचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला .धस यांनी ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली त्याच फलित निकालातून दिसून आलं .एकट्या आष्टी मतदार संघातून भाजपला 70 हजाराचे मताधिक्य मिळाले,त्याच बरोबर मोहन जगताप असोत की बदामराव पंडित या सगळ्यांना एकाच भात्यात घेत त्यांनी विरोधकांवर जे धनुष्य ताणले त्यामुळे विरोधक धारातीर्थी पडले .
या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी जे निर्विवाद यश मिळवले आहे ते पाहता  "आपला नाद नाही करायचा " हाच इशारा त्यांनी दिला आहे .या निकालामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू निश्चितपणे सरकली असणार यात शंका नाही ,कारण येत्या चार महिन्यावर विधानसभा निवडणुक येऊन ठेपली आहे,त्यामुळे ही बाई त्यावेळी काय करणार अन त्यावेळी देखील मोदी आणि फडणवीस यांचा करिष्मा चालला तर आपलं काय होणार या विचारानेच विरोधकांना धडकी भरली आहे .लोकसभा तो एक झांकी है विधानसभा अभि बाकी है अशीच चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे .
नेता ते सर्वसामान्य मतदार हा जो राजकारणाचा नवा ट्रेंड नरेंद मोदी यांनी या निवडणुकीत सुरू केला आहे काहीसं तसच काम पंकजा मुंडे यांनी या लोकसभा निवडणुकीत करून दाखवलं आहे,अधले मधले कोणालाही भाव न देता त्यांनी थेट रूट बेस च्या लोकांच्या मनाला हात घालीत राजकारणात आपणच शेर असल्याचं आणि आपल्याला कोणी रोखण्याचा प्रयत्न करू नये नसता तोंडावर पाडल्याशिवाय राहणार नाही हेच दाखवून दिलं आहे .या निकालाने अनेकांची दुकानदारी देखील कायमची बंद करण्यात पंकजा यांना यश आले आहे .जंगलाचा राजा सिंह हा जसा कोणाच्या इशाऱ्याने किंवा कोणाच्या सल्याने कारभार करीत नाही तो आपल्या मानाप्रमाणेच वागतो कारण तो राजा आहे आणि त्यामुळेच तो जंगलावर अधिराज्य गाजवतो हेच पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा या निकालाने सिद्ध केलं आहे .जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात त्यांचा एक मोठा दबदबा या निकालाने निर्माण झाला आहे याचा त्यांना आगामी राजकीय वाटचालीत निश्चितपणे मोठा लाभ होईल यात शंका नाही .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404 .

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

जातीयवादावर विकास वरचढ ठरणार !


ज्या बीड जिल्ह्याने रखमाजी गावडे यांच्यापासून ते केशरकाकू क्षीरसागर यांच्यापर्यंत अनेकांना त्यांची जातपात न पाहता लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याच बीड जिल्ह्यात आज जातीयवादाच भयानक विष पेरलं जात असल्याचे चित्र आहे, आपल्या जातीचा उमेदवार अस सर्रास सांगून ग्रामीण आणि शहरी भागात प्रचार सुरू आहे,एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार होणार असेल तर लोकशाही भविष्यात जिवंत आणि सुदृढ राहील का असा प्रश्न निर्माण होत आहे . सत्ताधारी असोत की विरोधक कधीही हा अमुक जातीचा तो तमुक जातीचा अस म्हणून लोकांची काम अडवत नाहीत ,प्रसंगी आपल्या जातीचा म्हणून काही लोक फेवर करीत असतील मग निवडणुकीतच का जात आठवते हे न उलगडणारे कोडे आहे.जातीयवाद काय असतो हे सध्या बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे मात्र त्यासाठी कान आणि डोळे उघडे असणे आवश्यक आहे .

जात नाही ती जात असं म्हणल जातं , कारण नको त्या ठिकाणी माणसाला जात आठवते किंवा जात दाखवायची सवय असते,विशेषतः निवडणुकीच्या काळात ही जात जास्तच प्रकर्षाने जाणवते नव्हे प्रदर्शित केली जाते.निवडणूक मग ती ग्रामपंचायत ची असो किंवा विधानसभा ,लोकसभेची ,प्रत्येकवेळी उमेदवार,त्याच शिक्षण,त्याचं भाषण कौशल्य,त्याची विकासाची भूमिका याकडे दुर्लक्ष करून लोक जातीचा विचार करतात तेव्हा लोकशाही आहे यावरील विश्वास डळमळीत होतो ,सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून बीडसह बहुतांश ठिकाणी जातीय समीकरणावरच भर दिला जात असल्याच चित्र आहे .यावर मतदारांनी लक्ष दिलं पाहिजे हे नक्की .

लोकसभेचा रणसंग्राम जाहीर झाला अन लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात प्रत्येक पक्ष जोशात मैदानात उतरला असल्याचं दिसून येत आहे .राज्यात बहुतांश ठिकाणी दुरंगी किंवा तिरंगी लढती असल्याचं चित्र आहे,भाजप सेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी यांच्यात प्रमुख लढत दिसते आहे,काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ने तगडे,लोकसंग्रह असलेले उमेदवार दिल्याने लढत रंगतदार होणार यात शंका नाही .बीड जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी विद्यमान खासदार डॉ प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यातच प्रमुख लढत असल्याचं चित्र आहे .

निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा किंवा वचननामा जाहीर करून मोठं मोठी आश्वासन देतो मात्र प्रचाराच्या काळात मुद्यावरची निवडणूक कधी जातीवर येते हे मतदारांच्या सुद्धा लक्षात येत नाही .बीड जिल्ह्यात एकीकडे पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासावर बोलत असताना विरोधक मात्र जिल्हा भकास केल्याची टीका करीत असताना दिसत आहेत .
आगामी काळात जिल्ह्यात मोठं मोठे प्रकल्प,उद्योग,शैक्षणिक संस्था कशा आणता येतील यावर बोलण्याऐवजी एकमेकांची उणी दुणी काढण्यात पुढारी मग्न असल्याचे चित्र आहे .जातीयवादातून राष्ट्रवाद धोक्यात येऊ शकतो याची फिकीर नसल्याचे दिसत आहे .विशेषतः पंकजा मुंडे यांच्यावर जाणीवपूर्वक मराठा विरोधी असल्याचं चित्र निर्माण केले जात आहे ज्यात फारसं तथ्य नसल्याचं दिसत कारण त्यांनी जातीयवाद केला असता तर वंजारेत्तर गावात विकासकामे किंवा निधी पोहचलाच नसता,आज जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून रस्ते,पाणी,शासकीय इमारती यांची कामे होताना दिसत आहेत,तरीदेखील त्यांच्याबाबत जी ओरड होते आहे ती राजकारणाचा दर्जा किती खालावला आहे याचेच द्योतक आहे .

स्व गोपीनाथ मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळात देखील जातीयवाद पसरवून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न झाला होता आणि यावेळी देखील तोच प्रयत्न असल्याचे दिसत आहे .मात्र मागच्यावेळी सुज्ञ मतदारांनी जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती हे विसरून चालणार नाही . बीड जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी मराठा आणि वंजारी असा जातीभेद दरवेळी निर्माण केला जातो हे जाणवत.कोणत्याही जातीचे लोक एकाच पक्षात असतात असे नाही आणि जातीचा म्हणून पक्षभेद विसरून सगळे एकत्र आल्याचे देखील उदाहरण नाही.पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे दोघे दोन वेगवेगळ्या पक्षात मोठ्या पदावर कार्यरत आहेत .त्यामुळे अमुक एक समाज आमच्याच पाठीशी आहे असा दावा कोणी करण्याची गरज नाही .

राज्यात सर्वाधिक आमदार हे मराठा समाजाचे आहेत मात्र ते एकाच पक्षात आहेत असे नाही,त्यामुळे सध्या बीड जिल्ह्यात जे चित्र निर्माण केले जात आहे त्यात फारसे तथ्य नसल्याचेच जाणवते .राष्ट्रवादी म्हणजे मराठ्यांचा पक्ष आणि भाजप म्हणजे शेटजी भटजी चा पक्ष असे आता राहिलेले नाही.मात्र निवडणूक जिंकायची असेल तर जातीय गणितं हमखास पाहिली जातात हे स्पष्ट आहे .तसे नसते तर संभाजी महाराज यांची भूमिका करणाऱ्या डॉ अमोल कोल्हे यांच्या जातीची चर्चा झालीच नसती किंवा आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागले आहेत असे विधान पन्नास वर्षे राजकारणात असलेल्या शरद पवार यांनी केलेच नसते .

बीड जिल्ह्यातील मतदारांनी कधीच उमेदवारांची जात पाहून मतदान केलेलं नाही अन्यथा अत्यल्प समाज असलेल्या केशरकाकू तीन वेळा बीडच्या खासदार झाल्याचं नसत्या किंवा मारवाडी समाजाचे द्वारकदास मंत्री कधीच खासदार झाले नसते .याच बीड जिल्ह्याने गंगाधर अप्पा बुरांडे यांना तसेच रखमाजी गावडे यांना सुद्धा लोकसभेत पाठवलं आहे .

अलीकडच्या काळात मात्र जातीयवादाच बीज जाणीवपूर्वक पेरलं जात असल्याच चित्र आहे .मुंडे विरुद्ध आडसकर असो की मुंडे विरुद्ध धस या दोन्ही निवडणुकीत मराठा वंजारा वाद निर्माण केला गेला,त्याचा फायदा त्या त्या पक्षांना किती झाला हे सर्वश्रुत आहे .यावेळी देखील हळूहळू जातीय स्वरूप निवडणुकीला दिल जात असल्याच दिसून येत आहे .त्यात सोशल मीडियाची भर पडल्याने वातावरण अधिकच गढूळ होणार अशी शक्यता आहे .कदाचित त्यामुळेच पालकमंत्री पंकजा मुंडे यांना विकास करताना आम्ही जात पाहिली नाही मग मतदान करताना जात का पाहिली जाते असा प्रश्न पडला असावा .पंकजा यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण केल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे,मात्र निवडणुकीत बोलायला मुद्दे नसले की समोरच्या उमेदवाराला जातीच्या चौकटीत कसं बसवायचं हे बीडमधल्या काही राजकीय  मंडळींना चांगलच माहीत आहे,त्याचाच वापर सध्या सुरू असल्याचे दिसतं .
मात्र पंधरा वीस वर्षांपूर्वी जसे जातीचे ठेकेदार होते तशी परिस्थिती आज नक्कीच नाही,आज कोणीही छातीठोकपणे माझ्या मागे इतका समाज आहे असे सांगू शकत नाही,तरीदेखील सध्या उमेदवाराची जात हा विषय विशेष चर्चेचा असल्याचे चित्र आहे .

बीड जिल्ह्यात भाजपचे जे सहा आमदार आहेत त्यातील आर टी, धस आणि पवार हे तिघे ही मराठा समाजाचे आहेत तरी देखील या समाजावर अन्याय झाला असे म्हणणे योग्य आहे का ? नक्कीच नाही तरीदेखील काही लोक जाणीवपूर्वक जातीयवाद पसरवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत,अशा प्रचारापेक्षा विकास,नवनवीन प्रकल्प,उद्योग याबाबतीत चर्चा व्हायला हवी असे वाटते .

लक्ष्मीकांत रुईकर, बीड

गुरुवार, १४ मार्च, २०१९

राजकीय शत्रुत्व ..........!

राजकीय शत्रुत्व ...........!

राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो अस म्हंटल जातं नव्हे असे अनेकदा अनुभव आलेले आहेत ,मात्र देशाचं नेतृत्व करण्याची आस मनात बाळगणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या राजकीय धुरंधर व्यक्तीनं राजकीय शत्रुत्व किती खोल असत हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे,नगरच्या राजकारणात पवार आणि विखे कुटुंबातील कलह अवघ्या महाराष्ट्रानं 90 च्या दशकात पाहिला अन त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही होणार असे दिसते आहे .

महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठी घराणी कायम सत्तेत किंवा चर्चेत राहिलेली आहेत,त्यात शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील यांचा मोठा वाटा आहे,विखे आणि पवार हे दोघेही पश्चिम महाराष्ट्रात राहणारे ,एकाच पक्षात असून देखील या दोघांमधील संघर्ष लपून राहिलेला नाही .90 च्या काळात पवार आणि विखे यांच्यातील या संघर्षाला अधिकच धार आली,बाळासाहेब विखे यांचा पराभव करण्यासाठी तेव्हा मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवार यांनी गडाख कुटुंबाला जवळ करीत नगरच्या राजकारणात भूकंप घडवला ,मात्र पराभव जिव्हारी लागलेल्या बाळासाहेब विखे यांनी गडाख आणि पवार यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित करीत आपल्या पराभवाचे उट्टे काढले .सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पवार वाचले मात्र गडाख कुटुंबाचे राजकारण सहा वर्षासाठी थांबले.

90 च्या दशकात सुरू झालेला पवार विखे कुटुंबातील संघर्ष आज 20 वर्षानंतर देखील सुरूच आहे यावरून राजकारणात शत्रुत्व कसे असू शकते हे स्पष्ट होते .देशाच्या राजकारणात एकमेकाला पाण्यात पाहणारे मायावती,अखिलेश असोत की एकेकाळी भाजपशी जवळीक साधत नंतर त्यांच्यावरच टीकास्त्र सोडणाऱ्या ममता बॅनर्जी असोत,बदलत्या राजकीय परिस्थिती नुसार प्रत्येक राजकीय नेत्याने आपल्या भूमिका कायम बदलेल्या आहेत, मात्र राज्याच्या राजकारणात विखे पवार कुटुंबातील कलह काही थांबण्याची चिन्हे नाहीत .

शरद पवार हे नेहमीच पक्षाबाहेर राजकीय संबंध ठेवणारे म्हणून परिचित आहेत,देशपातळीवर सर्वपक्षीय आघाडी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे,मात्र असे असतानाही विखे कुटुंबाशी असलेली खानदानी दुष्मनी विसरण्यास पवार तयार नाहीत यातच सगळे काही आले .त्यातूनच पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला, हा नकार देताना पवार यांनी विखे पाटील कुटुंबाबद्दल जी वक्तव्य केली त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी च्या आघाडीवर देखील आविश्वासाचे ढग दाटले आहेत .

राजकारणात एक अधिक एक दोन न होता अकरा होतात हे न समजण्याएवढे पवार दुधखुळे निश्चितच नाहीत,मात्र ज्यांनी आपल्याला राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला त्या विखेंबद्दल पवार दोन पावलं माघार घ्यायला तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे .पवार नेहमी जे बोलतात त्याच्या विपरीत वागतात अस म्हणलं जात मात्र नगरच्या बाबतीत ते जे बोलले त्यावर ते कायम राहणार हे स्पष्ट दिसल्याने सुजय विखे यांनी भाजपची वाट धरली .

सुजय यांच्या निर्णयामुळे नगरची लढाई प्रतिष्टेची होणार यात शंका नाही .नगर मधून राष्ट्रवादीकडून अरुण जगताप यांचे नाव निश्चित मानले जात आहे ,मात्र दुसरीकडे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये आपण राष्ट्रवादी चा प्रचार करणार नाही असे सांगून आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली आहे .त्यांच्या या निर्णयामुळे नगरमध्ये काय होणार हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यकाराची गरज नाही .

नगरच्या संघर्षामुळे कदाचित काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला देखील मोठा फटका बसू शकतो .मात्र नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे अशी भूमिका जाणत्या नेत्यांनी घेतल्यास परिणाम दुर्दैवीच होणार हे निश्चित .

लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...